रसायनांचा धुमाकूळ आणि कर्करोगाचा भस्मासुर

Submitted by कुमार१ on 2 December, 2017 - 01:39

ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू असतोच हे तर मूलभूत सत्य. पण हा मृत्यू निरोगी अवस्थेत शांत झोपेत किती जणांच्या वाट्याला येतो? फारच थोड्या. आयुष्यात मानवी शरीर हे कुठल्या ना कुठल्या रोगाची शिकार बनतेच. मग हा रोग शरीर पोखरत रुग्णास मृत्यूस नेतो. आज विविध रोगांमुळे होणाऱ्या मृत्युंमध्ये हृदयविकार हे आघाडीवर आहेत आणि त्याखालोखाल स्थान आहे ते कर्करोगाचे. सध्या जगभरात कर्करोगाने जवळपास ८० लाख लोक दरवर्षी मरण पावतात. हा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. चालू शतक संपेपर्यंत बहुधा कर्करोग हा हृदयविकाराला मागे टाकून ते अव्वल स्थान पटकावेल अशी चिन्हे दिसताहेत.

आपल्याला कर्करोग का होतो? ढोबळ मानाने त्याची तीन कारणे आहेत:
१. विविध किरणोत्सर्ग (रेडीएशन)
२. अनेक प्रकारची रसायने, आणि
३. काही विषाणूंचा संसर्ग

आपल्याला होणाऱ्या एकूण कर्करोगांपैकी सुमारे ८०% हे रसायनांमुळे होतात. हादरलात ना हा आकडा ऐकून? पण ते वास्तव आहे. आज माणसाने विविध कारणांसाठी बनवलेल्या रसायनांची संख्या एक लाखाच्या आसपास आहे! या रसायनांशी आपला अनेक प्रकारे संपर्क येतो. त्याचे अनेक दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात आणि कर्करोग हा त्यापैकीच एक. रसायनांचे विविध स्त्रोत, त्यांच्यामुळे कर्करोग का होतो, कोणती रसायने जास्त घातक आहेत आणि त्यापासून वाचण्यासाठी आपण कोणते प्रतिबंधात्मक उपाय करू शकतो यांचा आढावा या लेखात घेत आहे.

या विषयाची व्याप्ती मोठी असल्याने पुढील मुद्द्यांच्या आधारे विवेचन करतो:
१. रसायनांशी आपल्या संपर्काचे मार्ग
२. रसायने आणि कर्करोगाची कारणमीमांसा
३. कर्करोगकारक रसायनांची उदाहरणे आणि
४. प्रतिबंधात्मक उपाय

रसायनांशी आपल्या संपर्काचे मार्ग
रसायने आपल्या शरीरात हवा, पाणी, अन्न अथवा त्वचेमार्फत शिरू शकतात. त्यांचे स्त्रोत हे खालीलप्रमाणे असू शकतात:
१. अन्नातील नैसर्गिक घटक : उदा. Aflatoxin हे दाणे, मका व सोयाबीन यांच्यात असते.
२. रासायनिक शेतीतील पिके : या विषयावर गेल्या दहा वर्षात अनेक माध्यमांतून भरपूर दळण दळले गेले आहे. अधिक लिहिणे नलगे.
३. अन्न-प्रक्रिया : एखादे उकळलेले खाद्यतेल तळणासाठी वारंवार वापरुन त्यात aromatic hydrocarbons तयार होतात. हा प्रकार कनिष्ठ दर्जाच्या खानावळीत हमखास होतो.
४. व्यसने : उदा. तंबाकूतील अनेक रसायने आणि अल्कोहोल
५. हवा व पाण्याचे प्रदूषण : कारखान्यांतून सोडली जाणारी अनेक रसायने.
६. विशिष्ट उद्योगधंदे : उदा. Asbestos हे वाहन आणि बांधकाम उद्योगात वापरले जाते, तर aromatic amines ही रबर उद्योगात वापरतात.
७. रोगोपचारासाठी वापरलेली औषधे : उदा. cyclophosphamide हे काही कर्करोगांच्या उपचारासाठी वापरलेले औषध अन्य काही कर्करोग निर्माण करू शकते! आहे की नाही हा विरोधाभास?

रसायने आणि कर्करोगाची कारणमीमांसा
कर्करोगकारक रसायने ही आपल्या पेशींमध्ये शिरून थेट DNA वर हल्ला चढवतात. परिणामी काही जनुकीय बदल होतात. मग विशिष्ट प्रथिनांची मोठ्या प्रमाणात निर्मिती होते आणि त्यांच्या प्रभावाखाली पेशींची अनियंत्रित वाढ होते. हाच तो कर्करोग. अर्थात अशा प्रकारे होऊ शकणारा कर्करोग खालील घटकांवर अवलंबून असतो:

१. रसायनाचे शरीरात जाणारे प्रमाण
२. रसायन-संपर्काचा दीर्घ कालावधी
३. कर्करोग होण्यासाठीची जनुकीय अनुकुलता आणि
४. शरीराची कमकुवत प्रतिकारशक्ती

ह्या सर्व घटकांच्या एकत्रित परिणामातून कर्करोग होतो (multifactorial disease). काही वेळेस गप्पांच्या अड्ड्यात आपल्याला “अहो, आमचे ते काका रोज पन्नासेक तरी सिगारेटी फुंकायचे, तरी वयाच्या ८०व्या वर्षापर्यंत कसे ठणठणीत होते” अशा छापाची विधाने कधीमधी ऐकायला मिळतात. याचे स्पष्टीकरण वरील चार कारणांमध्ये दडलेले असते. अर्थात अशी उदाहरणे ही अपवाद म्हणून सोडून द्यायची असतात. एखादे रसायन जर ९५% लोकांना घातक ठरले असेल तर त्याकडे गांभीर्याने बघितले पाहिजे.

कर्करोगकारक रसायनांची उदाहरणे
या संदर्भात अनेक रसायनांकडे ‘संशयित’ म्हणून बघितले गेले आहे. साधारणपणे त्यांचे दोन गटात वर्गीकरण करता येईल:
१. कर्करोगकारक (carcinogenic)
२. कर्करोगपूरक (co-carcinogenic)
त्यापैकी सुमारे १०० रसायने ही आतापर्यंत माणसासाठी ‘कर्करोगकारक’ म्हणून सिद्ध झालेली आहेत. यातील एकेक रसायन हे स्वतंत्र प्रबंधाचा विषय होऊ शकेल. काही रसायनांचा संपर्क हा विशिष्ट व्यावसायिकांपुरता मर्यादित असतो. याउलट धूम्रपान आणि मद्यपान हे समाजातील खूप मोठ्या समूहांशी संबंधित विषय आहेत. त्यामुळे या लेखाच्या मर्यादेत या दोनच स्त्रोतांमधील रसायनांचा विचार आपण करणार आहोत.

तंबाकूचे धूम्रपान
जागतिक स्तरावर फुफ्फुसाचा कर्करोग हा कर्करोगांच्या यादीत प्रथम क्रमांकावर आहे. त्याचे सर्वात महत्वाचे कारण आहे अर्थातच धूम्रपान. या रोगाने जे मृत्यू होतात त्यापैकी ८०% लोक हे दीर्घकाळ धूम्रपान करणारे असतात. धूर ओढणे हे स्वतःसाठी आणि धूर सोडणे हे आजूबाजूला असणाऱ्यांना घातक असते!
या धुरातील रसायनांचा तपशील असा आहे :
• एकूण रसायने ७०००
• त्यापैकी घातक २५० आणि
• कर्करोगकारक ६९
• कर्करोगकारक रसायनांमध्ये Acetaldehyde, Aromatic amines, Benzo[α]pyrene ही काही उदाहरणे.

तंबाकूतील निकोटीन हे एक बहुचर्चित रसायन आहे. ते जबरदस्त व्यसनकारी आहे पण ते माणसात कर्करोगकारक असल्याचे अद्याप निर्विवाद सिद्ध झालेले नाही. तूर्तास त्याला कर्करोगपूरक म्हणता येईल.
तंबाकू खाणे हा प्रकार आपल्याकडे भरपूर आहे. त्यातील nitrosamines हे तोंडाच्या कर्करोगास कारण ठरतात. भारतात हा कर्करोग पुरुषांमधील कर्करोगांच्या यादीत प्रथम क्रमांकावर आहे.

अल्कोहोलचे सेवन अर्थात मद्यपान
हे शीर्षक वाचताक्षणीच अनेकांच्या भुवया उंचावतील कारण हा अतिशय संवेदनशील विषय आहे ! जगभरातील सुशिक्षित समाजावर नजर टाकता एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. अनेकांनी धूम्रपानाला आयुष्यातून हद्दपार केलेले आहे पण त्यांना मद्यपानाची संगत मात्र सोडवत नाही. संशोधकांचाही हा लाडका विषय! त्यामुळे बहुसंशोधित आणि बहुचर्चित. फक्त कर्करोगच नव्हे तर इतर अनेक आजारांशीही त्याचा कार्यकारणभाव जोडलेला आहे. त्यावरील भरपूर उलटसुलट माहिती माध्यमांतून उपलब्ध आहे.
एक दशकापूर्वी अल्कोहोलला ‘कर्करोगपूरक’ इतपत लेबल लावलेले होते. आता मात्र ते ‘कर्करोगकारक’ च्या यादीत जाऊन बसले आहे. काही संशोधक त्याला ‘risk factor’ असे सुरक्षित लेबल लावणे पसंत करतात.

तर आता जाणून घेऊयात याबाबतीतली ताजी घडामोड. ६ नोव्हेंबर २०१७ रोजी American Society of Clinical Oncology (ASCO) ने अल्कोहोल आणि कर्करोग याबाबत नियतकालिकात जाहीर निवेदन दिलेले आहे. ‘First-time Statement’ अशा विशेषणासह त्याला ठळक प्रसिद्धी दिलेली आहे. त्यातील महत्वाचे मुद्दे असे आहेत:
१. अल्कोहोल हे पुढील सात अवयवांच्या कर्करोगास कारणीभूत ठरते (causal relationship) : तोंड, घसा, स्वरयंत्र, अन्ननलिका, यकृत, स्तन आणि मोठे आतडे.
२. तर जठर आणि स्वादुपिंडाच्या बाबतीत मात्र ते ‘कर्करोगपूरक’ आहे.
३. दीर्घकाळ अतिरिक्त मद्यपानाने कर्करोगाचा खूप धोका संभवतो आणि प्रमाणात (moderate) पिणे सुद्धा सुरक्षित नाही.
४. वैधानिक इशारा : “ तुम्हाला जर कर्करोगाचा धोका कमी करायचा असेल, तर खूप कमी ‘प्या’ आणि जर तुम्ही ‘पित’च नसाल तर अल्कोहोलच्या नादीच लागू नका !”

तर हे होते धूम्रपान आणि मद्यपानाशी संबंधित रसायनांचे विवेचन. अन्य रसायनांचा विचार विस्तारभयास्तव करीत नाही.

प्रतिबंधात्मक उपाय
संशोधनातील प्रगतीमुळे कर्करोगाच्या नवनव्या उपचारपद्धती विकसित होत आहेत. त्यामुळे जरी बऱ्याच कर्करोगांवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले असले तरीही रोगप्रतिबंध हा कधीही श्रेष्ठ उपाय ठरतो. याबाबतीत जागतिक आरोग्य संघटनेने काही मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. या लेखाच्या विषयालाही ती लागू आहेत. त्यानुसार काही कर्करोग-प्रतिबंधक उपाय असे आहेत :
१. तंबाकूसेवन वर्ज्य
२. अल्कोहोलसेवन अत्यल्प
३. आहारात ‘अ’, ‘इ’ व ‘क’ जीवनसत्वांचा भरपूर वापर. तेव्हा गाजर, पालेभाज्या आणि लिंबू दणकून खात रहा.
४. शरीराच्या वजनावर नियंत्रण, कारण अतिरिक्त चरबी ही पेशींमध्ये कर्करोगपूरक परिस्थिती निर्माण करते. आणि,
५. विविध वैद्यकिय ‘चाळणी परीक्षा’ (screening tests) नियमित करून घेणे.

समारोप
एकूण मानवी कर्करोगांपैकी सुमारे ८०% हे रसायनांमुळे होतात हे कटू सत्य आहे. आपण निर्माण केलेल्या रसायनांच्या बेलगाम वापरामुळे तीच आता आपल्यावर बूमरॅंग झाली आहेत. त्यांचा वापर आणि संपर्क शक्य तेवढा कमी केला पाहिजे. अन्नातून शरीरात जाणारी रसायने कमी करण्यासाठी सेंद्रिय शेतीचा प्रसार वेगाने झाला पाहिजे. व्यसनांपासून दूर राहणे हे तर सर्वस्वी आपल्याच हातात आहे. औद्योगिक-प्रदूषण नियंत्रण कठोरपणे झाले पाहिजे. रसायनांमुळे होणारा कर्करोग हा गंभीर सामाजिक आरोग्यविषय विषय आहे. तो रोखण्यासाठी विविध स्तरांवर युद्धपातळीवर अंमलबजावणी व्हायला हवी. अन्यथा कर्करोगाचा भस्मासुर हळूहळू मानवजातीला गिळंकृत करण्यासाठी टपून बसलेला आहे.
******************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शीतपेये व कॅन्सर याबद्दल सध्या काय संशोधन झालंय ?
खूप उलट सुलट वाचनात येते>>≥>>

अजून एक घोळदार विषय आहे तो. त्या पेयांमधलं aspartame हे कायमच वादग्रस्त राहिले आहे.
काही प्रयोगांमध्ये ते प्राण्यांच्या बाबतीत कर्करोगकारक असल्याचे वाटले होते.
पण मानवी प्रयोगांमध्ये ठोस पुरावे नाहीत.
नक्की मत देणे अवघड आहे.

माहितीपूर्ण लेख ! घरगुती सामान साठवण्यासठी / पॅकिंग साठी एकुणातच प्लॅस्टिक चा वापर खूप वाढला आहे. त्याचा तसेच पूर्वीच्या तांब्या-पितळ्याच्या / लोखंडाच्या कढया / पातेल्यान्ची जागा स्टेनलेस स्टील नॉनस्टिक च्या वस्तूंनी घेतली आहे. त्याचा यात काही हात आहे का

स्टीलचा वापर चांगला आहे. त्यात क्रोमियम असते ते तब्बेतीला चांगलं. ग्लुकोज - इन्सुलिन संदर्भात ते चांगले काम करते.

छान विषय आणि लेख, विषयाची मान्डणी करायची पद्धत मला आवडली.

< स्टीलचा वापर चांगला आहे. त्यात क्रोमियम असते ते तब्बेतीला चांगलं. ग्लुकोज - इन्सुलिन संदर्भात ते चांगले काम करते. >
------ स्वयम्पाकात वापरलेल्या भान्ड्यान्मधुन खुप क्रोमियम जाणार नाही पण मर्यादेच्या बाहेर गेले तर घातकच असेल.
IARC (WHO शी निगडीत सन्स्था आहे) ने कर्करोगकारक एजन्टची यादी दिली आहे. त्यात Chromium metallic, Chromium (III) compounds यान्ना class 3 मधे तर Chromium (VI) compounds ला class 1 मधे गणले आहे.
http://monographs.iarc.fr/ENG/Classification/latest_classif.php

मला सर्वात मोठा प्रॉब्लेम नॉन्स्टिक / टेफलॉन भान्डी वापरताना त्याच्या सोबतच स्टिल/ मेटल चे चमचे वापरणे. काही काळानन्तर टेफलॉन भान्ड्याला चरे पडायला लागतात आणि त्या चरे पडलेल्या भागातुन ते मटेरियल निघायला सुरवात होते मग अल्प प्रमाणात असेल पण पोटात जातेच...

>>माहितीपूर्ण लेख ! घरगुती सामान साठवण्यासठी / पॅकिंग साठी एकुणातच प्लॅस्टिक चा वापर खूप वाढला आहे. >> नुसती ड्राय ग्रोसरी भरल्याने काही अपाय होत असेल असं वाटत नाही. पण प्लॅस्टीक गरम करणं नक्कीच अपायकारक आहे.

आपण आपल्या लेखात म्हटल्याप्रमाणे
आपल्याला होणाऱ्या एकूण कर्करोगांपैकी सुमारे ८०% हे रसायनांमुळे होतात.
हे प्रमाण, मागच्या दशकातील वाढलेल्या मोबाईल फोनच्या वापरानंतर ही तेवढच आहे का? कारण आपण दिलेल्या कारणांमध्ये किरणोत्सर्ग (रेडीएशन) नं 1 ला आहे.

एक शंका..

<<हे प्रमाण, मागच्या दशकातील वाढलेल्या मोबाईल फोनच्या वापरानंतर ही तेवढच आहे का? कारण आपण दिलेल्या कारणांमध्ये किरणोत्सर्ग (रेडीएशन) नं 1 ला आहे.>>
-------- रेडिएशन दोन प्रकारची (अ) ionizing (ब) non-ionizing असतात.
कुमारान्नी जे रेडिएशन म्हटले आहे त्या मधे #अ प्रकार (यामधे अल्फा, बिटा, गॅमा, एक्स-रे हे आहेत) त्यान्ना अभिप्रेत असावा. तुमच्या शरिराला हे प्रमाणाबाहेर मिळणे घातकच आहेत. हे सर्व रेडिएशन्स निसर्गात आहेतच, आणि आपण दर-रोज त्यान्ना सामोरे जातो, ते डॅमेज (cell division) करतातच पण तो छोट्या प्रमाणात असेल तर निसर्गत: दुरुस्त होण्याची शक्यता पण असते. पण exposure जास्त झाले तर cell division जास्त होणार आणि दुरुस्तीची प्रक्रिया गुन्तागुन्तीची होणार.
आज अनेक वेळा आपण कृत्रिम प्रकारे रेडिएशनला सामोरे जातो. विमान प्रवास, एक्स रे, डेन्टल एक्स रे, कामाचे स्वरुप (पदार्थाची घनता मोजण्यासाठी गॅमाचा वापर होतो, मायनिन्ग मधे)....
एका ठराविक डोस नन्तर डॅमेज रिकव्हर होणार नाही... असे झाल्यास कॅन्सर होण्याची शक्यता वाढते.

किती काळात हा असा रेडिएशन डोस मिळाला आहे हे पण महत्वाचे आहे. थोड्या छोट्या काळात मोठा य' डोस का टप्या टप्याने, दिर्घ काळात 'य' डोस मधे फरक आहे.

#ब प्रकारात non-inoizing रेडिएशन येतात. यात अल्ट्रा वॉयोलेट (UV), visible, इन्फ्रा रेड, रेडिओ हे येतात. याने कॅन्सर होतो याला काही आधार नाही. जर तुम्ही स्वत: कम्फर्ट नसाल तर मोबाईलचा वापर कमी करा.

सर्व नवीन प्रतिसादकांचे आभार आणि चर्चेत स्वागत.
उदय यांचे प्रतिसाद अभ्यासपूर्ण आहेत.
मनीष, मोबाईल व कर्करोग हा माझा लेख तुम्ही इथे वाचू शकता :
https://www.maayboli.com/node/60382

कदाचित आहार सुबत्तेचा धुमाकूळ आणि कर्करोगाचा भस्मासूर असे ही म्हणता येईल.>>>>>> एकदम रोचक, मानव ! हा एका वेगळ्या लेखाचा विषय होईल. बघा लिहिताय का तुम्ही ☺
वरील चर्चेत उदय यांच्या आगमनाने आनंद झाला आहे. हा विषय दोन अभ्यासशाखांच्या सीमेवरचा असल्याने इथे एका वैज्ञानिकाची गरज होती.

वर बऱ्याच जणांनी प्लॅस्टिकच्या वेष्टनात ठेवलेले अन्न वा पाणी घातक आहे का असे विचारले आहे. तूर्त त्याबद्दल थोडे लिहितो.
प्लॅस्टिकमधून Bisphenol A हा पदार्थ पोटात जातो. तसा तो फार काळ रक्तात टिकत नाही . पण जर प्रत्येक खाण्यापिण्याबरोबर तो पोटात गेला तर तो टिकू शकेल.
त्याच्या दुष्परिणामांवर बरेच संशोधन चालू आहे
कर्करोगापेक्षाही आपल्या हॉर्मोन यंत्रणा त्याने बिघडतात असा काहीसा निष्कर्ष आहे.
ठाम मत देणे अवघड आहे पण प्लस्टिक आणि अन्न संपर्क जेवढा कमी तेवढे चांगले.

आपणा सर्वांना लेख महत्त्वाचा वाटला याचे समाधान आहे.
सर्वांच्या सहभागामुळे चर्चा उपयुक्त झाली याचा आनंद वाटतो.
मनापासून आभार !

कर्करोगाचे प्रमाण जगभर झपाट्याने वाढत आहे. यासंबंधी ‘यु.के.’ मधील एक मजेदार अहवाल वाचनात आला.

२०१५ मध्ये त्या देशात ७०,०००हून अधिक नवीन निदान झालेले कर्करोगी आढळले होते. हा आकडा नक्कीच धक्कादायक आहे. त्या संशोधकांनी सहज या आकड्याची तुलना तेथील समाजातील काही वेगळ्या घटनांशी केली.तेव्हा हा आकडा त्या वर्षातील खालील तीन घटनांपेक्षा अधिक होता:

१. नवीन लग्नांची संख्या
२. पहिल्या अपत्यास जन्म देणाऱ्या स्त्रियांची संख्या आणि
३. देशातील सर्व विद्यापीठांतून पहिली ( bachelor) पदवी मिळवणारे एकूण स्नातक !

असे काही वाचायला मनोरंजक वाटले तरी त्यातून कर्करोगाच्या भीषण व्याप्तीची जाणीव होते.

अन्नातून शरीरात जाणारी रसायने कमी करण्यासाठी सेंद्रिय शेतीचा प्रसार वेगाने झाला पाहिजे. >>>>>

सेंद्रिय शेती म्हणजे कोणती शेती?

मी सध्या सुभाष पाळेकरांची व्याख्याने ऐकतेय/वाचतेय. त्यांनी सेंद्रिय शेतीही शेवटी रासायनिक शेतीच्या वाटेने जाणार हे भाकीत केलेय. नैसर्गिक शेती सर्वोत्तम, ही शेती करताना तुम्ही मुळात जमीन सशक्त कशी होईल, तिच्यात जे n p k ठासून भरलेय ते पिकांना उपलब्ध कसे होईल व पिकांवर येणाऱ्या किडींचे नैसर्गिकरित्या कसे निवारण होईल याबद्दल त्यांचे विचार मला पटलेत. कार्बन फुटप्रिंटस कमी करण्यासाठीही नैसर्गिक शेती सहाय्यक आहे, सेंद्रिय शेतीने कार्बन फूटप्रिंट्स वाढणार हे त्यांचे मत आहे.

मानवी पिढ्या निकृष्ट निपजण्यामागे रासायनिक शेतीचा फार मोठा हात आहे हे सत्य आहे. ही शेती पूर्णपणे बंद करण्यातच सगळ्यांचे भले आहे.

बुननु, सहमत आहे.
मोबाईल च्या बाबतीत 'कळतेय पण वळत नाही' अशी आपली अवस्था आहे

नुकत्याच भारत, चीन व अमेरिका येथील बाटलीबंद पाण्याच्या नमुना चाचणीचे निष्कर्ष हाती आले आहेत. त्यांत बिसलेरी सारख्या उत्पादनांचाही समावेश आहे :
https://www.google.com/amp/www.livemint.

सध्या महाराष्ट्रातही याची जोरदार चर्चा आहे.
बघूया याला काही पर्याय सापडतोय का.

कर्करोग आहारातील काही पदार्थांमुळे होऊ शकतो. उदा. smoked फिश मुळे जठराचा, गोमांसामुळे
आतड्याचा, तसेच भेसळयुक्त पदार्थांमुळे पण.

तणनाशक फवाऱ्यातील Glyphosate व कर्करोग :

पाश्चिमात्य देशांत बरेच लोक आपल्या शेतात वा बागेतील वनस्पतींवर ‘Roundup’ हे तणनाशक फवारतात. त्यातील Glyphosate या रसायनाने कर्करोग होऊ शकतो. काहीसे वादग्रस्त असे ते रसायन आहे. हा फवारा दीर्घकाळ वापरलेल्या दोघांना कर्करोग झाला. गेल्या वर्षभरात या दोघांनी तो फवारा बनवणाऱ्या कंपनी विरुद्ध दावे लावले होते. त्यांत न्यायालयाने फिर्यादीची बाजू मान्य केली असून कंपनीला जबरी दंड ठोठावला आहे.

आता कंपनीने Glyphosateविरहित फवारा निर्मिला आहे.

बाजारातून आणलेल्या भाज्या आणि फळे बेकिंग सोडा घातलेल्या पाण्यात अर्धा तास भिजवून ठेवाव्यात म्हणजे त्यातली घातक रसायने निघून जातात असा मेसेज कायप्पावर येत असतो. त्यात काही तथ्य आहे का?

सर्वात महत्वाचे अनुत्तरित प्रश्न
रोज ऐकाच प्रकारची आणि प्रमाण सुधा ऐकाच असे दारू पिणारे तीन लोक .
तेच तीन लोक तंबाखू सुधा समानच खातात आहार विहार सर्व same pan cancer ऐकलाच होतो आणि बाकी दोघे निरोगी आयुष्य जगतात ह्याच काय कारण आहे .
आणि आशि खूप उदाहरणे आपल्या अवतीभोवती बघायला मिळतात

@ माधव,
***** घातक रसायने निघून जातात असा मेसेज कायप्पावर येत असतो. त्यात काही तथ्य आहे का?>>>

आतपर्यंत मुरलेली रसायने पूर्णपणे निघून जातील असे वाटत नाही. द्राक्षांच्या बाबतीत ६ तास मिठाचे पाण्यात मी बुडवतो. नक्की किती परिणाम होतो याची कल्पना नाही.

राजेश, सविस्तर उत्तर नंतर देतो.

Pages