©दिविजा

Submitted by onlynit26 on 11 June, 2019 - 01:36

©दिविजा

" विराज, पत्रिका पाठवल्या का रे?"
" हो आई सगळ्यांना व्हाट्सअप्प केल्या."
" मलाही पाठवून ठेव, महीला ग्रुपवर पाठवायला."
" आई , मला हे पटत नाहीये गं, आता या वयात माझा बारसं करतेस ते."
" तू गप्प बस, तू लहानपणी सारखा बोलायचास की माझा बारसं झालं नाही, तेव्हा परिस्थितीमुळे नाही जमले रे म्हणून आता तुझी इच्छा पूरी करणार आहे."
यावर विराज काही न बोलता कामाला लागला. किर्तीला हसताना पाहून तो अजूनच शरमला.
विराज आणि किर्तीचे आठ दिवसापूर्वीच बडोद्याला लग्न झाले होते. त्यानंतर ते सर्वजण पुण्याला परतले होते. पुण्याला आल्या आल्या प्रमिलाजींनी वेगळाच थाट मांडला होता. कुलदैवताचे दर्शन झाल्यावर विराजचं बारसं करायची घोषणा केली तेव्हा साऱ्यान्याच आश्चर्य वाटले. प्रमिलाजींसमोर बोलायची कोणाची हिंमत नव्हती. किर्तीला हसूच आवरत नव्हते.
जेव्हा सर्वांना आमंत्रणे गेली तेव्हा नातलग आणि मित्रपरिवारात एकच खळबळ उडाली. घरातील सगळ्यांनाच फोन येऊ लागले. विराज आणि वसंतराव यांनी आपले फोन बंद करून ठेवले. पाहूणे-सोयरे संशयितपणे विचारू लागले. शेजारच्या काकू दोन तीन वेळा घरी फेरी मारून गेल्या. प्रमिलाजी कडक स्वभावाच्या असल्याने त्यांना थेट कोणी विचारले नाही. आमंत्रित मात्र पत्रिकेत लिहिलेल्या ' नवीन बाळाच्या बारश्याला यायचे हं' या शब्दांचा अर्थ काढत बसले. लोकांना विचार पडला 'नवीन बाळ' कुठून आले? प्रमिलाजींनी एखादे बाळ दत्तक घेतले असावे असा समज करत लोकं कुजबूजत राहीली.

बारश्याचा दिवस उजाडला. विराज खूपच टेंशनमध्ये होता. किर्ती मात्र त्याला चिडवून हैराण करत होती. बारसं घरीच असल्याने सजावटीसाठी प्रमिलाजी खास लक्ष देत होत्या. वसंतराव आपल्या सूनेसोबत बाकीच्या तयारीला लागले होते. विनिताही आपल्या छोट्या मुलासोबत आली.
" बरं झालं माझं बारसं लहानपणी झालं, नाहीतर आज पाळण्यात झोपावे लागले असते " तिने आल्या आल्या विराजला चिडवायला सुरुवात केली.
" ताई , एका बाळाच्या बारशाला पाळणा नाही आहे काही, चांगला मोठा झोपाळा आणलाय" असे बोलून किर्ती हसू लागली.

हळूहळू पै पाहुणे ,शेजारी यायला सुरुवात झाली. हळू आवाजात साउंड सिस्टीम पण लावली गेली. आमंत्रित लोकांना बाळ मात्र कुठे दिसत नव्हते. विराज तयार झाला. त्याला लग्नातही एवढी धाकधूक वाटली नव्हती तेवढी आज वाटत होती. सगळी तयारी झाली. मुख्य हॉलमधे प्रवेश करताना प्रमिलाजी विराजच्या कानात काहीतरी पुटपुटल्या. त्याचवेळी विराजचा चेहरा आनंदाने फुलून गेला. भीती आणि लाजेचे सावट दूर सरले.
"विराज आपल्या बाळाला आण." असे प्रमिलाजीनी म्हणाल्याबरोबर विराजने मोरपंखी साडी नेसलेल्या किर्तीला अलगद उचलले. तिला काहीच समजेना. हळूहळू तो तिला हॉलमध्ये सजलेल्या झोपाळ्याकडे घेऊन जाऊ लागला.
" विराज काय करताय हे?"
" विशेष काही नाही, बाळाला उचलून घेतलंय."
उपस्थित लोकांना काहीच कळत नव्हते. वसंतराव आणि विनिता बघतच राहीले. विराजने किर्तीला झोपाळ्यात आणून बसवले. ती लाजेने चूर झाली होती.
प्रमिलाजी आपल्याकडे माईक घेत बोलू लागल्या.
" तुम्हाला हे सारं बघून आश्चर्य वाटले असेल. मी जेव्हा पहिल्यांदा आई झाले तेव्हा माझं वय पंचवीस होते. मातृत्वाचे क्षण अनुभवत असतानाच विराजच्या जन्माने मी अठ्ठाविसाव्या वर्षी दुसऱ्यांदा आई झाले आणि आज वयाच्या पंचावन्नाव्या वर्षी तिसऱ्यांदा आई झाली आहे. त्याच बाळाचे आज नामकरण होणार आहे." त्या किर्तीकडे हात दाखवत म्हणाल्या.
सगळेजण प्रमिलाजींच्या बोलण्याने अचंबित झाले. आजपर्यंत कोणी आपल्या सुनेचा बारसं केलं नसेल. लग्नानंतर मुलीचे नाव बदलण्याच्या पारंपारिक विधीला एका चांगल्या विचाराची जोड देऊन प्रमिलाजी एक आदर्श पायंडा घालू पाहत होत्या. जमलेले लोक त्यांचे पुढचे बोलणे ऐकू लागले.
" लग्न लागल्यानंतर किर्ती जेव्हा आईच्या गळ्यात पडून रडत होती. तेव्हा त्यांच्यातील बोलणे मी ऐकलेय. माझ्या कडक स्वभावामुळे लग्नानंतर आपल्या मुलीचे सासरी कसं होईल? तिला नीट नांदवतील का? तिला काही त्रास तर होणार नाही ना? असे अनेक प्रश्न त्या माऊलीच्या आसवात होते. किंबहुना प्रत्येक मुलीच्या आई-वडीलांच्या मनात अशी काळजी दाटलेली असते. त्याचवेळी मी ठरवले. किर्तीला आपली मुलगी म्हणून वागवायचे. सासूबाईचा हक्क तर सगळेच गाजवतात , म्हटलं सूनेची आई होऊन बघू आणि नव्या घरी बावरलेल्या या बाळाचे बोट पकडून तर बघू." त्यांना पुढे काही बोलता येत नव्हते. किर्ती केव्हाच प्रमिलाजींच्या कुशीत शिरली होती. हा कौतुक सोहळा अहमदाबादवरून तिचे आई वडील व्हिडीओ कॉलवरून पाहत होते. प्रमिलाजी आपल्या द्वितीय कन्येच्या डोळ्यातील कौतुक मिश्रीत भाव निरखित होत्या...
इथे विराज ताटातील तांदुळात 'दिविजा'हे मघाशी आईने कानात सांगितलेलं नाव कोरत होता.

समाप्त..

© या कथेचे सर्व हक्क लेखकास्वाधीन आहेत. लेखकाच्या नावासहीत ही पोस्ट शेअर करायला हरकत नाही. तसे न झाल्यास कायदेशीर कारवाई अनिवार्य आहे.
-------------------------------------------------------
लेखक - नितीन दशरथ राणे.
सातरल - कणकवली
सध्या वास्तव्य - डोंबिवली (ठाणे )
मोबाईल नं. ९००४६०२७६८
दिनांक - ०१.०६.२०१९

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

किती किती किती तो मेलोड्रामा!
इतकंही गोड गोड कृत्रिम लिहू नका, कि वाचतानाही कसनुसं होईल.
पण मराठी पांचट सिरीयल चांगली लिहाल तुम्ही...

कथा म्हणून चांगली आहे Happy
पण असं न सांगता नाव/ओळख जाहीररीत्या बदललेली नाही आवडणार काही मुलींना, हे मा वै म
कथेतल्या सासूबाईंचं हे वागणं मला show off वाटलं.

Awara! Kahihi.
She already has a name for God's sake..
And she also has a mom...

काहीच्या काही!!!
एक तर न विचारता नाव बदलायचे हाच प्रकार होपलेस आहे!! त्यातून असा सोहळा वगैरे डबल होपलेस!!!
धन्य ती सासू आणि धन्य ती सून!! कथा म्हणून सुद्धा वाचायला नाही आवडलं!

इथे कीर्ती आनंदी आहे, तिला हा सोहळा आवडलेला आहे. तिला या सगळ्याचं कौतुक आहे. त्यामुळे ती पोरगी पार सासूच्या कुशीत शिरली, त्यामुळे हे सगळं कीर्तीच्या मनाविरोधात होतं आहे असं वाटतं नाही. प्रमिलाजी यांचा हेतू कपटी वाटतं नाही. आता या कथेमुळे लोक सुनेचं बारसं करायला लागतील अन भारतीय समाजावर दुष्परिणाम होतील आणि असं काही झालं तर त्याला फक्त हा लेखकच जबाबदार आहे, असं वाटतं नाही.

नितीन राणे साधं, सोपं, सरळ, थेट लिहितात, आता ही त्यांची लेखनशैली काहींना आवडेल किंवा आवडणार नाही. पण म्हणून आपण लेखनशैलीला नावं ठेवतो का कथेतील पात्राला? यावर विचार व्हायला हवा.

बाकी ही कथा आहे, उद्या प्रमिलाजी कीर्तीचा खून करतील नाहीतर तिचे पाय चेपून देतील, वाचकांच्या मनासारखं कथेतील पात्रं वागू शकत नाही. माझ्या मनासारखं कथेतलं पात्र वागलं नाही, म्हणून कथाच भंगार, म्हणून मी लेखकाला नावं ठेवत बसणार नाही.

प्रतिक्रिया देणार नव्हतो, पण इतका व्देष बघून राहवलं नाही.

अहो चैतन्य द्वेष वगैरे काही नाहीए. फक्त आवडले नाही, पटले नाही ईतकच सांगतायेत सगळे. onlynit छानच लिहितात. या वेळी आवडले नाही इतकच.

पण इतका व्देष बघून राहवलं नाही
नवीन Submitted by चैतन्य रासकर +१११

हल्ली मायबोलीवर कंपू बाजीला उधाण आलंय, त्यामुळे इकडे यावेसे सुद्धा वाटत नाही. पण काही लेखक आहेत हाब, नितिन इत्यादीसारखे जेन्युइन आयडी आणि ओरिजिनल लिखाण असलेले त्याना वाचायला यावे तर पुन्हा तेच सर्व प्रकार Sad
लिखाण नाही आवडले तर डायरेक्ट व्यक्तिला टारगेट करत काहीही बोलायचे हे दुर्दैवाने आता सवयीचे होवून बसलंय !

@चैतन्य रासकर - त्या 'द्वेषजनक' प्रतिसाद देणाऱ्या मंडळीत माझाही समावेश आहे, असं समजून लिहिते. नसल्यास प्रतिसाद अस्थानी समजावा!

बाकी ही कथा आहे, उद्या प्रमिलाजी कीर्तीचा खून करतील नाहीतर तिचे पाय चेपून देतील, वाचकांच्या मनासारखं कथेतील पात्रं वागू शकत नाही. माझ्या मनासारखं कथेतलं पात्र वागलं नाही, म्हणून कथाच भंगार, म्हणून मी लेखकाला नावं ठेवत बसणार नाही!

याला मी लेखनस्वातंत्र्य म्हणेन. कुणाला काहीही वाटलं तो लिहू शकतो. कुणाला काहीबाही वाटलं, तेही तो लिहू शकतो. वाचकांच्या स्वातंत्र्याचं काय? जर समजा वाचकांनी फक्त चांगल्या प्रतिक्रिया द्याव्यात असं लेखकाला वाटत असेल, तर ते डिस्क्लेमर तो टाकू शकतो, तसं काहीही टाकलेलं नाहीये. माझ्या मते नितीन सगळ्या प्रतिक्रियांच स्वागतच करतील किंवा यथोचित उत्तरही देतील. उगाच कुणा दुसऱ्याने कुणा तिसऱ्याला छिद्रांवेशी, कथाद्वेषी म्हणून ठरवू नये.
माझ्यासाठी प्रॉब्लेम तरी लेखनशैलीचा नाहीये, कारण मी यापूर्वी यांची एकही कथा वाचलेली मला आठवत नाही. (एखादी चुकून वाचलेली असावी तर आगाऊ क्षमस्व. इथे काही मंडळी लगेच खोदकामाला लागतील नाहीतर.)

आता या कथेमुळे लोक सुनेचं बारसं करायला लागतील अन भारतीय समाजावर दुष्परिणाम होतील आणि असं काही झालं तर त्याला फक्त हा लेखकच जबाबदार आहे, असं वाटतं नाही

उपरोधिक टोला कळला, आणि आवडलाही. खिक्क झालं वाचून, पण या असल्या उपरोधानेच ही असली काही थेरे किती भंपक वाटतात हे जास्त अधोरेखित होतं.

आमच्या मनासारखी पात्रे कथेत वागली नाहीत तरी चालेल, पण मनासारखे प्रतिसाद देण्याचा हक्क आहेच. तो हक्क जर नसेल, तर लेखकाने कथा फक्त वाचनमात्र ठिकाणी टाकावी. नितीन यांनी ही कथा मायबोली, फेसबुक किंवा मुक्तपीठ वगैरे ठिकाणी टाकली, तर तिथे प्रतिसाद येतीलच हे भान राखूनच टाकली असावी.

बाय द वे, मागे काही महिन्यांपूर्वी, खरोखर इथल्याच एका अतिशय चांगल लिहिणाऱ्या आयडी ची एकच आयडी अनेक अवतार घेऊन यथेच्छ टिंगल करत होता, तेव्हा चैतन्य तुमचा प्रतिसाद नाही दिसला.

की द्वेष होत असताना न राहवण व्यक्तीसापेक्ष असतं?

@onlynit26 - तुमच्या कथा चांगल्या असतात, पण माफ करा, ही कथा बिलकुल आवडली नाही.
पुढील कथेच्या प्रतीक्षेत!

मला ट्विस्ट आवडला. असं होऊच शकत नाही असे काही लोकांना वाटते. पण नवीन कल्पना सुचुन त्यावर कथानक फुलवणे खायचं काम नाही. तसं तर हालिवूड, नेट फ्लिक्स वरील काल्पनिक कथानकाची स्तुती करताना जीभ थकत नाही यांची.

onlynit26 हे मायबोलीवरच्या माझ्या आवडत्या लेखकांपैकी एक आहेत. ही कथा आवडली नाही असा प्रतिसाद देण्यात द्वेष वगैरे काही नाहीये.

पण असं न सांगता नाव/ओळख जाहीररीत्या बदललेली नाही आवडणार काही मुलींना, हे मा वै म>> काही मुलींना काय, कोणालाच आवडणार नाही.
लेखक आणि वाचक या दोघांनाही स्वातंत्र्य आहे. लेखक त्याला जे हवे ते लिहू शकतो आणि वाचक त्यांना ज्या वाटल्या त्या प्रतिक्रिया देऊ शकतात Happy

वावे + १

चैतन्य रासकर यांनी सदर लेखकांच्या इतर कथेवरील प्रतिसाद पाहावेत. मायबोलीकरांनी कौतुकच केलंय त्या कथा व्यवस्थित आणि चांगल्या असल्याने. उगाच काय द्वेष वगैरे !!

कथा ठीक, पण सुनेला न विचारता तिचं नाव का बदलायचं? सासू असो किंवा नवरा , स्वतःचं नाव बदलायचा अधिकार फक्त त्या मुलीलाच असला पाहिजे ...

एकुणात काय स्त्री मुक्ती जिंदाबाद.‌ काही दिवसांनी म्हणणार नवऱ्यांचच नाव बदललं पाहिजे. __/\__.

चैतन्य रासकर तुम्हला द्वेष कुठे दिसला प्रतिसादांत?
आवडले नाही, पटले नाही असंच लिहिलंय सगळ्यांनी.
सगळ्या आधी मी स्वतः प्रतिसाद लिहिला होता. अगदी पहिला.
पण आता कुणाच्या लेखाच्या काही विरोधी लिहायचं म्हणजे आपल्या विरोधात एक्स्ट्रा २०-२५ पोस्टी वाचायची तयारी ठेवावी लागते म्हणुन मी तो खोडला. Lol
पण मी ही अगदी सेम टु सेम किल्ली ने लिहिलंय त्याच अर्थाचा प्रतिसाद लिहिला होता.

या कथेला झालेला आक्षेप, माह्या मनावर झाला. त्यामुळे या सगळ्यावर काम सोडून, फार विचार केला, अजूनही करत आहे, कदाचित हा विचार अथांग असेल पण त्यात मला बुडायचं नाही.
यावर रुसून बसून, माझं मतं कुरवाळायचं नसून, हा धागा उसवू नये म्हणून पहिल्या प्रतिक्रियेतला व्देष हा शब्द मागे घेतो.

@onlynit कथेत केला गेलेला विचार चांगला आहे.माफ करा पण तुमच्या बाकिच्या कथांसारखी हि कथा इतकी प्रभावी नाही वाटली.
पु.ले.शु! Happy

कुणी काही लिहो. पण दिविजा हे नाव मी प्रथमच वाचले. खूप सुंदर नाव आहे. मला नात झाली तर हेच नाव ठेवीन मी.

Pages