फुकटात विनासायास वेटलॉस

Submitted by शाम भागवत on 3 July, 2018 - 03:17

वाढलेला पोटाचा घेर व वाढलेले वजन, सोबतीला कोलेस्टेरॉल सापडल्यामुळे नशिबी आलेल्या गोळ्या आणि आता या आयुष्यभर घ्यावयाच्या आहेत अस डॉ. नि सांगितल्यावर मनाला बसलेला हबका. काही जणांचा वाढलेला रक्तदाब व त्यावरच्या गोळ्या , मधुमेह पूर्व स्थिती लक्षात आल्यावर उडालेली घाबरगुंडी तर मधुमेह झाल्याचे निदान झाल्यावर घरातल्या सर्वांच्या चेहऱ्यावर अवतरलेली काळजी. आणि या सगळ्यातून हे खा व हे खाऊ नका ची भली मोठी यादी. शिवाय गुडगेदुखी, ऍसिडिटी , .. , .., .. असच बरच काही यांच्यासाठी हे लिहितोय.

ह्या सगळ्या त्रासातून कस मुक्त व्हायच?, एक पैसा जास्त खर्च न करता हे कस साधायच? श्रीमंत असो की गरीब दोघांनाही जमू शकेल,तसेच स्त्री पुरूषात अजिबात भेदभाव न करता दोघांनाही एकच पद्धत कशी वापरता येईल, तसेच त्यामागे विज्ञानाचा भक्कम पाठिंबा असला पाहिजे. वगैरे वगैरे .......
थोडक्यात आखूड शिंगी, बहुदुधी, गरीब, दूध काढताना लाथा न मारणाऱ्या बहुगुणी गायीबद्दल हे लिहितोय.

कै. डॉ.श्रीकांत जिचकार एक अवलिया माणूस. एमबीबीएस, एमडी झाल्यावर आयपीएस त्यानंतर चक्क आयएएस. पण चारच महिन्यात नोकरीचा राजीनामा देऊन आमदार, मग मंत्री, राज्यसभेचे खासदार. या माणसाने प्रगती तरी किती वेगाने करावी? पण हे सगळं ४९ वर्षांच्या आयुष्यात साधायच म्हणजे एवढा वेग हवाच की हो!

घरातल्या ग्रंथालयात बावन्न हजार पुस्तक. विद्वत्ता दाखविण्यासाठी जाहिरात म्हणून नक्कीच जमवलेली नसणार. उलट सगळी वाचलेली असण्याची शक्यता जास्त. कारण ४२ विद्यापीठातून मिळवलेल्या २० पदव्या. बहुतेक सगळ्या प्रथम श्रेणीतून मिळालेल्या. २८ सुवर्णपदक मिळवलेला माणूस हा. नक्कीच पुस्तके वाचलेली असणार.

तर असा हा माणूस. भरपूर परदेश वाऱ्या केलेला असूनही त्याची भारताशी जुळलेली नाळ तुटली नव्हती. साधारण अशी माणसे थोडीशी भारतीय संस्कृतीशी फटकून वागतात. पण इथेही आपल्याला आश्चर्याचा धक्का बसतो. भारतीय संस्कृती व प्राचीन इतिहास, तत्त्वज्ञान व संस्कृत यात एमए केलेय. हे मी आपल वानगीदाखल सांगतोय कारण तस पाहिल तर त्यांनी १० विषयात एमए केलेय. इतकच काय मानाची डी. लिट. पदवी मिळालीय त्यांना संस्कृतामध्ये.

तर सांगायच म्हणजे अशा माणसाने १९९७ साली एक नवीन विचार भारताला दिला. त्यावेळी ते राज्यसभेचे सभासद होते. पुणे महानगर पालिकेत मा. शशिकांत सुतार नावाच एक मोठ्ठ प्रस्थ होत. त्यांनी बालगंधर्व रंगमंदिरात जिचकारांना भाषणासाठी बोलावल. त्यासाठी सगळी व्यवस्था जातीने केली. आपोआपच बरेच मान्यवरांनी रंगमंदिर भरून गेल.

त्यांनी सांगितल की, "शरीरात तयार होणारे अतिरिक्त इन्शूलीन बऱ्याच रोगांचे कारण आहे." स्थूलता, त्यातून मधुमेह, वाढलेला रक्तदाब, त्यातून मग अंजोग्राफीची तपासणी, त्यात नक्की काहीतरी सापडतच. मग अंजोप्लास्टी. सगळाच प्रकार खर्चिक. पण मरणाची भीती वाटायला लागली की माणूस करतो खर्च. त्याला वाटतं की झाल सगळ करून. आता काही आपल्याला होणार नाही. पण कसच काय. पाच सहा वर्षात आणखी खर्चिक बायपाससाठी हॉस्पिटलची वारी ठरलेली.

मग यावर सोपा उपाय काय? दिवसातून फक्त दोनदाच जेवा. काहीही खा. भूक भागेपर्यंत कितीही खा. तूप लोणी बिनधास्त खा. मांसाहारही चालेल. फक्त हे जेवण ५५ मिनिटांत संपवले पाहिजे. आणि दिवसातून ४५ मिनिटे भरभर चालण्याचा व्यायाम केला पाहिजे. महागड्या जिम नको की, आहारतज्ञांना पैसे द्यायला नको. दवाखान्याची पायरी चढायची कधी वेळही येणार नाही. किती सोपे आहे ना? पण अवघड बाब पुढे आहे. ते पुढे सांगतात की, "दोन जेवणामध्ये काहीही खाऊ नका." याकाळात तोंड उघडायचे ते फक्त बोलण्यासाठी किंवा पाणी पिण्यासाठी. बस्स. औषधांच्या याद्या विसरून जा. हे खा व हे खाऊ नका याची प्रत्येक डॉक्टर व आहारतज्ञांप्रमाणे बदलणारी यादी व त्यातून उडणारे गोंधळ संपवून टाका.

सगळ वैज्ञानिक नियमावर आधारलेले भाषण. समोर अनेक मान्यवर बसलेले. त्यामुळे बऱ्याच वेळेस अशी भाषणे इंग्रजीत चालतात आणि जिचकार तर इंग्लिश लिटरेचर मध्येपण एमए केलेले. पण तरीही हा विचार सर्वसामान्य माणसाला कळला पाहिजे यासाठी हे भाषण त्यांनी मराठीतून दिले आहे. समोर नुसते मान्यवर नाही तर पुण्याचे मान्यवर बसणार आहेत म्हणून त्यांनी अनेक इंग्रजी संज्ञांना पूरक मराठी संज्ञा शोधून काढल्या होत्या व त्या संज्ञा पाठ करून मगच ते व्याख्यान द्यायला आले होते. (या मराठीतील संज्ञा शोधणे व पाठ करणे हे कामही त्यांना सोपेच गेलेले असणार. कारण ते महाराष्ट्राच्या विश्वकोश निर्मिती मंडळाचे सभासद होते!!!) एखाद्या माणसाला बेंबीच्या देठापासून कळकळ असते म्हणजे काय हे समजून घ्यायचे असेल तर त्यासाठीही हे व्याख्यान ऐकायला हरकत नाही.

आपल्या या कार्याचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी "नागपूर फिटनेस मुव्हमेंट" आणि "पुणे फिटनेस मुव्हमेंट" अशा दोन संस्था सुरू केल्या. पण त्या काळात फेसबुक किंवा व्हॉटऍपस वगैरे काहीच नव्हत. नाहीतर याचा प्रसार फार वेगाने झाला असता. मनोगत, मायबोली किंवा मिसळपाव सारखा एखादा संकेतस्थळ तयार करता अल्लाही असत कदाचित. पण वाचणार कोण? इंटरनेट फार महाग होत त्यावेळेस. टाटा कंपनीच्या व्हीसएनएल ला वर्षाकाठी पाच सहा हजार भरल्यावर कनेक्शन मिळायच. शिवाय घरात फोन असला पाहिजे ही पूर्वअट. आणि नेट वापराला सुरवात झाली की दर मिनिटाला एक टेलीफोनचा कॉल एवढे पैसे टेलिफोनच्या बिलात यायचे तो खर्च वेगळाच. नेट वापरणे हे सामान्यांच्या कुवती बाहेरची गोष्ट होती. अपवाद फक्त आयटी मधल्या लोकांचा!

तरीपण राज्यसभेच्या सदस्याला बऱ्याच सोयी सुविधा असतात. ओळख पाळख असते. त्यामुळे प्रसाराचे काम चालू होते. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. दोनच वर्षांनी म्हणजे १९९९ साली झालेल्या लोकसभेच्या निवडणूकीसाठी काँग्रेसकडून त्यांना तिकिट मिळाल पण फक्त ३०००+ मतांनी पडले. इतकेच नव्हे तर राज्यातले आणि त्याचबरोबर केंद्रातले काँग्रेसचे सरकार पडले. प्रसारावर फारच मर्यादा आल्या.सर्वात मोठे दुर्दैव म्हणजे २००४ साली जेव्हा कॉग्रेसचे सरकार राज्यात व केंद्रात आले त्यानंतर दोनच आठवड्यात त्यांचा अपघाती मृत्यू झाला. मला वाटते या नवीन विचारांचे फक्त बी लावायचे काम नियतीने त्यांच्यावर सोपवले होते.

त्यांचा या भाषणाचा एक ऑडिओ यूट्यूबवर होता. पण दोन तास तीन मिनिटांचा ऑडिओ म्हटल्यावर बरेच जण तो उघडून सुद्धा बघत नसत. आणि यदाकदाचित कोणी उघडलाच तर बरेच जण पहिले प्रास्ताविक संपेपर्यंतही कळ काढू शकत नसत. त्यामुळे मूळ भाषण सुरू होण्याआधीच तो बंद केला जायचा. एवढा वेळ असल काही ऐकायला तो थोडाच वपू किंवा पुल चा व्हिडिओ होता की व्यायाम/प्रवास करताना ऐकायचा गाण्याचा अल्बम होता? ही राजकारणी लोक ही अशीच. समोर माइक आला की यांना वेळेच भानच राहत नाही. अशी कॉमेंटपण कोणीतरी केली असेल असा मला दाट संशय आहे.

बरीच वर्षे निघून गेली. जिचकारांनी लावलेले बी रूजण्यासाठी अनुकूलतेची वाट पाहत युट्युबवर पडून होत. ही अनुकुलता लाभणे फार अवघड होत. त्याला वेळ लागणार हे त्या बियाणाला माहीत होत. आणि सहा वर्षापूर्वी ते एकाच्या हृदयात रूजल. हा माणूस एमबीबीएस, एमडी होता. पण रोग पाहून औषध देणारा नव्हता. तर रोग होऊच नये यासाठी काय करता येईल यातला तज्ञ होता. प्रामाणिक होता. पैशासाठी काम करणारा नव्हता. समाजाच्या भल्यासाठी काम करण्याची इच्छा असणारा असा होता. मुख्य म्हणजे माहिती वाचून चर्चा करणारा नव्हता तर त्यासाठी स्वतःवर प्रयोग करायला तयार असणारा व त्यासाठी स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करायला तयार असणारा होता. नियतीने अगदी अचूकरीत्या लातूरच्या डॉ. जगन्नाथ दीक्षित यांची निवड केली होती.

डॉ. दीक्षित सध्या ते लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विभाग प्रमुख आहेत व गेली सत्तावीस वर्षे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अध्यापन करत आहेत. "स्थूलत्व निवारण आणि मधुमेह प्रतिबंध" या विषयावर त्यांनी संशोधन केले.यात त्यांनी प्रथम स्वतःवर प्रयोग केले. नातेवाइकांवर प्रयोग केले. जवळच्या मित्रांवर प्रयोग केले. या सगळ्याच्या व्यवस्थित नोंदी ठेवल्या. मग मात्र त्यांनी लातूर व औरंगाबाद येथील हजारो लोकांवर प्रयोग केले. वैज्ञानिक नियतकालिकात प्रबंध लिहिण्यासाठी या प्रयोगाचे योग्य दस्तावेजीकरण केले व अनेक प्रबंध प्रकाशीतही केलेले आहेत.

पण प्रसारासाठी नुसते प्रबंध लिहून भागत नाही यासाठी त्यांनी व्याख्याने द्यायला सुरवात केली. पुण्याच्याच बालगंधर्व रंगमंदिरात कै. डॉ. श्रीकांत जिचकारांच्या स्मृतीला अभिवादन करून सुरवात झालेले त्यांचे व्याख्यान ऐकण्यासाठी खाली लिंक देत आहे. हेही व्याख्यान खूप मोठे आहे. पहिले प्रास्ताविक ३० मिनिटे चालते. त्यामुळे व्याख्यानासाठी आतुर झालेले बरेच जण कंटाळून पहिल्या काही मिनिटांनंतर व्याख्यान बंद करून टाकतात. हे प्रास्ताविक पाहू नये म्हणून मी हे सांगत नाहीये. तर थोडा धीर धरावा असे सुचवत आहे. या प्रास्ताविकातूनही तुम्हाला काही मुद्दे मिळू शकतात.

२०० च्या वर व्हॉटऍपस ग्रुप स्थापन करून व फेसबुकच्या माध्यमातून ही चळवळ अठ्ठावीस हजार माणसांपर्यंत पोहोचली आहे. अनेक देशातील माणसे यात आहेत. पण हे सगळे सांभाळणे आता अवघड होत चाललेय. कार्यकर्त्या डॉक्टरांना यासाठी वेळ देणे अवघड होत चाललेय. यासाठी आता एक वेबसाईटच उघडायचे प्रयत्न चालू आहेत. तस झाल की एकाच ठिकाणी सगळी माहिती एकत्रित होईल. वेळ वाचेल. एक कोटी लोकांपर्यंत लोकांपर्यंत पोहोचायचे उद्दिष्ट समोर ठेवून आता काम सुरू होणार आहे.

खर म्हणजे ह्या व्याख्यानाचा सारांश देण्याचा माझा विचार होता. पण मी मुद्दामहून तस करत नाहीये. कारण तस केले तर लोक मूल व्याख्यान न ऐकताच चर्चा करायला सुरवात करतात. हे व्याख्यान ऐकल्यावर फारशा शंका उरत नाहीत. शिवाय त्यांनी काही फोन नंबरही दिलेले आहेत. त्यावर तुम्ही व्हॉटऍपवर प्रश्न किंवा शंका विचारू शकता.

डॉ. दीक्षित यांच्या व्याख्यानाची लिंक खाली देत आहे. दोन तास सलग वेळ काढता येईल अशी वेळ निवडून निवांतपणे पहा.
https://www.youtube.com/watch?v=edKaI5gxaNQ

ही डॉ. दीक्षित यांची फेसबुक पेजची लिंक आहे. त्यात लाभार्थींची नावे, अनुभव व मोबाईल नंबर दिले आहेत.हे तुम्ही केव्हाही पाहू शकता! https://www.facebook.com/weightlosseffortlessly/

डॉ. जिचकार यांनी याच व्याख्यानात बी पेरण्याचे काम केले. हा ऑडिओ आहे. दोन तास सलग वेळ काढता येईल अशी वेळ निवडून निवांतपणे पहा.
https://www.youtube.com/watch?v=8-kw3hGUwW4

मी स्वतः या विषयातला तज्ञ नाही. पण या संकेतस्थळावर या विषयातले बरेच तज्ञ असल्याने साधक बाधक चर्चा होऊन हा विषय आणखी स्पष्ट होईल याहेतूने हे लेखन केले आहे.

एक महत्त्वाची सूचना :
ज्यांना मधुमेह आहे अशांनी HbA1c आणि fasting insuline या दोन तपासण्या करून त्याचे अहवाल डॉ. दीक्षित यांना पाठवावेत. या दोन तपासण्या म्हणजे रक्तातल्या शर्करेचे प्रमाण दाखवणाऱ्या तपासण्या नव्हेत. त्यानंतर त्यांच्याच सल्ल्यानेच पुढील आहारयोजना सुरू करावी. परस्पर आहारयोजना सुरु करू नये.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

विक्रमसिंह,
तुमचा अनुभव इथे लिहील्याबद्दल धन्यवाद. तुमची हरकत नसेल तर जेवणात कोणते पदार्थ टाळले किंवा कोणत्या पदार्थांचा अंर्तभाव केला याबद्दल थोडे सविस्तर लिहाल का? तसेच तुमच्या डॉक्टरांनी हे डाएट करताना (तुम्ही मधुमेहाचे औषध घेत असल्याने) तुम्हाला काही टीप्स, सल्ले दिले होते का? व्यायाम कार्डीओ करता का वेटस ?
माझ्या डॉक्टरांनी आणि डाएटीशएनने डायबेटीसची औषधे घेत असल्यास इंटरमिटंट फास्टींगला विरोध केला त्यामुळे कुतूहल आहे.

अंजली.
मी डायबेटिसची गोळी १५ दिवसच घेतली असेल. नंतर माझी मीच बंद केली कारण मला त्रास होतोय अस वाटायच आणि माझे साखरेचे चाचणी निष्कर्ष मधुमेह आहे म्हणण्या इतपत नव्हते.
कामाच्या स्वरूपामुळे कामाच्या दिवशी माझे दुपारचे जेवण घरी होत नाही व बाहेर स्विगी तर्फे. Happy ऑफिसमदल घेतल तर पोळी भाजी. बाहेरच घेतल तर अंडी ब्रेड, भाकरी भाजी, बेक्ड भाजी , चिकन किंवा फिश. संध्याकाळी फक्त भाजी, डाळ व अंडी किंवा फिश. घरी असेन तेंव्हा बाजरीची भाकरी.
भात किंवा गोड पदार्थ महिन्यातून कधी तरी. घरी कुणी येणार आहे म्हणून केला असेल तरच. चहात साखर नाही. फळे पण जास्त नाही.
माझा आहार फारसा आदर्श किंवा शास्त्रीय आहे अस नाही.
मी माझ्या डॉक्टरना दिक्षित पद्धती चालू केल्याचे सांगितले तेंव्हा त्यांनी थोडी नकारात्मक प्रतिक्रिया दिली. पण साखर कमी असल्याने गोळी बंद करायला परवानगी दिली. (तसही मी गोळी घेत नसल्याचे त्यांना सांगितले नव्हते). त्यांच्या म्हणण्याप्रमाणे दोनदाच खाल्ल तर Insulin spike (त्यांच्याच शब्दात) होते. पण याउलट माझी मेहुणी आणि साडू जे दोघेही युकेमधे डॉक्टर आहेत त्यांनी आम्हाला ५ -६ वर्षांपूर्वीच सांगितले होते की कमी वेळा खा. Multiple Secretion of insulin is very bad for health. (त्यांच्याच शब्दात) . पण तेंव्हा आम्ही दिवेकर गटात होतो, ऐकल नाही Happy ).

मला आवड असल्याने मी व्यायाम मात्र खूप करतो. पूर्वी जिम मधे जायचो. मुख्य भर स्ट्रेंग्थ, वेटस वगैरे. आता घरीच. जोर, बैठका, डंबेल्स. काही अ‍ॅपस डाउन लोड करून घेतली आहेत (Total fitness, Home work out, Dumbells only work out). मला कार्डिओची आवड नाही. पण पूर्वी क्रिकेट खेळलो असल्याने बेस फिटनेस बरा आहे. माझी आहारातील पदार्थांबाबत फारशी ठाम मते नाहीत प्रत्येकाना स्वतःला योग्य होईल असा करावा. पण व्यायामाचे म्हणाल तर सर्वांनी अगदी स्त्रीयांनी सुद्धा स्ट्रेंग्थ ट्चे व्यायाम करावेच असे माझे मत आहे. वजन कमी झालेले दिसले नाही तरी प्रकृती खूप चांगली रहाण्यास मदत होते हे नक्की.

तुम्हाला शुभेच्छा.

विक्रमसिंह, सविस्तर लिहील्याबद्दल धन्यवाद!
प्रत्येकाना स्वतःला योग्य होईल असा करावा. >>> याला अनुमोदन.

विक्रमसिंह,
छान अनुभव
११ महिने सातत्य ठेवता आल्याबद्दल
अभिनंदन!व शुभेच्छा.

आता झी मराठी वर दीक्षित चालू आहेत.
मला चर्चा आवडली.एकंदर त्यांच्या बोलण्यातून अनर्थ न करणारी सुज्ञ माणसं या प्लॅन चा खूप चांगला वापर करू शकतील.(बाकी अर्थाचा अनर्थ प्रत्येक ज्ञानी माणसाच्या बोलण्याचा कोणी न कोणी करतंच.)
मला हे गृहस्थ खुप क्युट(लोकांना पटेल या पद्धतीने विचार मांडणे आणि हजरजबाबीपण या अर्थाने) वाटले.

_/\_

" मुंबईच्या लोकल मधे आता चारही प्रवासी दीक्षित पॅटर्न चे असतील तर अगदी आरामात ऐसपैस बसून जाऊ लागलेत त्या मुळे जागेवरून होणाऱ्या भांडणात लक्षवेधी घट झालीय " थोडी अतिशयोक्ती असली तरी त्या विधानात दडलेल्या तथ्याचा सांगोपांग आणि दूरगामी विचार करावाच लागेल.

* पुण्यात गल्लोगल्ली उघडलेल्या आल्टर स्पेशालिस्टकडे दुकान उघडण्यापूर्वीच कशीबशी पँट सावरत पब्लिकचा मोठा क्यू लागलेला दिसतो.

* सकाळी दुथडी भरुन वहाणारे पोहे, उपमा इडली, बटाटे वडे वगैरेचे स्टॉल चक्क ओस पडलेले दिसतात. ५५ मिनीटापेक्षा जास्त वेळ कोणी हॉटेलमधे बसतच नाही. एकुणच हॉटेलमधली वर्दळ जवळजवळ निम्यावर आल्याच हॉटेल व्यवसायिक उघडउघड सांगतायत. रवा, पोह्यासकट बेसन आणि साखरेची विक्री घटल्यामुळे वाणी हवालदिल झालेत तर न्याहरी बंद झाल्यामुळे काही गृहिणी पोहे, उपीठ, वडे वगैरेची कृतीच विसरल्यात.

* जेवणा आधी आणि नंतर जाता येता दिसेल ते तोंडात टाकायच बंद झाल्यामुळे दाणे, चिक्की फरसाणवाले चींतेत आहेत. काहींनी तर चक्क सेल लावलेत म्हणे.

* काही डॉक्टरांकडे दरमहा हक्काचे आणि हमखास येणारे मधुमेही आणि ओबेस कमी होऊन वैद्यकीय व्यवसायात पहिल्यांदाच मंदी किंवा बेकारीचे सावट आल्याच बोलल जातय तर "अच्छे दिन" आलेले पँथॉलॉजिस्ट मात्र संधीचा फायदा घेउन चक्क "दिक्षित टेस्ट पँकेज" वर हात धुवुन घेतायत.

* पुण्यात थ्री सीटर रिक्षावाल्यांनी चवथा पँसेंजर घ्यायला सहमती दर्शवल्याचही बोलल जातय.

* सर्वात महत्वाच म्हणजे दिक्षित डायट प्लँनच्या परिणामांचा खगोल शास्त्रज्ञांनीही खोल विचार करायला सुरुवात केली आहे. जगाच्या ७७० कोटी लोकसंखेपैकी एक टक्का जनतेच म्हणजेच सात कोटी सत्तर लाख जनतेपैकी प्रत्येकाच सरासरी वजन पाच किलोनी कमी झाल तर पृथ्वीवरचा अडतिस कोटी पन्नास लाख किलोचा भार कमी होईल आणि पृथ्वीचा स्वतः भोवती भ्रमण करण्याचा वेग निश्चितच बदलेल. परिणामतः दिनमान बदलुन चोविस तासांचा दिवस, तिस-एकतिस दिवसांचा महिना किंवा ३६५ दिवसांचे वर्ष वगैरे संकल्पना भ्रामक ठरुन चंद्र केंव्हा उगवेल आणि सूर्य केंव्हा मावळेल या विषयीही अमुलाग्र बदल अपेक्षित आहेत अस मत त्यांनी नोंदवले आहे. शाळा, कॉलेज, नोकरी, व्यवसाय सर्वांच्याच वेळापत्रकात उलथापालथ होइल असाही त्यांचा होरा आहे.

@हेला
तुमच्या कल्पनाशक्तीला मनापासून दाद.
कॉपी पेस्ट करून आमच्या व्हॉग्रुवर टाकले सुध्दा.
खरेच मनापासून हसलो.

अनेक दुचाकी स्वारांनी दुचाकीचे अॅव्हरेज सुधारल्याचे सांगितलंय.
तर पेट्रोलपंप वाल्यांनी पंपावर रोज येणाऱ्या गाड्यांची संख्या कमी झाल्याचे सांगितलंय.

मात्र काही जणांनी दिक्षीत पध्दतीला कडाडून विरोध केलाय.
कारण या पध्दतीमुळे आपल्या शब्दांचे वजनही कमी होतंय त्यामुळे लोकं आपल बोलणं फारसं मनावर घेत नाहीत अशी काहींची तक्रार आहे.

मला शुगर नाही . पण थायराईड आहे . वजन वाढलंय . पण पायाचा त्रास आहे. पोटऱ्या , गुडघे दुखतात . त्यामुळे जास्त फिरू शकत नाही . दोन वेळेचं जेवण चालू केलं . काही प्रमाणात तरी वजन कमी व्हाव अस वाटत .

तळवलकर सारख्या जिमच्या बाहेर उभे राहा
तेथून बाहेर पडणाऱ्या विशाल महिलांना विचारा, तुम्हाला काय काय खायला मनाई केली आहे?
"जे जे त्यांना मना आहे, ते सर्व खा".

Pages