कीप इट सिम्पल सिली .......

Submitted by यशू वर्तोस्की on 11 January, 2018 - 21:07

हे वर्ष मात्र सुट्यांचं होतं शनिवार रविवारला जोडून आलेल्या सुट्यांमुळे लॉंग विकेंड्स खूप होते त्यामुळे पार्टी अनिमल्स करता सरतं वर्ष म्हणजे एक पर्वणी होती. हल्ली दीड दिवस सुट्टी असली तरी लोक मुंबईच्या बाहेर पळतात तर अश्या लॉन्ग विकेंडला काय विचारा . मुंबई बाहेर जाणारे सर्व रस्ते तुडुंब असतात . माझ्या घरापासून ठाण्यात यायला सामान्यतः वीस पंचवीस मिनिटे पुरतात पण अश्या विकेंड्सला हेच अंतर काटायला मला जवळपास दोन अडीच तास लागत होते . जणूकाही सर्व शहर रिकामं होत होतं असा भास होत होता .
पेपरात टीव्हीवर हीच चर्चा असायची की कसे सगळे एक्सप्रेस हायवेज जॅम झालेत . सर्व आऊटिंगची ठिकाणं ओसंडून वाहत आहेत . खोटं कशाला बोलू पण या वाहत्या गंगेत आम्हीही थोड्याफार प्रमाणात सामील होतोच . माझं कामाचं शेड्युल आणखी लवचिक असल्याने तसाही प्रत्येक विकेंडला मी लॉन्ग विकेंड करू शकतो पण तरीही मनात कुठेतरी एक टेन्शन किंवा गिल्ट असते . असे लॉन्ग विकेंड आले की ही गिल्ट थोडी कमी होते एव्हढंच . अगदी शहरी वातावरणाच्या एकदम विरुद्ध असणारे रिसोर्र्ट्स , किंवा समुद्रकिनारी असणारी विकेंड होम्स , किंवा त्यापलीकडे जाऊन बाईक वरून सापुतारा किंवा माळशेज घाटाची सफर किंवा अगदी लडाख , कच्छचं रण कितीतरी ऑप्शन्स उपलब्ध होते आणि ते आम्ही वेळोवेळी घेतले . परत आल्यावर नाईलाजाने दुसऱ्यादिवशी ऑफिसला जायला लागायचं तो आमच्या आयुष्यातला सर्वात कठीण दिवस असायचा . त्यानंतरचा अख्खा आठवडा सामानाची आवराआवर आणि मेमेरीज सांभाळणे यात जायचा . या सर्व नंतर पुढचे काही दिवस खूप थकवा जाणवायचा . आनंद मिळत होता पण ड्रेन झाल्यासारखं व्हायचं .
बरेचदा आपल्या वाचनात प्रवास वर्णनं येतात . माणसं कुठेकुठे जाऊन येतात किंवा त्यांना कितीतरी भयानक किंवा अलौकिक अनुभव येतात . सुदैवाने आम्हाला आमच्या कुठल्याच प्रवासात फार अलौकिक अनुभव आले नाहीत . पण यामुळे आमच्या आनंदात कुठे एक्साइटमेन्ट कमी होती असं आम्हाला कधीच वाटलं नाही . आज बऱ्याच मुशाफिरी करणाऱ्या किंवा विकेंड्सला बाहेर जाणाऱ्या लोकांशी सहज चर्चा होते तेंव्हा एक गोष्ट जाणवते की आनंद मिळवणं एव्हढंच पुरे पडत नाहीये . माणसांची भूक वाढत जाते . एक थोडासा कमर्शियल ऍप्रोच झालाय . मी विकेंडला तीन दिवस खर्च करून , इतका प्रवास करून आणि खर्च करून जातोय म्हणजे मला त्या प्रमाणात मजा केलीच पाहिजे. हल्ली मजा याचा अर्थ आनंद नसून ऍक्टिव्हिटीज असा झाला आहे . या तीन दिवसात साधारण २००-३०० किलोमीटर ड्रायव्हिंग किंवा प्रवास , रात्रीची जागरणं , विविध प्रकारच्या खाद्य संस्कृती , ते पदार्थ , मद्य , कॅम्प फायर , साईट सिईंग , गाणी , दिवसा ऍडव्हेंचर स्पोर्ट्स ..... हे सगळे रकाने भरले तर तर ती ट्रिप सक्सेसफुल अन्यथा नो गूड असं काहीसं झाला आहे .
लडाख , काश्मीर किंवा अगदी कच्छच्या रणात फिरायला जाणाऱ्या ( खरं तर ही हॉलिडे ट्रिप करण्याची किंवा व्हेकेशन मधे फिरायची ठिकाणं नाहीत ) लोकांना आपल्या बरोबर लहान मुलं , खूप सामानसुमान असला लवाजमा घेऊन जाताना पाहिलं कि खूप विचित्र वाटतं . याच्या एकदम उलट या ठिकाणी विमानाने जाणं किंवा सध्या मार्गाने प्रवास करणं म्हणजे फालतू आणि याठिकाणी बाईक्स वरून ट्रिप , किंव स्वतः ड्राइव्ह करून जाण्याचं थ्रिल म्हणजेच मजा असं मानून बाकी सामान्य लोकांकडे तुच्छतेने बघणारी पण एक जमात आहे .
आपण नेमके कशाकरता बाहेर पडलो आहोत हेच लक्षात न घेतलेले सध्या आऊटिंग मध्ये ओढूनताणून थ्रिल आणणारे आणि थ्रिल म्हणून आचरट प्रकार करणारे दोघेही एकाच माळेचे मणी असतात . मी हे म्हणत नाही की आनंद मिळत नाही , नक्की मिळत असतो पण अँट व्हॉट कॉस्ट . आनंदाने माणसाला शांतात , स्थैर्य मिळते , कधीकधी तर शाररिक श्रम होतात पण तरीही फटिग येत नाही . पण पैसे वसूल नादात कमी वेळात सगळी सुखं किंवा सगळ्या एन्जॉयमेंटचे रकाने भरण्याच्या नादात आपण कमावतो त्यापेक्षा काहीतरी जास्त गमावतो . आणि सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे त्याची सवय लागते ज्यामुळे पुढे पुढे कुठल्याच गोष्टीत माणसाला तृप्तता येत नाही . काय मिळवलं यापेक्षा आणखी काय काय करायचं राहून गेलं यांच्यातच गुंतून माणसं जे कमावलं त्याचा आनंदच उपभोगू शकत नाहीत . दुसर्याबद्दल नाही तर मी हे स्वानुभवावरून सांगतोय . वेगळं करणं म्हणजे काहीही अचाट करणं गरजेचं नसतं . काही इंग्लिश खाडी पोहून जाणे एव्हरेस्टवर चढणे किंव जंगल ट्रेक करणे गरजेचं नाही . ते करणं चुकीचं नाही पण त्याची सवय आणि त्याचं वय या गोष्टी ध्यानात घ्याव्यात एव्हढंच म्हणणं आहे . हे करणारी माणसं लौकिकार्थाने वेगळी नसतात तर वेगळं आयुष्य जगणारी असतात . आपण रुटीन आयुष्य जगणारी माणसं वेगळेपण मिळवणाच्या नादात म्हणून बरेचदा मनस्ताप मिळवतो .
वेगळा विषय म्हणून शेअर करतो .... टीव्हीवर मास्टर शेफ ऑस्ट्रेलिया कार्यक्रम असतो. मी तो पूर्वी रेग्युलर बघायचो. असं वाटायचं की या कार्यक्रमातून काही वेगळ्या डिशेश बघायला मिळतील . पण त्यांचं कुकिंग आणि फूड कल्चर आपल्यापेक्षा फारच वेगळं आहे . त्यामुळे त्यांच्या बऱ्याचश्या डिशेश जरी बनवता आल्या तरी खायला कितपत जमतील याबद्दल मी साशंक होतो . आपल्याकडचे कुकरी शोज पाहणं म्हणजे एक शिक्षाच असते . एकतर या शोज मध्ये येणारे लोक सो कॉल्ड सेलिब्रेटीज असतात त्यामुळे त्याचं कुकिंग त्याच्या ग्लॅमरही संबंधित म्हणजे यथातथाच असतं आणि बाकीची सामान्य माणसं सध्या सरळ पदार्थांची अशी काही मोडतोड करतात ते खाणं तर दूरच पण ते पाहाणं देखील खूप त्रासदायक असतं . घरात असलेल्या उपलब्ध साहित्यापासून फारसा तोडमोड न केलेला किंवा अचाट प्रयोग न केलेला साधा चविष्ट पदार्थ बनवणे म्हणजे स्वयंपाकाची कला . म्हणजे खूप मेकअप न करता किंवा खूप कॉश्च्युम्स न घालता फक्त साधे कपडे आणि कमीतकमी मेकअप करून फक्त आवाजाच्या चढउतारांनी किंवा मुद्राभिनयाने सादरीकरण करणारा नट हा नटसम्राट मनाला जातो तसं.
पण मास्टर शेफ ऑस्ट्रेलियाच्या एका एपिसोड मध्ये एक सिनियर सेलिब्रिटी शेफ आला होता . पूर्ण वेळ तो स्पर्धकाच्या अवतीभोवती फिरत होता . त्याच्या हातात एक शेफ्स नाईफ असायची . तोंडाने तो एकच मंत्र जपत होता की " टू मेक अ ग्रेट डिश .... कीप इट सिम्पल "
किती अचूक स्ट्रॅटेजि .... कालिनरी आर्टच नाही तर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात हे चपखल बसतं . कीप इट सिम्पल . दोन दिवसांपूर्वी संध्याकाळी लवकर स्वयंपाक झाला होता . फार मोठा बँक्वेट प्लॅन नव्हता ( पराठे आणि चटणी , दही ) . आदित्य घरी यायला बराच वेळ होता. म्हणून स्वातीने डबा तयार केला , पाण्याची बाटली , पेपर प्लेट्स घेतल्या . बाईकवरून काळा तलाव परिसरात गेलो . एकमेकांचा हात हातात धरून थोडं चाललो . लोकं कुतूहलाने पाहत होते गंमत वाटत होती . थोडावेळ माशांना पिठाचे गोळे खाऊ घातले . काळोख नुकताच पडत होता . पाण्यातली कारंजी चालू झाली होती , प्रकाशाच्या खेळ सुरु होता . दूरवर तळ्याच्या पैलतीरी बाळासाहेब ठाकरे मेमरियलचे दिवे पेटले होते . त्या वास्तूचं प्रतिबिंब पाण्या फारच सुरेख दिसत होतं . पाण्यात बदकं , पाणकोंबड्या , बगळे विहरत होते . वॉक करणारे , नेहेमीचे पेन्शनर्स , किलबिलाट करणारी लहान मुलं . पण थंड वाऱ्याच्या झुळुकांबरोबर थंडी पसरत होती . आम्ही हलकेच अंगावर स्काफ गुंडाळून घेतला . या सगळ्यामध्ये असूनही आम्ही एकदम शांत आणि एकटे होतो ..... फक्त एकमेकांबरोबर. एक तास कसा गेला कळलं नाही . डबा खाऊन थोडावेळ रेंगाळून आम्ही घरी परत आलो . आदित्य आला होता त्याला जेवायला घालून सर्व आवरून झोपायला बारा वाजून गेले . पण कुठेही थकवा जाणवत नव्हता . काय गप्पा झाल्या ते देखील आठवत नव्हतं पण शांत वाटत होतं . अनुभव कुठेतरी आतपर्यंत पोहोचला होता .
आता मनात कसलीही शंका उरली नाही . शक्य तेव्हढा कमी प्रवास , झेपेल तेव्हढंच थ्रिल , पोटात मावेल एव्हढंच अन्न आणि सोसवेल एव्हढेच श्रम किंवा जागरण . एकदा हे ठरवलं की रात्र थोडी सोंगं फार अशी अवस्था होणार नाही . आणि मुख्यतः शिणलेल्या शरीराने किंवा मनाने काय राहिलं यापेक्षा काय मिळालं याचं सुख जास्त आहे .
आतला आवाज पण मला कित्येक दिवस हेच सांगत होता " किप इट सिम्पल सिली ".......

Group content visibility: 
Use group defaults

मी स्वतः मात्र प्रवास करते तेव्हा मला खूप गोष्टी पहायच्या, खायच्या, खरेदी करायच्या असतात. त्याचा थकवा अजिबात येत नाही. उलट मजा वाटते. नविन अनुभव येतात आणि प्रसन्न वाटते. रिसॉर्ट बुक करुन तेथे पडून रहायच्या ऐवजी मला घरात पडून रहायला आवडते.>> +१११
माझं हि असच आहे . लांबच्या प्रवासाच्या बाबतीत. पैसे खर्च करून जाणार तर काहीतरी बघायला पाहिजेच तिथल असं काही तरी वेगळं . नाहीतर पैसे खर्च करण्यात काय मतलब ? आणि आपल्या घराजवळचे फिरण्याचे स्पॉट तर रोजचेच आहेत. तिथे काय कधीही जाऊ शकतो
लडाख , काश्मीर किंवा अगदी कच्छच्या रणात फिरायला जाणाऱ्या ( खरं तर ही हॉलिडे ट्रिप करण्याची किंवा व्हेकेशन मधे फिरायची ठिकाणं नाहीत ) >> हे पण नाही पटल . कच्छ ला गेले नाही त्यामुळे त्याबद्दल माहित नाही
लेख छानच आहे

मस्त लेख, अगदी माझ्याच मनातले विचार!

मीही या सर्व गोष्टींचा बराच विचार केलाय. मला वाटतं जर आपण 'फक्त दिखाव्यासाठी विकेंड टूर करणाऱ्या' जमातीचा विषय जरा बाजूला ठेवला, तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे एखादा माणूस सध्या आयुष्यात मानसिक रित्या कुठल्या स्टेजला आहे यावर अवलंबून आहेत.

नुकतेच शिक्षणासाठी घराबाहेर पडलायत, तेव्हा भटकंतीचं कारण हे कुतूहल आणि नुकतंच मिळालेलं स्वातंत्र्य असतं. नाकात वारं शिरलेल्या वासरासारखं चौफेर भटकावसं वाटतं.

ह्याच भटकंतीच्या काळात जर एखाद्या रिस्की किल्ला, कडा किंवा दरी चढलात की एक नवीन थ्रील मिळतं. आणि ज्यांनी ह्या थ्रील ची चटक घेतलेली आहे ते जाणतात की ह्याच्यासमोर दारू सिगारेट चा नशाही फिका वाटू लागतो.

मग अंगातली रग जिरवण्यासाठी याहीपेक्षा पुढच्या ॲडव्हेंचर्सचा शोध सुरू होतो. रात्री अपरात्री भटकणं, किर्र जंगलात जाऊन क‌‍‍ॅंपींग करणं हे आजमाऊन पाहिलं जातं.

अशात जर जाॅबला असाल तर 'हे मटेरियलिस्टीक जग सोडून थोडे दिवस तरी निसर्गाच्या सान्निध्यात गेल्याशिवाय मला चैन पडत नाही' अशी कारणं वगैरे ऐकवली जातात, ऐकायला मिळतात.

मग यातच बाईकवर कोकण फिरून होतं, लेहलाही जाणं होतं पण भूक काही मिटत नाही. प्रत्त्येक ट्रीप नंतर ही भूक वाढतच जाते. मग ज्यांना करायला मिळतं ते पॅराशूट जंपींग वगैरे पर्यंत जातात.

आता ज्याला हे समजतं की ही भूक न संपणारी आहे तो ह्या सगळ्यातून बाहेर पडतो. मग त्याला डोंगर दऱ्यांचं एवढं कौतुक वाटत नाही. तो जीवात्मा शांत होतो व रोजच्या दैनंदिन आयुष्यातच आनंद शोधु लागतो!

आणि ज्याला नाही समजत तो जीवात्मा आयुष्यभर भटकतच राहतो. त्याच्या खानाबदोशीला कधीच अंत नसतो...

लेख आवडला..
मलाही एखाद्या ठिकाणी गेलो तर तिथलं अगदी सगळच्या सगळ बघितलंच पाहिजे असा चंग बांधणारे आवडत नाहित..
तसही जर आपण आपल्या जवळच किंवा ओळखीच ठिकाणं ऑन्लाईन शोधुन बघितल ट्रॅव्हल साईटस वर तर अगदी
काही पण ठिकाणी टुरिस्ट प्लेस/पॉईन्ट म्हणुन लिहिलेली असतात..
म्हण्जे प्रत्येक ठिकाणी एक ना एक पॉईन्ट कव्हर करायची गरज नाहीये..
आधी आपले आई बाबा जायचे तेव्हा ..ताजमहल बघायला जायचय .. अमुक तमुक मंदिर बघायला जायचयं.. असं निवडक हेच हिट लिस्ट वर असायचे.. आता ताजम्हल बघायलो गेलो तरी तिथले इकडचे तिकडचे ४ महाल त्यात गुंफलेले असतात..
खरे भटके लोक वेगळेच असतात..
टुरिस्ट पॉईंट.. पॅकेजेस अशा गोष्टिंनी फार प्रॅक्टिकल मटेरिअलिस्टिक बनवलय सगळ्याला

Pages