शिव ऋण प्रतिष्ठान - अक्षय बोराडे - एक अनुभव

Submitted by सुनिधी on 24 April, 2018 - 11:58

अक्षय व त्याचे सहकारी, रस्त्यावरील बेघर व मनाची शुद्ध हरवलेल्या व्यक्तींना आधार देऊन त्यांचे पुढील जीवन सुसह्य करण्याचे जे कार्य करतात त्याबद्दल मायबोलीकरांना ह्याच्या कामाची ओळख आधीच शोभा ह्यांनी https://www.maayboli.com/node/64824 या धाग्यात करून दिली आहे. शोभा यांचे आभार मानावे तेव्ढे कमी.

ही माहिती तेव्हा चांगलीच लक्षात राहिली होती.

यावर्षी जानेवारीत काही कारणाकरता सोलापुरला जाणे झाले होते. तेव्हा रोज सकाळी वहिनीबरोबर चालायला जाणे व्हायचे. एक दिवस असेच साडेसहाच्या सुमारास चालताना कोपर्‍यावर वळलो आणि एक व्रुद्ध दादा बसलेले दिसले. त्यांचे कपडे, चेहरा पाहुन ते रस्त्यावरच रहात असणार हे कळतच होते. आमची चाहुल लागल्याबरोबर त्यांनी आमच्याकडे पाहुन एकदम काही मागण्यासाठी वगैरे वा सांगण्यासाठी असेल, एकदम दोन्ही हात अर्धवट उचलले व तसेच ते हतबलतेने खालीही आले. कदाचीत आम्ही काही मदत करणार नाही हे जाणवले असेल त्यांना. ते खरेही होते. फिरायला जाताना हात रिकामेच असतात. पण माझी नजर त्यांच्या डोळ्याकडे गेली तेव्हा डोळ्यात अक्षरशः शुन्य भाव होते, प्रचंड एकाकीपणामुळे आलेले.
आयुष्यात पहिल्यांदा कोणा निराधाराच्या डोळ्यांकडे पाहिले इतके नीट पाहिले होते. पोटात तटातटा तुटले.

वहिनीला म्हटले, ‘फार वाईट वाटले गं त्यांची अवस्था पाहुन‘. तेव्हा तीही कळवळुन म्हणाली, ‘गेले कित्येक वर्ष त्यांना याच आत्ममग्न अवस्थेत पहाते आहे.’ मग तर अजुनच दु:ख झाले. त्यांच्या इतके वर्ष चाललेल्या आयुष्याचा विचार करवेना. आणि त्याचक्षणी अक्षय बोराडे व त्याच्या ‘शिवऋण’ ची आठवण झाली.

शोभा यांचा लेख वाचुन लगेच अक्षयला फोन केला, सर्व माहिती घेतली. त्याने सांगितले की तो व त्याची टीम महाराष्ट्रात कुठेही जातात या निराधारांना आणायला. त्या आधी त्यांचा फोटो व ठिकाण कळवावे लागते. अक्षय खुप नम्र आहे. कामाबद्दल आत्मविश्वासु आहे. बोलण्यातुन कळकळ जाणवतेच.

त्याच दिवशी परतीचा प्रवास सुरु होणार होता म्हणुन वहिनीला त्या दादांचा पुन्हा दिसले तर फोटो घ्यायला सांगितले.
परत आल्यावर रुटीन पुन्हा लागेतोवर सामाजिक उपक्रमावर सर्वांचे काम सुरु झाले. यावर्षी शिवऋणला घेऊया का विचारल्यावर सर्वांनी लगेच ‘हो’ म्हटले. प्राची, अकुने अक्षयबरोबर फोनवर बोलणी करून सर्व जरूरी माहिती घेतली व उपक्रमाचा धागा वगैरे आला.

पण या सगळ्यात त्या दादांची आठवण मागे पडत नव्हती. वहिनीला काही ना काही कारणामुळे बाहेर जाणे होत नव्हते. गेली तर ते दादा दिसत नव्हते. या सगळ्यात बराच वेळ गेला व अखेर ४ दिवसांपुर्वी वहिनीला ते दिसले. स्कुटीवर मागे बसलेल्या भाच्याने लगेच त्यांचे फोटो काढले व मला पाठवले.

BBAA61E1-2236-4531-9C44-206D4F086A27.jpeg

मग घरचा फोनमधे बिघाड व अक्षयला व्हाट्सपवर फोन लागेना म्हणुन अकुला फोन करुन सर्व सांगितले. सर्व माहिती तिला पाठवली. तिने लगेच अक्षयला फोन करुन कळवले, सर्व माहिती पाठवली. खबरदारी म्हणुन तिने मलापण अक्षयला संपर्क करायला कळवले. म्हणुन त्याला कळवले. त्याचे लगेच उत्तर आले की ‘सर्व माहिती पाठवा, दुसर्‍या दिवशी सोलापुरला जातो‘. मग फोटो, वहिनीचा नंबर, ते दादा कुठे असु शकतील वगैरे कळवले. आणि अक्षय व त्याचे सहकारी काल रात्री निघाले व दुसर्‍या दिवशी म्हणजे भारतीय वेळेनुसार आज सकाळी ८-९ च्या सुमारास रात्रभर प्रवास करुन सोलापुरला पोचले.

वहिनी त्या जागी जाऊन थांबली पण ते दादा तिथे नव्हते. मात्र अक्षयला ते दुसर्‍या जागी सापडले व त्यांना गाडीत बसवुन मंडळी लगेच परतीला लागली. अक्षयची वा भावा-वहिनीची मात्र भेट होऊ शकली नाही.

95D9A03B-D7C9-4A9E-B6ED-D2B198D1CAA5.jpeg88F72B82-F758-4D54-A307-3F532F9BE139.jpegF3F816B8-F729-4CB4-B078-B73B84C39749.jpeg

अक्षय व सहकार्‍यांचे कौतुक करावे तेवढे थोडे. या कामात त्यांनी झोकुन दिले आहे. त्यांना पुढील घडामोडी कळवायला सांगितले आहे. त्यांना हा अनुभव नवा नाही पण अकु व मी , आम्ही दोघी आणि तिकडे भाऊ-वहिनी जीव मुठीत घेऊन होतो की ते दादा सापडले नाहीत तर काय???
नशिबाने तसे झाले नाही व दादांना आता माणसांत रहायला मिळेल याचा खुप आनंद झाला.

बरेच लोक अक्षयच्या घरीच रहात आहेत. स्त्रियापण आहेत. त्यांच्याकरता आता वेगळे बाथरूम्स, आंघोळीची व्यवस्था वगैरे बांधकाम चालू आहे. अक्षयचे घरचे सर्व त्याला यात मदत करतात. कोणाची तब्येत बिघडली तर त्यांना मोठ्या गावात डॉ.कडे घेऊन जातात.

मायबोलीवर अनेक संस्थांची ओळख होते. प्रत्येकजणानी वेगवेगळा वसा घेतला आहे.
या अनुभवाबद्दल लिहावेसे वाटले. कारण केवळ फोनवर/व्हाट्सपवर सर्व जुळुन आले.

शिवऋणच्या मुलांची ही जिद्द पाहुन फार आनंद वाटला.
आपणही त्या ना यथाशक्ती मदत करुया.

धन्यवाद.

पुढील घडामोडी कृपया इथे वाचा.
https://www.maayboli.com/comment/4205755

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>दादांना आता माणसांत रहायला मिळेल याचा खुप आनंद झाला. >>> मस्तच.
फार मोठे सामाजिक कार्य करत आहेत अक्षय व त्याचे सहकारी, मदत करायला आवडेल.

हा खरंच एक वेगळा अनुभव होता. निराधार, बेवारस प्राण्यांना कोणी सांभाळेल का, यासारख्या पोस्टी खूप वेळा वाचनात येतात. परंतु अमुक निराधार व्यक्तीला कोणी आधार देईल का, सांभाळेल का, असे क्वचितच वाचनात येते.
सुनिधीने जेव्हा तिचा सोलापुरातील त्या निराधार दादांचा अनुभव सांगितला तेव्हा हाच विचार मनात रुंजी घालत होता. त्या दादांची व अक्षयची गाठभेट होईपर्यंत मनात खूप धाकधूक होती व ईश्वराची प्रार्थना चालू होती. अक्षय अपडेट्स देत होताच पण प्रत्यक्ष त्या व्यक्तीला मदत करताना, तिला समजावून आपल्याबरोबर चालण्यासाठी राजी करताना त्यांना तसा वेळ मिळत नाही व नंतरही ती व्यक्ती स्थिरावेपर्यंत डोळ्यात तेल घालून तिच्याकडे लक्ष द्यावे लागते. तरी अक्षयने आमच्या विनंतीवरून त्या दादांना घेऊन जाताना काढलेले फोटो शक्य तितक्या लवकर पाठवले.
हे सगळे ज्या सुनिधीच्या अंत: प्रेरणेमुळे शक्य झाले तिच्या कळकळीचे आणि जाणिवेचे कौतुक वाटते.
अक्षय व त्यांच्या टीममुळे ही जाणीव प्रत्यक्ष व्यवहारात जबाबदारी कशा प्रकारे घेता येऊ शकते हे दिसले.

या सर्व गुणी लोकांना व त्यांच्या कामाला खूप शुभेच्छा! रस्त्यावर जनावरांपेक्षाही लाजिरवाणे जिणे जगणाऱ्या लोकांना पुन्हा लौकिकार्थाने माणसांत आणण्याचे त्यांचे हे काम आज समाजात खूप आवश्यक आहे. समाजातल्या प्रवाहातून बाहेर फेकली गेलेली ही ओळख हरवलेली माणसे परत समाजप्रवाहात येणे व त्यांना सन्मानाने जगता येणे हे त्यांच्या प्रयत्नांचे यश आहे.

खरचं अक्षय आणि त्याचे सहकारी जे काम करतात त्याला शब्दच नाही. त्यांच कौतुक करावं तेवढं थोडच आहे. त्यांच्यामुळे किती लोकांचं जीवन सुसह्य झालं, याला गणतीच नाही. त्याच्या घरातलेही अगदी आनंदाने त्याला मदत करतात. त्या सगळ्यांना शतशः धन्यवाद!
सुनिधी, तु अगदी लक्षात ठेऊन योग्य वेळी योग्य निर्णय घेतलास, तुझं आणि अकुचंही कौतुक आणि धन्यवाद!

सर्वांसाठी :
कुणालाही महाराष्ट्रात कुठेही अशी निराधार व्यक्ती तर जरूर अक्षयला फोन करून सांगा. हे त्याचंच सांगण आहे.
आपल्या एका फोन मुळे, कुणाचं आयुष्य बदलत असेल तर ते आपल्याला नक्कीच आवडेल ना? सगळ्यांनी त्याचा फोन नंबर आपल्याकडे ठेवा, आणि योग्य वेळीच त्याचा वापर करा. धन्यवाद!

अक्षय अणि त्यांचे सहकारी, हॅट्स ऑफ!
सुनिधी , तू लगेच घेतलेला निर्णय आणि अकुची साथ हे देखील कौतुकास्पद!

अक्षय अणि त्यांचे सहकारी, हॅट्स ऑफ!
सुनिधी , तू लगेच घेतलेला निर्णय आणि अकुची साथ हे देखील कौतुकास्पद! .... + १०००

माफ करा. उशीरा प्रतिसाद लिहीत आहे. फोटो यायची वाट पहात होतो. हे आजोबांचे काही पुनर्वसनाचे फोटो.

43E2B171-EDCD-4AE4-88E1-BDC0938C475D.jpeg92022F98-D4FD-4089-9E01-2ABD4C37AEA9.jpeg

मध्यंतरी , शिवरुणच्या गाडीला अपघात झाला पण सुदैवाने सर्वजण सुखरुप आहेत. म्हणुन पुढील घडमोडी यायला वेळ लागला.

दुसरे असे की, सोलापुरला या आजोबांना शोधताना अजुन एक निराधार गृहस्थ स्वयंसेवकांना सापडले व त्यांनाही ते जुन्नरला घेऊन गेले व त्यांचा फोटो शिवऋणच्या फेसबुक वर टाकला. तेव्हा त्यांचे सख्खे भाऊ व इतर नातेवाईक येऊन त्यांना रीतसर ओळखपत्र दाखवुन घरी परत घेऊन गेले. त्यांच्या घरच्यांनी सांगितले की, ते गृहस्थ ८-१० वर्षापुर्वी हरवले. ३-४ वर्ष खुप शोधले पण सापडले नाहीत. फेसबुकवर शिवऋणची माहिती कळल्यावर ते तिथेपण लक्ष ठेऊन होते आणि त्यांनी लगेच या गृहस्थांना ओळखले व ताबडतोप त्यांना न्यायला आले. हल्लीच त्यांच्या मुलींची लग्ने झाली ही माहिती पण ओघात कळली. आम्हाला खुप आनंद झाला. आजोबांचे पुनर्वसन करताना अजिबात अपेक्षा नसताना कोणा एकाला त्यांचे घर, परिवार पुन्हा भेटला.

शिवऋणचे पुन्हा एकदा खुप कौतुक.
तुम्हा सर्वांनी केलेले कौतुक शिवऋणपर्यंत पोचवले आहे.
सर्वांचे खुप आभार.
अधुनमधुन घडामोडी लिहीत राहू.
एखादी निराधार व्यक्ती दिसली तर जरूर शिवऋणला कळवा व जमल्यास त्यांना त्या व्यक्तीस घेऊन जायच्या प्रवासास लागणार्‍या पेट्रोलचा खर्च द्या. तो द्यावा अशी अपेक्षा नसते पण दिल्यास नक्की मदत होईल.

ग्रेट ग्रेट ग्रेट.... प्रचंड महत्त्वाचे काम आहे हे... अक्षयला त्याच्या कामासाठी शक्य तितकी मदत करेन व उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्नही करेन...

हो खूपच छान काम आहे , जर त्यांना अजून मदत मिळाली तर अजून खूप चांगले काम होऊ शकते , hope रुग्णवाहिका साठी त्यांना पुरेशी मदत मिळाली असेल