ती काळरात्र - भाग ६

Submitted by तुषार विष्णू खांबल on 23 November, 2022 - 10:55

ती काळरात्र - भाग ६
शब्दांकन : तुषार खांबल

https://www.maayboli.com/node/82683 - भाग १

https://www.maayboli.com/node/82689 - भाग २

https://www.maayboli.com/node/82701 - भाग ३

https://www.maayboli.com/node/82706 - भाग ४

https://www.maayboli.com/node/82708 - भाग ५

रुपेश आणि रेवतीने होकार दिला खरा; पण यांच्या मनात धाकधूक सुरु होती. काय उपाय असेल याची ते आपलपल्या परीने अंदाज लावत होते. पुजारी उठून आतल्या खोलीत गेले. तेथून त्यांनी काही पुस्तके आणली. ती समोर ठेवून त्यांनी बोलायला सुरुवात केली.

"तुमच्या कुटुंबातील घडलेली गोष्ट तुम्हाला पचायला जितकी कठीण जातेय त्याहूनही कठीण हा उपाय आहे. तुमच्या कुटुंबातील ज्या स्त्रीने आत्महत्या केली होती तिच्यावर अंतिम संस्कार तर झाले. परंतु तिच्या आत्म्याची तसेच तिच्या गर्भात असणाऱ्या त्या बाळाच्या आत्म्याचीही शांती झाली नाही. तुम्हाला ती शांती करावी लागेल.”

"म्हणजे नक्की काय करावं लागेल?" रेवतीने उत्सुकतेने विचारलं

“उपवास आणि नवस करून फक्त इष्ट शक्ती प्रसन्न होतात तर दुष्ट शक्तींना प्रसन्न करण्यासाठी त्यांच्याच कलेने घ्यावं लागत. एकदा का त्या प्रसन्न झाल्या कि आपल्याला येणाऱ्या अडचणी आपोआप दूर होतात. त्या मातेचा आणि तिच्या गर्भातील बाळाचा आत्मा हा आजही तुमच्या अवती-भोवती वावरत आहे. त्यांना गरज आहे मुक्ती देण्याची. कुठलाही होम-हवन किंवा पूजाअर्चा करून हे शक्य होणार नाही. या सर्व गोष्टींसाठी एका अघोरी शक्तीचाच उपयोग आपल्याला करावा लागणार आहे. याव्यतिरिक्त यावर काहीही उपाय नाही.”

"गुरुजी अजून आमची परीक्षा पाहू नका. जे काही आहे ते स्पष्टपणे सांगा. काहीही झालं तरी आम्हाला आई-बाप होण्याचं आमचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. आणि त्यासाठी आम्हाला जे काही शक्य आहे ते सर्व आम्ही करायला तयार आहोत." रुपेशने पुजाऱ्यांना सांगितलं.

"ठीक आहे तर मग" असे म्हणून पुजाऱ्यांनी आपल्या पुढ्यातील पुस्तके उघडली. त्यावर काही अघोरी प्रथेतील चित्र आणि न समजणाऱ्या भाषेतील मजकूर लिहिला होता. ती पुस्तके त्याने रेवती आणि रुपेशच्या समोर ठेवली. हर्षल आणि नितीन देखील लक्ष देऊन त्या पुस्तकातील चित्रांकडे पाहत होते. त्या चित्रात एक स्त्री तिच्या बाळासहित निद्रावस्थेत होती. या दोघांच्या बाजूला २-४ लोक बसले होते. त्यांच्या एकंदरीत पेहरावावरून ते मांत्रिक असावेत असे वाटत होते. त्या चित्राकडे बोट दाखवत पुजाऱ्यांनी बोलण्यास सुरुवात केली.

"ज्यावेळी कोणत्याहि गर्भवती स्त्रीचा मृत्यू होतो त्यावेळी तिच्या गर्भातील निष्पाप बालकाचा देखील मृत्यू होतो. अश्यावेळी त्या दोघांच्याही आत्म्याची शांती करणे आवाश्यक असते. जे काही पूजाअर्चा करून साध्य करता येते. परंतु जर त्या स्त्रीचा मृत्यू अनैसर्गिकरित्या झाला असेल तर मात्र तिचा आत्मा हा तोवर शांत होत नाही जोवर तिच्या आतील मातेचा आत्मा शांत होत नाही. याकरिता तिच्या आणि तिच्या गर्भातील बालकाच्या आत्म्यास बोलावून त्यांच्यावर शांतीसंस्कार केले जातात. याकरिता मुख्य गरज असते ती दोन गोष्टींची. त्यातील एक म्हणजे ज्या स्त्रीची मुले जन्मतःच या जगातून निघून गेली अश्या स्त्रीचे दूध; आणि गर्भावस्थेत मृत झालेल्या स्त्रीचा देह"

हे ऐकताच त्या सर्वांना विजेचा झटका बसला. आपल्याला काहीतरी भास झालाय असं सर्वांना वाटलं. ते पाहून पुजाऱ्यांनी पुन्हा एकदा आपण जे सांगितलंय त्याचा पुनरुच्चार केला. बाहेर कडाक्याची थंडी असताना देखील रुपेश आणि रेवतीच्या अंगाला घाम फुटला होता. दोघे बसल्याजागी भीतीने थरथर कापत होते. घशाला कोरड पडली होती. तोंडावाटे शब्द बाहेर पडत नव्हते. पुजाऱ्याने हर्षलला पाणी आणुन त्यांना देण्यास सांगितले. हर्षलने पाणी आणू दिले. ते प्यायल्यावर ते किंचितसे शांत झाले.

"गुरुजी, मी आम्ही खूप साधी आणि सरळ माणसे आहोत. असा हा प्रकार करण्याचा आम्ही कधी स्वप्नातही विचार करू शकत नाही. दुसरा कोणता उपाय आहे का बघा ना प्लिज" रुपेश काकुळतीला येऊन म्हणाला.

"दुसरा कोणता उपाय असता तर मी तो सांगितला नसता का? यावर हा एकच उपाय आहे. आणि तुम्ही पूजेला बसण्यापूर्वीच कबूल केले आहे त्यानुसार आता तुम्हाला हे कार्य पार पाडावेत लागेल." पुजाऱ्याने उत्तर दिले.

आपण आता अडकलो आहोत अशी भावना रुपेश आणि रेवतीच्या मनात निर्माण झाली. यातून सुटकेचा कोणताही मार्ग त्यांना दिसत नव्हता. कारण पुजाऱ्याने सांगितलेला प्रत्येक शब्द हा खरा होता. रुपेशने रेवतीकडे पाहिलं. तिचा चेहरा पूर्णपणे रडवेला झालेला होता. काही वेळा पूर्वी जो आई होणार या कल्पनेचा आनंद तिच्या चित्र्यावर दिसत होता त्याची जागा आता एका अनामिक भीतीने घेतली होती. डोळ्यातील मातृत्वाची आस मात्र कायम तशीच होती. आता सर्वस्वी रुपेश काय म्हणतो यावर सर्व अवलंबून होते. थोडा वेळ विचार केल्यानंतर रुपेशने आपले मन घट्ट केले आणि पुजाऱ्यांना आपला होकार सांगितला. रेवतीच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. रुपेशने प्रेमाने तिला जवळ घेतले. आणि शांत केले. ती शांत झाल्यावर त्यांनी पुजाऱ्यांना पुढे काय करायचे असे विचारले. यावर पुजाऱ्यांनी सांगायला सुरुवात केली.

"हे सर्व कार्य एका वर्षाच्या आत पूर्ण व्हायला हवे. एकवेळ बाळंतिणीचे दूध मिळेल, परंतु गर्भवती स्त्रीचा मृतदेह मिळणे कठीण आहे. त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या जवळपास असणाऱ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन वरील दोन गोष्टींची माहिती मिळवावी लागेल. एकदा का ती माहिती मिळाली त्या गोष्टी कश्या प्रकारे आपल्या पर्यंत पोहचतील याची व्यवस्था करावी लागेल. मृतदेह कोणत्याही परिस्थितीत घरात किंवा इतर कोणाच्या नजरेस पडेल असा ठेवून चालणार नाही. यासाठी शहरापासून लांब अश्या जागी त्याची व्यवस्था करावी लागेल."

रुपेश - "पण गुरुजी, माझे खूप नाव आहे शहरात. मी जर अश्या गोष्टी करत बसलो तर उगाच नको त्या गोष्टींना सामोरे जावे लागेल."

पुजारी - "मला या सर्व गोष्टींची कल्पना आहे. म्हणूनच हर्षल आणि नितीन तुम्हाला या कामात मदत करतील.”

आता हर्षल आणि नितीनचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. हर्षलने तर सरळसरळ नकार दिला. यावर पुजाऱ्यांनी त्याला तो देखील या कार्याचा भाग कश्या प्रकारे बनला (म्हणजे रुपेश-रेवतीला इकडे आणणे, त्यांना या सर्व गोष्टीबद्दल सांगणे इत्यादी) याची आठवण करून दिली. रुपेश आणि रेवतीने त्याला हवा तितका पैसे देण्याचे कबूल केले. बराच विचार केल्यानंतर हर्षल आणि नितीनने त्यांना मदत करण्याचे कबूल केले. शेवटी यात त्यांचे काही नुकसान नाही होणार होते परंतु पैसे मात्र पुष्कळ मिळणार होते. पुजाऱ्यांनी त्यांना त्यांच्या समस्येतून १००% बाहेर काढण्याची शाश्वती दिली. त्यानंतर देवाच्या पाय पडून सर्वजण घरी जाण्यास निघाले. हर्षलने रुपेश आणि रेवतीला हॉटेलला सोडले आणि आपल्या घरी निघून आला. त्यारात्री कोणालाही नीट झोप लागली नाही. चौघेही पुढे काय वाढून ठेवले आहे याच्याच विचारात तळमळत होते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुषार -

लिहीत रहा ! ...

खूप शुभेच्छा !

अघोरी उपाय.

जरा मोठे भाग टाका ना. सुरूवात केली आणि लगेच संपतो भाग