राझी - उध्वस्त होण्याला दिलेली मान्यता

Submitted by माधव on 20 July, 2018 - 00:01

बहुतेक भारतीयांना भगवद्गीतेबद्दल महिती असते - कुणाला ती तोंडपाठ असते, कुणी नीत्यनेमाने वाचतात तर कुणी त्यावर चर्चा करतात. पण फार थोड्या जणांना गीता खर्‍या अर्थाने समजलेली असते. गीता जऊद्या, ते खूप मोठे प्रकरण आहे (खरं तर गीतेत अनेक प्रकरणे (अध्याय) आहेत) पण ती ज्या प्रसंगात सांगितली गेली तसा प्रसंग आपल्यापैकी खूप कमी जणांच्या आयुष्यात येतो. कारण सोपं आहे - आपण पळपुटे असतो! युद्ध आणि आपण यांची सांगड प्रत्यक्ष आयुष्यात तर दूरच, आपण स्वप्नात देखील घालत नही. आपण ज्या काही तथाकथीत लढाया लढतो त्या स्वहीत आणि त्यानंतर आपल्या कुटुंबाचे भले येवढ्याच मर्यादीत हेतूने केलेल्या असतात. आता युद्धच करायचे नाही म्हटल्यावर आपल्या प्रियजनांशी युद्ध करायचा प्रश्नच उद्भवत नाही. मग जर का कोणी आपल्याला सांगितले की आधी प्रेमाची नाती तयार करा अणि मग त्या जीवलगांशी युद्ध करा तर ?

"येडंच आहे! मी काय कोळी वाटलो का ? आधी जाळे विणायला आणि मग त्यात न अडकायला? अरे इथे गणपती गेल्यानंतर आरास काढायला जीवावर येते. इतक्या चटकन् निर्जीव गोष्टीत जीव अडकतो माझा आणि म्हणे जीवलगांशी युद्ध!"

पण काही जण हे करू शकतात आणि त्यातलीच एक म्हणजे सेहमत - आपल्या सिनेमाची नायिका! नाही नाही! ती कोणी लष्करातली अधिकारी नाहीये ना कोणी प्रशिक्षीत हेर. ती एक कॉलेजात शिकणारी साधी मुलगी आहे. एक तुरुतुरु पळणारी खार एका गाडीखाली येणार असते आणि तिला आपल्या जीवाची पर्वा न करता वाचवताना सेहमत पहिल्यांदा भेटते आपल्याला. आपल्या मनातही येत नाही की हा प्रसंग सिनेमात पुढे खूप महत्वाचा ठरणार आहे.

तर अशी ही सेहमत भारतासाठी हेरगीरी करायला तयार होते ते केवळ आपल्या वडलांच्या शब्दाखातर. देशाबद्दल प्रेम प्रत्येकालाच असते. पण त्याकरता प्राण द्यायला फार कमी जण तयार असतात आणि केवळ वडलांचा इच्छेखातर देशासाठी प्राण द्यायला तयार होणारे अगदीच विरळा. पण सेहमत तयार होते - राझी होते.

सेहमतच्या वडलांना पकिस्तान भारताविरुद्ध काहीतरी कारस्थान रचतोय आणि नजीकच्या काळात काही तरी घडणार आहे याची कुणकुण लागते. ते भारतासाठी हेरगीरी करत असतात आणि त्याचाच एक भाग म्हणून पकिस्तानी सैन्यातल्या अधिकार्‍यांच्या घरी त्यांची उठबस असते. कारस्थानाची माहिती काढणे त्यांना शक्य असते पण त्यांच्याकडे वेळ आणि शक्ती दोन्ही नसते. त्यांचे अफेअर सुरू असते - कॅन्सरशी! आणि त्यापासून अलिप्त राहणे त्यांना आता अशक्य असते. दुसर्‍या कोणाला त्यांची जागा घेता आली असती पण इतक्या कमी वेळात विश्वास संपादून इतक्या आतल्या गोटात पोहचणे निव्वळ अशक्य असते. त्यांचा डोक्यात एक अतर्क्य प्लॅन तयार होतो - आपल्या पोटच्या मुलीला पाकिस्तानी अधिकार्‍याची सून करून पुढची माहिती काढायची. तो प्लॅन अतर्क्य आपल्याकरता असतो पण त्यांच्याकरता तो अगदी सहज असतो कारण त्यांची हेरगीरीची कारकिर्द सुरू झाली असते अशाच एका शब्दाखातर! सेहमतच्या कानावर ते आपला प्लॅन घालतात आणि ती वेडी तयार होते.
सेहमत राझी होते पण ती कशाला तयार झाली आहे ते ना तिला कळत ना आपल्याला. तिचे हेरगीरीचे प्रशिक्षण सुरू होते आणि आपण हेरगीरीवरचा सिनेमा आहे असे समजून सिनेमा पहायला लागतो. सिनेमाच्या प्रोमोजमध्ये पण तेच सांगितले होते. आपणही तेच ग्राह्य धरतो.

ट्रेनींग सुरु होते आणि आपल्याला भेटतो मीर - सेहमतचा प्रशिक्षक आणि तिच्या वडलांचा सुहृद! तिच्याविषयी वाटणारे कौतुक आणि माया तो कडक शिस्तीच्या बुरख्यात लपवून ठेवतो. तिला कसलीही उसंत न देता, 'छोटीशी चूकही तुझ्या जिवावर उठू शकते' हे तिच्या मनावर बिंबवत तो तिचे ट्रेनींग पूर्ण करतो. पूर्ण करतो म्हणण्यापेक्षा जेवढे शक्य असते तेवढे तो तिला शिकवतो. सेहमत पुरती तयार झाली नाहिये हे त्याला माहित असते पण नाईलाज असतो, सगळे यथासांग करण्याइतका वेळ नसतो. तो एक मात्र करतो - परक्या मुलखात सेहमतसाठी अनेक पळवाटा बनवून ठेवतो.

मग वेळ येते ती बिदाईची आणि पडद्यावर येते ते एक अप्रतिम गाणे - दिलबरो. लग्न, आपला जोडीदार याबद्दल कधी फारसा विचारच केलेला नाहीये, ज्याला भेटणे तर दूरच कधी पाहिले पण नाहीये अशा शत्रू देशातल्या माणसाबरोबर लग्न झालय, वडलांना परत कधीच भेटू शकणार नाही हे पण कळलंय आणि मग घराचाच नाही तर देशाचाच उंबरठा ओलांडायची वेळ येते. सेहमतची मनस्थीती ते गाणे अगदी तंतोतंत मांडते. गाणी हा आपल्या सिनेमाचा अविभाज्य भाग आहे आणि मी हिंदी सिनेसंगीताचा प्रचंड चाहता आहे. पण बर्‍याचदा हे गाणे आत्ता का आहे हा प्रश्न मला पडतोच. प्रसंगाला अनुसरूनच नाही तर तो प्रसंग अधीक गहीरा करणारी गाणी आपल्या सिनेमात फार कमी असतील. दिलबरो त्यातलेच एक. गाणे सुरू झाल्यावर अंगावर काटा आला होता माझ्या. गाणं ऐकताना हे पण जाणवलं की समोर चालू आहे ती हेरकथा नाहीये, एक वेगळंच रसायन आहे. खूप वेगळं आणि गहीरं!

लग्नाबरोबर सेहमतच्या आयुष्यात इक्बाल येतो. "आपलं लग्न केवळ आपल्या वडलांच्या निर्णयावरून झालेय पण आपण मात्र एकमेकांना अनोळखीच आहोत." पहिल्या दिवशीच इतका समजूतदारपणा दाखवणार्‍या नवर्‍याच्या प्रेमात न पडणे कठीण आहे पण तरीही सेहमत स्वतःला सावरते. पण ते सावरणे तात्पुरते ठरते. त्याच्या समजुतदारपणापुढे आणि प्रेमापुढे ती हतबल होते. आत्तापर्यंत मला तीन उमदे माहित होते - पहिला उमदा हा एक व वनस्पती तूपाचा ब्रँड होता, दुसरा गोष्टीतला राजकुमार (राजा किंवा इतर पुरुष कधीच उमदे नसायचे) आणि तिसरा उमदा म्हणजे घोडा. राझीत चौथा आणि खराखुरा उमदा बघायला मिळाला - इक्बाल.

घरात सगळ्यांना तिचे कौतुक असते - फक्त अब्दुल सोडून. त्याला तिच्यावर कायम संशय असतो. हळूहळू ती नविन घरात रुळू लागते आणि कामातही. पण ती काही सराईत हेर नसते, हातून लहान सहान चुका होतच असतात. आणि अशीच एक चूक अब्दुलच्या लक्षात येते. काही पर्यायच उरत नाही तिच्यापुढे. एके काळी गाडीखाली येणार्‍या खारीला वाचवणारी सेहमत आता....

प्रवास पुढे चालूच राहतो - यशाच्या दिशेने. पण त्या वाटेवरचे प्रत्येक पाउल तिला उध्वस्त करत जाते. योद्ध्याला युद्धात विजय मिळाला तर तो काही अंशी तरी उपभोगता येतो. पण इथे सेहमतला विजय मिळूनही ती सर्व काही हरते. सिनेमा संपतो तेंव्हा रेहमत एका अतिशय साध्या (पडक्या म्हणाव्या अशाच) घरात एकटी असते. घरी लाडाकोडात वाढलेली, सासरीही ऐश्वर्य उपभोगलेली ती, आता अर्थ शोधत असते विजय, नाती, आयुष्य यांचा. त्यांच्यापुढे ऐश्वर्याची काय किंमत? त्या सीनमध्ये तिच्या बाजूला एक माठ दाखवला आहे. तिचे आयुष्यही आता त्या माठातल्या पाण्यासारखे आहे - शांत, थंड! पण एके काळी त्या पाण्याने त्सुनामी आणली होती.

आणि या सगळ्याला सुरुवात झालेली असते - तिच्या राझी होण्यापासून!

आलिया - काय लिहू तिच्याबद्दल? आजच्या घडीला तिच्यासारखी हरहुन्नरी अभिनेत्री दुसरी नसावी. सेहमत तीने अगदी सहज उभी केलीये आणि ही सहजता खूप गरजेची होती. हेरगीरीचे बेअरींग थोडे जरी जास्त झाले असते तरी सिनेमाचे गणित साफ कोसळले असते.

विकी कौशल - प्रत्येक चित्रामध्ये बॅकग्राऊंडला खूप महत्व असते. कुठल्याही सिनेमाचेही अगदी तसेच असते. महत्वाची भूमीका खुलून दिसण्याकरता बाकीच्या अभिनेत्यांची साथ खूप महत्वाची असते. इक्बालच्या भूमीकेत अभिनयाला फारसा वाव नव्हता पण त्याने त्याचे काम अगदी चोख केलय.

रजीत कपूर - बाप आणि सच्चा देशभक्त यांच्यातले द्वंद्व खूप सुरेख दाखवलय. व्योमकेश बक्षीनंतर तो पहिल्यांदाच इतका लक्षात राहिला.

मेघना गुलझार - सिनेमात फक्त आणि फक्त सेहमतची कामगीरी दाखवली आहे. आणि शेवटचा एक सीन, जो अनेक वर्षांनी घडतो. पण त्या एका सीनच्या जोरावर मेघना हेरकथेचे रुप पूर्ण पालटून टाकते. आणि मग ती होते सेहमतची कथा, तिच्या विजयाची, तिच्या अपरीमीत दु:खाची! गुलझारचे अनेक चित्रपट पडद्यावर अडीच तासात संपतात पण मनात मात्र वर्षानुवर्ष चालूच असतात. हा सिनेमा अगदी त्याच पठडीतला आहे. मेघना असली तरी शेवटी ती गुलझार पण आहेच.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इथले परीक्षण वाचून मी कधीही मायबोलीकरांना कळेल असा सिनेमा काढणार नाही.
(साऊथ ला जाऊन काढू शकतो, पण पैसे नाहीत ही पहिली अडचण आणि
त्यातलं काहीच कळत नाही ही दुसरी )

डबा बाटली, स्वहिली भाषेत रामलीला काढा. आधीच रामलीला, त्यात स्वहिली.मायबोलीकरांची फुल्ल विकेट ☺️☺️☺️☺️

आणि त्या काळात तर सेहमतने सहज म्हणून नोकराच्या खोलीत जाणे निव्वळ अशक्य होते. >> माधव, हे इन जनरल बरोबर आहे. पण या सिनेमात ती एकदा जाताना दाखवली आहे आधी. तिचा दीर जेव्हा त्याच्या खोलीत काहीतरी शोधत असतो, तेव्हा ती जाउन बोलते त्याच्याशी तेथे. त्यामुळे तो पुरावा तेव्हाही पडलेला असल्याची शक्यता असू शकते, तिच्या नवर्‍याला ते माहीत नसले तरी.

मला वाटतं की तेंव्हा तीने खोटं सांगुन काहीही कारण दिलं असतं तरी तिच्या नवर्‍याचा एकदा तिच्यावर संशय आलाय म्हणल्यावर त्याने काही दिवसांमम्धे पकडलंच असतं.. आणि तिला शिकवण होतीच ना की असं वाटलं की आपण पकडले जातोय म्हणजे आपण लवकरच पकडले जाणार आहोत, मला वाटतं त्यामुळे त्यांनी तिथे विषय फार ताणला नसावा..

कारण तो पण एक हुशार आधिकारीच असतो, आज ना उद्या ती पकडली गेलीच असती

अरे, सेहेमतला तिचं मन खात होतं. ती स्वतःला अपराधी समजत आहे आणि घराला सर्वेलंस सुरु होणं, भाभीची चौकशी, बेगचं येणं आणि ताबडतोब निघुन जायची तयारी... यात आपलं भांडं फुटलेलं आहे याची बोच/ तणाव तिला आहे. त्याच्या मधात Proud नवर्‍याच्या पाकिटात आपल्या पैजणांचा एक घुंगरु सापडणं म्हणजे याला सगळं समजलं हे तिनेच अध्याहृत धरलं आहे. कारण रुल #१.
आता तिने सफाई दिली असती, तर परिस्थितीजन्य पुरावे इ. इ. करायला हे कोर्ट नाही. तिचा नवरा तोंडावर हापके मारायला गेलेला तो जनरल गेला असेल आणि चांदीचा तो पीस सराफाकडे घेउन जाउन घडणावळ देउन पैजण दुरुस्त करणार आहे असं आपल्याला सगळ्यांना वाटतंय तसं बहुतेक सेहेमतला वाटलं नसेल. Biggrin

अमित Proud मुळात तुम्हांला मेलं कौतुकच नाही इक्बालचं की तो घुंगरु बघून त्याला लग्गेच पैंजणात असाच घुंगरु असल्याचं लक्षात आलं. Wink

सोडा हे झाड आता. काये ना की आपण एक था टायगर आणि गदर वगैरे सिनेमांवर पोसले गेल्यामुळे ती तिथे पोहोचलीच कशी? आता बाहेर कशी पडणार, तमक्याला मारले याला पुरावा काय यात अडकून पडणे साहजिक आहे. नवर्याला सिनेमा पहायला लावला तर तो पण मला सुरुवातीला दोन तीनदा म्हणाला यात कतरिनाला घ्यायला हवं होतं!! Lol

पण या सिनेमात ती एकदा जाताना दाखवली आहे आधी. तिचा दीर जेव्हा त्याच्या खोलीत काहीतरी शोधत असतो, तेव्हा ती जाउन बोलते त्याच्याशी तेथे. त्यामुळे तो पुरावा तेव्हाही पडलेला असल्याची शक्यता असू शकते, तिच्या नवर्‍याला ते माहीत नसले तरी.
>>
घुंगरू तिथे मिळणे ही एकच गोष्ट झालेली नाही.
अब्दूलचा कधीच घराबाहेर पडत नसताना घराबाहेर झालेला अचानक मृत्यू, त्या मृत्यूचा सहमतवर झालेला खोल परिणाम, त्याच्यामागे काहीतरी राझ आहे असं भावाचं ठाम मत, त्याच्या खोलीत भावाला आधी काहीच सापडलेलं नसताना आता अचानकपणे हेरगिरीचे पुरावे सापडणे हे जेव्हा त्या घुंगरू बरोबर बघितले जाईल तेव्हा ईकबाल सारख्या अधिकाऱ्याला नक्कीच लिंक लागेल.
चला आता इथे सगळी स्टोरी आणि सस्पेन्स आला.

अर्थात वर इतरांनी म्हणल्याप्रमाणे खूप लोपाहोल्स आहेतच.

मी मूळ पुस्तक वाचले नाही. पण त्यात म्हणे तिचा नवरा इतका ठाम दाखवला नाहीये. तिच्या खूप प्रेमात असतो आणि तिला वाचवण्यासाठी आणि भारतात परत पाठवण्यासाठी वहिनीचा बळी देतो.

तिचा नवरा तोंडावर हापके मारायला गेलेला तो जनरल गेला असेल आणि चांदीचा तो पीस सराफाकडे घेउन जाउन घडणावळ देउन पैजण दुरुस्त करणार आहे असं आपल्याला सगळ्यांना वाटतंय तसं बहुतेक सेहेमतला वाटलं नसेल
>> Lol

रिया पटलं.
मुळात तुम्हांला मेलं कौतुकच नाही इक्बालचं की तो घुंगरु बघून त्याला लग्गेच पैंजणात असाच घुंगरु असल्याचं लक्षात आलं. Wink >> सायो हो ना Lol

अमीत, Rofl

यात कतरिनाला घ्यायला हवं होतं!! >>> मग 'दिलबरो' एक आयटम साँग असतं Proud

कतरिनाला घेतलं असतं तर मग इक्बालच्या रोल मधे सलमानला घ्यावं लागलं असतं. आणि मग दो मुल्क एक जान असं गाणं म्हणत दोघांनी मिळून अशी काही माहिती दोन्ही देशांना पुरवली असती की दोन्ही देश गळ्यात पडून रडायला लागले असते आणि या जोडीने पण कुठल्यातरी बेटावर संसार थाटला असता. बांगला देश, भारत आणि पाकिस्तान एक झाले अशी स्टोरी असती.

झाली की हो चर्चा. ठराविक काळ सिरीयस चर्चा झाल्यावर विनोद केल्याशिवाय रहावत नाही. अजून काही मुद्दे असतील तर जरूर मांडा. नव्या पॉलिसी नुसार आता 4 तास उलटल्याने पोस्ट डिलीट करता येत नाही. Admin ना सांगून उडवा.
हलकं घ्या हो.

अरे काय हे, ईतक्या सुंदर मुव्हीचेही चिरफाड झालीच शेवटी.

काही प्रतिसाद अफलातुन आहेत,

नवर्याला सिनेमा पहायला लावला तर तो पण मला सुरुवातीला दोन तीनदा म्हणाला यात कतरिनाला घ्यायला हवं होतं!! >>>> अशक्य हसले.

ईमॅजिन पण करु शकत नाही आलिया शिवाय ईतर कुठलीही अ‍ॅक्ट्रेस यात , ईतकी छान वाटतेय ती याच्यात

लेख आणि प्रतिसाद छान आहेत.

चित्रपट अजून पाहिला नाही. आलिया आवडत नाही. तरीही तिचे चित्रपट पहात राहिले तर डोक्यात जायला चालू होईल. त्यामुळे राझी बघेन कि नाही शंका आहे. त्याऐवजी शायनिंग थ्रू बघेन वेळ मिळाला की.

मी ही बघायला प्राइम सबस्क्रिप्शन रिन्यू केलं पाच मिनिट पण बघवला नाही. कॅसल लावले. पण एकदा आलियाच्या सा ड्या कपडे बघायला
बघीन.

अमा, कमॉन. पहिल्या पाच मिनिटात कोणत्या पिक्चरमध्ये काय घडलं आहे? ते ही बॉलिवुडी चित्रपटांत?

Pages