चांगुलपणा !

Submitted by झुलेलाल on 25 July, 2019 - 13:49

‘इंटरनेट’मुळे एक बरं झालंय. एखादा संदर्भ, एखादी गोष्ट, सहज सापडत नसेल, तर ‘सर्च इंजिन’वर जायचं. मग लगेच त्या शब्दाचे सारे संदर्भ समोर येऊन उभे राहतात.
थोडक्यात, ‘शोध सोपा झाला!’
हे माहीत असल्यामुळेच, हा लेख लिहिण्याआधी सहज एका सर्च इंजिनवर एक शब्द टाईप केला... ‘चांगुलपणा’!
शेकडो रिझल्टस समोर आले. पण पाहिजे तो संदर्भ त्यातून शोधण्यासाठीही खूपच मेहनत करावी लागली. इतकी, की इंटरनेटच्या सर्च इंजिनवरूनही चांगुलपणा हरवत चालला आहे की काय, अशी शंका येऊ लागली. काही संदर्भ आढळले. ‘आमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ नका’… ‘तुम्ही चांगुलपणा दाखवलात तरच आम्हीही चांगुलपणा दाखवू’ असे काही मथळे असलेला मजकूर मात्र लगेचच पुढे आला, आणि चांगुलपणा शोधावाच लागणार असे नक्की वाटू लागले.
तसा शोध सुरू असतानाच वर्तमानपत्राच्या कुठल्यातरी कोपऱ्यात एक बातमी दिसली, आणि चांगुलपणा जिवंत आहे, याची खात्री पटली. तो शोधावा लागत असला, तरी तो पूर्णपणे नष्ट झालेला नाही, त्याचे अस्तित्व भक्कम आहे, असेही जाणवू लागले.
मग त्या बातमीशी तुलना करणारे काही जुने प्रसंग, जुने अनुभवही मनात जागे होऊ लागले.
… लोकल गाडी स्टेशनवर थांबण्याआधी रिकामी झाली होती. मी मोबाईलमधले पुस्तक वाचत असल्याने मला स्टेशन आल्याचे जरा उशीराच लक्षात आले. फर्स्टक्लासचा तो डबा जवळपास रिकामा होता. समोरच्या बाकावर, माझ्यासारखाच, उशीरा लक्षात आलेला एकजण होता. मी उतरताना सहज वर बघितलं. एका चकचकीत कागदात पॅक केलेला बॉक्स असलेली प्लास्टिकची पिशवी कुणीतरी रॆंकवर विसरून गेला होता. मी बाजूच्या त्या माणसाला विचारलं.
'ये आपका है?'
त्याची नसल्यामुळे तातडीनं तो 'नाही' म्हणाला. पण लगेचच त्याचं लक्ष त्या पिशवीवर खिळलं.
मी उतरलो. मागे बघितलं.
तो माणूस डब्यात रेंगाळला होता.
थोडं पुढे जाऊन मी थांबून बघू लागलो.
तो माणूस उतरला, तेव्हा त्याच्या हातात ती पिशवी होती!
... बहुधा मी उतरायची किंवा मूळ मालक येतो की काय याची वाट पहात तो रेंगाळला होता.
तो फलाटावर उतरून चालू लागला, आणि काही अंतरावर उभा असलेल्या मला त्यानं पाहिलं. झटक्यात मागे वळून उलट्या दिशेनं झपाझप चालत तो दिसेनासा झाला होता!
... दुसऱ्या दिवशी वाचलेल्या एका बातमीमुळे तो प्रसंग पुन्हा आठवला.
पुण्याच्या एका भंगारवाल्यानं, हिराबागेतील एका उच्चभ्रू घरातलं एक जुनं कपाट विकत घेतलं.
ते विकून चार पैसे नफा मिळणार म्हणून तो खुश होता.
या धंद्यातून होणाऱ्या पाचसहा हजाराच्या कमाईतून त्याचं कुटुंब कसंबसं जगत होतं. बायको जेवणाचे डबे बनवून संसाराला हातभार लावायची, दोन मुलगे जमेल तशी मजुरी करायची. मुलगी शाळेत शिकत होती. खेळात नाव कमवायचं तिचं स्वप्न होतं.
तिच्या शिक्षणासाठी घेतलेलं कर्जही त्याच तुटपुंज्या कमाईतून तो नेमानं फेडत होता.
आपल्या वाटणीला आलेलं आयुष्य ते कुटुंब आनंदानं आणि प्रामाणिकपणाने जगत होतं.
ते कपाट विकून या वेळी हाताशी चार पैसे जास्त मिळणार होते.
त्यानं ते कपाट घरी आणलं, आणि विकण्याआधी स्वच्छ करण्याकरीता उघडलं. आत एक लॉकर होता. त्यानं तो उघडला.
एक जुनी पिशवी आत होती. त्यानं ती काढून उघडली, आणि त्याचे डोळे विस्फारले. नकळत दोन्ही हातांचे तळवे गालांवर आले.
काही वेळ फक्त तो त्या पिशवीत पाहात होता.
... आत सोन्याचे दागिने होते!
त्यानं भानावर येऊन पुन्हा पिशवी उचलली. जड होती. किलोभर तरी वजन होतं.
क्षणभरच, अनेक विचार मनात येऊन गेले.
आख्खं भविष्य एका सुखद वळणावर येऊन थांबल्याचा भासही त्याला झाला.
पुढचा क्षण त्याचं आयुष्य बदलण्यासाठी समोर हात जोडून जणू उभा होता.
त्यानं मिनिटभर डोळे मिटले, आणि लहानपणी आईवडिलांच्या तोंडून ऐकलेल्या संतांच्या गोष्टी त्याला आठवल्या. पंढरीच्या वारीला जाणारे वारकरी आठवले...
... आणि पिशवीला घट्ट गाठ मारून तो पुन्हा हिराबागेतील त्या घरी गेला.
दार वाजवून मालकाच्या -आपण त्यांना पेंडसे म्हणू- हाती त्यानं ती पिशवी सोपवली.
पेंडशांनी ती उघडली.
आता त्यांचे डोळे विस्फारले होते. तोंडाचा आ झाला होता. त्यांना काही बोलायलाच सुचत नव्हते. अचानक समोर उभं राहिलेलं हे भाग्य आपल्याच घरात भंगारात कितीतरी वर्ष पडून राहिलं होतं, हेही त्यांनादेखील माहीतच नव्हतं...
तो भंगारवाला समोर दरवाजात उभा होता. काहीच न बोलता.
काही वेळानं पेंडसे सावरले. पिशवी घेऊन आत गेले, आणि पुन्हा बाहेर आले.
त्यांच्या हातात पाचशेची नोट होती. ती त्यांनी भंगारवाल्याच्या हातावर ठेवली.
तो जरासा कचरलाच. त्याचा हात पुढे झालाच नाही. मग पेंडशांनी त्याच्या खांद्यावर थोपटलं!
'अरे, हे तुझ्या चांगुलपणाचं बक्षिस आहे! घे!' असं म्हणाले.
पाचशेची नोट घेऊन कपाळाला लावत त्यानं खिशात घातली आणि तो घरी आला.
त्या क्षणी त्याला अगदी हलकंहलकं, मोकळं वाटत होतं!
.... हा दुसरा प्रसंग.
दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात ती बातमी वाचली, आणि मला ट्रेनमधला प्रसंग आठवला.
मोहाचे क्षण टाळणं, भल्याभल्यांना जमत नाही.
चांगुलपणाच्या गप्पा सगळेच मारतात. पण असा एखादा क्षण समोर आलाच, तर कितीजण तो प्रत्यक्षात जगतील हे सांगणं कठीण असतं.
.... या दोन प्रसंगांतून ही दोन्ही उत्तरं मिळाली!
पुण्याच्या त्या गरीब भंगारवाल्याच्या चांगुलपणाला आणि श्रीमंतीला सलाम केलाच पाहिजे. कारण, चांगुलपणा आजकाल शोधावा लागतो, असे सगळेच म्हणतात. म्हणूनच, अशा चांगुलपणाची एखादीच घटना दुर्मीळ ठरते, आणि तिची बातमी होते. अशी बातमी कधीतरीच वर्तमानपत्राच्या एखाद्या कोपऱ्यात अवतरते, पण त्या दिवशी तीच सर्वाधिक वाचली जाते. कारण, चांगुलपणाविषयी समाजाच्या मनात आदर आहे. चांगुलपणाला गालबोट लावणाऱ्या घटनांबद्दल अजूनही तिटकारा व्यक्त होतो. म्हणूनच, सिनेमातल्या खलनायकाचाही प्रेक्षकांना राग येतो, आणि चांगुलपणाचा विजय झाला की हायसे वाटते...
चांगुलपणा ही मोठी वजनदार गोष्ट आहे. वाईटपणाच्या शेकडो गोष्टी आसपास सतत घडत असतानाही, चांगुलपणाची एखादीच गोष्ट त्या वाईट घटनांच्या दुःखावर फुंकर घालण्यास पुरेशी असते.
कारण चांगुपलणाचा कोपरा प्रत्येक मनामनात असतो. त्यावर एखाद्या घटनेची फुंकर बसली, की तो ताजा, टवटवीत होतो, आणि त्याचे झरे जिवंत होऊन पाझरू लागतात...
जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात, जिथे माणसं वावरतात, तिथे हे झरे जिवंत झाल्याचा अनुभव नेहमी येत असतो. ते झरे एवढे प्रवाही होतात, की जगाच्या थेट दुसऱ्या टोकावरही त्याचा ओलावा पोहोचून जातो, आणि चांगुलपणाच्या एखाद्या तरी घटनेची प्रतीक्षा करणाऱ्या मनांवर त्याचा शिडकावाही होतो.
चारपाच वर्षांपूर्वीची एक बातमी अशीच जगाच्या त्या टोकाकडून इथपर्यंत पोहोचली.
कॅनडामधील ओटावामध्ये एका शॉपिंग मॉलच्या परिसरात पन्नाशी उलटलेला एक इसम- स्कॉट मरे त्याचं नाव!- अगतिकपणे बसला होता. समोर एक फलक होता, ‘मी कॅन्सरग्रस्त आहे, मला उपचारासाठी मदत करा!’ पुढच्या दीडदोन तासांतच स्कॉटच्या वाडग्यात सुमारे शंभर डॉलर्स गोळा झाले होते. स्कॉटला मदत करणाऱ्यामध्ये ओटावा सिटिझन नावाच्या वर्तमानपत्राचा बातमीदारही होता. त्याने स्कॉटशी संवाद साधला. त्याची कहाणी समजून घेतली. चांगली सरकारी नोकरी करत असताना अचानक कधीतरी स्कॉटला कर्करोगाचे निदान झाले, आणि त्याचा आजाराशी संघर्ष सुरू झाला. कॅनडामध्ये रुग्णोपचाराचा खर्च सरकार करत असले तरी याच्याजवळची पुंजी संपतच आली होती. आता आपण जगलो नाही तर आपण पाळलेल्या मांजरीचे काय होणार, या चिंतेने स्कॉट अधिकच खंगत चालला. आपल्याजवळच्या पैशातून त्याने मांजरीसाठीचे खाद्य साठवून ठेवले. अशा आजारपणात तिचा सांभाळ करणे शक्य नाही असे लक्षात आल्यावर त्याने आपल्या मांजरीला एका देखभाल केंद्रात दाखल केले, आणि तिच्या जगण्यासाठीचा खर्च उभा करण्याच्या चिंतेने आजारी स्कॉटला पछाडले. मग त्याने भिक्षा मागण्याचा मार्ग पत्करला, आणि माणसांमधल्या चांगुलपणाचे झरे स्कॉटसाठी जिवंत झाले.
त्या दिवशी ओटावा सिटिझनच्या त्या बातमीदाराने स्कॉटची ही कथा आपल्या वर्तमानपत्रातून जगासमोर मांडली, आणि चांगुलपणाच्या ओझ्याखाली आजारी स्कॉट अक्षरशः दबून गेला. त्याच्यावर चहूबाजूंनी मदतीचा ओघ सुरू झाला, आणि चांगुलपणा जिवंत आहे, याची प्रचीती जगाला आली...
अशा अनेक कथा जगाच्या कानाकोपऱ्यातून कधी ना कधी ऐकायला, पाहायला मिळतात.
केवळ माणसाने माणसांसाठीच नव्हे, तर ज्या माणसांच्या विश्वासावर अन्य सजीव प्राणी आश्वस्त असतात, त्यांच्यासाठीदेखील माणसाच्या मनातील चांगुलपणाचे झरे कळत नकळत जिवंत होतात, आणि तो स्पर्श असंख्य मनांना सुखावून जातो...
अशा चांगुलपणामुळेच माणुसकीला अजूनही धुगधुगी आहे. म्हणूनच ती जगविण्यासाठी हालचाल केली पाहिजे.
भर पावसाळ्यात ओलाव्याने जडावलेल्या झाडांच्या फांद्या तुटून कोसळतात, झाडेही उन्मळून पडतात. त्यामुळे होणारी हानी हा निसर्गाचा दोष नाही. पण ही हानी टाळण्यासाठी, माणसांच्या सुरक्षिततेसाठी मुंबई महापालिकेकडून पावसाळयात झाडे अमानुषपणे छाटली जातात. अशा झाडांच्या आश्रयाने राहणाऱ्या पक्ष्यांची घरटी उध्वस्त होतात, आणि स्वत:स वाचवू न शकणारी असंख्य पिल्ले आकाशात भरारी मारण्याआधीच देवाघरी जातात...
माणसाच्या डोक्यावरील संकटाची टांगती तलवार दूर करताना, जगण्याच्या आशेने केवळ चिमुकल्या व केवळ परावलंबी मातापित्यांवर निर्भर असलेल्या पक्ष्यांच्या पिल्लांचा बळी घेतला जातो, हे त्यांच्या गावीही नसते.
पुण्याच्या भंगारवाल्याच्या बातमीतून, ओटाव्यातील स्कॉट मरेच्या बातमीतून, चांगुलपणा पणाला लावणाऱ्या माणुसकीचे जे दर्शन घडते, तसेच दर्शन अधूनमधून राजकारणाच्या बजबजपुरीतही घडून जाते, आणि खात्री पटते, चांगुलपणा जिवंत आहे!
दोनतीन वर्षांपूर्वी एका पावसाळ्यात मुंबई महापालिकेत त्याचे दर्शन असेच घडून गेले... वृक्षछाटणीचे काम शास्त्रोक्त पद्धतीनेच झाले पाहिजे व छाटणीआधी फांद्यांवरील घरटी तपासावीत अशी मागणी एका नगरसेवक महिलेने सभागृहाच्या बैठकीत केली. पक्ष्याचे घरटे नसेल तरच फांद्या छाटाव्यात असा अत्यंत महत्वाचा मुद्दा त्यांनी मांडला.
महापालिका प्रशासनाचा यावर काय प्रतिसाद होता ते त्या बातमीतून स्पष्ट झाले नाही, पण राजकारणाने लडबडलेल्या क्षेत्राच्या एका कोपऱ्यात कुठेतरी चांगुलपणा जिवंत आहे, याचा दिलासा या बातमीने नक्कीच दिला.
पक्ष्यांना वाचता आले असते, तर झाडाझाडावर, फांदीफांदीवर किलबिलाट करून त्यांनी त्या दिवशी नक्कीच आनंदोत्सव साजरा केला असता

Group content visibility: 
Use group defaults

लाखो रुपये किमतीचे दागिने प्रमाणिकपणे परत केल्यावर पाचशे रुपये बक्षिश!

आणि त्यातल्या रिऍक्शन आणि बॉडीलँग्वेज बघा ->
तो जरासा कचरलाच. त्याचा हात पुढे झालाच नाही. मग पेंडशांनी त्याच्या खांद्यावर थोपटलं!
पाचशेची नोट घेऊन कपाळाला लावत त्यानं खिशात घातली आणि तो घरी आला.
त्या क्षणी त्याला अगदी हलकंहलकं, मोकळं वाटत होतं!

Angry Angry

छान आहे लेख.
चांगुपलणाचा कोपरा प्रत्येक मनामनात असतो.>>>>> +१

मी भंगारवाल्याची बातमी वाचली आहे. कपाट मालक इतके कृतघ्न नव्हते. त्यांनी मोठी रक्कम देऊ केली होती. परंतु भंगारचा धंदा करणाऱ्या मनाने श्रीमंत असणाऱ्या व्यक्तीने बक्षीस घ्यायला नकार दिला होता.