प्रलय-१६

Submitted by शुभम् on 6 April, 2019 - 09:31

प्रलय-१६

उत्तरेचा सैनिक तळ हा सैनिक तळ कमी आणि देशद्रोह्यांचा अड्डा म्हणून जास्त ओळखला जायचा . ज्यावेळी महाराज सत्यवर्मांनी वानप्रस्थ आश्रम स्वीकारला . त्यावेळी महाराज विश्वकर्मानी राज्याची सूत्रे सांभाळली . त्यावेळी महाराज विश्वकर्माचे बरेच समर्थक होते . पण ज्यावेळी दुसरा राजपुत्र जन्मला व त्याच्या नावे राज्याभिषेक करण्याचा प्रश्न आला , त्यावेळी महाराज विश्वकर्मा महाराज पदावरून बाजूला झाले . मात्र त्यांचे समर्थक अडून राहीले .. त्यामुळे त्या सर्वांना शिक्षा देण्याचे ठरले . मात्र ते समर्थक पलायन करण्यात यशस्वी झाले व उत्तरेचा जंगलात स्थायी झाले . सैनिकांबरोबर बरेच सामान्य नागरिक ही त्याठिकाणी स्थायिक झाले होते......

त्याच सैनिकाच्या तळावरती आज सर्व जण जमले होते. महाराणी शकुंतला ही त्या ठिकाणी उपस्थित होत्या . ज्या लोकांनी महाराणीचं अपहरण केलं होतं ते तळावरील सैनिक होते . ज्या सैनिकांनी अपहरण केलं होतं त्यांना माहित नव्हतं त्या महाराणी आहेत . नंतर तळावरती आल्यावर सुरक्षक प्रमुखाने महाराणीची सुटका केली व नम्रता पुर्वक त्यांचा आदर सत्कार केला . महाराणी त्या ठिकाणाहून राज्याकडे जाऊ इच्छित होत्या . महाराज विश्वकर्मा यांना फाशी झाली असा त्यांचा समज होता , पण सुरक्षा प्रमुख रघुरामाने तो समज काढून टाकला . त्याने महाराणींना सर्व हकीकत सांगितली व त्यांना तळावर राहण्यासाठी विनंती केली . त्या विनंतीला मान देऊन महाराणी त्यांच्यासोबत असलेल्या छोट्या राजपुत्रासह तळावरती स्थायिक झाल्या . जोपर्यंत महाराज विश्वकर्माचा पुढील आदेश येणार नव्हता तोपर्यंत त्या तिथेच राहणार होत्या . त्याठिकाणी अजूनही बरेच लोक होते . भिल्लव होता , सरोज होती , अधिरथ होता , अद्वैत होता आणि त्या दोघांचे साथीदारही होते . त्याचबरोबर उत्तरेच्या तळाचे सुरक्षा प्रमुख रघुराम आणि त्यांचे महत्त्वाचे साथीदार सैनिकही होते . सर्व लोक व सैनिक आजूबाजूला जमले होते , कारण त्या ठिकाणी तंत्रज्ञ मंदार काहीतरी बोलण्यासाठी उभारले होते . सर्वत्र शांतता होती . तंत्रज्ञ मंदारने बोलायला सुरुवात केली..........

" येथील बरेच जण मला ओळखतात आणि बरेच जण नाहीत . पण जे मला ओळखतात त्यांना माहित आहे मी सहसा बाहेर पडत नाही . प्रवासाला तर मुळीच नाही . पण आता अशी गोष्ट झाली आहे , ज्या गोष्टीमुळे मला बाहेर पडावे लागले. तुम्हाला प्रलयबाबतची काही कल्पना नसेल , या पृथ्वीतलावर असलेल्या वेगवेगळ्या संस्कृती प्रलयाची वेगवेगळी वर्णने आहेत . कोणी सांगतात , ज्यावेळी प्रलय येईल त्यावेळेस संपूर्ण पृथ्वी पाण्याखाली बुडून जाईल , कुणी सांगतात ज्यवेळी प्रलय येईल त्यावेळी आकाशातून आगीचा वर्षाव होईल व सर्व पृथ्वी जळून जाईल . कुणी सांगतात ज्या वेळी प्रलय येईल त्यावेळी पाऊस पडणार नाही व सर्व पृथ्वी सुकून जाऊन पाण्यावाचून तडफडून मरेल . ज्या त्या संस्कृतीत वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जातात . प्रत्येकाच्या संस्कृतीत प्रलयाची वर्णने आहेत पण मी म्हणतो ती सारी वर्णने खोटी आहेत . तसं काही होणार नाही , त्याहून भयंकर होणार आहे .......प्रलय येणार आहे आणि आपल्याला विळख्यात घेणार आहे , जर आपण लवकरच कृती केली नाही तर प्रलय कोणीच थांबवू शकणार नाही........

त्यावेळी बराच जणांच्या चेहऱ्यावर ती त्याला प्रश्न चिन्ह दिसले मंदारने अजून सविस्तर सांगायला सुरुवात केली......

" तुम्हाला जास्तीत जास्त वाईट काय माहित आहे ......तर ती माहित आहे काळी भिंत , भिंतीपलीकडील महाल आणि त्यातील सम्राट ...।।त्याची खरी कथा कोणालाच माहित नाही . ज्यावेळी भिंत बांधली होती . त्यावेळी मी जिवंत होतो . मला त्याची कहाणी माहित आहे . पण पण त्याहूनही भयानक काहीतरी आहे हे कुणाला माहीतच नाही , आणि त्याहूनही भयानक आहे तो म्हणजे प्रलय .....

त्यावेळी सैन्याची तुकडी घेऊन काळी भिंत पाडण्यासाठी निघालेला अभिजीत अद्वैत म्हणाला.....

" तुम्हाला चूकीचं ठरवण्याचा माझा उद्देश नाही , पण मी स्वतः सैनिकांची तुकडी घेऊन काळी भिंत पाडण्यासाठी गेलो होतो . त्या ठिकाणी मी जे काही पाहिलं त्याच्याहून भयानक या जगात काहीच असू शकणार नाही....

हा तोच अभिजीत अद्वैत होता . ज्याच्या तुकडीची संपूर्ण विल्हेवाट त्यां अंवभक्तांनी लावली होती......

" मला माहित आहे अभिजीत अद्वैत ..... तू काय पाहिलं असशील......? तंत्रज्ञ मंदार

" नाही , तुम्हाला कल्पना येऊ शकत नाही . त्या पंधरा लोकांनी , त्या फक्त पंधरा लोकांनी आमच्या तीनशे जणांच्या तुकडीचा संपूर्ण निकाल लावला . आमची तुकडी साधीसुधी नव्हती . संपूर्ण पृथ्वीतलावर सर्वात पराक्रमी , अनुभवी असलेल्या आमची तुकडी , तुकडीतील 300 सैनिक , या साऱ्यांच्या बरोबर युद्ध करून त्यांना पराभूत केलं , फक्त पंधरा लोकांनी .....आणि त्यानंतर ते जे काही कृत्य करत होते ते तर कोणाही माणसाच्या अंगावरती काटा आणणारा होतं . ही लोक जर भिंतीपलीकडे असतील तर भिंतीहून भयानक या जगात काहीच असू शकत नाही ......

" अद्वैता मला माहित आहे तू काही अंधभक्तांना पाहिलं असशील पण अंधभक्त हे भिंतीचे नाहीत तर दक्षिणेकडील देवाची आपत्ये आहेत . त्यांना बासरीचा ठराविक धुनीवरती आपल्या ताब्यात करता येते . आणि पूर्वीप्रमाणे मनुष्यात आणता येते , त्यात काही फारसं अवघड नाही ; पण त्याहून अवघड आहे ती म्हणजे काळी भिंत आणि काळ या भिंतीहुन भयानक आहे तो म्हणजे प्रलय ........

यावेळी प्रथमच भिल्लव बोलत होता ,
तो म्हणाला " अंधभक्त जर काहीच नसेल , तर भिंतीपलीकडे त्याहून भयानक असे काय आहे.....?

" काळा भिंतीची खरी गोष्ट कुणालाच माहीत नाही ज्या काही गोष्टी सांगितल्या जातात त्या ऐकिव आहेत . आज मी तुम्हाला कळ्या भिंतीची खरी गोष्ट सांगतो जी मी स्वतः अनुभवलेली आहे.....
मंदारने काळ्या भिंतीची गोष्ट सांगायला सुरुवात केली . ज्यावेळी भिंत बांधली जात होती आणि त्या पूर्वी घडलेल्या बऱ्याच गोष्टी या साऱ्या गोष्टींचा जिवंत साक्षीदार फक्त मंदार होता , आणि तो आता भिंतीची गोष्ट साऱ्यांना सांगत होता... त्याने बोलायला सुरुवात केली........

" या पृथ्वीतलावरती अजूनही बऱ्याचशा जागा आहेत ज्या जागांवर ती मनुष्याला जाणे अशक्य आहे किंवा मनुष्याचे जाणे निषिद्ध आहे प. ण मनुष्य नेहमीच नवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी उत्सुक राहिलेला आहे . त्याची ही उत्सुकता बऱ्याच वेळा त्याच्या विनाशाचे कारण बनते . मनुष्याने उत्सुक असाल तरी निसर्गाच्या विरुद्ध , निसर्गनियमांच्या विरुद्ध जाणे त्याने टाळले पाहिजे . ज्यावेळी चालत आलेल्या गोष्टींच्या विरोधात जाऊन त्यांना काही करायचा प्रयत्न केला त्यावेळी निसर्गाने त्याला धडा शिकवला आहे . काळ्या भिंतीच्या गोष्टीचीही सुरुवात अशा गोष्टींनीच होते.....

" मनुष्याला नेहमीच सत्ता व संपत्ती याची हाव राहिलेली आहे . प्रत्येक मनुष्य या दोन गोष्टींच्या प्राप्तीसाठी संपूर्ण आयुष्यभर धडपडत असतो . प्रत्येकाला या गोष्टी हव्या असतात आणि या गोष्टी प्राप्त करण्यासाठी मिळेल तो मार्ग अवलंबण्याचा तो प्रयत्न करत असतो . फार पूर्वी , पृथ्वीवर एकछत्री राज्य येण्यापूर्वी , ज्यावेळी पृथ्वीवर छोट्या छोट्या भूभागावर , गावागावात राज्य असायचे त्या काळी.....
एका छोट्याश्या गावाचा राजा होता तो . त्यालाही संपत्तीची हाव होती . त्यालाही सत्ता हवी होती . तो एका गावाचा अधिपती होता . त्याच्याकडे एका गावाची सत्ता होती . पण त्याने त्याची हौस भागली नाही . त्याने गावातील तरुणांना गोळा करून अस्त्रविद्या शिकवायला सुरुवात केली . त्याने स्वतःचे सैन्य बनवायला सुरुवात केली . सैन्य बनवून आजूबाजूची गावे त्याने जिंकायला सुरुवात केली....

एकापाठोपाठ एक गावे तो जिंकत गेला . त्यांच्या आजूबाजूची जेवढी म्हणून मनुष्यवस्ती होती ती सर्व त्याने त्याच्या अधिपत्याखाली आणली तो त्या प्रदेशाचा राजा झाला . जो गाव तो जिंकायचा त्या गावातील काही तरुणींबरोबर तो लग्न करायचा . असे करता करता त्याच्या शेकडो राण्या झाल्या . त्याचे एक छोटेसे राज्य तयार झाले . मग त्याने त्या राज्यासाठी महाल बांधायला सुरुवात केली......

तो राजा सुखी समाधानी झाला होता . त्याचे स्वतःचे छोटेसे राज्य होतं . त्याला वाटलं आपल्याला जे मिळवायचे होतं ते आपण मिळवले आहे...... त्याने राज महाल बांधला व त्याच्या राण्या बरोबर तो राजमहाला मध्ये राहू लागला .. तो राण्यांना घेऊन समुद्रकिनारी जलक्रीडा करण्यासाठी जात असे . त्या दिवशीही तसाच तो त्याच्या रिण्यांबरोबर समुद्रकिनारी गेला होता , पण समुद्रात दूरवर ती त्याला काहीतरी हालचाल दिसली . समुद्रात कोणता तरी विचित्र प्राणी त्याला दिसला . त्यांनी त्याच्या सैनिकांना बोलावले व छोटीशी नाव काढून ते त्या ठिकाणी जायला निघाले . जेव्हा ते त्या प्राण्याच्या जवळ गेले तेव्हा त्याला जाणवले की तो कोणत्याही प्रकारचा प्राणी नव्हता तर भली मोठी नाव होती । त्याने इतकी मोठी नाव त्याच्या आयुष्यात कधीच पाहिले नव्हते तो ती नाव पाहून हबकून गेला .

त्याला वाटलं होतं समुद्र किनाऱ्या पलीकडे देवांची वस्ती आहे आणि साक्षात देवच त्याच्या भेटीसाठी आले आहेत . पण त्याला माहित नव्हतं ती ही माणसे होती आणि समुद्रकिनाऱ्या पलीकडे अजून जमीन होती , भली मोठी जमीन होती आणि त्या जमिनीवर तीही अनेक राज्ये होते , ज्यांचे अनेक राजे होते.... त्या मोठ्या जहाजावरील माणसांना, नि ह्या बेटावरील राजाला एकमेकांची भाषा समजत नव्हती . पण जहाजावरील माणसांनी या राजाला बंदी बनवले व याला घेऊन त्यांच्या राज्यात गेले....

जेव्हा बेटाचा राजा त्यांच्या शहरात फिरत होता त्यावेळी तेथील गोष्टी पाहून तो वारंवार आश्चर्य करत होता . तेथील इमारती , तेथील रस्ते सर्वच त्याला नवीन होता. त्याच्या संपूर्ण जमाती मध्ये पहिल्यांदाच तो या भूमीवर ती आला होता . त्याला वाटलं होतं त्या बेटावरतीच तेवढे जग आहे , आणि मी संपूर्ण जगाचा राजा झालो आहे . त्या लोकांना संपूर्ण जगाची माहिती नव्हती , पण याला आता संपूर्ण जगाची माहिती झाली होती . त्याला कळलं होतं जग खूप मोठा आहे , त्यात खूप राज्ये आहेत , खूप बेटे , आहेत खूप लोक आहेत.... आणि तरीही त्याला संपूर्ण जगावर राज्य करण्याची इच्छा झाली होती ......

त्याला कैदी म्हणून त्या राज्याचा राजा समोर पेश केलं होतं , पण त्या राज्याला बेटावरील लोकांची भाषा येत होती.....
तो राजा बेटावरील लोकांच्या भाषेत त्याला म्हणाला.....
" क्षमा करा , आमच्या सैनिकांकडून चूक झाली . त्यांना तुमची भाषा समजत नसल्यामुळे तुमच्यामध्ये गैरसमज झाला असावा .........
आणि त्या राजाने त्याच्या सैनिकांना बेटावरील लोकांना सोडण्याचे आदेश दिली...
" आपला परिचय .....
त्या राज्याच्या राज्याने बेटावरील राजाला विचारले..।
" मला तुमच्या राज्यांचे ते जहाज दिसेपर्यंत असेच वाटत होते कि मी या संपूर्ण जगताचा राजा आहे..... पण मला आता कळाले ला आहे मी फक्त त्या बेटाचाच राजा आहे....
" त्या बेटावरतीही आता एक राजा आहे म्हणायचा . मागच्या दशकापासून त्या बेटा सोबत आमचा संपर्क तुटला आहे...... मागच्या वेळी मी जेव्हा भेटा वरती आलो होतो त्यावेळी एका टोळीकडून आम्हाला लागणारी खनिजे आम्ही उकरून घेतली होती.....
" सर्व टोळ्यांना एकत्र करून , काही जणांबरोबर युद्ध करून , काही जणांबरोबर नातं जोडून , काहीजणांना मुळापासून उपटून टाकून मी बेटावरती साम्राज्य प्रस्थापित केलेलं आहे आणि तुमच्या लोकांनी मला बंदी बनवून आणलं हे काही मला आवडलेला नाही....

" मी माझ्या लोकांच्या वागणुकी बद्दल क्षमा मागतो . तुम्ही काही दिवस , तुम्हाला जेवढं वाटतं तेवढंच ,आमच्या राज्यात वास्तव्य करा , आमच्या पाहुणचाराचा लाभ घ्या , ज्यावेळी तुमचं समाधान होईल त्यावेळी तुम्हाला तुमच्या राज्यात सोडू......

तो राजा बरेच दिवस तेथे राहिला . तेथील भाषा , समाज , रूढी , परंपरा , प्रथा इतर शास्त्रे , युद्ध , युद्ध कला आणि त्यांची शस्त्रे ......। त्याने सर्व काही शिकून घेतलं बरेच दिवस राहिल्यानंतर त्याला त्या ठिकाणचे राजकारणही समजलं....... तुझ्या राज्यात राहत होता ते राज्य पृथ्वीतलावर फार मोठं नव्हतं पण त्याच्याकडे बरीच साधनसंपत्ती होती , पण सैन्याच्या बाबतीत ते राज्य मागं होतं . त्यामुळे त्या राज्याला बऱ्याच वेळा इतर राज्याकडून त्रास सहन करावा लागे व कर म्हणून त्याच्या जवळील बरीच साधनसंपत्ती इतर राज्यांना द्यावी लागे. हे सर्व जाणून घेऊन तो राजा त्याच्या बेटावर आला....

ज्यावेळी तो बेटावरून माघारी आला , पुन्हा त्याच राज्यात . त्यावेळी त्याच्या जवळ बऱ्याच गोष्टी होत्या . ज्या शस्त्र म्हणून वापरता येण्यासारख्या होत्या . ज्या राज्यात तो राहिला होता त्या राजाच्या मदतीने त्याने शेजारील राज्यांवर आक्रमण ठरवले . त्या राज्याचा राजा परस होता . आणि बेटावरील राज्याचे नाव वासुकी होते . वासुकी ने अशा काही गोष्टी आणल्या होत्या ज्या पाहून राजा परस हा वासुकीच्या परम मित्र झाला . वासुकी व परस राजा दोघांनी मिळून शेजारच्या राज्यावर आक्रमण केले . त्या राज्यावर आक्रमण करण्यासाठी त्यांनी स्वतःची सैना वापरले नाही , ती सैना त्याच राज्याची होते . ज्या राज्यावर आक्रमण करणार होते त्यांची सैना त्यांच्याच विरुद्ध लढली . या साऱ्या मागे एक वाक्य होतं ते म्हणजे.....
" सिरकोडा इसाड कोते.......
हे अंधभक्तांचं प्रकरण फार मागे जातं . त्या भक्ताच्या प्रकरणाची सुरुवात त्या ठिकाणी झाली होती . आणि हे वाक्य त्या बेटावरील भाषेतील वाक्य आहे ........

त्याच वेळी त्या उत्तरेकडील सैन्यतळाच्या अवतीभोवती मोठ्या आवाजात
" सिरकोडा इसाड कोते "
या वाक्याचा पुनरुच्चार होत होता..........

काळ्याभिंतीपाशी जलधि राज्याची सेना जमा झाली होती . भिंती पलीकडे असलेल्या त्रिशूळ सेने वरती त्यांनी आक्रमण केलं होतं . भिंतीवरती चढवलेल्या तोफा आग ओकत होत्या . धनुष्यबाण एकापाठोपाठ एक त्यांच्या काळजाचा वेध घेत होते . एवढं सगळं होऊनही त्या सैनिकाकडून कोणत्याच प्रकारचं प्रत्युत्तर नव्हतं जणू त्यांना हल्ला करण्याचा आदेश मिळाला नव्हता......

त्याठिकाणी मृतदेहांचा खच पडला होता . रिकामी झालेली जागा भरण्यासाठी दोन्ही बाजूने आणखी सैनिक येत होते . तेही मृत पावल्यानंतर त्यांच्या वरती अजून सैनिक येतच राहिले . जिकडे तिकडे रक्ताचा चिखल झाला होता . कुठे तुटून पडलेला हात दिसायचा , कुठे पाय ....कुठे एखाद्याचे शीर ....कुठे एखाद्याचा राहिलेलं धड . सर्वत्र तुकडे झालेले अवयव विखरून पडले होते..... पण येणारे सैनिक काही कमी होत नव्हते .एका पाठोपाठ एक एक रिकाम्या झालेल्या जागा भरून निघत होत्या इतकं अफाट सैन्य भिंतीपलीकडे जमा झालं होतं ......

हल्ला करण्यापूर्वी राज्याच्या एका मंत्र्याने हल्ला न करण्याचा सुचवलं होतं . त्याचं म्हणणं होतं की सैना जरी त्रिशूळाची असली , तरी त्यात असलेले लोक आपल्या सारखेच सामान्य होते . त्यांना काहीही करून त्यांच्या सामान्य व्यवस्थित आणनं भाग होतं . पण ते कसे करायचे याचं मात्र उत्तर त्यांच्याकडे नव्हतं . त्यामुळे त्याची ही सूचना स्पष्टपणे धुडकावून लावली गेली . आणि बऱ्याच जणांच्या मतानुसार आक्रमण करण्याचं ठरलं . मात्र सुरू झाल्यानंतर कितीतरी तास आक्रमण चालू होतं , पण सैनिकांची संख्या काही कमी होत नव्हती . मढ्यांचा ढीग लागला होता तरीही सैनिक येत होते आणि जागा घेत होते.....

पण अचानक हल्ला करणारा एक सैनिक जोरात ओरडला . तोफांच्या आवाजात त्याचा आवाज कोणाला ऐकू गेला नाही..... पण एका पाठोपाठ एक बऱ्याच सैनिकांच्या आरोळ्या ऐकू येऊ लागल्या , आणि तोफांचा आवाज थांबला . बऱ्याच सैनिकांचे नातेवाईक त्यांना समोर दिसत होते . कोणाची आई होती , कुणाचे वडील होते . कोणाचा भाऊ होता . बरेच लोक त्यांच्या ओळखीचे त्यांना समोर दिसत होते .........

झालेला सर्व प्रकार कैरव महाराजांच्या कानावर गेला.।। आणि ही गोष्ट कानावर जाते न जाते तोच राज्यातून एक दुत संदेश घेऊन आला होता....

" राज्यातील बरेच लोक बेपत्ता झाले होते.........

याचा अर्थ त्यांच्या स्वतःच्या राज्यातीलच लोक त्यांच्या विरुद्ध लढण्यासाठी भिंतीपलीकडे उभा होते . हे कसं झालं .....? काय झालं....? हे महाराजांना काही कळत नव्हतं ........?

आयुष्यमान घोडा चालवण्यात पटाईत होता . त्याने घोडा इतक्या जोरात पुढे आणला की भरत व शोनकला त्याचा पाठलाग करणे शक्य झाले नाही . उत्तरेचे जंगल पूर्व-पश्चिमेला समांतरच संपूर्ण भूखंडावरती पसरला होतं आयुष्यमानने मोहिनीला उत्तरेच्या जंगलावर उंच उडत जाताना पाहिलं होतं . याचा अर्थ तीं उत्तरेच्या जंगलातच कुठेतरी असेल असा त्याने कयास बांधला....त्यामुळे उत्तरेच्या जंगलातच पूर्व-पश्चिम असा शोध घ्यायचा आयुष्यमान ठरवलं . तो लगेच पूर्वेकडे निघाला .

आयुष्यमानने कळ्या भिंतीपाशी त्याचा शोध सुरू केला होता , पण पूर्वेकडे जाईल तसं ते जंगल अधिक घनदाट होत होतं . जंगलातील झाडे झुडपे प्राणी व पक्षी सुद्धा वाढत होते. पुढे पुढे त्याला घोड्यावरुन जाणे अशक्य झाले . तो खाली उतरला व पायी जाऊ लागला . जंगल इतके होते कि त्याला पुढे जाण्यासाठी त्याच्या तलवारीने वाट करावी लागत होती . तो बराच वेळ चालत होता . चालून चालून त्याच्या पायाला फोड आले होते . जंगलातील लहान लहान किटकामुळे संपूर्ण अंगावर ते लाल रेषा उमटल्या होत्या . जंगलात बरेच विषारी कीटक होते , त्याचा दंष झाल्यामुळे त्याला दरदरून घाम फुटला होता . तो कोणत्याही क्षणी बेशुद्ध होऊ शकत होता तरी तो चिकाटीने चालत होता. हळूहळू त्याची एकेक जाणीव कमी होत होती . त्याच्या सर्व जाणिवा बधिर झाल्या होत्या . त्याला तहान लागली होती . त्याच्या जवळील पाणी संपले होते . तो आता बेशुद्ध होऊन पडणारच तोपर्यंत समोरच्याला एक लहानसा ओढा दिसला....

त्याने कसेतरी ओढ्या पर्यंतचे अंतर पार केले . ओढ्यापाशी पोहोचल्यावर त्याने त्याचे कपडे काढत ओढ्यामध्ये उडी घेतली . त्यातील पाण्याचा स्पर्श होताच त्याच्या शरीराची जळजळ कमी झाली . फुटणारा घाम थांबला . हळू एक एक जाणीव येऊ लागली . वरून पाझर फुटला होता , त्या दगडा जवळ जात त्याने वरून पडणारे थोडे पाणी प्याले तेव्हा त्याला हुशारी वाटली . सर्व शरीर स्वच्छ धुतले . नंतर तो त्यातून बाहेर आला पण त्याचवेळी हवेत उचलला गेला . त्याच्या पायाला दोर बांधला गेला होता . तो हवेत उलटा लटकला होता . तो नक्कीच कोणत्यातरी सापळ्यात सापडला होता , जे कोणीतरी हेतुपूर्वक त्या ठिकाणी ठेवले होते......

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

" राज्यातील बरेच लोक बेपत्ता झाले होते.........

याचा अर्थ त्यांच्या स्वतःच्या राज्यातीलच लोक त्यांच्या विरुद्ध लढण्यासाठी भिंतीपलीकडे उभा होते . हे कसं झालं .....? काय झालं....? हे महाराजांना काही कळत नव्हतं ........? >>> solid twist

mastt

छान गुंतागुंत आहे... रोज नवीन भाग येत आहेत त्या मूळे लिंक तूटत नाहिये. एक दोन भाग वाढले तरी चालतील पण सर्व गुंतागुंत सोडवा हि विनंती.

तुम्हा सर्वांच्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून धन्यवाद . असेच वाचत राहा प्रतिक्रिया देत राहा . लिहायला उत्साह येतो . दोन-तीन दिवसापासून प्रलय थांबला होता.. आजपासून पुन्हा सुरू होईल....... तुमच्या सहकार्याबद्दल धन्यवाद

>>>राज्यातील बरेच लोक बेपत्ता झाले होते.........

याचा अर्थ त्यांच्या स्वतःच्या राज्यातीलच लोक त्यांच्या विरुद्ध लढण्यासाठी भिंतीपलीकडे उभा होते . हे कसं झालं .....? काय झालं....? हे महाराजांना काही कळत नव्हतं ........? >>> solid twist
Submitted by ShitalKrishna>>>>>>
असे "सिरकोडा इसाड कोते " हे वाक्य उच्चार केल्यामुळे झाले..असे मला वाटते