माहिती हवी आहे.

Submitted by देवकी on 28 August, 2019 - 01:34

आज सकाळी लिहिलेले,एका फटक्यात डिलीट झाल्यामुळे परत आता लिहिते.

खरंतर कसं लिहू याबाबत दुविधा आहे.सुरुवात करते.
मीना,माझी नवीन कामवाली तिच्या नवर्‍याच्या प्रेमप्रकरणामुळे त्रस्त आहे.हे प्रकरण सुमारे ६-७ वर्षे जुने आहे.रोज त्यांचे फोन चालू असतात.व्हिडिओ कॉल करताना २ वेळा मीनाने पाहिले.तिने सासर-माहेर दोन्हीकडे सांगितले.आई म्हणाली धीर धर.गावच्या महिलामंडळात (तिचा शब्द) मीनाने तक्रार केली असता,तिला सल्ला मिळाला की पुरावे आण.नवर्‍याचा मोबाईल पासवर्ड तिला माहित नाही.त्यामुळे प्रेयसीबरोबरच्या व्हॉट्स अप संभाषणाचा स्र्कीनशॉट ती घेऊ शकत नाही.

गावच्या जातपंचायतीत तिने हे प्रकरण नेले असता, नवर्‍याने कानावर हात ठेवले. म्हणाला की हिलाच माझ्याबरोबर नांदायचे नाही म्हणून ही गावी रहाते,हिचेच काहीतरी लफडे असावे.पंचायतीत मुलाला खेचल्यामुळे सासरचे,हिच्यावर रागावले आहेत.दररोज रात्री १-२ वाजेपर्यंत याचे प्रेयसीबरोबर व्हॉट्स अप संभाषण असते.रोज फोन असतो.मीनाच्या मुलीने बापाच्या शेजारी राहून त्यांचे व्हॉ.अप्चे संभाषण वाचले आहे.नवरा आपल्या मुलांकडे लक्ष देत नाही किंवा घरखर्चासाठी पैसे देत नाही.

प्रेयसी, प्रेयसीच्या नवर्‍याला फोन केला असता हिलाच शिव्या मिळाल्या.मी तिला विचारले की तुला नेमके काय हवं आहे. तू नवर्‍याला काडीमोड देणार आहेस का? का वेगळी रहाणार? तर म्हणे सासरी घेणार नाहीत आणि माहेरी भावजय नंतर बोलेलंच.मनाविरुद्ध मी म्हटले, अग मग आहे ते चालू दे.दुर्लक्ष कर नाहीतरी तुझी आई म्हणतेच की धीर धर.तेव्हा मीना म्हनाली की मुंबईत अशा काही स्त्री संघटना आहेत का? ज्या माझ्या नवर्‍यावर दबाव आणून त्याचे मोबाइल रेकॉर्ड चेक करतील आणि त्याचा खोटेपणा उघडकीला आणतील.शिवाय तिच्यावरचे किटाळ दूर होईल.
मुलांना घेऊन ती वेगळी राहू शकणार नाही,लगेच नवरा आणि त्याची माणसे म्हणतील की आमची मुले आमच्याकडे हवीत.
मीनासारख्यांना काही मदत करणार्‍या संघटना आहेत का?असल्यास जरूर कळवा.आगाऊ धन्यवाद!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

देवकीताई, जास्त माहीत नाही पण शिवसेनेच्या निलम गोर्हेंची एक संस्था आहे जी अश्या गरजु स्त्रियांना मदत करते असे ऐकले होते. आमच्या ट्रेनच्या ग्रुपमध्ये एकजण आया (घरगुती नर्स) काम करत होती , तीने त्यांची मदत घेतली होती, नवरा चांगले आठवडाभर पोलिस कोठडीत गेला होता म्हणे तीचा त्यांच्या हस्तक्षेपामुळॅ, अन नंतर तीला निट वागवत पण होता, त्याचेपण कुणाशीतरी अफेअर होते.
पण ती आमच्यात जास्त दिवस नव्हती सो जास्त माहीती नाहीये. ऑनलाईन बघा अजुन काही माहिती मिळते का?

अजून तरी ,नवऱ्याशिवाय एकटी राहिलेली बाई म्हणजे सहज उपलब्ध समजलं जाते.परत ती ज्या क्लास मधून आली आहे तिथे असं मुलाना घेऊन एकटी रहाणे शक्य नाही.तसेच सासरची मंडळी मुलांना घेऊन जातील ही काळजी आहेच.

मीना अशा एका ठराविक केससाठी उपाय मलातरी सांगता येणार नाही.
त्या वर्गातल्या बऱ्याच स्त्रियांची अशीच कहाणी असते. तुम्ही लिहिलंय तसं "नवऱ्याशिवाय एकटी राहिलेली बाई म्हणजे सहज उपलब्ध समजलं जाते.परत ती ज्या क्लास मधून आली आहे तिथे असं मुलाना घेऊन एकटी रहाणे शक्य नाही."
हे सगळे पितृसत्ताक व्यवस्थेतून निर्माण झालेलं प्रॉब्लेम आहेत. ती जर मोडायची असेल तर उच्चवर्ण, वर्गातल्या स्त्रीपुरुषांकडे याची जबाबदारी जाते. बाकी काही नाही तरी कमीतकमी या कुटुंबपद्धतीचे गोडवे गाणं माध्यमातून बंद/कमी केलं तरी सध्या पुरेसे आहे.

मीनाचा नवरा तिला, मुलांना मारहाण करतोय का? किंवा दारू पिण्यासाठी, प्रेयसीवर उधळण्यासाठी तिच्याकडचे पैसे काढून घेतोय का?
तसे करत असेल तर वर VB, कबालीने सुचवले आहे तशा संघटनेतून मदत घ्यावी.
===

कदाचित अवांतर: राहुल गांधीने सुचवलेल्या न्याय योजनेचा फायदा मिनासारख्या बायकांना झाला असता असे मला वाटते.

मीनाला नक्की काय हवंय? तुम्ही जे लिहिलेय त्यावरून नवऱ्याचा खोटेपणा उघडा पाडायचा आणि आपल्यावरचे किटाळ दूर करायचे हा अजेंडा दिसतोय. ती गावी राहतेय असे तुम्ही म्हटले. यामुळे नवऱ्याला अप्रत्यक्षपणे मदत मिळतेय विना अडथळा लफडे करायला.

मीनाला मुलगी आहे हे वर आले. आईविना मुलीला सासरचे ठेऊन घेणार नाहीत, एवढे औदार्य मुलीच्या बाबतीत कोणी दाखवत नाही. मुलगा समज आलेल्या वयात असेल तर तो आईला सोडून बाबाकडे जाणार नाही. त्यामुळे सासरचे मुलांना ताब्यात घेऊन हिला बाहेर काढतील ही भीती अनाठायी आहे. माहेरी आधार कधीही मिळणार नाही.

मीना तुमच्याकडे सध्या काम करतेय तर ती अजून 2-3 घरी कामे करून त्या पैशात स्वतःचा वेगळा संसार थाटू शकते. अर्थात हे अतिशय कठीण आहे, हे करायचे तर मीना प्रचंड हिम्मतीची हवी. शिवाय सासरचे याचा अर्थ तिचे खरेच लफडे आहे व त्याच्या जोरावर ती वेगळी राहतेय असा लावतील. त्या सामाजिक स्तरात हे असले आरोप सामान्य आहेत.

वेगळे राहणे जमत नसेल तर 'माझ्या कुंकवाचा धनी' म्हणत नवऱ्यासोबत राहणे हाच पर्याय उरतो. नवऱ्याला उघडा पाडायचा प्रयत्न अंगलट येऊ शकतो. त्यातून प्रेयसीच्या नवऱ्याचे डोळे उघडले तर तो तिला घरातून घालवेल. मग ती ब्याद हिच्या घरात येऊन बसेल.

त्यामुळे सद्य स्थितीत तिला फारसे काही करता येईल असे वाटत नाही. परिस्थिती अनुकूल व्हायची वाट पहायची. अजून काय करणार?

त्यावरून नवऱ्याचा खोटेपणा उघडा पाडायचा आणि आपल्यावरचे किटाळ दूर करायचे हा अजेंडा दिसतोय.>>> हो हेच आहे सद्यातरी.ती गावी रहात नाही.माहेर सासर, गावाकडे असल्याने नवर्‍याचा बाहेरख्यालीपणा गावी पंचायतीत आणला.दोन्ही मुले लहान आहेत.१० - ८ वर्षांची.
ती अजून 2-3 घरी कामे करून त्या पैशात स्वतःचा वेगळा संसार थाटू शकते. अर्थात हे अतिशय कठीण आहे, हे करायचे तर मीना प्रचंड हिम्मतीची हवी. शिवाय सासरचे याचा अर्थ तिचे खरेच लफडे आहे व त्याच्या जोरावर ती वेगळी राहतेय असा लावतील. >>>>मीही तिला तेच सांगितले,पण त्याचबरोबर म्हटलेही मला सांगायला सोपे आहे.वेगळे रहाण्याला ती नाही म्हणाली .कारण सासरची माणसे नातवंडांना घेऊन जातील.
तिच्या भाषेत ,प्रेयसीला धडा शिकवायचा आहे म्हटल्यावर तिला झापले की बाई आपलंच नाणं खोट असल्यावर दुसरीला का दोष देतेस?
त्या सामाजिक स्तरात हे असले आरोप सामान्य आहेत. >>> नाही साधना! एकट्या बाईच्या बाबतीत सर्व स्तर समान असतात.असो.तुमचा प्रतिसाद नेहमीसारखा छान रोखठोक आहे.धन्स!

आणि नवर्‍याला काही बरे वाईट झाले तर? हॉस्पिटलचा खर्च अंगावर पडला तर? नवर्‍याला कळाले आणि त्याने पोलिस कंप्लेंट केली तर ?
चुकून मुलांच्या पोटात गेले तर?

भरत, तुम्ही मास्तर आहात हे सगळीकडेच दाखवलंच पाहिजे का? Light 1

देवकी, मला म्हणायचं आहे की मीनाने आधी स्वतः खंबीर रहावं. मन धीट करुन मग पुढचा विचार करावा.
तिला नवर्‍याला सोडायचं आहे का माफ करुन संसार टिकवायचा आहे हे ठरवुन तसं वागावं. सासरचे माहेरचे असं असं म्हणतील हा विचार करुन काय फायदा? साधना यांचा प्रतिसाद योग्य आहे.

Adv. अपर्णा रामतीर्थंकर यांना संपर्क साधा: YouTube वर त्यांचे अनेक व्हिडीओ उपलब्ध आहेत ज्यात त्या शेवटी त्यांचा संपर्क क्रमांक सांगतात.

मुख्य म्हणजे ह्या वादात तुम्ही पडू नका. तिला पण सांगा की ह्यात नवर्‍याच्या त्रास द्यायच्या मागे न पडता आपला लॉस काय आहे भावनिक शारिरिक तो मान्य करून ( स्वतःशी) जात पंच्यायत घरचे काही संबंध नाही. मुले हवी असल्यास त्याणंच्या बरोबर किंवा एकटीने घर सोडून (स्वतःची फिजिकल सेफ्टी सुरक्षितता सर्वात महत्वाची) . तर माहेरचा किंवा काही सपोर्ट असेल तर त्यांना मदतीस घेउन वेगळे घर थाटावे व मुलांबरोब्नर राहवे. घटस्पोटाची प्रक्रिया चालू करावी. ती व मुले ह्यांना जिवाला धोका होउ शकतो हे सीरेअसली लक्षात घेउन मगच पावले उचलावी. नातेवाइक अश्या परिस्थितीत नवर्‍या बरोबर राहुन तिच्यावर उलटतील. हा पळ पुटा विचार वाटू शकतो पण आई गेल्यास मुलांचे हाल होतील म्हणून तिथे फोकस करून आपले जीवन बिल्ड करावे. लैंगीक संबंधांची हवा डोक्यात गेलेल्या वयक्ती असा नको असलेला जोडिदार एलिमिनेट व्हावा म्हणून काहीही करू शकतात.

मुख्य म्हणजे ह्या वादात तुम्ही पडू नका. >>> अगदी खरें.पण ज्या फ्रस्ट्रेशन मधे ती होती त्यावेळी तिने आततायी विचार करण्यापेक्षा,काही मार्ग काढण्यासाठी इथे लिहिले.कालही तिला झटकले होतेच.आज बाई जरा सावरलीय.मीही तेच घिसेपीटे डॉय्लॉग मारले.'जाऊ दे,दुर्लक्ष कर, तुझे पैसे किती ते कधीच सांगू नको की जास्त देऊ नको" वगैरे वगैरे.
आज नवर्‍याचा मोबाईल फोडून आली आहे.म्हटले वेडी आहेस.तो दुसरा फोन घेईल.

आता पुढे काय करायचे ते करो.