अन्न, स्त्रीवाद आणि मी (मूळ लेखिका आर्किटेक्ट शीतल पाटील)

Submitted by अतुल. on 28 September, 2019 - 02:15

संस्कृतीच्या नावाखाली हजारो वर्षांचा लेप मनांवर बसला आहे. मनं अधू झाली आहेत. असंवेदनशील झाली आहेत. इतकी असंवेदनशील कि रांधा, वाढा, खरकटी काढा हि स्त्रियांची कामेच आहेत, यात बदलण्यासारखे काय आहे? असा कोडगा व निलाजरा प्रश्न सहजगत्या विचारला जाऊ शकतो. अनेक ठिकाणी स्वत: त्या स्त्रीला सुद्धा याची जाण नसते. मानसिक गुलामगिरी सारखा दुर्दैवी प्रकार नसेल. नांगराच्या शोधानंतर निर्माण झालेली जमिनीची मालकी. त्यासाठी पुरुषांच्या हाणामाऱ्या. ती मालकी पुढे नेण्यासाठी वंश नावाचा प्रघात. व त्यातून पुढे निर्माण झालेला स्त्रियांवरचा मालकीहक्क. असा हा स्त्री-पुरुषांतील सामाजिक समतोल ढासळलेला प्रवास आहे. आणि संस्कृती नावाच्या प्रक्रीयेखाली हि गुलामगिरीची पुटं मनांवर शिस्तबद्धपणे चढवली आहेत. हा जाडजूड लेप खरवडून निघून एक व्यक्ती म्हणून स्त्रीकडे पाहायला शिकण्यासाठी अजून कित्येक वर्षे जातील माहित नाही. पण त्यासाठी आधी जी जाणीव व्हायला हवी ती होणे महत्वाचे आहे. माही मैत्रीण शीतल पाटील हिच्या लेखातून हि जाणीव निर्माण करण्याचा व मनांवरील हि पुटं काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला गेलाय. समतोल समाजव्यवस्था निर्माण होण्यासाठी असे विचार समाजाच्या सर्व स्तरांत झिरपवण्याची नितांत गरज आहे. याच भावनेतून व तिच्या परवानगीने हा लेख इथे देत आहे (खाली मूळ लेखाची लिंक सुद्धा आहे).
------------------------------------------------------------------------------------

अन्न, स्त्रीवाद आणि मी

गात दोन प्रकारची लोकं आहेत असं म्हणतात - एक जे खाण्यासाठी जगतात आणि दुसरे - जगण्यासाठी खातात.मी एक सामान्य भारतीय स्त्री आहे आणि तरीही, जरा चवीत बदल किंवा दुधात मिठाचा खडा म्हणूया - मी दुसर्या प्रकारात मोडते . जगण्यासाठी आवश्यक असलेली गोष्ट (read, necessary evil) इतकाच माझा आणि खाण्याचा संबंध. मी आता जे लिहिणार आहे ते केवळ कॅथार्सिस सारखं काहीतरी असणार आहे, पण हे कधीतरी करायला हवंच होतं तेंव्हा....

गोष्टीची सुरुवात करायची तर सुरुवातीपासूनच करायला हवी! त्यासाठी साधारण चार लाख वर्षं तरी मागे जायला हवं. अवघ्या चराचरात होमोनिड कुटुंबातील होमो इरेक्टस हा प्राणी कृत्रिमरित्या अग्नी निर्माण करायला आणि हाताळायला सगळ्यात आधी शिकला. ही मानववंशीय प्रजातींच्या बौद्धिक क्षमतेची पहिली ठिणगी. त्यातूनच मग अंधारलेल्या गुहे मध्ये हवं तेंव्हा हवा तेवढा प्रकाश आणि ऊब मिळवता येऊ लागली असेल. त्याने निबिड अरण्यात जगणं बरंच सुसह्य झालं असावं.

मुळात Hunter gatherer असलेल्या माणूस नावाच्या प्राण्याची अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जेंव्हा निसर्गाशी दोन हात करण्यात आणि सतत च्या स्थलांतर करण्यात खूप शक्ती खर्ची पडू लागली तेंव्हा त्याच्या मादीने पिल्लं जगावी म्हणून गुहेत राहून शेतीचा प्रयोग करून बघितला. त्या प्रयोगाची फळं मिळायला लागल्यावर तो हळू हळू स्थिरावायला लागला. आणि इथेच स्त्रीच्या अधोगतीची बीजं –“संस्कृती” नावाच्या कसदार जमिनीत रुजली, वाढली, फोफावली. मूल हे स्त्री पुरुष संबंधांतून जन्माला येतं इतकं तोवर माणसाला कळायला लागलेलं होतं. पण स्त्रीला होणारं मूल नक्की कुठल्या पुरुषाचं आहे हे कळपात राहणार्‍या त्या बिचार्‍या प्राण्याला कळायला मार्ग नव्हता. (तेंव्हा DNA tests चा शोध अजून लागायचा होता अर्थातच.) त्यामुळे, कष्टाने मिळवलेली जमीन पुढच्या पिढीकडे सोपवायची तर समोरचं मूल आपलं आहे ह्याची खात्री तर असायला हवी नं ? मग आता हा पेच सोडवायचा कसा ? तर स्त्री इतर कुठल्याही पुरुषाशी संबंधच ठेऊ शकणार नाही अशी काहीतरी युक्ती करायला हवी होती. संबंधच काय तर इतर पुरुषांच्या संपर्कातही ती येऊ नये अशी चोख व्यवस्थाच करायला हवी होती.त्यासाठी एक फार धूर्त योजना आखण्यात आली, ती म्हणजे विवाह संस्था ! आणि अश्या तर्‍हेने अत्यंत स्वयंपूर्ण, सक्षम, स्वायत्त, स्वतंत्र आणि सबळ असलेली स्त्री ही अक्षरशः पुरुषाच्या दावणीला बांधण्याची मुहूर्तमेढ रोवण्यात आली . त्यातून मनुष्यबळ निर्मितीचा कारखानाच घरच्या घरी मिळाला वर जमिनीच्या वारसा हक्काचा प्रश्नही आपसूक मिटला. जश्या गोठ्यात गाई तशी घरात बाई !

आता ह्या पार्श्वभूमीवर आपल्याला सहज लक्षात येईल की अग्नी, शेती आणि विवाह ह्या तिन्हींच्या संयोगाने मानवाच्या मादीचं विश्व बदलून स्वयंपाकघर नावाच्या खोली पुरतं सीमित झालं आणि जीवंत राहण्यासाठीची मुलभूत गरज असलेला साधा अन्न नावाचा घटक पाककला नावाच्या अती क्लिष्ट आणि वेळखाऊ उपद्व्यापात अडकला .

तेंव्हा अन्न आणि स्त्रीवाद हा अस्तित्वाच्या गाभ्याशी जाऊन भिडणारा विषय न होता तरच नवल .
अन्न, वस्त्र, निवारा ह्या माणसाच्या मुलभूत गरजा असल्या तरी आता ह्या तीनही गोष्टी अविश्वसनीय वाटाव्या इतक्या प्रमाणात बदलेल्या आहेत. आता त्या गरज ह्या संज्ञेला ओलांडून कधीच एका अत्यंत स्फोटक अश्या संस्कृती नावाच्या वेष्टनात गुंडाळल्या गेल्या आहेत .पुरुष धार्जिणी संस्कृती निर्माण करण्यासाठी आणि ती टिकवून ठेवण्यासाठी कराव्या लागणार्या शोषणाची अत्यंत वस्तुनिष्ठ व्यवस्थाच निर्माण केली गेली. ती व्यवस्था एकाच वेळी अनेक पातळ्यांवर कार्यरत होती, अजूनही आहे . त्यामुळे अन्न आणि स्त्रीवाद हा विषय म्हणजे एक तीन पायाची शर्यत आहे . तो खरंच समजून घ्यायचा असेल तर स्त्री आणि अन्न ह्या दोन विषयांची जन्माची पडलेली गाठ सोडवून त्यांना तटस्थपणे वेगवेगळ करून बघता यायला हवं . हा झाला larger point of view. Larger premise.

पूर्वीच म्हणल्या प्रमाणे मी जे लिहितेय ते माझ्यासाठी कॅथार्सिस सारखं काहीतरी आहे But I also believe, the more personal you write , the more universal it becomes. And the first step you can take towards changing your story, is to tell your story. So, अत्यंत खाजगी किंवा व्यक्ती, ह्या पातळीवर चिकित्सा करायला गेलो तर अन्न हा अतिशय over rated, time and energy consuming प्रकार वाटतो मला.त्यातही स्त्री असल्याने अन्न शिजवणे किंवा स्वयंपाक ह्या विषयाशी माझं कळत्या वयापासून love-hate relationship होतं असं आता मागे वळून बघताना मला जाणवतं. I loved to hate food (&/or cooking) and Hated to have to love food (&/or cooking). अगदी लहान असताना पासून मी घरातल्या स्त्रीयांना चुली जवळ तासंतास हाडाची काड करताना बघत होते आणि इतकं करून जे पानात वाढलं जायचं ते मोजून १०-१५ मिनिटात घरातली मुलंबाळ कर्ते पुरुष फस्त करून आपापल्या कामाला लागलेले असायचे आणि बायका पुन्हा अनेक तास उष्टी खरकटी भांडी स्वच्छ करण्यात घालवायच्या . त्यातून बाहेर पडत नाही तोच पुढ्या जेवणावळीच्या तयारीला बिचार्या लागलेल्या असायच्या.मोठं झाल्यावर आपल्यालाही हेच करायला लागणार आहे की काय ह्याचा धसका माझ्या बालमनाने घेतला होताच आणि ह्यातून काहीही झालं तरी आपण आपली सुटका करून घ्यायलाच हवी तरच काही खरं आहे; हे सतत स्वतःला बजावत राहिले.माझं स्वतःचं aptitude गृहकृत्यदक्ष सुगरण वगैरे स्त्री असण्याचं नव्हतं आणि घरातल्यानीही फार मला त्या साच्यात बसवायचा प्रयत्न केला नाही . त्यांनी एक दोनदा सांगून बघितलं असेल इतकंच पण फार काही मला कुणी “सासरी गेल्यावर आमचा उद्धार करशील” ह्या सबबीखाली जाच केला नाही. त्यात अभ्यासात बर्यापैकी प्रगती होती तेंव्हा त्यांनी मला माझ्यावर सोडून दिलं, त्यांच्या ह्या ऋणात मी आजन्म रहायला तयार आहे .

माझी आई उत्तम स्वयंपाक करायची पण त्याहून उत्तम जर काही तिने आमच्या भरणपोषणा साठी केलं असेल, तर तिने वाचन ह्या प्रकाराचे संस्कार आमच्यावर न बोलता, तिच्या वागण्यातून नकळत केले. आमच्या घरात पुस्तकांच्या चळती सतत लागलेल्या असायच्या . स्वयंपाक जेवणं आवरली की आई कायम हातात कुठलं न कुठलं पुस्तक घेऊन बसलेली असायची. तिला मी कधीही शेजारी पाजरी जाऊन कुणाशी उगाचच गप्पा मारत बसलेली बघितलं नाही. कधी कधी तर ती एखादं engaging पुस्तक वाचत असेल तर स्वयंपाक देखील झटकन आवरून जवळ जवळ पळत जाऊन पुस्तक घेऊन बसत असे.

मला हे एक तिचे खूप आवडे . तिच्या स्वयंपाकापेक्षा मला तिचं हे , स्वतःच्या वाचना साठी लागणारा वेळ आणि अवकाश संसाराच्या व्यापातून मिळवण्यासाठी धडपडणं, फार लोभस वाटत असे आणि आदर्शही. ती तिच्याच पुस्तकांच्या जगात इतकी रमलेली असे की आमच्यावर उगाचच बाकीच्यांच्या आया करतात तशी चौकीदारी किंवा आईगिरी तिने कधी केली नाही . ह्यावर अती दक्ष आया कदाचित भुवया उंचावतील पण त्यामुळेच खरंतर आमचे आम्ही निर्णय घ्यायला आणि त्या निर्णयांची जबाबदारी घ्यायला शिकलो . याहून मोठं शिक्षणाचं प्रयोजन ते काय असेल??!!

आईचा स्वयंपाक minimalist म्हणता येईल ह्या categoryत मोडायचा. ती उगाचंच कधी स्वयंपाकघरात तासंतास घालवत बसत नसे. साधं सुटसुटीत पण व्यवस्थित पोट आणि मन भरेल असा स्वयंपाक ती करत असे आणि त्याचाही फार गवगवा करत नसे. स्वतःच्या पाक कौशल्याचा वापर तिने कधीही आम्हाला emotionally blackmail करायला अथवा स्वतःचा ego satisfy करायला केला नाही . हे फार महत्वाचं mental training मला घरबसल्या त्यामुळे मिळालं. अन्ना कडे बघण्याचा अलिप्त भाव त्यामुळेच आपोआप विकसित होत गेला. अन्न शिजवणे हा जगत राहण्यासाठीचा महत्वाचा भाग असला तरी तो आपल्या जगण्याचं प्रयोजन होऊ शकत नाही, होऊ नये, ह्याचं भान मला खूप लहानपणीच आलं होतं. त्यामुळे खाण्याच्या चवीपेक्षा त्याचं पोषण मूल्य तपासायला शिकले . जितका वेळ आणि शक्ती एखादी पाक कृती करायला लागते त्या प्रमाणात त्याचा उपयोग आपल्या शरीराला होतोय का ह्याचा ताळमेळ आपोआप मनात लागायला सुरु होत असे.

त्यातूनच नको त्या फापट पसार्यातून मोकळं होऊन शरीरास जे उपकारक ते स्वीकारणे आणि अपायकारक ते नाकारणे हे आपोआप घडायला सुरुवात झाली. मला कधीही कुठल्याही तळलेल्या किंवा चटपटीत किंवा गोड पदार्थांचं so called craving, instinctively सहसा होत नाही . त्यामुळे ठरवून diet (control) वगैरे प्रकार आजवर कधीही करायला लागले नाहीत. शरीरंच व्यवस्थित मार्गदर्शन करायला लागलं काय खायला हवं नको ते. शरीराचं ऐकलं तर मनाच्या स्वैर वागण्याला आपसूक चाप बसतो. आणि चवीचं म्हणाल तर ते बरंचसं mental construct आहे आणि त्यामुळेच फारच subjective आहे असंही मला हल्ली वाटायला लागलंय.

म्हणजे प्रत्येकाला आपल्याच आईच्या हातच्या आमटी किंवा वरणाची चव लक्षात असते, आवडते. मला माझ्या हातच्या आमटीची चव अजीबातच आवडत नाही पण माझ्या मुलांना मात्र ती फार आवडते. तर त्यात त्या आमटी पेक्षा ती मी केलेली असते हे त्यांना माहीत असेल तर त्यांच्या दृष्टीकोनात फरक पडतो. आमटी अतिशय सामान्य असते पण ती आपल्या आईने आपल्यासाठी केलीये ह्यात कदाचित मुलांचाही ego satisfy होत असेल. कुणीतरी आपल्यासाठी सगळी कामं बाजूला ठेऊन केवळ आपल्याला आवडते म्हणून एखादा पदार्थ करून आपल्याला वाढत असेल, किंवा तेच तिचं काम असेल, तर ह्यापेक्षा जास्ती validation काय असू शकेल ?!

पण मला आई म्हणून अजिबातच माझ्या हातच्या कुठल्याही पदार्थांचा कौतुक वाटत नाही. मी एक average स्वयंपाक करणारी average बाई आहे. त्यात आई झाल्याने फार काही फरक पडलेला आहे असं मला वाटत नाही. एकदा वीणा वर्ल्ड ह्या पर्यटन व्यवसायात अग्रगण्य असलेल्या कंपनीच्या सी.ई. ओ. वीणा पाटील ह्यांची मुलाखत मी बघत होते . तेंव्हा त्यांनाही इतर व्यावसायीक यश मिळवलेल्या कर्तबगार स्त्रीयांना विचारतात तसेच घरा-दारा-मुलां संबधीचे सुमार प्रश्न त्या मुलाखतकारानेही विचारले असता, त्यांनी अजिबात कुठलाही अपराध भाव चेहेर्यावर अथवा आवाजात न येऊ देता दिलेलं उत्तर माझ्यासाठी मनोहर सूर्योदय बघितल्याचा आनंद देऊन गेलं. त्या म्हणाल्या होत्या, “मला जर कुणी विचारलं की तुमचा आवडता पदार्थ कोणता, तर माझं प्रामाणिक उत्तर असतं , असा कुठलाही पदार्थ, ज्यासाठी मला स्वतःला स्वयंपाक घरात जाऊन फार वेळ घालवावा लागणार नाही, मला आवडतो.”

घराबरोबरच इतर अनेक व्यवधानं समर्थपणे सांभाळणार्या कर्तबगार मल्टी टास्किंग मास्टर्स असलेल्या अनेक मैत्रिणी मला लाभलेल्या आहेत . त्यातल्याच एकीने एकदा एक मजेशीर किस्सा सांगितला होता . ती म्हणाली, “नवीन लग्न होऊन मी जेंव्हा ह्या घरात आले तेंव्हा माझ्या सासर्यांनी मला सांगितलं होतं, तुला जर आयुष्यात खरंच सुखी व्हायचं असेल तर कुणाच्याही हातच्या कुठल्याही पदार्थाची चव आवडून घ्यायची सवय लाऊन घे, आणि त्यात उगाचंच कुठलाही अहंभाव किंवा न्यूनगंड मनात येऊ देऊ नकोस.”

माझ्यासाठी ही दोन्ही उदाहरणं माझ्या narrative शी अगदी चपखल मेळ खाणारी आणि म्हणून अत्यंत तार्किक वाटली मला आणि मी ती पडत्या फळाची आज्ञा समजून शिरसावंद्य मानली . कसोशीने पाळली आणि खरंच सुखी झाले .

आमच्या घरी स्वयंपाक करणार्या मावशी अतिशय उत्तम स्वयंपाक करतात. माझ्यापेक्षा नक्कीच जास्त सरस करतात हे मी नम्रपणे मान्य करून माझं स्वयंपाकघर निर्धास्त मनाने त्यांच्या स्वाधीन करून टाकलेलं आहे .जबाबदार्यांच delegation किंवा वेळखाऊ आणि repetitive processes चं outsourcing हे global economies मध्ये organisation building चे key factors समजल्या जातात. घर ही एक संस्था म्हणलं तर ती चालवण्याचे अनेक वेगवेगळे प्रकार असू शकतात. माझ्या आईकडे वेगळा उपाय होता, सासूबाईं कडे वेगळा आणि माझा वेगळा. सगळेच प्रकार एकाच वेळी तितकेच प्रभावी असूच शकतात . प्रत्येकीचं नियोजन कौशल्यंच असतं ते.

कुणी स्टार प्लेयर्स असतात कुणी टीम प्लेयर्स असतात. मी टीम प्लेयर आहे. मला एकटीच्या खांद्यावर विजय ओढून आणावा असं कधीही वाटत नाही तशी महत्वाकांक्षा नाही आणि इच्छा तर मुळीच नाही. I enjoy being part of a winning team , without having to keep performing all the time.

खांदे पालट होत राहिली तर कुणावरच अतिरिक्त ताण येत नाही आणि प्रत्येकाच्याच क्षमता अधून मधून घासून पुसून लख्खं होत राहतात . “मी घरी नसले तर माझ्या घराचं पानही हलत नाही” किंवा “आमच्या ह्यांना साधा चहा देखील करायला येत नाही”, “किंवा आमच्या घरी सगळ्यांना माझ्याच हातच्या गरम गरम पोळ्या/भाकरी लागतात” इत्यादी इत्यादी, असल्या dysfunctionality ला कौतुकांच्या वेष्टणात गुंडाळून स्वतःचं आणि इतरांचही जगणं दुर्धर करून टाकणार्या toxic feminity च्या जाळ्यात मी कधीच स्वतःला किंवा माझ्या घराला अडकू दिलेलं नाहीये. ह्याचा मला माफक अभिमान आहे. मी असली नसली तरी माझं घर व्यवस्थित सुरू राहावं ह्याची तजवीज मी केलेली आहे. मी स्वयंपाक घरात दिवस दिवस गेले नाही तरी सगळ्याचं सगळं व्यवस्थित होतंय की नाही ह्याकडे माझं माझ्या कामाच्या टेबलावरून लक्ष असतं. आणि तितकं पुरेसं असतं. स्वयंपाकघर हेच एकमेव आणि इतकंच जगण्याचं, कर्तव्यपूर्तीचं आणि स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्याचं मर्यादित क्षेत्र असलेल्या स्त्रियांच्या अनेक पिढ्यांचे “संस्कार” अगदी आजच्या पिढीपर्यंत लीलया पोहोचलेले आहेत. हे बघून गंमत वाटते.

अभिनयाच्या क्षेत्रात प्रथितयश असलेल्या एका तरुण दांपत्याची मुलाखत सोशल मीडिया फीड स्क्रोल करत असताना चुकून बघण्यात आली, तेंव्हाच्या ३० सेकंदात , मुलाखत घेणाऱ्या मुलीने नेहमीप्रमाणेच दोघांमधल्या तिच्यावर नेम धरून हमखास वर्मी बसणारा आणि प्रेक्षकांना खुश करणारा, ठेवणीतला प्रश्न भात्यातून काढला, “ तुम्ही दोघंही सतत इतके बिझी असता, तेंव्हा घरासाठी , एकमेकांसाठी वेळ कसा काढता आणि तो कसा घालवता?” त्यावर क्षणाचाही विलंब न लावता ती म्हणाली, “आम्हाला फार वेळ एकत्र मिळत नाही पण जेव्हा जेव्हा तो मिळतो तेंव्हा तेंव्हा आम्ही एकत्र जेवतो, त्यातही ह्याला गरम गरम पोळ्या करून वाढण्यात मला सगळ्यात जास्त आनंद मिळतो.” असं ती सांगत असताना, तो दोन्ही गालात गुलाबजाम असल्यासारखा गोड ब्लश करत होता, पुढे ती म्हणाली, “मला आठवतं माझी आई आम्हाला असं लहानपणी मस्त गरम पोळ्या वाढायची ते खाताना कोण सुख वाटायचं, तेच ह्यालाही मिळावं असं मला वाटतं आणि मलाही असं वाढायला आवडतं ” इतका सगळा प्रेमळ गोड गुलाबी संवाद ऐकून मला अर्धा क्षण कौतुक वाटलं खरं त्या आदर्श दांपत्याचं, पण तितकंच. त्यानंतर मात्र त्या गोडव्याने पोटात ढवळायला लागलं. ३० सेकंदाच्या वर काही मी ती मुलाखत पचवू शकले नाही आणि पुढे स्क्रोल करता करता विचार करू लागले , मिळत असेल कुणाला त्यात आनंद तर मिळो बापडा. आपल्या आईचं काय जातंय?

पण मला, प्रामाणिकपणे सांगायचं तर, कधीही पोळ्या लाटत बसण्यात किंवा त्या गरम गरम नवर्याला किंवा कुणालाही , अगदी स्वत:च्या मुलांनाही, वाढण्यात आनंद वगैरे अनुभवलाय असा एकही क्षण आठवत नाही. आमच्या घरात ज्याला गरम पोळ्या/ भाकरी खाण्याचा आनंद मिळवायचा असेल त्याने मावशी असतात त्या वेळेत जेवायला बसावे इतकाच नियम आहे . तोही कुणी पाळत नाही . प्रत्येक जण आपापल्या वेळेत आपापल्या सोईने लागेल तसं जेवण गरम करून वाढून घेतात . अगदी माझा १० वर्षाचा मुलगाही !

मला आठवतं नवीन लग्न होऊन जेंव्हा मी सासरी आले तेंव्हा हळदीचा रंग उतरल्यावर कुणीतरी मला विचारलं होतं, तुझी स्पेशालिटी डिश काय आहे , तीच आज सगळ्यांसाठी कर बघू . ते ऐकल्यावर खरंतर पोटात आधी गोळाच आला होता. सुचेचना उत्तर. कधी विचारच नव्हता केला ह्याबद्दल, कृती तर फार दूर. आपली तर कुठली स्पेशालिटीच नाहीये . तेंव्हा नवरा मदतीला धाऊन आला आणि दोघांनी मिळून कढी खिचडी का काय ती केली होती. सगळ्यांनी अर्थातच कौतुक करून वेळ साजरी केली पण i was so unimpressed with my culinary efforts. नवरा अतिशय समंजस मिळालाय हे एका अर्थी खरोखरीच ‘वर’दान म्हणायला हवं.

“पुरुषाच्या हृदयाचा मार्ग त्याच्या पोटातून जातो”, ह्यासारखं sexist आणि crude वाक्य नाहीये जगात. माझ्या आयुष्यात महत्वाच्या असलेल्या एकाही पुरुषाला मी कधीही, काहीही खाऊ पिऊ घालून आपलंसं करायचा प्रयत्न तर सोडा तसा विचारही कधी केलेला नाहीये. आणि मुळात अश्या, हृदयाचा मार्ग पोटातून वगैरे जाणार्या पुरुषांबद्दल किंवा त्यांच्या हृदयाबद्दल मला कधीही यत्किंचीतही आकर्षण वाटलेलं नाहीये, त्यामुळे त्यांना आपलंसं करण्याचा प्रश्नच नव्हता उलट असे जे काही तुरळक पुरुष वाटेत आले त्यांना kindly excuse me म्हणून मी तिथून सहज सटकलेय.

एखाद वर्ष एकमेकांना ओळखल्यावर जेव्हा नवर्याने propose केले तेंव्हा मी त्याला पहिला प्रश्न विचारला होता, “ तुला तुझ्या आई किंवा वहिनी सारखी कुणी मुलगी हवी आहे का??” त्यावर क्षणाचाही विलंब न लावता त्याने शांतपणे उत्तर दिलं होतं, “नाही. मला आई आणि वहिनी already आहेत , मला तू हवी आहेस , life partner म्हणून हवी आहेस. तुझी तयारी असेल तर लग्न करुया .” मी अर्थातच ते उत्तर ऐकून मगच तयार झाले. त्यानंतर च्या एका भेटीत त्याने विचारले होते, “तू non veg खात नाहीस , पण तू non veg बनवू शकते का ?” त्यावर मी म्हणाले होते , “नाही. मला येत नाही.”
त्यावर त्याने विचारले , “माझी आईही खात नाही, ती शिवतही नाही , पण शिजवते. तसं तुला करायला जमेल का?"
मला आठवतं त्यावर मी तितक्याच शांतपणे उत्तर दिल होतं , “प्रयत्न केला तर कदाचित जमेलही मला, पण मला तो प्रयत्न करायला आवडेल असं वाटत नाही , एक तर ते माझ्या तत्वात बसत नाही आणि मी तुझी आई नाहीये.” त्यावर त्याने मला हसून long drive वर नेलं आणि त्याच्या आवडत्या एका restaurant मध्ये dinner date ला घेऊन गेला जिथे आम्ही architecture ह्या आमच्या अत्यंत आवडत्या विषयावर पोट भर चर्चा करून दिवस सत्कारणी लावला.

लग्ना आधी जेंव्हा सासरी भेटायला गेले होते तेंव्हा माझ्या नणंदेने मला विचारलं होतं, “स्वयंपाक येतो का ?” तेंव्हा मी “फार नाही, फक्त कामा पुरता, उपाशी रहायला लागणार नाही कधी इतकाच येतो.“ असं प्रामाणिक उत्तर दिलं होतं. त्यावर तिने पुन्हा विचारलं,
“पण आमच्या सचिन ला तर वेगवेगळ्या डिशेस खायला खूप आवडतात, मग कसं करणार तू ??” त्यावर मी पुन्हा तितक्याच शांतपणे म्हणाले होते “ ज्याला खायला आवडतं त्याने बनवायलाही शिकावं, मी मदत नक्की करीन, पण तेवढ्यासाठी मला स्वयंपाकात फार वेळ घालवायला नाही आवडणार"

तेंव्हा कदाचित कुणाला माझी उत्तरं आगाऊपणाची वाटली असतील पण माझ्यासाठी ती सगळीच उत्तरं खरी आणि महत्वाची होती, अजूनही आहेत. मला माझं स्त्रीत्व स्वयंपाकघराशी बांधून घ्यायचं नव्हतं अगदी प्रेमाखातर देखील नाही. ही clarity मला लहानपणापासूनच होती त्यामुळे ती उत्तरंही तितकीच स्वच्छ होती. केवळ पाककला कौशल्या च्या कसोटी वर जर कुणी माझ्या स्त्रीत्वाची पारख करणार असेल तर त्यांनी मला खुशाल शून्य देऊन टाकावा . आयुष्यभर तो क्रूस खांद्यावर घेऊन चालत बसण्यापेक्षा मला खांदे झटकून त्या ओझ्यातून मोकळं होणं जास्त परवडणारं, आवडणारं होतं.

त्यामुळेच जेंव्हा आमच्या नवीन घरातलं स्वयंपाकघर आम्ही design करत होतो तेंव्हा अत्यंत साधं logical brief आम्ही स्वतःला दिलेलं होतं. आपल्या घरातलं स्वयंपाकघर democratic असावं , open असावं . तिथे कुणीही कधीही काहीही येऊन शिजवावं. स्वतः खावं इतरांना खाऊ घालावं. स्वयंपाकघर हे भूक लागणार्या प्रत्येकासाठी, भूक शमवण्यासाठी लागणारं साहित्य असलेलं ठिकाण आहे. ते प्रत्येकाने मुक्तहस्ते वापरावं इतर कुणावरही स्वतःच्या भुकेचं, चवीचं ओझं न टाकता, मग ती आपल्यावर जीवापाड प्रेम करणारी आई असो, बायको असो, गर्ल फ्रेंड असो, आजी असो किंवा कुणीही .

बहुसंख्य स्त्रियांची, त्यातही भारतीय स्त्रियांची, उमेदीची खूप वर्षं,कर्तृत्व,उर्मी, क्षमता, स्वयंपाक घर नावाच्या पोकळीत अक्षरशः शोषल्या जातात हे आपण सारेच जाणतो, ते मान्य करू न करू हा भाग वेगळा. त्यातल्या सगळ्याच स्त्रीयांना काही स्वयंपाकाची आवड असू शकत नाही, किंबहुना असत नाही किंवा त्या नैसर्गिकरीत्या स्वयंपाकासाठी designed असतात असंही नाही. स्वयंपाक ही काही gendered skill नाहीये, आणि असं असेल तर food industry चा विचार करता, तिथे सगळ्याच महत्वाच्या ठिकाणी पुरूषच दिसतात, हे कसे? 5 star हॉटेल्स चे शेफ्स असो किंवा लग्नात लागणारे जेवण बनवणारे आचारी /महाराज असो, किंवा सरकारी गेस्ट हाऊस मध्ये काम करणारे खानसामे असो, किंवा अगदी पाणीपुरी/ पावभाजी ची गाडी चालवणारे असो, सगळेच पुरुषच दिसतात. हे कसे ?

व्यवसाय म्हणून स्वयंपाक करणे किंवा एखाद दिवशी हौसेने एखादा पदार्थ करून बघणे आणि रोज तासंतास ओट्या समोर उभं राहून तेच thankless काम वर्षानुवर्ष , आयुष्यभर करत राहणं ह्यात perception चा खूप फरक आहे. करणार्यांच्या आणि ती सेवा विनासायास उपभोगणार्यांच्या देखील. म्हणूनच ज्या स्त्रिया ह्या एकरेषीय, एकसुरी gender roles, ना आव्हान देतात, त्यातून मार्ग काढतात, त्या जाळ्यातून मुक्त होण्याच्या शक्यता धुंडाळतात, त्यांचं स्त्रीत्व यत्किंचीतही दुय्यम दर्जाचं ठरतं असं मला अजिबातच वाटत नाही. उलट त्याच जगण्याच्या पद्धतींच्या नव्या शक्यता, विचारांच्या नव्या दिशा दाखवू शकतात .

बोलता बोलता मी असं एकदा म्हणाले असता माझा एक अत्यंत जिवलग फेमिनीस्ट मित्र म्हणाला होता, “ न जाणो असे किती आईनस्टाईन, शेक्सपीअर, कोलंबस आपण हरवून बसलोय.... स्वयंपाकघरात, आणि त्याहून मोठं दु:खं हे आहे की आपल्याला ते कधीच कळणारही नाही. त्यांची इतकी महत्वाची आयुष्यं केवळ तांदळातले खडे वेचण्यात निघून गेली असतील.” त्याचं ते वाक्य मनात घर करून राहिलंय ते कायमचं.
आईनस्टाईनच्या (त्याच्याच इतक्या कर्तबगार) बायकोवर ची documentary एकदा youtube वर बघण्यात आली. मलीव्हा मरीच तिचं नाव. अर्थात आपल्यापैकी बोटावर मोजण्या इतक्या लोकांनी हे नाव ऐकलं असेल. ज्यांना अधिक जाणून घेण्यात रस असेल त्यांनी जरून गूगल करून बघावं म्हणजे मी काय म्हणतेय त्याचं गांभीर्य कदाचित थोड्या प्रमाणात पोहोचेल.
सिमोन दि ब्वाव्हा तिच्या सेकंड सेक्स ह्या पुस्तकांत ह्या प्रक्रियेचा व्यवस्थितच धांडोळा घेते. ती म्हणते, एकूणच आपल्या समाजात पुरुषाच्या कर्तृत्वाला नको तितके वलय प्राप्त झालेले आहे. स्त्री तीन चार तास खपून जगातला सर्वोत्तम केक जरी बनवत असेल तरी तो १०-१५ मिनिटात संपून जातो आणि त्याची इतिहासात कुठेही नोंद ठेवली जात नाही .

केवळ चूल आणि मूल ह्या टोकांवर झुलणारा स्त्रीत्वाचा डोलारा उतरवून फक्त व्यक्ती म्हणून स्त्री कडे बघता आलं तर अन्न ह्या एका छोट्याश्या गोष्टी साठी किती मोठी किंमत ती व्यक्ती मोजतेय ह्याचा अंदाज जरी आला तरी आपल्या अपेक्षा आटोक्यात ठेवता येतील. “तुला स्वयंपाक येतो का?” असा वर वर साधा वाटणारा प्रश्न एखाद्या तरुण मुलीला विचारण्या आधी आपण तो किती loaded आहे ह्याचा क्षणभर थांबून विचार करू शकलो त्या ऐवजी, तिला तिच्या कुठल्या क्षमता विकसित कराव्याश्या वाटतात ह्यावर चर्चा करू शकलो तरी ह्या लेखन प्रपंचाचं प्रयोजन कारणी लागलं असं म्हणायला हरकत नाही. नाही ??!!

- शीतल पाटील
(लेखिका गेली १७ वर्ष बांधकाम क्षेत्रात कार्यरत आहे. अनेक प्रख्यात राष्ट्रीय अंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम केल्या नंतर तिने मंथन डिझाईन स्टुडीओ ह्या नावाने कोल्हापूर येथे स्वतः ची प्रक्टिस स्थापित केली . शिक्षण क्षेत्रात रस असल्याने ती वेगवेगळ्या आर्किटेक्चर कॉलेजेस मध्ये विजिटिंग लेक्चरर म्हणूनही कार्यरत आहे . एकीकडे व्यवसाय नावारूपास आणताना एकत्र कुटुंबात राहून दोन मुलांची आई असण्याची तिहेरी कसरत करत झालेल्या तिच्या प्रवासातून आलेल्या अनुभवांचा उपयोग विध्यार्थ्यांना आणि व्यवसायात नव्याने उतरू बघणार्या मुलांना विशेषतः मुलींना व्हावा ह्यासाठी ती सतत प्रयत्नशील असते)

मूळ लेखाची लिंक:
https://punhastriuvach.blogspot.com/2019/09/blog-post_89.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ती सगळं स्वयंपाक करून जाते. पण घरी सासू सासरे वाढून पण घेत नाहीत, हिची येईपर्यंत वाट पाहत बसतात, सून आल्यावर वाढेल म्हणून. ती बाहेर असली कि pressure नि घरी पळत येते त्यांच्या जेवायच्या वेळेत. how frustrating!!
>> अशा सुनेने मुद्दाम घरी राहून सासु सासऱ्यांना सळो की पळो करून सोडले पाहिजे. पैसा कमवायचा नाही पण भरपूर मन मानेल तसा खर्च करायचा , घरात भांडणं उकरुन काढायची म्हणजे त्यांना भीक नको कुत्रा आवर अशी म्हणायची वेळ येईल. अती आज्ञाधारक,मवाळ स्त्री असो किंवा पुरुष त्रास होतो.‌

वर कुणीतरी लिहिलंय तसं, खरं म्हणजे फार क्रान्तिकारी वगैरे नसलेल्या या लेखावर इतके टोकाचे, असंबद्ध आणि विखारी प्रतिसाद का?
एव्हडी कसली भिती वाटतेय की अगदी लिंगबदल शस्त्रक्रिये पर्यंत गाडी जातेय? लेखिका सासूसासर्याना सांभाळत नसणार हा आरोप (बरं त्यावर लेखात काहीच भाष्य नाहीए ), तिने वडिलांकडे राहावं (ते सुद्धा बाईच्या वडिलांचा बाप असा थोडा तुच्छतेचा उल्लेख करून ), तिने नवर्याच्या पैशांवर हक्क सांगू नये हे आवर्जून लिहिलं जातंय - पण तिने स्वतः च्या आईबाबांची पण काळजी घ्यावी, स्त्री कमावती नसेल तर तिच्या आई वडिलांची जबाबदारी तिच्या नवर्याने घ्यायला हवी असं कुणालाच वाटत नाही.

स्त्री चुलखंडाला बांधून घेत नसेल तर इतर "पुरुषांपासून " तिला कोण जपणार असं गलिच्छ विधान केलं जातंय पण घर दोघांचं आहे तर प्रत्येक जबाबदारी दोघांची आहे. एखाद्या स्त्रीचे विचार पटले नाहीत म्हणून तिच्यावर इतर "पुरुषां" पासून वाचवण्याची वेळ यावी यात कुणाचीच मर्दानगी दिसत नाही - हे लिहावं असं कुणाला वाटत नाहीए... इतर प्रतिसादकांना पण असलं काही लिहू नका असं ठणकावून लिहायची इच्छा होत नाहीए - हीच बाब मला कालपासून अस्वस्थ करतेय...

बाकी "hence proved" हेच खरं आहे असं दिसतंय

बाकी सध्याच्या असंतुलित पितृसत्ताक पद्धतीचं प्रतिबिंब असलेली मातृसत्ताक पद्धत ज्यांना हवी आहे - त्यांनी

कार्येषु मन्त्री करणेषु दासी -भोज्येषु माता शयनेषु रम्भा ।धर्मानुकूला क्षमया धरित्री
यातल्या किती जबाबदाऱ्या आपण पेलू शकू यावर विचार करावा...

मातृ किंवा पितृ कोणतीच सत्ता नसून खऱ्या अर्थाने पूर्ण सामानाधिकार असावा असं आपलं माझं मत आहे...

लेख वाचला. नॉर्मल आहे.आणि कल्पना फार नवी नाही अर्थात हे थिंकिंग लाऊड आहे.
आजूबाजूला बऱ्याच जणी(विखारी/पुरुष हेटर नसलेल्या/व्यवस्थित संसार स्वयंपाक ऑफिस काम सर्व बॅलन्स करणाऱ्या ) हे विचार मांडताना दिसल्या आहेत.
मला माझ्या कुटुंबाला जमेल तेव्हा गरम पोळ्या, वाफाळते आलू पराठे टाव्यावरून ताटात वाढायला आवडेल. पण ती माझ्यावर बंधनकारक ड्युटी म्हणून रोज आलेली आवडणार नाही.एखाद्या दिवशी मला चालत बागेत जायला , मनसोक्त चालायला, परत येताना रमत गमत बाजारात आलेले कपडे बघायला आवडेल.आणि हे सर्व करून घरी आल्यावर पहिल्या पासून स्वयंपाक चालू करून चारिठाव जेवण बनवायला मला आवडणार नाही.टेक्नॉलॉजी, बहुतांश घरात सौजन्य आणि सहकार्य करणारे पुरुष/सासरचे यामुळे आज हा मोठा प्रश्न नाही.
चूल वैल वाल्या काळात मात्र बायकांचा भयंकर वेळ यात जात असेल.आजही मुक्तपीठ मधले 'आजी आई गौरीच्या काळात 3 ला उठायची.सर्व करायची.रात्री आवरून उशिरा झोपायची.' किंवा 'कुठे गेले ते सण.. आमच्या घरातल्या बायका 20 भाज्या करायच्या, पुरुषांना फक्त पाटावरून ताटावर इतकेच काम होते.आहाहा..पाट्यावर 3 तास बसून वाटलेल्या चटणीची चव काय वरणावी महाराजा..' वाल्या सुरातले लेख कितीही रम्य वर्णन असले तरी वाचवत नाहीत.हे लेख कन्झ्युमर्स लिहितात.त्या काळात आई आजी यांना अनॉनिमस आणि खरे लिहायची परवानगी असती तर त्यांनी त्या सणांबद्दल काय लिहिले असते आपण कल्पना करू शकतो.स्वयंपाक आवड म्हणून, आवड आहे त्याने करावा.मूळ उद्देश कुटुंबाच्या पोटात चांगले तेल, स्वच्छ प्रोसेस वापरून केलेला ताजा स्वयंपाक जावा, प्रकृती चांगली राहावी इतपत असावा.यात 'स्वयंपाक,सर्व घरकाम हे फक्त बाईचे काम.पैसे कमावून आणणे हे पुरुषाचे काम' इतकी सरळ साधी विभागणी नाही.तसे असते तर घरातल्या बायकांनी सुताराकडून कामे करवून घेणे, कॉल सेंटर चे कॉल घेणे,दूधवाला, धोबी,मेकॅनिक यांच्याशी बोलून कामे करून घेणे हेही व्याख्येत बसले नसतेच.बाई हा जबाबदारीत 80% पुरुष आणि हक्क देण्याच्या वेळी, कामं वाटण्याच्या वेळी 110% फक्त बाई अशी काहीशी विभागणी आहे ही.(हे फक्त 'लिंगबदल करून घ्या' वाल्या टोकाच्या प्रतिसादांसाठी आहे.सर्व पुरुष असे वगैरे विखारी आणि तद्दन चुकीचे दावे मी करणार नाही.)प्रश्न 'मी करणार नाही' असा नसून 'कागदावर टास्क लिस्ट मध्ये ही कामं मीच करणार, ती कधीतरी केली नाही तर माझ्यावर कारणे दाखवा नोटीस का, ही कामं टास्क लिस्ट मध्ये 'ऑल' या हेडर खाली का नाहीत' हा आहे.ऑफिसमध्ये तुमची काम करण्याची क्षमता 10 फायली आणि तुमच्या नावावर कागदावर रोज 20 फायली आणि शेजारच्या टेबलवर बसलेल्याच्या नावावर 5 फायली असे असेल तर कधीतरी तुम्ही बंड करून उठाल.'मला कामांना वेळ पुरत नाही, हा शेजारचा 5 फायली पूर्ण करून बाकी वेळ पाय पसरून मोबाईलवर मॅच बघतोय, त्याला द्या ना थोडी कामं.कधीतरी मला पण मोबाईलवर 5 मिनिटं मॅच बघायची आहे' असं नक्की म्हणाल.

चित्र भरपूर बदललं आहे, पुरुष मदत करतात, जिथे दोघांनाही वेळ नाही तिथे पैसे मोजून सेवा विकत घेता येतात.

स्वयंपाक वाली बाई काय,बाहेरून मागावल्यास तिथले स्वयंपाकी पुरुष काय किंवा स्वयंपाक आवडणारी पण कामामुळे ओढाताण होणारी बाई काय, कोणी न कोणी पार्टी थकलेली असणारच.त्यातल्या त्यात थकणाऱ्याला कधीतरी ते काम न करण्याचा चॉईस, तसा चॉईस देणे शक्य नसल्यास पैशात योग्य मोबदला, मानवी आरोग्याला आवश्यक तितकी विश्रांती इतके आपण करू शकतो.

लेख आवडला. लेखिकेने विचार सोप्या भाषेत मांडले आहेत.
अगदी आधी आवड असली स्वयंपाकाची तरी नंतर निघुन जाते, कंटाळा येतो अशीही वेळ येते. अगदी नोकरीचाही वर्षानुवर्षे करुन कंटाळा येतो. त्यामुळे जे काम करतोय, पैसे मिळवुन देणारे, न देणारे... ते करावेसे वाटत नसेल व तरीही ते केल्यावाचुन चालत नसेल तर कुटुंबातल्या सर्वांनी मिळुन त्याचा त्या व्यक्तीवरुन भार कोणत्या पद्धतीने हलका करावा याचा तोडगा शोधावाच लागेल.

अनु, >> पुरुष मदत करतात << हा प्रॉब्लेम आहे ना. पुरूष स्वतःच्या घरात जे काही करतात ती मदत म्हणण्यातच ते काहीतरी जास्तीचे आणि उपकार म्हणून करतायत हे येते. मूलतः ते त्यांचे काम नव्हे. हा सेन्स पुसला जात नाही.
स्वतःच्या घरातले काम ही जबाबदारी आहे. मदत नव्हे.

स्त्रियांनी जेंडर शस्त्रक्रिया करून पुरुष बनावं.
Submitted by स्वप्नील ७७७ on 29 September, 2019 - 12:00
>> इथं मला असं म्हणायचं आहे की, पुरुष हेटर्स किंवा आमच्या वर पुरुषांकडून अन्याय होतो असं म्हणणाऱ्या स्त्रियांनी पुरुष बनून पुरुषाचं स्वातंत्र्य? स्वच्छंदी जीवन अनुभवावं. म्हणजे मुल, बाळंतपण, मुलांना वाढवणं, अन्न शिजवणं वगैरे कामं करावी लागणार नाहीत. कृपया हलकं घेणे हे त्या प्रतिसादात लिहायचं राहिले होते. तरी आता प्रतिसाद न पटल्यास हलके घ्या प्लीज.

मी सुद्धा लहर आली की मै ससुराल नही जाऊंगी , हे गाणे लावून नाचतो,
ते जमले की, मेरे हाथो मे 9, 9 चा नंबर आहे,

स्रीसत्ताक आले की बाई मला तिच्या घरी नेणार , मग कधी राग आला तर मी गाणे म्हणत नाचणार

मी तर नाठाळ घरजावयी बनून आळशी सासू सासऱ्यांना घरगुती हिंसाचार कायद्यांतर्गत खडी फोडायला पाठविन. बायको नांदवायला तयार नसली तर भरपूर पोटगी आणि मालमत्तेचा कायदेशीर हिस्सा घेऊन वेगळा होईन.

पुरुषप्रधान संस्कृती नको म्हणजे स्त्रीप्रधान हवी असे नाही हे स्पष्ट केले असतानाही, तेच टुमणे लावून प्रतिसाद देत आहात.

मी अनु, पोस्ट आवडली Happy
तुमच्या पुर्ण पोस्ट्ला अनुमोदन
मलाही असंच वाटतं Happy

मी अनु आणि स्नेहमयी,प्रतिसाद आवडले.माझेच विचार, अधिक चांगल्या भाषेत आणि सुस्पष्टपणे मांडल्यासारखे वाटले.

प्रचंड वेगाने बदलाचे वारे वहात असताना स्त्री विरुद्ध पुरूष असा विषय अजून का कवटाळला जातो हे मला समजत नाही.
ज्या स्त्रीला किंवा ज्या पुरूषाला जसे जगायचे असेल तसे जगण्यासाठी आज परिस्थिती अनुकूल आहे. समाजसुद्धा लग्नाशिवाय एकत्र रहाणे मान्य करतोच आहे. लग्न करणे ही बाब आवश्यक राहिलेली नाही. स्वबळ असलेली प्रत्येक व्यक्ति स्वतंत्र राहू शकते. माझ्या दृष्टीने स्त्रियांना स्वतःला वाटत असेल तर स्वतंत्र विचाराने रहाण्यासारखी परिस्थिती आज कधी नव्हे येवढी सर्वच बाबतीत (सुरक्षा, संधी) अनुकूल आहे. निर्णय तुमचा. .
स्वबळ असलेल्या किंवा नसलेल्या, समलिंगी किंवा भिन्नलिंगी व्यक्तिंनी लग्न केल्यास दोघांनी आधी प्रामाणिकपणे अपेक्षा ठरवल्यानुसार वागणूक केल्यास काहीच अडचण येणार नसते. निर्णय तुमचा.

मला खात्री आहे की समाजव्यवस्था या बदलत्या झंझावताला सामावून घेइल व नवी व्यवस्था निर्माण होइल. ही व्यवस्था स्थिर व्हायला किती वेळ लागेल हे मात्र सांगता येणार नाही. पण प्रत्येकाला स्वातंत्र्य मिळेल हे नक्की.

पुरूष स्वतःच्या घरात जे काही करतात ती मदत म्हणण्यातच ते काहीतरी जास्तीचे आणि उपकार म्हणून करतायत हे येते. मूलतः ते त्यांचे काम नव्हे. हा सेन्स पुसला जात नाही.>> +१
घर सगळ्यांच आहे, त्यात स्त्री- पुरुष हा प्रश्नच येत नाही, सगळ्यांनी घराला आपलं मानुन कामं केली की झालं

मला
वाटत कुटुंब ही पद्धती पूर्ण जगात सर्व देशात आहे .
मानवी प्रगतीला ती कुटुंब व्यवस्थेचा नक्कीच हातभार आहे .
कुटुंब व्यवस्था नसती तर माणूस आज जेवढा प्रगत दिसत आहे तेवढं प्रगत नक्कीच झाला नसता .
कुटुंब व्यवस्था टाकाऊ व्यवस्था आहे असा उथळ मत कसे स्वीकारावे .
माणसाची आर्थिक,मानसिक,शारीरिक ,गरज कुटुंब व्यवस्थेत भागवली जाण्याची क्षमता आहे .
लग्न न करून एकटे राहणाऱ्या व्यक्तीला काय काय अडचणीला सामोरे जावे लागते ह्या विषयी अभ्यासाची गरज आहे .
मानवी जीवन अनेक टप्पातून जाते .
शिशु ,बालपण ,जवानी ,आणि म्हातारपण .
ह्या सर्व टप्पात माणसाच्या गरजा सुद्धा वेगवेगळ्या असतात आणि त्या पुरवणारी व्यक्ती सुधा.
त्या मुळे ह्या व्यवस्थेला छेद देणारे विचार माणसाला अस्वस्थ करतात .
कारण जे असा विचार करतात ते परिपूर्ण विचार नसतात असे मला वाटते .
आताच जे आई वडील नोकरी करतात मुलांकडे लक्ष देवू शकत नाहीत ती मुल मानसिक दृष्ट्या डिस्टर्ब होतात हिंस्त्र तरी होतात किंवा ऐक्कल कोंडी तरी होतात .
ह्या विषयात जास्त डिटेल लिहत येईल
पण मला ते मांडता येत नाही

म्हणूनच वृध्दाश्रमात म्हातारपणी जाणं भारतात कंपलसरी होणार आहे. आपुलकी, जिव्हाळा, प्रेम, कर्तव्य सगळं पुस्तकात पहायला मिळेल. सुपातील जात्यात जाणार आहे हे कुणी लक्षात घेतच नाही.

मला वाटतं 'कुटुंब नको, लग्न नको, संसार नकोच, एकटं राहायचं' हा मूळ मुद्दा नसून 'स्वयंपाकाची डिलिव्हरी विशिष्ठ प्रकारे करण्याची सक्ती 24 बाय 7 घरातल्या एकाच व्यक्तीवर नको, ते काम हसत खेळत टीम वर्क म्हणून केले जावे' हा मुद्दा आहे.तेही लेखिकेने स्वतःच्या घराच्या आधीच्या पिढीला स्त्रिया एक जेवण तयार करणे, मग आवरा आवर, मग तितक्यात दुसर्या जेवणाची वेळ, परत तयारी यातच अडकून पडलेल्या पाहिल्याने.ती हेही म्हणते की या पिढीतले पुरुष जेवण खाण्यात 20 मिनिटं घालवत असतील तर बायका चूल आणि इतर कामात तासन तास घालवायच्या.
एकंदर थोडे स्त्री च्या बाजूने लिहिलेले लेख लाटणं मोर्चा किंवा काळे कपडे घालून कपाळाला लाल पट्टी बांधून लाल टिळा लावून तलवार घेऊन पुरुषांना मारणारी स्त्री असे जे कल्पिले जातात त्याचे नवल वाटते.हे असे कल्पिले जाण्यात, असे जोक्स होण्यात कधी काळी स्त्रियांचे काही इनिशीयल पवित्रे चुकीचे व्यक्त झाले अशी शक्यता आहे.
जेव्हा वुमन एम्पॉवरमेंट म्हणतो तेव्हा 'तुम्ही मेले पुरुष शत्रू' किंवा 'चला पूर्ण स्त्री राज्य स्थापू' किंवा 'सेल्फ डिफेन्स' इतकाच अर्थ नसून काही प्रश्न अड्रेस करणें, त्याच्या मुळाशी जाणे, यात एकमेकांविषयी एम्पथी दाखवणे, हे उद्देश साध्य होऊन पूर्ण समाजातही सिनर्जी राहील असे विचार मांडणाऱ्या पुरुषांनाही साथ देणे, त्यांचे मुद्दे समजून घेणे हा असतो.मला नीट मांडता येत नाहीये.

मसान फेम नीरज घायवानचा मागच्या वर्षी आलेला शेफाली छाया अभिनित लघुपट ज्युस हाच विषय शेवटच्या काही सेकंदात अतिशय प्रभावीपणे मांडतो

धन्यवाद मी अनु. संयत आणि अत्यंत योग्य लिहिले आहे. आजच्या काळात स्त्रिया पूर्वीसारखे स्वयंपाकघरात वेळ घालवत नाहीत. गॅस, मिक्सर, कुकर या सारखी यंत्रे मदतीला आहेत आणि कुटुंबातील सदस्यसंख्या तीन चार वर आली आहे. बाहेरुन अन्न आणणं मान्यता पावले आहे. तरीही स्त्रीनं मला लग्नानंतर स्वयंपाक करणं जमेल की नाही याची माहिती, स्पष्ट कल्पना लग्नाआधी दिली पाहिजे. बहुतेक स्रियांना सासुरवास जेवण बनवता येत नाही म्हणून होत असतो. आणि पुरुष नाही तर स्रियाच बाईला स्वयंपाक आला पाहिजेच या मताच्या असतात.

कुटुंब व्यवस्था ही जर स्त्रिया वर अन्याय करणारी असेल तर त्या अन्यायाचे निवारण सुद्धा कुटुंब व्यवस्था करू शकते .
ह्या प्रश्नाचे उत्तर विवाह संस्थेच्या बाहेर मिळणार नाही उलट अजुन पाय खोलात जाईल .
आज नवरा बायको हे नोकरी करणारे आहेत .
स्त्री नी नोकरी करू नये अशा मतची खूप कमी लोक मिळतील .
उलट तिच्या गुणांना वाव मिळावा म्हणून घरातील पुरुष सदस्य सुधा पाठिंबा आणि सहकर्या देत आहेत .
माझ्या बाबत विचार केला तर आम्ही दोघे नोकरी करतो ,मुलगा शिकत आहे.
सकाळी ऐकत्र जेवण होवूच शकत नाही कारण प्रत्येकाचे घराबाहेर पडण्याची वेळ वेगवेगळी आहे .
बेसिक काही पदार्थ मी सुद्धा बनवू शकतो आणि माझा मुलगा सुद्धा बनवू शकतो .

आणि त्याचे प्रयोग आढवड्यातून एकदा तरी असतात .
रात्री सर्वांचे जेवण एकत्र असतं .
तेव्हा काम ठरलेली असतात
मी जेवण बाहेर घेतो मुलगा पलेट्स ,डिश वैगरे घेतो .
Mrs चे काम वाढून घेणे हे असतं
जेवण झाल्या नंतर सर्व plates उचलून basin मध्ये ठेवायचे,काम मुलाचे .
अस एकत्र सहकार्य करत राहण्यात वेगळीच मजा असते .
जेवताना सहसा konhi मोबाईल घेत नाही,मतभेद होतील असेल विषय टाळले जातात .
तब्बेतं ठीक नसेल,कंटाळा आला असेल तर mrs ला आराम देण्यासाठी स्वयंपाकाचे शिवधनुष्य आम्ही दोघे मिळून उचलतो .
इथे कोणालाच माझ्या वर अन्याय होतोय असं वाटतं नाही .

हा ट्रोल अजिबात नाहीये. लेखाच्या नावातल्या आर्किटेक्ट असणे याबद्दल अपेक्षा उंचावल्या. किचनमध्ये काय बदल केले आणि काय उपयोग झाला याची दोनचार डाजाइन्स टाकायला हवी होती. >> अनुमोदन.
विषय नवा नाही, त्यांचे अनुभव सुद्धा नवे नाहीत.

त्यामुळेच जेंव्हा आमच्या नवीन घरातलं स्वयंपाकघर आम्ही design करत होतो तेंव्हा अत्यंत साधं logical brief आम्ही स्वतःला दिलेलं होतं. आपल्या घरातलं स्वयंपाकघर democratic असावं , open असावं . तिथे कुणीही कधीही काहीही येऊन शिजवावं. >> ह्यात नक्की काय वेगळं होतं? सर्वसाधारण घरांमधे नक्की काय नसतं जे यांच्या डिझाइन ब्रीफ ने अकम्प्लिश केलंय ? आतापर्यंत भारतात, अमेरिकेत अनेक घरं , अपार्टमेंट पाहिलीत. प्रवासाच्या निमित्ताने जगभरात अनेक देशात मित्र मैत्रिणी / नातेवाईकांची घरं पाहिलीत. एअर बी अ‍ॅण्ड बी / कॅम्प साइट , कॅबिन्स मधे राहिलेय. कुठल्याही किचन मधे घरातल्या एखाद दोनच व्यक्तींना प्रवेश आहे किंवा सामान सुमान वापरता येईल असे आर्किटेक्चर दिसले नाही. तर या ताईंनी नक्की काय केलेय डिझाइन ते वाचायला आवडेल.

स्त्रियांनी स्वतंत्र व्हावं, पुरुषांनी कामाचा अर्धा वाटा उचलावा , लग्नाआधी हे सर्व स्पष्ट असावे वगैरे वगैरे थिअरी मान्य. पण आर्थिक स्वातंत्र्य आणि मानसिकरीत्या मजबूत असणे ' नेसेसरी बट नॉट सफिशिअंट' अशा बाबी आहेत. ज्या स्त्रिया आर्थिक रीत्या स्वतंत्र आहेत अगदी उच्चशिक्षित आहेत, त्यांना जर कुटुंबात खूप त्रास झाला तरी घटस्फोट घ्यायची हिंमत असते का? थिअरी प्रॅक्टिसमध्ये उतरते का? पुरुष असे पुरुष तसे म्हणण्यापेक्षा तुम्ही तुमच्या आर्थिक स्वातंत्र्याचा काय लाभ घेउ शकलात, असे विचारले तर बहुसंख्यजणी हेच सांगतील की आमचे घर आदर्श नाही पण बाहेर पडायची आमच्यात हिंमत नाही. आम्ही कुरकुर केली, असे व्हावे तसे व्हावे अशी थिअरी मांडली पण आपल्या घराच्या उंबरठ्याच्या आत राहून. इथे उत्तर द्यावे अशी अपेक्षा नाही. फक्त स्वतःला प्रश्न विचारुन पहावा.

बऱ्याच स्त्रिया पहिला नवरा सोडला आणि दुसरा त्याच्यापेक्षा जास्त त्रासदायक निघाला तर.... या एकच विचाराने दिवस ढकलत असतात. माहेरुन भक्कम आधार असला तरच स्वतंत्र होण्याचा निर्णय घेतात.

कधीकधी समस्येपासून लांब जाण्यापेक्षा समस्येत राहूनच हळूहळू बदल करून परिस्थिती आपल्याला हवी तशी वळवता येते.
प्रत्येक वेळी समस्येपासून वेगळं व्हायला अनुकूल परिस्थिती असेलच असं नाही ☺️

Happy बऱ्याच जणी तिखट नवऱ्याचा ठेचा नाहीतर चटणी बनवतात असं काहीतरी वाक्य कायप्पावर फिरत होतं.

प्रेम विवाह जरी असेल तरी एकमेकाच्या स्वभावाच्या सर्व पैलूंचे दर्शन होत नाही .
त्या मुळे लग्न अगोदर (मग ते aarange असू ध्या नाही तर प्रेम विवाह)काही निगेटिव्ह गुण दिसत नाहीत .
लग्न झाल्यावर दोघांच्या पण स्वभावाचे काही छुपे गुण बाहेर येतात ..
तेव्हा त्यातून मार्ग काढायचा असेल तर समजूतदार पना असायला हवा .
दोन पावलं माग येण्याची तयारी असायला हवी आणि हेच बऱ्याच कपल जमत नाही आणि तीव्र मतभेद होवून तुटायची वेळ येते .
पण ते बंधन तोडून स्वतंत्र आयुष्य जगण्यासाठी सुद्धा तडजोड तर करावीच लागते त्या कराव्या लागणाऱ्या तडजोडीची जाणीव असल्या मुळे बाहेर पडणे सुद्धा मानसिक खंबीर व्यक्ती लाच जमते

अनु सहमत आहे पण परिस्थितीअलनुकूल असली तरी .... बरेचदा हिंमत होत नाही

Pages