तुंबाड - धारप व तत्सम गूढ जगाचे रूपेरी पदार्पण (आता स्पॉयलर्स सहीत चर्चा)

Submitted by किरणुद्दीन on 12 October, 2018 - 16:19

1063423_6880936_48.jpg

दोन बहुचर्चित सिनेमे समोर असताना कुठला निवडावा हे अवघड काम होतं. बायकोचा कल अंदाधून कडे होता. मात्र तुंबाड नेफ्लिवर पाहून होणार नाही याची खात्री होती. सुदैवाने अंधाधूनचा लास्ट शो सुरू होऊन अर्धा तास झालेला होता आणि आता फक्त तुंबाड शिल्लक होता...

मी सिनेक्षेत्राशी निगडीत नाही. संबंध असेल तर प्रेक्षक म्हणून. तो ही जाणता नव्हे. पण हा सिनेमा पाहून इतरांना सांगावेसे वाटावे हे या सिनेमाचे यश आहे असे वाटते. गेल्या अनेक वर्षात असे वाटलेले नाही. अगदी सैराटच्या वेळीही नाही. इथे मी कुठलेही सस्पेन्स लीक करत नाही अथवा कथेबद्दलही बोलणार नाही. ती प्रत्येकाने सिनेमाहॉल मधेच एंजॉय करावी.

कारण हा सिनेमा एक ब्रिलियंट सिनेमा आहे. पाहताना जर काही जाणवत असेल तर मेहनत आणि फक्त मेहनत. (दिग्दर्शकाने घेतलेली मेहनत याहीपेक्षा प्रचंड आहे, तो इथे आपला विषय नाही). पहिल्या फ्रेमपासून सिनेमा आपले वेगळेपण ठसवत राहतो. कोकणातले हे गाव आपल्यासमोर पावसाच्या रूपाने जिवंत होते. पण त्याचा फक्त गूढ वातावरणनिर्मितीपुरताच वापर करून घेतला आहे. वायफळ फ्रेम्सला इथे जागा नाही. सिनेमा पहिल्या फ्रेमपासून वेगळ्या धाटणीची गोष्ट सांगायला लागतो.

ही शैली थोडीशी धारपांशी जुळणारी. श्रेयनामावलीत त्यांचे नाव कुठेच नाही. मात्र दिग्दर्शकाने त्यांच्या कथांचा प्रभाव असल्याचे मान्य केले आहे. धारपांच्या कथा वाचताना पहिल्यापासून जाणवलेली गोष्ट म्हणजे याचे व्हिजुअल्स अत्यंत अवघड आहे. प्रत्येकाच्या डोक्यात जे चित्र तयार होते त्याला न्याय देणारे चित्रण अत्यंत अवघड किंबहुना अशक्य आहे असे वाटायचे. मात्र या सिनेमात धारपांची कादंबरी समोर उलगडतेय असे वाटणे हे सर्वात मोठे यश आहे.

दुसरे म्हणजे ही पीरीयड फिल्म आहे. त्या दृष्टीनेही घेतलेली मेहनत दाद देण्यासारखी आहे. नायक लहान असतानाच्या काळ हा स्वातंत्र्यापूर्वी साधारण ३० वर्षांपूर्वीचा आहे. त्या वेळची वाहने, गैरसोयी आणि त्या काळच्या पुण्याचे दर्शन हे सर्व दाद घेऊन जातात. जुनी भांडी, फिरकीचा तांब्या, जुन्या पद्धतीचे घट्ट झाकणांचे डबे, पत्र्याची ट्रंक हे बारीकसारीक तपशील लक्ष वेधून घेतात. सुरूवातीला नायक आजीसाठी ज्या ताटलीत जेवण वाढतो ती नीट पाहिली नाही. बहुधा ती चुकीची घेतली असे नंतर वाटले. खात्री नाही. पुणे दाखवताना पुणेरी पाट्या दाखवण्याचा मोह दिग्दर्शकाला आवरलेला नाही. अगदी सनातन पाट्या असाव्यात या.

कोकणातला पाऊस सतत सोबत करतो. तो वातावरण निर्मिती करतोच. मात्र कॅमेरा प्रकाश आणि छायांचा खेळ टिपत व्हिज्युअल अत्यंत प्रभावी करतो. एका दृश्यात सावकार भुयाराचे दार उघडून खाली पाहतो तेव्हां खालून येणारा उजेड आणि तिथे नेणा-या बोळकांडातला भेसूर अंधार हे दृश्य अक्षरशः मेंदूत कोरलं जातं.

भुयारातून खाली रंवरंव नरक उभा केला आहे. धारपांच्या अनेक कथांत जसा डोळ्यासमोर यावा तसाच. कदाचित बर्वेंना जसा दिसला तसा त्यांनी उभा केल्याने तो इतरांनाही अपील झालेला दिसतो.

सिनेमा कसा आहे ?
खरं म्हणजे कसा आहे हे सांगता येत नाही. सांगूही नये. हा नेहमीचा हॉरर सिनेमा नाही. गूढ कथा आहे. प्रासंगिक विनोदाच्या जागा आहेत. वडलांच्या अंगवस्त्राला लाच देऊन तुझ्याशी लग्न करीन म्हणणारं पोरगं अफलातून. बाप पोराला मोठा झालास की लग्न लावून देईन म्हणतो तेव्हां पोरगं तोपर्यंत काय असा प्रश्न विचारतं.. इथे अक्षरशः फुटायची पाळी आली होती. हा सीन सुचला कसा याचंच नवल जास्त होतं.

दचकवणारे सीन्स नाहीत. फूटेज खाणारे स्वप्नातले शॉट्स नाहीत. नेहमीच्या युक्त्या नाहीत. घाबरा, घाऊक घाबरा असला मामला नाही. प्राचीन किंवा त्याही आधीची अस्तित्त्वं, त्यांच्या सुप्त इच्छा आकांक्षा आणि मानवी स्वभावाचे खेळ यांची सांगड घालून पाहीले तर हा वेगळ्या धाटणीचा सिनेमा आहे हे मान्य करावे लागेल. महेश भट किंवा त्यांचे पूर्वज रामसे यांच्या सिनेमांच्या कल्पना डोक्यात असतील तर सिनेमा आवडण्याची शक्यता नाही.

माणसाच्या मनातले भय, लालसा अशा नकारात्मक भावनांची एकमेकांवर कशी मात होते. शाप वगैरे गोष्टी मान्य करून पुढे पाहिलं तर अशा मार्गाने मिळालेलं धन आणि त्यामुळे जीवनात प्रवेश करणा-या काही टाळता येण्यासारख्या गोष्टी. हाती काहीच लागणार नाही अशा मार्गावरचा हा प्रवास यावर एक शब्द न बोलता सिनेमा बोलतो. गानूआजीसारखी एक आजी आहे (हा स्पॉयलर नव्हे). ती बघवत नाही. धारपांच्या वर्णनांप्रमाणे गिळगिळीत, चिकट असे काही बीभत्स रूप आहे तिचे. अशा दृश्यातून भीती दाटून राहते.

या आजीचा संदर्भ पुढे लागतो म्हणून लक्ष द्यायचे.

स्पॉयलर अ‍ॅलर्ट
पिशवीतला खामरा नावाची कथा वाचली असेल तर ती आठवल्याशिवाय राहणार नाही. खामरा वगैरे टिपीकल धारपांची नावे. हा खामरा जीवनात आल्यापासून नायकाला वेगवेगळ्या बायकांची भूक जाणवत असते. ती तो रोज भागवत असतो. अशा रात्री जस जशा जातील तस तसा हा खामरा मोठा आणि शक्तिशाली होत असतो. अशा कथा ज्या वळणाने जातात त्याच वळणाने ही कथाही वाटचाल करते.

राही अनिल बर्वे यांनी पाहीलेल्या या भयानक स्वप्नासाठी त्यांना सलाम !
(सिनेमाची गोष्ट तर सांगितलीच नाही. गोष्टीत जीवच कितीसा ? ऐसा नही चलता क्या ? इनबॉक्स मे आ जाओ फिर )

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

BtW , जेव्हा विनायक पहिल्यांदा वाडयात जातो तेव्हा भीतीवर 6 7 बायका पीठ दळत आहेत असे चित्र आहे ते नोटीस केले का?
इकडे तिकडे उचक पाचक करताना एक मोठे जाते सुद्धा हलवतो तो.
त्या क्षणापर्यंत आपल्याला पिठाचे काय कोरिलेशन आहे ते माहीत नसते, पण उत्सुकता चाळवते

धारप किंवा स्टिफन किंग न वाचणार्यांना हा सिनेमा कळतो, आवडतो आहे का?>

कळतो पण कळला म्हणजे आवडला असे नाही.

> नाही. बायकोने यापेक्षा स्त्री चांगला होता असं बाणेदारपणे उत्तर दिलेलं अजून ठणकतंय. > हा हा Lol आधीपण ती अंधाधूनला जाऊयात म्हणत होती म्हणजे आमची आवड सारखी आहे बहुतेक.

> कळतो पण कळला म्हणजे आवडला असे नाही. > हो बरोबर आहे Happy

हस्तर चा बाधित व्यक्तीला ही सतत खायला लागत असते आणि कुठल्याही प्रकारचे खाद्य. पण मानवी देहाला ते सतत खाणे शक्य नाही म्हणून तो झोपी जाण्याचा उशाप असावा
हस्तर आ जायगा सो जा हा त्या व्यक्तीला हिप्नॉटाईज करत असावा. आजी हिप्नॉटाईज असते तोवर झोपून असते पण उठली की खायला लागत असते.

आणि जो पर्यंत तिला रेडिमेड खायला मिळत असते तोवर तिला इको सिस्टीम तयार करायची आवश्यकता नाही. पण तिला खाणे देणे बंद केले पण ती शापामुळे मरूही शकत नाही त्यामुळे तिला हा पर्यंत स्वीकारावा लागतो.
अग्नी मिळाला नाही तर मुक्ती नाही त्यामुळे विनायक आजीला आणि नंतर मित्राला अग्नी देतो आणि शेवटी पांडुरंग बापाला अग्नी देतो

आजीचे संवाद नीट कळले असते तर बराच उलगडा झाला असता मला. पण ते चेटक्याच्या आवाजातले संवाद फक्त 1 टक्का कळले Happy Happy

नाही, आज फक्त रेकी visit आहे, याची गरज नाही, म्हणून
जर बाहुली नेली तर हस्तर येईल,
पण पोरगा नजर चुकवून बाहुली नेतोच, अर्थात त्याला त्याचा परिणाम माहीत नसतो

पोरग्याला लवकरात लवकर केटी पूर्ण करून घ्यायची असते. बापाने खजिना लुटून मिळवलेलं सगळं त्याला पाहिजे असतं. म्हणून तो बाहुली घेऊन जातो.

राही अनिल बर्वे म्हणजे `थँक्यु मि. ग्लाड' वाल्या लेखक अनिल बर्वेंचा मुलगा का ?>> हो.
सोहम शाह म्हणजे कभी हां कभी ना वाल्या कुंदन शहांचा मुलगा का?>> नाही.

काल हा चित्रपट पाहिला. माझा प्रतिसाद नकारात्मक आहे. अर्थात खालील अभिप्राय माझा वैयक्तिक आहे.

तांत्रिक बाजू, कास्टिंग, सिनेमॅटोग्राफी इत्यादी बाबी अतिशय उत्कृष्ट. वादच नाही. याबाबत अगदी हॉलीवूडच्या झक मारेल असे जबराट काम झाले आहे. पण तरीही प्रामाणिकपणे एका वाक्यात सांगायचे तर मनाला इतका भिडला नाही. बघून झाल्यानंतर सुद्धा जो चित्रपट मनात रेंगाळत राहतो तो यशस्वी चित्रपट. इथे तसे अजिबात होत नाही. इथे स्पेशल इफेक्टद्वारे सिनेमा चकचकीत ठसठशीत करण्याच्या अतिरेकात सिनेमा माध्यमाचा कथा सांगण्याचा मूळ हेतू गुदमरला आहे असे राहून राहून वाटत होते. अनेकदा संवाद पण नीट ऐकू येत नाहीत. त्यामुळे कथानक तपशिलात कळतंच नाही. कथानक प्रेक्षकाला भिडण्यासाठी काही प्रसंगाना वेळ जास्ती द्यायला हवा होता आणि संवादावर व ते नाट्यमय करण्यावर सुद्धा जास्त भर द्यायला हवा होता. तिथे तो तितका दिला गेलेला नाही असे वाटले. तर काही ठिकाणी नाट्यमयता फारच कृत्रिम वाटली. निदान माझ्या बाबत तरी चित्रपट गुंतवून ठेवण्यात (engaging viewer) यशस्वी झाला नाही. मी नारायण धारपांची मूळ कथा ("तुंबाडचे खोत"?) वाचलेली नाही. पण सिनेमापेक्षा मूळ कथेचे वाचन नक्कीच खिळवून ठेवणारे असेल हे सांगू शकतो.

>> वडलांच्या अंगवस्त्राला लाच देऊन तुझ्याशी लग्न करीन म्हणणारं पोरगं अफलातून.

हा प्रसंग अजिबात झेपला नाही. पीरीयड फिल्म आहे. त्याकाळातील मुलाची मानसिकता अशा प्रकारची असेल का? धारपांच्या कथेत हा प्रसंग असेलसे वाटत नाही.

तिकीट स्वस्त आहे.120 रु रिकलायनर आणि 100 गोल्ड 80 सिल्व्हर.
Submitted by mi_anu on 14 October, 2018 - 08:01

कोणत्या थियेटरात? कारण पीव्हीआर कुमार प्लाझाला तर रिकलायनर ३०० रुपयेच्या पुढे आहे. (अर्थात माझ्याकडे एक व्होउचर होते त्यामुळे तुमच्या म्हणण्याप्रमाणे मला शंभर सव्वाशेच मोजावे लागले. पण तो भाग वेगळा)

रच्याकने: नारायण धारपांच्या कथांवर काही महिन्यांपूर्वी माबो वर धागा निघाला होता. धागा वाचला नाही, पण तो याच चित्रपटाच्या संदर्भात होता का? चित्रपट येऊ घातलाय म्हणून वगैरे? असो.

अतुल, स्पेशल इफेक्ट बद्दल बरोबर आहे.सगळं हाय फाय आहे पण त्यामुळे बीबीसी शेरलॉक सारखं कान ताणून ऐकावं लागलं.
काही करेक्शन
मायबोलीवर धारप कथा धागा अनेक वर्षांपासून आहे.शिवाय पिक्चर हा कोणत्या कथेची हुबेहूब प्रतिकृती नाही.धारप यांच्या 2 कथातले संदर्भ थोडे वापरलेत.बाकी पटकथा लेखकाची स्वतःची आहे.
तुंबाड चे खोत वर पिक्चर नाही हे सांगून आता तोंड आणि लेखणी दमलीय.युट्युब वर एका शहाण्याने पिक्चर येण्यापूर्वी स्टिंग ऑपरेशन करून तुंबाडचे खोत वर काढलेला पिक्चर आहे सांगून त्या कादंबरीतली पात्रं पिक्चर मध्ये आहेत वगैरे सर्व लिंक लावून चुकीची स्टोरी पण सांगितली होती.
(रहाटणी स्पॉट 18 ला होते हे दर. विकडे ला 60 ला गोल्ड 80 ला रिकलाईनर्स आहेत.या ड्राईव्ह करून.)

मी नारायण धारपांची मूळ कथा ("तुंबाडचे खोत"?) वाचलेली नाही. <<< बाय दी वे, 'तुंबाडचे खोत' धारपांचे नाही ते श्री. ना. पेंडसे यांचे आहे.

>> तुंबाड चे खोत वर पिक्चर नाही हे सांगून आता तोंड आणि लेखणी दमलीय.
>> 'तुंबाडचे खोत' धारपांचे नाही ते श्री. ना. पेंडसे यांचे आहे.

माझ्याप्रमाणे अनेकांचा घोळ झालेला दिसतोय ह्या बाबत Wink

मस्त चाललीय चर्चा, सीन टू सीन. सैराटवर अशीच झालेली ते आठवतं. पाठ झाला होता सैराट तेव्हा, तरी बघताना मजा आली, शेवट अंगावर आला. ह्या बाबतीतपण असं होईल बहुतेक.

माझी एक समजूत चुकीची होती असे आज आढळले:
मला वाटत होते की आदीमातेने हस्तरला इतर सोळा कोटी देवांपासून वाचवण्यासाठी आपल्या गर्भात लपवून ठेवले ते बाहेर न येण्याच्या अटीवर. मात्र ते तसे नाही. तिची अट अशी होती की कुणीही तुला पुजले नाही पाहिजे. जो कुणी पुजेल त्याला शाप लागेल. देवतांच्या हल्ल्यामुळे हस्तरचे अगणीत तुकडे झाले होते ते तुकडे भुकेजले आहेत. त्यांना बाहेर पडण्याची अनुमती तर आहे पण विनायकच्या शहाणपणामुळे ते बाहेर पडू शकलेले नाहीयेत. मला न सुटलेले कोडे इतकेच की, हे अंश वगळता वेगळा हस्तर आहे का? की सर्व अंश मिळून भव्य हस्तर बनतो? हस्तरचे अंश बाहेर आले तरी आपली भूक कशी भागवू शकणार आहेत?

राही अनिल बर्वेच्या फेबु पोस्टी वाचल्या. अफाट केवळ अफाट काम आहे. किती धाडस, चिकाटी, आपल्या स्वप्नांवरील निष्ठा आणि पॅशन आहे त्या माणसात. खरोखर अफलातून.

तुंबाडचा प्रिक्वेल यावा आता. शिवकाळात तुंबाडमधिल त्या वाड्याच्या सुवर्णकाळात कुठल्या तरी पुर्वजाच्या मनात जागी झालेली सुप्त लालसा. तेव्हाची सत्तास्पर्धा, तिला फ्युएल करण्यासाठी लागणारे धन मिळवण्यासाठी हस्तरची उपासना सुरू करतो. ती गोष्ट,तेव्हापासूण ते आजीपर्यंत. मराठेशाही, नंतर पेशवाई, अश्या १०० वर्षांच्या काळाची पार्श्वभुमी दाखवायची. कशीये कल्पना! :))

तुंबाडचा प्रिक्वेल यावा आता. शिवकाळात तुंबाडमधिल त्या वाड्याच्या सुवर्णकाळात कुठल्या तरी पुर्वजाच्या मनात जागी झालेली सुप्त लालसा. तेव्हाची सत्तास्पर्धा, तिला फ्युएल करण्यासाठी लागणारे धन मिळवण्यासाठी हस्तरची उपासना सुरू करतो. ती गोष्ट,तेव्हापासूण ते आजीपर्यंत. मराठेशाही, नंतर पेशवाई, अश्या १०० वर्षांच्या काळाची पार्श्वभुमी दाखवायची. कशीये कल्पना! :)) >>>>> मस्त आहे कल्पना, पुम्बा. Happy हयाचा सिक्वेलसुद्दा यायला हवा, आताच्या काळातला.

धन्स अंजुताई, राहींच्या पोस्टवर करतो कमेंट. त्यांचं १८- २० वर्षांचे ध्यासपर्व, १००० पानाच्या आसपास नुसता स्टोरीबोर्ड, माझ्या फुटकळ कल्पनेच्या हजारपट विचार त्यांनी केलाच असेल.

लव्हक्राफ्ट या अमेरिकन लेखकाच्या कथांत हस्तर ही संकल्पना खुपदा आलीये असे वाचले. आता, त्याच्या कथा वाचायला सुरूवात करतो.

आॅन ड्युटी इंजुरी आणि हस्तर चाॅकलेट्स का जवळ ठेवेल Rofl
मलाही काही शंका आहेत
विनायक आधी दाढीमिशा वाढवून का फिरत असतो आणि बायको पीठ दळून देते हे वाचून का चिडतो
ती सावकाराची सो काल्ड सूनच विनायकच्या माडीवर रहात असते का जिला पांडू लग्नाचं विचारतो
हस्तर वगैरे या कथेपूरतंच आहे की खरोखर असा कोणी देव/राक्षस होता
नंतर ते दिवाळीला आकाशात उडणा-या फटाक्यांसारखंं सारखं काय दाखवत होते.
एकंदरीत पूर्ण शेवटच कळला नाही, विनायकाची ती अवस्था कशी झाली, पांडु कसा वर आला, ते पिठाचं रिंगण तर अजिबातच नाही झेपलं
विनायकाच्या बायकोला आपण ब्राम्हण असल्याचा अभिमान असतो (पिठाची जाहीरात सुरूवातीची), मग नवरा असा रखेल्या ठेवतो हे तिला कसं पटतं (हा बादरायण संबंध असेल कदाचित), त्याला पैसे कसे मिळतात हे ती किंवा ईतर समाज /नातेवाईक, कधीच विचारत नाही का.
केटी म्हणजे नाॅलेज का
विनायकाची बायको मधेच त्या विधवेला घराबाहेर काढते तो काय प्रकार होता, ती काही चोरी करते का

विनायक आधी दाढीमिशा वाढवून का फिरत असतो आणि बायको पीठ दळून देते हे वाचून का चिडतो
-विनायक त्या झाड बनलेल्या म्हातारी पाशी गेलेला असतो.तिथे ते रहस्य हळूहळू जाणून घेऊन खरोखर त्या विहिरीत जाऊन नाणी घेऊन येण्यात तितके दिवस लागले तेव्हा तो गावात राहिला असेल, दाढी वगैरे ची चिंता न करता.बायको पीठ दळून देतेय हे वाचून चिडतो कारण त्याकाळी बायकांनी काम करणे नामुष्की असेल.

ती सावकाराची सो काल्ड सूनच विनायकच्या माडीवर रहात असते का जिला पांडू लग्नाचं विचारतो
हो.

हस्तर वगैरे या कथेपूरतंच आहे की खरोखर असा कोणी देव/राक्षस होता
हा लिजांड जुना आहे.स्टीफन किंग च्या कथेत पण आहे.पण संदर्भ हे नसतील.

नंतर ते दिवाळीला आकाशात उडणा-या फटाक्यांसारखंं सारखं काय दाखवत होते.
हे केव्हा?

एकंदरीत पूर्ण शेवटच कळला नाही, विनायकाची ती अवस्था कशी झाली, पांडु कसा वर आला, ते पिठाचं रिंगण तर अजिबातच नाही झेपलं
- दोघांनी अनेक बाहुल्या नेऊन हस्तर ला जास्त वेळ बिझी ठेवून जास्त किंवा सगळी नाणी मिळवायचं ठरवलं.पण ऐन वेळी हस्तर च्या अनेक प्रतिमा आल्यावर आता आपण संपलो हे त्यांना जाणवलं.अनेक हस्तर त्या बाहुल्यांसाठी झगडत असताना विनायक चा निर्णय पक्का झाला आणि तो बाहुल्या बांधून तयार झाला.पांडुरंग ला याचा परिणाम काय ते चांगलं कळलंय आणि तो बापाला धरून रडतो.कितीही स्वार्थी, लोभी मनुष्यजात असली तरी आपल्या वंशजा साठी बलिदान आणि त्याग करू शकते.विनायक बाहुल्या बांधून चढतो.सगळे हस्तर त्याच्यावर तुटून पडतात.मग तो खाली पडल्यावर चिकटलेले हस्तर राख होतात.तुंबाड चा पावसाचा शाप संपून ऊन पडते.दुःखी पांडुरंग कसाबसा बाहेर येतो.बापाची अवस्था बघून सोनं नाकारून वैफल्याने बापाला अग्नी देऊन तो निघून जातो.अति लोभात शेवटी सगळं प्रिय गमावलं.

विनायकाच्या बायकोला आपण ब्राम्हण असल्याचा अभिमान असतो (पिठाची जाहीरात सुरूवातीची), मग नवरा असा रखेल्या ठेवतो हे तिला कसं पटतं (हा बादरायण संबंध असेल कदाचित), त्याला पैसे कसे मिळतात हे ती किंवा ईतर समाज /नातेवाईक, कधीच विचारत नाही का.
-ब्राह्मण स्त्री ने दळलेले पीठ वगैरे तिचा अभिमान नसून त्या काळ चा यु एस पी असेल.आता शुद्ध तुपातल्या जिलब्या विकतात तसे.त्या काळी बाहेरचे आयते विकतचे नैवेदयाला आणि सोवळ्यात भ्रष्ट झाल्याने चालणार नाही असे फंडे असतील.विधवा घरात असणे हा तिचा नाईलाज.त्या काळी पुरुष काही चालू देत नसत.अंगवस्त्र पण कॉमन होते.

केटी म्हणजे नाॅलेज का
विनायकाची बायको मधेच त्या विधवेला घराबाहेर काढते तो काय प्रकार होता, ती काही चोरी करते का
-तिला चांगले माहीत असते विधवा का आहे घरात.म्हणून बाहेर काढले.पण नंतर तिला परत आणून डोक्यावर बसवले आहेच विनायक ने.

Pages