चकवा.........आयुष्याच्या वाटेवर!(भाग ४)

Submitted by पद्म on 10 August, 2017 - 14:29

भाग १
भाग २
भाग ३

एके दिवशी रोजप्रमाणे कॉलेजमध्ये सृष्टीशी चॅटिंग बसलो होतो, तितक्यात माझा एक कलीग कॅबिनसमोरून जाताना माझ्याकडे बघून बोलला, "काय अनिकेत सर, गर्लफ्रेंड काय?"

लोकं कशाचा अर्थ काय काढतील सांगता येत नाही. मी तूर्तास त्यांना सांगितलं, "नाही हो, मित्र आहे एक जुना.."

त्या दिवशी कॉलेजमधून घरी जाताना अचानक मला त्या सरांचा प्रश्न आठवला, आणि काही वेळ मी आत्मपरीक्षण करण्याचा प्रयत्न केला. आपण रोज दुसऱ्याचं परीक्षण भरपूर करतो, पण आत्मपरीक्षण आपल्याला व्यवस्थित आरसा दाखवतं. आणि खरंच त्या सरांमुळे त्या दिवशी मला कळालं कि, सृष्टीसोबत बनत असलेलं माझं नातं आता मैत्रीपर्यंत मर्यादित राहिलं नाहीये पण त्याने आता भरपूर सीमा ओलांडल्या आहेत. काही लोकांना या गोष्टी रोमँटिक वगैरे वाटत असतील पण माझ्यासाठी असं नव्हतं. मला सृष्टी फक्त एक मैत्रीण म्हणून हवी होती पण ती माझ्या सर्वस्वाचा ताबा घेत होती. हे तिला माहिती होतं किंवा नाही माहिती नाही, पण या सत्याला सामोरं जाणं मला तरी कठीण होतं.

त्या दिवसापासून मी आता हाच विचार करत होतो कि, काहीतरी करून मला सृष्टीशी असलेला संपर्क कमी करायला हवा. आणि मला खात्री होती कि, मी सृष्टीला जर सरळ सांगितलं, तर ती मला नक्कीच समजून घेईल. आणि यातून निघण्याचा मार्गही सुचवेल.

एके दिवशी हे सर्व नक्की करून पहिल्यांदा मी सृष्टीला फोन केला. ती कितीही समजूतदार असली, तरी मनात कुठेतरी भीती होतीच कि, तिला हे सांगणं चांगलं वाटणार नाही. पण काही गोष्टी वेळेवर केलेल्या बऱ्या असतात नाहीतर वेळ निघून गेल्यावर फक्त पश्चाताप वाट्याला येतो.

तिने पटकन फोन उचलला आणि खूप उत्साहात म्हणाली, "हॅलो पिल्लू, कसा आहेस?"

"मी तर ठीक आहे, तू कशीयेस?"

"एकदम मस्त....."

"............" कशी सुरुवात कळत नव्हतं.

"अरे काय झालं? पुढे बोल काहीतरी. काही काम होतं का?"

"अगं तुला एक गोष्ट सांगायचीये, तुला राग येणार नसेल तर."

"अरे तुला बोलली ना, मला माझ्या पिल्लुवर कधीच राग नाही येणार म्हणून........बिनधास्त सांग."

"मला सांगायचंय कि, आपण एकमेकांचे चांगले मित्र आहोत, पण आपली चॅटिंग ही फक्त २ मित्रांप्रमाणे होत नाहीये..."

"म्हणजे? मला कळत नाहीये तुला काय म्हणायचंय........"

"अगं तुला असं नाही वाटत की आपण मित्रांप्रमाणे नाही तर एखाद्या कपल प्रमाणे गप्पा मारतोय?"

"अनिकेत! तू काय बोलतोय तुला तरी कळतंय का?"

"अगं राग येऊ देऊ नकोस, पण मला जे वाटलं, ते तुला सांगितलं."

"तुला कोणी काही बोललं का? तू आपल्याबद्दल कोणाला काही सांगितलं का?"

"अगं असं काही नाहीये, मी कोणाला काही सांगितलं नाहीये पण मला आता असं वाटतंय.."

खूप वेळ ती काहीच बोलली नाही, खूप वेळाने तिचा आवाज आला, "बरं मग काय करायचं असं तुला वाटतं?"

मी उपाय शोधून ठेवला होता, "माझ्या मते आपण इतकं जास्त चॅटिंग करायला नको. फक्त थोडा वेळ, किंवा आठवड्यातून कधीतरी चॅटिंग करत जाऊ."

"अनिकेत, एक काम कर ना याच्यापेक्षा तू माझ्याशी बोलणंच बंद कर. विषयच संपला.", हे बोलताना तिचा कंठ खरंच गहिवरून आला होता, हे तिचा केवळ आवाज ऐकून कळत होतं.

"अगं तू एकदम टोकाची भूमिका का घेतेयस? आपण कमी बोलूनसुद्धा मैत्री टिकवू शकतो ना?", मी समजावण्याच्या सुरात म्हणालो.

"अनिकेत, मला तुझी मैत्री हवीये, मैत्रीच्या नावाखाली केलेली तडजोड नाही. तुला जर चुकीचं वाटत असेल, तर आजपासून मी तुला फोन आणि मेसेज काहीच करणार नाही. आणि तुही मला करू नकोस, बाय......", हे वाक्य बोलताना ती रडत होती, जे माझ्यासाठी असह्य असतं.

त्यानंतर मी तिला परत फोन केला, पण तिने उत्तर दिलं नाही. माझ्या मेसेजलासुद्धा तिने काहीच प्रतिसाद दिला नाही. मला त्या वेळी खरंच खूप वाईट वाटत होतं, पण माझ्याकडे दुसरा काही मार्ग नव्हता. माझी चांगली मैत्रीण गमावण्याचं दुःख तर मला होतंच पण त्याहीपेक्षा जास्त मला मी सृष्टीला दुखावण्याचं दुःख होतं. तिच्या जीवनात आधीच भरपूर वादळ येऊन गेले होते आणि आज माझ्यामुळे पुन्हा तिला दुःखाला सामोरं जावं लागलं होतं.

त्या दिवशी माझ्या मनात पश्चाताप आणि संताप या दोनही भावना खूप प्रबळ झाल्या होत्या. स्वतःवरच संताप येत होता कि, इतकीच भीती होती तर पुन्हा शिरपूरला जाऊन तिच्याशी मैत्री करायचा प्लॅन करायची काय गरज होती? मी खरंच ही माझ्या जीवनातली खूप मोठी चुकी केली होती. असं वाटत होतं कि, मोबाईल समुद्रात फेकून द्यावा, त्या दिवशी माझा संताप अनावर होत होता आणि पश्चातापापोटी कितीतरी वेळ झोप लागत नव्हती. काहीतरी करून मला माझ्या मनाला या सर्वातून बाहेर काढायचं होतं.

जवळ जवळ एक महिना मीही सृष्टीला फोन केला नाही, आणि तिनेही मला फोन केला नव्हता. पण माझ्या मनाला शांतता लागत नव्हती, तिचं मन दुखवून माझं मन काही केल्या शांत होणार नव्हतं, शेवटी मी माझ्या कमजोर मनामुळे हरलो, आणि एके दिवशी तिला मेसेज केला....

"हाय सृष्टी......."

तिचा लगेच रिप्लाय आला, जशी १ महिन्यापासून ती माझ्याच मेसेजची वाट पाहत होती, "बोल अनिकेत"

मी पिल्लुपासून परत अनिकेतपर्यंत पोहोचलो होतो. मी परत मेसेज केला, "अजूनही रागावलीयेस तुझ्या पिल्लुवर?"

"अनिकेत, मी तुझ्यावर रागावलीये. माझ्या पिल्लुवर मी कधीच नाही रागावू शकत. आणि तू माझा पिल्लू नाहीयेस.." मुली केव्हा कसे रिप्लाय करतील, काहीच नेम नसतो.

"कॉल करू का तुला?"

"नको, काही गरज नाहीये." मी तिला फोन करावा हि तिची इच्छा होती, हे न समजण्याइतका मी मूर्ख नव्हतो.

मी लगेच तिला फोन केला, आणि यासाठी ती १ महिन्यापासून उत्सुक होती. मीच सुरुवात केली, "हॅलो सृष्टी, कशी आहेस?"

"बरीये"

"चांगली नाहीयेस का?" मी काहीतरी विनोद करून तिचा राग घालवण्याचा प्रयत्न करत होतो.

"अनिकेत परत कशाला कॉल केलास? तुला माझ्याशी बोलायचं नव्हतं ना?" ती परत त्याच विषयावर आली.

"अगं मी बोलायचं नाही असं कधी बोललो? तूच बोलली कि, आपण एकमेकांशी बोलायचं नाही म्हणून." मी माझे तार्किक उत्तरं देत होतो.

"मग तुला माझा त्रास होतो, तर न बोललेलंच बरं ना?"

आता ती मला इमोशनली ब्लॅकमेल करत होती, "अगं तू वेडी आहेस का? मला तुझा त्रास नाहीये. तू समजून का घेत नाहीयेस?"

हे ऐकून ती सिरीयस झाली आणि म्हणाली, "अनिकेत, कित्ती आणि कोणाकोणाला समजून घेऊ मी? आणि मीच का समजून घ्यायचं नेहमी? मला नाही का कोणी समजून घेऊ शकत? कमीत कमी तू तरी........." पुन्हा तिचा कंठ गहिवरून आला होता. आणि तिचा हा आवाज तालवारीसारखा आघात करत होता.

तिचे ते शब्द ऐकून काय बोलावं सुचत नव्हतं, मी कसाबसा बोललो, "तू सांग तुला काय हवंय ते....."

"आधी तुझ्या डोक्यातला तो कपल वाला कचरा काढून टाक, आणि........"

"आणि काय?"

"आणि मला माझा पिल्लू परत हवाय..", या मुली ना खरंच अशक्य असतात.

मी पुन्हा खुश झालो, कारण माझं मन पश्चातापातून मुक्त झालं होतं. मी म्हणालो, "ठीक आहे, जे झालं ते झालं आजपासून मी तुझ्यापासून दूर जाणार नाही. चल ठेवतो फोन, बाय..."

मी तिला पुन्हा एकदा दूर न जाण्याचं वाचन दिलं. पण या वेळी मी फक्त माझ्या मनाला पश्चातापातून मुक्त करण्यासाठी हे केलं होतं. मला दुसऱ्याचं मन दुखवण्याचं ओझं ठेवताच येत नाही, त्यात सृष्टी माझी पहिली आणि एकमेव मैत्रीण होती, आणि तिच्याशी असा वागून मनःशांती शक्यच नव्हती."

त्या दिवसानंतर आम्ही पुन्हा पूर्वीसारखा बोलू लागलो, पण यावेळी मी चॅटिंगवर जास्त वेळ देत नव्हतो. आणि हे तिलाही कळत होतं, पण मी काहीतरी काम असल्याचे करणं देऊन कमीत कमी चॅटिंग करण्याचा प्रयत्न करत होतो; कारण यावेळी मला माझ्या भावनांच्या आहारी जायचं नव्हतं.

पण ते म्हणतात ना, लोणी फ्रिज मध्ये १०० वर्ष जरी ठेवलं तरी आगीजवळ गेल्यावर काही सेकंदातच वितळतं.आणि माझं ह्यावेळी तेच झालं मी कितीही प्रयत्न करत असलो, तरी सृष्टीचा स्वभाव मला पुन्हा तिच्याकडे खेचत होता. आणि यावेळी हे सर्व माझ्या नकळत होत नव्हतं, मला सर्व कळत असतानाही मी काही करू शकत नव्हतो. आणि याबाबतीत कोणी माझी मदत करेल, असंही मला वाटत नव्हतं. कारण सृष्टीला सांगितलं असतं तर ती ही गोष्ट समजून घेणारी नव्हती, उलट तिच्या रडण्यामुळे माझंच मन जास्त दुखावलं गेलं असतं. खरंच पाषाणहृदयी मुलंच इतके ब्रेक अप्स सहन करत असतील असं मला वाटलं.

एके दिवशी असाच नेटवर काहीतरी फिलॉसॉफिकल कोट्स वाचत बसलो होतो, आणि वाचता वाचता एका वाक्याने माझं लक्ष वेधून घेतलं; कारण ते वाक्य माझ्यासाठी योग्य उपाय होतं असं मला वाटलं. लिहिलं होतं, "sometimes in life, some knots become so complicated that we become unable to open those. At that time we are left with only one solution CUT THE KNOT"

त्या वाक्याचा मी पुन्हा विचार केला, खरंच जर मी तिला पुन्हा समजावण्याचा प्रयत्न केला, तर ती पुन्हा रडेल आणि काहीही झालं तर पुन्हा मलाच मनःस्ताप होईल, आणि मी पुन्हा तिच्याशी बोलणं चालू करेल, जे मला नको होतं. मला तिला दुखावण्याची इच्छा मुळीच नव्हती पण आमचं असं हे नातं भविष्यात आम्हालाच घेऊन बुडालं असतं; म्हणून मला आता योग्य वेळी योग्य निर्णय घेणं गरजेचं होतं.

मी आज मनात पक्का निर्णय केला कि, हे प्रकरण आयुष्यातून पूर्णपणे काढून टाकायचं. काही दिवस त्रास होईल पण हे दोघांसाठी योग्य आहे. आज घरी येताना मी खूप विचार करून माझ्या सिम मधले, मुग्धा आणि सृष्टी सोडून सर्व नंबर्स फोनमध्ये सेव्ह केले आणि सिम काढून समुद्रात फेकून दिलं. हे एक छोटंसं पाऊल आता मला वाचवेल, सृष्टीची आठवण येतेय पण काहीतरी करून लवकरच तिला विसरायला हवं. आणि तीसुद्धा मला लवकरच विसरेल.

आज माझ्या आयुष्यातलं एक मोठं प्रकरण मी संपवलं होतं, असं मला तरी वाटत होतं.......

पुढील भाग

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पद्म सर आज मी पहीला. छान गती पकडली आहे. अजिबात ट्रॅक सुटत नाहीये. उत्सुकता वाढली आहे पु भा प्र.

माबोकर Lol
मौसम येत असतात जात असतात

विचारांची कश्मकश !
मनाची घालमेल !!
सगळं काही फारच सुरेख मांडलय
पुभाप्र Happy
(hopefully this wouldn't b end of cute love story)

मलाही ही कथा रेंगाळताना वाटतेय. पण अनिकेतच्या मनातली एकही गोष्ट मला सुटू द्यायची नाहीये.
मला जास्त रोचक पद्धतीने लिहिता येत नाही, त्याबद्दल क्षमस्व.

कॉलिंग समवन पिल्लु इज वेरी इरीटेटींग. वै म Happy

म्हणजे आई तिच्या बाळाला म्हणते ते ठीके. पण मित्राला सतत पिल्लु पिल्लु बोलणं. टु मच.
'मी माझ्या पिल्लुवर रागावु शकत नाही' Uhoh कय्च्याकै. वै म Happy

सहसा प्रेमात वैगेरे काही मुली पिल्लु शोना बबुचका वैगेरे बोलतात. मैत्रीत मी नाही कधी ऐकलं.

मलाही ही कथा रेंगाळताना वाटतेय. पण अनिकेतच्या मनातली एकही गोष्ट मला सुटू द्यायची नाहीये.
मला जास्त रोचक पद्धतीने लिहिता येत नाही, त्याबद्दल क्षमस्व. >>> अजिबात नाही,
खूप छान चाललिये स्टोरी... लिहा तुम्ही...

सहसा प्रेमात वैगेरे काही मुली पिल्लु शोना बबुचका वैगेरे बोलतात. मैत्रीत मी नाही कधी ऐकलं.>>>> तेच अनिकेतला खटकलं. मित्र असून ते कपलप्रमाणे बोलत होते.
वै म म्हणजे काय?