श्रीमती कविता गाडगीळ यांनी भारतीयांना उद्देशून लिहिलेलं पत्र

Submitted by चिनूक्स on 28 April, 2025 - 00:27

२१ सप्टेंबर २००१ रोजी फ्लाईट लेफ्टनंट अभिजीत गाडगीळ यांचा मिग - २१ हे विमान चालवत असताना मृत्यू झाला. कॅप्टन अनिल आणि कविता गाडगीळ यांच्यासाठी हा मोठा आघात होता. सरकारनं अभिजीत गाडगीळ यांच्यावर अपघाताची जबाबदारी ढकलली. पुत्रवियोगाच्या दु:खात असूनही गाडगीळ दांपत्यानं तीन वर्षं सरकारशी लढा दिला. सरकारनं शेवटी मान्य केलं की चूक अभिजीत गाडगीळ यांची नसून विमानातील तांत्रिक बिघाडामुळे अपघात झाला. ’रंग दे बसंती’ या चित्रपटाची ही प्रेरणा होती.

गाडगीळ दांपत्याचा लढा केवळ त्यांच्या मुलासाठी नसून मिग - २१ विमानांच्या अपघातात बळी गेलेल्या दोनशेहून अधिक वैमानिकांसाठी होता.

यापुढे अधिक बळी जाऊ नयेत, म्हणून गाडगीळ पतीपत्नी सरकारदरबारी खेटे घालत राहिले.

२००६ साली त्यांनी भारतातलं पहिलं एव्हिएशन सिम्यूलेटर खडकवासल्याजवळ सुरू केलं. त्या काळी या प्रकल्पासाठी दोन कोटी रुपये खर्च आला. हा बहुतेक सगळा खर्च गाडगीळ कुटुंबानं केला. अभिजीत यांचे बंधू केदार यांनी पंचवीस लाख रुपये दिले.

पण आत्ता मुद्दा हा नाही.

कॅप्टन अनिल भारतीय वायुसेनेत वीस वर्षं कार्यरत होते. त्यांनी बांगलादेशाच्या युद्धात भाग घेतला होता.

काही दिवसांपूर्वी पहलगाम इथे अतिरेक्यांनी केलेल्या नृशंस हत्याकांडानंतर देशभर पाकिस्तानाशी युद्ध करावं, ही मागणी जोर धरू लागली. मुसलमानांवर आर्थिक बहिष्काराची भाषा तर हल्ल्यानंतर पाचेक मिनिटांत सुरू झाली.

या पार्श्वभूमीवर कविता गाडगीळ यांनी भारतीयांना उद्देशून एक खुलं पत्र लिहिलं. तुमच्यापैकी अनेकांनी ते आतापावेतो इतरत्र वाचलंही असेल.

कविता यांनी सांगितल्यानुसार केदार यांनी ते इंग्रजीत लिहिलं. त्या पत्राचा अनुवाद भक्ती बिसुरे यांनी केला आहे.

हे पत्र मायबोली.कॉमवर पुनर्मुद्रित करायला परवानगी दिल्याबद्दल भक्ती बिसुरे यांचे मन:पूर्वक आभार.

***

माझ्या प्रिय भारतीय बंधुभगिनींना,
सप्रेम नमस्कार!

आज माझ्या मुलाचा वाढदिवस आहे. माझा मुलगा म्हणजे फ्लाईट लेफ्टनंट अभिजित गाडगीळ! अभिजित आज असता तर ५१ वर्षांचा झाला असता… पण माझ्यासाठी मात्र तो २७ वर्षांचाच आहे अजूनही.

कुठल्याही आईसाठी तिचं मूल कितीही मोठं झालं तरी ते कायम लहानच असतं म्हणून नाही… पण अभिजित २७ वर्षांचा असताना घडलेल्या घटनेने जणू काळ गोठला आणि सगळं जिथल्या तिथे थांबलं.

२००१ मध्ये सप्टेंबरच्या त्या रात्री अभिजितने त्याच्या ‘मिग -21’ मधून टेकऑफ केलं. त्यानंतर अवघ्या ३३ सेकंदांमध्ये सगळं होत्याचं नव्हतं झालं. अभिजितचं ‘मिग-21’ क्रॅश झालं. काही म्हणजे काही हाती लागलं नाही. फक्त रिकामं भकास आकाश आणि जीवघेणी शांतता तेवढी मागे राहिली…
त्या तसल्या जीवघेण्या शांततेचं ओझं अनेक वर्षं मनावर आहे, म्हणूनच मी आज तुम्हा सगळ्यांशी बोलायचं ठरवलंय.

एखाद्या हिंसक प्रसंगानंतर येणारी शांतता मोठी भीषण असते. भूतकाळातली सुखदुःखं, श्वास, जगणं हे सगळं नाहीसं झाल्यामुळे निर्माण झालेली ती एक पोकळी असते. ही पोकळी उरावर घेऊन जगण्याच्या यातनांची कल्पनाच न केलेली बरी…

ती तसली भीषण पोकळी आता मला परत जाणवू लागली आहे… आणि त्यातच युद्ध हवं म्हणणाऱ्या आवाजांचे सूरही टिपेला पोहोचले आहेत.

मी १२ वर्षांची होते तेव्हा १९६२चं युद्ध झालं. आमच्या जगण्यातलं सगळं निरागसपण त्या युद्धानं हिरावून घेतलं.

आपली तरणीताठी मुलं गमावलेल्या, मोडून पडलेल्या आयांना बघत मी लहानाची मोठी झाले. नुकतंच लग्न झालेल्या आणि नवरा युद्धात कामी आल्यावर सर्वस्व गमावलेल्या कितीतरी तरुण मुली पाहिल्या आहेत मी. पुढे माझंच लग्न हवाईदलातल्या एका धडाडीच्या अधिकाऱ्याशी झालं. त्यानंतरची किती तरी युद्धं आम्ही दोघांनी एकत्र पाहिली.

१९७१चा तो कडाक्याचा हिवाळा मी फक्त हेडलाईन्समधून बघितलेला नाही, तर प्रत्यक्ष अनुभवलाय. माझा नवरा तेव्हा जोरहाटवरुन सतत मोहिमांवर जात असे. कधी युद्धभूमीवर लढणाऱ्यांसाठी राशन पोहोचवायचं म्हणून, तर कधी पूर्व पाकिस्तानातून जखमी किंवा मृत सैनिकांना परत आणायचं म्हणून त्याच्या अविश्रांत फेऱ्या सुरु असत. जीव धोक्यात घालणाऱ्या मोहिमांसाठी तो टेकऑफ करायचा तेव्हा मागे एकाकी धावपट्टीवर उभी राहून कित्येकदा मी त्याच्या सुरक्षेसाठी प्रार्थना केलीये. युद्धासारखी वाटणारी शांतता आणि शांतता ढवळून टाकणारी युद्ध हे सगळं मी जवळून पाहिलंय.

ज्यांनी कधी ना कधी युद्धावर गेलेल्या कुणाच्या तरी वाटेकडे डोळे लावून बसणं काय असतं हे अनुभवलंय, त्यांनाच युद्ध हे कुठल्याही समस्येवरचं उत्तर नाही याची जाणीव असते, याची मला पुरेपूर कल्पना आहे.

युद्ध म्हणजे विनाश. युद्ध म्हणजे नांदत्या कुटुंबांचे लचके तोडणं. युद्ध हा त्याग आहे, आणि त्या त्यागाची अपेक्षाही सहसा अशाच लोकांकडून केली जाते, ज्यांच्याकडे मुळातच फार काही नसतंच…

युद्धात बहुतेकवेळा सर्वसामान्य, गरीब, मध्यमवर्गीय शेतकऱ्यांची, कर्मचाऱ्यांची, नोकरदारांची आणि शिक्षकांची मुलंच कामी येतात. श्रीमंतांची मुलं तिथपर्यंत कधीच पोहोचत नाहीत. त्यामुळेच कर्त्यासवरत्या मुलाच्या बदल्यात मिळणारा तिरंगाही सर्वसामान्य आयांच्याच वाट्याला येतो.
युद्धाची खरी किंमत नेहमी बायकांनाच मोजावी लागते. ती किंमत काय असते? आपली तरुण मुलं गमावल्यावर त्यांच्या मागे कुढत जगत राहणं, नवरा गमावल्यावर आपलं दुःख बाजूला ठेवून एकटीने मुलांना वाढवणं, युद्धात भाऊ गेल्यानंतर उरलेलं आयुष्य भावाची उणीव घेऊन सैरभर जगत राहणं…

परवा पहलगाममध्ये जे झालं त्यानंतर देशात उफाळून आलेला संताप मला दिसतो आहे. मला तो कळतोही आहे. पण म्हणूनच मला तुम्हाला कळकळीची विनंती करायची आहे, आपल्या तरुण तडफदार मुलांना वृथा अभिमान आणि सूडाच्या तोंडी देण्यापूर्वी थांबा आणि सारासार विचार करा. मोठमोठ्या व्यासपीठांवर, न्यूज चॅनल्सच्या चर्चांमध्ये किंवा अगदी सोशल मीडियावरच्या चर्चेत ‘युद्ध हाच उपाय’ म्हणून कंठशोष करणाऱ्यांना युद्धाची किंमत मोजायची नाहीये, नसते. वेळ आलीच तर तुमचीआमची मुलं, विद्यार्थी, शेजारी, प्रियजन - पर्यायाने तुम्हीआम्ही त्या युद्धाची किंमत मोजतो. आणि किंमत म्हणजे फक्त तिरंग्यात लपेटून आलेले आपल्या माणसांचे मृतदेह नव्हे… युद्धात झालेली सर्व प्रकारची हानी भरुन यायला कितीतरी वर्ष जावी लागतात. कितीतरी पिढ्या मातीमोल होतात तरी युद्धाच्या जखमा भरत नाहीत आणि भविष्य म्हणजे फक्त अंधकार असतो!

अण्वस्त्रसज्ज शेजाऱ्यांमधल्या युद्धाचा अर्थ, त्याची भीषणता, गांभीर्य आपल्यापैकी किती लोकांना कळतं मला माहिती नाही. पाकिस्तान अत्यंत अस्थिर आणि आततायी देश आहे. ‘नो फर्स्ट यूझ’ हे धोरण त्या देशाला मान्य नाही. अण्वस्त्राचा वापर झाला तर अवघ्या काही तासांमध्ये सुमारे एक कोटी भारतीय (आणि पाकिस्तानीही!) नागरिक मरतील. आपल्या जमिनी आणि नद्या तहहयात विषारी होतील. साडेतीन कोटी लोक आयुष्यभर ‘मरण आलं असतं तर बरं’ अशा वेदना घेऊन जगतील आणि त्या वेदनांवर कुठलीही औषधं कधीही पुरे पडणार नाहीत.

तुम्हाला माहितीये, ८० कोटी भारतीय रेशनच्या धान्यावर जगतात. तरुणांमध्ये बेरोजगारीचं प्रमाण प्रचंड आहे. भारतीय सैन्यदलांच्या धाडसाबद्दल दुमत नाही, पण आपल्याकडे एक लाख सैनिक आणि १२,००० अधिकाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत. आपल्या हवाईदलाला ४२ स्क्वाड्रन्सची गरज आहे, पण आपल्याकडे आहेत कशाबशा ३१, त्यातलीही बहुतेक विमानं आता खूप जुनी आहेत. नौदलाकडे १५ पेक्षा कमी पाणबुड्या काम करण्याच्या अवस्थेत आहेत आणि चीनकडे मात्र सुमारे ७० पाणबुड्यांचा ताफा आहे… उद्या खरंच युद्ध सुरु झालं तर आपण कसेबसे दोन आठवडे लढू शकू, याची कल्पना आहे आपल्याला?

सैनिकांचे बूट, जॅकेट्स, रेडिओ, रायफल्स, टेंट्स, औषधं… आणि माफ करा, मला हा शब्द लिहिणंही जड जातंय, पण अगदी शवपेट्यांसाठीही आपण इतरांवर अवलंबून आहोत हे आपल्यापैकी किती लोकांना माहिती आहे? आणि आपण युद्धाचे मनोरथ रचत असताना तिकडे चीन मात्र अरुणाचल प्रदेश, लडाख, सिक्कीम आणि आपल्या हातून निसटू शकेल असं सगळं सगळं गिळंकृत करायला बसलाय, हे दिसतंय का कुणाला? अमेरिका आपल्याला सहानुभूती देईल, भाषणं देईल, महागडा शस्त्रसाठा देईल, पण त्यांची मुलंबाळं आपल्याला देणार नाही, हे लक्षात असुदे ‘युद्ध हवं’ म्हणणाऱ्या सगळ्यांच्याच.

आपल्यावर झालेल्या अन्यायाला पोटात घ्या, असं मी अजिबात म्हणत नाही. पहलगामचा बदला घ्यायला हवाच. या सगळ्याला जबाबदार असलेल्यांना सुळावर चढवून आपल्याला न्याय मिळायलाच हवा. आपल्या इंटेलिजन्सचा दर्जा सुधारायला हवा. संरक्षण अधिक काटेकोर हवं. अपयश समोर यायला हवं आणि त्याची दुरुस्तीही व्हायला हवी. वरपासून खालपर्यंत जे जे दोषी आहेत त्यांची गच्छंतीही व्हायलाच हवी.

पण सुडाच्या वारुवर उधळताना आपल्यातलं शहाणपण हरवतां नये. त्यातून आपला प्रवास विनाशाकडे होता नये. ते होऊ नये म्हणून, या देशावर जीवापाड प्रेम करणारी एक नागरिक म्हणून मी तुम्हा सगळ्यांना हे कळकळीचं आवाहन करते आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, देशाच्या रक्षणार्थ मी माझा मुलगा दिला आणि तो मला परत मिळाला नाही. एक वीरमाता म्हणून माझं तुम्हाला हे आवाहन आहे. भारताला आत्ता नेमक्या कशा नेतृत्वाची गरज आहे ते ओळखून तुम्ही वागावं, अशी माझी अपेक्षा आहे. क्रोधाचे ढग गडद होतात तेव्हा आरडाओरडा करणं म्हणजे ताकद नव्हे, तर स्थिर राहाणं ही ताकद आहे हे, तुम्ही सगळ्यांना दाखवून द्यावं, असं मला वाटतं. मृतांना न्याय मिळवून द्यायचा आहे, पण त्यासाठी हयात असलेल्यांच्या भविष्याशी खेळायचं नाही, हे तुम्ही जमवायला हवं. ‘स्टेट्समनशिप’ चा अर्थ तुम्ही इतरांना दाखवून देण्याची गरज आहे. या परिस्थितीत तुम्ही क्रोधाने नाही, तर सहानुभूतीने नेतृत्व कराल, अशी अपेक्षा आहे. आपल्याकडे असलेल्या सैन्यदलांमधल्या माणसांची मोजदाद करताना ती फक्त एक माणसांची संख्या नाही तेवढ्या कुटुंबांची, स्वप्नांची आणि त्यांच्या प्रत्येकाच्या स्वतःच्या जगाची संख्या आहे, हे विसरु नका. या देशाचे प्रमुख म्हणून तुम्ही हे सगळं कसं जमवणार, याकडे जगाच्या नजरा लागल्या आहेत, आणि मुख्य म्हणजे आपल्या देशातली मुलंही मोठ्या अपेक्षेने तुमच्याकडे पहातायेत, हे लक्षात असू द्या. खरा नेता कसा असतो, कसा असायला हवा, हे त्यांना दाखवून द्या, प्लीज!

आणि आता पुन्हा जरा भारतीयांकडे वळते.

बंधूभगिनींनो, तुम्ही म्हणताय तसं, काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना काही मूठभर स्थानिक काश्मिरींकडून मदत मिळते, आसरा दिला जातो, हे खरंच.
पण काश्मीरकडे पाठ फिरवणं, हा त्यावरचा उपाय नाही. उलट हीच वेळ आहे त्या मूठभर काश्मिरींकडे दुर्लक्ष करुन मोठ्या संख्येने शांतता हवी असलेल्या काश्मिरींसाठी आपला हात पुढे करण्याची. दहशतवाद हा तिरस्काराला खतपाणी घालतो. इतरांपासून तुटलेले, दुरावलेले, एकटे पडलेले किंवा पाडलेले यांना गाठून त्यांचे कान भरणं, त्यांना आपल्या बाजूला वळवणं दहशतवादाला सहज जमतं. काश्मीरच्या ट्रिप्स कॅन्सल करुन, तिथल्या व्यवसायांवर बहिष्कार घालून किंवा तिथल्या लोकांकडे पाठ फिरवून तुम्ही दहशतवाद्यांना अद्दल घडवत नसता, तर त्यांना बळ देत असता, हे लक्षात असूदे. एरवी ज्या तरुण मुलांनी शेती केली असती, लहानमोठा नोकरीधंदा केला असता, ते तरुण आपण काश्मीरकडे पाठ फिरवल्यामुळे हाताला काम नसलेले, अस्वस्थ, रिकामे बसणार आहेत. त्यामुळे त्यांची माथी भडकवून त्यांना आपल्याकडे खेचून घेणं दहशतवाद्यांना सोपं जाणार आहे.

काश्मीरबद्दल खरंच तुमच्या मनात प्रेम असेल, तो भारताचा अविभाज्य भाग आहे, असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला काश्मिरी लोकांना परकं करुन चालणार नाही. तुम्हाला काश्मीरची जमीन हवी, निसर्ग हवा, पण तिथली माणसं नकोत हे कसं काय जमेल?

अर्थातच, काश्मिरी पंडितांना खोऱ्यात परत आणायला हवं. त्यांना न्याय मिळायला हवा. भूतकाळातल्या चुका सुधारायला हव्यात. लोकसंख्येचा समतोल साधायला हवा. पण हे सगळं स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन, त्यांच्या साथीने व्हायला हवं, त्यांना डावलून नाही! कारण सर्वसामान्य काश्मिरी लोक तुमच्याबरोबर असतील तर दहशतवादी काहीच करु शकणार नाहीत. कुठेही जरा खुट्ट झालं तरी स्थानिक काश्मिरींना त्याची जाणीव सगळ्यात आधी होते, हा इतिहास आहे. १९४७ला घुसखोरी झाली तेव्हा, नंतर कारगिल घडलं तेव्हाही काश्मिरी मेंढपाळ, गुज्जर, बकरवालांनीच त्याबद्दल सैन्यदलांना पहिली माहिती देत सावध केलं होतं, याची तुम्हाला कल्पना आहे का?

अगदी परवा पहलगाम झालं तेव्हाही पर्यटकांना मृत्यूच्या दाढेत न जाऊ देणारे, त्यांना खाऊपिऊ घालणारे आणि त्यांच्या संरक्षणासाठी जीव देणारे तेच स्थानिक काश्मिरी होते हे आपण विसरुन चालणार नाही. आपण त्यांच्यावर विश्वास ठेवायला हवा. त्यांचा आदर करायला हवा. आपल्याला जर खरंच दहशतवादाचा बिमोड करायचा असेल, पाकिस्तानला अद्दल घडवायची असेल, संपूर्ण काश्मीर आपलं असावं-ते आपल्याला परत मिळावं असं वाटत असेल तर माझ्याकडे एक योजना आहे. त्या योजनेत बळाचा वापर करण्याची गरज नाही.

काश्मीरला जा. तिथल्या लोकांच्यात मिसळा. त्यांची हॉटेल्स, बागा, बाजार हे तुमच्या अस्तित्वाने भरून टाका. त्यांची सफरचंदं, त्यांचे जर्दाळू, केशर, गालिचे, शाली विकत घ्या. तिथे व्यवसाय सुरु करा. दुकानं उघडा. तिथे रेल्वे स्टेशन्स, विमानतळ येऊ देत. धरणं, पूल उभे राहूदेत. त्यासाठी तुमची मनं आणि तुमच्या खिशातला पैसा हे माध्यम होऊ द्या!

ही योजना राबवताना कुणाचे जीव जाणार नाहीत. विनाशही होणार नाही. युद्धापेक्षा हे बरंच नाही का?

काश्मीर हे भारताचं अविभाज्य, तेजस्वी अंग व्हावं पण ते तेज विश्वासाचं हवं… रणधुमाळीच्या आगीचं नाही. त्यासाठी आधी काश्मिरी लोक आपला अविभाज्य भाग असायला हवेत मात्र…

काश्मीरच्या गोष्टीचा उत्तरार्ध तिरस्काराने नाही, तर प्रेमाने लिहिला जाऊ शकतो हे जगाला दाखवून देण्याची ही वेळ आहे. हे घडलं तर पाकिस्तानने बळकावलेल्या काश्मीरलाही फरक दिसेल, जाणवेल आणि तिथले लोक स्वतःच पाकिस्तानचं वर्चस्व नाकारतील!

बंदुकीची एक गोळीही न झाडता आपण काश्मीर राखू… पाकिस्तानने बळकावलेलं काश्मीरही परत मिळेल. हे सगळं फक्त काश्मीर आणि काश्मिरींना आपलंसं केल्यामुळे साध्य होईल.

काश्मिरी लोकांनी आम्हाला वाचवलं, त्यांच्यामुळेच आम्ही आहोत हे पहलगाममधला दहशतवादी हल्ला अनुभवलेले पर्यटक आपल्याला जीव तोडून सांगतायेत.. सर्वसामान्य काश्मिरी माणूस कष्टाळू आहे. कुटुंबवत्सल आहे. त्यांनाही वाटतं आपल्या मुलाबाळांनी शिकूनसवरुन, सर्वसामान्य भारतीयांसारखं शांत स्थिर आयुष्य जगावं…

पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेला नृशंस हिंसाचार पाहिलेली, अनुभवलेली, त्यातून स्वतःचं सर्वस्व गमावलेली माणसं मानवतेवर विश्वास ठेवू शकतात तर आपणही तो ठेवायला हवा.

लक्षात ठेवा, युद्ध सुरू करणं सोपं, पण ते संपवणं अशक्य असतं. तिरस्काराची आग शत्रुला भस्मसात करेलच, पण ती लावणाऱ्याला तरी ती कुठे मोकळं सोडणार आहे? फक्त सैन्यदलं ही भारताचं एकमेव बलस्थान नाहीत, न संपणारी स्वप्न, दुर्दम्य आशावाद आणि प्रेम या आपल्या सर्वात जमेच्या बाजू आहेत. त्यांचा विसर पडू देऊ नका.

निवडण्याची वेळ येईल तेव्हा प्रेम निवडा. धैर्य निवडा. बुद्धीमत्ता निवडा. भारतमातेला निवडा.

माझ्या बोलण्याचा विचार करा.

दुःखात असले तरी आशा न सोडलेली आणि प्रार्थनेवर विश्वास ठेवणारी,
अभिजितची आई
आणि अनेक ‘मिग-21’ पायलट्सची माँ!
————
मूळ इंग्रजी पत्र - कविता गाडगीळ
अनुवाद - भक्ती बिसुरे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पहलगाम दहशतवादी किंवा त्यांना मदत करणारे स्थानिक यांना माफ करा, आपलं म्हणा, असं कविता गाडगीळ यांनी लिहिलंय किंवा सुचवलंय का?
>>>>
"तुमची मनं आणि तुमच्या खिशातला पैसा हे माध्यम होऊ द्या!" यासाठी ते लिहिले आहे. कविता गाडगीळ यांच्या मताचा पूर्ण आदर राखूनही मला हे व्यावहारिक वाटत नाही. कारण गेली ३-४ वर्ष पैसा आणि विश्वास ऑलरेडी काश्मीरमध्ये भरभरून ओतला जातोच आहे. पण आता तो पैसा निष्पाप नागरिकांना मारण्यासाठी वापरला जाणारच नाही याची खात्री मला उरली नाही.

दहशतवाद्यांना लपवायल, आरडीएक्स उतरवऊन घ्यायला कोणीच मुंबईचे लोक सामील नव्हते का?
>>> काश्मिरी लोकांविषयी हे मत फक्त एका पहलगाम हल्ल्यावरून झालेले नाही. ९०च्या दशकात काश्मिरी पंडितांना हुसकावून लावण्यात त्यांचे शेजारी, मित्र सामील होते हे केवळ पंडितच नाहीत तर बिट्टा कराटे सारख्या अतिरेक्यांनींही जाहीररीत्या सांगितले आहे.
९० च्या दशकानंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलेले आहे आणि आता सामान्य काश्मिरी तेवढ्या प्रमाणात अतिरेक्यांना सामील नसतील पण काश्मीरमध्ये वातावरण सामान्य करण्याची जबाबदारी वारंवार उर्वरित भारतावर ढकलली जाणे मला मान्य नाही. (सरकार बाजूला ठेवूया कारण त्यांचे ते कर्तव्य आहे.) यावेळी लोकल काश्मिरींची भूमिका स्वागतार्ह आहे. ती तशीच राहावी ही इच्छा आहे.

मै +१.
मला ही सेन्सिबल पत्र वाटलं.
बेफी यांच्या वैयक्तिक होऊन संत गाडगीळ वगैरे चिखलफेकीचा निषेध.

<पण काश्मीरमध्ये वातावरण सामान्य करण्याची जबाबदारी वारंवार उर्वरित भारतावर ढकलली जाणे मला मान्य नाही> तुम्ही नका घेऊ. ज्यांना घ्यायची ते घेतील.

कलम ३७० रद्द केलं हा उर्वरित भारतातून मते मागण्याचा मुद्दा झालेला चालतो.

काश्मीरकडे पाठ फिरवली तर त्याचे परिणाम काय होतील हेही कविता गाडगीळ यांनी लिहिलं आहे.

<तुम्हाला काश्मीरची जमीन हवी, निसर्ग हवा, पण तिथली माणसं नकोत हे कसं काय जमेल?> हा कळीचा मुद्दा आहे. हे आधीपासूनच असं होतं, व्यक्त करण्यासाठी किंवा उघड सांगण्यासाठी दहशतवादी हल्ला हे आणखी एक निमित्त - असं आहे का, याचं उत्तर स्वतःच्या मनाशी द्या.

टेरर फंडिंगबद्दल दुसर्‍या धाग्यावर आताच लिहिलं आहे. कदाचित आधीही कोणी लिहिलं असेल.

कलम ३७० रद्द केलं हा उर्वरित भारतातून मते मागण्याचा मुद्दा झालेला चालतो. >>>>
हे कलम संसदेत साधक बाधक चर्चा करूनघातले होते का?
नाही.
३७० मुळे भारताच्या राज्यघटनेने दिलेले अधिकार सर्व काश्मिरी नागरिकांना मिळत होते का?
नाही.
मग भारताच्या नागरिकांना त्यावर चर्चा घडवून आणण्याचा, ते स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा अधिकार आहे. सुप्रीम कोर्टाने तो मान्य केला आहे.
राहिली गोष्ट जबाबदारीची. तर काश्मीरमध्ये जाऊन, त्यांच्यावर विश्वास ठेवून, काश्मिरी नागरिकांना उर्वरित भारतात सामावून घेऊन सामान्य नागरिक ही जबाबदारी पार पाडतच होते व आहेत. त्यांनाच दोषी ठरवणाऱ्या लोकांची मला कमाल वाटते.

<मग भारताच्या नागरिकांना त्यावर चर्चा घडवून आणण्याचा, ते स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा अधिकार आहे. सुप्रीम कोर्टाने तो मान्य केला आहे> क्यूट. फक्त काश्मीरच्या नागरिकांना ते रद्द करण्याच्या चर्चेत सहभागी करून घेतलं नव्हतं. अख्खं राज्य कोंडून घातलं होतं. न्यायालयाने तांत्रिक बाबी मान्य केल्या तरी भावना शिल्लक राहतेच.

<३७० मुळे भारताच्या राज्यघटनेने दिलेले अधिकार सर्व काश्मिरी नागरिकांना मिळत होते का?
नाही.> हे ओअण क्यूट. हे काश्मीरचे लाड चालले आहेत असा प्रचार होता ना?

काश्मीरचे संसदेतले काही सभासद राज्यघटनेची कॉपी फाडून चर्चेतून निघून गेले. गुलाम नबी आझाद संसदेत आणि चर्चेत होते.

सर्व काश्मिरी नागरिकांना मिळत होते का?
सर्व काश्मिरी नागरिकात ४७च्या सुमारास पंजाबातून आणलेले दलित समाजाचे लोकांचाही समावेश होतो. त्यांच्या अधिकारांचे काय?

काश्मीरच्या नागरिकांचं काय?
>>>
काश्मीर भारताचा भाग आहे. त्यांचे रिप्रेझेन्टेशन संसदेत आहे. त्यांच्या लोकप्रतिनिधींनी चर्चा करायच्या ऐवजी गोंधळाचा मार्ग स्वीकारला.

सुप्रीम कोर्टाने तो मान्य केला आहे
केव्हा ? ३७० ची केस तर सुनावणीलाही आलेली नाही.

लेखातील भावनांशी सहमत.

फील्ड मार्शल आर्णब गोस्वामी व तत्सम इतरांचे बाहू युद्धासाठी स्फुरण पावत आहेत.
पाकिस्तान म्हणजे गाझा नव्हे आणी त्यांच्याकडेही अण्वस्त्रे वगैरे आहेत.

माझा मुद्दा स्पष्ट होता.

<<पण काश्मीरमध्ये वातावरण सामान्य करण्याची जबाबदारी वारंवार उर्वरित भारतावर ढकलली जाणे मला मान्य नाही> तुम्ही नका घेऊ. ज्यांना घ्यायची ते घेतील.

कलम ३७० रद्द केलं हा उर्वरित भारतातून मते मागण्याचा मुद्दा झालेला चालतो.>

कलम ३७० हा चक्क महाराष्ट्रातल्या २०१९ विधानसभा निवडणुकींमध्ये एक मुद्दा होता.

चर्चा नागरिकांबद्दल चालली आहे. आता ते सोडून संसदेत चर्चा, लोकप्रतिनिधी इ. वळणे सुरू झाली.

३७० रद्द करताना तिथली विधानसभा बरखास्त केली. नेत्यांना कोंडून घातलं. अख्ख्या राज्यात लॉकडाउन लावला आणि इंटरनेट बंद होतं.

मग निवडणुकीत मुद्दा झाला तो संसदेसाठीच ना? महाराष्ट्रातल्या किंवा इतर राज्यातल्या प्रत्येक नागरिकाने चर्चा नाही केली संसदेत.
जर भारताचे कोणतेही कायदे करत असताना इतर राज्यातल्या विधानसभांना विचारत नाहीत तर काश्मीरच्या विधानसभेला का विचारावे?

असो या विषयावर आपले एकमत होणार नाही. त्यामुळे हेमाशेपो.

<<<सर्व काश्मिरी नागरिकात ४७च्या सुमारास पंजाबातून आणलेले दलित समाजाचे लोकांचाही समावेश होतो. त्यांच्या अधिकारांचे काय?>>>

हा संदर्भ समजला नाही. माझे मन, ह्या बद्दल जरा तपशीलवार लिहाल का?

अमित्व,

Happy

मगाशी निवृत्त मेजर गौरव आर्या यांची या विषयावर विस्तृत मुलाखत झाली. स्वस्त प्रसिद्धीचा हेतू नव्हता, फॅक्टस होते. लिंक देऊ शकलो तर देईन. ती ऐकायला मिळाली तरी काहींची मते बदलणार नाहीत याची खात्री आहे. कविता गाडगीळ यांच्या एकट्यांचा कुटुंबीय आजवर शहीद झालेला नाही. तोही विमानातील तांत्रिक बिघाडामुळे! त्याने इतरांचे प्राण वाचवण्याचे आटोकाट प्रयत्न केले या गोष्टीला नमन! पर्यटक म्हणून गेलेल्यांना मारले आहे. त्याचा निषेध तुम्ही बाय default केला असेलच. कविता गाडगीळ यांना संत म्हणणे हे वैयक्तिक होणे नाही,. अडीच दशकांनंतर त्यांचे असे विचार ऐन प्रसंगी आले आहेत. ठोस बदला घ्यावाच असे काहीतरी त्या म्हणाल्याचे वर वाचले, म्हणजे चार घरच्यांनी वाऱ्यावर सोडलेल्या, आपला मृत्यू असाच होणार हे माहीत असणाऱ्यांना, लपून बसणाऱ्या चौघांना शोधून मारायचे, असे का? एवढेच करायचे का? आणि संत ही शिवी कधी झाली?

माझ्यासोबत असंख्य लोकांचा निषेध करत बसावे लागेल तुम्हाला! Happy

कॅप्टन अभिजीत गाडगीळ यांचा मृत्यू विमानातील तांत्रिक बिघाडामुळे झाला हे पुन्हा पुन्हा सांगताना सरकारनं अभिजीत गाडगीळ यांच्यावर अपघाताची जबाबदारी ढकलली हे वाक्य दुर्लक्षित करायचं कसब वाखाणण्याजोगं आहे. मिग २१ विमानांना उडत्या शवपेट्या का म्हणतात , ते आपल्या कानावर कधी पडलंच नसेल किंवा चाळणीतून बाहेर पडलं असेल.

मग युक्रेन, रशिया, इस्राईल, हमास हे वाडगा घेऊन फिरायला हवे होते>>>
व्हाईट हाऊसमध्ये झेलेंस्की वाडगा घेऊन बसला होता ते पहिलं नाही का? तेथून हाकलून दिल्यावर झेलेंस्की युरोपात वाडगा घेऊन फिरला होता ते दिसलं नाही का?
इस्राएल चा वाडगा अमेरिका न मागताच ओतप्रोत भारत असतेच.
हमास ही गुपचूप त्यांच्या दात्यांकडून वाडगा भरून घेतच असते.

स्थानिकांचा सहभाग असल्याशिवाय पहलगाम घडले का>>>

काही स्थानिकांचा सहभाग होता म्हणून सरकारची जबाबदारी संपली का? तुमच्यापैकी किती जणांनी social media वर गृहमंत्री, पंतप्रधान यांना जबाबदार धरलय आणि प्रश्न विचारले आहेत.

भारत इतकी महागडी शस्त्रे, अस्त्रे, विमाने, रणगाडे, तोफा वगैरे विकत घेतो ती काय निव्वळ प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात देखाव्यात ठेवता यावीत म्हणून का?
जर पाकिस्तान कुरापती काढताना असा विचार करून बघत नाही की भारताकडे अण्वस्त्रे आहेत. तो आपले अतिरेकी बिनदिक्कत पाठवून विविध पद्धतीने जिहाद करतो. पण आपण मात्र कायम बोटचेपे बनायचे हा दुटप्पीपणा का?
आपला मुलगा सैन्यातील भ्रष्टाचारामुळे किंवा तांत्रिक बिघाडामुळे मरण पावला म्हणून भारताचे संरक्षण धोरण फक्त शांती आणि शांती असेच असावे असे बोलण्याचा ह्या बाईंना अधिकार कसा मिळतो?

इस्लाम हे असे आगलावू तत्त्वज्ञान आहे की ते असताना कश्मीरी लोकांचे हृदय जिंकले पाहिजे वगैरे हास्यास्पद वल्गना आहेत.
जोर जबरदस्ती करून, हवे तितके संरक्षण पुरवून भारतातील अन्य प्रदेशातील लोक मोठ्या प्रमाणात वसवून कश्मीरच्या लोकसंख्येचे घटक बदलणे आवश्यक आहे. तरच तो प्रदेश भारतात समाविष्ट होईल. कधीतरी कश्मीरी मुस्लिम पंडितांना परत बोलावतील आणि सगळे पुन्हा नंदनवन होईल असा विचार करणारे मूर्खांच्या नंदनवनात बागडत आहेत!

>>पत्रात व्यक्त झालेल्या भावना/ विचारांशी सहमत. येथे प्रसिद्ध केल्याबद्दल चिनूक्सचे आभार<< -१
ऑब्वियस्ली काहितरी हिडन अजेंडा आहे, अथवा एका सोल्जर कुटुंबातील स्त्रीने सरकारने काय करावं आणि काय करु नये असं भावनिक निवेदन देण्याचं प्रयोजन कळलं नाहि. गुड सोल्जर्स डोंट आस्क क्वेश्चन्स...

पुर्वग्रहदूषीत विचारांमुळे गोंधळलेल्या मंडळींनी रि. ले. ज. हसबनीस यांची मुलाखत जरुर बघावी.. काहि ट्रिवियल मुद्दे क्लियर व्हायला मदत होइल...

पत्र वाचले भावना तळमळीच्या आहेत फक्त आता मी वैयक्तिक नागरिक म्हणून त्याबरोबर सहमत नाही.
पत्रात लिहिल्या प्रमाणे ऊर्वरीत भारत काश्मीर ला सामावून घ्यायचा प्रयत्न सतत करतोच आहे .
सरहद संस्था ; indrani balan foundation हे सातत्याने काश्मीर मधे वेगवेगळे ऊपक्रम राबवून; तिथल्या मुलांना ईथे आणून बाकी भारत कसा आहे ते दाखवतात.
ही मुले स्थानिक कुटुंबात राहतात.
आपल्या सारखी माणसे पर्यटन करायला जातात तेव्हा स्थानिक लोकांशी आपुलकीने बोलतात, स्वतःच्या प्रदेशासारखे काही दिसले तर त्याचा ऊल्लेख करून संवाद साधतात. हे ऊर्वरीत भारताचे प्रयत्नच आहेत ना ?
मग का काश्मीर स्वतःला तुटक अलग समजतो ? भारतात एकजिनसीपणे मिसळून जाण्यासाठी तिथल्या लोकांनी पण प्रयत्न ते ही सतत करायला हवे की नको ?
पत्रात लिहिलय तस युध्द काही होणार नाही .. माझ्या अल्प अभ्यासावरून असे वाटते आहे की पाकिस्तान पुन्हा विभाजित होईल...बलुचिस्तान हा नवा देश निर्माण होईल आणी पाकिस्तान ला यातून सावरायला खूप काळ लागेल.

ओवेसीचे भाषण तरी ऐका, जर त्यांना एका धर्माचे (स्वयंघोषित का असेनात) प्रतिनिधी मानत असाल तर!

सीमेवर लढताना आणि पर्यटक म्हणून फिरताना शहीद झालेल्या सगळ्यांच्या आयांनी अशी पत्रे लिहिली आहेत का?

युद्ध अजिबात लाभदायक नाही हे कविता गाडगीळ यांना कळते, पण मोदी, शहा, राजनाथ सिंह, डोवाल यांना समजतच नाही असे म्हणायचे आहे का?

सीमेशी, पाकिस्तानशी, काश्मीरशी काहीही संबंध न आलेल्या भारतीयाचेही याबाबत काही मत असू शकते हे मान्यच नाही का?

की कोणीतरी एक कविता गाडगीळ काहीतरी म्हंटल्या तेच ब्रह्मवाक्य?

पत्र 'एक एज्युकेटेड ओपिनियन' म्हणून अ‍ॅक्सेप्ट करता येतं की. मतभेद असू शकतात, असावेत, पण एकदम संतपद किंवा कुशंका ही टोकं कशाला?
गाडगीळ काही देशाचं धोरण ठरवणार नाही आहेत. पण सोशल मीडियावर एका बाजूला आवेशाने 'घरात घुसून मारा' वगैरे म्हणणारे (आणि मग हे पोस्ट करून झाल्यावर सहजतेने दैनंदिन व्यवहारांना लागणारे) लोक असतात तेव्हा दुसर्‍या बाजूने 'युद्ध सोपं नसतं' हे सांगणारा असा 'व्हॉइस ऑफ रीझन'ही तितकाच आवश्यक आहे.

बाकी २६ ही एक संख्या झाली. एकसुद्धा निरपराध माणूस मारला जाणं हे क्लेशकारकच असतं.
अशी एक घटना घडण्यामागे केवढी कारणपरंपरा, कोणाकोणाचे हितसंबंध, कोणाकोणाच्या गफलती, कोणाकोणाचे नाइलाज असतील आणि त्यातलं बातम्यांतून आपल्यापर्यंत किती येतं, काय कळायला मार्ग आहे?! आपण अशा बातम्यांचे चारदोन तुकडे वेचून त्यावरून गदारोळ करतो आणि आपसांतच बहिष्कार आणि लठ्ठालठ्ठी करतो.

यावर बरेच उलटसुलट मतप्रवाह येत आहेत.
मला थिंक बॅन्कवरची गुर्जरांची मुलाखत आणि हा एक व्हीडिओ संयत आणि माहितीपूर्ण वाटले.
राजू परुळेकरांची मुलाखत ऐकायला सुरुवात केली आहे, सहसा सेन्सिबल बोलतात.

गाडगीळ काही देशाचं धोरण ठरवणार नाही आहेत. पण सोशल मीडियावर एका बाजूला आवेशाने 'घरात घुसून मारा' वगैरे म्हणणारे (आणि मग हे पोस्ट करून झाल्यावर सहजतेने दैनंदिन व्यवहारांना लागणारे) लोक असतात तेव्हा दुसर्‍या बाजूने 'युद्ध सोपं नसतं' हे सांगणारा असा 'व्हॉइस ऑफ रीझन'ही तितकाच आवश्यक आहे. >> +१ कंसामधले वाक्य महान आहे.

दैनंदिन व्यवहार सोडून या प्रश्नाबाबत फिल्ड वर आलेल्यांनी असले प्रतिसाद द्यावेत.

दुसऱ्या बाजूचाच काय तर येथील बहुसंख्य प्रतिसाददात्यांचा दैनंदिन व्यवहार सोडून काही केल्याचा इतिहास ऐकिवात नाही

गाडगीळ देशाचे काय, मायबोलीकरांचेही धोरण ठरवू शकत नाहीयेत. शहीद झालेल्यांच्या आयांचे प्रातिनिधिक धोरणसुद्धा नाहीये ते!

प्रतिसादप्रभुत्व हे कौशल्य येथे चालते, संकेतस्थळाच्या बाहेर हे कोणी ऐकूनही घेणार नाही

<<<एज्युकेटेड ओपिनियन' म्हणून अ‍ॅक्सेप्ट करता येतं की>>>

------
स्वाती- संयत शब्दांत मांडलेला प्रतिसाद विचार करायला भाग पाडतो.

Pages