राझी - उध्वस्त होण्याला दिलेली मान्यता

Submitted by माधव on 20 July, 2018 - 00:01

बहुतेक भारतीयांना भगवद्गीतेबद्दल महिती असते - कुणाला ती तोंडपाठ असते, कुणी नीत्यनेमाने वाचतात तर कुणी त्यावर चर्चा करतात. पण फार थोड्या जणांना गीता खर्‍या अर्थाने समजलेली असते. गीता जऊद्या, ते खूप मोठे प्रकरण आहे (खरं तर गीतेत अनेक प्रकरणे (अध्याय) आहेत) पण ती ज्या प्रसंगात सांगितली गेली तसा प्रसंग आपल्यापैकी खूप कमी जणांच्या आयुष्यात येतो. कारण सोपं आहे - आपण पळपुटे असतो! युद्ध आणि आपण यांची सांगड प्रत्यक्ष आयुष्यात तर दूरच, आपण स्वप्नात देखील घालत नही. आपण ज्या काही तथाकथीत लढाया लढतो त्या स्वहीत आणि त्यानंतर आपल्या कुटुंबाचे भले येवढ्याच मर्यादीत हेतूने केलेल्या असतात. आता युद्धच करायचे नाही म्हटल्यावर आपल्या प्रियजनांशी युद्ध करायचा प्रश्नच उद्भवत नाही. मग जर का कोणी आपल्याला सांगितले की आधी प्रेमाची नाती तयार करा अणि मग त्या जीवलगांशी युद्ध करा तर ?

"येडंच आहे! मी काय कोळी वाटलो का ? आधी जाळे विणायला आणि मग त्यात न अडकायला? अरे इथे गणपती गेल्यानंतर आरास काढायला जीवावर येते. इतक्या चटकन् निर्जीव गोष्टीत जीव अडकतो माझा आणि म्हणे जीवलगांशी युद्ध!"

पण काही जण हे करू शकतात आणि त्यातलीच एक म्हणजे सेहमत - आपल्या सिनेमाची नायिका! नाही नाही! ती कोणी लष्करातली अधिकारी नाहीये ना कोणी प्रशिक्षीत हेर. ती एक कॉलेजात शिकणारी साधी मुलगी आहे. एक तुरुतुरु पळणारी खार एका गाडीखाली येणार असते आणि तिला आपल्या जीवाची पर्वा न करता वाचवताना सेहमत पहिल्यांदा भेटते आपल्याला. आपल्या मनातही येत नाही की हा प्रसंग सिनेमात पुढे खूप महत्वाचा ठरणार आहे.

तर अशी ही सेहमत भारतासाठी हेरगीरी करायला तयार होते ते केवळ आपल्या वडलांच्या शब्दाखातर. देशाबद्दल प्रेम प्रत्येकालाच असते. पण त्याकरता प्राण द्यायला फार कमी जण तयार असतात आणि केवळ वडलांचा इच्छेखातर देशासाठी प्राण द्यायला तयार होणारे अगदीच विरळा. पण सेहमत तयार होते - राझी होते.

सेहमतच्या वडलांना पकिस्तान भारताविरुद्ध काहीतरी कारस्थान रचतोय आणि नजीकच्या काळात काही तरी घडणार आहे याची कुणकुण लागते. ते भारतासाठी हेरगीरी करत असतात आणि त्याचाच एक भाग म्हणून पकिस्तानी सैन्यातल्या अधिकार्‍यांच्या घरी त्यांची उठबस असते. कारस्थानाची माहिती काढणे त्यांना शक्य असते पण त्यांच्याकडे वेळ आणि शक्ती दोन्ही नसते. त्यांचे अफेअर सुरू असते - कॅन्सरशी! आणि त्यापासून अलिप्त राहणे त्यांना आता अशक्य असते. दुसर्‍या कोणाला त्यांची जागा घेता आली असती पण इतक्या कमी वेळात विश्वास संपादून इतक्या आतल्या गोटात पोहचणे निव्वळ अशक्य असते. त्यांचा डोक्यात एक अतर्क्य प्लॅन तयार होतो - आपल्या पोटच्या मुलीला पाकिस्तानी अधिकार्‍याची सून करून पुढची माहिती काढायची. तो प्लॅन अतर्क्य आपल्याकरता असतो पण त्यांच्याकरता तो अगदी सहज असतो कारण त्यांची हेरगीरीची कारकिर्द सुरू झाली असते अशाच एका शब्दाखातर! सेहमतच्या कानावर ते आपला प्लॅन घालतात आणि ती वेडी तयार होते.
सेहमत राझी होते पण ती कशाला तयार झाली आहे ते ना तिला कळत ना आपल्याला. तिचे हेरगीरीचे प्रशिक्षण सुरू होते आणि आपण हेरगीरीवरचा सिनेमा आहे असे समजून सिनेमा पहायला लागतो. सिनेमाच्या प्रोमोजमध्ये पण तेच सांगितले होते. आपणही तेच ग्राह्य धरतो.

ट्रेनींग सुरु होते आणि आपल्याला भेटतो मीर - सेहमतचा प्रशिक्षक आणि तिच्या वडलांचा सुहृद! तिच्याविषयी वाटणारे कौतुक आणि माया तो कडक शिस्तीच्या बुरख्यात लपवून ठेवतो. तिला कसलीही उसंत न देता, 'छोटीशी चूकही तुझ्या जिवावर उठू शकते' हे तिच्या मनावर बिंबवत तो तिचे ट्रेनींग पूर्ण करतो. पूर्ण करतो म्हणण्यापेक्षा जेवढे शक्य असते तेवढे तो तिला शिकवतो. सेहमत पुरती तयार झाली नाहिये हे त्याला माहित असते पण नाईलाज असतो, सगळे यथासांग करण्याइतका वेळ नसतो. तो एक मात्र करतो - परक्या मुलखात सेहमतसाठी अनेक पळवाटा बनवून ठेवतो.

मग वेळ येते ती बिदाईची आणि पडद्यावर येते ते एक अप्रतिम गाणे - दिलबरो. लग्न, आपला जोडीदार याबद्दल कधी फारसा विचारच केलेला नाहीये, ज्याला भेटणे तर दूरच कधी पाहिले पण नाहीये अशा शत्रू देशातल्या माणसाबरोबर लग्न झालय, वडलांना परत कधीच भेटू शकणार नाही हे पण कळलंय आणि मग घराचाच नाही तर देशाचाच उंबरठा ओलांडायची वेळ येते. सेहमतची मनस्थीती ते गाणे अगदी तंतोतंत मांडते. गाणी हा आपल्या सिनेमाचा अविभाज्य भाग आहे आणि मी हिंदी सिनेसंगीताचा प्रचंड चाहता आहे. पण बर्‍याचदा हे गाणे आत्ता का आहे हा प्रश्न मला पडतोच. प्रसंगाला अनुसरूनच नाही तर तो प्रसंग अधीक गहीरा करणारी गाणी आपल्या सिनेमात फार कमी असतील. दिलबरो त्यातलेच एक. गाणे सुरू झाल्यावर अंगावर काटा आला होता माझ्या. गाणं ऐकताना हे पण जाणवलं की समोर चालू आहे ती हेरकथा नाहीये, एक वेगळंच रसायन आहे. खूप वेगळं आणि गहीरं!

लग्नाबरोबर सेहमतच्या आयुष्यात इक्बाल येतो. "आपलं लग्न केवळ आपल्या वडलांच्या निर्णयावरून झालेय पण आपण मात्र एकमेकांना अनोळखीच आहोत." पहिल्या दिवशीच इतका समजूतदारपणा दाखवणार्‍या नवर्‍याच्या प्रेमात न पडणे कठीण आहे पण तरीही सेहमत स्वतःला सावरते. पण ते सावरणे तात्पुरते ठरते. त्याच्या समजुतदारपणापुढे आणि प्रेमापुढे ती हतबल होते. आत्तापर्यंत मला तीन उमदे माहित होते - पहिला उमदा हा एक व वनस्पती तूपाचा ब्रँड होता, दुसरा गोष्टीतला राजकुमार (राजा किंवा इतर पुरुष कधीच उमदे नसायचे) आणि तिसरा उमदा म्हणजे घोडा. राझीत चौथा आणि खराखुरा उमदा बघायला मिळाला - इक्बाल.

घरात सगळ्यांना तिचे कौतुक असते - फक्त अब्दुल सोडून. त्याला तिच्यावर कायम संशय असतो. हळूहळू ती नविन घरात रुळू लागते आणि कामातही. पण ती काही सराईत हेर नसते, हातून लहान सहान चुका होतच असतात. आणि अशीच एक चूक अब्दुलच्या लक्षात येते. काही पर्यायच उरत नाही तिच्यापुढे. एके काळी गाडीखाली येणार्‍या खारीला वाचवणारी सेहमत आता....

प्रवास पुढे चालूच राहतो - यशाच्या दिशेने. पण त्या वाटेवरचे प्रत्येक पाउल तिला उध्वस्त करत जाते. योद्ध्याला युद्धात विजय मिळाला तर तो काही अंशी तरी उपभोगता येतो. पण इथे सेहमतला विजय मिळूनही ती सर्व काही हरते. सिनेमा संपतो तेंव्हा रेहमत एका अतिशय साध्या (पडक्या म्हणाव्या अशाच) घरात एकटी असते. घरी लाडाकोडात वाढलेली, सासरीही ऐश्वर्य उपभोगलेली ती, आता अर्थ शोधत असते विजय, नाती, आयुष्य यांचा. त्यांच्यापुढे ऐश्वर्याची काय किंमत? त्या सीनमध्ये तिच्या बाजूला एक माठ दाखवला आहे. तिचे आयुष्यही आता त्या माठातल्या पाण्यासारखे आहे - शांत, थंड! पण एके काळी त्या पाण्याने त्सुनामी आणली होती.

आणि या सगळ्याला सुरुवात झालेली असते - तिच्या राझी होण्यापासून!

आलिया - काय लिहू तिच्याबद्दल? आजच्या घडीला तिच्यासारखी हरहुन्नरी अभिनेत्री दुसरी नसावी. सेहमत तीने अगदी सहज उभी केलीये आणि ही सहजता खूप गरजेची होती. हेरगीरीचे बेअरींग थोडे जरी जास्त झाले असते तरी सिनेमाचे गणित साफ कोसळले असते.

विकी कौशल - प्रत्येक चित्रामध्ये बॅकग्राऊंडला खूप महत्व असते. कुठल्याही सिनेमाचेही अगदी तसेच असते. महत्वाची भूमीका खुलून दिसण्याकरता बाकीच्या अभिनेत्यांची साथ खूप महत्वाची असते. इक्बालच्या भूमीकेत अभिनयाला फारसा वाव नव्हता पण त्याने त्याचे काम अगदी चोख केलय.

रजीत कपूर - बाप आणि सच्चा देशभक्त यांच्यातले द्वंद्व खूप सुरेख दाखवलय. व्योमकेश बक्षीनंतर तो पहिल्यांदाच इतका लक्षात राहिला.

मेघना गुलझार - सिनेमात फक्त आणि फक्त सेहमतची कामगीरी दाखवली आहे. आणि शेवटचा एक सीन, जो अनेक वर्षांनी घडतो. पण त्या एका सीनच्या जोरावर मेघना हेरकथेचे रुप पूर्ण पालटून टाकते. आणि मग ती होते सेहमतची कथा, तिच्या विजयाची, तिच्या अपरीमीत दु:खाची! गुलझारचे अनेक चित्रपट पडद्यावर अडीच तासात संपतात पण मनात मात्र वर्षानुवर्ष चालूच असतात. हा सिनेमा अगदी त्याच पठडीतला आहे. मेघना असली तरी शेवटी ती गुलझार पण आहेच.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सेहमत कॉलिंग च्या लेखकाची यू ट्युब वर मुलाखत आहे. त्यानुसार खरी सेहमत कारगिल इथे रहात होती. कुठले ही श्रेय न घेता . तिची मुलाखत घेउन कदम्बरी लिहिली आहे. बांगला देहमधला भारताचा दबाव कमी करण्यासाठी पाकने गाझी युद्धनौका बन्गालच्या उपसागरात पाठवली होती ती सेहमतच्या माहितीच्या आधारे कळल्याने ती उद्ध्वस्त करण्यात आली . त्यावर गाझी अटॅक नावाचा फसलेला चित्रपट आला होता. मात्र भारताची मोहीम फसली नाही गाझी बुडवली त्यामुळे बांगला मुक्तीच्या लढ्यात भारताचा विजय झाला त्यात गाझीच्या नष्ट होण्याचा आणि सेहमतच्या हिण्ट चा मोठा रोल आहे. असे अनेक अनसंग हिरो /हिरॉइन्स ज्यांअचे काम लोकांपुढे येत नाही. कालच रशियन लेडी हेर सेक्स करण्यासही तयार होती असे एका अधिकार्‍याने स्टेट्मेन्ट दिले आहे. बेबी चित्रपटातही तापसी पन्नुची भूमिका अशीच काहीशी आहे. महिला हेर पकडला गेला तर तिच्याशी काहीही होउ शकते.
दुसरे असे की, चित्रपटात पाकिस्तानची पात्रे दाखवायची म्हणजे ती आक्रस्ताळी , उठसूट भारताच्या नावाने शिव्या देणारी, नाटकी, मूर्ख असलीच पाहिजे त अशी एक प्रथा आहे . (असेच तिकडेही असणार :)) पण सेहमतचे सासरचे कुटुंबीय हे अत्यंत खानदानी , लोभस वागणुकीचे ,आपल्यासारखीच कुटुम्ब्वत्सल दाखवली आहेत. अगदी ती नवी बायको ,सून , जाउ , वहिनी व्यवस्थित रुळेल याची काळजी सगळे घेत असतात. अगदी नवरा देखील मीलन घाइने टाळतो... शेवटी सीमेपलिकडेही माणसेच राहतात. आपल्याच संस्कृतीचा भाग आहेत ती. कुटुंब व्यवस्था ही तशीच आहे. ' हो मन जहान' या नुकत्याच गाजलेल्या पाकिस्तानी चित्रपटात माहिरा खानच्या लग्नाचे सीन आहेत. मुस्लिम कुटुंब असले तरी लग्न विधी पाहिले तर कुठल्याही भारतीय हिन्दु पंजाबी कुटुम्बाच्तील लग्न वाटते. शिवाय त्यातील नातेवाइकांच्या भावना अस्सल भारतीय आहेत . (उपखंडीय आहेत असे म्हणावेसे वातते ). ( आणि माहिरा खान इतकी सुरेख दिसली आहे की बॉलीवूडने तिला अगदी वाया घालवले आहे असे म्हणावे लागेल.) हे गाणेच एका वेगळ्या धाग्याचा विषय आहे. https://www.youtube.com/watch?v=xoWMv4eu-V8

सांगायचे तात्पर्य असे की व्यक्तीरेखा प्रचंड खर्‍या आहेत.

दिल्बरो बद्दल काय बोलावे ? बिदाई साँग मधले सर्वोत्तम गीत म्हणावे लागेल.
दहलीज (उंबरठा) पित्याचे बोट धरून फक्त घराचाच नाही तर माहेरचा ओलांडायचा तर आहेच. माहेरच्या पलिकडे देशाचाही . कदाचित जीवनाचाही , मृत्युकडे जायचाही . ही बिदाइ घरातून, देशातून कदाचित जीवनातूनही !! परत कधीच न येण्यासाठीही. केवढी रिस्क !! केवढे ते काळजावर दगड ठेवणे आइबापांचे.
सलाम , हजारो सलाम.

एक ट्रिविआ : यातील सेहमतचा सासरा, पाकिस्तानी ब्रिगेडियर परवेझ सय्यद हा पंचविसेक वर्षापूर्वी आलेल्या धारा तेलाच्या जिलेबीच्या जाहिरातीत त्या छोट्याचा बाप दाखवला आहे Happy त्याचे नाव शिशिर शर्मा. तो अगदी झिया अल हक सारखा दिसतो त्यामुळे पाकितानी बिगेडियर म्हणून अगदी रिलेट झालाय... Happy

जिलेबीवाली धाराची ' ती ' जाहिरात https://www.youtube.com/watch?v=hIDWHiTrjZ8

मायकेल डग्लसचा शायनिंग थ्रू आणि राझी यात अनेक साम्यं आहेत. दोन्ही सिनेमे नायिकाप्रधान आहेत. दोन्ही नायिका हेरगिरीशी अनभिज्ञ असतात पन परिस्थितीमुळे त्यांना शत्रूच्या देशात जाऊन एका खतरनाक परिस्थितीत स्वतःला झोकून द्यावे लागते. शायनिंग ग्लोरी मधली नायिका कूक म्हणून एका कर्नलच्या घरी जाते पण तिला स्वयंपाक अजिबात येत नसतो. वरीष्ठ अधिका-यांच्या पार्टीत त्यामुळे यजमान (ज्याच्याकडून सीक्रेट्स काढायची असतात) फजित होतात आणि तिला कामावरून काढण्यात येते. पण ती लागलीच मुलांना सांभाळण्याचा जॉब पत्करते.

ती अर्धी जर्मन असल्याने तिचा आणि दॉईश भाषेचा संबंध आलेला असतो. तिला सपोर्ट सिस्टम असते पण इथे येण्यापूर्वी तिला इंग्लंडमधे फोन करण्याची परवानगी नसते. तिला एकटीला निर्णय घ्यायचे असतात. शिवाय सापडली तर कुणी जबाबदारी घेणार नसते. दिवसेंदिवस ती अत्यंत वाईट परिस्थितीत फसत जाते. त्यातच तिचे कझिन्स तिथे असल्याने त्यांना ती भेटायला जाते तेव्हां तिथेच बाँबफेक होते. त्यातून जीव वाचवत ती कशीबशी येत असते. आता तिला प्रश्नांची उत्तरे देताना तारांबळ उडत असते. तिचे कझिन मारले गेल्याचं दु:ख लपवून तिचे काम चालूच असते. इतक्यात तिला कर्नलच्या घरात एक वेगळेच सीक्रेट समजते.

एक असे सीक्रेट जे दुस-या महायुद्धाला कलाटणी देऊ शकत होते. जिन्यावर पावलं वाजत असताना ती फोटो घेण्यात मग्न होती. कर्नल वर येत असतात. तिला पळून जायला अवधी नसतो आणि तिचं काम झालेलं नसतं. इथून पुढचा सिनेमा फक्त श्वास रोखून पहावा लागतो.

अगं बावळट पळ ना इथून असं ओरडून सांगावंसं वाटतं. तिच्यासाठी एक मदतनीस तिथे असते. तिच्या घरापर्यंत तिला पोहोचायचं असतं . तिच्या मागे गेस्टापोज लागलेले असतात. तिच्यात पळायचं त्राण नसतं.
कशी बशी ती त्या घरात पोहोचते पण वेगळंच संकट तिच्यापुढे वाढून ठेवलेलं असतं... आता आपण वाचत नाही असे तिला वाटते..

हा सिनेमा राझी नंतर पाहील्यास राझीचा आनंद घेता येईल. कदाचित शायनिंग थ्रू मधे फेरफार करून त्यावरूनच हा सिनेमा बनवला गेला असावा असे वाटत राहते.

>>मायकेल डग्लसचा शायनिंग ग्लोरी ...<<

शायनिंग थ्रु आहे तो. राझी आणि शायनिंग थ्रु चा प्लॉट सारखा आहे पण शायनिंग थ्रुला थोडी रोमँसची झाक आहे...

बा.का. - प्रतिक्रिया आवडली. बाय द वे तो शिशिर शर्मा पूर्वी टीव्ही सिरीयल्स मधे कायम असे. 'सैलाब' नावाची एक सिरीयल होती त्यात बराच रोल होता त्याचा. त्यातील फीमेल लीड चा बॉस दाखवला आहे बहुधा तो. पेपर चा संपादक असतो.

कालच हा पिक्चर पाहिला. आवडला. मूळ लेख वाचतो आता.

खूप मस्त लिहिलं आहे. हा पिक्चर बघायचा राहिला होता पण प्राईम कृपेने आजच बघायला मिळाला. अलियाचं काम भा री झालं आहे, दिसतेही सुंदर. बाकी सगळेही मस्तच आहेत आपापल्या रोलमध्ये. सेहमत लग्न करुन तिकडे जाते आणि सगळेच तिच्याशी इतकं प्रेमाने वागताना बघून ‘हिला किती कठीण होईल ह्या लोकांना, नवर्‍याला फसवणं‘ अस वाटून गेलं.

बायदवे, पाकिस्तानातलं जे दाखवलं आहे त्याचं शूटींग खरंच तिकडे केलं आहे का?

ज्यावेळी ती अब्दुलला गाडीखाली चिरडून परत येते आणि शॉवरखाली उभी राहून ढसाढसा रडते तेव्हा मलाही तेवढेच आणि तसेच रडू आले. alia is the best contemporary actress!

अब्दुलचा तिच्यावर संशय का अस्तो ते कळलं नाही >> त्याला कुणावर तरी घ्यायचाच असतो, ही समोर येते.

<<बायदवे, पाकिस्तानातलं जे दाखवलं आहे त्याचं शूटींग खरंच तिकडे केलं आहे का?>>

नाही. पंजाबमध्ये केलं आहे

ती भारतीय असते म्हणून. तो मुहाजीर का काहीतरी असतो ना! त्याला असं वाटत असेल की असा चान्स त्याला मिळाला तर तो पाकिस्तान साठी हेरगिरी करेल.

अब्दुलचा तिच्यावर संशय का अस्तो ते कळलं नाही
>>> कोणालाही आला असता संशय.. ती अशा गोष्टी करत असते. सासरचे लयच येडछाप दाखवलेत..

काल जागून पूर्ण सिनेमा एकटाकी पाहीला. सुरेख कामं आहेत सगळ्यांचीच. आलीया च काम आणि भूमीका खरोखरीच तीनं फार उठावदार केलेल्या आहेत. जरूर पाहावा हा सिनेमा, प्राईम वर आहे.
त्या 'ऐ वतन' गाण्याच्या वेळी बाकी सगळे स्मित करत असतांना ती आपले आसवं दिसू न देण्याची फ्रेम जबरी आहे...

अलिकडच्या काळातला दंगल नंतर पाहण्यात आलेला अतिशय चांगला सिनेमा.
पण हा सिनेमा म्हणजे राझी = सेहमत= आलिया असंच आणि एवढंच आहे आहे. तिचा रोल लार्जर दॅन लाईफ सारखा लार्जर दॅन मुवी असा आहे.. अर्थात आजिबात ओवरडू न होता जेवढ्यास तेवढेच अश्या चांगल्या अर्थाने.
एखाद-दुसरी फ्रेम सोडली तर पूर्ण काळ पडद्यावर आलिया आणि फक्त आलियाच आहे.. तिने कोलकाता टेस्ट मधली लक्ष्मणची नजाकतभरी आणि द्रविडची धीरगंभीर ईनिग एकटीनेच खेळल्यासारखी पूर्ण सिनेमा लाजवाब नजाकतीने आणि भुमिकेच्या कमाल गांभीर्याने अक्षरशः खेळून काढला आहे.
विद्या बालन आणि एखाद दुसरीचा अपवाद वगळता जिथे मेनस्ट्रीम सिनेमाचे दिग्गज आणि यशस्वी डिरेक्टर्स सुद्धा हिरॉईनला एवढं कवरेज देण्याची हिम्मत करीत नाहीत तिथे एवढ्या लहान वयात कमालीच्या सामंजस्याने एकहाती सिनेमा निभाऊन नेणारी आलिया बघणे किती सुखावह होते म्हणून सांगू. मेघना गुलजार आणि टीमचे त्यासाठी खास अभिनंदन.
वडिलांचा फोन आल्याने ती दिल्लीवरून घरी येते आणि वडिलांसोमर बसते तेव्हा फुगवलेल्या केशरचनेत ती काय कमालीची सुंदर दिसली आहे.
स्पॉयलर वॉर्निंग.....
खासकरून दीराला मारल्यानंतर मोठ्या जावेशी नजर टाळून बोलतांना, तिने दाखवलेल्या काळजी आणि प्रेमाचा स्वीकार करतांनाचे अवघडलेपण वगैरे अतिशय संयतपणे अभिनित केले आहे देहबोलीतून.

मीरचे कॅरॅक्टर आणि गेटअप थेट किंग्जमन सिनेमातल्या कॉलिन फर्थच्या 'हॅरी हार्ट' ह्या कॅरॅक्टरवर तंतोतंत बेतलेले आहे.

आता सिनेमा म्हंटले की काही ऊणीवा राहणारच.. त्या राझीतही आहेतच
१) संवाद आणि डायलॉग रायटिंग सपक आणि स्क्लिशे वाटले.
'हमे तो ईस मछली मे काटे भी नही नजर आये'... केवढं क्लिशे आहे हे वाक्य.
२)टेरेन आणि लँडस्केपचा अतिशय कमी वापर.
३)पाकी ब्रिगेडिअर आणि मेजर जनरलचे कॅरॅक्टर्स जेवढे स्ट्राँग असायला हवे होते तेवढे वाटले नाहीत
४)होणार्‍या नवर्‍यासमोर ती मोस्ट वल्नरेबल असणार हे माहित असूनही ट्रेनिंगमध्ये त्यासाठी स्ट्रॅटेजीचा साधा ऊल्लेखही नाही.
५)सगळीकडे 'हिंदुस्तानी' असा शब्द टाळून 'ईंडियन' असा शब्द वापरणे खटकले... निदान सत्तरच्या दशकात तरी हिंदुस्तानी शब्द आजच्या पेक्षा जास्तच वापरला जात असेल.
६)मीर (तो मोस्ट वाँटेड माणूस असतांना) आणि पार्टीचे पाकिस्तानात येणे जाणे थोडे अजून विस्तृतपणे दाखवायला हवे होते.
७) बाँबच फेकायचा होता तर आधी डार्ट का मारला
८)लहान मुलाला घेऊन घरून निघालेली सेहमत मार्केटमध्ये पोचेपर्यंत... ईक्बाल वडिलांना जाऊन कहानी कथन करतो मग त्यांची रिअ‍ॅक्शन आणि ईतर डायलॉग डिलिवरी.. मग तो त्याची पार्टी जमवून त्या पार्टीला घेऊन त्या बाजारात पोचतो वगैरे टाईमलाईनचा जरा घोळच घातला आहे.

पण ह्या सगळ्या प्रासंगिक तृटी आहेत आणि त्याने सिनेमाच्या ईंपॅक्टवर फार काही फरक पडत नाही.. ओवरऑल लक्षात राहिल असा सिनेमा आणि अभिनय.

हमे तो ईस मछली मे काटे भी नही नजर आये'... केवढं क्लिशे आहे हे वाक्य. >>> मछली मे गुलाब का फूल नजर आया असं पाहीजे का ते ??

भन्नाट आहे राझी. डोक्यातून जात नाही अजिबात. आलिया तर तिच्या पहिल्या पिक्चर पासून आवडती आहे. अगदी खिळवून ठेवणारा पिक्चर.

शंकर एहसान लॉय चे म्युझिक खुप दिवसांनी ऐकले. सध्याच्या जुन्या गाण्यांना नविन करण्याच्या प्रथेमध्ये गुलझारांचे शब्द आणि सेल चे म्युझिक असे खुपच मस्त कॉम्बो हाती लागले. ( ते राझी गाणे मात्र शंकर करताच बनलेले होते आणि त्यानेच गायला हवे होते. काय आरोह अवरोह आहेत आणि अरिजित चा चिरका आवाज सगळ्याची माती करतो - नजर लागू नये म्हणून असलेले गालबोट म्हणावे)

बाँबच फेकायचा होता तर आधी डार्ट का मारला
>>> फक्त dart मारला तर तिचे आयडेंटिफिकेशन नष्ट नाही होणार म्हणून बॉम्ब टाकला असावा. आणि फक्त बॉम्ब टाकून ती वाचण्याचा धोका आहे म्हणून आधी dart मारून make sure केला.
माझे मत !

राज, राझी मधे सुद्धा प्रेमकहाणी सुरेख गुंफली आहे.

इक्बाल ला खरी परि स्थिती समजते तेव्हा (त्याच्या प्रेमापोटी?) तो तिला जाऊ देतो आणि मग मात्र थेट मारायला येतो किंवा त्या प्रसंगातून पळ काढून गाडीतून पळ काढलेल्या मीर ला सेहेमत अगदी आरामात शोधून गाठते ते जरा पचलं नाही. पण बाकी पिक्चर पुढे अजिबात खटकलं नाही.

इक्बाल ला खरी परि स्थिती समजते तेव्हा (त्याच्या प्रेमापोटी?) तो तिला जाऊ देतो >> नाही तो तिला जाऊ देणार नसतोच पण ती कर्नल सिद्दिकी च्या मुलाचे कवर वापरून पळते तिथून. इक्बाल म्हणतो पण तेव्हा, "वो छोटा बच्चा है"

तो तिला जाऊ देणार नसतोच >> हो पण वडीलांना उत्तर देतोच तो की ती हे तिच्या देशासाठीच करते आहे. ते दोघेही एकमेकांमध्ये गुंतल्याचे अगदी सुंदर दाखवले आहे. नंतर ती मीर कडे येऊन त्याला रागावते, ती चिडते कारण इक्बाल मारला गेला म्हणून - त्यांनी तिला मारायचा प्रयत्न केला म्हणून नाही.

मै आज भी डुआय के लिखे हुये प्रतिसाद नही पढता डागदर सहाब! >>> मैने सिखाया हुआ आपको आज भी याद है यह देखकर बडी खुशी हुई | बस ऐसे ही लगे रहना | जब भी पढना हो मेरे जैसे ओरिजिनल्स को ही पढते रहना | जुग जुग जिओ ४ जी |

Pages