‘शेजाऱ्या’चे ओझरते दर्शन

Submitted by कुमार१ on 26 November, 2021 - 11:26

गेल्या २५-३० वर्षांत आपल्यापैकी अनेक जणांच्या कुटुंबात वा नात्यात कोणी ना कोणी परदेशी गेलेले किंवा जाऊन आलेले आहे. पर्यटन, शिक्षण, नोकरी आणि व्यवसाय अशा अनेक हेतूंनी लोक परदेशात जातात. त्यामुळे अनेक कुटुंबांच्या गाठीशी परदेश प्रवासाचे विविध अनुभव साठलेले असतात. जेव्हा विविध कारणांमुळे होणाऱ्या कौटुंबिक मेळाव्यांना लोक एकत्र जमतात तेव्हा हटकून परदेशातील अनुभवांची देवाण-घेवाण होते.

असाच एक मेळावा एकदा आमच्या घरी भरला होता. त्या समूहातील सहा जण विविध देशांमध्ये जाऊन आलेले होते. अमेरिका कॅनडापासून ते ऑस्ट्रेलिया जपान पर्यंत अनेक देशांच्या अनुभवांवर गप्पा चालू होत्या. मला एकदम लहर आली आणि म्हटलं, आता जरा यांची फिरकी घेऊ.
मग मी सर्वांना म्हणालो,
“तुम्ही बरेच जण जगातील अनेक प्रगत व सधन देशांमध्ये जाऊन आलेले आहात. पण माझे एक वैशिष्ट्य आहे. मी अशा एका देशामध्ये जाऊन आलेलो आहे की जिथे तुमच्यापैकीच काय पण माझ्या माहितीतील अन्य कोणीही तिथे गेलेले नाही. मी ९९.९% खात्रीपूर्वक सांगू शकतो की तुमच्यापैकी कोणीही त्या देशाला आयुष्यात भेट देण्याची शक्यता नाही. तर आता माझा प्रश्न असा आहे की तुम्ही तो देश ओळखा” !

इतका वेळ हसत खिदळत गप्पा चालल्या होत्या. माझ्या या निवेदनानंतर एकदम सन्नाटा पसरला. अनेकांना आश्चर्य वाटले की मी एवढे छातीठोक कसे सांगू शकतोय. सगळ्यांचे चेहरे आश्चर्यचकित झालेले. मग मी म्हणालो, “प्रयत्न करा, सुरुवात तर करा ओळखायला, पाहिजे तर मी पैज लावतो”! मग आशिया, युरोप, दक्षिण अमेरिका व आफ्रिका या खंडांतील अनेक आणि काही अतिपूर्वेकडील देशांची नावे लोकांनी सांगितली. तरीपण अद्याप त्यांनी माझे उत्तर काही ओळखले नव्हते. मग मी थोडी भर घातली, “देश आपल्यासारखाच आहे. प्रगत किंवा सधन म्हणता येणार नाही. मग अजून काही न ऐकलेल्या देशांची नावे पुढे आली. तरीसुद्धा अजून उत्तर सापडत नव्हते. शेवटी एकमुखाने सगळे म्हणले, आम्ही हरलो बुवा. मग मी जाहीर केले,

मी ज्या देशाला भेट देऊन आलेलो आहे तो म्हणजे पाकिस्तान” !

माझे उत्तर ऐकल्याबरोबर मागच्यापेक्षाही अधिक सन्नाटा पसरला. अनेकांचे चेहरे वाकडे झाले. काहींच्या कपाळावर आठ्या उमटल्या. मग एक जण म्हणाले, “तुम्ही काही सरकारी अधिकारी, खेळाडू, सैनिक, कलाकार किंवा पत्रकार असे काही नाहीत ते माहित आहे. तसेच तुम्ही इतिहास संशोधक, राजकीय अभ्यासक किंवा गेला बाजार, जातिवंत पर्यटक देखील नाही. मग असं वाटतंय की कशाला मरायला हा माणूस गेला होता पाकिस्तानात ? तुम्ही तिम्बक्तूला गेलो असे म्हटला असतात तरी आमचा विश्वास बसला असता ! पण पाकिस्तान, छे, काहीतरीच काय“ ! मी हसलो आणि म्हणालो, “बरोबर आहे तुमचा तर्क. पण मी तिथे जाऊन आलोय हे वास्तव आहे. आता तिथे मी का जाऊन आलो ते मी तुम्हाला सांगतो”.
..
वाचक मित्रहो,
असा हा आमच्या कुटुंबीयांसमवेत घडलेला संवाद होता. थोडे पुढे जाऊन मी म्हणतो की, हा लेख जे वाचक वाचणार आहेत त्यांच्यापैकीही कोणी पाकिस्तानला गेले असण्याची शक्यता जवळजवळ नाही. पुन्हा एकदा मी हे विधान ९९ % खात्रीने करतोय. अर्थात उरलेला १ टक्का मी बाकी ठेवतोय याचे कारण असे : ध्यानी मनी नसताना मी नाही का गेलो त्या देशात? तसा चुकून एखादा इथेसुद्धा सापडू शकतो.
तर मग आता तुमच्याही मनात प्रश्न आला असेल, की कशाला उठून गेला हा बाबा तिकडे पाकिस्तानात ? Happy

तर आता ती कथा सांगतो. सुरुवातीला एक स्पष्ट करतो, की मी काही कामासाठी तिथे गेलो होतो आणि अगदी अल्पकाळ म्हणजे जेमतेम तीन दिवस वास्तव्य करून लगेच भारतात परतलो होतो. त्यामुळे रूढ अर्थाने हे पर्यटन नाही याची नोंद घ्यावी. आपल्याकडील ज्या लोकांचे नातेवाईक पाकिस्तानात आहेत असे लोक (व अन्य काही अपवाद) वगळता, सामान्य भारतीय नागरिक पाकिस्तानला हौसेने जाण्याचा विचार स्वप्नात देखील करत नाही. म्हणून माझा हा एक वेगळा अनुभव लिहिणे असा या लेखाचा हेतू आहे.
…..

तर मग सुरुवात करतो. घटना आहे १९८० च्या दशकातल्या पूर्वार्धातील. तेव्हा मी नुकताच एमबीबीएस झालो होतो. आता पुढे काय करावे या विचारात एक गोष्ट अशी ठरवली, की अमेरिकेत जाण्याच्या डॉक्टरांसाठीच्या स्पर्धात्मक परीक्षेला बसावे. ही स्पर्धात्मक परीक्षा आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध देशांमध्ये होते पण त्याकाळी भारतात मात्र त्याची केंद्रे नव्हती. १९६० च्या दशकामध्ये भारतात ती केंद्रे होती पण पुढे ती बंद करण्यात आली. त्यामागील हेतू हा असावा की जर आपल्या देशात केंद्रच ठेवले नाही तर परीक्षेला बसणाऱ्या लोकांची संख्या आपोआपच मर्यादित राहते. आपले डॉक्टर्स शक्‍यतो आपल्याच देशात राहावेत हा या सगळ्या मागचा उद्देश असावा. ज्या देशांचे धोरण असे नव्हते, त्यांनी आपापल्या देशांमध्ये अमेरिकेच्या परीक्षेसाठी केंद्रे ठेवली होती. माझे एक नातेवाईक सिलोनला (आताच्या श्रीलंकेला) जाऊन ही परीक्षा देऊन आल्याचे मला माहित होते.

तेव्हाची आमची कौटुंबिक आर्थिक स्थिती सामान्य होती. परीक्षेसाठी लागणारे डॉलर्समधील शुल्क अमेरिकेतली नातेवाईकांच्या मेहेरबानीने मिळाले. आता प्रत्यक्ष परीक्षेस जाऊन बसण्याचा खर्च एवढी बाजू आम्ही सांभाळायची होती. त्यामुळे जो काही प्रवासखर्च होईल तो कमीत कमी असावा असेच ठरवणे भाग होते. त्या काळी जे विद्यार्थी पुरेसे सधन होते ते अशा निमित्ताने सिंगापूर, फिलिपिन्स आणि तत्सम देशांनाही भेट देऊन परीक्षेच्या जोडीने सहल व मौजमजा करून येत. आम्ही जेव्हा परीक्षा केंद्रांच्या तक्त्यावर नजर टाकली तेव्हा लक्षात आले, की आपल्याला परवडण्यासारखी केंद्रे दोनच असून ती पाकिस्तानात आहेत. त्यापैकी एक म्हणजे कराची आणि दुसरे लाहोर.

मग जरा आजूबाजूला चौकशी करून आम्ही अधिक माहिती काढली तेव्हा एक गोष्ट स्पष्ट झाली. भारतातील बरेच डॉक्टर्स या कामासाठी पाकिस्तानला जायचे. सर्वसाधारण आपल्या भौगोलिक प्रांतानुसार केंद्र निवडीची विभागणी झालेली होती. संपूर्ण उत्तर आणि मध्य भारतातील डॉक्टर्स लाहोरला जात. तेव्हा अमृतसर ते लाहोर ही रेल्वेसेवा सुद्धा उपलब्ध होती. त्यामुळे त्यांच्यासाठी हा प्रवास तर अगदी स्वस्तातला.
तर पश्चिम आणि दक्षिण भारतातील विद्यार्थी कराची केंद्र निवडायचे. माझ्यासाठी मुंबई ते कराची हा विमानप्रवास हाच मार्ग सगळ्यात स्वस्त ठरणार होता.

मग अर्ज भरला आणि कराचीची निवड केली. आता पुढचा टप्पा होता पाकिस्तानचा व्हिसा मिळवणे. तेव्हा काहीतरी कारणामुळे मुंबईतील पाकिस्तानी दूतावासाचे उपकेंद्र बंद होते. त्यामुळे दिल्लीला जाणे हाच एकमेव पर्याय शिल्लक होता. त्या आधी सांगितले पाहिजे की मी नुकताच पदवीधर झालेला असल्याने माझ्या जवळ कुठल्याही प्रकारची आर्थिक बचत वगैरे नव्हती. किंबहुना पासपोर्ट म्हणजे काय हे फक्त ऐकून माहित होते. मग तातडीने मुंबईला जाऊन आयुष्यातील पहिला पासपोर्ट काढला. तेव्हाच्या पासपोर्टच्या पहिल्या पानाच्या मागच्या बाजूस एक ठळक सूचना दिलेली असायची :

सदर पारपत्रधारकाला दक्षिण आफ्रिका सोडून जगातील अन्य सर्व देशांना जाण्यास परवानगी दिलेली आहे”.

Passport_of_India_travel_restriction_note_to_the_Republic_of_South_Africa.jpg

याचे कारण म्हणजे तेव्हा दक्षिण आफ्रिकेचे वर्णद्वेषी धोरण चालू होते. म्हणून भारताने त्यांच्याशी राजनैतिक संबंध ठेवलेले नव्हते.
मग दिल्लीला जायचे ठरले. अशा तऱ्हेने आयुष्यातील पहिली दिल्लीवारी या कामाच्या निमित्ताने झाली. दिल्लीमध्ये त्यांच्या दूतावासात गेलो आणि परीक्षेसंबंधी माहिती दाखवल्यावर त्यांनी ७ दिवसांसाठी फक्त कराचीचा व्हिसा मंजूर केला. आम्ही व्हिसा मिळवण्यासाठी जेव्हा दिल्लीला गेलो होतो तेव्हा तिथे कडाक्याची थंडी होती. तोपर्यंत महाराष्ट्र न सोडलेल्या मला उत्तरेतील मरणाची थंडी म्हणजे काय असते ते समजले.

हे सर्व तांत्रिक सोपस्कार पूर्ण झाले. एकीकडे जमेल तसा अभ्यास चालू होता. अखेर परीक्षा जवळ आली. आता पहिला प्रश्न होता तो म्हणजे तिथे कराचीमध्ये राहायचे ठिकाण ठरवणे. त्याकाळी आपल्याकडे आंतरजाल तर जाऊद्या पण संगणक सुद्धा नव्हते. मग काही ओळखीच्या लोकांना कामाला लावले आणि थोडीफार माहिती काढली. आमची परीक्षा होती ‘ताज इंटरनॅशनल’मध्ये. नावावरुनच लक्षात आले की तिथे राहणे काही आपल्याला परवडायचं नाही. मग थोडेफार नकाशे पाहिल्यावर असे लक्षात आले की या परीक्षेच्या ठिकाणापासून दोन किलोमीटर अंतरावर मेहरान नावाचे एक हॉटेल आहे जे आपल्या खिशाला परवडू शकेल. आणि मुख्य म्हणजे तिथे मिश्राहारी भोजन व्यवस्था होती. मग मेहरान हॉटेल मोजून दोन दिवसांसाठी फोनद्वारा आरक्षित केले. आता परीक्षा एक दिवसावर येऊन ठेपली होती. मुंबई ते कराची विमान प्रवासाचे तिकीट काढले होते. म्हटलं, चला या निमित्ताने आयुष्यातला पहिला विमान प्रवास घडतो आहे. परीक्षेच्या आदल्या दिवशी मुंबईमध्ये विमानात बसलो. कुठलीही गोष्ट प्रथम अनुभवताना माणूस हरखून जातो तसे माझेही झाले. साधारण एक तास वीस मिनिटात कराचीला पोहोचलो.

जेव्हा आपण भारतातून अन्य सधन देशांमध्ये जातो तेव्हाची प्रवासवर्णने वाचली की एक गोष्ट लक्षात येते. मुंबईतून जेव्हा विमान उडते तेव्हा आपल्याला सुंदर इमारतींच्या जोडीने झोपडपट्ट्यांचा महासागरही दिसतो आणि परदेशात विमान उतरत असताना मात्र एकदम सगळेच चकचकीत, लखलखीत, परीराज्यासमान दृश्य वगैरे दिसते. माझ्या या परदेश प्रवासात मात्र हा फरक उद्भवणार नव्हता. इथून उडताना आणि तिथे उतरताना दोन्हीकडे समानच दृश्य नजरेस पडले. अखेर कराचीमध्ये उतरलो. तेव्हा त्या विमानतळावर नूतनीकरणाचे वगैरे काम चालू होते. तसा तो सामान्य दर्जाचा वाटला. (पुढे काही वर्षांनी मात्र पाकिस्तानने त्यांचे सर्व विमानतळ अत्यंत शाही रीतीने सजवले होते. ते भारतापेक्षा अधिक डामडौलाचे आहेत असे वर्णन मी खुशवंतसिंग यांच्या एका पुस्तकात नंतर वाचले होते).

विमानतळापासून हॉटेलकडे जाताना रस्त्यावर नजर टाकली. थोडा परिसर बघितला आणि लक्षात आले की या शहराचा तोंडवळा आणि रचना साधारण मुंबईप्रमाणेच आहे. एक प्रकारे ही पाकिस्तानची मुंबई म्हणता येईल. गरीबी-श्रीमंतीचा निकट सहवास हे दोन्ही शहरांचे समान वैशिष्ट्य. आम्ही ज्या टॅक्सीत बसलो होतो ती जपानमधून आयात केलेली कार होती तोपर्यंत भारतात मारुती कार सामान्य माणसाच्या हातात फारशी दिसत नव्हती. पाकिस्तानात बहुतेक कार उद्योग यथातथाच असावा. त्यामुळे तेव्हा ते परदेशी गाड्या थेट आयात करत होते. आमचे हॉटेल आल्यावर टॅक्सीतून उतरलो व आपल्या फियाटच्या सवयीनुसार धाडकन ते दार लावले ! तो मोठा आवाज ऐकल्यावर ड्रायव्हर माझ्यावर चांगलेच डाफरले. यावरून ही नाजूक प्रकारची गाडी आहे आणि दार हळुवार लावायचे असते हा धडा प्रथम मिळाला. मग हॉटेलच्या खोलीत पोचलो. दुसऱ्या दिवशी परीक्षा असल्याने फार काही करायला वाव नव्हता. अभ्यास करणे भाग होते.

परीक्षेचा दिवस उजाडला. परीक्षा एकूण दोन दिवस होती रोज सहा तास. त्यापैकी दर दोन तासांनी थोडावेळ विश्रांतीचा असे. परीक्षेच्या २ सत्रांमध्ये त्यांनी दुपारच्या खाण्याची किरकोळ व्यवस्था केली होती. ही परीक्षा संपूर्ण वस्तुनिष्ठ स्वरूपाची होती उत्तरपत्रिकेवर योग्य त्या पर्यायांच्या पुढे पेन्सिलने खूण करायची होती. संपूर्ण परीक्षेत कुठेही पेन लागणार नव्हते. परीक्षेसाठी पर्यवेक्षक म्हणून स्कर्ट परिधान केलेल्या दोन जाडजूड अमेरिकी बायका आलेल्या होत्या. त्यांच्या देहबोलीवरूनच त्या कडक असल्याचे लक्षात आले. त्यांनी सुरुवातीला महत्वाची सूचना केली,

जेव्हा परीक्षेचा वेळ संपल्याची घोषणा होईल तेव्हा सर्वांनी आपापल्या पेन्सिली ताबडतोब खाली ठेवल्या पाहिजेत. या शिस्तीचे पालन न केल्यास तुमची उत्तरपत्रिका रद्द ठरवण्यात येईल”.
ही सूचना ऐकल्यावर लगेच काही त्याचे गांभीर्य जाणवले नाही. दुपारच्या सत्रात वेळ संपल्याचे जाहीर झाल्यावरही (पेपर गोळा करेपर्यंत) तीन विद्यार्थी लिहीतच होते. हे त्या बायकांच्या लक्षात आल्यावर त्या तातडीने पळत त्या विद्यार्थ्यांकडे गेल्या. त्यांनी त्या मुलांना तुम्ही नियम मोडल्याचे सांगून लगेचच त्यांच्या उत्तरपत्रिकांवर काट मारून त्या रद्दबादल ठरवल्या. इतकी करडी शिस्त मी आयुष्यात प्रथमच पाहिली.

परीक्षेच्या शुल्कामध्ये त्यांनी खाण्यासाठीचे पैसे घेतलेले होते. त्यातून त्यांनी एका कागदी खोक्यामध्ये आम्हाला अल्पोपहार दिला. ते खोके उघडून पाहिल्यावर त्यात फक्त एक केळ व एक कबाबचा तुकडा असे खाद्य होते. मला केळ अजिबात आवडत नाही. पण आता करतो काय ? थोड्याशा वेळात काहीतरी खाणे भागच होते. तेव्हा मी मिश्राहारी होतो ते एका दृष्टीने बरेच झाले. भुकेच्या वेळी जे अन्न समोर येईल ते खाण्यात शहाणपण असते. पुढे माझ्या मुलांना मी हा किस्सा सांगितला आणि एक सल्ला दिला, “जरी परंपरेने आपण घरी शाकाहारी असलो तरी जगाच्या पाठीवर कुठेही वेळप्रसंगी तरुन जायचे असेल तर सर्व काही खायची सवय असलेली बरी असते”.

पहिल्या दिवशीचा पेपर संपल्यानंतर ताजमधून बाहेर पडलो आणि चालतच मुक्कामाच्या हॉटेलकडे जायचे ठरवले. तेवढेच टॅक्सीच्या पैशांची बचत आणि थोडफार काहीतरी बघता यावे हा उद्देश. सहज रस्त्यावरील एक-दोन दुकानांमध्ये डोकावलो. दुकानाची रचना अगदी आपल्यासारखीच होती. दुकानदारांनी, “आप इंडियासे आये है ना” असे म्हणून स्वागत केले व आदराने बोलले. चहा मागवला. आपल्या व त्यांच्या प्रमाणवेळेत अर्ध्या तासांचा फरक असल्याचे त्यांनी आम्हाला सांगितले. एकंदरीत पाहता पाकिस्तानी माणूस आपल्या कुठल्याही उत्तर भारतीय माणसाप्रमाणेच दिसतो. अशी भ्रमंती करीत हॉटेलात पोचलो. रात्री हॉटेलमध्ये अगदी पोटभर वरण-भात खाऊन घेतला तेव्हा कुठे जीव शांत झाला. परीक्षेच्या दुसऱ्या दिवशी सर्वसाधारण पहिल्या दिवसाप्रमाणे सर्व काही झाले. आता कालच्या प्रकारानंतर विद्यार्थ्यांना कडक शिस्तीची कल्पना आलेली होती. त्यामुळे आज कोणीही वेळ संपल्यानंतर लिहित बसायची आगळीक केली नाही.

अखेर पूर्ण परीक्षा संपली. एकंदरीत ही वस्तुनिष्ठ परीक्षा म्हणजे बुद्धीला खुराक होता. वस्तुनिष्ठ प्रश्नांचे अनेक अवघड आणि गोंधळात टाकणारे प्रकार इथे अनुभवायला मिळाले. एखाद्या विषयाचे सखोल वाचन असल्यासच आपण अचूक उत्तर देऊ शकतो हे लक्षात आले. परीक्षा केंद्राला टाटा केल्यावर पुन्हा एकदा चालतच रस्त्याने निघालो. साधारणपणे आपण भारतातच आहोत अशीच भावना होती. काही खास वेगळे असे त्या भागात तरी जाणवले नाही. रस्त्यांवरील अ/स्वच्छता आणि बे/शिस्त अगदी आपल्याप्रमाणेच. एकेकाळचे आपण भाऊ भाऊच आहोत हा विचार मनात बरेचदा येऊन गेला.
आता उरलेल्या वेळात ओळखीने एकच कार्यक्रम ठेवलेला होता तो म्हणजे तिथल्या एका रूग्णालयाला भेट देणे. मग घाईत तिकडे पोचलो. दोन-तीन डॉक्टरांशी गप्पा झाल्या. त्यापैकी एक डॉक्टर मुकेश हा सिंधी होता. त्याने आमच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्याच्या कुटुंबामध्ये फाळणीच्या वेळेस बऱ्याच हत्या झालेल्या होत्या. त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर कायमस्वरूपी खिन्नतेचे सावट होते. त्याचे काही नातेवाईक भारतात येऊन स्थायिक झाले होते. त्यापैकी काही तर पिंपरी-चिंचवडला असल्याचे त्याने सांगितले.

त्यासंदर्भात 1947 साली एक एकतर्फी करार दोन्ही देशांदरम्यान झाल्याचे त्याच्याकडून समजले. या करारातील तरतूद अशी आहे : जर पाकिस्तानातील एखाद्या व्यक्तीला भारतात येऊन वास्तव्य करावेसे वाटले तर भारत सरकार विचार करून त्या व्यक्तीला एक वर्षाचा व्हिसा देते. पुढे दरवर्षी त्याचे नूतनीकरण काही अटींवर होऊ शकते. याला अनुसरून मुकेशचे काही नातेवाईक भारतात आले. त्यापैकी काहींना येथे स्थिरस्थावर होणे जमले व कालांतराने त्यांनी भारताच्या नागरिकत्वासाठी अर्ज केलेला होता. परंतु त्याच्या अन्य काही नातेवाईकांना इथे काही जम बसवता आला नाही. त्यातून निराश होऊन पुन्हा पाकिस्तानात परतही जावे लागले होते. हे सर्व पाहता मुकेशची मनस्थिती द्विधा होती. त्याच्या मनात आज ना उद्या मध्यपूर्वेतील देशांमध्ये दीर्घकाळ रहावे असे होते व तेथून जमल्यास पाश्चिमात्य देशांमध्ये जायचा त्याला प्रयत्न करायचा होता.

मुकेशला मनापासून शुभेच्छा देत आम्ही ती रुग्णालय भेट आटोपती घेतली. आता लगेचच हॉटेलवर जाऊन सामानाची बांधाबांध करून परतीच्या प्रवासास निघायचे होते. त्यांनी व्हिसा जरी ७ दिवसांचा दिलेला असला तरी मला तिथे उगाच भटकणे परवडणारे नव्हते. मग काही तासातच आम्ही परीक्षेला बसलेले काही जण परतीच्या प्रवासासाठी कराची विमानतळावर हजर झालो. तिथे एकमेकांना आलिंगन देत निरोप घेतला. आमच्या सर्वांच्या बोलण्यात एक समान मुद्दा होता. भविष्यात आम्ही मनाप्रमाणे विविध देशांचे पर्यटन करू शकू. पण त्या पर्यटनाच्या यादीमध्ये एरवी पाकिस्तानचा समावेश चुकूनही झाला नसता. या परीक्षेच्या निमित्ताने आपण एकेकाळी अखंड भारताचाच भाग असलेल्या प्रदेशाला भेट दिली एवढे या परीक्षेमुळे साध्य झाले होते. तसेच खुद्द परीक्षेचा अनुभवही अविस्मरणीय होता.

जेमतेम तीन दिवसाच्या या छोट्या मुक्कामात माझ्या मनात कराची म्हणजे दुसरी मुंबई एवढीच भावना निर्माण झाली. त्या काळी भारतात सिंधी लोकांनी चालवलेली ‘कराची स्वीट मार्ट’ अशी मिठाईची प्रसिद्ध दुकाने असायची. त्या दुकानांमधून आम्ही वेफर्स वगैरे आवडीने आणायचो. त्या दुकानांचे नाव ज्या गावावरून आले ती कराची आपण पाहिली असे एक मानसिक समाधान लाभले. तिथल्या सामान्य माणसांवर नजर टाकता ते आणि आपण सामाजिक वावरात तसे सारखेच आहोत हे दिसून आले. दोन राष्ट्रांमध्ये स्वातंत्र्यापासूनच वैरभाव निर्माण झालेला आहे खरा. परंतु तिथल्या काही सामान्य नागरिकांशी गप्पा मारताना तो काही जाणवला नाही. भविष्यात जर दोन देशांदरम्यानचे राजनैतिक संबंध कधी सुधारलेच् तर निदान दोन्हीकडच्या नागरिकांना मुक्तपणे एकमेकांच्या देशात पर्यटनासाठी जाता येईल का, असा एक भाबडा विचार तेव्हाच्या तरुण मनामध्ये येऊन गेला. परंतु आजचे अजूनच बिघडलेले वास्तव आपण जाणतोच.
असो.

लेखातील घटनेनंतर पुढील संपूर्ण आयुष्यभरासाठी पाकिस्तानला जाणे हा विषय मी कायमचा बाद करून टाकलेला आहे. पण, आयुष्यातील पहिला विमान व परदेशप्रवास आणि पहिल्या आंतरराष्ट्रीय परीक्षेचा अनुभव या कारणांसाठी का होईना पाकिस्तान माझ्या आठवणीत राहील.
........................................................................................................................................................
लेखातील चित्र जालावरून साभार !

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्ही हीच पोस्ट मिपा वर टाकली आहे.
उजव्या विचाराने प्रेरित आंधळे तिथे आहे.
दहा बारा आयडी त्यांनी मीपा चा दर्जा खूप तळाला पोचवला आहे.
तिथे तुमच्या ह्या पोस्ट वर योग्य कॉमेंट येणार नाहीत..सर्व च आंधळे आहेत
माय बोली हेच एकमेव संकेत स्थळ आहे ते लोकांच्या विविध विचारांचा सन्मान करते.

त्या स्ट्रीट फूड पीके वाल्याचे नाव आहे झिया ताबारेक. हा व ह्याचे मित्र रीसेंटली तुर्की मध्ये जाउन आले इस्तंबूल. मेनली फु ड ब्लॉगर इतिहासाची फारशी माहिती नाही तुम्ही पण गूगल करा म्ह्टला. व जिथे तिथे उगीच वी आर फ्रॉम पाकिस्तान म्हणून सांगत होता. तिथे ही विक्रेते उगीच चढवून धंदा पदरात पाडून घेतात तसेच दिसले. लॉक डाउन काळात ह्याने घरगुती रेसीपी घरुन सुद्धा दाखविलेल्या. आई बायको दाखवले नाहीत. पण त्यांनी थोडे स्वयं पाक केलेले. त्यात कुरकुरीत भजी डाल आमटी भात व भेंडीची भाजी असे पदार्थ बघून ड्वा ळे पाणाव ले.

स्वात व्हॅली व चायना बॉर्ड र व्हिडी ओ अप्रतिम जागा आहेत. पण प्रवास खूप आहे. टॅक्सीत आपलीच लता रफी गाणी लावलेली व ते लोक्स गात पण होते.

मला पण पॅरिस मध्ये एकदा पाकिस्तानी टॅक्सी चालक भेटलेला आहे. व तो नीटच बोलत होता. आमचे कल्चर वगैरे.

यू ट्यूब वर बघितलेल्या व्हिडिओ वरून असे वाटते.
पूर्व पाकिस्तान म्हणजे बंगला देश आणि पश्चिम पाकिस्तान म्हणजे आताच पाकिस्तान ह्यांची संस्कृती मध्ये खूप फरक आहे.
बंगला देश पेक्षा पाकिस्तान ची संस्कृती , आहार,राहणीमान हे उत्तम आहे.
आपल्या पंजाब प्रमाणेच खाद्य संस्कृती पाकिस्तान मध्ये आहे.

**बंगला देश आणि पश्चिम पाकिस्तान म्हणजे आताच पाकिस्तान ह्यांची संस्कृती मध्ये खूप फरक आहे.
>>+११

@ कुमार१,

आपले शेजारी देश म्हणजे माझा आवडता विषय Happy तुमचा अनुभव आवडला.

तुम्ही सुदैवी आहात, वर अनेकांनी लिहिल्याप्रमाणे पाकिस्तानचा व्हिसा मिळणे आता जवळपास अशक्य आहे. कर्तारपुरसाहिबला जाणे म्हणजे पाकिस्तानच्या भूमीवर पाय ठेवणे इतपतच. ती काही खरीखुरी 'भेट' नाही.

बाहेरच्या देशात भेटणारी पाकिस्तानी माणस आपल्याशी अगदी आदराने वागतात.
मला हा अनुभव बर्‍याचदा आला आहे. बाहेरच्या देशातली पाकीस्तानी त्यांच्या लोकांशी नसतील वागत पण भारतीय आहे हे कळल्यावर मात्र आदराने वागवतात. कदाचित पाकिस्तान देश काढत असलेल्या कुरापती, अतिरेक्यांना सहाय्य वगैरेची टोचणी कुठेतरी त्यांना लागत असावी. २६/११ झाल्यावर नॉर्वेत एका पाकिस्तानीने चक्क माझी माफी मागितली होती.

अनिंद्य व योगी
सहमत.

परदेशातील रुग्णालयात काम करतानाचा माझा अनुभव साधारण योगि यांच्या सारखाच आहे.
.माझ्याबरोबरचे दोन पाकिस्तानी डॉक्टर अतिशय विनयशील होते. त्यांच्याइतका नम्रपणा आपल्या भारतीयांच्यात जाणवला नाही.
आपले एक महाशय तर दिल्लीच्या एम्स मधून शिकून आले होते. ते तिथले सर्वात उद्धट डॉक्टर म्हणून प्रसिद्ध होते.

*अर्थात व्यक्तीसापेक्ष अनुभव वेगवेगळे. कुठलेही सरसकटीकरण नाही

पाकिस्तान वरील वेगळा आणि छान लेख आहे. खूप चांगले अनुभव कथन केले आहे कुमार सर.

भारताबाहेर राहताना पाकिस्तानी लोक भेटले तर अदबीने वागतात हा अनुभव बरेचदा आला आहे.

पाकिस्तानी पश्तु पठाण जातीचे लोक कराची आणि इस्लामाबाद च्या पाकिस्तानी लोकांना नावे ठेवतात.पाकिस्तान ने फक्त उर्दू ही एकच भाषा शाळांमधून सक्तिची केली त्यामुळे काही स्थानीय भाषा जसे पश्तु नामशेष होत आहेत असे एका पश्तु पठाण असलेल्या मैत्रिणीकडून समजले. ती माझ्याकडे नेहमी भारताचे कौतुक करते की आपण सगळे आपली मातृभाषा लिहू, वाचू शकतो. तिला फक्त पश्तु भाषा बोलता येते पण लिहिता / वाचता येत नाही कारण ती भाषा लिहिता आणि वाचता येणारी पिढी संपत आली आहे.

दुसरा अनुभव स्विटझरलँड मधिल.. ट्रेन मधील प्रवासात एक ट्रेन साफसफाई कर्मचारी आला. तो मूळचा पाकिस्तानी.त्याचे युरोप मधिल गेल्या 10वर्षातील अनुभव सांगत होता. भारतीय नसणार्या लोकांना तो स्वतः भारतीय आहे असे सांगायचा कारण भारतीय लोकांबद्दल जितका आदर जगातील लोकांना असतो तसा पाकिस्तानी लोकांना मिळत नाही ही त्याची खंत होती.

अभिप्राय व पूरक माहितीबद्दल सर्व नवीन प्रतिसादकांचे आभार !
.....
*भारताचे कौतुक करते की आपण सगळे आपली मातृभाषा लिहू, वाचू शकतो
अणि
*"भारतीय लोकांबद्दल जितका आदर जगातील लोकांना असतो तसा पाकिस्तानी लोकांना मिळत नाही

>>> रोचक !

भारत पाक राजकीय संबंध चांगले नसले तरी पाकची भारताला निर्यात बऱ्यापैकी आहे.
२०२० मध्ये १६७००० डॉलर्स इतकी.

(https://tradingeconomics.com/pakistan/exports/india)

भारतातील काय किंवा पाकिस्तान मधील काय सर्व सामान्य लोक चांगलीच असतात.
जे दहशत वादी कृत करत असतात ती मंडळी कोणत्या ना कोणत्या संघटनेचे सभासद असतात.
समाजाशी त्यांचा संबंध नसतो.

छान अनुभव. मी ही युट्युबवर पकिस्तानातल्या टुरिझमचे व्हिडिओज पाहिले आहेत आणि मोठी शहरं ही मुंबईचीच आठवण करुन देतात तर नीलम व्हॅलीचा निसर्ग अप्रतिम आहे. आपण युट्युबवरच बघायचं. जाणं काही होणार नाही.
तिकडे काही मोजकी हिंदू लोकं आहेत ती गणपती वगैरे साजरे करतानाही दाखवली होती. खखोदेजा.

धन्यवाद .
...तिकडे काही मोजकी हिंदू लोकं आहेत>>

त्या देशाच्या अधिकृत जनगणनेनुसार तिकडे 44 लाख हिंदू आहेत. परंतु पाकिस्तान हिंदू परिषदेच्या म्हणण्यानुसार ती संख्या 80 लाखांहून जास्त आहे.

https://en.m.wikipedia.org/wiki/Hinduism_in_Pakistan

धन्यवाद.
......
नुकतीच केंद्रीय मंत्र्यांनी लोकसभेत सादर केलेली माहिती :
गेल्या पाच वर्षात 87 देशातील 10646 लोकांनी भारताचे नागरिकत्व मागितलेले आहे .
त्यामध्ये पाकिस्तानचा क्रमांक प्रथम आहे( 7782 लोकांनी)

https://mahanews.live/24620/

छान अनुभव.
हीना रब्बानी पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्री होत्या त्या वेळी शेजा-यावर प्रेम करावे हे मनापासून पटले होते. त्यासाठी काही कट्टर संघटनांचा विरोध पत्करायला लागला तरी बेहत्तर ही खूणगाठ मनाशी बांधली होती. व्हिसा मिळणे अवघड असेल तर बजरंगी भाईजान चा सलमान, गदरचा सनी यांच्या मार्गानेही गेलो असतो. पण हाय रे किस्मत !
आता नुसरत जहां संसदेत असल्याने दिल्लीतच तळ ठोकून आहे. आधी आपले घर पहावे मग शेजा-यावर प्रेम करावे या निर्णयाप्रत येऊन पोहोचलो आहे.

धन्यवाद

**आधी आपले घर पहावे मग शेजा-यावर प्रेम करावे या
>>>
अगदी पटले.

समारोप
माझा एक साधारण अनुभव या लेखाद्वारे लिहिला. तो आपणा सर्वांना आवडला हे वाचून आनंद वाटला.

त्यावरील चर्चेत आपल्यातील सहभागी अनेक लोकांनी चांगले योगदान दिले. दोन्ही देशांदरम्यानचे आर्थिक, राजकीय, सामाजिक आणि लष्करी संबंध याबाबतीत बरेच जणांनी अभ्यासू प्रतिसाद दिले.
अशी अर्थपूर्ण चर्चा घडवून आणल्याबद्दल मी आपणा सर्वांचे कौतुक करतो.

पाकिस्तान हा संवेदनशील आणि स्फोटक विषय असतानाही या चर्चेदरम्यान धाग्याचा काश्मिर झाला नाही हे विशेष. उलट आपण सर्वांनी चर्चेतून माहितीचे नंदनवन फुलवले असेच म्हणतो. Happy

आपणा सर्वांचा मनापासून आभारी आहे !

या लेखाचा परिणाम म्हणून लायब्ररीत दिसलेलं अरविंद गोखलेंचं असाही पाकिस्तान हे पुस्तक आणलंय.

भरत
माहितीसाठी धन्यवाद !
वाचून झाल्यावर इथे जरूर गोषवारा लिहावा

असाही पाकिस्तान हे पुस्तक आणलंय.>>> ते पुस्तकही छान आहे.बर्‍याच वर्षांपुर्वी वाचलेले आहे.कथालेखक अरविंद गोखले आणि पत्रकार अरविंद गोखले ,हे दोघे वेगळे असावेत.

अरविंद गोखले ,हे दोघे वेगळे असावेत.
>>
होय. वाचकांचा तो गोंधळ होऊ शकतो म्हणून त्यांच्यापैकी पत्रकार हे अरविंद व्यंकटेश गोखले असे पूर्ण नाव लिहीत असल्याचे आठवले.

(अरविंद व्यंकटेश गोखले हे ’दैनिक केसरी'चे बारावे संपादक. )

Pages