संक्रांतीला कल्पकतेचं वाण

Submitted by रंगराव on 30 December, 2018 - 09:42

उत्तरायणची सुरुवात झाली की, हळदी-कुंकू समारंभाची लगबग सुरु होते. हळदी कुंकूवाची परंपरा जुनी असली तर त्याचं महत्व आजही तितकचं टिकून आहे. हळदी कुंकू लावून तिळगूळच्या लाडवासोबत वाण देण्याची प्रथा अजूनही कायम आहे. हळदी-कुंकु कार्यक्रमाचे धार्मिक महत्व किती ते माहित नाही. पण असे कार्यक्रम सर्वांनाच आवडतात. सर्व महिला मस्तपैकी नटुन-सजुन येतात, गोड गोड गप्पा मारतात, नविन ओळखी होतात, एकाच कॉम्प्लेक्समध्ये असुनदेखील कधी न बघितलेल्या महिला एकमेकींना भेटतात.

यंदा वाणाला दुसरं काही देण्याच्या ऐवजी फुलांची किंवा भाजीपाल्याची रोपे वाटली तर.! संक्रांतीच्या वाणात फळ झाड, फुल झाड, शोभेचे झाड किंवा कंपोस्ट खताची १/२ किंवा १ किलोचे बॅग, जीवामृत, बायोकल्चर, भाजीपाल्याच्या बियाण्याचे पाकिट या पैकी काहीतर एक निवडुन द्यावे. या कल्पकतेचा उद्गम झाला आमच्या बाग प्रेमींच्या हिरवाई व्हॉटसअप (WhatsApp) समुहात. अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक इथे फक्त आपल्या बागेच्या प्रेमापोटी एकत्र आले आहे, हिरवाई हा एक हौशी लोकांचा समुह आहे. कचरा व्यवस्थापनाच्या सुप्त हेतुसोबतच परसबाग, गच्ची, टेरेस , बाल्कनी जेथे जागा मिळाली तेथे हिरवा कोपरा उभा करून फुलझाडे, शोभेची रोपे याचसोबत रोजच्या वापराचा ताजा भाजीपाला अन तोही संपूर्ण सेंद्रिय घरच्या घरी मिळावा हा हातचा धरून हिरवाई समुहाची वाटचाल सुरु आहे. गेल्या वर्षी नाशिक मधील बागा प्रेमींचे संक्रात संमेलन याच संकल्पनेतून साजरे केले गेले. त्याची दखल समाज माध्यमांसोबत विविध वृत्त वाहिनीनी देखील घेतली होती.

सण, उत्सव परंपरांची सांगड आपल्या भोवतालच पर्यावरण संरक्षणाशी घालण फारसं अवघड नाहीय. उदाहरणच सांगायचं झाल तर एका लग्न समारंभात आठवडाभराचे कार्यक्रमात भरपूर फुलांचा वापर होतो. लग्नाची सजावट हार, गजरे, फुलांच्या माळा, सजावटीचे निर्माल्य मिळून निघणार्या ओल्या कचर्याचा वापर करून मातीविरहीत बाग फुलवता येतील. एवढ्या ओल्या कचर्यात किमान ५ कुंड्या तरी नक्कीच तयार भरतात . आणि त्याच कुंड्या नवीन जोडप्याला गिफ्ट द्यायच्या . त्यांच्याच लग्नाची सजीव आठवण म्हणून . फोटोज आणि विडिओ सोबत लग्नात उपयोगात आलेले वरमाला, हातातील पुष्पगुच्छ, भेट मिळालेले बुके केवळ त्याच दिवसापुरते सोबत न राहता , त्यातच एक नवीन रोपटे लावून जर कायम सोबत ठेवता येत असेल तर जास्त भावेल.

घरातला ओला कचरा प्लास्टीकच्या पिशवीत बांधून बाहेर फेकला जातो. काही काळानंतर त्याचा एक जिवंत बॉम्ब तयार होतो, भटकी जनावरं भूकेपोटी तो कचरा पिशवीसकट खातात, ते त्यांच्या जिवावर बेततं. कचराकुंडीत टाकला तरी त्याचा उकिरडा होतो. मनपा ला दोष देऊन उपयोग होतो का ?

म्हणून त्यावर उपाय काय तर कचर्यातचं विघटन करून त्याचा पुन्हा वापर करायचा. त्यासाठी खूप पर्याय आहेत. बायोकल्चर, कंपोस्ट खत, गांडूळखत, बायोमास इत्यादी इत्यादी. ह्या सर्व प्रकारात आपण कचरा बाहेर टाकत नाही हे सर्वात मोठे समाधान !!त्यावर भाज्या पिकवल्या तर सेंद्रिय भाज्या खाण्याचा आनंद !!

निसर्गावर प्रेम असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या संग्रही असायलाच हवी अशी "Organic Waste Management/ कंपोस्ट" ही पुस्तिका तयार केली आहे. कचरा विलगीकरण, ओल्या कचर्यापासून घराच्या घरी दर्जेदार कंपोस्ट खत बनविण्याचे विविध पद्धती याची सविस्तर माहिती या पुस्तकात दिलेली आहे. पर्यावरणाची होत असलेली प्रचंड हानी, वाढतं प्रदूषण व त्याचमुळे अनियमित चाललेलं निसर्गचक्र ... याला इलाज एकच, आणि तो म्हणजे या सर्व गोष्टींमध्ये समतोल राखण्यासाठीचा एक प्रामाणिक प्रयत्न ! पर्यावरणाविषयी अतोनात प्रेम, झाडांची मनापासून आवड, नवनवीन प्रयोग करून बघण्याची जिज्ञासू वृत्ती व तितकंच महत्वाचं म्हणजे आपल्याला असलेली माहिती इतरांपर्यंत पोचवण्याची तळमळ यातूनच ह्या पुस्तिकेचा उगम झालाय. हिरवाई समुहाचे निमंत्रक डॉ वैभव किर्ती चंद्रकांत दातरंगे यांना ९४२२२९२३३५ या क्रमांकावर संपर्क करून इ बुक स्वरूपातील ही पुस्तिका निशुल्क प्राप्त करून घेता येईल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

यंदा वाणाला दुसरं काही देण्याच्या ऐवजी फुलांची किंवा भाजीपाल्याची रोपे वाटली तर.! संक्रांतीच्या वाणात फळ झाड, फुल झाड, शोभेचे झाड किंवा कंपोस्ट खताची १/२ किंवा १ किलोचे बॅग, जीवामृत, बायोकल्चर, भाजीपाल्याच्या बियाण्याचे पाकिट या पैकी काहीतर एक निवडुन द्यावे. >>>मस्त कल्पना

माझी आई अनेक वर्षांपासून भाजीच्या पेंडया लुटते.
रोप दिलं तर आमच्या इथली लोकं फेकून देतील नक्कीच... वाईट आहेत अगदी