इम्तिहान- एक परीक्षा

Submitted by विको on 15 March, 2019 - 11:13

अलीकडे इम्तिहान नावाचं एक सिनेमा बघितला.

या सिनेमात रवीना टंडन, सैफ आली खान, सनी देओल आणि दलीप ताहिल प्रमुख भूमिकेत आहेत.
जोडीला विनोद करण्याच्या प्रयत्नात असरानी आहेत. या चित्रपटातले असरानी असलेले प्रसंग तुम्ही बघितलेत तर .... पहिलं म्हणजे तुमचं अभिनंदन तुमच्याकडे खूप सहनशक्ती आहे आणि दुसरं म्हणजे ते प्रसंग कसे होते ते मला कळवा.
यातील बरेचसे प्रसंग मी पाहू न शकल्याने पुढे ढकलण्यात आले.

अलीकडे पाणी घालून घालून केलेल्या मराठी मालिका बघितल्यावर वाटलं या चित्रपटाच्या दिग्दर्शकाचा मांडव घालून सत्कारच केला पाहिजे. चित्रपटाच्या कथेत इतक्या उपकथा आहेत की त्या प्रत्येक उपकथेचा एक चित्रपट सहज होऊ शकतो. म्हणजे परीक्षेत जसे पहिला पेपर दुसरा पेपर असतात तसे इम्तिहान-१, इम्तिहान-२ अशी सिरीज निघू शकते.

सुरुवात होते ते दलीप ताहील हा अतिश्रीमंत.... व्यावसायिकच असणार, नोकरी करून कोण एवढं श्रीमंत होणार, आपल्या एकुलत्या एक लेकीच्या लग्नाच्या चिंतेत असतो. इकडे लेक म्हणजे रवीना टंडन एका प्रसिद्ध कलाकाराच्या म्हणजे सैफ आली खानच्या कार्यक्रमाला आलेली असते. त्यावेळेस त्याची नजर अर्थातच रवीनावर पडते आणि अर्थातच त्याला ती आवडते. मग नेहेमीप्रमाणे तो गाणी गात तिच्याभोवती फिरत असतो आणि ती अजिबात दाद देत नाही. पुढे तो तिच्या वडिलाना भेटतो आणि मला रवीना आवडते असं सांगतो. वडील वाटच बघत असतात त्यामुळे लगेच त्या दोघांचं लग्न लागत (कथा १). लग्नानंतर रवीना दुखी दिसत असते. मग अचानक उजेड पडतो (विजेचा, मुसळधार पाऊस सुरु होतो) आणि कथेचा उलगडा व्हायला लागतो.

रवीना कॉलेजमध्ये असताना सनी देओल तिचा हिरो असतो. तो गरीब आणि धडाकेबाज (गुंड) असतो. शक्ती कपूर त्याचा मित्र असतो. तिच्या वडिलांना अर्थातच हे स्थळ पसंत नसत. परंतु खऱ्या प्रेमापुढे गरिबी, गुंडगिरीसारख्या गोष्टींची काय किंमत. त्यामुळे वडिलांच्या विरोधाला न जुमानता रवीना आणि सनी लग्न करतात (कथा २). त्या रात्री गाणं वगैरे म्हणतात. दुसऱ्या दिवशी सकाळी देवदर्शनाला जायला निघतात. रवीना पायऱ्या चढून पुढे जाते. मात्र सनीचे शत्रू त्याला पहिल्या पायरीपाशीच गाठतात. मग थोडी मारामारी,फार तपशीलात जाण्यात अर्थ नाही. रवीनाच्या लक्षात येत की आपल्या नवऱ्याला काही लोक घेऊन गेले आहेत. ती त्यांचा पाठलाग करते. तिला दिसत ते त्याला भरपूर मारतात आणि तो पाण्यात पडतो. तो गेला, म्हणजे देवाघरी गेला, म्हणून त्याचे शत्रू खूष आणि बायको म्हणजे रवीना दु:खी होते. आता दुसरा इलाज नसल्याने ती परत वडिलांकडे जाते (कथा ३).

आता कथा पुन्हा वर्तमानात येते. रवीनाला हळू हळू सैफ आवडायला लागतो. एकदा त्या दोघांना शक्ती कपूर भेटतो. रवीना आणि सनीच्या लग्नाला तीन साक्षीदार असतात एक भगवान शंकर, दुसरे लग्न लावणारे गुरुजी आणि तिसरा शक्ती कपूर.
अचानक सैफसोबत असताना शक्ती कपूर दिसल्यावर रवीनाला कुठे तोंड लपवू असा होत. शक्ती कपूर पण शहाजोगपणे तोंडदेखलं हसून, बोलून निघून जातो. मग रवीनाला काही फोन यायला लागतात. आणि हे सगळं सैफ पासून लपवून चालू असत. सैफ दिसतो त्यापेक्षा हुशार असतो त्यामुळे त्याला काहीतरी गौडबंगाल आहे हे कळत मात्र त्याचा बायकोवर भलताच विश्वास असतो.

एक दिवस अचानक फोन येतो की रवीनच्या वडिलांना हार्ट अटॅक आला आहे तेव्हा ताबडतोप या. मग रवीना आणि सैफ निघतात. आल्या आल्या रवीना वडिलांना भेटायला जाते. सैफ गाडी लावून सावकाश येणार असतो. मात्र तेवढ्या काळात तिचे वडील तिला एक महत्वाची गोष्ट सांगतात की ती परत आल्यावर (आठवा तिच सनीबरोबर लग्न झालेलं असत ) गरोदर असल्याचं कळत मग तिला एक मुलगी होते. तिला सांगण्यात येत की ती मुलगी जन्मल्यावर लगेचच देवाघरी गेली. पण प्रत्यक्षात ती एका अनाथालयात असते. एवढं बोलून वडील गतप्राण होतात (कथा ४). मात्र आपल्या आणि तिच्या नशिबानी अनाथालायाच नाव ते सांगतात. बाहेर कोणीतरी हे सगळं ऐकत असत. हे महत्वाचं बोलणं झाल्यावर सैफ येतो.

घरी परत आल्यावर रवीना बेचैन असते. अखेर ती अनाथालयात जाऊन मुलीला भेटते. मुलीच्या ओढीनी परवानगी घेऊन तिला घरी घेऊन येते. सैफला मुलगी आवडते मात्र मुलीमुळे आपल्याकडे बायकोच दुर्लक्ष होत आहे हे बघून तो मुलीला परत सोडून ये असं सांगतो. रवीनापण त्याच ऐकून मुलीला परत अनाथालयात घेऊन जाते (कथा ५).
मग मात्र रहस्यमय फोन, गुपचूप भेटायला जाण सुरू होत. पुढे काय होत, रवीनाच रहस्य कोणी ऐकलं असत, तिला कोण फोन करत असत, ती कोणाला भेटायला जाते, तिच्या मुलीचं काय होत ते प्रत्यक्ष पडद्यावरच पहा (कथा ६, ७,.... ). अथवा पाहू नका.

Spoiler Alert हा सिनेमा अपेक्षित वळण घेत हिंदी सिनेमाला साजेश्या पद्धतीने संपतो.

गाणी बरीचशी ओळखीची आहेत! अरे, हे या सिनेमात आहे होय असं बऱ्याचदा होईल. अथवा तुम्ही या विषयातले तज्ञ असाल तर माझ्यासारख्या अडाण्याला माफ करा.

सिनेमाच्या सुरुवातीला दलीप ताहिल रवीनाबाबत कोणाशीतरी बोलत असतात. ते पाहुणे विचारतात पण तुमची लेक आहे कुठे? आणि कॅमेरा एका पाठमोऱ्या व्यक्तीवर जातो. ती व्यक्ती सावकाश पुढे बघते. मला अपेक्षा होती ती रवीना असणार पण निघाला सैफ!

रवीना तिच्या मुलीला भेटायला अनाथाश्रमात जाते. तिला मुलीचा लळा लागतो आणि ती तिथल्या संचालिकांना विचारते मी या मुलीला घरी घेऊन जाऊ का?
संचालिका: तू तिला दत्तक घेणार आहेस का?
रवीना: माझा तिला दत्तक घ्यायचा विचार आहे.
संचालिका: मग ठीक आहे. तू तिला घेऊन जा.

क्काय इंग्लिश मध्ये jaw dropped असा जो वाक्प्रचार आहे ते झालं माझं.

पुढे सैफ तिला सांगतो मुलीला परत सोडून ये. तर ती खरंच त्या अनाथाश्रमात जाते आणि मुलीला परत देऊन येते.

अरे हा सिनेमा आला तेव्हा दुकानातून घेतलेली वस्तू परत करायची ते सुद्धा एवढं सोपं नव्हतं आणि ही मुलीला घेऊन काय येते परत काय करते....

हा सिनेमा सैफ च्या worst १० मध्ये नाहीये*! तेव्हा भरपूर वेळ असल्यास स्वतःच्या जबाबदारीवर पहावा.

तळटीप: बघायला, लिहायला आणि वाचायला भरपूर खाद्य पुरवल्याबद्दल हिंदी सिनेमांचे आभार.

*http://www.rediff.com/movies/report/slide-show-1-the-10-worst-saif-ali-k...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

रवीना आणि सनीच्या लग्नाला तीन साक्षीदार असतात एक भगवान शंकर, दुसरे लग्न लावणारे गुरुजी आणि तिसरा शक्ती कपूर.
>>> हा हा हा हा

नाही. हा हमराज नाही. सुनील दत्त चा हमराज म्हणजे बेवफा अनिल करीना कपूर अक्षयकुमार आणि शशिकलाच्या रोल मध्ये भडक अभिनय करत मनोज वाजपेयी आणि शमिता शेट्टी. एकदम अ अ चित्रपट आहे.
पण असे इम्तिहान सारखे य सिनेमे मिळतील विषेशतः ८० मध्ये.
गाणी चक्क चांगली आहेत

Sunil dutt chya Hamraz cha copy ahe na ha picture >>>> हो.
गुगु , बेवफा आणि हमराजची story वेगळी आहे.
तो कदाचित "चलो इक बार फिरसे अजनबी बन जाये हम दोनो" वाला movie.
माला सिन्हा , अशोक कुमार , सुनील दत्त

हा पिच्चर आता कुठे मधेच पाहिलात? Lol
चाहा तो बहोत, इस तरहा आशिकी का, दो बाते हो सकती है आवडती गाणी.
हमराज शी साधर्म्य आहे.

रवि-सैफच्या लग्नानंतर सगळी स्टोरी प्रेक्षकांना दाखवतात म्हणजे सैफला पण ती तेव्हाच माहित झाली असणार. शिवाय मुलगी झाली होती हे रवीनाला पण माहित नसतं म्हणजे सैफला पण माहित नसणार. लग्नाआधी पुढच्या आयुष्यासाठी महत्वाची ठरेल अशी माहिती न देण्याची प्रथा इथुनच उचललीये का सरंजामेंनी.

स्वाती
तो गुमराह, मी confuse झालो.

हमराज च साधर्म्य आहे. इम्तिहानशी.

मलादेखील हमराझच आठवला. राज कुमार, सुनील दत्त, आणि कोणीतरी प्लास्टिक हिरोईन होती. लहान मुलीचा रोल सारीकाने केला होता. सिनेमा बरा होता.

सैफचे दो बातें हो सकती है गाणे अजूनही आठवते मला अधूनमधून.