मातॄ दिन--(वीक एंड लिखाण)

Submitted by निशिकांत on 14 May, 2022 - 09:44

परवाच मातॄ दिन जगभरात  साजरा झाला.  आठवड्यातून एक दिवस मी याच सदराखाली कांही लिखाण  शनिवार/रविवारी मी प्रकाशित करत असतो. या आठवड्यात माझी जरा गोची झाली. एकाच आठवड्यात दोन दिवस साजरे झाले. दोन्हीही विभूती  माझ्या आवडत्या आहेत. आई (मातृ दिन) आणि गायक तलत महमूद याचा वाढदिवस पण होता. मी आज आणि पुढील आठवड्यात दोन्हीही विषयावर लिहायचे ठरवले आणि आज त्यातील पहिला लेख पेश करतोय.
आई हा सर्वांचा आवडता विषय! हे आपल्या देशातच नाही तर सर्व जगात आहे. याबाबतीत खालील गोष्टी ध्यानात घेण्या जोग्या आहेत.
१) आई या विषयावर प्रत्येक भाषेत मुबलक आणि प्रेमभावनेतू लिखाण झालेले आहे.
२) आईला सर्व जगात/धर्मात मायेचे प्रतिक मानलेले आहे.
३)आईचा अपिरिमीत प्रेमभाव हे जगाच्या अस्तित्वाचे मूळ आहे.
४) आपल्या हिंदू धर्मात तर मातृ देवोभव, पितृ देवोभव म्हणताना देवांनाही नंतरचे स्थान दिले आहे.

मी लहानपणी आईवर लिहिलेले खूप लिखाण वाचले.
यातील एक कथा माझ्या हृदयाला गेलेली आहे अगदी बालपणी. ही कथा पटकन मन वेधून घ्यायची. ती अशी:
 एक मुलगा आणि मुलगी एकमेकाच्या खूप प्रेमात पडलेले असतात. प्रियकर लग्नासाठी मुलीला अर्जव करत असतो. मुलगी त्याला म्हणते,    तू तुझ्या आईचे काळीज मला आणून दे तुझे माझ्यावरील प्रेम सिध्द करण्यासाठी. नंतर आपण लग्न करू या. प्रेमात वेडा झालेला मुलगा घरी जातो आणि आईचा खून करून तिचे काळिज एका चांदीच्या तबकात मखमली कपड्यावर ठेऊन घाईघाईने प्रेयसीकडे जायला निघतो. रस्त्यात त्याचा  तोल जाऊन तो पडतो आणि आईचे काळिज पण रस्त्याच्या बाजूला असलेल्या गटारात पडते. मुलगा स्वतःला सावरत उठण्याचा प्रयत्न करत असताना पडलेल्या आईच्या काळजास वाचा फुटते आणि ते मुलाला विचारते "बाळा तुला जास्त लागले तर नाही ना?" ही गोष्ट एक कल्पना विलासही असेल कदाचित. पण आईविषयी बरेच कांही ही गोष्ट सांगून जाते.
एकदा मातृदिनाच्या कार्यक्रमासाठी मी निमंत्रित पाहुणा होतो आणि मी या प्रसंगी चार शब्द बोलणे अपेक्षित होते. मी या कार्यक्रमास जायचे ठरवले आणि काय बोलायचे यावर विचारमंथन सुरू झाले. आठदिवस वेळ होता तयारी करणासाठी. मी गांभिर्याने तयारी सुरू केली. मुद्दे एका कागदावर लिहून काढले. आश्चर्य म्हणजे मला दोन दिवस आधी या विषयावर एक कविता सुचू लागली. कांही दिवसात कविता पण तयार झाली जी मी खाली पेश करतोय. मी घाईघईने एक गोष्ट स्वसंरक्षणार्थ नमूद करतो की मला तेंव्हा लयबध्द कविता येत नव्हत्या.लय, मात्रा याचे कांहीही ज्ञान नव्हते. तरीह हिंमत केली.  या कवितेत कांहीही आज मितीला बदल करावासा वाटेना कारण यात माझ्या भावना गुंतलेल्य होत्या. असो.

माईच ज्योत होती

 समईत देवघरच्या आईच वात होती
ओजास पसरणारी माईच ज्योत होती

पाऊल उचलले मी पहिले जगात जेंव्हा
आई जणू खुशीचा साक्षात झोत होती

संगीत पाठ पहिला ऐकून तृप्त झालो
झोपेत गुंगताना ती गीत गात होती

निजता कुशीत रात्री गोष्टीस सांगताना
स्वप्ने मला उद्याची ती दाखवीत होती

विसरून आपुल्याला, बाळास पोसताना
ना गाठ पीळ कोठे, रेशीम पोत होती

खडतर प्रपंच सारा, खडबड असून तळवे
पाठीवरी मुलायम फिरवीत हात होती

नाभीत जन्मलेला ब्रह्मा उदास आहे
सांगा कुठे तयाच्या आई घरात होती?

वैकुंठ काय देशी? दे येरझार जगती
शतजन्म जीवनाचे आईच गीत होती

ना गाईले कधीही भारूड वेदनांचे
अश्रूस लपवणारी ती खास प्रीत होती

वृक्षास आज आहे एकांत वेदनांचा
पचवून दु:ख जगणे रक्तात रीत होती

ज्यांनी तिला बघावे, सारे उडून गेले
जोडून हात जगली ती शांत शांत होती

निशिकांत" माय तुजला बघते वरून आहे
तुज ठेच अन् तिच्या रे! सिसकी उरात होती

निशिकांत देशपांड, पुणे.
मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users