माझ्या कल्पनेतली शाळा....

Submitted by ..सिद्धी.. on 1 April, 2018 - 15:18

छोट्या शहरातली एक मराठी शाळा. आज जूनमधला शाळेचा पहिला दिवस होता. सगळे विद्यार्थी शाळेत आले होते .पहिल्या दिवसाची प्रार्थना संपली आणि वर्गात तास सुरू झाले. पण मुख्याध्यापक सर आज जरा टेन्शनमध्ये  होते. त्याला कारणही तसंच होतं. मागच्या दोन तीन वर्षांपासून शाळेतल्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होत होती. या वर्षी बरेच शिक्षकही शाळा सोडून गेले होते.महागाई आणि त्यात परत कमी वेतन यामुळे त्यांनी शाळेत शिकवणं सोडलं होतं .त्यापैकी काहींनी मिळून एक खासगी क्लास देखिल सुरू केला होता. त्यामुळे आता वर्षभराचं नियोजन कसं करायचं याच्या विवंचनेत सर केबिनमध्ये बसले होते.

तितक्यात अचानक केबिनच्या दारावर टकटक झाली .सरांनी दचकून वर बघीतलं तर एक तरूण दाराबाहेर उभा होता. सर मी आत येऊ का ? असं त्याने विचारलं . त्यांची परवानगी घेऊन तो आत  आला आणि येऊन सरांपुढे बसला.  त्याने आपलं नाव सांगितलं आणि सरांशी बोलू लागला . काय काम होतं बाळा? असं सरांनी त्याला विचारलं . तेव्हा तो म्हणाला सर मला या शाळेत मुलांना शिकवायचं आहे . मला संधी द्याल का? .
हे ऐकून सर विचारात पडले. नंतर बराच वेळ तो तरूण आपल्याबद्दल सांगत होता . सरही विचार करता करता ऐकत होते . त्याच्या चेहेर्यावर चैतन्य ओसंडून वाहत होतं. आणि बोलण्यात एक परिपक्वता होती . त्याच्या व्यक्तीमत्वाने सरांवर छाप पाडली होती. शेवटी सरांनी ठरवलं. असंही शाळेत शिक्षकांची गरज आहे तर मग याला एक संधी देवून पाहूया. त्याचं बोलणं संपल्यावर सरांनी त्याला पत्र दिलं आणि उद्यापासून रूजू होण्यास सांगितलं .सरांना त्याच्या बोलण्यातून एक विश्वास वाटत होता की हा नक्की काहीतरी चांगल करून दाखवेल.
शाळेचा दुसरा दिवस उजाडला. प्रार्थना संपली .आठवी 'क' च्या वर्गातली सगळी मुलं आश्चर्याने दाराकडे पाहू लागली .एक नवीन सर त्यांना आपल्या वर्गाकडे येताना दिसले .  सर वर्गात आले आणि अख्या वर्गात शांतता पसरली .मी शरद ! या वर्षीचा तुमचा वर्गशिक्षक अशी त्यांनी आपली ओळख करून दिली. मग हळूहळू त्यांनी मुलांना नावं विचारली. पहिल्यांदा सगळे अवघडले होते. नंतर मुलांना एक जाणवलं. हे नवीन सर इतरांपेक्षा वेगळे होते . सतत प्रसन्न आणि हसतमुख असायचे . कधी मुलांवर चिडायचे नाहीत .त्यामुळे  पहिल्या दिवसापासून त्यांना ते मुलांना थोडे थोडे आवडायला लागले . असेच दिवस सरत होते .आता मुलंही सरांशी मोकळेपणाने बोलायची .त्यांनी प्रेमाने संपूर्ण वर्गाला आपलसं केलं होतं. छडी ही जनावरांना शिस्तीत आणण्यासाठी असते ; मुलांना नाही असं सरांना वाटायचं. शरद सर म्हणजे एक अजब रसायन आहे हे एव्हाना संपूर्ण शाळेला कळलं होतं.

सरांची शिकवण्याची पद्धतही खूप वेगळी होती .ते कधी पुस्तक हातात घेऊन शिकवायचे नाहीत . एकादा भाषेच्या तासाला त्यांनी वर्गात चिठ्ठ्यांचा बाॅक्स आणला .प्रत्येकाला एक चिठ्ठी उचलायला लावली आणि त्यात जो उपक्रम  दिलाय तो करायला सांगितला.  असं करून त्यांनी वर्षभरात दोन कथा आणि तीन कविता संग्रह तयार केले ज्याचा अख्खा वर्ग लेखक होता .त्यांनी मुलांना भाषा वापरायला शिकवली. गणिताच्या तासाला मापन शिकवण्यासाठी त्यांनी शेठजींच दुकान एक दिवस चालवायला घेतलं होतं . सगळ्या मुलांना त्यांच्या कुवतीनुसार कामं वाटून दिली आणि हिशेबही शिकवला. मुलांसाठी हे सारं अविस्मरणीय होतं . शाळेच्या मैदानाची ; वर्गाची परिमिती आणि क्षेत्रफळ काढायला लावलं . इतिहासाच्या तासाला सर ऐतिहासिक गोष्टी रंगवून सांगायचे . जवळपासच्या सगळ्या किल्ल्यांवर; संग्रहालयात त्यांनी मुलांना नेवून आणलं आणि इतिहास नुसताच न शिकवता दाखवलासुद्धा . भूगोलाच्या तासाला सर मुलांना डोंगरावर घेऊन गेले आणि भूरूप दाखवलं . वेधशाळेत नेऊन भौगोलिक उपकरणे प्रत्यक्ष दाखवली . पर्जन्यमापन यंत्र कस वापरतात ते शिकवलं . विज्ञानाचे तास तर क्वचित वर्गात भरायचे . न्यूटनचे नियम मुलं उदाहरण बघून शिकली . इंद्रधनुष्य कसं अवतरत हे प्रत्यक्ष दाखवून शिकवलं . शेतात सहल नेवून सिंचनपद्धत ; मातीचे प्रकार आणि खतं कशी वापरतात ते दाखवलं . सरांच नेहमी एकच म्हणणं अससायचं . "खरा गुरू हा निसर्ग आहे . मी तुम्हाला आणि त्याला जोडणारा एक दुवा आहे. चार भिंतीच्या वर्गात मी तुम्हाला तात्पुरतं ज्ञान देईन . पण निसर्ग तुम्हाला आयुष्यच्या  प्रत्येक टप्प्यावर धडे देईल." असा निसर्ग शिकण्यात संपूर्ण वर्ष संपलं आणि परीक्षा उजाडली . मुलांना जरा टेन्शन आलं आणि त्यांनी सरांना विचारलं; आम्ही आता अभ्यासाचं काय करू? . सर म्हणाले मुलांनो आपण वर्षभर जे केलं तेच तुम्हाला परीक्षेत लिहायचय .त्यामुळे आजिबात घाबरू नका तुम्हा सर्वांना सगळं येईल याची मला खात्री आहे . शेवटी एकदाची परीक्षा संपली . कधी नव्हे ते सर्वांनाच पेपर चांगले गेले .आता ते निकालाची वाट बघत होते . एकदाचा तो दिवस उजाडला आणि पहिल्यांदा असं झालं होतं की आठवी 'क' चा विद्यार्थी पहिला आला होता . निकाल वाचणार्याला पण क्षणभर आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता . पण तेच खरं होतं . आणि चक्क सगळी मुलं सुद्धा पास झाली होती . शेवटच्या खुर्चीत बसून शरद हे सगळं आनंदाने बघत होता . निकाल संपल्यावर सगळी मुलं धावत येवून सरांना बिलगली. आणि तुम्हीच आम्हाला पुढची दोन वर्ष शिकवायचं असं आश्वासन घेऊनच परत गेली. 

कार्यक्रम संपल्यावर मुख्याध्यापक सरांनी शरदला बोलावून घेतलं आणि त्याला शाबासकी दिली . शरद म्हणाला सर मी शांताक्काचा मुलगा . आपल्याच शाळेत शिकलो आणि पुढे  इंजिनीयर झालो . पण तरीही कुठेतरी कमी आहे असंच मला सतत वाटायचं . शेवटच्या वर्षी एका सरांनी सांगितलं शरद तू चांगलं शिकवू शकतोस .  त्यानंतर मी सरांच्या आग्रहास्तव एक लेक्चर घेतलं . आणि त्यादिवशी मला माझ्यात काय कमतरता होती ते कळलं  . नंतर मी कोर्स पूर्ण केला आणि आपल्याच शाळेत शिकवायच असं ठरवलं . शाळेत मी अभ्यासेतर उपक्रमात कधी पुढे नव्हतो त्यामुळे तुम्हाला मी फारसा आठवतही नसेन . पण आता आयुष्यभर मी इथेच शिकवायचं ठरवलय . सरांच्या डोळ्यात नकळत अश्रू दाटून आले .
एक उत्तम विद्यार्थी उत्कृष्ट शिक्षक होऊ शकतो याचं उदाहरण त्यांच्यासमोर उभं होतं . प्रयोगशीलता ही शिक्षणाचा पाया आहे हे त्यांना पटलं होतं.
==============================
हा लेख म्हणजे माझ्या कल्पनेतली शाळा आहे . प्रत्येकाच्या शाळेविषयी काही कल्पना असतात .त्या प्रतिसादात मांडण्याची वाचकांना मुभा आहे.

--- आदिसिद्धी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुझी कल्पनेतली शाळा भन्नाट आहे. पुलेशु (पुढील लेखनासाठी शुभेच्छा ).
लेखनातल्या मला न उमगलेल्या गोष्टी. ८वी क म्हणजे पटसंख्या बर्‍यापैकी मोठी आहे या वर्गाची म्हणजे शाळा बर्‍यापैकी मोठी आहे सरकारी मदत असणारच. त्यामुळे कमी वेतन पटत नाही . शिवाय एका वर्गाला सर्व विषयाला एकच शिक्षक हेही पटले नाही. का आधी म्हणाल्याप्रमाणे बरेच शिक्षक सोडून गेल्याने ही अरेंजमेंट आहे ते कळत नाही.

अरे वाह.. छान आहे कल्पनेतील शाळा. लिहिलेही छान Happy
अश्या शाळा असतात असे ऐकलेही आहे .. बहुतेक माबोवरच मागे वाचलेही आहे..

<<<<< छडी ही जनावरांना शिस्तीत आणण्यासाठी असते ; मुलांना नाही असं सरांना वाटायचं. >>>>
जनावरांनाही प्रेमाची भाषा समजते. पण येनीवेज, सरांचा तो प्रांत नसावा Happy

@ पाफा, अहो ती मराठी शाळा असावी. तिची स्थिती अशीच असणार..

खूप आवडली... आजही काही शाळेत असा चांगल्या अर्थानं 'उद्योगी' शिक्षक एखादा नक्की सापडतो...
हि शाळा टागोरांच्या शांतिनिकेतनसारखी वाटली...

आनंद ; सायुरी ; अभिषेक>>> धन्यवाद

पाफा काका >>> तुमचे मुद्दे बरोबर असतील.मुलं कमीच होती वर्गात . मलाही सहावीपर्यंत एकच वर्गशिक्षक सगळे विषय शिकवायचे...मी फक्त वीस मिनीटं अभ्यासातनं ब्रेक घेतल्यावर इथे विचार करून टाईप केलीये . मला या शासकीय गोष्टींची तितकीशी माहिती नाही .जरा समजून घ्या प्लीज. त्यामुळे काही चुकलं असेल तर माफ करा.. मला आशय पोहोचवणं महत्त्वाचं वाटलं ... पुढच्यावेळी सुधारणा करेन... तुमचेही धन्यवाद.

ऋदादा>>> ते वाक्य आमचे गणिताचे सर म्हणायचे .. मला त्या अर्थाचं दुसरं वाक्य सुचलं नाही म्हणून ते आठवलं आणि तेच टाकलं इथे...तु सुचलं तर सांगतोस का? मी संपादन करेन....

अभिषेक >> धन्यवाद . मी शांतिनिकेतन पाहिलं नाहीये . पण तुम्ही म्हणत असाल तर तसंच असेल . मला नावाने माहितीये पण त्याबद्दल इतर माहिती नाहीये.

छान आहे कल्पनेतील शाळा. कोणीतरी अशी कल्पनेतील शाळा प्रत्यक्षात आणली तर ते जास्त आवडेल आणि ती व्यक्ती खरोखर महान असेल.

छान... यापेक्षा उत्तम शिक्षण अन्य कुठल्या मार्गाने भेटेल???
तुमच्या कल्पनेतली शाळा अगदी परिपुर्ण आहे बरका..

हिचकी च्या गोष्टीवरून प्रेरणा घेतली का लिहायची?>>>>> हे उचकी प्रकरण काय आहे???? कल्पनाविस्तार करता का जरा....मला खरंच माहित नाहीये...

हिचकी पिक्चर आहे राणी मुखर्जीचा. त्यात तिची भूमिका- नयना माथुर हीला सतत उचक्या येण्याचा सिन्ड्रोम असतो. तिची तरीही शिक्षक बनायची इच्छा असते. ती शाळेतल्या मुलांशी जुळवत ते यशस्वीपणे करून दाखवते याची यशोगाथा हा पिक्चर.

अच्छा अस आहे तर.... मी टीव्ही बघत नाही.... सिरीयल आणि चित्रपट तर नाहीच नाही.... त्यामुळे हे मला नव्हतं माहिती.... ही मला सुचलेली कल्पना आहे.... अगदी शाळेत असल्यापासून अशीच माझी शाळा असावी असं मला नेहमी वाटायचं... पण ते शक्य नव्हतं....त्यामुळे आता इथे लिहीलं...

छान छान !!!
तोत्तोचान पुस्तक आठवले हे वाचून.
पुण्यात पौड रोडवर एक अशासारखीच शाळा आहे.

धन्यवाद महेश. तोत्तोचान मी सहावीत असताना वाचलेल.. त्यातला यासुकीचानच्या मृत्यूची गोष्ट वाचल्यावर मी खूप रडून गोंधळ घातलेला..भयंकर वाईट वाचलेलं... जेवले सुद्धा नव्हते त्या दिवशी.... शेवटी बाबांनी कसबसं समजावलेलं...तुमच्या पोस्ट वरनं आठवलं....

मलाही सहावीपर्यंत एकच वर्गशिक्षक सगळे विषय शिकवायचे...मी फक्त वीस मिनीटं अभ्यासातनं ब्रेक घेतल्यावर इथे विचार करून टाईप केलीये . >>>>>>>>>

कुठल्या दुर्गम गावात शिकत आहात? मी 40 वर्षांपूर्वी मुंबईत पालिकेच्या शाळेत होते तेव्हाही विषयांना वेगळे शिक्षक होते, माझी मुलगी मराठी शाळेत होती, तिथे तिच्या वर्गाची पटसंख्या 16 होती तिथेही चौथीपर्यंत एकापेक्षा जास्त शिक्षक होते. सध्या माझ्या गावच्या शाळेत पण पाचवीपासून एकापेकशा जास्त शिक्षक आहेत. आता कुणी अगदीच दुर्गम भागात आहे जिथे जायला कोण तयार नसेल तर गोष्ट वेगळी.

बाकी तुम्ही, द्वागु वगैरे लहान मुली माबोवर येऊन चांगले लिहिता याचे कौतुक वाटत होते. पण 20 मिनिटात विचार करन गोष्ट लिहिली व इथे टंकली असे काही वाचले की शंका यायला लागते. गोष्ट रचायला वेळ लागत नसेल पण इथे वर लिहीलेय तितके टंकयला 20 मिनिटे पुरेशी नाहीत. त्यात तुमच्या प्रतिसादाची पद्धत व भाषा खूप ओळखीची वाटते व त्यामुळे जरा जास्तच शंका वाटते.

असो. तुम्ही खऱ्याच असाल तर मनावर घेऊ नका.

कुठल्या दुर्गम गावात शिकत आहात? मी 40 वर्षांपूर्वी मुंबईत पालिकेच्या शाळेत होते तेव्हाही विषयांना वेगळे शिक्षक होते, माझी मुलगी मराठी शाळेत होती, तिथे तिच्या वर्गाची पटसंख्या 16 होती तिथेही चौथीपर्यंत एकापेक्षा जास्त शिक्षक होते. सध्या माझ्या गावच्या शाळेत पण पाचवीपासून एकापेकशा जास्त शिक्षक आहेत. आता कुणी अगदीच दुर्गम भागात आहे जिथे जायला कोण तयार नसेल तर गोष्ट वेगळी.>>>>>>>>>>>>> मी कथेच्या नावातच म्हटलेलं आहे की ही माझ्या कल्पनेतली शाळा आहे...त्यामुळे नावातच सारं काही आलं...बाकी माझ्या शाळेत मला सहावीपर्यंत एकच वर्गशिक्षक सगळे विषय शिकवत होते हे सत्य आहे.... प्रत्येक शाळेची वेगवेगळी पद्धत असूच शकते ना...

पण 20 मिनिटात विचार करन गोष्ट लिहिली व इथे टंकली असे काही वाचले की शंका यायला लागते. गोष्ट रचायला वेळ लागत नसेल पण इथे वर लिहीलेय तितके टंकयला 20 मिनिटे पुरेशी नाहीत. >>>>>
मी मला काहितरी सुचलं की इथे डायरेक्ट टाईप करते.. आणि मोबाईलवर टाईप करत असल्यामुळे लवकर काम होतं... मी स्वतःला टाईम
लिमीट ठरवून घेते की मला ठरावीक इतक्याच वेळात हे काम करायचयं ... त्यामुळे लवकर काम संपत..... आणि माझा टायपिंगचा आणि विचारांचा वेग जास्त असल्यामुळे एवढी गोष्ट टाईप करायला वीस मिनीटं मला पुरेशी आहेत

त्यात तुमच्या प्रतिसादाची पद्धत व भाषा खूप ओळखीची वाटते व त्यामुळे जरा जास्तच शंका वाटते.>>>>>>> ....एखाद्या व्यक्तीने लिहीलेल लेखन हे त्याच्या मनातल्या विचारांच प्रतिबिंब असतं अस मला वाटतं.. दोन माणसांची मतं किंवा शैली सेम असू शकतात... त्यात परत आपण प्रत्यक्षात कधी भेटलेलो नाही .... त्यामुळे तुमचं असं मत असणं स्वाभाविक आहे... याचा मला काहीच फरक पडत नाही...उलट गंमतच वाटते....

असो. तुम्ही खऱ्याच असाल तर मनावर घेऊ नका.>>>मी अशा गोष्टी कधीच मनावर घेत नाही... आणि राग तर मला आजिबात येत नाही..त्यामुळी मी चिडले नाहीये... ही माझी मतं झाली ...तुम्हाला पटायलाच पाहिजेत अशी काही माझी जबरदस्ती नाही.... त्यामुळे नसतील आवडली तर सोडून द्या... आणि धन्यवाद.

.

शाळेचा विषय आहे म्हणून एक गोष्ट इथे शेअर करावीशी वाटते. वास्तविक इथे लिहिणे हे कदाचित अवांतर होईल परंतु तेवढ्यासाठी नवीन धागा काढायला नको म्हणून इथेच शेअर करतो आहे.
अंधेरी पश्चिम येथे आंबोली सिग्नलजवळ St. Blaise Convent School आहे. तिथली बरीचशी मुले अंधेरी क्रीडासंकुल येथे जलतरणासाठी (swimming) येतात. त्यांच्यापैकी काही मुलांशी माझी ओळखही झाली आहे.
या मुलांशी गप्पा मारतांना एक गोष्ट लक्षात आली की, ही मुले बोलताना सर्रास त्यांच्या वयाला न शोभणाऱ्या शिव्यांचा वापर करतात. (इ. ७ वी/ वय वर्षे १२) द्वयअर्थी बोलणे, शिव्या / धमक्या देणे अगदी नित्याचीच बाब झाली आहे. या वाईट सवयी त्यांना कुठून लागल्या असाव्यात? शाळेतून की जिथे राहतात त्या परिसरातील अन्य व्यक्तींकडून? शाळेतल्या शिक्षकांचे मुलांकडे लक्षच नसेल का? Convent school मध्ये मुलांवर संस्कार वगैरे काही करतच नाहीत का?

Pages