बटाटेवडा - लक्ष्मीबाई धुरंधर आणि प्रभुकुमारी यांच्या कृतींप्रमाणे

Submitted by चिनूक्स on 10 June, 2025 - 14:16
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

जिनसांची यादी कृतीत दिली आहे.

क्रमवार पाककृती: 

कोलंबियन एक्स्चेंजच्या कृपेनं बटाटा हे अतिशय उपयुक्त पीक जगभर पसरलं. भारतात ते पोर्तुगिजांनी आणलं, असं आपण मानतो, पण त्यासाठी भरभक्कम पुरावा नाही. सतराव्या शतकात बटाट्याची लागवड सुरतेस इंग्रजांच्या बागांमध्ये होत होती. तिथून तो गोव्यात गेला असावा, कारण तिथे तो सुरतेच्या नावानं ओळखला जात होता. एक नक्की की, भारतात बटाट्याचा प्रसार इंग्रजांनी केला.

या बटाट्याचा सर्वांत महत्त्वाचा आणि उपयुक्त इत्यादी पदार्थ म्हणजे बटाटावडा / बटाटेवडा.

बटाट्याच्या भाजीची कृती रामचंद्र सखाराम गुप्त्यांच्या सूपशास्त्रात आहे. मात्र त्यात बटाटावडा नाही.

बटाटावडा या नावानं पहिली कृती लक्ष्मीबाई धुरंधर यांच्या गृहिणीमित्रात सापडते.

ती पुढीलप्रमाणे -

चण्याचें पिठात मीठ, जिरें, मोहन घालून नरम कणकेसारखें भिजवावे. उकडलेले बटाट्यांच्या चुर्‍यात थोडें आलें, लसूण, मीठ, मिरची, कोथिंबीर, चिमूट दालचिनी, लिंबाचा रस घालून चुलीवर थोडे तुपांत परतून घ्यावें. मग चण्याचे पिठाचे वाटे वळून त्यांत हे पुरण भरून वाटोळें गोळें करून तुपांत तळावे.

आपण हल्ली करतो तशी ही कृती नव्हे.

तशी कृती प्रभुकुमारी यांनी मासिक मनोरंजनात लिहिली.

ती येणेप्रमाणे -

अर्धाशेर बटाटे घेऊन ते वाफावे. नंतर ते सोलून त्यांत चहाचा चमचाभर जिरें व बेताचेच मीठ घालून पाट्यावर वाटावे. मग त्या गोळ्यांत नारळाच्या एका वाटीचा कीस, ओल्या मिरच्या व कोथिंबीर इतके घालून तो गोळा मळावा. नंतर त्याच्या लहानलहान गोळ्या करून पानावर वळाव्या, व चण्याचें पीठ भज्यांच्या पिठाप्रमाणें कालवून त्यांत बुडवून भरतेलांत तळावें, ह्मणजे वडे चांगले फुगतात.

१९१३ सालच्या फेब्रुवारी महिन्यात ही कृती प्रसिद्ध झाली. गृहिणीमित्राची पहिली आवृत्ती १९१० सालची आहे.

प्रभुकुमारी गोरेगावात राहत. त्यांनी लेखनासाठी घेतलेल्या नावानुसार त्या पाठारे प्रभू समाजाच्या होत्या.

लक्ष्मीबाई धुरंधरही या समाजाच्या होत्या. आपल्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत त्या लिहितात - ’कोणतेही पदार्थ करणें झाल्यास चांगल्या साहित्याची आवश्यकता आहें असें म्हटलेंच आहे. तरी तें साहित्य तयार करण्यांतही थोडीशी कुशलता खर्च केली पाहिजे. उदाहरणार्थ, बटाट्यांचा काहीं पदार्थ करावयाचा आहे तर ते सोलले पाहिजेत व कच्चे बटाटे सोलणें म्हणजे एक कुशलतेचेंच काम होय. साल पातळ निघावें, बटाट्यांचा नाश होऊं नये व सालही सोलतांना तुटूं नये ही सोलण्याची कुशलता मुंबईच्या प्रभु लोकांतच फार आढळून येते. इतर लोक बटाटे वाफून नंतर त्यांचें साल काढतात. ह्यांत दोन तर्‍हेचा तोटा होतो. एक तर पाण्यामध्यें बटाट्याचा स्वाद निघून जातो व दुसरें, शिजविण्यास वेळ व लाकडें लागतात तीं निराळींच. ह्याकरितां बटाटे, आंबे, केसरा वगैरे सोलण्यास प्रत्येक गृहिणीनें अवश्य शिकावें हें बरें.'

असो.

कोणत्याही पद्धतीनं का होईना, बटाटेवडे करा आणि खा.

माहितीचा स्रोत: 
गृहिणीमित्र आणि मासिक मनोरंजन (फेब्रुवारी १९१३)
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>>>>>बटाट्यापेक्षा रताळ्यात नारळ, दालचिनी घालून चांगली लागतील.
अगदी मस्त नीरीक्षण आहे. पण उकडून नंतर लवंग घालून तुप साखरेत तळलेले रताळे जास्त मस्त लागेल.

IMG20250614204044.jpgIMG20250614200402.jpg
हे आज केले दुसऱ्या पद्धतीचे. चवीला उत्तम झालेत, सौम्य चव आली आहे खोबऱ्यामुळे. लसूण आणि लिंबू हे अधिकचे जिन्नस घातले. फोडणी वरून केली. मॅश केले बटाटे (वाटले नाहीत). मुलांना फारच आवडले तिखट नसल्याने. आता हे असे नेहेमी करेन. पाकृ बद्दल धन्यवाद. आणि हो आपल्या उपवास कचोरी सारखे अजिबात नाही लागत सारण. पूर्ण वेगळी चव आहे.

दुसर्‍या पद्धतीने आई बटाट्याचे पॅटीस करायची.
ओलं खोबरं, जीरं , मिरची , दालचिनी वगैरे आणि राजगिर्‍याच्या पीठाचा घोळ करून तव्यावर तळायची. उपवास नसला की लसूण , लिंबू वगैरे. रताळ्याचे पण अशीच करायची. हो, आणि ती बटाटा खिसायची उकडल्यावर एकजीव होवून पॅटीस तूटु नये म्हणून. पाट्यावर वाटायचा तोच हेतु असावा. गरगटीत व्हावं म्हणून.
रताळ्यात लवंग घालाय्ची.

Pages