अरबस्तानचा इतिहास - भाग ११

Submitted by Theurbannomad on 21 February, 2021 - 08:44

राजाश्रय आणि धर्मविस्तार

जिझसने निवडलेल्या 'प्रेषितांपैकी' - ज्यांना मुख्य अनुयायी म्हणणं जास्त संयुक्तिक ठरेल -विश्वासघातकी जुडास सोडला, तर बाकीच्या अकरा जणांनी आपल्या ईश्वराने दिलेल्या संदेशाच्या पायावर ख्रिस्ती धर्माची मुहूर्तमेढ रोवली. तोपर्यंत ज्यू असलेले हे सगळे जण आणि एव्हाना प्रचिती आल्यामुळे जिझसला देवाचा अवतार मानायला लागलेले लोक एकत्र आले आणि ख्रिस्ती धर्माचा प्रसार व्हायला सुरुवात झाली. ज्यू या नव्या धर्माला अर्थात मान्य करायला तयार नव्हते.
जिझसच्या अकरा प्रेषितांपैकी शेवटच्या प्रेषिताचा मृत्यू होईपर्यंतच्या काळाला ' अपोस्तोलिक एज ' असं संबोधलं जातं. जेरुसलेम येथे एककून १२० अनुयायांनी मिळून आपल्या धर्माचं ' चर्च ' स्थापन केलं. या अनुयायांपैकी महत्वाचे होते पॉल आणि पीटर. या पीटरने कोर्नेलियस नावाच्या बड्या रोमन अधिकाऱ्याला बाप्तिस्मा देऊन ख्रिस्ती धर्मात आणलं आणि चंचुपावलांनी ख्रिस्ती धर्माचा रोमन साम्राज्यात प्रवेश झाला. पॉलने जेरुसलेममधल्याच ज्यू सोडून इतर लोकांना आणि मूळच्या ग्रीक असलेल्या हेलेनिस्ट लोकांना सर्वप्रथम ख्रिस्ती धर्माची दीक्षा दिली. हळू हळू त्यांच्याकडून रोमन साम्राज्याच्या पूर्वेकडच्या ग्रीक प्रांतांमध्ये हा धर्म पसरायला सुरुवात झाली. ज्यू धर्मातल्या बजबजपुरीला कंटाळलेले अथवा बळजबरीने ज्यू झालेले लोक हळू हळू या नव्या धर्माकडे आकर्षित होऊ लागले. जेरुसलेमपासून सुरू झालेला हा धर्मप्रसार अँटीओक , इफेसस , कोरिन्थ, थेसलॉनिका, सायप्रस, क्रेते अशा भागाकडून होत होत पुढे तर थेट इजिप्तच्या अलेक्सान्ड्रियापर्यंत हे लोण पसरलं. १० वर्षाच्या काळात १०० च्या वर चर्च या भागात उदयाला आली.
या काळात जुडिआ प्रांतात ' सिमोन बार खोखबा ' नावाचा एक शूर ज्यू योद्धा आपल्या मनात काही वेगळेच मनसुबे रचत होता. अनेक वर्षांपासून बकोटीवर बसलेले रोमन त्याच्या डोळ्यात खुपत होते. अखेर त्याने आपल्या ज्यू बांधवांमधून काही समविचारी तरुण निवडले आणि त्यांच्यातला एलसार नावाचा एक उमदा तरुण हाताशी घेतला. आपल्या सैन्याची जमवाजमव करून त्याने जुडिआ आणि आजूबाजूच्या प्रदेशात रोमन लोकांच्या विरोधात उठाव केला. आपल्या शिवाजी महाराजांप्रमाणे त्याने प्रचंड रोमन सैन्याला मात दिली ती गनिमी युद्धतंत्राने. अपलावधीत जुडिआ प्रांत हाताखाली आणून पुढे इदूमिया प्रांतापर्यंत त्याने मजल मारली.
आसपासच्या डोंगराळ भागातल्या गुहेत लपून अचानक रोमन सैन्यावर हल्ले करण्याच्या त्याच्या युद्धतंत्रामुळे रोमन सैन्याची चांगलीच वाताहात झाली. शेवटी रोमनांना सेक्सटस ज्युलिअस सेव्हरस या शूर रोमन सेनापतीला थेट ब्रिटन भागातून डॅन्यूब नदीमार्गे पाचारण करावं लागलं. आपल्याबरोबर सव्वा लाखाचं सैन्य घेऊन हा सेनापती जुडीआ आणि आजूबाजूच्या प्रांतात उतरला आणि या नव्या दमाच्या सैन्याने बंडखोरांना चांगलाच दणका दिला. अखेर साडेपाच लाख ज्यू, जवळ जवळ हजारभर ज्यू वस्त्या आणि पन्नास तटबंदीयुक्त शहरं रोमन सैन्याने नष्ट करून या बंडाची अखेर केली.
या बंडामुळे या प्रदेशावर अतिशय दूरगामी परिणाम झाले. सर्वप्रथम या ज्यू लोकांचा कायमचा बंदोबस्त करण्याच्या उद्देशाने रोमन लोकांनी ज्यू लोकांच्या कायद्यांवर आणि हिब्रू दिनदर्शिकेवर बंदी घातली. टेम्पल माऊंट या ज्यू लोकांच्या महत्वाच्या धर्मस्थळावर अनेक पवित्र हस्तलिखितांची होळी पेटवली. ज्यू लोकांच्या मुख्य सिनेगॉगच्या आवारात रोमनांच्या देवतांचा प्रमुख देव असलेल्या ज्युपिटरचा आणि रोमन सम्राट हेंड्रियनचा पुतळा उभारला. ज्यू लोकांचं शिरकाण करण्याच्या दृष्टीने त्यांना जुडीआ आणि आजूबाजूच्या प्रांताबाहेर जायलाही रोमनांनी मज्जाव केला. हिब्रू संस्कृती या भागातून कायमची हद्दपार करण्याचा या हेंड्रियनने चंग बांधला आणि पुन्हा एकदा ज्यू लोकांच्या अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिला.

इथे ज्यू लोकांच्या नशिबी हे भोग आले असताना दुसरीकडे ख्रिस्ती धर्म मात्र हळू हळू आपला विस्तार वाढवत चालला होता. भूमध्य समुद्राच्या भागातल्या मेसोपोटेमिया, आर्मेनिया ते थेट पर्शियाच्या साम्राज्याच्या पश्चिम भागातल्या प्रांतांमध्ये आता या धर्माचा प्रसार झाला. जिझसच्या जन्मापासून ख्रिस्ती धर्मियांनी नवी कालगणना सुरु केली होती. त्या कालगणनेनुसार ख्रिस्तजन्माच्या शंभर वर्षातच रोमन साम्राज्यातल्या बऱ्याचशा लोकांनी ख्रिस्ती धर्म अंगिकारला.
ज्यू लोकांचं बंड अयशस्वी झाल्यावर रोमनांनी त्या बंडाचा राग ज्यू लोकांच्या सिनेगॉगवर काढला.. ख्रिस्तजन्मानंतर ७० वर्षातच मंदिर होत्याच नव्हतं झालं आणि जिझसने आपल्या हयातीत केलेलं भाकीत खरं ठरलं. या सिनेगॉगच्या जागी उरली ती फक्त एक भिंत. आज जेरुसलेमची जी भिंत ज्यू लोकांची पवित्र ' वेलिंग वॉल ' म्हणून ओळखली जाते, ती हीच. आता ज्यू लोक भयभीत झाले. त्यांच्या खुद्द जेरुसलेममध्ये प्रवेश करण्यावर बंदी घातली गेली. आपला पूर्ण निर्वंश होतो की काय, या भीतीने ते उरलेसुरले ज्यू लोक आपल्या पवित्र भूमीतून निघून गेले. खुष्कीच्या मार्गाने आणि समुद्रमार्गाने जमेल तसे जमेल त्या दिशेला शेकडो ज्यू लोक आपल्या मायभूमीतून परागंदा होऊन सुरक्षित आश्रयाच्या शोधात निघाले. आफ्रिका, युरोप, रशिया, इराण ते अगदी भारतापर्यंत त्यांची पांगापांग झाली. या वेळी मात्र जवळ जवळ १७-१८ शतकं त्यांना आपल्या मातृभूमीत परत येणं शक्य झालं नाही. या भागातून ते जे हद्दपार झाले, ते रोमन साम्राज्य लयाला गेल्यावरही परतले नाहीत.
ख्रिस्तजन्मानंतर ३०० वर्षांनी ' कॉन्स्टंटाईन द ग्रेट ' या नावाने ओळखला जाणारा रोमन सम्राट गादीवर आला आणि त्याने ख्रिस्ती धर्माला राजधर्म म्हणून स्वीकारल्याची घोषणा केली. या एका घोषणेने ख्रिस्ती धर्म झटकन जगाच्या नकाशावरच्या एका बलाढ्य साम्राज्याचा धर्म म्हणून पुढे आला आणि अखेर त्या धर्माला राजाश्रय मिळाला. रोमन साम्राज्य तेव्हा ' पेगन ' धर्मपद्धतीने चालणार होतं. या धर्मपद्धतीत एकापेक्षा जास्त धर्मांना मान्यता होती, जी या कॉन्स्टंटाईनच्या एका घोषणेने लयास गेली. पुढच्या चार शतकांमध्ये या धर्माची वाढ अतिशय जलद रीतीने झाली.
ख्रिस्ती धर्माला आता सोन्याचे दिवस आले होते. या धर्माचा प्रभाव आता विस्तीर्ण भूभागावर आणि अतिशय मोठ्या लोकसंख्येवर प्रस्थापित झाला होता. चर्च हे राजसत्तेइतकंच प्रबळ होतं चाललं होतं. धर्मसत्तेतही आता पदांची उतरंड तयार होऊ लागली होती. वेगवेगळ्या प्रांताचे जसे प्रशासक होते, तसेच धर्मगुरूही. परंतु हे सगळं घडत असताना शेजारच्या अरबस्तानात काही घडामोडी घडत होत्या. टोळीजीवन जगणाऱ्या आणि रुक्ष वाळवंटात कशीबशी जगण्याची कसरत करत असणाऱ्या कबिल्यांमध्ये आता एक प्रेषित जन्माला येणार होता. ख्रिस्तजन्मानंतर सातव्या शतकात अरबस्तानच्या विशाल वाळवंटात मोहम्मद पैगंबरांच्या रूपाने आता एक वादळ येणार होतं.
या काळात ज्यू लोक मात्र जिथे सुरक्षित आसरा मिळेल तिथे विसावले. ज्यू लोकांनी बरोबर नेलेल्या दोन गोष्टी म्हणजे ' तोरा ' हा त्यांचा धर्मग्रंथ आणि ' हिब्रू ' हि मातृभाषा. आपल्या प्राचीन इतिहासाचा टोकाचा अभिमान आणि वांशिक शुद्धतेचा आग्रह या दोन गुणांमुळे ते गेले तिथे आपल्या वस्त्या - घेट्टो - तयार करून राहिले. जणू काही इस्राएलच्या भूमीचे विखुरलेले तुकडे असावेत, अशा त्या वस्त्यांमध्ये ज्यू लोकांव्यतिरिक्त कोणीही राहत नसत. रक्तातली व्यापारी वृत्ती त्यांना आपसूक व्यापाराकडे खेचून नेत असल्यामुळे जिथे राहिले तिथे ते व्यापारधंद्यात शिरले. ख्रिस्ती अथवा मुस्लिम लोकांप्रमाणे त्यांच्यात व्याज घेणं हे पाप समजलं जात नसे...खरं तर आजही परिस्थिती तशीच आहे. याच कारणांमुळे ते हळू हळू पैशाने साधन झाले आणि नंतर नंतर चांगले गब्बर होऊन आपापल्या प्रांतातल्या उच्चभ्रु वर्तुळात आले.
व्याज घेण्याच्या वृत्तीमुळे त्यांच्यावर सावकारीचा आणि पर्यायाने बदनामीचा शिक्का लागला. जिझसच्या निर्घृण हत्येला जबाबदार तर तर त्यांचे पूर्वज होतेच. या सगळ्यामुळे त्यांच्याबद्दल इतर समाजाच्या मनात एक प्रकारची घृणा होती. त्यांच्या वंशाला हीन समजलं जात होतं. तशात ते उपरे असल्यामुळे स्थानिक लोकांनाही त्यांच्याबद्दल तितकी माया नव्हती. ज्यू लोकसुद्धा आपल्या त्या घेट्टोमध्ये आपल्याच लोकांच्या सान्निध्यात राहणं पसंत करत. रोटीबेटी व्यवहार आपापसातच करत. शिक्षण, संस्कृती, अडीअडचणीला एकमेकांना मदत इतकंच काय पण शेती, पशुपालन अशा गोष्टीही आपापसातच ठेवण्यावर त्यांचा भर असे. या सगळ्यामुळे इस्राईलहून परागंदा होताना ते जसे होते तशाच त्यांच्या पुढच्या पिढ्याही राहिल्या.
आपल्या पुढच्या पिढ्यांना ' एरेट्झ इस्राएल ' येथे - म्हणजे आपल्या पूर्वजांनी आणि यहोवा देवतेने आपल्यासाठी निवडलेल्या पवित्र कनानच्या भूमीत कधी ना कधी आपण नक्की जाऊ अशा दुर्दम्य आशावादाचं आणि इच्छाशक्तीचं बाळकडू पाजत त्यांनी वाढवलं. जेथे जातील तिथल्या स्थानिक भाषा, रीतिरिवाज आणि समाजप्रथा शिकण्याचं त्यांना कधीच वावडं नव्हतं, पण त्यासाठी त्यांनी आपल्या हिब्रू भाषेला आणि ज्यू संस्कारांना तिलांजली दिली नाही.
सर्वाधिक प्राचीन धर्म विखुरलेला , दुसरा काही शतकांपूर्वी जन्माला येऊनही विस्तारलेला आणि बाकीचे धर्म व पंथ नुसते नावालाच उरलेले अशा परिस्थितीत जन्माला आलेला नवा इस्लाम धर्म पुढे या सगळ्यांपेक्षा जास्त वेगाने फोफावला. या तीन धर्मांमध्ये आपापसात पुढे अनेक वेळा झटापटी होणार होत्या आणि प्रत्येक धर्मामध्येही अनेक पंथ निर्माण होणार होते. अब्राहमच्या वंशजांच्या या सगळ्या कृत्यांमध्ये आता युरोपपासून आशियापर्यंतच्या भागात घडामोडी घडणार होत्या.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाचतेय. बाकी सगळ्या धर्मांची शेवटी बजबजपुरीच होते. तेव्हा एक सोडून दुसर्‍याच्या भजनी लागण्यात अर्थ नाही हेच खरं. हिंदी सिनेमातलं प्रसिध्द वाक्य आठवतं 'हम सब इन्सान है, भगवान नही'. इथे देवच साक्षात स्वतःच्या मुलांत डावं-उजवं करतो मग हाडामांसाच्या माणसांची गोष्टच सोडा. धर्म भलेही महान उद्देशाने निर्माण झाला असेल. तो पुढे न्यायला, आचरायला माणसं लागतात आणि तीच शेवटी स्वार्थापायी त्याची वाट लावतात.

जिझसच्या निर्घृण हत्येला जबाबदार तर तर त्यांचे पूर्वज होतेच. >>>> काय दैवगती आहे! जिझस जन्माने ज्यू असूनही त्याच्या हत्येचे खापर इतर ज्यूवरती.