ताई (अंतिम भाग )

Submitted by मिरिंडा on 2 September, 2020 - 08:13

माझ्या तोंडाला कोरड पडू लागली. कोरड्या तोंडानेच मी ओरडलो, " क्...क्... कोण आहे तिकडे......." पण माझा आवाज दोन फुटांपर्यंतही गेला नसावा. माझ्या खिशात अजूनही मेन फ्यूज होते. मोबाईलही जवळ नव्हता. अतिशय थंड शांततेत पावसाचा तेवढा लागलेला एकसूर भयाण शांततेचा भंग करीत होता. खिडक्या सगळ्याच बंद असल्याने बाहेरची हवा आत येत नव्हती. हॉलमधलं डायनिंग टेबलही बरंच दूर होतं. तिथे पाणी असलं तर......? आत पुन्हा कोणाच्यातरी फिरण्याची खसफस ऐकू आली. मला भीती वाटू लागली. मला स्वत:च्या नेभळटपणाचा राग आला. जरा बरं वाटलं. रागाने भितीवर नियंत्रण आणलं. तात्पुरत्या निर्माण झालेल्या बळावर मी भराभर पावले टाकली. भीती परत यायच्या आत मला जाऊन मेन फ्यूज लावायचे होते. अचानक माझ्यासमोरचा अंधार गडद झाला. समोरुन कोणीतरी येत होतं. .......पण मांजराच्या पावलानी....माझं डोकं घामानी आणि भीतीनी ओलं झालं. मी पटकन् समोरच्या माणसाला पाठ दाखवीत पुढे निघालो.पण त्याने झटकन फिरुन माझ्या मानेभोवती घट्ट पकड मिळवली. मी सुटण्याची धडपड केली. उपयोग झाला नाही. माझा श्वास वरचा वर खालचा खाली होऊ लागला.मगरमिठीच ती सुटण्याची सुतराम शक्यता नव्हती. त्याने दुसऱ्या हाताने सुऱ्याचं टोक माझ्या कमरेत घुसवलं, पुढच्याच क्षणी माझ्या कमरेजवळ रक्त वाहत असल्याचं जाणवू लागलं. आता मला सुटायलाच हवं.कॉलेजमधे असताना NCC मधलं ट्रेनिंग आठवलं. आमचा ट्रेनिंग ऑफिसर सांगत होता" अगर किसीने आपकी गर्दन पीछेसे पकडी है तो आप अपना दाहिना घुटना मोडके पीछे की तरफ घुमाके अपनी लात उपर कराके जोरसे झाडिये, तो ये लात पकडनेवालेके अंडाशयपर जा धडकेगी और उसकी पकड एकदमसे छूटकर वो तिलमिलाकर जमीपर गिरेगा. अब आप घूमके वो उठनेसे पहिले दो चार जबरदस्त लाते उसके पेटमे जमा दो वो उठेगा नही और आप भाग सकोगे. ......." मी बरोब्बर तेच केलं. माझी लाथ तर बसली . तो वेदनेने कळवळत खाली पडला. पण मला त्याला जास्त मारण्यात रस नव्हता. खरंतर मी चूक केली. तोही कमी नव्हता. तो कळ दाबीत उठला आणि माझा पाय ओढून मला खाली पाडले. माझ्या डोक्यात कशानेतरी त्याने घाव घातला. मी तिथेच बेशुद्ध होऊन पडलो. .......मी किती वेळ शुद्धीत नव्हतो कुणास ठाऊक.हळूहळू मी शुद्धीवर येत होतो. प्रथम माझ्या डोक्यात पडणारे घण जाणवले. मी कण्हू लागलो. माझं कण्हणं कोणाला तरी ऐकू गेलं असावं.हळूहळू मी डोळे उघडले. पिवळा प्रकाश डोळ्याना झोबत होता. एवढ्यात शब्द ऐकू आले......." डॉक्टर, हा शुद्धीवर येतोत बहुतेक. पाणी मारुन पाहतो." पप्पांचा आवाज ऐकू आला. म्हणजे पप्पा आत आले तर. ..... माझ्या तोंडावर पाणी मारलं गेलं . मी डोकं दाबून धरीत उठलो. आता हा डॉक्टर कोण ? तिडबिडे तर नाही ? डॉक्टरला कोणी बोलावलं ? आणि पोलीस काय करतायत ? नाहीतरी ते शेवटीच येतात. मी डोळे पूर्ण उघडले. पप्पा माझ्यावर वाकून पाहत होते. समोर डॉक्टर की कोण तो उभा होता. माझ्या डोक्यात सारख्या कळा येत होत्या. पप्पा म्हणाले," आता तरी चहा घेणार ना ,,, असं म्हणून त्यांनी माझ्यापुढे कप केला. मी अर्धवट उठून बसत म्हणालो, " दीपा कुठे आहे ? " त्यावर हसत ते म्हणाले" ती उठल्ये पण तिला तिच्याच खोलीत बंद करुन ठेवलंय."
पाणी ....पाणी म्हणत मी पुन्हा जमिनीवर लोळण घेतली..पप्पानी पाण्याचा ग्लास पुढे केला. थंडगार पाण्याने जरा बरं वाटलं. मग त्यांनी जवळच ठेवलेला चहाचा कप माझ्या तोंडाला लावला.आता जरा डोकं चालू लागलं. पप्पा आत कसे आले आणि हा डॉक्टर कसा आला ? घड्याळात पाच ठोके पडले. मी उठून उभा राहिलो. डोक्यात जबरदस्त कळ गेली. अजूनही डॉक्टरचा चेहरा दिसत नव्हता. मी जरा दुबळेपणाचं जास्त नाटक करीत जवळच्याच खुर्चीवर डोकं हातात धरुन बसलो. पप्पा म्हणाले ," याला तळघरात बंद करुन ठेवायला हवं, म्हणजे पुढची ट्रीटमेंट देणं तुम्हाला सोपं जाईल. ताईची इच्छापण पूर्ण होईल. चला लवकरच उजाडायच्या आत हालचाल करायला हवी " आणि ते ऐकल्यावर माझ्या डोक्यात आलं, म्हणजे कमरे खालचा भाग आखूड करणार. हा डॉक्टर तिडबिडेच आहे. पोलिसाना परत फोन करायला हवा.... मोबाईल पप्पांकडून घेतला पाहिजे. दीपा उठली कशी नाही , राधाबाईंचं काय.....? माझ्या प्रश्नाचं उत्तर मला ताबडतोबच मिळालं. डॉक्टर पिचक्या आवाजात म्हणाले, " हो पण याला प्रथम तळघरात टाकू. नंतर ताई आणि राधाबाई याना मागच्या दलदलीत फेकू. आता खड्डे खणायला वेळ नाही , हे सगळं दीपाच्या अपरोक्ष व्हायला हवं. " मग डॉ. माझ्याकडे वळून मला जोरात हलवित म्हणाले, " ए! ऊठ तुला काही झालेलं नाही. नाटकं करु नकोस. ..." असं म्हणून त्यांनी मला दोनतीन कानफटात मारल्या. मी कसातरी उभा राहिलो. मग दोघांनी मला ढकलीत जेमतेम कीचन पर्यंत ओढून नेले. आता बल्बच्या पिवळ्या प्रकाशात मला राधाबाईंचा म्रूतदेह दिसला. त्यांच्या पाठीत सुरा खुपसला होता. मी सर्व बळ एकवटून त्या दोघांना जोरात धक्का दिला. पप्पा कोलमडले , फ्रीजवर आपटून पडले. त्यांच्या कपाळावर जबर फटका बसला होता. पण बारीक दिसणाऱ्या डॉक्टरची पकड मात्र जीवघेणी होती. त्याने मला खाली पाडलं आणि माझ्या छातीवर बसून तो माझा गळा दाबू लागला. तेवढ्यात दोन गोष्टी अचानक घडल्या. दारावरची बेल दोनतीन वेळा वाजली आणि भिंतीतला जिना उघडून दीपा कीचनमधे आली. तिच्या हातात जड पेपरवेट होता. ...पप्पाना सुचेनासं झालं. दोन मुडदे कुठे लपवायचे त्याना कळेना. दीपा हातातला पेपरवेट उगारुन डॉक्टरांकडे धावली . पप्पा दीपाला धरायला धावले. परत बेल वाजली. पण आता ती सारखी वाजत राहिली . दीपाच्या कानफटीत त्यानी दिली. तिच्या हातातला पेपरवेट आवाज करीत खाली पडला.
......... आता मात्र पुन्हा पुन्हा बेल वाजत राहिली. मग पप्पा म्हणाले, " डॉक्टर याला घेऊन तुम्ही वर जा आणि तळघरात ढकलून द्या. मी हे मुडदे कुठे लपवायचे ते पाहतो.." आता दारावर धक्के बसू लागले. पप्पांनी जरा जोरातच विचारलं," कोण आहे, " सकाळी सकाळी सभ्य माणसाचा दरवाज्या वर धडका देत आहात. आत्ता मी पोलिसाना फोन करतो. " ......त्यावर उत्तर आलं," अरे ए , ! बऱ्या बोलानं दार उघड. आम्हीच पोलास आहोत. उघड लवकर...." आता मात्र पप्पा घाबरले. डॉक्टरांनी मला ढकलीत जिन्यावर आणलं. जिन्याचा दरवाज्या लावून घेतला. पप्पांनी मग प्रथम दीपाला ढकलीत अडगळीच्या खोलीत बंद करुन ठेवली. अजून कोणाच्याही मदती शिवाय दोन्ही मुडदे मागील दरवाज्याने बाहेर काढून दलदलीत ढकलायचे होते . आता मुख्य दरवाज्यावरील धडका थांबल्या होत्या. पप्पांना आश्चर्य वाटलं. अचानक पोलीस गेले कुठे त्याना समजेना.
मग त्यांच्या लक्षात आलं की हे धोकादायक आहे. पण मिळालेल्या संधीचा आपण फायदा घेतला पाहिजे. कीचनमधली दोन कपाटांकडे त्यांचं लक्ष गेलं. या कपाटांमधे ठेवलं तर ,,,,,? मग त्यांनी कपाटांकडे निरखून पाहिलं. समोरच्या बाजूला काच होती. म्हणजे आत घालून उपयोग नाही. वेळ चालला होता. लवकर काहीतरी करायला हवं होतं. हा डॉक्टर वर काय करतोय..... त्यांना एक कल्पना सुचली. नाहीतरी पोलिस पुढच्या दरवाज्याशी नाहीत. आपण बाहेर पडून या दोघाना झाडांमधे लपवून ठेवलं तर ,,,? विचारांच्या गर्दीने आणि वेळ नष्ट होत चालल्याने त्यांना आता भीती वाटू लागली. त्यांच्या अंगाला थरथर सुटली. भीतीवर नियंत्रण यावं म्हणून त्यांनी फ्रीज उघडला. आत फक्त बियर होती. तिचा काहीच उपयोग नाही. त्यांनी परत एकदा फ्रीजमधे नजर फिरवली. केव्हातरी मागच्या वर्षात ठेवलेली क्वार्टर दिसली.. आत काय आहे हेही न पाहता, त्यांनी बाटली उघडून तोंडाला लावली. आता कसला सोडा आणि पाणी ,,,,? त्यानी कच्चीच प्यायली. ,,,,,,ती रम होती. घसा जाळीत जाणाऱ्या अल्कोहोलने त्याना हुषारी बरोबर स्थिरता आली. ते तिथल्याच एका खुर्चीवर बसले. अति श्रमाने त्याना घेरी येत्ये असं वाटलं. नाही म्हंटलं तरी ते जवळजवळ रात्रभर जागेच होते. अचानक त्याना सरुची आठवण झाली. पंधरावीस वर्षांपूर्वी ती गेली होती. बाहेर संबंध ठेवण्याचा त्यानी खूप प्रयत्न केला होता. पण त्याना जमलं नाही. राधाबाईंना मारणं आवश्यक होतं. नाहीतर त्या आज असत्या. पण तिच्यासमोरच सगळं घडल्याने तिला मारणं भाग होतं. त्यांनी क्वार्टर अर्धी केली होती. अचानक जिन्याचा दरवाज्या उघडला आणि डॉक्टर आत आले. म्हणाले," अरे नुसते बसलात काय ? या दोघांचं काय .....? " पप्पानी उत्तरादाखल त्यांच्या हातात क्वार्टर दिली.मग त्यानी पोलिसांबद्दल आणि मुडद्यांचं काय करायचं ते थोडक्यात सांगितलं. अचानक मागच्या दरवाज्यावर गोळी झाडल्याचा दणदणीत आवाज आला. त्या दोघांची खाडकन उतरली. मग डॉक्टरांच्या मदतीने दोन्ही बॉडीज पुढच्या दरवाज्याकडे सरकवायला सुरुवात झाली. आता त्या बॉडीज चांगल्याच जड झाल्या होत्या . " धडाम धूम " असा आवाज आला. मधेच ढगांचा गडगडाट होऊन वीज कोसळली. वाऱ्यापावसाची जुगलबंदी चालू झाली. दोघाना ,काही मैल धावून आल्यागत चांगलाच दम लागला होता.
सहा वाजत आले. बाहेर सूर्यप्रकाश पडलाच असणार. जंगलामुळे दिवसाची जाणीव होत नव्हती. दोघांनी घामाच्या धारा पुसण्यात आणि दम खाण्यात काही मिनिटं घालवली. मिनिट मिनिट आता महत्वाचं होतं. अडगळीच्या खोलीच्या दरवाज्यावर दीपाच्या धडका चालूच होत्या. पुन्हा मुडदे ओढण्याचं काम चालू झालं. दरवाज्यातून मुडदे बाहेर सहजासहजी बाहेर काढता येतील अशा दिशेत ठेवले गेले. दोघांनी दमून आपली डोकी दरवाज्यावर टेकली. मग मोठं अवसान आणून पप्पांनी बोल्ट उघडले , अडसर दूर केला आणि लँच उघडला. आता दरवाज्या उघडायचा म्हणून दोघांनी जोर लावला त्याबरोबर उघड्या दरवाज्यातून वाऱ्यासहित पाऊस भुंकल्यासारखा ओरडला. अचानक दोघांवर पाण्याचा मारा झाला. आता बाहेर उजाडल्याच्या खुणा दिसू लागल्या. दोघेही एकदम बाजूला झाले आणि तिकडे पोलिस दरवाज्या फोडण्यात यशस्वी झाले. इकडे पप्पा आणि डॉक्टर ताईंची बॉडी बाहेर काढण्यात यशस्वी झाले. बाहेर उभ्या असलेल्या पप्पांच्या खांद्यावर कॉन्स्टेबल जाधव आणि मसुरकरांची पकड बसली. त्यांना बाजूला ओढीत जाधव म्हणाल, " स्वत: खून करुन आम्हालाच मदतीला बोलावतोस काय ,,,,? " ...... घाबरुन जाऊन पप्पा म्हणाले ," छे हो ! मी खूनही नाही केला आणि फोनही......त़ो बघा खुनी पळतोय ... " असं म्हणून मागील दरवाज्याकडे धावण्याचा प्रयत्न करणाऱ्या डॉक्टरांकडे त्यांनी बोट दाखवलं. पण आत शिरलेल्या इन्स्पेक्टर सूर्यकांतानी त्याना जोरात कानफटात मारुन पकडलं. इन्स्पे. नी अडगळीच्या खोलीच्या धडका ऐकून ते उघडलं आणि दीपाची सुटका केली. ती बाहेर येता येता गुदमरल्यामुळे भोवळ येऊन त्यांच्याच अंगावर कोसळली. त्यांनी तिला तिथल्या खुर्चीवर बसवली आणि तिच्या तोंडावर शुद्धीवर येण्यासाठी पाणी मारु लागले. हळूहळू चांगलंच उजाडलं. पप्पाना आणि डॉक्टराना ताब्यात घेतल्यावर कॉ. मसुरकर म्हणाले, " सर तुम्ही लकी आहात, याला ओळखलंत का आपण ? हा डॉ. तिडबिडे पेंडिंग मेडिकल इन्क्वयरीज मधे हा वाँटेड होता. " त्यावर इन्स्पे. म्हणाले, " बरोबर आहे तुमचं, आपण खरंच लकी आहोत. " मग डॉक्टरकडे मोर्चा वळवीत त्यांना एक कानफटात मारीत म्हणाले, " माणसाचं शरीर आखूड करणारा. चल आता आत, आपल्याला भरपूर वेळ आहे तुझं संशोधन समजून घ्यायला. " दिपा शुद्धीवर आली. तिने माझ्याबद्दल विचारलं. पण मला कुठे ठेवलंय याचा अंदाज नसल्याने इन्स्पे. साहेबांनी डॉ.ना दरडावून विचारलं, " काय रे कुठे डांबलंयस अविनाशला ?" ते बोलत नसल्याचे पाहून इन्स्पे .त्यांची कॉलर पकडीत ओरडले , " सांगतोस ,का आता मारु दोन चार ... " तरीही डॉ. म्हणाले, " मी कोणत्याही अविनाशला वगैरे ओळखत नाही." मग इन्स्पे. साहेबांनी दोन चार वाजवल्यावर अविनाशला भुयारात बंद करुन ठेवल्याचं सागितलं. त्यांना तसेच धरुन जिन्याने वरच्या मजल्यावर गेले.
वर गेल्यावर भिंतीतली कळ दाबल्यावर कंटाळल्या सारखा आवाज करीत गुप्त दरवाजा उघडला . एक बोळकंडी सारखा भाग दिसला. तिथे डॉक्टरला ढकलीत इन्स्पे. साहेब आणि जाधव आत शिरले . भिंतीतली बटणं दाबल्यावर पिवळट प्रकाशात मी तिथेच बांधलेल्या अवस्थेत सापडलो. मला सोडवल्यावर मी म्हणालो, " फोन मीच केला होता. दोन्ही खून पप्पांनीच केलेले आहेत. हे डॉ. अतिशय डांबरट आहेत. आपल्या संशोधनाचे प्रयोग ते करुन त्याचा vdo काढतात , कशासाठी माहीत नाही. " , चला खाली जाऊ आणि दोघाना पोलिस स्टेशनला घेऊन जाऊ." मग आम्ही चौघे खाली आलो . पप्पा खाली मान घालून बसले होते. पावसाने निर्माण केलेली थंडी होती तरी त्यांच्या कपाळावर घाम जमला होता. गेल्या गेल्या दीपाला जवळ घेतलं. तिला चांगलाच धक्का बसला होता. पप्पा असं काही करतील असं तिला कधीच वाटलं नव्हतं. आता ते तिची नजर टाळीत होते. " हे असं काही घडेल असं वाटलं नव्हतं. " मग आम्ही सगळेच पोलिसांच्या गाडीतून निघालो. बसल्यावर मी इन्स्पे. ना विचारलं, " वाड्याचं नाव माहीत नसताना सुचलं ते सांगितलं, पण तुम्हाला तो कसा सापडला ? ". .... त्यावर ते म्हणाले," वाडा याच नावाने गावात प्रसिद्ध आहे. बरोबर ना पप्पा ?" .... उत्तरादाखल त्यानी फक्त मान डोलावली .
गाडीत ,खऱतर दीपा सोडून सगळेच पेंगत होते. अर्ध्यातासाऩतर आम्ही पो. स्टेशनला पोहोचलो. सगळेच स्थानापन्न झाल्यावर इन्स्पे. साहेब म्हणाले, " चला, पप्पा आणि डॉक्टर पोपटासारखं बोलयचं नाहीतर चार्जरुम आहेच,आणि तिथे आमच्याकडून खास मेजवानी मिळेलच. काय आहे ना हे आमचे कॉन्स्टेबल जाधव , हे गेले दोन वर्ष बसून आहेत. त्यांचे हात शिवशिवत असतात...." जाधवांकडे पाहत म्हणाले. चहा आला. पो. स्टेशनचा कळकट्ट चहा आला. त्यावेळेला तोही चांगला लागला. नंतर इन्स्पे.म्हणाले," चला, प्रथम अविनाशपासून सुरुवात करु. मी माझं स्टेटमेंट दिलं. मग दीपा म्हणाली, " मला काहीच बोलायचं नाही. पप्पांची मात्र मला कमाल वाटते. राधाबाईं बरोबरचे संबंध आणि त्यांचा राधाबाईंचा या दोघांनी केलेला खून ,यावर माझा विश्वासच बसत नाही. पप्पा तुमची तर मला वडील म्हणवून घ्यायला लाज वाटते. " डॉ. उसळून म्हणाले ," ए माझा खुनांशी काहीही संबंध नाही. " इन्स्पे. चिडून म्हणाले ," आधी खून करवून घ्यामचे आणि मग म्रुतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी इथे यायचं. काय बरोबर आहे ना ?. " .....अजिबात नाही. ... खून पप्पांनी केल्येत आणि ते करणार असल्याची मला कल्पनाही नव्हती." ,,,,,,, " सगळे गुन्हेगार असंच म्हणतात. पप्पा म्हणतात खून तुम्ही कलेत. काय समजायचं काय ? आम्हाला मोघम उत्तरं नाही चालत हो. चला जाधव घ्या दोघाना आत ," असं म्हणत ते उठले आणि डॉक्टरांजवळ जात त्यांनी पप्पा आणि डॉक्टरांच्या एकेक कानफटात भडकवली. जाधवांना म्हणाले " घ्या दोघांना आत, हात साफ करुन घ्या. मग जाधवांनी प्रथम डॉक्टराना कॉलर धरुन उचलंल आणि ओढीत अंधाऱ्या चार्जरुम मधे गेले. दहा पंधरा मिनिटं फक्त डॉक्टरांच्या किंकाळ्या आणि जाधवांच्या शिव्या ऐकू आल्या. मग त्याना मगाचसारखे ओढीत बाहेर आणलं. त्यांचा एक डोळा बाहेरुन काळा आणि आतून लाल दिसत होता. त्यांचा एक हातही लोंबत होता. ते जेमतेम खुर्चित बसले. ते पाहून पप्पा शहारले. आणि म्हणाले ," मी ...मी सगळं सांगतो सर पण मला मारु नका. "
ते पाहून आम्ही दोघे शहारलो आणि इन्स्पे. म्हणाले, " तुम्ही तर एका दगडात दोन पक्षी मारलेत की. गुड जॉब. " त्यावर मिशा पिळीत जाधव म्हणाले ," सर , आपली गिरिपच अशी असत्ये. "
मग मी विचारलं, " आम्ही दोघं गेलो तर चालेल का ? " थोडावेळ थांबून इन्स्पे. म्हणाले, " ठीक आहे निघा तुम्ही, पण सध्या वाडा सोडून जायचं नाही , तपास पुरा होईपर्यंत तुमची गरज लागेल. "
मग मात्र मी आणि दीपा उठलो. बाहेर आलो . तेव्हा दीपा बिलगून म्हणाली ," सॉरी अवि. पप्पा असे असतील असं वाटलं नाही रे. .. "
तेवढ्यात जाधव बाहेर येऊन म्हणाले " साहेब तुम्ही जाणार कशे ? थांबा ड्रायव्हर सोडेल तुम्हाला ." मग अर्ध्या तासात आम्ही वाड्यावर पोहोचलो. दिवसाच्या प्रकाशात वाडा आता बराच सौम्य दिसत होता. राधाबाई नसल्याने जेवणाचा प्रश्न होताच. खेडेगावात हॉटेल मिळणंही कठीण. मला कॉलेजमधे आणखी दोन दिवसांच्या रजेसाठी फोन करावा लागला.प्रिंसिपल जरा वैतागलेले दिसले. पण मी गेल्यावर सगळं सांगितलं की ऐकतील याची मला खात्री होती. थोडावेळ विश्रांती घेऊन आम्ही जेवणासाठी तालुक्याच्या गावी गेलो. चांगलं जेवण मिळायला ते काही मुंबई पुणं नव्हतं. असो घरी आल्यावर जे झालं त्यावर बरीच चर्चा झाली. मग मी दीपाला म्हंटलं, " आता आपण पुढे कसं करायचं .....म्हणजे आपल्या लग्नाचं आणि या वाड्याचं . "
त्यावर ती म्हणाली पहिल्यांदा लग्न करुन घेऊ. मग वाड्याबद्दल ठरवू. " मी सध्यातरी तिला होकार दिला. आता मला वाड्यात फारसा रस नव्हता. बघू ,जमेल तेव्हा नवीन बांधू. संध्याकाळच्या जेवणाचा प्रश्न नव्हता. पार्सल होतंच. आता वाड्यावर ठेवलेल्या गड्याचा प्रश्न होता. दीपाला पटत नव्हतं तरी मी त्याला ठेवण्याचं ठरवलं. कधीमधी या्वंसं वाटलं तर थोडीफार तरी व्यवस्था ठेवायला त्याची गरज होती. रात्र झाली. एवढ्या मोठ्या वाड्यात आम्ही दोघेही भुतासारखे राहणार होतो. आज एकाच खोलीत आणि एकाच बेडवर आम्ही झोपलो. बेडवर पडल्यावर दीपा लगेच जवळ येऊन म्हणाली ," पप्पा आणि ताईमुळे तुला खूप त्रास झाला असेल ना ? " डोळ्यतलं पाणी पुसत ती माझ्या मिठीत विसावली. आज पावसाने एक्झिट घेतली होती. मी तिला बाजूला करीत म्हंटलं," हे पाहा बाईसाहेब आता लग्न झाल्याशिवाय जवळ यायचं नाही. हा पोलीसतपास संपला की आपण लवकरच लग्न करु. मी गादी घालून खाली झोपणार आहे. " असं म्हंटल्यावर ती हो म्हणाली पण नाईलाजनेच. तिच्या तोंडावर ते स्पष्ट दिसत होतं. असो आम्हाला लवकरच झोप लागली.
सकाळी जाग आली ती इन्स्पेक्टर साहेबांच्या फोननेच. मी फोन घेतल्यावर ते म्हणाले," किती झोपणार आहात हो. सात आठवेळा फोन लावला मी. बरं तासाभरात पो.स्टेशनला या. मी गाडी पाठवतोय. " असं म्हणून त्यांनी फोन बंद केला. अजूनही मला सापडलेल्या कवटीबद्दल कुतुहलमिश्रीत भीती होती मी ते दीपाला मुद्दामच सांगीतलं नाही ती इथे राहू शकली नसती. मला भीती वाटत नव्हती असं नाही. . आम्ही पो. स्टेशनला जाण्याची तयारी करीत होतो. जो नोकर इथे होता त्यानी दूध आणून दिल्याने आमचा चहा वगैरे झाला दीपाला फार काही नाश्ताबिश्ता बनवता येत नव्हता. पण आत्ता मला वाद नको होता. अजून मी तिला ताईंबरोबर सिनेमा पाह्यला गेल़ो होतो हे सांगितलं नव्हतं.अजून मी वाड्याचा दलदलीच्या बाजूला असलेला भाग पाहिला नव्हता. लवकरच गाडी आली . आम्ही पो. स्टेशनकडे निघालो. येताना जेवूनच घरी यायला लागणार होतो. आल्याबरोबर इन्स्पे. साहेब म्हणाले , " झाले की रात्रीत दोघेही तयार. खून मात्र पप्पांनीच केले आहेत पण डॉक्टर त्यात सामील असणार याची मला खात्री आहे. नाहीतरी दुसऱ्या चौकशीत त्याला अडकवायचंच आहे. " मग मी त्याना दलदलीजवळच्या जागेबद्दल संशय व्यक्त केला. पप्पाना मी भेटू इच्छित नव्हतो पण दीपाला ओढ होती. म्हणून साहेबांच्या परवानगीने त्याना भेटायल गेली. तेवढ्यात इन्स्पे. साहेबांनी मागवलेला चहा आला. तो घेता घेता ते म्हणाले ," साधारणपणे आणखी दोन दिवसांनी घरी जाऊ शकता . " मग मी त्याना मला सापडलेल्या मानवी कवटीबद्दल त्याना सांगितलं. डोळे विस्फारित ते म्हणाले. " त्याच्याशी नक्कीच डॉक्टरचा संबंध असणार. ठीक आहे आम्ही आज संध्याकाळीच येऊ. वाड्याचा दुसरा भागही पाहू.नक्कीच काहीतरी सापडेल. " तेवढ्यात दीपा आली. मग आम्ही जायला निघालो.पुन्हा त्यांनी त्यांच्याच गाडीने आम्हाला सोडलं. वाड्यावर पोहोचल्यावर माझी गाडी घेऊन आम्ही जेवायला गेलो. जेवणात नाविन्य नव्हतंच. कसं असणार ? मी काही मुंबईत नव्हतो. यापुढे पोलिसांची गाडी वापरायची नाही हे मी ठरवलं. असो. परतल्यावर दीपानी परत लग्नाचा विषय काढला. तिचंही बरोबर होतं. घरी गेल्यावर ती एकटीच राहणार होती. तिला त्याची भीती वाटत होती. पप्पाची शिक्षा नक्कीच होती. म्हणजे आणखी काही वर्ष जाणार. केस चालू व्हायच्या आत लग्न झालं तर तिच्याबरोबर मी असेन. आणि केसमुळे होणारी बदनामी सहन करायला माझी मदत होणार होती.तास दोन तास चर्चा झाल्यावर मी लवकरात लवकर लग्न करण्याचं तिला आश्वासन दिलं. संध्याकाळी साडेपांच सहाच्या सुमारास इन्स्पेक्टर आले. आता मात्र येताना त्यांनी एकदोन माणसं जास्त आणली. पावसाची काळोखी भरली. पावसाला सुरुवात झाली. आल्याबरोबर ते माझ्या खोलीची झडती सुरु केली. कवटी आणि एक दोन मानवी हाडंही त्याना मिळाली. वॉर्डरोब मधले रबरी मोजे आणि इतर सामानही त्यानी बाहेर काढलं. साड्यांच्या वीसपंचवीस घड्या मिळाल्या .पण हात लावल्यावर त्यांचा भुगा होत होता. जो भाग चांगला होता तो प्लास्टिक पिशव्यांमधे सील करुन पुढील तपासासाठी पाठवण्याचं ठरवलं. एखाद्या वस्तूचं वय किती असावं हे ठरवणाऱ्या सरकारी खात्याकडे पाठवण्यासाठी वेगळ्या ठेवण्यात आल्या. आत्तपर्यंत दीपाने दोनदा चहा जमेल तसा नाश्ता बनवला होता.
आता साडेसात वाजत आले. " चला वाड्याची मागची बाजू पाहू." असं म्हणून इन्स्पे, दोन कॉन्स्टेबल्स बरोबर आणलेली जास्तीची माणसं, त्यातला एक कुलपं उघडणारा आणि दुसरा कुलपं तोडणारा त्याच्या हातात छोटीशी पहार होती., आणि आम्ही दोघं. मागील दरवाज्या आता अर्धवट तुटला होता. दहा पंधरा फुटांवर शतकानुशतकांची साचलेली दलदल होती. मागचा भाग नंतर केव्हातरी बनवून जोडला असावा. तरी पन्नास साठ वर्ष जुना असावा. मी वर्ष सांगतोय त्यावर विश्वास ठेवू नका ,कारण मी काही तज्ञ नाही..असो आम्ही या भागाचा मुख्य दरवाज्या अजून उघडला नव्हता ,तोच अचानक दड् दड् धाम् धडाम् धुम् असा आवाज होऊन तो भाग कोसळू लागला. अचानक प्रचंड धुरळा उडू लागला आणि दगड माती आमच्या अंगावर येऊ लागले. आम्ही तोंडावर रुमाल ठेवून दहा बारा फूट मागे सरकलो..".............मला वाटतं, एक दोन दिवस थांबावं लागेल " त्यावर इन्स्पे. म्हणाले " अहो थांबलो तर पावसाच्या पाण्यात पुरावे वाहून जातील की. पण मला वाटतं दिवसा उजेडी यावं." अहो, रात्रीत पुरावे वाहून जातील की ... " मी असं म्हंटलं खरं ,पण इन्स्पे. ना राग आला. " आमची चेष्टा करताय ? मिस्टर अविनाश एकदा का पुरावे हातातून निसटले की त्या तिडबिडेची फक्त चौकशी हातात राहील. आधीच तो आत्ताच्या घटनेत गुंतलेला नाही. आम्ही त्याला नेटमधे आणू पण तो थेट जबाबदार नसेल. आमचं काम वाटतं तेवढं सोपं नाही. उगाच टोमणे मारण्याचं काम करु नका . नाहीतरी मी एक कॉन्स्टेबल सोडून जाणार आहे. " मी सॉरी म्हणून बाजूला झालो. एका पोलीसला तिथे ठेवून इन्स्पेक्टर साहेब तांड्यासहित निघून गेले. म्हणजे आता आणखी काही दिवस आपले फुकट जाणार. अर्थात मी इन्स्पे. साहेबांची परवानगी घेऊन कॉलेजला जाऊन रजा वाढवून घ्यायचं ठरवलं. आता नऊ वाजून गेले होते. आम्ही पार्सल आणलेलं गरम करुन जेऊन घेतलं.बिछान्यावर पडल्या पडल्या मी दीपाला म्हंटलं " असं काही माझ्या आयुष्यात घडेल हे महिन्यापूर्वी कोणी सांगीतलं असतं तर मी विश्वास ठेवला नसता." त्यावर तिनी एकच उत्तर दिलं की आपल्याला लवकरात लवकर लग्न करायला पाहिजे. तिच्या द्रुष्टीने हाच रिझल्ट महत्वाचा होता.
आस्ते आस्ते आम्हाला झोप लागली. सकाळ झाल्याचं लक्षातंच आलं नाही. आम्हाला वाड्यावरच्या एकमेव गड्याकडून दूध मिळत होतं, म्हणून उठल्याबरोबर चहा तरी मिळत होता. असो, रोजरोज पोलिसांची गाडी कशाला वापरायची, असा विचार करुन दहा वाजण्याच्या सुमारास आम्ही माझ्या गाडीने पो.स्टेशनला निघालो. अचानक आम्हाला आलेलं पाहून इन्स्पे.म्हणाले," तुम्ही आज न बोलवता कसे ? इथे येण्याचं लोक टाळतात " ......... . " त्याचं काय आहे की माझी इथे राहण्याची कितपत गरज आहे ते सांगितलंत तर बरं, म्हणजे मी कॉलेजमधे जाऊन रजा वाढवून घेईन. " थोडावेळ जाऊन देऊन ते म्हणाले ," बरोबर आहे तुमचं, तशी तुमची फारशी गरज नाही. जेव्हा लागेल तेव्हा बोलवून घेऊ. तुम्ही जायच्या आधी तुमचं दोघाचं स्टेटमेंट तेवढं आमच्या जाधव साहेबांकडे नोंदवून जा. तसंही जे झालंय त्याबद्दलचा तपास पुरा झालेला आहे. या दोघांना त्यात बरोबर गुंतवलं आहे. " मग आम्ही बाहेर येऊन जाधव साहेबाना आमची स्टेटमेंट्स देऊन निघालो. आता वाड्यावर जाऊन फक्त कपडे गोळा करायचे आणि चावी नोकराकडे जाऊन निघायचं या विचारांनी मी उत्साहीत झालो. भराभर ,सगळं उरकून आम्ही गाडीत बसलो आणि एकदाचे निघालो. मी अनिच्छेनी आलो होतो ,काहीच मजा न आल्याने अनिच्छेनीच निघालो. पावसाचा जोर वाढत होता. येताना आम्ही परत त्याच रेस्टॉरंट मधे जेवायला थांबलो. पण आत्ता ताई आणि पप्पा नव्हते. दीपाचे डोळे डबडबले. तिला समजावताना माझी पुरेवाट झाली. दीपाला घरी सोडून निघताना मला जड गेलं.. आता मात्र आई बाबांशी मी लवकरात लवकर बोलण्याचे ठरवले. दुसऱ्या दिवशी प्रिन्सिपलना भेटून सगळं सांगितल्या्वर लागेल तेव्हा रजा घे असं ते म्हणाले. आता प्रॉब्लेम सुटत होते. आईबाबांनी पण पुढच्याच आठवड्यातला मुहूर्त काढून नोंदणी पद्धतीने लग्न करण्यास परवानगी दिली . नाही म्हणायला आईची आणि दीपाची निराशा झाली. दीपाचे नातेवाईक कोणीच नव्हते त्यामुळे हा निर्णय योग्यच ठरला. पाचसहा मित्र आणि अगदी जुजबीच नातेवाईकांच्या उपस्थितीत विवाह सोहळा पार पडला. दीपा माझ्या घरी राहायला आली. दीपाच्या फ्लँटला कुलुप लागलं. तिला ते फारसं आवडलं नाही. पण मी तिला समजावून सांगितलं. दुसऱ्याच दिवशी सकाळी इन्स्पेक्टर साहेबांचा फोन आला. मी त्याना कालच लग्न झाल्याचे सांगितलं. तरीही त्यांनी तासाभराकरिता येऊन जायला सांगितलं. " फार काही नाही, एकदा तुमच्या कानावर सगळा तपशील घातला की आरोपपत्राच्या मंजुरीसाठी ते प्रयत्न करणार होते. केस कोर्टात उभी राहायला तीन ते सहा महिन्याचा कालावधी लागणार होता. आम्ही तासाभरातच निघालो . दुपारचे बारा वाजण्याच्यआ सुमारास आम्ही पो. स्टेशनला पोहोचलो. इन्स्पे. साहेबांनी लग्नाबद्दल अभिनंदन केलं आणि म्हणाले, " त्या वाड्याच्या पडक्या भागात आणखी दोन मानवी सांगाडे सापडले. डॉक्टरला थर्ड डिग्री ट्रीटमेंट दिल्याबरोबर भडाभडा ओकला. जे दोन सांगाडे सापडले त्यांच्यावर डॉ. ने प्रयोग केले होते. त्या दोघानाही यशस्वी चांचणीनंतर त्याने मारुन टाकले. आणि त्याला मदत कोणी केली तुमची मेव्हणी गायत्री आणि पप्पा. आता पोचलेच दोघेही जन्मभरापुरते. " ते ऐकल्यावर दीपा रडू लागली . तिने पप्पाना भेटण्याची विनंती केली. आम्ही दोघेही पप्पना भेटलो. ते आता बरेच म्हतारे वाटू लागले. पोलिसांची वागणूक व एकूणच तणावापुढे त्यांचा टिकाव लागला नाही. दीपा सारखी रडत होती. ती म्हणाली " आपण चांगला वकील करु . तुम्ही नक्की सुटाल. " पण मला माहित होतं शिक्षा थोडीफार कमी होईल. शेवटी त्यानी मर्डर केले होते. आम्ही डॉ. ना भेटायला गेलोच नाही. ना तो आमचा नातेवाईक होता ना मित्र. निघताना इन्स्पे. साहेब म्हणाले, " या केसमधे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होता. ठीक आहे. तुम्ही निघा . अजून बराच वेळ लागेल." मग आम्ही घरी जायला निघालो..............जवळजवळ पाच वर्ष लागली. पप्पाना आणि डॉक्टरला जन्मठेप झाली.
वाडा तिथेच होता. आम्ही त्यासाठी गिर्हाईक पाहतोय. आयुष्यात भलताच अनुभव आला तो मी विसरु शकलो नाही.
(संपूर्ण)
.

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Use group defaults

मध्यंतरी तब्बेत बरीच बिघडल्याने भाग लिहून ठेवला होता तरी पाठवायला जमलं नाही त्याबद्दल क्षमस्व. एक ते अंतिम भाग वाचकांच्या सोयी साठी एकत्र पाठवीत आहे.उशीर झाल्याबद्दल दिलगीर आहे.

मध्यंतरी तब्बेत बरीच बिघडल्याने भाग लिहून ठेवला होता तरी पाठवायला जमलं नाही त्याबद्दल क्षमस्व. एक ते अंतिम भाग वाचकांच्या सोयी साठी एकत्र पाठवीत आहे.उशीर झाल्याबद्दल दिलगीर आहे.

मध्यंतरी तब्बेत बरीच बिघडल्याने भाग लिहून ठेवला होता तरी पाठवायला जमलं नाही त्याबद्दल क्षमस्व. एक ते अंतिम भाग वाचकांच्या सोयी साठी एकत्र पाठवीत आहे.उशीर झाल्याबद्दल दिलगीर आहे.