सळसळते तारुण्य गेले - ऋषी कपूर

Submitted by बेफ़िकीर on 30 April, 2020 - 01:01

एक सगळ्या जगालाच आवडणारे व्यक्तीमत्व असावे पण ते गेल्यावर अगदी व्यक्तीगत दु:ख व्हावे असे फार कमी वेळा घडते. कालच इरफान खान कमी वयात गेला आणि आज ऋषी कपूर ६८ व्या वर्षी! किशोर कुमार, आर डी हीपण अशीच व्यक्तीमत्वे!

मलईवर गुलाबाच्या पाकळ्या भुरभुराव्यात तसा चेहरा घेऊन बॉलीवूडमध्ये प्रवेशलेला ऋशी कपूर कायम दोन मर्यादांसह कार्यरत राहिला व तरीही अफाट यशस्वी ठरला. गोंडस चेहरा आणि गबदूल शरीरामुळे हाणामारी करू शकणे, प्रेक्षकांना सूड उगवल्याचे क्षणिक समाधान देऊ शकणे यापासून त्याला नेहमीच दूर राहावे लागले. दुसरे म्हणजे त्याच्या ऐन भरभराटीच्या काळात अमिताभ बच्चन हिंदी चित्रपटसृष्टीचा सर्वेसर्वा होता. त्याच्याबरोबर अनेक भूमिका केलेल्या ऋषी कपूरचे एकत्रित चित्रपटातील अस्तित्व तुलनेने कायम दुय्यमच राहिले. मात्र या समस्येवर ऋषी कपूरने सहज मात केली होती. त्याच्या एकट्याच्या वाटेला चित्रपटाचा नायक म्हणून आलेल्या भूमिकांचे त्याने सोने केले. भूमिकेला आवश्यक ते गांभीर्य त्याने नेहमीच देऊ केले. त्याचा आवाज, भावनिक गुंतवणूक सहज समजेल अशी संवादफेक, मुद्राभिनय आणि आपल्या (तथाकथित) मर्यादांनाच आपले बलस्थान बनवण्याचे कसब अफलातून होते. तथाकथित म्हणण्याचे कारण असे की असे गुलगुलीत शरीरयष्टी आणि तोंडावळा असलेले कैक स्टार्स आधीच्या जमान्यात होऊन गेले. त्यांनीही त्यावर बर्‍यापैकी मात केलेली होती.

राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, शशी कपूर, संजीव कुमार, विनोद खन्ना आणि अनेक चरित्र अभिनेते, अभिनेत्री यांच्या उपस्थितीत योग्य तेवढा भाव ऋषी कपूरने नेहमीच खाल्ला. अमर, अकबर, अ‍ॅन्थनी हे त्याचे सर्वात सुरेख उदाहरण म्हणावे लागेल. खणखणीत शरीरयष्टीचा इस्न्पेक्टर विनोद खन्ना आणि सुपरस्टार अमिताभ यांच्या उपस्थितीत अकबर उभा करून पडदा व्यापणे सोपे नव्हते.

राज ते रणबीर या पिढ्यांमधील एक प्रदीर्घ लांबीचा दुवा म्हणूनही ऋषी कपूर कायम आपले स्थान टिकवून राहील असेही वाटते. याचे कारण सत्तरच्या दशकापासून ते एकविसाव्या शतकापर्यंत कार्यरत राहणे हे विशेष महत्वाचे आहे. समाज, संस्कृती, मूल्ये, प्राधान्ये यात आमुलाग्र बदल होण्याची ही चाळीस, पन्नास वर्षे होती. बदलाचा वेग कधी नव्हे इतका वाढला होता. या वेगवान प्रवाहात टिकून राहणे आणि कायम आकर्षणाचा विषय ठरणे सोपे नव्हते. ऋषी कपूरने तर कारकीर्दीच्या शेवटी खलनायकी भूमिकाही केली.

ऋषी कपूरचे नृत्य व गाण्यांवर अभिनय करतानाचा मुद्राभिनय हे मन ताजेतवाने करणारे असत. दिवाना चित्रपटात लहानश्या दिव्या भारतीसमोर खूपच गबदूल दिसत असूनही त्याने हा प्रश्न रसिकमनात येऊ दिला नव्हता की हे दोघे एकमेकांना शोभतात तरी का!

राज कपूरने भारतीय संस्कृती व त्यातील मूल्यांना पडद्यावर महत्व दिले. शम्मीने वेडेपणा करून एका पिढीला वेड लावले. शशी कपूरने मर्यादांमध्ये राहून आलेल्या भूमिकांचे शक्य तितके चीज केले. रणधीर कपूर व राजीव कपूर तसे मागे मागेच राहिल्यासारहे वाटले. पुढच्या पिढीला त्या त्या काळाला सोभेलसा अभिनय करणे व वावर ठेवणे आवश्यक झाले. करिष्मा, करीना आणि रणबीर यांनी कपूर घराण्याचा दबदबा निश्चितच कायम ठेवला. मात्र ऋषी कपूरने प्रदीर्घ काळ हिंदी चित्रपट रसिकाचे मन ताजेतवाने आणि तरुण ठेवले. हे ऋषी कपूरचे फार मोठे योगदान म्हणावे लागेल.

जेव्हा सुपरडूपर हिट चित्रपट देणार्‍या अभिनेत्यावर दुनिया जान कुर्बान करत असते तेव्हा अभिनेत्यांची एक फळी एकापाठोपाठ एक गुणी चित्रपट देऊन मोठेच योगदान देत असते. ऋषी कपूर अश्या फळीचा प्रतिनिधी होता असे म्हणावे लागेल. सतत त्रस्त चेहरा न करता, फारशी हाणामारी न करता, सतत सुडाग्नीने पेटलेले नसूनही एक सशक्त कथानक मांडता येते हे दाखवून देणार्‍या ऋषी कपूरला.....

..... साश्रू नयनांनी शेवटचा निरोप!

=====

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>> ही जाणीव कधी येणार ?>>> विकृत असतात काहीजण. त्यांना जाणिवेशी वगैरे काही घेणं देणं नसतं. Sad

Pages