तुम्हाला स्वतःची कधी लाज वाटली काय?

Submitted by प्रीत००९ on 30 August, 2018 - 12:42

माननीय कटप्पा यांच्याकडून स्फुर्ती घेऊन हा उद्योग.
तर मंडळी तुम्हाला आपल्या कृत्यांची कधी एकांतात लाज वाटली का? पश्चाताप होतो का?
१) जवळच्या व्यक्ती वर चोरीचा संशय घेणे,नंतर ती वस्तू आपणच कुठेतरी ठेवलेली आढळणे.
२) कुणाची वस्तू ढापणे.
३)उसने घेतलेले पैसे बुडवणे.
४) जोडीदाराशी प्रतारणा करणे.
पुढचे तुम्ही सांगा.
लहानपणी गावच्या जत्रेत एक आजी तळलेली मटकी विकण्यासाठी आली होती तेव्हा काही पोरांनी तिच्याकडून हिसकावून सर्व मटकी खाल्ली त्यात मीसुद्धा सामील होतो.
एकदा आजोबांनी भावाला व मला खवा खाण्यासाठी विकत घेऊन दिला होता,भाऊ आत साखर आणायला गेला इकडे मी सगळा खवा खाऊन टाकला.
आईबापांनी कष्टाने पाठवलेले पैसे दारू पिण्याकरिता खर्च केले.
मोठा भाऊ पास झाल्यावर त्याचे पुस्तकं त्याला न विचारता रद्दीत विकून त्या पैशांची चैन केली.
अजून भरपूर चुका केल्यात आता फार पश्चाताप होतो.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वतःची लाज वाटावी अशा भरपूर गोष्टीं केल्या आहेत,
पण इथे त्या स्वतः:च्या तोंडाने सांगून लोकांच्या हाती कोलीत देण्यात अर्थ नाही
त्यामुळे इकडे फक्त वाचनमात्र.
पुढे मागे धीर झाला ,किंवा सौम्य लाज वाटावी आशा गोष्टी आठवल्या तर लिहीन Happy

स्वतःची लाज वाटावी अशा भरपूर गोष्टीं केल्या आहेत,
पण इथे त्या स्वतः:च्या तोंडाने सांगून लोकांच्या हाती कोलीत देण्यात अर्थ नाही

>>>>> +१

चांगला धागा !
सीमंतिनी नावाच्या आयडी ला एकदा उद्धट प्रतिसाद दिला होता , नंतर वाईट वाटले आणि परत तसे केले नाही.

एकदा मी एका भिका-याला ५००० रू दिले. नंतर मलाच माझी लाज वाटली म्हणून मग पुन्हा ५००० रू दिले
अशा प्रकारच्या प्रतिसादांच्या प्रतिक्षेत

भावाचा नेटपक त्याने नको सांगितलेले असतांनाही त्याच्या गैरहजेरीत संपवला
आता खुप वाईट वाटतं

मला वाटतं हे योग्य फोरम नाही अशा प्रकारच्या गोष्टी लिहायचं.
इथे निर्हेतुक पणे लिहिलेल्या पोस्टीं वरून पण लोकांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करताना पाहतोय. अशा वेळी
>>>पण इथे त्या स्वतः:च्या तोंडाने सांगून लोकांच्या हाती कोलीत देण्यात अर्थ नाही<<< हेच धोरण बेस्ट Sad

इथे लिहिण्यापेक्षा शक्य असल्यास त्या त्या व्यक्ती जवळ माफी मागा.
अगदी शाळेपासून ते प्रौढ वयात देखील, ज्याना दुखावलं, त्यांना संपर्क करून त्यांची माफी मागणे आणि प्रत्यक्ष त्या व्यकीतजवळ दिलगिरी व्यक्त करणे. आतापर्यंत तरी खूप चांगला अनुभव मला स्वतःला आला आहे.
लोकांना बरेचदा लक्षात असतं इतक्या वर्षानंतर देखील आणि त्यांना खूप बरं वाटलेलं मी अनुभवलंय जेव्हा आपण इतक्या वर्षांनी का होईना आपली चूक त्यांच्याजवळ प्रत्यक्ष कबुल करतो

चुकतो तो माणूस. आपण आपल्या चुकांची माफी मागुन मोकळे व्हावे हेच योग्य.
रच्याकने दिवसाच्या नक्की कोणत्या प्रहरात बोचणी लागते? Wink

एकदा मी एका भिका-याला ५००० रू दिले. नंतर मलाच माझी लाज वाटली म्हणून मग पुन्हा ५००० रू दिले
अशा प्रकारच्या प्रतिसादांच्या प्रतिक्षेत>>>>>> Rofl

सर्वांना धन्यवाद. असुफजी कुठेतरी इगो आडवा येतो. chatroom सारखं इथं कुणी एकमेकांना प्रत्यक्ष ओळखत नाही. फार थोडे आयडी एकमेकांच्या संपर्कात असावेत. तेव्हा कोलित हाती देण्याची भिती रास्त नाही. म्हणजे पहा आपण या खोट्या आयडी रूपी ओळखीचाही अहं किती कुरवाळतोय.
माणसानं निदान स्वतःशी तरी प्रामाणिक रहावे असं माझं (फक्त माझंच) मत आहे .
रच्याकने मायबोलीवर माझा लेखनाचा पहिलाच प्रयत्न आहे,तसेच संस्थळांवर आजपर्यंत कधीच लिहीण्याचा अनुभव नाही.तस्मात्‌ अस्मादिकांना सांभाळुन घ्या.

कोलित हाती देण्याची भिती रास्त नाही.

--- तुम अबि नया है... दिरे दिरे सब समज जायगा. अनुभवाने पोळलेली बरीच लोकं आहेत इथे.

मयने सबकु कब्काच फाटे पे मारेल हय. नाउमेद व्हने की बातच नै.
हा माझा चौथा आयडी हाये. मय पुराना खिलाडू है.

रच्याकने मायबोलीवर माझा लेखनाचा पहिलाच प्रयत्न आहे,तसेच संस्थळांवर आजपर्यंत कधीच लिहीण्याचा अनुभव नाही.

हा माझा चौथा आयडी हाये. मय पुराना खिलाडू है.

--- आता लगेच येईल अनुभव Happy

मयने सबकु कब्काच फाटे पे मारेल हय. नाउमेद व्हने की बातच नै.
हा माझा चौथा आयडी हाये. मय पुराना खिलाडू है.
नवीन Submitted by प्रीत००९ on 31 August, 2018 - 13:42

इसीलिये मैने पुछ्या था,
रच्याकने दिवसाच्या नक्की कोणत्या प्रहरात बोचणी लागते? Wink

मय काय कर्ताय बोलू क्या, कोई मेरे पिचे पड्या ना? मंग लई दिस मायबोली उघडत्याच नय. बीळमें पडके रवतय.
सांच्या टैमाला उलशीक घितली की लई बोचणी लगती हय पाथभै.

रच्याकने मी समाजात एक यशस्वी,साळसुद माणूस म्हणून ओळखला जातो पण आत मी एक पाताळयंत्री,स्वार्थी,ढोंगी,लंपट,बदमाश व गुन्हेगार की जो अजून पकडला गेला नाही, खुनशी, भडकवणारा माणूस आहे.

लाज वाटावी किंवा जबरद्स्त खटकलेली आणी मनात रुतून बसलेली आठवण
पूर्वायुष्यात मी पन्चवीसेक वर्‍षे वयाचा असताना पौरोहित्य (भटजीपणा) करत असे .
चिपळूण जवळच्या एका खेडेगावात एका गरीब म्हातारी कडे तिच्या तरुण मुलाचे वर्षश्राद्ध होते , तो बिचारा नुकताच बारावी आयटीआय करून दुबईला नोकरीला गेला होता आणि परत आल्यावर लग्न झाले एक मुलगा झाला आणि एका अ‍ॅक्सीडेन्ट मध्ये त्याचा मॄत्यु झाला होता . घरची परिस्थिती अत्यन्त हालाखीची होती . त्या म्हातारीच्या ५/६ वर्षाच्या नातवाने वर्षश्राद्ध विधी केले . त्याची आठवण म्हणून त्याने दुबईवरुन आणलेले एक नवेकोरे कॅसिओ डिजिटल घड्याळ त्या म्हातारीने ब्राह्मणास म्हणजे मला दिले.

खरेतर मनातून त्या कार्याची दक्षिणा घेण्यास मन धजावत नव्हते , परन्तु मला तिथे दुसर्‍या भटजीनी पाठवलेले असल्याने त्यानी सान्गितलेली २५१/- रुपये दक्षिणा घेवून तिथून बाहेर पडलो , मनोमन असे ठरवले होते की नन्तर मनीऑर्डर ने ती रक्कम त्या कुटुम्बास पाठवून देइन , पण नन्तर कामाच्या गडबडीत ते राहून गेले आणि त्या यजमानाचे नावही विस्म्रुतीत गेले.

या गोष्टीची अजूनही मनास जबरदस्त चुटपूट लागून राहिली आहे

Sad

मी ४-५ वीत असेल तेव्हा आई आणि मी आजोळी गेलो होतो. आईला बांगड्या भरायच्या होत्या म्हणून एक कासार आला होता. आईने, आजीने बांगड्या भरल्या. मी त्या रंगबेरंगी काचेच्या बांगड्या बघून खूप खूष झाले होते त्यामुळे मलाही बांगड्या घेण्यासाठी आईच्या मागे लागले होती. काचेच्या बांगड्या फुटून मला लागतील म्हणून आईने कासाराला, मला प्लास्टिकच्या बांगड्या भरायला सांगितलं. मी त्या' नको म्हणत असताना त्याने हातात भरल्या त्यापण घट्ट . मला त्यावेळी आईचा खूप राग आला होता म्हणून मी लगेचच कात्रीने बांगड्या कापल्या.
आईचा स्वभाव बघता आता जबरदस्त मार पडणार हे नक्की होतं पण त्यावेळी आई साधं ओरडलीसुद्धा नाही. तिने कासाराला सांगून मला काचेच्या बांगड्या भरायला लावल्या.
त्या क्षणापासून ते आज २२-२३ वर्षे झाली असतील मला स्वतःची लाज वाटते. तिथे जमलेल्या आईच्या मैत्रीणी, मावश्या, आजी सगळ्यांना काय वाटलं असेल. आईला तेव्हा नक्कीच खूप वाईट वाटले असेल म्हणूनच ती मला काहीही बोलली नाही.
नेहमी वाटते की त्या प्रकाराबद्दल आईची माफी मागावी पण अजूनही हिंमत होत नाही.

मला एकदा "वजन कसे कमी करावे" या व्याख्यानासाठी निमंत्रित केले होते. पाच सहा लाखांचा जमाव जमला होता. भाषण केबल टीव्हीवर लाईव्ह होते. मी पैसे घेत नाही हे आयोजकांना माहीत होते. भाषण संपल्यावर टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. आयोजकांनी आवाहन केलेले असतानाही नागरिकांच्या वतीने मला एक चेक देण्यात आला. मी नम्रपणे नाही म्हटले. पण त्यांनी कसानुसा चेहरा केला आणि हातात तर घ्या म्हणाले. मी चेक हाती घेतला आणि पाहिले तर पाच कोटीची रक्कम.
पाच कोटी आजही किरकोळ रक्कम नाही. हो कि नाही ? एव्हढे पैसे देण्यामागे नागरिकांचे असलेले प्रेम पाहून माझ्या डोळ्यांत पाणी आले.
पण मला पैसे घेता येणार नाहीत कारण माझी तत्त्वं आहेत हे मी आयोजकांनाही ठणकावून सांगितलेले होते. माझ्यावर प्रेम करणा-या जनतेला नाही कसे म्हणायचे हा प्रश्नच पडला होता. पण शेवटी तत्त्वं जिंकली आणि मी नकार दिला.
हे ऐकल्याबरोबर अनेक लोक रडू लागले. काही बेशुद्ध पडले. काही जमिनीवर फतकल मारून विलाप करू लागले.
मला आयोजकांनी गर्दीतून बाहेर काढले आणि गाडीत बसवले. पण माझ्या डोळ्यासमोरून ते दृश्य जात नाही.
आजही मला तो पाच कोटीचा चेक आठवतो आणि तो न घेतल्याबद्दल माझीच मला लाज वाटते.

माझ्या ऑफिसात मी सुरूवातीचे दिवस अ‍ॅडमिन मध्ये होते. आणि संपुर्ण कंपनीचे कामकाज अ‍ॅडमिनमधले आम्ही दोघेच करत असल्याने आमच्या भोवती कायम माणसांचा गराडा असायचा. त्यातून माझा स्वभाव थोडा फटकळ आणि कडक असल्याने मी साधं नॉर्मल आवाजात बोलले तरीही ते चिडून बोलल्यासारखे वाटे (कदाचित अजूनही असेल) वेगवेगळ्या डिपार्टमेंट्सशी संबंध यायचा त्यात एक व्हिपी आणि त्यांची सेक्रेटरी ही होती. ते दुसर्‍या लोकेशन वर बसायचे. त्यामुळे नेहमी प्रत्यक्ष संपर्क यायचा नाही. नंतर मी अ‍ॅडमिन सोडलं आणि माझी पण त्या लोकेशन ला बदली झाली. ती सेक्रेटरी येता जाता भेटली तरी फक्त हाय बाय करायची, बाकिच्या मुलिंसोबत भेटली तरी तिच्या बोलण्यात मला कडवटपणा जाणवायचा. अनेको वर्षांनंतर असंच एकदा पुर्वीच्या दिवसांचा विषय निघाला तेव्हा तिने ओपनली बोलून दाखवले की तु अत्यंत खडूस्पणे वागायचीस तेव्हा आणि माझा बॉस पण तुझ्याशी बोलायला लागू नये म्हणून आटापिटा करायचा, अगदीच वेळ आली तर मला (तिला) माझ्याशी बोलायला सांगायचा वगैरे. मला हे ऐकून इतका धक्का बसला... Sad मी डेस्कवर परतले आणि मला स्वतःची प्रचंड लाज वाटली.
कामाच्या त्या वेळच्या प्रेशरमध्ये आपण कित्येक लोकांच्या मनात आपली अशी इमेज करून ठेवली असेल हा विचार करून कसंसंच झालं. लगेच त्या मुलिला एक ईमेल लिहिला आणि त्यात मनापासून माफी मागितली. तिचा पण रिप्लाय आला. तिने मोठ्या मनाने मला माफ केले.
त्यानंतर कधीही रस्त्यात भेटली तर छान गप्पा व्हायच्या. ती सोडून गेली तेव्हा तिच्या गुडबाय च्या ईमेल ला पण मी छान रिप्लाय दिला होता त्यावर ती खूप इमोशनल झाली तो वाचून असा रिप्लाय आला होता तिचा.
अनेकदा आपण फक्त आपल्यापुरते पाहून, विचार न करता वागतो/बोलतो आणि त्याचा इतर लोकांवर कायमचा चांगला/ वाईट परिणाम होतो. त्या मुलिच्या डोक्यात हे संपुर्ण पणे भिनले होते की मी तशीच आहे आणि किमान ७-८ वर्ष हे कोळ्याचं जाळं आमच्यातून हटलं नाही. याचं वाईट वाटलं. पण तिची माफी मागून चूक सुधारल्याचं समाधानही झालं.

अनेकदा आपण फक्त आपल्यापुरते पाहून, विचार न करता वागतो/बोलतो आणि त्याचा इतर लोकांवर कायमचा चांगला/ वाईट परिणाम होतो.>> अगदी बरोबार दक्ष्शु ताई

तेव्हा मी भटजीचे काम म्हणजे मुंजी लग्न लावुन देणे वगैरे करायचो. एकदा एका लग्नात पुजा मांडत असतांना सहज तोंडातून, 'माय नेम इज शीला, शिला कीजवानी' हे गाणे माझ्या नकळत बाहेर पडू लागले. बाजूलाच गप्पा मारत बसलेल्या बायकांना आधी मी काहीतरी पुजा मांडायचा मंत्र म्हणतोय की काय असे वाटले पण जवानी जवानी असे दोनदा शब्द कानावर पडल्यावर त्यांनी चमकून माझ्याकडे बघितले, मला ते जाणवले पण माझी त्यांच्याशी नजर भिडवण्याची हिंमत झाली नाही... फार फार लाज वाटली तेव्हा.

नवीन Submitted by आमचा खड्डा on 31 August, 2018 - 05:33>>>>>

हा बोकलत यांचा आयडी आहे का ??????????? म्हणजे आता इथे मुद्द्याचे सोडून बाकी सगळे लिहिले, चर्चिले जाणार ते स्वस्तुतीपर असेल. इथे आता न आलेले बरे.

ओ अजनबी ओ अजनबी,
मै ने जो लिखा है वो सच है साथियां यां यां... मेरे सामनेही ये घटा है साथियां यां

Pages