गिरणु !

Submitted by मी-माझा on 13 June, 2019 - 02:56

गेला पाऊण महिना गिरणु आणि त्याच्या मित्रमंडळींमध्ये सुतकाचे वातावरण होते. निवडणुकीचा निकाल लागला आणि त्यात गिरणु व त्याच्या मित्रमंडळींच्या पक्षाचे पार वाटोळे झाले. पक्षाचा प्रचार प्रभावीपणे केला नाही असा आरोप होऊन आता लवकरच खायचे वांदे होणार या भीतीने सगळ्यांची बोबडी वळली होती.

गोणीया बांधी यांच्या मांडीवर बसलेला लहानगा फाऊल व ग्रीझलीवाल यांच्या भिंतीवरील (वेगवेगळ्या) तसबिरींना गिरणुने मनोभावे नमस्कार केला. फाउलने हळूच डोळा मारल्याचा त्याला उगाचच भास झाला.

"मुण्णा, ए मुण्णा", गिरणीचा वैतागलेला आवाज आला. गिरणी म्हणजे गिरणुची बायको, "ए गिरण्या SSS " गिरणी पुन्हा ओरडली.

"आलो आलो" म्हणत गिरणु धावत धावत हॉल मध्ये गेला.

गिरणी - आज चकाट्या पिटून झाल्या कि येताना वांगी घेऊन ये.
गिरणु - अरे पण जानू, गेले कित्येक महिने आपण रोज फक्त वांगीच खातोय.
गिरणीं - आता तुला तेव्हढीच एक भाजी चांगली बनवता येते त्याला मी काय करणार?
गिरणु - पण जानू, माझं ऐक, आपण बाकीच्या भाज्या ट्राय करायला पाहिजेत. एखादी भाजी नाही तर निदान मिक्स भाजी तरी....
गिरणी (बोलणं तोडत)- ठीक आहे, ५ वर्षांनी विचार करू.

दुसरी बायको करावी असा विचार गिरणुच्या मनात आला, पण मग तीन तीन लोकांचं जेवण बनवायला लागेल असा शहाणपणाचा विचार करून त्याने मूळ विचार झटकून टाकला.

हतबलतेने गिरणुने कापडी पिशवी उचलली नि वाटेला लागला. काका वडेवाल्यांच्या दुकानात गिरणुचा अड्डा जमायचा. काका वडेवाल्यांकडे काम करणारा भूरिराम गिरणुचा जिवलग मित्र. बुद्धीने यथातथा व किंचित वेडसर होता, पण गिरणुवर त्याचं फार प्रेम.

"आले आले ढगोबा आले" भूरिराम गिरणुला पाहून ओरडला. ते ऐकून काका वडेवाल्यांनी पावाला चटणी लावायला सुरुवात केली.
काकांना भावगीतांचा भारी शौक. त्यांच्या मोबाईलवर सुधीर फडकेंच्या गाण्याचं कडवं लागलं.

"निर्जीव उसासे वाऱ्यांचे.. आकाश फिकटल्या ताऱ्यांचे"....

"बंद करा ते गाणं" गिरणु ओरडला "बंद करा म्हणतो ना?" काका आधी आ वासून बघत राहिलें व मग त्यांनी गाणं बंद केलं.

काका - का रं गिरणु, काय झालं?
गिरणु - काय तुम्ही गाणी लावता यार? इथे निवडणुकीच्या निकालाने आधीच सगळं बोंबललंय. त्यात तुमची गाणी आम्हाला निवडणुकीत पडलेल्या उगवत्या ताऱ्याची आठवण करून देतात.
काका - ठिक हाय, नाय लावत, पण नक्की प्रॉब्लेम काय हाय?
गिरणु - एक असेल तर सांगेन, बायको घरी वांग्याशिवाय दुसरी भाजी बनवू देत नाही, निवडणुकीत आमचे प्रोग्रेस व बाप हे दोन्ही पक्ष नाकावर आपटले. आता आम्ही प्रचार केला नाही म्हणून आमचं दाणापाणी बंद होणार म्हणून हायकमांडच्या चमच्याने सांगितलंय.
काका (बेरकीपणाने अन्दाज घेत) - हे बघ, मी आता उधारीचं बोलत नाय, पण तुला काहीतरी कामधंदा करायला पायजे.
गिरणु - मला कोण काम देणार? त्यापेक्षा आहे ते काम पुढे कसं चालू ठेवता येईल ते बघायला पाहिजे.

मध्येच भुरीराम वर बघुन ओरडला "तो बघा ढग, आंब्यावाणी दिसतो !"

त्याच्याकडे दुर्लक्ष करून काका म्हणाले "आरं, हे राजकारणी इशय काय संपतात व्हय? कायतरी इशय तुलाबी मिळल, तोपर्यंत वडापाव खा"

गिरणुने वडापाव खाता खाता काकांकडे पाहिलं. सत्तरी पार करूनही माणसाची कुटील बुद्धी अजून शाबूत होती. काड्या घालण्याचा दांडगा अनुभव त्यांच्यापाशी होता.त्यांच्याकडूनच काहीतरी आयडिया काढूया असे गिरणुने मनोमन ठरवले. शेवटी, गिरणुची राजकारणाशी ओळखही काकांच्याच अड्ड्यावर झाली होती.

गिरणु - काका, आता तुम्हीच काहीतरी आयडिया काढा कि.
काका - म्या काय रं आयडिया काढणार?. बघू इचार करतो.

थोड्या वेळाने काकांचा चेहेरा प्रफुल्लित झाला.

काका - गिरणु , काल हिथं निवडणूक आयोगाची दोन मानस वडा खायला आलेली. त्यातलं एक बेणं पार वैतागलेलं. म्हणत हुतं "कधी संपणार काम देव जाणे, आता आकडे जुळत नाहीत म्हणून लोक बोंबलत आहेत, च्यायला एवढं इमानदारीने काम करूनसुद्धा हि गत".

गिरणुने कान टवकारले.

काका - म्या काय म्हंतो. तूबी जरा आकडे-बीकडे बघ आणि काय चूक गावली कि निवडणूक गंडली म्हणून बोंबाबोंब कर. भुरीरामला बी घे संगतीनं . त्यो वरडण्यात वस्ताद हाय. समोरचं कायबी बोलूदे, त्यो त्याला शिकवलेलंच बोलनार. मग पुढचं सा महिने तुला दुसरं काम बघायची गरज नाय.

आणि मोबाईलवरच गाणं पुन्हा सुरु करून काका त्यांच्या कामाला लागले.

गिरणु विचारात पडला. पक्षाच्या वतीने मिळालेलं फुकटच इंटरनेट अजून चालू होत. त्यावर पटापटा तो लिंका उघडून बघायला लागला. मतांच्या संख्येत खिजगणतीतही नसलेल्या कुठल्याश्या उमेदवाराने गणितात गुण दाखवून मतांच्या संख्येतली तफावत दाखवून दिली होती. आपल्या बिनडोक नेत्यांपेक्षा असल्या शिकलेल्या नेत्यांची देशाला गरज आहे असा उदात्त विचार क्षणभर गिरणुच्या मनात आला, पण मग खायचे वांदे होतील या विचाराने त्यावर मात केली.

असो आता रान उठवायला नवीन विषय मिळाला होता, आता नवीन नवीन लिंका मिळवून लोकांना पाठवायच्या नि त्यांना गोंधळात पाडायचं.. त्यावर पुढचे ६ महिने सहज ढकलता येतील असा विचार करून गिरणु वांगी घ्यायला भाजीवाल्याकडे निघाला.

गाणं संपत होतं..
"संजीवन मिळता आशेचे, निमिषात पुन्हा जग सावरले.. किमया असली का केली कुणी?"

आणि काका फोनवर बोलत होते " काळजी करू नका सायेब. पोरास्नी कामाला लावलंय"

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारी!

नन्तर गिरणू डीजे च्या तालावर पकोडे खात खात आरारारा गाण्यावर नाचायला लागला असेल!

जरा उशीरच झालाय.. पण प्रोत्साहन देणाऱ्या सगळ्यांचे हार्दिक धन्यवाद...

बादवे , गिरणू ने आता गाढवाचा जन्म घेतलाय... आता तो ऑफबीट रेकेल !