अन्न, स्त्रीवाद आणि मी (मूळ लेखिका आर्किटेक्ट शीतल पाटील)

Submitted by अतुल. on 28 September, 2019 - 02:15

संस्कृतीच्या नावाखाली हजारो वर्षांचा लेप मनांवर बसला आहे. मनं अधू झाली आहेत. असंवेदनशील झाली आहेत. इतकी असंवेदनशील कि रांधा, वाढा, खरकटी काढा हि स्त्रियांची कामेच आहेत, यात बदलण्यासारखे काय आहे? असा कोडगा व निलाजरा प्रश्न सहजगत्या विचारला जाऊ शकतो. अनेक ठिकाणी स्वत: त्या स्त्रीला सुद्धा याची जाण नसते. मानसिक गुलामगिरी सारखा दुर्दैवी प्रकार नसेल. नांगराच्या शोधानंतर निर्माण झालेली जमिनीची मालकी. त्यासाठी पुरुषांच्या हाणामाऱ्या. ती मालकी पुढे नेण्यासाठी वंश नावाचा प्रघात. व त्यातून पुढे निर्माण झालेला स्त्रियांवरचा मालकीहक्क. असा हा स्त्री-पुरुषांतील सामाजिक समतोल ढासळलेला प्रवास आहे. आणि संस्कृती नावाच्या प्रक्रीयेखाली हि गुलामगिरीची पुटं मनांवर शिस्तबद्धपणे चढवली आहेत. हा जाडजूड लेप खरवडून निघून एक व्यक्ती म्हणून स्त्रीकडे पाहायला शिकण्यासाठी अजून कित्येक वर्षे जातील माहित नाही. पण त्यासाठी आधी जी जाणीव व्हायला हवी ती होणे महत्वाचे आहे. माही मैत्रीण शीतल पाटील हिच्या लेखातून हि जाणीव निर्माण करण्याचा व मनांवरील हि पुटं काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला गेलाय. समतोल समाजव्यवस्था निर्माण होण्यासाठी असे विचार समाजाच्या सर्व स्तरांत झिरपवण्याची नितांत गरज आहे. याच भावनेतून व तिच्या परवानगीने हा लेख इथे देत आहे (खाली मूळ लेखाची लिंक सुद्धा आहे).
------------------------------------------------------------------------------------

अन्न, स्त्रीवाद आणि मी

गात दोन प्रकारची लोकं आहेत असं म्हणतात - एक जे खाण्यासाठी जगतात आणि दुसरे - जगण्यासाठी खातात.मी एक सामान्य भारतीय स्त्री आहे आणि तरीही, जरा चवीत बदल किंवा दुधात मिठाचा खडा म्हणूया - मी दुसर्या प्रकारात मोडते . जगण्यासाठी आवश्यक असलेली गोष्ट (read, necessary evil) इतकाच माझा आणि खाण्याचा संबंध. मी आता जे लिहिणार आहे ते केवळ कॅथार्सिस सारखं काहीतरी असणार आहे, पण हे कधीतरी करायला हवंच होतं तेंव्हा....

गोष्टीची सुरुवात करायची तर सुरुवातीपासूनच करायला हवी! त्यासाठी साधारण चार लाख वर्षं तरी मागे जायला हवं. अवघ्या चराचरात होमोनिड कुटुंबातील होमो इरेक्टस हा प्राणी कृत्रिमरित्या अग्नी निर्माण करायला आणि हाताळायला सगळ्यात आधी शिकला. ही मानववंशीय प्रजातींच्या बौद्धिक क्षमतेची पहिली ठिणगी. त्यातूनच मग अंधारलेल्या गुहे मध्ये हवं तेंव्हा हवा तेवढा प्रकाश आणि ऊब मिळवता येऊ लागली असेल. त्याने निबिड अरण्यात जगणं बरंच सुसह्य झालं असावं.

मुळात Hunter gatherer असलेल्या माणूस नावाच्या प्राण्याची अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जेंव्हा निसर्गाशी दोन हात करण्यात आणि सतत च्या स्थलांतर करण्यात खूप शक्ती खर्ची पडू लागली तेंव्हा त्याच्या मादीने पिल्लं जगावी म्हणून गुहेत राहून शेतीचा प्रयोग करून बघितला. त्या प्रयोगाची फळं मिळायला लागल्यावर तो हळू हळू स्थिरावायला लागला. आणि इथेच स्त्रीच्या अधोगतीची बीजं –“संस्कृती” नावाच्या कसदार जमिनीत रुजली, वाढली, फोफावली. मूल हे स्त्री पुरुष संबंधांतून जन्माला येतं इतकं तोवर माणसाला कळायला लागलेलं होतं. पण स्त्रीला होणारं मूल नक्की कुठल्या पुरुषाचं आहे हे कळपात राहणार्‍या त्या बिचार्‍या प्राण्याला कळायला मार्ग नव्हता. (तेंव्हा DNA tests चा शोध अजून लागायचा होता अर्थातच.) त्यामुळे, कष्टाने मिळवलेली जमीन पुढच्या पिढीकडे सोपवायची तर समोरचं मूल आपलं आहे ह्याची खात्री तर असायला हवी नं ? मग आता हा पेच सोडवायचा कसा ? तर स्त्री इतर कुठल्याही पुरुषाशी संबंधच ठेऊ शकणार नाही अशी काहीतरी युक्ती करायला हवी होती. संबंधच काय तर इतर पुरुषांच्या संपर्कातही ती येऊ नये अशी चोख व्यवस्थाच करायला हवी होती.त्यासाठी एक फार धूर्त योजना आखण्यात आली, ती म्हणजे विवाह संस्था ! आणि अश्या तर्‍हेने अत्यंत स्वयंपूर्ण, सक्षम, स्वायत्त, स्वतंत्र आणि सबळ असलेली स्त्री ही अक्षरशः पुरुषाच्या दावणीला बांधण्याची मुहूर्तमेढ रोवण्यात आली . त्यातून मनुष्यबळ निर्मितीचा कारखानाच घरच्या घरी मिळाला वर जमिनीच्या वारसा हक्काचा प्रश्नही आपसूक मिटला. जश्या गोठ्यात गाई तशी घरात बाई !

आता ह्या पार्श्वभूमीवर आपल्याला सहज लक्षात येईल की अग्नी, शेती आणि विवाह ह्या तिन्हींच्या संयोगाने मानवाच्या मादीचं विश्व बदलून स्वयंपाकघर नावाच्या खोली पुरतं सीमित झालं आणि जीवंत राहण्यासाठीची मुलभूत गरज असलेला साधा अन्न नावाचा घटक पाककला नावाच्या अती क्लिष्ट आणि वेळखाऊ उपद्व्यापात अडकला .

तेंव्हा अन्न आणि स्त्रीवाद हा अस्तित्वाच्या गाभ्याशी जाऊन भिडणारा विषय न होता तरच नवल .
अन्न, वस्त्र, निवारा ह्या माणसाच्या मुलभूत गरजा असल्या तरी आता ह्या तीनही गोष्टी अविश्वसनीय वाटाव्या इतक्या प्रमाणात बदलेल्या आहेत. आता त्या गरज ह्या संज्ञेला ओलांडून कधीच एका अत्यंत स्फोटक अश्या संस्कृती नावाच्या वेष्टनात गुंडाळल्या गेल्या आहेत .पुरुष धार्जिणी संस्कृती निर्माण करण्यासाठी आणि ती टिकवून ठेवण्यासाठी कराव्या लागणार्या शोषणाची अत्यंत वस्तुनिष्ठ व्यवस्थाच निर्माण केली गेली. ती व्यवस्था एकाच वेळी अनेक पातळ्यांवर कार्यरत होती, अजूनही आहे . त्यामुळे अन्न आणि स्त्रीवाद हा विषय म्हणजे एक तीन पायाची शर्यत आहे . तो खरंच समजून घ्यायचा असेल तर स्त्री आणि अन्न ह्या दोन विषयांची जन्माची पडलेली गाठ सोडवून त्यांना तटस्थपणे वेगवेगळ करून बघता यायला हवं . हा झाला larger point of view. Larger premise.

पूर्वीच म्हणल्या प्रमाणे मी जे लिहितेय ते माझ्यासाठी कॅथार्सिस सारखं काहीतरी आहे But I also believe, the more personal you write , the more universal it becomes. And the first step you can take towards changing your story, is to tell your story. So, अत्यंत खाजगी किंवा व्यक्ती, ह्या पातळीवर चिकित्सा करायला गेलो तर अन्न हा अतिशय over rated, time and energy consuming प्रकार वाटतो मला.त्यातही स्त्री असल्याने अन्न शिजवणे किंवा स्वयंपाक ह्या विषयाशी माझं कळत्या वयापासून love-hate relationship होतं असं आता मागे वळून बघताना मला जाणवतं. I loved to hate food (&/or cooking) and Hated to have to love food (&/or cooking). अगदी लहान असताना पासून मी घरातल्या स्त्रीयांना चुली जवळ तासंतास हाडाची काड करताना बघत होते आणि इतकं करून जे पानात वाढलं जायचं ते मोजून १०-१५ मिनिटात घरातली मुलंबाळ कर्ते पुरुष फस्त करून आपापल्या कामाला लागलेले असायचे आणि बायका पुन्हा अनेक तास उष्टी खरकटी भांडी स्वच्छ करण्यात घालवायच्या . त्यातून बाहेर पडत नाही तोच पुढ्या जेवणावळीच्या तयारीला बिचार्या लागलेल्या असायच्या.मोठं झाल्यावर आपल्यालाही हेच करायला लागणार आहे की काय ह्याचा धसका माझ्या बालमनाने घेतला होताच आणि ह्यातून काहीही झालं तरी आपण आपली सुटका करून घ्यायलाच हवी तरच काही खरं आहे; हे सतत स्वतःला बजावत राहिले.माझं स्वतःचं aptitude गृहकृत्यदक्ष सुगरण वगैरे स्त्री असण्याचं नव्हतं आणि घरातल्यानीही फार मला त्या साच्यात बसवायचा प्रयत्न केला नाही . त्यांनी एक दोनदा सांगून बघितलं असेल इतकंच पण फार काही मला कुणी “सासरी गेल्यावर आमचा उद्धार करशील” ह्या सबबीखाली जाच केला नाही. त्यात अभ्यासात बर्यापैकी प्रगती होती तेंव्हा त्यांनी मला माझ्यावर सोडून दिलं, त्यांच्या ह्या ऋणात मी आजन्म रहायला तयार आहे .

माझी आई उत्तम स्वयंपाक करायची पण त्याहून उत्तम जर काही तिने आमच्या भरणपोषणा साठी केलं असेल, तर तिने वाचन ह्या प्रकाराचे संस्कार आमच्यावर न बोलता, तिच्या वागण्यातून नकळत केले. आमच्या घरात पुस्तकांच्या चळती सतत लागलेल्या असायच्या . स्वयंपाक जेवणं आवरली की आई कायम हातात कुठलं न कुठलं पुस्तक घेऊन बसलेली असायची. तिला मी कधीही शेजारी पाजरी जाऊन कुणाशी उगाचच गप्पा मारत बसलेली बघितलं नाही. कधी कधी तर ती एखादं engaging पुस्तक वाचत असेल तर स्वयंपाक देखील झटकन आवरून जवळ जवळ पळत जाऊन पुस्तक घेऊन बसत असे.

मला हे एक तिचे खूप आवडे . तिच्या स्वयंपाकापेक्षा मला तिचं हे , स्वतःच्या वाचना साठी लागणारा वेळ आणि अवकाश संसाराच्या व्यापातून मिळवण्यासाठी धडपडणं, फार लोभस वाटत असे आणि आदर्शही. ती तिच्याच पुस्तकांच्या जगात इतकी रमलेली असे की आमच्यावर उगाचच बाकीच्यांच्या आया करतात तशी चौकीदारी किंवा आईगिरी तिने कधी केली नाही . ह्यावर अती दक्ष आया कदाचित भुवया उंचावतील पण त्यामुळेच खरंतर आमचे आम्ही निर्णय घ्यायला आणि त्या निर्णयांची जबाबदारी घ्यायला शिकलो . याहून मोठं शिक्षणाचं प्रयोजन ते काय असेल??!!

आईचा स्वयंपाक minimalist म्हणता येईल ह्या categoryत मोडायचा. ती उगाचंच कधी स्वयंपाकघरात तासंतास घालवत बसत नसे. साधं सुटसुटीत पण व्यवस्थित पोट आणि मन भरेल असा स्वयंपाक ती करत असे आणि त्याचाही फार गवगवा करत नसे. स्वतःच्या पाक कौशल्याचा वापर तिने कधीही आम्हाला emotionally blackmail करायला अथवा स्वतःचा ego satisfy करायला केला नाही . हे फार महत्वाचं mental training मला घरबसल्या त्यामुळे मिळालं. अन्ना कडे बघण्याचा अलिप्त भाव त्यामुळेच आपोआप विकसित होत गेला. अन्न शिजवणे हा जगत राहण्यासाठीचा महत्वाचा भाग असला तरी तो आपल्या जगण्याचं प्रयोजन होऊ शकत नाही, होऊ नये, ह्याचं भान मला खूप लहानपणीच आलं होतं. त्यामुळे खाण्याच्या चवीपेक्षा त्याचं पोषण मूल्य तपासायला शिकले . जितका वेळ आणि शक्ती एखादी पाक कृती करायला लागते त्या प्रमाणात त्याचा उपयोग आपल्या शरीराला होतोय का ह्याचा ताळमेळ आपोआप मनात लागायला सुरु होत असे.

त्यातूनच नको त्या फापट पसार्यातून मोकळं होऊन शरीरास जे उपकारक ते स्वीकारणे आणि अपायकारक ते नाकारणे हे आपोआप घडायला सुरुवात झाली. मला कधीही कुठल्याही तळलेल्या किंवा चटपटीत किंवा गोड पदार्थांचं so called craving, instinctively सहसा होत नाही . त्यामुळे ठरवून diet (control) वगैरे प्रकार आजवर कधीही करायला लागले नाहीत. शरीरंच व्यवस्थित मार्गदर्शन करायला लागलं काय खायला हवं नको ते. शरीराचं ऐकलं तर मनाच्या स्वैर वागण्याला आपसूक चाप बसतो. आणि चवीचं म्हणाल तर ते बरंचसं mental construct आहे आणि त्यामुळेच फारच subjective आहे असंही मला हल्ली वाटायला लागलंय.

म्हणजे प्रत्येकाला आपल्याच आईच्या हातच्या आमटी किंवा वरणाची चव लक्षात असते, आवडते. मला माझ्या हातच्या आमटीची चव अजीबातच आवडत नाही पण माझ्या मुलांना मात्र ती फार आवडते. तर त्यात त्या आमटी पेक्षा ती मी केलेली असते हे त्यांना माहीत असेल तर त्यांच्या दृष्टीकोनात फरक पडतो. आमटी अतिशय सामान्य असते पण ती आपल्या आईने आपल्यासाठी केलीये ह्यात कदाचित मुलांचाही ego satisfy होत असेल. कुणीतरी आपल्यासाठी सगळी कामं बाजूला ठेऊन केवळ आपल्याला आवडते म्हणून एखादा पदार्थ करून आपल्याला वाढत असेल, किंवा तेच तिचं काम असेल, तर ह्यापेक्षा जास्ती validation काय असू शकेल ?!

पण मला आई म्हणून अजिबातच माझ्या हातच्या कुठल्याही पदार्थांचा कौतुक वाटत नाही. मी एक average स्वयंपाक करणारी average बाई आहे. त्यात आई झाल्याने फार काही फरक पडलेला आहे असं मला वाटत नाही. एकदा वीणा वर्ल्ड ह्या पर्यटन व्यवसायात अग्रगण्य असलेल्या कंपनीच्या सी.ई. ओ. वीणा पाटील ह्यांची मुलाखत मी बघत होते . तेंव्हा त्यांनाही इतर व्यावसायीक यश मिळवलेल्या कर्तबगार स्त्रीयांना विचारतात तसेच घरा-दारा-मुलां संबधीचे सुमार प्रश्न त्या मुलाखतकारानेही विचारले असता, त्यांनी अजिबात कुठलाही अपराध भाव चेहेर्यावर अथवा आवाजात न येऊ देता दिलेलं उत्तर माझ्यासाठी मनोहर सूर्योदय बघितल्याचा आनंद देऊन गेलं. त्या म्हणाल्या होत्या, “मला जर कुणी विचारलं की तुमचा आवडता पदार्थ कोणता, तर माझं प्रामाणिक उत्तर असतं , असा कुठलाही पदार्थ, ज्यासाठी मला स्वतःला स्वयंपाक घरात जाऊन फार वेळ घालवावा लागणार नाही, मला आवडतो.”

घराबरोबरच इतर अनेक व्यवधानं समर्थपणे सांभाळणार्या कर्तबगार मल्टी टास्किंग मास्टर्स असलेल्या अनेक मैत्रिणी मला लाभलेल्या आहेत . त्यातल्याच एकीने एकदा एक मजेशीर किस्सा सांगितला होता . ती म्हणाली, “नवीन लग्न होऊन मी जेंव्हा ह्या घरात आले तेंव्हा माझ्या सासर्यांनी मला सांगितलं होतं, तुला जर आयुष्यात खरंच सुखी व्हायचं असेल तर कुणाच्याही हातच्या कुठल्याही पदार्थाची चव आवडून घ्यायची सवय लाऊन घे, आणि त्यात उगाचंच कुठलाही अहंभाव किंवा न्यूनगंड मनात येऊ देऊ नकोस.”

माझ्यासाठी ही दोन्ही उदाहरणं माझ्या narrative शी अगदी चपखल मेळ खाणारी आणि म्हणून अत्यंत तार्किक वाटली मला आणि मी ती पडत्या फळाची आज्ञा समजून शिरसावंद्य मानली . कसोशीने पाळली आणि खरंच सुखी झाले .

आमच्या घरी स्वयंपाक करणार्या मावशी अतिशय उत्तम स्वयंपाक करतात. माझ्यापेक्षा नक्कीच जास्त सरस करतात हे मी नम्रपणे मान्य करून माझं स्वयंपाकघर निर्धास्त मनाने त्यांच्या स्वाधीन करून टाकलेलं आहे .जबाबदार्यांच delegation किंवा वेळखाऊ आणि repetitive processes चं outsourcing हे global economies मध्ये organisation building चे key factors समजल्या जातात. घर ही एक संस्था म्हणलं तर ती चालवण्याचे अनेक वेगवेगळे प्रकार असू शकतात. माझ्या आईकडे वेगळा उपाय होता, सासूबाईं कडे वेगळा आणि माझा वेगळा. सगळेच प्रकार एकाच वेळी तितकेच प्रभावी असूच शकतात . प्रत्येकीचं नियोजन कौशल्यंच असतं ते.

कुणी स्टार प्लेयर्स असतात कुणी टीम प्लेयर्स असतात. मी टीम प्लेयर आहे. मला एकटीच्या खांद्यावर विजय ओढून आणावा असं कधीही वाटत नाही तशी महत्वाकांक्षा नाही आणि इच्छा तर मुळीच नाही. I enjoy being part of a winning team , without having to keep performing all the time.

खांदे पालट होत राहिली तर कुणावरच अतिरिक्त ताण येत नाही आणि प्रत्येकाच्याच क्षमता अधून मधून घासून पुसून लख्खं होत राहतात . “मी घरी नसले तर माझ्या घराचं पानही हलत नाही” किंवा “आमच्या ह्यांना साधा चहा देखील करायला येत नाही”, “किंवा आमच्या घरी सगळ्यांना माझ्याच हातच्या गरम गरम पोळ्या/भाकरी लागतात” इत्यादी इत्यादी, असल्या dysfunctionality ला कौतुकांच्या वेष्टणात गुंडाळून स्वतःचं आणि इतरांचही जगणं दुर्धर करून टाकणार्या toxic feminity च्या जाळ्यात मी कधीच स्वतःला किंवा माझ्या घराला अडकू दिलेलं नाहीये. ह्याचा मला माफक अभिमान आहे. मी असली नसली तरी माझं घर व्यवस्थित सुरू राहावं ह्याची तजवीज मी केलेली आहे. मी स्वयंपाक घरात दिवस दिवस गेले नाही तरी सगळ्याचं सगळं व्यवस्थित होतंय की नाही ह्याकडे माझं माझ्या कामाच्या टेबलावरून लक्ष असतं. आणि तितकं पुरेसं असतं. स्वयंपाकघर हेच एकमेव आणि इतकंच जगण्याचं, कर्तव्यपूर्तीचं आणि स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्याचं मर्यादित क्षेत्र असलेल्या स्त्रियांच्या अनेक पिढ्यांचे “संस्कार” अगदी आजच्या पिढीपर्यंत लीलया पोहोचलेले आहेत. हे बघून गंमत वाटते.

अभिनयाच्या क्षेत्रात प्रथितयश असलेल्या एका तरुण दांपत्याची मुलाखत सोशल मीडिया फीड स्क्रोल करत असताना चुकून बघण्यात आली, तेंव्हाच्या ३० सेकंदात , मुलाखत घेणाऱ्या मुलीने नेहमीप्रमाणेच दोघांमधल्या तिच्यावर नेम धरून हमखास वर्मी बसणारा आणि प्रेक्षकांना खुश करणारा, ठेवणीतला प्रश्न भात्यातून काढला, “ तुम्ही दोघंही सतत इतके बिझी असता, तेंव्हा घरासाठी , एकमेकांसाठी वेळ कसा काढता आणि तो कसा घालवता?” त्यावर क्षणाचाही विलंब न लावता ती म्हणाली, “आम्हाला फार वेळ एकत्र मिळत नाही पण जेव्हा जेव्हा तो मिळतो तेंव्हा तेंव्हा आम्ही एकत्र जेवतो, त्यातही ह्याला गरम गरम पोळ्या करून वाढण्यात मला सगळ्यात जास्त आनंद मिळतो.” असं ती सांगत असताना, तो दोन्ही गालात गुलाबजाम असल्यासारखा गोड ब्लश करत होता, पुढे ती म्हणाली, “मला आठवतं माझी आई आम्हाला असं लहानपणी मस्त गरम पोळ्या वाढायची ते खाताना कोण सुख वाटायचं, तेच ह्यालाही मिळावं असं मला वाटतं आणि मलाही असं वाढायला आवडतं ” इतका सगळा प्रेमळ गोड गुलाबी संवाद ऐकून मला अर्धा क्षण कौतुक वाटलं खरं त्या आदर्श दांपत्याचं, पण तितकंच. त्यानंतर मात्र त्या गोडव्याने पोटात ढवळायला लागलं. ३० सेकंदाच्या वर काही मी ती मुलाखत पचवू शकले नाही आणि पुढे स्क्रोल करता करता विचार करू लागले , मिळत असेल कुणाला त्यात आनंद तर मिळो बापडा. आपल्या आईचं काय जातंय?

पण मला, प्रामाणिकपणे सांगायचं तर, कधीही पोळ्या लाटत बसण्यात किंवा त्या गरम गरम नवर्याला किंवा कुणालाही , अगदी स्वत:च्या मुलांनाही, वाढण्यात आनंद वगैरे अनुभवलाय असा एकही क्षण आठवत नाही. आमच्या घरात ज्याला गरम पोळ्या/ भाकरी खाण्याचा आनंद मिळवायचा असेल त्याने मावशी असतात त्या वेळेत जेवायला बसावे इतकाच नियम आहे . तोही कुणी पाळत नाही . प्रत्येक जण आपापल्या वेळेत आपापल्या सोईने लागेल तसं जेवण गरम करून वाढून घेतात . अगदी माझा १० वर्षाचा मुलगाही !

मला आठवतं नवीन लग्न होऊन जेंव्हा मी सासरी आले तेंव्हा हळदीचा रंग उतरल्यावर कुणीतरी मला विचारलं होतं, तुझी स्पेशालिटी डिश काय आहे , तीच आज सगळ्यांसाठी कर बघू . ते ऐकल्यावर खरंतर पोटात आधी गोळाच आला होता. सुचेचना उत्तर. कधी विचारच नव्हता केला ह्याबद्दल, कृती तर फार दूर. आपली तर कुठली स्पेशालिटीच नाहीये . तेंव्हा नवरा मदतीला धाऊन आला आणि दोघांनी मिळून कढी खिचडी का काय ती केली होती. सगळ्यांनी अर्थातच कौतुक करून वेळ साजरी केली पण i was so unimpressed with my culinary efforts. नवरा अतिशय समंजस मिळालाय हे एका अर्थी खरोखरीच ‘वर’दान म्हणायला हवं.

“पुरुषाच्या हृदयाचा मार्ग त्याच्या पोटातून जातो”, ह्यासारखं sexist आणि crude वाक्य नाहीये जगात. माझ्या आयुष्यात महत्वाच्या असलेल्या एकाही पुरुषाला मी कधीही, काहीही खाऊ पिऊ घालून आपलंसं करायचा प्रयत्न तर सोडा तसा विचारही कधी केलेला नाहीये. आणि मुळात अश्या, हृदयाचा मार्ग पोटातून वगैरे जाणार्या पुरुषांबद्दल किंवा त्यांच्या हृदयाबद्दल मला कधीही यत्किंचीतही आकर्षण वाटलेलं नाहीये, त्यामुळे त्यांना आपलंसं करण्याचा प्रश्नच नव्हता उलट असे जे काही तुरळक पुरुष वाटेत आले त्यांना kindly excuse me म्हणून मी तिथून सहज सटकलेय.

एखाद वर्ष एकमेकांना ओळखल्यावर जेव्हा नवर्याने propose केले तेंव्हा मी त्याला पहिला प्रश्न विचारला होता, “ तुला तुझ्या आई किंवा वहिनी सारखी कुणी मुलगी हवी आहे का??” त्यावर क्षणाचाही विलंब न लावता त्याने शांतपणे उत्तर दिलं होतं, “नाही. मला आई आणि वहिनी already आहेत , मला तू हवी आहेस , life partner म्हणून हवी आहेस. तुझी तयारी असेल तर लग्न करुया .” मी अर्थातच ते उत्तर ऐकून मगच तयार झाले. त्यानंतर च्या एका भेटीत त्याने विचारले होते, “तू non veg खात नाहीस , पण तू non veg बनवू शकते का ?” त्यावर मी म्हणाले होते , “नाही. मला येत नाही.”
त्यावर त्याने विचारले , “माझी आईही खात नाही, ती शिवतही नाही , पण शिजवते. तसं तुला करायला जमेल का?"
मला आठवतं त्यावर मी तितक्याच शांतपणे उत्तर दिल होतं , “प्रयत्न केला तर कदाचित जमेलही मला, पण मला तो प्रयत्न करायला आवडेल असं वाटत नाही , एक तर ते माझ्या तत्वात बसत नाही आणि मी तुझी आई नाहीये.” त्यावर त्याने मला हसून long drive वर नेलं आणि त्याच्या आवडत्या एका restaurant मध्ये dinner date ला घेऊन गेला जिथे आम्ही architecture ह्या आमच्या अत्यंत आवडत्या विषयावर पोट भर चर्चा करून दिवस सत्कारणी लावला.

लग्ना आधी जेंव्हा सासरी भेटायला गेले होते तेंव्हा माझ्या नणंदेने मला विचारलं होतं, “स्वयंपाक येतो का ?” तेंव्हा मी “फार नाही, फक्त कामा पुरता, उपाशी रहायला लागणार नाही कधी इतकाच येतो.“ असं प्रामाणिक उत्तर दिलं होतं. त्यावर तिने पुन्हा विचारलं,
“पण आमच्या सचिन ला तर वेगवेगळ्या डिशेस खायला खूप आवडतात, मग कसं करणार तू ??” त्यावर मी पुन्हा तितक्याच शांतपणे म्हणाले होते “ ज्याला खायला आवडतं त्याने बनवायलाही शिकावं, मी मदत नक्की करीन, पण तेवढ्यासाठी मला स्वयंपाकात फार वेळ घालवायला नाही आवडणार"

तेंव्हा कदाचित कुणाला माझी उत्तरं आगाऊपणाची वाटली असतील पण माझ्यासाठी ती सगळीच उत्तरं खरी आणि महत्वाची होती, अजूनही आहेत. मला माझं स्त्रीत्व स्वयंपाकघराशी बांधून घ्यायचं नव्हतं अगदी प्रेमाखातर देखील नाही. ही clarity मला लहानपणापासूनच होती त्यामुळे ती उत्तरंही तितकीच स्वच्छ होती. केवळ पाककला कौशल्या च्या कसोटी वर जर कुणी माझ्या स्त्रीत्वाची पारख करणार असेल तर त्यांनी मला खुशाल शून्य देऊन टाकावा . आयुष्यभर तो क्रूस खांद्यावर घेऊन चालत बसण्यापेक्षा मला खांदे झटकून त्या ओझ्यातून मोकळं होणं जास्त परवडणारं, आवडणारं होतं.

त्यामुळेच जेंव्हा आमच्या नवीन घरातलं स्वयंपाकघर आम्ही design करत होतो तेंव्हा अत्यंत साधं logical brief आम्ही स्वतःला दिलेलं होतं. आपल्या घरातलं स्वयंपाकघर democratic असावं , open असावं . तिथे कुणीही कधीही काहीही येऊन शिजवावं. स्वतः खावं इतरांना खाऊ घालावं. स्वयंपाकघर हे भूक लागणार्या प्रत्येकासाठी, भूक शमवण्यासाठी लागणारं साहित्य असलेलं ठिकाण आहे. ते प्रत्येकाने मुक्तहस्ते वापरावं इतर कुणावरही स्वतःच्या भुकेचं, चवीचं ओझं न टाकता, मग ती आपल्यावर जीवापाड प्रेम करणारी आई असो, बायको असो, गर्ल फ्रेंड असो, आजी असो किंवा कुणीही .

बहुसंख्य स्त्रियांची, त्यातही भारतीय स्त्रियांची, उमेदीची खूप वर्षं,कर्तृत्व,उर्मी, क्षमता, स्वयंपाक घर नावाच्या पोकळीत अक्षरशः शोषल्या जातात हे आपण सारेच जाणतो, ते मान्य करू न करू हा भाग वेगळा. त्यातल्या सगळ्याच स्त्रीयांना काही स्वयंपाकाची आवड असू शकत नाही, किंबहुना असत नाही किंवा त्या नैसर्गिकरीत्या स्वयंपाकासाठी designed असतात असंही नाही. स्वयंपाक ही काही gendered skill नाहीये, आणि असं असेल तर food industry चा विचार करता, तिथे सगळ्याच महत्वाच्या ठिकाणी पुरूषच दिसतात, हे कसे? 5 star हॉटेल्स चे शेफ्स असो किंवा लग्नात लागणारे जेवण बनवणारे आचारी /महाराज असो, किंवा सरकारी गेस्ट हाऊस मध्ये काम करणारे खानसामे असो, किंवा अगदी पाणीपुरी/ पावभाजी ची गाडी चालवणारे असो, सगळेच पुरुषच दिसतात. हे कसे ?

व्यवसाय म्हणून स्वयंपाक करणे किंवा एखाद दिवशी हौसेने एखादा पदार्थ करून बघणे आणि रोज तासंतास ओट्या समोर उभं राहून तेच thankless काम वर्षानुवर्ष , आयुष्यभर करत राहणं ह्यात perception चा खूप फरक आहे. करणार्यांच्या आणि ती सेवा विनासायास उपभोगणार्यांच्या देखील. म्हणूनच ज्या स्त्रिया ह्या एकरेषीय, एकसुरी gender roles, ना आव्हान देतात, त्यातून मार्ग काढतात, त्या जाळ्यातून मुक्त होण्याच्या शक्यता धुंडाळतात, त्यांचं स्त्रीत्व यत्किंचीतही दुय्यम दर्जाचं ठरतं असं मला अजिबातच वाटत नाही. उलट त्याच जगण्याच्या पद्धतींच्या नव्या शक्यता, विचारांच्या नव्या दिशा दाखवू शकतात .

बोलता बोलता मी असं एकदा म्हणाले असता माझा एक अत्यंत जिवलग फेमिनीस्ट मित्र म्हणाला होता, “ न जाणो असे किती आईनस्टाईन, शेक्सपीअर, कोलंबस आपण हरवून बसलोय.... स्वयंपाकघरात, आणि त्याहून मोठं दु:खं हे आहे की आपल्याला ते कधीच कळणारही नाही. त्यांची इतकी महत्वाची आयुष्यं केवळ तांदळातले खडे वेचण्यात निघून गेली असतील.” त्याचं ते वाक्य मनात घर करून राहिलंय ते कायमचं.
आईनस्टाईनच्या (त्याच्याच इतक्या कर्तबगार) बायकोवर ची documentary एकदा youtube वर बघण्यात आली. मलीव्हा मरीच तिचं नाव. अर्थात आपल्यापैकी बोटावर मोजण्या इतक्या लोकांनी हे नाव ऐकलं असेल. ज्यांना अधिक जाणून घेण्यात रस असेल त्यांनी जरून गूगल करून बघावं म्हणजे मी काय म्हणतेय त्याचं गांभीर्य कदाचित थोड्या प्रमाणात पोहोचेल.
सिमोन दि ब्वाव्हा तिच्या सेकंड सेक्स ह्या पुस्तकांत ह्या प्रक्रियेचा व्यवस्थितच धांडोळा घेते. ती म्हणते, एकूणच आपल्या समाजात पुरुषाच्या कर्तृत्वाला नको तितके वलय प्राप्त झालेले आहे. स्त्री तीन चार तास खपून जगातला सर्वोत्तम केक जरी बनवत असेल तरी तो १०-१५ मिनिटात संपून जातो आणि त्याची इतिहासात कुठेही नोंद ठेवली जात नाही .

केवळ चूल आणि मूल ह्या टोकांवर झुलणारा स्त्रीत्वाचा डोलारा उतरवून फक्त व्यक्ती म्हणून स्त्री कडे बघता आलं तर अन्न ह्या एका छोट्याश्या गोष्टी साठी किती मोठी किंमत ती व्यक्ती मोजतेय ह्याचा अंदाज जरी आला तरी आपल्या अपेक्षा आटोक्यात ठेवता येतील. “तुला स्वयंपाक येतो का?” असा वर वर साधा वाटणारा प्रश्न एखाद्या तरुण मुलीला विचारण्या आधी आपण तो किती loaded आहे ह्याचा क्षणभर थांबून विचार करू शकलो त्या ऐवजी, तिला तिच्या कुठल्या क्षमता विकसित कराव्याश्या वाटतात ह्यावर चर्चा करू शकलो तरी ह्या लेखन प्रपंचाचं प्रयोजन कारणी लागलं असं म्हणायला हरकत नाही. नाही ??!!

- शीतल पाटील
(लेखिका गेली १७ वर्ष बांधकाम क्षेत्रात कार्यरत आहे. अनेक प्रख्यात राष्ट्रीय अंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम केल्या नंतर तिने मंथन डिझाईन स्टुडीओ ह्या नावाने कोल्हापूर येथे स्वतः ची प्रक्टिस स्थापित केली . शिक्षण क्षेत्रात रस असल्याने ती वेगवेगळ्या आर्किटेक्चर कॉलेजेस मध्ये विजिटिंग लेक्चरर म्हणूनही कार्यरत आहे . एकीकडे व्यवसाय नावारूपास आणताना एकत्र कुटुंबात राहून दोन मुलांची आई असण्याची तिहेरी कसरत करत झालेल्या तिच्या प्रवासातून आलेल्या अनुभवांचा उपयोग विध्यार्थ्यांना आणि व्यवसायात नव्याने उतरू बघणार्या मुलांना विशेषतः मुलींना व्हावा ह्यासाठी ती सतत प्रयत्नशील असते)

मूळ लेखाची लिंक:
https://punhastriuvach.blogspot.com/2019/09/blog-post_89.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सोपे आहे , बाईने लग्न करताना नोकरी न करणारा व घर बघणारा नवरा करावा , किंवा नोकर ठेवता येईल इतका पगार मिळवावा अन नवरा घरजावई करून डोसाईल ठेवावा,>>

हो हो नक्कीच आवडेल अनेकींना असा नवरा. फक्त त्याने आपला इगो आणि आपल्या आईवडिलांचा ताठा आपल्या माहेरी सोडून यावं. नवीन कुटुबात मिळुनमिसळून रहावं. बायकोच्या म्हातार्या आईवडील आजीआजोबांची काळजी घ्यावी. मुलांवर उत्तम संस्कार करावे. आदर्श जाव्ई बनावे.

आई वडील आणि वयस्कर लोक सांभाळणे स्त्री ला बोजा वाटतो .
पण पुरुष आई ही स्त्री आणि बाप हा पुरुष उतार वयात सांभाळणे त्यांना बोजा वाटत नाही .
आधुनिक स्त्रिया किती संकुचित आहेत .

त्या वयस्कर झाल्यावर त्यांचे विचार हेच राहतील का?

आईवडिलांचा ताठा आपल्या माहेरी सोडून यावं. नवीन कुटुबात मिळुनमिसळून रहावं. बायकोच्या म्हातार्या आईवडील
तुम्ही तुमच्या सासू सासऱ्याना नक्कीच सांभाळत नसणार .
पण त्यांची मालमत्ता आपल्याला मिळावी ही हाव मात्र सोडली नसणार .
पाहिले तुम्ही स्वतः सासू सासरे सांभाळत नसलं तर त्यांच्या मालमत्तेचा हक्क सोडून ध्या आणि नंतर फुकटचे सल्ले ध्या .
बघा जमतंय का ..
सासू ,सासरे मेले की आम्हीच वारस आहे म्हणून ताबडतोप हजर होणाऱ्या लोकांची कमी नाही

सर्वांनी आपापली मते मांडली आहेत. लेख वाचल्याबद्दल व प्रतिक्रियांसाठी सर्वाना धन्यवाद Happy माझी मते दोन-तीन मुद्द्यांतच मांडतो...

१. लेखिकेने स्त्री प्रधान व्यवस्था यावी असे कुठेही (प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे) ध्वनित केलेले निदान मला तरी जाणवत नाही. त्यामुळे पुरुषप्रधान व्यवस्था नकोय म्हणजे ती स्त्रीप्रधान असण्याची अपेक्षा असेल असा तर्क लावणे चुकीचे होईल. "ज्याला खायला आवडतं त्याने बनवायलाही शिकावं, मी मदत नक्की करीन" ह्या लेखिकेच्या वाक्यात सगळा सारांश आहे. हे कुठेही जेंडर सापेक्ष नाही. हे वाक्य स्त्री-पुरुष दोघांच्याही तोंडी तितकेच शोभेल. तेच "आमच्या घरी सगळ्यांना माझ्याच हातच्या गरम गरम पोळ्या/भाकरी लागतात” हे वाक्य मात्र सद्यस्थितीत स्त्री-पुरुष दोघांच्याही तोंडी तितकेच शोभते का असा प्रश्न आपण स्वत:स विचारायला हरकत नाही. समानता हवीच. समतोल हवाच. कुठेही असो.

२. कुटुंब/विवाह संस्था अयोग्य आहे असा सूर सुद्धा लेखात मला जाणवला नाही. पण या व्यवस्थेचा "स्त्रीला अक्षरशः पुरुषाच्या दावणीला बांधण्यासाठी" पद्धतशीरपणे वापर केला गेला हे लेखात अधोरेखित केले गेले आहे. जसे मी सुरवातीला लिहिले आहे कि एका संशोधनातून "नांगराच्या शोधानंतर निर्माण झालेली जमिनीची मालकी" इथून याची सुरवात झाल्याचे दिसून येते. हजारो वर्षांपूर्वी तत्कालीन परिस्थिती जी असेल त्यानुसार ते घडले असेल. पण सांप्रतकाळात तिथे समानता यायला हवी हे विचार योग्यच आहेत असे मला वाटते.

३. लेखिकेने सुरवातीला उल्लेख केल्यानुसार लेखन कॅथार्सिस (the process of releasing, and thereby providing relief from, strong or repressed emotions) सारखं असणार आहे याचेही आपण भान ठेवायला हवे. लेखिकेची ओळख करून देण्याचा भाग म्हणून तिच्या "आर्किटेक्ट" असण्याचा उल्लेख होणे अपरिहार्य आहे. जितके मी लेखिकेला ओळखतो तिचा वाचन व्यासंग खूप आहे. अनेकदा नवीन गोष्टी तिच्या लिखाणातून मला समजल्या आहेत. (उदाहरणार्थ, अल्बर्ट आईनस्टाईन यांचे सिद्धांत व समीकरणे यावर मी आज पावेतो भरपूर वाचन केले आहे. पण त्यांच्या पत्नी Mileva Marić यांच्याविषयी व आईनस्टाईन यांनी त्यांच्यासोबत जो "करार" केला होता त्याविषयी कधीही वाचले नव्हते. या लेखातून ते नव्याने समजले)

तूर्तास आपण स्त्री वाद आणि पुरुष वाद बाजूला ठेवूया.
मानवी समूह ला कोणत्या प्रश्नाला सामोरे जावे लागेल .
१) स्त्रिया ह्या शारीरिक क्षमते मधे कमजोर असतात त्यांचे रक्षण कोण करणार
२) मुलांचे संगोपन कोण्ही करायचे आणि आणि स्वतःच्या पायावर उभ राहण्याची क्षमता येण्यासाठी जो करोडो रुपये खर्च येतो तो कोण्ही करायचा.
३) मुलांना राहण्यासाठी जागा लागेल त्याची कशी आणि कोण्ही सोय करायची .
४) रोजगार निर्मिती ,संरक्षण,,जर पुरुष करत असतील तर त्या मध्ये स्त्रिया ना हक्क देण्याचे कारण काय .
५) वयस्कर लोक ज्यात स्त्री आणि पुरुष दोन्ही येतात त्यांच्या संरक्षणाचे काय ?.
हे सर्व प्रश्न पुरुषानं भेडसावतात म्हणून ते अविचारी मुक्ती विचारच विरोध करतात .
स्त्री जर पुरुष शिवाय राहत असेल तर सर्व क्षेत्रात वर्चस्व असलेला पुरुष स्त्री शिवाय राहू शकणार नाही का ?.
स्त्री ला जेवढे हक्क प्राप्त आहेत त्याचे रक्षण पुरुषच करतो .
स्त्रियांच्या हक्काचे रक्षण स्त्रिया स्वतः करू शकणार नाहीत

{स्त्रिया ह्या शारीरिक क्षमते मधे कमजोर असतात त्यांचे रक्षण कोण करणार}
कोणापासून रक्षण ते सांगा. त्यातच प्रश्नाचं उत्तर आहे.

कोणापासून रक्षण ते सांगा. त्यातच प्रश्नाचं उत्तर आहे
नैसर्गिक आपत्ती मध्ये,
आणि पुरुषानं पासून हेच तुम्हाला उत्तर हवंय .
पण जेव्हा स्त्री आणि पुरुष प्रतिस्पर्धी म्हणून उभे राहतील तेव्हा हेच घडेल .
म्हणून तर कुटुंब व्यवस्था,विवाह संस्था ,नाती निर्माण झाली .

आणि तीच विन सोडवून
मोकळी केली तर धोक्यात कोण येईल

चूल आणि मूल आमची जबाबदारी नाही म्हणणाऱ्या स्त्रियांनी जेंडर शस्त्रक्रिया करून पुरुष बनावं.

यापेक्षा सरळ मूल होऊ न देणे हा पर्याय योग्य वाटत नाही का ? असा निर्णय एखाद्या स्त्रीने घेऊन वरच्या सारखा लेख लिहिला तर त्यावर तुमच्या प्रतिक्रिया पॉजिटिव्ह असणार का की तिथेही कुटुंबसंस्था - समाजव्यवस्था धोक्यात येत आहे म्हणून आगपाखड करणार ? की एखादीला तसा निर्णय घ्यायचा असेल तर घ्यावा पण सार्वजनिक संस्थळावर लेख वगैरे लिहून इतर मुलींचे विचार प्रभावित करायचा प्रयत्न करू नये असं तुम्हाला वाटेल ? या लेखाच्या बाबतीतही ह्या विचारांनी तरुण स्त्रिया प्रभावित होऊन कालांतराने तुम्ही ज्या व्यवस्थेत कम्फर्टेबल झाला आहात ती बदलेल याची धास्ती तुम्हाला वाटते म्हणून इतके निगेटिव्ह प्रतिसाद येत आहेत ... ?

कोणी जेंडर शस्त्रक्रिया करून घ्यावी हे सांगण्याचा कोणाला अधिकार नाही ... समजा मला वाटत असलं तरी मूल होऊ देऊ नये तरी कुणालाही असा सल्ला देण्याचा मला अधिकार नाही ... मी किंवा तुम्ही असा सल्ला दिला तर खुद्द लेखिकेची मुलं विचारतील - तुम्ही सांगणारे कोण ? आमची आई आमचं सगळं व्यवस्थित करते आहे , तुम्हाला चोमड्यासारखे सल्ले देण्याचा अधिकार कुणी दिला ... किंवा आमच्या आईने लिंगबदल ऑपरेशन करायला हवं हे ठरवणारे तुम्ही कोण ? प्रत्येकाला त्याची आई जशी असेल तशी प्रिय असते .. त्यासाठी तिने आयुष्यभर स्वयंपाक करून वाढायची गरज नाही ... मुलं म्हणतील आम्हाला चालतो आईने केलेला साधा स्वयंपाक किंवा स्वयंपाकिण मावशींनी केलेला स्वयंपाक - आमच्या आईने करिअर करायचं की घरी रांधायचं हे तिचं ती ठरवेल ... लेखिकेने एक गोष्ट बरोबर लिहिली आहे , जेवणाची गरज पोट भरणे आणि शरीराचं पोषण होण्यापूरती असते .. ते वेळच्यावेळी मिळत असेल तर ते आईच्या हातचं नाही म्हणून मुलांच्या आईवरच्या प्रेमात फरक पडत नाही ... रांधून घालते म्हणून मुलं आईवर प्रेम करत नाहीत , तो बंध वेगळाच असतो , त्याला असल्या टेकूंंची गरज नाही ... लग्न करताना निदान आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी स्त्रीने तरी नवरा आपल्याला स्वयंपाकीण म्हणून घरी नेऊ इच्छित आहे की आयुष्याची जोडीदारीण म्हणून हे पाहून मग लग्नाचा निर्णय घ्यावा असं लेखिकेचं मत जाणवलं .. त्याच्याशी मी तरी 100 % सहमत आहे ...

स्वयंपाक आवडत नाही म्हणून जेंडर बदल शस्त्रक्रिया ? का ? स्वयंपाक - घर सांभाळणं करायचं नसेल तर जसं जन्माला आलं तसं आनंदाने जगायचा अधिकार स्त्रीला नाही ? प्रचंड बुरसटलेले विचार आहेत तुमचे ....

स्वयंपाक , घर समभाळायची इचछा नाही,

इचछा तर पुरुषांना नोकरी करू नये अशीही होईल , कर्ज फेडू नये अशीही होईल, चालेल ?

घर , स्वयंपाक सांभाळणार नाही, म्हणजे नेमके काय करणार ? होस्टेलवर जाऊन रहाणार , रोज विकतचे खाणार की माहेरीच राहून आईचे खाणार ?

देशाचे रक्षण करण्यात किती स्त्रिया शहीद झाल्य आहेत त्यांची संख्या समजली तर बरं होईल .
अंतर्गत सुरक्षा राखताना किती स्त्रिया शहीद झाल्या आहेत त्यांची संख्या सांगितलं तर बरं होईल .
युद्धात ५० % पुरुष आणि 50 % स्त्रिया चे सैन्य कुठे लढले असेल तर ते वाचायला आवडेल.
फक्त पगार घेण्यासाठी संरक्षण क्षेत्र आणि पोलिस मध्ये स्त्री ला संधी का दिली जाते .
जे जे रोजगार उद्योगातून पुरुषांनी निर्माण केले आहेत तिथे स्त्रिया ना नोकरी नाकारली गेली तर किती स्त्रिया आर्थिक बाबतीत सक्षम राहतील

आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी स्त्रियांंबाबत लिहिलं आहे .. किंवा ज्यांच्या माहेरची परिस्थिती सुखवस्तू आहे अशांनी स्वयंपाकीण हवी असलेल्या घरात जायचं की नाही याचा स्वतःशी विचार करावा ... कारण अशांना स्वयंपाकी / स्वयंपाकीण - घरकामाला व्यक्ती परवडू शकणारा नवरा मिळायचे चान्सेस असतात .. आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी स्त्रियांनी जर घरकामाची आवड नसेल तर स्वतःच्या पगारातून स्वयंपाकाला - कामाला व्यक्ती ठेवू देतील असंच घर पाहावं , सुनेनेच करावं ही अपेक्षा ठेवणारी घरं टाळणं शहाणपणाचं वाटतं ...

इतरांना नाईलाजाने किंवा तोच गोड मानून मिळेल त्या घरात जुळवून घेण्याशिवाय पर्याय असत नाही . ज्यांना तो आहे त्यांनी त्याची किंमत ओळखावी आणि निर्णय घ्यावेत असं मला वाटतं .

लेख पटला आणि आवडला.
राधानिशा, तुमचंही पोस्ट पटलं. लग्नाला उभ्या मुलाकडच्या लोकांनी आम्हांला नोकरी करणारी सून चालणार नाही/ नोकरी करुन सगळं घरीच करणारी, आमच्या मुलाचे सगळे लाड पुरवणारीच मुलगी पाहिजे वगैरे आधीच स्पष्ट सांगितलं तर मुलींना चॉईस करणं सोपं जाईल.

ब्लॅककॅट, तुमची तडतड मायबोलीवर बरीच वर्ष चालू आहे. आता अती परिचयात अवज्ञा झाली आहे.

किंवा ज्यांच्या माहेरची परिस्थिती सुखवस्तू आहे
इथे सुद्धा पुरुषानं मूळे आर्थिक स्थिती चांगली असेल तर स्त्री नी हक्क सोडावा ..
स्त्री मुळे सक्षम असेल तरच त्या वर हक्क सांगावा

तुम्ही तुमच्या सासू सासऱ्याना नक्कीच सांभाळत नसणार .
पण त्यांची मालमत्ता आपल्याला मिळावी ही हाव मात्र सोडली नसणार .
पाहिले तुम्ही स्वतः सासू सासरे सांभाळत नसलं तर त्यांच्या मालमत्तेचा हक्क सोडून ध्या आणि नंतर फुकटचे सल्ले ध्या .>>

तुला कस कळल की मी लग्न झालेली स्त्री आहे, माझे सासुसासरे जिवंत आहेत, त्यांना मी संभाळत नाही, त्यांच्याकडे मला द्यायला मालमत्ता आहे वगेरे? स्वतावरुन अनुमान काढल का?
बर तू संभाळतो का सासुसासरे? आणी त्यांच्या मालमत्तेचा हक्क तू सोडला ना ? Proud

लेख ओके आहे, विचार चांगलेच पण त्यात नवीन अथवा क्रांतिकारी काहीच नाही असे वाटले!
पण मग असा काही विचार पहिल्यांदाच ऐकल्यासारख्या लेखावरच्या प्रतिक्रिया वाचून थक्क झाले. सुमारे ५० वर्षापूर्वी समजू शकले असते असल्या प्रतिक्रिया! Happy

राजेश, स्वप्नील,

तुम्ही जे काही लिहीत आहात, तो व्हिक्टोरियन विचार आहे. भारतात अठराव्या शतकानंतर आलेला. त्याला डोमेस्टिसिटी असं म्हणतात. पब्लिक आणि प्रायव्हेट अशी विभागणी करायची. स्त्रीला प्रायव्हेट स्पेसमध्ये डांबायचं, आणि पुरुषानं पब्लिक स्पेसमध्ये वावरून देशसेवा करायची. स्त्रीला सांगायचं की बये, तू घरात राहून स्वयंपाक कर आणि देशासाठी उत्तम संतती निर्माण कर. ही डोमेस्टिसिटी आपली नाही, त्यामुळे जुनाट, राष्ट्रवादी, व्हिक्टोरियन विचार आता हाकलून द्यावे.

मायक्रोसॉफ्ट पासून असंख्य कंपन्या पुरुषांनी स्थापित केल्या आहेत. .
जगातील बरेच देश पुरुषानं मुळे अस्तित्वात आहेत त्यांचे अस्तित्व पुरुषांच्या बलिदानातून निर्माण झाले आहे ...
जर ह्या सर्वांनी स्त्रिया ना रोजगार देणे नाकारले तर अन्याय असेल की न्याय .
जर अन्याय असेल तर पुरुष हे स्त्री चे दुश्मन आहेत असे विचार व्यक्त करणाऱ्या मुक्ती वाल्या स्त्रिया कसा प्रतिवाद करतील

>>>>>>>>>> मायक्रोसॉफ्ट पासून असंख्य कंपन्या पुरुषांनी स्थापित केल्या आहेत. .>>>>>>> त्यांना जन्म कोणी दिला, खायला/ल्यायला कोणी दिलं, संगोपन कोणी केलं.
जर-तर ला अर्थ नाही. शेवटी प्रत्येकाला कुठे ना कुठे तडजोड करावीच लागते. तेव्हा आपल्याकरता काय चांगलं आहे प्रत्येकाने ठरवायचे आहे. लेखिकेचे विचार मला पटले. तिने तिच्यापुरता ठरविलेले आहे की चूल - मूल मध्ये मी बांधून घेणार नाही. माझी क्षितीजे मी विस्तारेन.

क्षितिजे विस्तारायला कुणाचीच बंदी नाही, पुरुषांनी बंधने घातलेत वगैरे विचार सोडून द्यावेत व आंनदाने फिरावे,

पण , घर स्वयंपाक सोडणार तर काहीतरी पर्याय स्वीकारावाच लागेल

1. होस्टेलवर रहा
2 विकतचे मागवून खा
3. माहेरीच राहून आईचे खा
4. नवऱ्याला घर सांभाळायला द्या
5. नोकर ठेवा

त्यांना जन्म कोणी दिला, खायला/ल्यायला कोणी दिलं, संगोपन कोणी केलं.

मान्य स्त्री नी
मला फक्त हेच सांगायचे आहे पुरुष हा स्त्री चा दुश्मन नाही सहकारी आहे .
कुटुंब ,विवाह,समाज ह्या व्यवस्था खूप विचार करून बनवल्या आहेत त्या सुधा स्त्री च्या दुश्मन नाहीत तर supportive व्यवस्था आहे .
सर्व कामाचे विभाजन होणे गरजेच आहे त्या मध्ये दुमत नाही .
पण पुरुष दुश्मन.
कुटुंब ,समाज हे निरुपयोगी असे विचार करणारे चुकत आहेत हे दाखवणे गरजेचं वाटलं.

पुरुषानं मूळे आर्थिक स्थिती चांगली असेल तर स्त्री नी हक्क सोडावा ..
स्त्री मुळे सक्षम असेल तरच त्या वर हक्क सांगावा

हक्क सांगावा किंवा मागावा लागत नाही अशा कुटुंबात .. वडिलांनी जे कमवलं आहे त्यात आईचा सहभाग - योगदान असतंच .. आणि नसलं तरी फरक पडत नाही ... अजूनही वडील ठरवलं तर मुलीला तुझं तू बघ किंवा बघून दिलेल्या घरात निमूट संसार कर अशी सक्ती करू शकतात ... फक्त आता तशी सक्ती होण्याचं प्रमाण कमी होत आहे .. अगदी ग्रामीण भागातही सासरी निमूट सहन कर किंवा तूच ऍडजस्ट कर अशी भूमिका घेणं मुलीच्याच आईवडिलांनी कमी केलं आहे ... सुखवस्तू कुटुंबांचा विषय चालू आहे तर अशा कुटुंबात मुलीला कमीत कमी ऍडजस्ट करावं लागावं अशी खुद्द वडिलांचीच इच्छा असते ... एक - दोनच मुलं असतील तर मुलीच्या सुखाला अधिकच प्राधान्य दिलं जातं ... त्या माहेरच्या सुखवस्तू स्थितीवर किंवा वडील या पुरुषामुळे आलेल्या सुखवस्तू परिस्थितीवर मुलीचा अलिखित हक्क असतो... आणि आतातर कायद्यानेही दिला आहे पण तो वापरायची वेळच सुखवस्तू कुटुंबातल्या मुलींवर येत नाही . वडलांच्या मालमत्तेवरचा हक्क सोडण्याचं आवाहन असेल तर ते हास्यास्पद आहे ...

पुरुषानं मूळे आर्थिक स्थिती चांगली असेल तर स्त्री नी हक्क सोडावा ..
स्त्री मुळे सक्षम असेल तरच त्या वर हक्क सांगावा

--------
हे त्यांनी उपहासाने म्हटले आहे असे वाटते , म्हणजे त्यांना असे म्हणायचे आहे की , नवरा नको, तर बापही पुरुषच ना, ?

कुटुंब व्यवस्था गरजेची असेल तर टिकून राहीलच की . ज्या गोष्टीची गरज असते लोकांना त्या गोष्टी काळाच्या ओघातही टिकून राहतात ... आधी एकत्र कुटुंबं असायची 2 - 3 भाऊ त्यांच्या बायका , मुलं , आईवडील , आजी - आजोबा ... आज भाऊ भाऊ एकत्र राहणं खूप कमी दिसून येतं .. आईवडिलांची जबाबदारी कुणीतरी एक भाऊ घेतो ... सासू सासऱ्यांबरोबर एका छपराखाली राहणंही आजच्या मुलींना नको वाटतं .. बदल हा काळाचा नियम आहे ... चांगली गोष्ट ही आहे की आज लग्नाच्या बाजारात सगळ्यांना ऑप्शन्स उपलब्ध आहेत.. एकत्र कुटुंबात राहणारी मुलगी हवी असेल तर तशीही मुलाला मिळू शकतेच की ... आणि मुलीला स्वतंत्र दोघांचा संसार हवा असेल तर तसाही वर मिळू शकतो .... चिडचिड किंवा अट्टाहास कशाला करायचा इतरांनी आपल्याला जे योग्य वाटतं तसंच वागावं याचा .... आपल्या निकषांमध्ये बसणारी व्यक्ती शोधून घ्यायची की संपला विषय .

लेखातले काही विचार पटले आणि काही अजिबात पटले नाही ..

एक गोष्ट प्रकर्षाणे जाणवली आणि ती म्हणजे स्रीसुलभ भावना..
बहुतेक लेखिकेत ती कमी प्रमाणात असावी...

पोळया लाटायला कुणालाच इंटरेस्ट नसतो..खुपच बोरिंग काम आहे ते..
पण आपल्या पिल्लांना स्वःच्या हातच्या गरम पोळ्या खाऊ घालण्यात स्त्रीसुलभ/आईपणाची भावना असते आणि त्या भावनेतून आनंदच मिळतो म्हणून स्त्रिया ते काम करतात...

लेखिकेला बहुतेक क्लायंटला जागेचे करकरीत आराखडे देण्यात आनंद मिळत असेल...

सगळ्याच स्त्रियांना काही करियर करायचे नसते. घरच्यांना गरम खाऊ घातले तर काय हरकत आहे. एकदा मुलं झाले की त्यांना शक्य तितके व्यवस्थित देणे हे कर्तव्य आहे दोघांचेही. त्माझ्या मावस जावे कडे स्वैपाक ला बाई होती . जाऊ फक्त आराम करायची पण तरीही हिच्या पोटाच्या तक्रारी आणि अगदीच बारीक dr सांगितले स्वैपाक करणाऱ्या बाईचे नख तपासून बघा कणिक मळताना ती नाखातली घाण जाते अमेरिकेत आल्यापासून 15 मीच स्वैपाक करत आहे त्यामुळे qualified असून part timeजॉब करत आले. मला अजिबात वैषम्य वाटत नाही. करण मुलांचे संगोपन हे काम कमी आहे असे मला वाटले नाहीमुलगा मुलगी दोन्ही इथल्या मेडिकल आहे पण स्वतः अन्न तयार करतात आणि मुलीला स्वैपाकत विशेष आवड आहे.

मला हा लेख खूप पटला आणि आवडला पण. जेवण्या खाण्यामुळे खूप स्त्रियांचा पाय ओढला जातो . एक अनुभव सांगते. माझी एक जवळची मैत्रीण आहे इथे कॅनडात. नवरा बायको दोन मुलं. दोघेही उच्चशिक्षित ऊच्च पदावर मोठ्या कंपनीत. मैत्रिणीला २ आठवड्यासाठी कॅलिफोर्निया येथे जायचे होते. ती बिचारी १५ दिवसांचा स्वयंपाक करून मग गेली ट्रैनिंग साठी. कारण नवरा स्वयंपाक घरात कधीच जात नाही. आणि बाहेरचे पण चालत नाही.
I really felt bad for her. हेच जर नवरा गेला असता तर आरामात गेला असता. मी असे म्हणत नाही कि ज्यांना आवडते खाऊ पिऊ घालायला त्यांनी करावे. मला पण आवडते मुलांना चांगला चुंगलं खाऊ घालायला. पण एका स्त्रीला पण need a break.
माझ्या बहिणीची गोष्ट सांगते. ती इन्शुरन्स चे काम करते. तिच्या वेळा फिक्स्ड नसतात. ती सगळं स्वयंपाक करून जाते. पण घरी सासू सासरे वाढून पण घेत नाहीत, हिची येईपर्यंत वाट पाहत बसतात, सून आल्यावर वाढेल म्हणून. ती बाहेर असली कि pressure नि घरी पळत येते त्यांच्या जेवायच्या वेळेत. how frustrating!!म्हणजे एक पाय कायम घरात. कधी निवांत बिन्धास काम करताच येत नाही. कायम विचार मुलांनी जेवले असेल का? नवऱ्याने खाल्ले असेल का?
तेच माझे उदाहरण सांगते , माझा नवरा सगळा स्वयंपाक करू शकतो. mostly रोजचा मी करते. तो वीकएंड ला करतो. आता मी जॉब शोधत आहे. मला interview साठी कधी जायचे असेल तर नवरा घरून काम करतो, म्हणतो मी बघेल खायचं मुलांचं तू interview वर फोकस कर. मी बिन्धास जाऊ शकते. मुलं वेळेत जेवली का नाही याची चिंता राहत नाही. नवरा बायको एकमेकांचे सपोर्ट सिस्टिम हवेत. कोणा एकावर जास्त भार नको.

खूपच आवडलं. विचारांची आणि ते मांडण्यासाठी निवडलेल्या शब्दांची क्लॅरिटी एकदम जाणवलीच.
आपल्या आईचं काय जातं? ... सॉलिड

आयुष्यभर आजूबाजूल्या बघितलेलेल्या स्त्रियांनी अनुभवलेले प्रेशर व्यक्तीगत लेवलवर झुगारतांना, आपल्याला जखडू पाहणारी बंधनांची ही कारणं कुठून रूजली आहेत त्याची मुळाशी जाऊन समीक्षा (तुमच्या आमच्यासाठी हे चूक की बरोबर हा प्रश्न नाही) करतांना व्यक्त होण्याची ही प्रोसेस आहे हे लेखिकेने दोन दोनदा हे कॅथार्सिस आहे असं लिहूनही लेखिका ईतरांना काही प्रीच करते आहे असा समज अनेक वाचकांनी करून घेतला आहे ते अनाकलनीय आहे.

कोपर्‍यात बसून रडणे, मुझिक ऐकणे/वाजवणे, योगा करणे ह्यासारखी कॅथार्सिस ही व्यक्तीगत व्यक्त होण्याची प्रोसेस आहे त्यावर चर्चा समाज लेवलर किंवा लेखिकेचे खंडन न करता आपल्या व्यक्तीगत अनुभवातून करणे अपेक्षित आहे असे मला तरी वाटले.

आर्किटेक्ट असणे हे फक्त ती एक काय करते आणि त्यासाठी बाहेर पडावे लागते, वेळ द्यावा लागतो एवढ्यासाठी आहे. तसं तंत्रदृष्ट्या डेमक्रटिक किचन हे नावातल्या गमतीपुढे काही नसतं. किचनमध्ये आयुधं आणि त्यासाठीच्या जागा याचे स्थित्यंत्तर साठ सालानंतर झालेच आहे. सासू म्हणेल माझा पाटा वरवंटा, खलबत्ता, दादरा बांधलेल्या बरण्या, कल्हईची भांडी ठेव आणि सुनेचे नवीन मिक्सर वगैरे.
सर्वांसाठी सर्वांकडून यामध्ये नवीन विचार कोणता असू शकतो? 'हवी असलेली वस्तू कुणालाही सापडणे'; आणि घरात शाकाहारी आणि मासाहारी व्यक्ती असतील ( हे वाढले आहे) तर त्यांचीही सोय पाहणे. ते कदापी शक्य नाही. उदाहरणार्थ एकाच फ्रिजमध्ये दोन्ही पदार्थ ठेवलेले शाकाहारींंना चालत नाहीत. दुसरा फ्रीज?यावर उत्तर अपेक्षित आहे, स्त्रीवादावर नाही. म्हणजे लेखिकेची आर्थिक स्थिती वेगळी आहे. मोठी जागा.

कामासाठी बाहेर पडणे हे करणारी ती एक विशेष उदाहरण नाहीच. तसले लेख किर्लोस्कर वगैरे मासिकांत सत्तर साल दशकात येऊन त्याचा कीस पाडून झाला आहे. बाईला येण्यास उशीर होणार असल्यास रात्रीच्या जेवणाची व्यवस्था उरकण्यात ( स्वत: करून अथवा बाहेरून डबा आणून) तरबेज झाले आहेत. त्यातही नाविन्य नाहीच.
बाकी आता स्त्री पुरुष एकमेकाच्या चुका काढत नाहीतच उलट भरपूर कौतुक करत असतात चोहीकडे. ज्यांचं होत नाही त्यांनी वाईट वाटून घेऊ नये.
हा ट्रोल अजिबात नाहीये. लेखाच्या नावातल्या आर्किटेक्ट असणे याबद्दल अपेक्षा उंचावल्या. किचनमध्ये काय बदल केले आणि काय उपयोग झाला याची दोनचार डाजाइन्स टाकायला हवी होती. बाकी स्त्रीवाद, मुल्ये वगैरे चावून चोथा झालेला विषय आहे.
घरातला आनंदीआनंद एका स्त्रीमुळेच असतो हे कोणीही मान्य करेल.

Pages