भाग १ : जाना था जोशीमठ - औली पहुंच गए.......

Submitted by मंजूताई on 17 August, 2019 - 00:35

झालं असं की, या वर्षी लेक भारतात आल्यावर कुठेतरी जाऊ असं चाललं होतं, पण नक्की कुठे ते ठरत नव्हतं. जायला जमणार होतं तेवीस जून नंतरच. खूप धावपळ करायची नव्हती. चार दिवस एका ठिकाणी निवांत राहायचं होतं.

हिमालयात जायला हा बेस्ट सिझन! व्हॅली ऑफ फ्लाॅवर्सला जाताना औलीला धावती भेट दिली होती. अन् तिथल्या निसर्ग सौंदर्याच्या प्रेमातच पडले होते. परत इथे यायचं व निवांत राहायचं, असं दहा वर्षांपूर्वी मनाशी ठरवलं होतं, त्याला प्रत्यक्षात आणायचं ठरवलं. वेळ कमी होता. कुठेही गेलो असतो तरी परत पुण्याला येतान व्हाया नागपूरच यायचं होतं आणि तेही राजधानीनेच! विचार पक्का झाल्याबरोबर बेंगरुळू राजधानीचं चार जुलैचं तिकीट उपलब्ध होतं, ते करून टाकलं. लोकं जायची तारीख आधी ठरवतात आमची उलटी गंगा! KVNM मध्येच राहायचं हेही ठरलं होतं पण पुण्याच्या ऑफिसमध्ये बुकिंगला जाण्याआधी दोन बातम्या वाचण्यात आल्या. चारधाम यात्रेला अभूतपूर्व गर्दी व औलीमध्ये होऊ घातलेला दोनशे करोड रुपयांचा (दोनवर किती शून्य रे भाऊ?) एक लग्न समारंभ! आम्हाला गर्दीची ॲलर्जी आहे. काय करायचं?

भाचा नुकताच अल्मोड़ा, चौकोरी, मुन्सियारी जाऊन आला होता. त्याचे फोटो पाहिले अन् तिथल्या निसर्ग सौंदर्याने भुरळ घातली......
जोशीमठ की मुन्सियारी? दोन्ही ठिकाणी दिल्ली मार्गेच जावं लागतं त्यामुळे मुन्सियारीलाही गेलो तरी तिकीटाचा प्रश्न नव्हता. कॅन्सल करावं लागणार नव्हतं. KVNM च्या ऑफिसमध्ये जाऊन TRH बुकिंग करायला गेलो तर तिथल्या कर्मचाऱ्यांमध्येही शाही लग्नाची चर्चा सुरू होती.... तिथल्या पर्यावरणावर काय परिणाम होणार वै. वै. त्यामुळे त्यांनी आमच्या बदललेल्या बेताचं स्वागतच केलं. शताब्दीनेच प्रवास करायचा होता. येताना सोयीची नव्हती म्हणून जातानाच तिकीट घेतलं ती सकाळी सहाची त्यामुळे रात्री दीडची दिल्लीची फ्लाईट घ्यावी लागली. गंमत म्हणजे फक्त दहा दिवस आधी काढून व बरेच 'च' असून सुध्दा सगळी कन्फर्म तिकीटं मिळाली.
इतक्या ऐनवेळी ठरवून सुरुवात बिना अडथळ्यांची! अहो आश्चर्यम! असं कसं होऊ शकतं?

वारीमुळे बरेच रस्ते बंद होते तर बऱ्याच रस्त्यावर वाहतूक कोंडी. अडथळ्यांची शर्यत पार पाडत वेळेआधीच विमानतळावर पोचलो! हुश्श!
दिल्लीला पहाटे चारला पोचलो. मेट्रो पाच वाजता सुरू होतात. बस मात्र लगेचच मिळाली अन् बसायला जागाही. बऱ्याच ठिकाणी विकासाची (रस्ता बांधणी) कामं होताहेत त्यामुळं पहाटेची वेळ असूनही बराच वेळ लागला स्टेशन गाठायला. पहिल्यांदाच शताब्दीत बसणार होतो. ट्रेन छान व स्वच्छ होती. पाणी, पेपर, चहा, ज्यूस, ब्रेकफास्ट एका पाठोपाठ येत होतं... खाता-पिता केव्हा काठगोदाम आलं ते कळलंच नाही. साडेचार फुटी ड्रायव्हर विनोदजी थापा येऊन थांबलेलेच होते.

जे होतं ते चांगल्यासाठी. म्हणजे झालं असं की TRH चं बुकिंग आम्ही पुण्याच्या कुमांऊ पर्यटन विकास मंडळातून केलं. आमच्या बरोबर फिरायला येणाऱ्या उत्सुक मंडळींमध्ये बहीण, विहीण व मैत्रीण होत्या. त्यामुळे गाडी बुकिंग केलं नव्हतं. एकेकजण काही ना काही कारणाने गळत गेले अन् वेळेवर kvnm ची गाडी मिळाली नाही. भाचा ज्या ड्रायव्हरबरोबर गेला होता त्या विनोद थापाला फोन केला. सिझन संपत आला असल्याने विनोदजी लगेच तयार झाले. रेटबद्दल बोलायला गेलो तर म्हणाला, "बस,आप आ जाओ."
अरे बाबा, ते ठीकच आहे. येणार तर आहोत, पण व्यवहाराचं काहीतरी तर ठरवायला हवे ना!
त्याने सांगितलेला रेट ठीकच होता पण स्त्री धर्माला जागत विचारलंच...
परत तेच! "बस, आप आ जाओ! उन्नीस बीस कर देंगे !"
भैया, ये ये जगा देखना है... मध्येच थांबवत, त्याचं परत तेच घोषवाक्य "बस! आप आ जाओ! चिंता मत करो! आपको एैसी एैसी जगा घुमाऊंगा... आप थक जायेंगे लेकिन मैं नही थकुंगा... "

आम्ही रामपुरला पोचलो नाही तो त्याचा काठगोदामला पोचल्याचा फोन आला. गाडीत बसल्यावर त्याला सांगितलं कुठल्या कुठल्या TRH चं बुकिंग झाल्याचं व किती दिवसांच! दोन मिनीटात त्याने आयटरनी बनवून दिली.
"म्याडमजी, कोई जल्दबाजी नही आरामसे देखना, प्रक्रिती का आनंद लेते हुए चलेंगे... "
क्रमश:
https://www.maayboli.com/node/71089

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जोशीमठ ते औली केबल कार पण होती. मध्यंतरी काही अपघातामुळे बंद केली होती. आता परत सुरू केली असेल.

अमर, हर्पेन,शरद, स्वप्ना,देवकी,शैलजा,वावे,प्रविसगमनापासून धन्यवाद!
स्वप्ना, खूप डिटेलवार लिहीतेय... अगदी हाॅटेल्सच्या नावासकट. काही शंका असतील तर जरुर विचार.
शरद, जोशीमठ औली जवळ जवळच आहे. दहा वर्षापूर्वी केबलकारने गेलो होतो. औलीला जोशीमठहूनच जावे लागते. दुसरा भाग टाकलाय.

TRH म्हणजे काय?
मजा येते आहे वाचायला.
उन्हाळ्यात दार्जिलिंग ला गेल्यापासून,लवकरच पुढची हिमालय ट्रिप करायची असं ठरवलं आहे. बघूया जमतंय का? औली शाळा सुरू झाल्यावर सिझन! कधी ऑगस्ट मध्ये जोडून सुट्ट्या येतात तेव्हा प्लान करायला पाहिजे.