राझी - उध्वस्त होण्याला दिलेली मान्यता

Submitted by माधव on 20 July, 2018 - 00:01

बहुतेक भारतीयांना भगवद्गीतेबद्दल महिती असते - कुणाला ती तोंडपाठ असते, कुणी नीत्यनेमाने वाचतात तर कुणी त्यावर चर्चा करतात. पण फार थोड्या जणांना गीता खर्‍या अर्थाने समजलेली असते. गीता जऊद्या, ते खूप मोठे प्रकरण आहे (खरं तर गीतेत अनेक प्रकरणे (अध्याय) आहेत) पण ती ज्या प्रसंगात सांगितली गेली तसा प्रसंग आपल्यापैकी खूप कमी जणांच्या आयुष्यात येतो. कारण सोपं आहे - आपण पळपुटे असतो! युद्ध आणि आपण यांची सांगड प्रत्यक्ष आयुष्यात तर दूरच, आपण स्वप्नात देखील घालत नही. आपण ज्या काही तथाकथीत लढाया लढतो त्या स्वहीत आणि त्यानंतर आपल्या कुटुंबाचे भले येवढ्याच मर्यादीत हेतूने केलेल्या असतात. आता युद्धच करायचे नाही म्हटल्यावर आपल्या प्रियजनांशी युद्ध करायचा प्रश्नच उद्भवत नाही. मग जर का कोणी आपल्याला सांगितले की आधी प्रेमाची नाती तयार करा अणि मग त्या जीवलगांशी युद्ध करा तर ?

"येडंच आहे! मी काय कोळी वाटलो का ? आधी जाळे विणायला आणि मग त्यात न अडकायला? अरे इथे गणपती गेल्यानंतर आरास काढायला जीवावर येते. इतक्या चटकन् निर्जीव गोष्टीत जीव अडकतो माझा आणि म्हणे जीवलगांशी युद्ध!"

पण काही जण हे करू शकतात आणि त्यातलीच एक म्हणजे सेहमत - आपल्या सिनेमाची नायिका! नाही नाही! ती कोणी लष्करातली अधिकारी नाहीये ना कोणी प्रशिक्षीत हेर. ती एक कॉलेजात शिकणारी साधी मुलगी आहे. एक तुरुतुरु पळणारी खार एका गाडीखाली येणार असते आणि तिला आपल्या जीवाची पर्वा न करता वाचवताना सेहमत पहिल्यांदा भेटते आपल्याला. आपल्या मनातही येत नाही की हा प्रसंग सिनेमात पुढे खूप महत्वाचा ठरणार आहे.

तर अशी ही सेहमत भारतासाठी हेरगीरी करायला तयार होते ते केवळ आपल्या वडलांच्या शब्दाखातर. देशाबद्दल प्रेम प्रत्येकालाच असते. पण त्याकरता प्राण द्यायला फार कमी जण तयार असतात आणि केवळ वडलांचा इच्छेखातर देशासाठी प्राण द्यायला तयार होणारे अगदीच विरळा. पण सेहमत तयार होते - राझी होते.

सेहमतच्या वडलांना पकिस्तान भारताविरुद्ध काहीतरी कारस्थान रचतोय आणि नजीकच्या काळात काही तरी घडणार आहे याची कुणकुण लागते. ते भारतासाठी हेरगीरी करत असतात आणि त्याचाच एक भाग म्हणून पकिस्तानी सैन्यातल्या अधिकार्‍यांच्या घरी त्यांची उठबस असते. कारस्थानाची माहिती काढणे त्यांना शक्य असते पण त्यांच्याकडे वेळ आणि शक्ती दोन्ही नसते. त्यांचे अफेअर सुरू असते - कॅन्सरशी! आणि त्यापासून अलिप्त राहणे त्यांना आता अशक्य असते. दुसर्‍या कोणाला त्यांची जागा घेता आली असती पण इतक्या कमी वेळात विश्वास संपादून इतक्या आतल्या गोटात पोहचणे निव्वळ अशक्य असते. त्यांचा डोक्यात एक अतर्क्य प्लॅन तयार होतो - आपल्या पोटच्या मुलीला पाकिस्तानी अधिकार्‍याची सून करून पुढची माहिती काढायची. तो प्लॅन अतर्क्य आपल्याकरता असतो पण त्यांच्याकरता तो अगदी सहज असतो कारण त्यांची हेरगीरीची कारकिर्द सुरू झाली असते अशाच एका शब्दाखातर! सेहमतच्या कानावर ते आपला प्लॅन घालतात आणि ती वेडी तयार होते.
सेहमत राझी होते पण ती कशाला तयार झाली आहे ते ना तिला कळत ना आपल्याला. तिचे हेरगीरीचे प्रशिक्षण सुरू होते आणि आपण हेरगीरीवरचा सिनेमा आहे असे समजून सिनेमा पहायला लागतो. सिनेमाच्या प्रोमोजमध्ये पण तेच सांगितले होते. आपणही तेच ग्राह्य धरतो.

ट्रेनींग सुरु होते आणि आपल्याला भेटतो मीर - सेहमतचा प्रशिक्षक आणि तिच्या वडलांचा सुहृद! तिच्याविषयी वाटणारे कौतुक आणि माया तो कडक शिस्तीच्या बुरख्यात लपवून ठेवतो. तिला कसलीही उसंत न देता, 'छोटीशी चूकही तुझ्या जिवावर उठू शकते' हे तिच्या मनावर बिंबवत तो तिचे ट्रेनींग पूर्ण करतो. पूर्ण करतो म्हणण्यापेक्षा जेवढे शक्य असते तेवढे तो तिला शिकवतो. सेहमत पुरती तयार झाली नाहिये हे त्याला माहित असते पण नाईलाज असतो, सगळे यथासांग करण्याइतका वेळ नसतो. तो एक मात्र करतो - परक्या मुलखात सेहमतसाठी अनेक पळवाटा बनवून ठेवतो.

मग वेळ येते ती बिदाईची आणि पडद्यावर येते ते एक अप्रतिम गाणे - दिलबरो. लग्न, आपला जोडीदार याबद्दल कधी फारसा विचारच केलेला नाहीये, ज्याला भेटणे तर दूरच कधी पाहिले पण नाहीये अशा शत्रू देशातल्या माणसाबरोबर लग्न झालय, वडलांना परत कधीच भेटू शकणार नाही हे पण कळलंय आणि मग घराचाच नाही तर देशाचाच उंबरठा ओलांडायची वेळ येते. सेहमतची मनस्थीती ते गाणे अगदी तंतोतंत मांडते. गाणी हा आपल्या सिनेमाचा अविभाज्य भाग आहे आणि मी हिंदी सिनेसंगीताचा प्रचंड चाहता आहे. पण बर्‍याचदा हे गाणे आत्ता का आहे हा प्रश्न मला पडतोच. प्रसंगाला अनुसरूनच नाही तर तो प्रसंग अधीक गहीरा करणारी गाणी आपल्या सिनेमात फार कमी असतील. दिलबरो त्यातलेच एक. गाणे सुरू झाल्यावर अंगावर काटा आला होता माझ्या. गाणं ऐकताना हे पण जाणवलं की समोर चालू आहे ती हेरकथा नाहीये, एक वेगळंच रसायन आहे. खूप वेगळं आणि गहीरं!

लग्नाबरोबर सेहमतच्या आयुष्यात इक्बाल येतो. "आपलं लग्न केवळ आपल्या वडलांच्या निर्णयावरून झालेय पण आपण मात्र एकमेकांना अनोळखीच आहोत." पहिल्या दिवशीच इतका समजूतदारपणा दाखवणार्‍या नवर्‍याच्या प्रेमात न पडणे कठीण आहे पण तरीही सेहमत स्वतःला सावरते. पण ते सावरणे तात्पुरते ठरते. त्याच्या समजुतदारपणापुढे आणि प्रेमापुढे ती हतबल होते. आत्तापर्यंत मला तीन उमदे माहित होते - पहिला उमदा हा एक व वनस्पती तूपाचा ब्रँड होता, दुसरा गोष्टीतला राजकुमार (राजा किंवा इतर पुरुष कधीच उमदे नसायचे) आणि तिसरा उमदा म्हणजे घोडा. राझीत चौथा आणि खराखुरा उमदा बघायला मिळाला - इक्बाल.

घरात सगळ्यांना तिचे कौतुक असते - फक्त अब्दुल सोडून. त्याला तिच्यावर कायम संशय असतो. हळूहळू ती नविन घरात रुळू लागते आणि कामातही. पण ती काही सराईत हेर नसते, हातून लहान सहान चुका होतच असतात. आणि अशीच एक चूक अब्दुलच्या लक्षात येते. काही पर्यायच उरत नाही तिच्यापुढे. एके काळी गाडीखाली येणार्‍या खारीला वाचवणारी सेहमत आता....

प्रवास पुढे चालूच राहतो - यशाच्या दिशेने. पण त्या वाटेवरचे प्रत्येक पाउल तिला उध्वस्त करत जाते. योद्ध्याला युद्धात विजय मिळाला तर तो काही अंशी तरी उपभोगता येतो. पण इथे सेहमतला विजय मिळूनही ती सर्व काही हरते. सिनेमा संपतो तेंव्हा रेहमत एका अतिशय साध्या (पडक्या म्हणाव्या अशाच) घरात एकटी असते. घरी लाडाकोडात वाढलेली, सासरीही ऐश्वर्य उपभोगलेली ती, आता अर्थ शोधत असते विजय, नाती, आयुष्य यांचा. त्यांच्यापुढे ऐश्वर्याची काय किंमत? त्या सीनमध्ये तिच्या बाजूला एक माठ दाखवला आहे. तिचे आयुष्यही आता त्या माठातल्या पाण्यासारखे आहे - शांत, थंड! पण एके काळी त्या पाण्याने त्सुनामी आणली होती.

आणि या सगळ्याला सुरुवात झालेली असते - तिच्या राझी होण्यापासून!

आलिया - काय लिहू तिच्याबद्दल? आजच्या घडीला तिच्यासारखी हरहुन्नरी अभिनेत्री दुसरी नसावी. सेहमत तीने अगदी सहज उभी केलीये आणि ही सहजता खूप गरजेची होती. हेरगीरीचे बेअरींग थोडे जरी जास्त झाले असते तरी सिनेमाचे गणित साफ कोसळले असते.

विकी कौशल - प्रत्येक चित्रामध्ये बॅकग्राऊंडला खूप महत्व असते. कुठल्याही सिनेमाचेही अगदी तसेच असते. महत्वाची भूमीका खुलून दिसण्याकरता बाकीच्या अभिनेत्यांची साथ खूप महत्वाची असते. इक्बालच्या भूमीकेत अभिनयाला फारसा वाव नव्हता पण त्याने त्याचे काम अगदी चोख केलय.

रजीत कपूर - बाप आणि सच्चा देशभक्त यांच्यातले द्वंद्व खूप सुरेख दाखवलय. व्योमकेश बक्षीनंतर तो पहिल्यांदाच इतका लक्षात राहिला.

मेघना गुलझार - सिनेमात फक्त आणि फक्त सेहमतची कामगीरी दाखवली आहे. आणि शेवटचा एक सीन, जो अनेक वर्षांनी घडतो. पण त्या एका सीनच्या जोरावर मेघना हेरकथेचे रुप पूर्ण पालटून टाकते. आणि मग ती होते सेहमतची कथा, तिच्या विजयाची, तिच्या अपरीमीत दु:खाची! गुलझारचे अनेक चित्रपट पडद्यावर अडीच तासात संपतात पण मनात मात्र वर्षानुवर्ष चालूच असतात. हा सिनेमा अगदी त्याच पठडीतला आहे. मेघना असली तरी शेवटी ती गुलझार पण आहेच.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी ही बघायला प्राइम सबस्क्रिप्शन रिन्यू केलं पाच मिनिट पण बघवला नाही.>> अमानी चुकुन्न रइस किवा हॅलो जिन्दगी लावला का? शाखाला बघुन म्हणत असतिल ५ मिनिटही बघवला नाही.

सुरवातिला खारीला वाचवायला धावणारी , रक्त बघु न शकणारी ते एक्दम सिक्रेट एजन्ट वैगरे तेच ते प्रेडिकटबेल सिन आणी काहि फ्लॉज सोडले तर आवडला, आलिया नाजुक मुस्लिम सुन म्हणून मस्त वावरली आहे, रोल तिच्यासाठी टेलरमेड असावा इतका परेफेक्ट जमलाय, शेवटपर्यत होल्ड सुटत नाही मुव्हिचा, दिलबरो इज द बेस्ट , खुप वेळ मनात रेन्गाळत राहते ट्युन

दिलबरो आणि मेल - फिमेल वॉईसमधलं ए वतन शांतपणे बुचं कानाला लावून ऐकलं तर फार भारी आहेत दोन्ही गाणी.

प्राजक्ता - तो खारीचा सीन नुसता स्वतंत्र पणे पाहिला तर तसा वाटेल. पण वरती माधव यांनी लिहील्याप्रमाणे नंतरचा तिचा स्वतः गाडी चालवतानाचा सीन पाहिला तर तो संदर्भ जबरदस्त आहे.

माधव - सुंदर लिहीले आहे, आधी सांगायचे राहिले Happy

अमा, तुम्ही कधी कधी अगदी चकीत करता! Happy
सेक्रेड गेम्स बघताना तुम्हाला मुंबईत नव्याने आल्यावर कसा तग धरावा ह्यातल्या फिलॉसॉफी चा साक्षात्कार झाला पण राझी पहिली पाच मिनीटं बघून सहन न होऊन बंद केलात तुम्ही? Happy

कधी कधी सरळ सोट कॅरॅक्टर इंट्रॉडक्शन सपक वाटते आणि सुरुवातीस ' जर्क ' बसले नाहीत तर पुढे पाहण्याची उत्सुकता मरून जाण्याचीही शक्यता असतेच म्हणा... अमा>चे तसे झाले असेल.

असं होतं पण. एखादे पुस्तक, सिनेमा अगदी खात्रीच्या माणसाने शिफारस केली नसेल तर पाहण्याचे धाडस होत नाही. सेक्रेड गेम्स पाहताना सुरूवातीला नेहमीचा हिंसाचार पाहून नेहमीचा मसाला वाटला होता. त्यात गुंतण्यासाठी सबटायटल्स ऑन केले थोडा वेळ. गोडी लागल्यावर बंद केले. काल परमाणू पाहतानाही तसेच.. अलिकडे पूर्ण लांबीचा सिनेमा सिनेमाहॉल मधे जाऊन पाहिल्याशिवाय पाहून होत नाही.

काल राझी बघितला. बऱ्यापैकी आवडला.

पण बऱ्यापैकी लुपहोल्स आहेत.

ज्या खोलीत मिटिंगस होतात त्याच्या चाव्या सुनेला मिळणे कठीण नाही पण ती रात्री बेरात्री उठून खालच्या मजल्यावरील त्या खोलीत जाते व कोणाला काही कळत नाही हे पटायला कठीण वाटले.

अब्दुलला तिच्या गुप्तहेरीचा पुरावा हाती लागल्यावर तिथेच ओरडला असता तरी पाच सहा जण धावले असते. मुनिराची मोलकरीण मुनिराच्या केसांना तेल लावत असते म्हणजे निदान त्या दोघी तरी जाग्या होत्याच. त्या ऐवजी तो मालकाला सांगायला धावत सुटतो व त्याला मारणे सोपे करतो. ती गाडी मिळणेही काहीच्या काही.

शेवटी बेग बनून येतो तो मीर हे पाहताना लक्षात आले नाही. इथे वाचून कळले. त्याला ती ठामपणे मॉलमध्ये येते म्हणून सांगते. तिथे गेली म्हणजे तिथून थेट भारतात हे माहीत असते. मग मदत मागायला जाणे कशाला करते कळले नाही. गाडी मिळण्यासाठी फोन केला व ड्राईव्हर गाडी घेऊन आल्यावर त्याला घेऊन थेट मॉलवर जाता आले असते. हिला घेऊन परत घरीच जायचे हे कुठे त्याला माहित? तसेही नंतर त्यालाच घेऊन जाते ना..

घर व तिचे काम सोडून इतर फारशी माहिती नसलेल्या तिने शेवटी मीर लपला ती जागा कशी शोधली?

हे वगळता चित्रपट आवडला. कामे सुरेख झालीत.
दोन प्रसंगात नवऱ्याबद्दल वाईट वाटले. ती बंदूक रोखून उभी असते तेव्हा तो विचारतो, आपल्या दोघाच्या नात्यात सच्चे असे काही होते का? व शेवटी वडलांना हिच्याबद्दल सांगतो तेव्हा.
प्रतारणेचे अश्रू त्याला आवरत नसतात पण तरी वडील तिला हरामखोर म्हणतात तेव्हा ती तिच्या देशासाठी करत होती जसे आपण आपल्या देशासाठी करतोय म्हणतो.

विकी कौशलने शेवटच्या दोन्ही प्रसंगी खूप सुरेख काम केलंय. आलियाने मीरसोबत शेवटचा सिन खूप छान केलाय.

कंवलजीत बोलत असताना कॅमेरा एका ओफिसरकडे सतत वळतो पण तोच मुलगा हे कुठे उल्लेखलेले नाही. ज्यांना मूळ कथा माहीत नाही त्यांना कळणार नाही तिचा मुलगा भारतीय सेनेत आहे म्हणून.

राझी मध्ये अजून एक आवडलेली गोष्ट म्हणजे भारतीय लष्कर " आहे तसे" दाखवायचे धैर्य दाखवले
1) विश्वास बसण्यासाठी आलिया चे वडील मुक्तीसेनेच्या ठिकाणांचे पत्ते सांगतात , शालीवर मेसेज प्रसंग, नंतर च्या प्रसंगात त्या महितीच्या आधारावर पाक सैन्याने कारवाई केली असे येते,
2) शेवटच्या प्रसंगात पूर्ण मिशन फसेल अशी स्थिती आल्यावर प्लॅन B म्हणून आपल्याच ऐजेंट ला उडवायला ते मागे पुढे पाहत नाहीत

उगाच भारतीय लष्कर म्हणजे फार तत्वनिष्ठ, आणि अबोव्ह all असा आव न आणता त्या परिस्थिती खरे जसे वागले जाईल तसे दाखवले आहे.

पण तोच मुलगा हे कुठे उल्लेखलेले नाही >>>> त्याच्या छातीवर नाव लिहिले आहे.

अजून एक आवडलेली गोष्ट म्हणजे भारतीय लष्कर " आहे तसे" दाखवायचे धैर्य दाखवले>>>>>
हो, अशा परिस्थितीत जसे वागेल तसे दाखवलंय. पाकिस्तानात हा चित्रपट गेला का? पाकी भूमीवर घडत असल्याने त्या बाजूचे इन्फॉर्मेर्स दाखवले जे तिथल्या लोकांना ऑकवॉर्ड वाटू शकेल.

काश्मीर शासनात कार्यरत असलेल्या एका ias ऑफिसरने या चित्रपटाचा रिवू लिहिला आहे. काश्मिरी माणसाला मध्यवर्ती ठेऊन चित्रपट बनल्याचा आनंद व्यक्त करतानाच एका काश्मिरी माणसाने पाकिस्तान द्रोह करावा याबद्दलची खंत त्याच्या लिखाणातून लपत नाही.

https://m.timesofindia.com/home/sunday-times/all-that-matters/what-a-spy...

मी मूळ पुस्तक वाचले नाही. पण त्यात म्हणे तिचा नवरा इतका ठाम दाखवला नाहीये. तिच्या खूप प्रेमात असतो आणि तिला वाचवण्यासाठी आणि भारतात परत पाठवण्यासाठी वहिनीचा बळी देतो.>>>

पुस्तक स्क्रिबडी वर उपलब्ध आहे ऑनलाइन वाचण्यासाठी. त्यातले बरेच प्रसंग, खारीसकट, जसेच्या तसे घेतलेत तर कित्येक गाळलेत. चित्रपटात सेहमत किती दिवस पाकिस्तानात होती हे कळत नाही, पुस्तकात तो काळ दाखवलाय. पुस्तकात घुंगरू मात्र नाही Happy Happy

पुस्तकातही संवाद कमी व तृतीयपुरुषी निवेदन जास्त आहे. त्यामुळे अमुक एक काम सेहमतने केले हे कळते पण कसे केले याचा अंदाज येत नाही. लेखकाला सेहमतकडून पूर्ण डिटेल्स मिळाले नसणार. शेवटच्या दृश्यात सेहमत मुलासकट बाजारात येते असे आहे, पुस्तकात नवराही सोबत असतो व त्यांच्या मागे आर्मी इंटिलीजन्स. नवऱ्यासोबत बुरखा घालून मुनिराला आणले गेले असते जी डार्ट मारून संपवली जाते व बॉम्बही फोडला जातो ज्यात इक्बाल व मुनिरा मरतात. मुनिराला आणायचे हे नवऱ्याने सुचवले असे सेहमत नंतर म्हणते. नवऱ्याला पाकिस्तान प्रेम असते पण बायको प्रेम जास्त असते व ती इंटेलिजन्सच्या हाती लागू नये असे त्याला वाटत असते. ती त्याच्यावरच पिस्तुल रोखून असली तरीही Happy Happy

राझी चित्रपटात सर्वच कलाकारांनी चांगले काम केले किंबहुना दिग्दर्शकाने करवून घेतले आहे... मला तर हा चित्रपट पाहून काश्मिरांविषयी जास्त हळहळ वाटायला लागली... आपण इकडे बसून त्यांना दोष देत असतो की त्यांना भारतीय सैन्याविष्यी आत्मीयता नाही..पण त्यांची मात्र इकडे आड आणि तिकडे विहिर अशी अवस्था झाली आहे...

अजून असा एक चित्रपट बघितला... शौर्य

Sadhana, तूम्ही जी पुस्तकातील गोष्ट सांगताय तशीच ठेवली असती तर मला जास्त आवडलं असतं असं वाटतंय. मला राझी चा शेवट अजिबातच आवडला नाही. हे कुठे बोलायची चोरी आहे पण सगळ्या माझ्या पंचक्रोशीतील बायकाना आवडून हळहळ करायची आहे. देशकार्य म्हणजे देशकार्य, व्यक्तिगत आयुष्य, भावभावना not important. You are just a tool in very big machine.

Pages