बदलत्या वर्तमानाचं भान असलेला दिग्दर्शक - गिरीश कासरवल्ली - श्री. गणेश मतकरी

Submitted by चिनूक्स on 30 January, 2018 - 10:18

भारतीय चित्रपटसृष्टीला समृद्ध करणार्‍या आणि भारतीय चित्रपटांची आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण करणार्‍या दिग्दर्शकांमध्ये श्री. गिरीश कासरवल्ली अग्रगण्य आहेत. चौदा राष्ट्रीय पुरस्कार, असंख्य आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्यांच्या नावावर जमा आहेत.

पुण्याच्या आशियाई चित्रपट-महोत्सवात यंदाचा 'झेनिथ एशिआ' हा मानाचा पुरस्कार त्यांना देण्यात आला.

त्यानिमित्ताने चित्रपट-अभ्यासक व समीक्षक श्री. गणेश मतकरी यांनी लिहिलेला हा लेख -

***

पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमधून बाहेर पडल्यावर केलेल्या ‘घटश्राद्ध’ या आपल्या पहिल्या चित्रपटापासूनच, दिग्दर्शक गिरीश कासरवल्ली हे नाव भारतीय चित्रपटांसाठी लक्षवेधी ठरलेलं आहे. तेव्हापासून, ते त्यांनी २०१२ साली केलेल्या 'कूर्मावतार' या चित्रपटापर्यंत त्यांचा प्रत्यकेच चित्रपट हा काही नवं करू, बोलू पाहणारा आणि दर्जात्मक पातळीवर गौरवला गेलेला आहे. राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मराठी चित्रपटांना आजवर पाच सुवर्णकमळं मिळाली आहेत याचं आपल्याला कौतुक वाटतं, पण एकट्या कासरवल्लींच्याच घटश्राद्ध (१९७७) , तबरने कथे (१९८७) , ताईसाहेबा ( १९९७) आणि द्वीप (२००२) या चार चित्रपटांना सुवर्णकमळं आहेत. बाकी सन्मान, पुरस्कार तर विचारूच नका !

कासरवल्लींच्या एकूण कामाकडे पाहिलं, तर काही गोष्टी सहज लक्षात येतात. त्यांतली पहिली आणि कदाचित सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, केवळ प्रेक्षकांचा विचार करून या दिग्दर्शकानं कधीही काहीही केलं नाही. सिनेमा चालावा आणि आपल्याला त्यातून काही आर्थिक लाभ व्हावा, असा विचार त्यांच्या कामात कुठेही दिसत नाही. आशयाच्या, अर्थाच्या पातळीवर आपल्याला नवी काय मांडणी करता येईल, आजवर चित्रपटात सांगता न आलेलं काही आपण सांगू शकतो का, आणि ते सांगण्याचा सर्वांत योग्य मार्ग कोणता, याला कासरवल्ली प्राधान्य देतात. पण याचा अर्थ असा नाही, की नवं काही सांगताना या दिग्दर्शकाचा सिनेमा कठीण होतो, दुर्बोध होतो. उलट मी तर म्हणेन की, कोणत्याही सर्वसाधारण प्रेक्षकाला या चित्रपटांशी समरस होणं अगदी सोपं आहे.

बरेच दिग्दर्शक स्वतःची एक शैली ठरवतात, टाईप ठरवतात, चित्रप्रकार ठरवतात आणि पुढे त्याचप्रकारचं काम करत राहतात. त्यामुळे त्यांची एक ओळख ठरुन जाते आणि त्या त्या प्रकारच्या सिनेमाशी त्यांचं नाव जोडलं जातं. कासरवल्लींनी असा एका विशिष्ट प्रकाराला बांधून घेण्याचा प्रयत्न केला नाही. ढोबळमानानं पाहिलं तर व्यक्ती आणि समूह, समाज यांच्यामधलं नातं आणि त्या नात्यात होणारे संभाव्य बदल, असा एक व्यापक विषय त्यांच्या संपूर्ण कामातून पुढे येतो. पण वरवर पाहता या चित्रपटांमध्ये सरसकट साम्य दिसून येत नाही. कथेची जातकुळी, त्यातून व्यक्त होणाऱ्या कल्पना / आशयसूत्र, निवेदनशैली किंवा चित्रप्रकार, तसंच आशयानुरुप बदलणारी पार्श्वभूमी पाहता त्यांचा प्रत्येक चित्रपट हा दुसऱ्यापेक्षा पूर्णपणे वेगळा असल्याचं जाणवतं.

एखाददुसरा अपवाद वगळता कासरवल्लींचं संपूर्ण काम हे साहित्यकृतींच्या आधाराने केलेलं, रूपांतरीत आहे. मात्र हे रूपांतर जसंच्या तसं अजिबातच नाही. मूळ कृतीतले काही घटक, मांडणी, काही कल्पना यांचा वापर ते करतात, पण या घटकांपलीकडे जात नव्या दृष्टीने त्या गोष्टीकडे पाहणंही त्यांच्या चित्रपटांची गरज आहे. कासरवल्ली एखाद्या संकल्पनेचा विचार करत असतील, आणि एखाद्या साहित्यकृतीत या विचाराशी सुसंगत असे घटक सापडले, ती कृती आपल्या डोक्यातल्या विचारांना पडद्यावर आणतानाचं एक साधन म्हणून आपण वापरू शकू असं वाटलं, तरच त्या कथेचा किंवा कादंबरीचा विचार रूपांतरासाठी केला जातो. नाही म्हणायला 'घटश्राद्ध'सारखं उदाहरण घेता येईल, जे बरचसं जसंच्या तसं यु. आर. अनंतमूर्तींच्या कथेवर आधारित आहे, पण राम शा यांच्या कादंबरीवर आधारलेला 'ताईसाहेबा', वैदेहीच्या लघुकथेवर आधारलेला 'गुलाबी टाॅकीज' यांसारखी कथेत आणि मांडणीत अगदी मूलभूत बदल घडवणारी रूपांतरंच त्यांच्या कामात अधिक प्रमाणात दिसतात. हा दृष्टीतला बदल अतिशय आवश्यक आहे आणि तो मनासारखा झाला नाही, तर चित्रपट हवा तसा बनूच शकणार नाही, या एका कारणामुळेही कासरवल्लींना दुसऱ्या पटकथाकारावर अवलंबून राहणं अवघड जातं आणि ते आपल्या पटकथा स्वत:च लिहितात.

कासरवल्लींच्या कारकिर्दीत त्यांच्या स्त्रीकेंद्री चित्रपटांचं स्थान महत्त्वाचं आहे. मुळात 'घटश्राद्ध' हादेखील एका परीने स्त्रीकेंद्रीच चित्रपट आहे, पण १९९६च्या 'क्रौर्य'पासून ते २००८च्या 'गुलाबी टाॅकीज'पर्यंत आलेल्या सहा चित्रपटांमधूनही फार वैशिष्ट्यपूर्ण स्त्री-व्यक्तिरेखा आपल्याला पाहायला मिळतात. 'स्त्री विरुद्ध व्यवस्था' हे यांतल्या अनेक चित्रपटांचं सूत्र आहे. कधी ही रूढींनी बांधलेली धर्मव्यवस्था आहे, कधी समाजाच्या अलिखित नियमांनी ती तयार झाली आहे, तर कधी तिला सरकारी आशीर्वाद आहे. प्रत्येक वेळी यातल्या व्यक्तिरेखा व्यवस्थेला यशस्वीपणे तोंड देतातच असं नाही, पण त्यांचा संघर्ष प्रेक्षकाला बरंच काही सांगून जातो.

राजकीय भाष्य हा गिरीश कासरवल्लींच्या चित्रपटांचा महत्त्वाचा भाग. आता राजकीय भाष्य म्हणजे नुसती चित्रपटात राजकारणातल्या व्यक्तिरेखा घुसवणं, किंवा राजकीय सबप्लाॅट आणणं वगैरे नाही. इथला राजकीय विचार हा अधिक मूलभूत स्वरूपाचा, देशाच्या राजकीय धोरणाचा विचार करणारा आहे. विकासाची धोरणं, समाजरचना, जातीयवाद, सरकारी यंत्रणांच्या नावाखाली अस्तित्वात येणारी दुष्टचक्रं याबद्दलचा असतो. स्वातंत्र्य म्हणजे काय, सत्ताधाऱ्यांची यात काय भूमिका आहे यांवर कासरवल्लींचा सिनेमा बोलू पाहतो. सुखांत चित्रपटांमधून सोपी उत्तरं शोधत प्रश्न सोडवण्याचा आव आणण्यात त्यांना रस नाही, तर प्रश्न उपस्थित करणं हीच या चित्रपटांची गरज आहे. 'तबरन कथे', 'द्वीप', 'कूर्मावतार' अशा अनेक चित्रपटांकडे आपण या दृष्टीने पाहू शकतो.

गिरीश कासरवल्लींच्या चित्रपटांवर बऱ्याच अंशी वास्तववादाचा पगडा आहे. पण हा वास्तववाद पाश्चात्य चित्रपटांच्या वळणाचा नसून सत्यजित राय किंवा ऋत्विक घटक यांनी भारतात वास्तववादाचं जे रूप रुजवलं, त्याच्याशी सुसंगत आहे. त्यांच्या चित्रपटांची पार्श्वभूमी खरी असते. ती केवळ एक कल्पित कथा नसून तिला विशिष्ट काळ आणि तत्कालीन समाज यांची पक्की बैठक असते. चित्रपटांची रचना तर्काला धरून असते, वर त्यात केवळ रंजनाचा हेतू नसून काही एक सामाजिक, राजकीय अंगाचा विचार त्यांच्या केंद्रस्थानी असतो. अर्थात, मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे केवळ एका साच्याला धरून राहायचं नाही, अशी दिग्दर्शकाची पद्धतच आहे. त्यामुळे सिम्बाॅलिझमचा भरपूर वापर असलेला 'मने' (हिंदीत ‘एक घर’) , किंवा नाॅनलिनीअर कथनपद्धती वापरत प्रेक्षकाला कोड्यात पाडणारा ‘रायडिंग द स्टॅलिअन ऑफ ड्रीम्स' असे काही पूर्ण वेगळे प्रयत्नही त्यांच्या कामात वेळोवेळी येऊन गेलेले आहेत.

वर्तमानाचं भान सतत आपल्या कामामधून जाणवून देणाऱ्या आणि आशय तसंच तंत्र यांवर घट्ट पकड असलेल्या या सर्जनशील दिग्दर्शकाने भारतीय चित्रपटावर आपला ठसा उमटवलेला आहे. दुर्दैवानं त्याचं काम जरी सातत्यानं गौरवलं गेलं असलं, तरी सर्वसामान्य प्रेक्षकांपर्यंत त्यांचा चित्रपट म्हणावा तितका पोचलेला नाही. जगभरातल्या सर्वाधिक चित्रपटनिर्मिती होणाऱ्या देशांमध्ये आपला क्रमांक वरचा असला, तरी आपला प्रेक्षक, मग तो मराठी असो, हिंदी वा कन्नड, आजही केवळ रंजनवादी चित्रपटांनाच प्राधान्य देतो. त्यामुळे प्रेक्षकांपुरतं हिंदीत बाॅलिवुड आणि इतर भाषांमध्ये जे बाॅलिवुसदृश काम केलं जातं, तोच सिनेमा अधिक प्रमाणात पाहिला जातो. केवळ गिरीश कासरवल्लींचाच नाही, तर आपल्या प्रादेशिक चित्रपटांमधला काही अर्थपूर्ण कामगिरी करू पाहणारा समांतर वळणाचा एकूण सिनेमाच या मनोरंजनाच्या लाटेपुढे आज हतबल झालेला आहे. असं असतानाही, ज्यांचं काम या क्षणिक मनोरंजन देणाऱ्या चित्रपटांच्या माऱ्यासमोर काळाच्या ओघात टिकून राहील, अशांतला एक दिग्दर्शक म्हणून आपण कासरवल्लींकडे निश्चित पाहू शकतो.

पुण्यात होणाऱ्या आशियाई चित्रपट महोत्सवाचा ‘झेनिथ एशिआ’ हा पुरस्कार संपूर्ण आशियात आपल्या कर्तृत्वानं ओळखल्या जाणाऱ्या भारतीय चित्रकर्त्याला दिला जातो. यंदा हा मान गिरीश कासरवल्लींना मिळाला आहे. त्यांचं या निमित्तानं अभिनंदन करतानाच मी भारतीय प्रेक्षक लवकरच थोडा सुजाण होईल, आणि त्यांच्यासारख्यांचं दर्जेदार काम अधिक प्रमाणात आपल्यापर्यंत पोहोचेल, अशीही आशा व्यक्त करतो.

***

हा लेख मायबोली.कॉमवर पुनर्मुद्रित करण्यास परवानगी दिल्याबद्दल श्री. गणेश मतकरी यांचे मनःपूर्वक आभार.

***
विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर ओळख. फक्त नाव ऐकून माहिती होते पण कुठले आणि कसे चित्रपट केले हे माहिती नव्हते. माबो वर प्रकाशित केल्याबद्दल धन्यवाद चिनूक्स

सुंदर ओळख.
बरच काही नव्याने कळलं..

छान ओळख. दुर्दैवाने अशा कलाकारांना खरचं प्रसिद्धी मिळत नाही.
चित्रपट-महोत्सवांव्यतिरीक्त हे चित्रपट कुठे बघता येतील?

मस्त परीचय.

लेख मायबोलीवर आणण्याकरीता आभार चिनूक्स.

सुंदर ओळख.

कासरवल्ली यांचे घटश्राद्ध व तबरने कथे दूरदर्शनच्या कृपेमुळे पाहिले आहेत. बाकीचे चित्रपट नेटवर सापडले तर अवश्य बघेन.

कासरवल्लींचे ऑनलाईन असलेले चित्रपट -

१. http://www.hotstar.com/movies/nayi-neralu/1000102755 - नायी नेरलू

२. एक घर (नसिरुद्दीन शाह, दिप्ती नवल, रोहिणी हट्टंगडी ) - http://www.hotstar.com/movies/ek-ghar/1770004264/watch

३. गुलाबी टॉकीज - http://www.hotstar.com/movies/gulabi-talkies-/1000154918

४. ताईसाहेबा - https://www.jiocinema.com/watch/movies/thai-saheba/0/0/e48893a0b93511e6a...

५. कनशेंबो कुदुरेयनेरी - http://www.hotstar.com/movies/kanasembo-kudureyaneri/1000115834