'भारत'... मान ना मान, मै तेरा सलमान!

Submitted by टोच्या on 9 June, 2019 - 07:39

(सूचना- हे परीक्षण नाही. सिनेमा पाहून मला काय वाटले ते लिहिले आहे. सलमानच्या पंख्यांनी वाचले नाही तरी चालेल.)
रणबीर कपूरने संजू केला त्यात रणबीर कुठेच दिसला नाही. आमिरच्या दंगलमध्ये आमिर नव्हे तर महावीर फोगटच दिसत होते. धोनी सिनेमात सुशांतसिंह राजपूत नव्हे तर जणू प्रत्यक्ष धोनीच खेळत होता. ही या कलाकारांच्या अभिनयाची कमाल. पण, सलमानचा कुठलाही सिनेमा पहा, तो सलमानच असतो. तो म्हातारा झाला तरी सलमान असतो, तो तरुण दाखवला तरी सलमान असतो. तो रडला तरी सलमान, हसला तरी सलमान आणि नाचला तरी सलमान. त्याने दाढी लावली काय, न लावली काय, मिशी वाढवली किंवा सफाचक असला…तो सलमानच असतो. सलमान आणि सिनेमात अभिनय नावाचा प्रकार कुठे आड येत नाही, हे विशेष. भारत पाहिला. म्हटलं काहीतरी असेल वेगळं... पण कसचं काय... सलमान... सलमान... सलमान. सलमानच्या लार्जर दॅन लाइफ इमेजसाठी मूळ कोरियन कथेची वाट लावली. खरंतर इंटरव्हल होतो तिथेच सिनेमा संपला असं वाटतं.. तो तिथेच संपवला असता तर योग्य ठरला असता. नंतरचं भलंमोठं ठिगळ उगाच ओढून ताणून जोडल्यासारखं वाटतं. दिग्दर्शकाला सुचतील तसे प्रसंग चित्रीत केलेत असं वाटत राहतं. अटारी सीमेवरचे दृश्य तर बजरंगी भाईजानच्या वेळीच शूट करून ठेवलं होतं की काय, अशी शंका घ्यायला जागा आहे. प्रेक्षक इतके कंटाळतात की आता तरी सिनेमा संपेल असं वाटत राहतं... बरं क्लायमॅक्सला काहीतरी जबरदस्त होईल, अशीही एक अपेक्षा असते... पण कसचं काय??? सगळंच मुसळ केरात... एका ठिकाणी तर सिनेमा संपला म्हणून प्रेक्षक उभे बाहेर पडायची वाट पाहतात, पण नंतरही दहा-पंधरा तो रटाळपणे सुरू राहतो. सिनेमात चुकीच्या ठिकाणी विनोदनिर्मितीसाठी अचानक सुरू होणारे राष्ट्रगीत हा अगदी चीड आणणारा प्रकार. अचानक राष्ट्रगीत सुरू झाल्याने उभे रहावे की न रहावे या गोंधळात प्रेक्षक असतात. एखादे कडवे असेल असे वाटते, पण पूर्ण राष्ट्रगीत वाजवले जाते. ९०च्या दशकात झी टीव्हीचा लोगो वेगळा होता, पण सिनेमात झी टीव्हीचा लोगो आता दोन वर्षांपूर्वी बदललेला दाखवण्यात आलाय. अशा अनेक बाबी कालसुसंगत वाटत नाहीत. अभिनयात सलमान हा सलमानच वाटतो, भूमिकेत शिरतच नाही. कोणता सत्तर वर्षांचा म्हातारा पाच सहा गुंडांची धुलाई करेल... पण सलमान करतो. या म्हाताऱ्या सलमानचा शर्ट अचानक वाऱ्याने वा पाण्याने फाटून पुन्हा तो सत्तरीतील सिक्स पॅक दाखवितो की काय, अशी प्रेक्षकांना साधार भीती वाटत असते. (आठवा बॉडीगार्ड, दबंग वगैरे…) पण प्रेक्षकांच्या सुदैवाने तसे काही होत नाही. सुनील ग्रोव्हर चांगला अभिनेता आहे आणि प्रत्येक फ्रेममध्ये तो सलमानबरोबर आहे. कतरिना ठीकठाक. सलमान आणि तब्बूपेक्षा कमी वयाची सोनाली कुलकर्णी त्यांची आई शोभत नाही. चँग, आसिफ शेख यांना फारसा वाव नाही. जॅकी श्रॉफ, तब्बू यांचे रोल पाहुण्या कलाकारासारखे आहेत. तब्बूचं नाव सिनेमात गुडिया आहे, पण तिच्या सुरकुतलेल्या चेहऱ्याकडे पाहून मला ते उगाच ‘बुढिया’ असं ऐकू येत होतं. सिनेमाचं नाव भारत सोडून काहीही असतं तरी फरक पडला नसता. पण, सिनेमा चालण्यासाठीचा तो एक भावनिक जुमला आहे. असो...

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सलमान हैं तो स्टोरीबीन पिक्चर मूनकिन है ।

कोणता सत्तर वर्षांचा म्हातारा पाच सहा गुंडांची धुलाई करेल... पण सलमान करतो. ---- कमल हसनला विसरलात की (डबल रोलपैकी म्हातारा कल्लरी पायटु एक्सपर्ट कमल हसन) ! तो पण असाच देशभक्तीपर जुमला नाव असलेला काहीतरी होता पिक्चर

राहुल बावनकुळे धन्यवाद

वीक्ष्य
<कमल हसनला विसरलात की (डबल रोलपैकी म्हातारा कल्लरी पायटु एक्सपर्ट कमल हसन) ! तो पण असाच देशभक्तीपर जुमला नाव असलेला काहीतरी होता पिक्चर>> तिथे लॉजिक होतं आणि ती अतिशयोक्ती वाटत नाही. कारण कमल हसनकडे ती मर्मकला असते. येथे आख्ख्या सिनेमात मच्छरही न मारणारा सलमान म्हातारपणी फायटिंग करतो.

आशुचँप
<डेरिंग आहे, असले चित्रपट बघू शकता>
भारत नावावरून वाटलं काही वेगळं असेल.

महाश्वेता
<फक्त सलमान आवडत नाही, तर ओके.
चित्रपटाविषयी नंतर लिहिते.>
सलमान आवडत नाही असे नाही. बजरंगी भाईजानमध्ये त्याचा अभिनय चांगला होता. तसे असते तर सिनेमा पहायला गेलो नसतो. तसंही लोकांना तो असाच आवडतो त्यामुळे तो काही वेगळे प्रयोग करण्याची शक्यता नाही.

येथे आख्ख्या सिनेमात मच्छरही न मारणारा सलमान म्हातारपणी फायटिंग करतो.--- ओह्ह Lol ऐसा है तो फुल कॉमेडी पिक्चर होयेंगा यह तो ।
अजुन पाहिला नाही आणि सर्व प्रतिसाद अन् स्पष्टीकरण पाहता बहुतेक न पाहिलेलाच बरा...

वैशाली कदम
<तुम्ही दिशा पटानी बद्दल काहीच लिहीले नाही. बाकी प्रोमो बघूनच अंदाज होता.>
काही लिहिण्यासारखं नाही दिसण्यापलिकडे

भयंकर सिनेमा..फाळणीपासुन चालू होऊन मधेच भारताला मनमोहनसिंग यांच्यासारखा चांगला अर्थतद्न्य (?) व शा.खा सारखा सुपरस्टार कसा मिळाला यावर गाडी येऊन थांबते.!
कशाचा कशाला मेळ नाही.
१९८० मधे लिव ईन रिलेशनशिप साठी हिरोईन स्वतःहून पुढाकार घेते व मुलाची आई गोड हसून मान्यता देते...!!
सिनेमाभर लिव ईन वर ठाम असलेली मुलगी वयाच्या साठीत मात्र स.खा.शी लग्नाला तयार होते.
गाणं एकही लक्षात रहात नाही.

स.खा ला एकदा मिडल ईस्ट मधे नोकरी मिळते national anthem म्हंटल्यामुळे.तिथे अर्धा तास टि.पी. ती नोकरी संपल्यावर मर्चंट नेव्हीमधे ही सहजपणे मिळते.तिथे अर्धा तास आचरटपणा.
स.खा. चे सिनेमे टाईमपास तरी असतात.
'भारत' म्हणजे illogical scenesची हद्द आहे.टाईमपासही होत नाही.

दिशा पटनी ला काहीही काम नाही.

चैत्राली, प्रत्येक वाक्याला अनुमोदन. फाळणीचं पहिलं रेल्वेचं दृश्य पाहिल्यावर पुढे गदरसारखं काहीतरी भव्य दिव्य पहायला मिळेल अशी अपेक्षा असते. मात्र, ती धुळीस मिळते.