संत तुकाराम महाराजांना जगद्गुरु का म्हणतात?

Submitted by अतुल. on 19 June, 2017 - 06:14

आज सोसायटीत दिंडी आली आहे. एका लहान मुलाने प्रश्न विचारला तुकाराम महाराजांना जगद्गुरु का म्हणतात? मी थोडे गुगल करून पाहिले तर जगद्गुरु हि पदवी हिंदू धर्मातील इतरही अनेक विभूतीना मिळालेली आहे (जसे कि जगद्गुरु शंकराचार्य). आणि या विकिपीडिया लिंक वर लिहिले आहे कि:

यह एक पदवी है जो वेदान्त सम्प्रदाय के आचार्यों को दी जाती थी

म्हणजे संत तुकाराम "वेदांत संप्रदायातील आचार्य" आहेत का? (सॉरी मला यातले काहीच ज्ञान नाही)

कुणाला माहित असेल तर सांगावे.

Group content visibility: 
Use group defaults

केव्हांपासून म्हणू लागले ते ही बघावे लागेल. Happy
आमच्या लहानपणी, "संत ज्ञानेश्वर", "संत तुकाराम" इतकाच "संत" या पदवीने उल्लेख असायचा. Happy

असुद्या की! कोणी एक नाणिज स्थित भामटा स्वतःला जगद्गुरु म्हणवुन घेतो त्यापेक्षा तुकोबा कैकपटींनी त्या पदवीला पात्र आहेत.

भागवत धर्म,भक्तीमार्ग हा एक देव मानणाय्रांतला पंथ आहे. १) देव आहे २) देवाशी संपर्क दर्शन ,भक्ती आणि नामस्मरणाने होतो असा यांचा विश्वास आहे. तरीही प्रत्येकजण हे करण्यासाठी जन्मापासून कळायला लागल्यावर थेट देवाशी संपर्क करू शकत नाही तर त्याला "गुरू" भेटावा लागतो ही एक "ग्यानबाची मेख" कल्पिली आहे. तर असे जे काही या भक्तीमार्गातले गुरू आहेत त्यात तुकाराम श्रेष्ठी आहेत. मोठे गुरू आहेत, भक्तीपंथातील जगाचे गुरू. जगद्गुरू.
बघा पटतय का

थेट देवाशी संपर्क करू शकत नाही तर त्याला "गुरू" भेटावा लागतो ही एक "ग्यानबाची मेख" कल्पिली आहे.

>> खरेतर अशी काही मेख वगैरे नाही, पण गुरु कशासाठी लागतो हेच माहित नसल्याने सोकॉल्ड गुरुंनी 'गुरु भेटावा लागतो' याचा प्रचंड गैरफायदा उचलला आहे.

१. शिष्याची ज्ञानप्राप्तीची वेळ आली की (ही वेळ शिष्याच्या स्वतःच्या साधनेत कीती बळ आहे यावर अवलंबून असते) की 'गुरुला शिष्याची ओढ लागते'. शिष्याला गुरुची नव्हे. प्रत्येक शिष्याचा गुरु हा ठरलेला असतो, प्रत्येक शिष्यही कुणाचा ना कुणाचा गुरु होणार असतो, झालेला असतो, ही एक मल्टीलेवल वर चालणारी चेन आहे. भोंदू साधू, बनावट योग्यांचा याच्याशी काहीही संबंध नसतो, किंबहुना त्यांना याबद्दल शष्प (थेरॉटिकल सगळ्यांनाच माहित असते, प्रॅक्टीकली) माहित नसते.

२. जीवनात आपल्याला प्रत्येक गोष्ट शिकायला गुरु लागतो. विचार करा, अशी कोणतीही गोष्ट जी समोर दिसत असून, कशी करतात हे माहित असून तुम्हाला येत नव्हती, ती गुरुंनी सांगताच, समजवताच, शिकवताच तुम्हाला आत्मसात होते. आत्मसात हा शब्द महत्त्वाचा. सायकल चालवायला शिकणे हा एक अगदी छोटासा प्रसंग, यात 'सायकल बॅलन्स करता येणे' ही एक ज्ञानप्राप्तीची, योग साधण्याची घटना आहे. यात सायकल धरुन आधार देणारा गुरु, त्याला बॅलन्स करता येते, तो तुम्हाला बॅलन्स करता येणे शिकायला मदत करतो, तो कॅरीयर धरुन, सिट धरुन तुम्ही बॅलन्स होइपर्यंत मदत करत असतो. त्यात त्याचा स्वतःचा कुठलाही स्वार्थ पूर्ण होत नाही, नसतोच. पण ज्ञान करुन देणे हेच एवढेच कर्म तो तिथे पार पाडतो. अगदी असेच आध्यात्मिक गुरुंचे असते. तुमच्या ठायी असलेला बॅलन्स, ज्ञान याची जाणीव ते करुन देतात, न ते त्यांच्याजवळचं काही देतात, ना तुम्ही त्यांच्याकडून काही घेता. (पैसे घेऊन ज्ञान देणारे ते शिक्षक, गुरु नव्हे)

३. नामस्मरण, भक्ती, जपजाप्य हे साधनेचे मार्ग आहेत, साध्य नव्हे. असे अनेक मार्ग असतात, हजारो आहेत. त्यातला ज्याला जो सूट होतो त्याला तो मिळतो. ह्यात अजून डिटेलमध्ये जाता येईल पण आता जाणार नाही. गुरुंनी आम्हाला मंत्र दिला, जप सांगितला वगैरे भंपक गोष्टी आहेत. तो मंत्र, जाप देणारा गुरु आणि शिष्य दोघांनाही माहित नसते की हे फक्त आडंबर आहे. ते फक्त भंपक परंपरेचे पालन करत असतात. उदाहरणार्थ, तुम्हाला एखादा आजार झालाय, तुम्ही डॉक्टरकडे गेलात, तुम्हाला डॉक्टरने तपासून औषध दिले, ते तुम्ही केमिस्ट कडून आणून प्राशन केले, तुम्ही बरे झालात, ही एक व्यवस्थित वर्केबल रिजल्ट देणारी सिस्टीम आहे. आध्यात्मातही हीच सिस्टीम आहे. पण इथे भोंदु, भंपक किंवा अज्ञानी जन काय करतात, कंपाउंडर बघतो, डॉक्टर कायतरी खरडून देतो, रोगीपण बघतो कायतरी खर्डून दिले, ह्याने खरडून दिल्यानेच अमूक अमूक बरा झाला हे पसरलेले असते. पण त्या अमुक अमूक ने काय केले हे पसरत नाही, कारण व्यक्तिपूजा. आता हे खरडलेले घेऊन लोक त्याची पुजा-पारायणे करतात, कारण ते पवित्र आणि बरे करणारे लेखन आहे, त्यात जादू आहे, ताकत आहे, ते सर्वशक्तिशाली आहे, म्हणून तर ते अमुक तमूक बरे झाले होते. पुढे ते डॉक्टर मरतात, त्यांचा कपांउंडर तेच खरडने विधी करायला लागतो, जे आधी डॉक्टरने लिहून ठेवले तेच परत परत, लोक काही औषधे घेत नाहीत, लोक काही बरे होत नाहीत, पण आपण बरे होऊ यावर आशा ठेवून पारायणे करतात, डॉक्टरची मूर्ती उभारून मंदिरे बांधतात, भजन किर्तन करुन डॉक्टर प्रसन्न होतील आणि थेट दिव्य प्रभावाने मला बरे करतील अशी आशा ठेवतात. खरे तर त्यांनी दिलेल्या प्रिस्क्रिप्शनमध्ये ते थेट लिहिलेले आहे, आचरणात आणतील तत्क्षणी प्रभाव जाणवायला सुरुवात होते. तर नामस्मरण, जपजाप्य हे अगदी बेसिक लेवलची साधना करण्याचे टूल्स आहेत. ज्यांची नुकतीच सुरुवात होत आहे, करायची आहे त्यांच्यासाठी हे परफेक्ट असते. ज्ञानोबा आणि तुकोबांनी नामस्मरणाची पद्धत लाखो लोकांपर्यंत पोचवण्याचं कार्य त्यासाठीच केलं. पण त्याच्यापुढे जाऊन अजून लेवल्स गाठायच्या असतात हे समजण्यापेक्षा नामस्मरणाचे आडंबर सुरु झाले ते आजतागायत सुरु आहे. पण हे नैसर्गिकच आहे. ज्याची त्याची मार्गक्रमणा त्यालात्यालाच स्वतःहून करायला लागते.

४. गुरुशिवाय ज्ञान नाही, गुरुबिन मोहे कौन छुडावे ही आळवणी गुरुंबद्दल आदर आणि गुरुंची गरज व्यक्त करणारी आहे. हजारो मार्गांतून माझ्यासाठी योग्य मार्ग सांगणारा गुरु मिळणे गरजेच आहे. अन्यथा असे कोट्यानुकोटी जन्म जातील, मी फक्त ट्रायल करत राहिन. मुंबैतून दिल्लीला जायचे अनेक मार्ग आहेत, मला सूटेबल होईल असा मार्ग व मला दिल्लीलाच जायचे आहे, कलकत्त्याला नाही हे जाणकारच सांगू शकेल. पण ह्या सर्व प्रकाराचा व्यत्यास असा झाला की गुरुंवर विसंबून राहावे लागते, गुरूंमध्ये दिव्य शक्ती असते, त्यांच्या स्पर्शाने, सहवासाने सर्व दु:खे दूर होतात, भौतिक सुखे लाभतात असे गरिबांमध्ये पसरले आहे. भौतिक सुखांच्याही पलिकडे जे सुख आहे ते मिळवायला गुरु लागतो. भौतिक सुखांसाठी नाही, संसाराच्या कटकटींपासून मुक्तीसाठी नाही. ज्या गुरुंनी खरोखर ज्ञान दिले ते न बघता सोप्या आडंबरी साधना आणि कर्मकांडांतून भक्तीचे देखावे उभे करण्यात भोंदूंना यश आले, ते आले कारण विश्वास. साधनेचा परिणाम स्वतःपुरता असतो, तो काढून दाखवता येत नाही, त्याचे प्रदर्शन मांडता येत नाही. पण प्रदर्शन मांडणे सामान्यांची गरज असते, तीची पूर्तता भोंदू करतात. जो प्रदर्शन मांडतो तो खरा योगी, खरा गुरु नव्हेच. हीच त्याची सगळ्यात मोठी ओळख आहे.

५. सामान्य जनांना आध्यात्मिक शक्तींबद्दल अनेक दिव्य गोष्टी रचून सांगितल्या गेल्यात, त्यात काही तथ्य आहे, पण त्या दिव्य शक्ती मिळवणे हा एक वेगळा प्रवास आहे, तो सहज नाही. त्याचेही प्रदर्शन मांडता येत नाही. कारण अशा दिव्य शक्ती मिळवल्यावर आसक्तीच नष्ट होते, मग प्रदर्शन कसे करणार व का करणार? प्रदर्शनकारी बाबाबुवांचे आयुष्य जास्त नसते, त्यांचे कार्यही जास्त काळ टिकत नाही, तुकाराम, ज्ञानोबा, बुद्ध, इत्यादींचे कार्य अढळ राहते कारण ते सच्चे असते त्यात आडंबर नसते.

६. Srd यांनी जे म्हटले की देवाशी थेट संपर्क होऊ शकत नाही. देव म्हणजे कोण? देव या संकल्पनेचे खूप अर्थ आहेत. सामायिक अर्थ म्हणजे भौतिक दु:खे दूर करुन भौतिक सुख देणारा असे घेऊ. तर मुळात कोणत्याही संतांनी असे काही दावे केलेले नाहीत. त्यांची सुख, किंवा देवाची प्राप्ती ही संकल्पना भौतिक नाही, आध्यात्मिक आहे. प्रचंड भौतिक सुखात लोळणारेही परमदु:खी असू शकतात. कारण सुख किंवा दु:ख हे भौतिक साधनांमध्ये नाहीच. ते मनात आहे. ते दूर होणे, मनावरचे आवरण दूर होणे, सत्य दृष्टीस पडणे म्हणजे देव भेटणे होय. ही सृष्टी, चराचर, सर्व धरती, ब्रह्मांड आपणच आहोत, हे सर्व जग म्हणजे आपलाच एक भाग किंवा आप्ण ह्याचा एक अविभाज्य भाग आहोत, समुद्रातल्या एका थेंबासारखे आहोत हे समजणे म्हणजे इश्वरप्राप्ती. जेव्हा ही जाणीव निर्माण होते तेव्हा सगळे सांसारिक ताप दूर होतात. अनंत शक्तीची जाणीव होते, मग सगळं आहेच शक्य तर मग काही मिळवायची, गमवायची भीती निघून जाते. देव भेटतो तो असा. ही जाणीव गुरु करुन देऊ शकतो. ही जाणीव तोच देऊ शकतो ज्याला स्वतःला अशी जाणीव असते. म्हणून असे साक्षात्कारी गुरु फार दुर्मिळ असतात, नशिबात आणि साधनेत बळ असेल तर मिळतात, ते अजिबात जाहिरात करत नाहीत. ते फक्त भेटतात आणि मार्ग दाखवतात. त्यांचे मार्ग दाखवणेच ९९ टक्के काम करुन जाते. उदाहरणार्थः एक प्रचंड मोठा टाइम बॉम्ब लावला आहे, दोन मजली उंच असा. हजारो वायरी आहेत. त्यातली एकच कापायची आहे. ती कोणती हे फक्त गुरु सांगू शकतो. हजारो वायरी दिसत आहेत, कोणतीतरी कापली तर टायमर थांबेल हेही तुम्हाला माहित आहे, पण ती नेमकी कोणती हे तुम्हाला फक्त गुरु सांगू शकतो. म्हणून गुरुंचे आध्यात्मिक जगतात महत्त्व अपरंपार आहे. पण वायर तुम्हालाच कापायची आहे हां.

७. भारतीय आध्यात्मात गुरु शिष्य परंपरा शंकरापासून, म्हणजे आपले भोलेशंकर यांच्यापासून सुरु होते. मोक्ष मिळवणारा तो पहिला आत्मा, त्याने मोक्ष मिळवण्याच्या सर्व पद्धतींचा शोध लावला. त्याच्यापासून शिकून लाखो गुरु आजवर शिष्यांना मदत करत आलेत. पुढे लाखो वर्षे हे चालत राहणार. वैज्ञानिक पद्धतीने यात काहीच तथ्य सापडणार नाही. तेव्हा शोधू नये, वैज्ञानिक पद्धत भोंदू योगींना उघडे पाडायला वापरावी. स्वतःचा बचाव भोंदूंपासून करण्यासाठी वैज्ञानिक पद्धत वापरावी. आध्यात्मिक प्रगतीसाठी मात्र गुरु मिळतील यावर विश्वास ठेवावा. फार किचकट, दिव्य किंवा अद्भूतरम्य वगैरे काही नसते त्यात, तसे शोधायला जाणारे चुकीच्या गोष्टींमागे आहेत असे जाणावे. गुरुंपासून ज्ञान मिळणे सायकल चालवायला शिकण्यासारखे सोप्पे आहे. वेळ आल्यावर ते साधतेच. तोवर बुद्ध, ज्ञानोबा, तुकाराम, एकनाथ, रामदास, येशू, कबीर, रविदास, मीराबाई, पैगंबर, नामदेव, नानक, महावीर, वगैरे लोकांनी जे एकच सामायिक तत्त्व सांगितले आहे त्याचे पालन करावे. हीच साधना आहे. सोपी नाही बरीच कठीण आहे. उदाहरणार्थः खोटे बोलू नका. म्हणायला सोपे पण करायला महाकठिण.... साधना अशीच असते. पण अशी कठिण साधना करण्यापेक्षा लोक फुले उधळणे, अगरबत्या लावणे, धुपदिप ओवाळणे, बकरे कापणे, वगैरे आडंबर करत आपण किती देवप्रेमी आहोत ह्याचे आडंबर मांडतात, स्वतः भटकतात, इतरांनाही भटकवतात. या लोकांपासून आपला बचाव करणे हीच सगळ्यात पहिली अध्यात्माची पायरी, ही जरी चढलात तर अर्धी लढाई जिंकलीच म्हणून समजा.

----- मला वाटले ते लिहिले आहे, अवांतर वगैरे झाले असल्यास क्षमा असावी --------

नानाकळा ,आपल्याला काय वाटते अथवा बरोबर आहे याचा इथे विचार नसून भागवत धर्म त्याचे पालन,समज ,विश्वास ,श्रद्धा काय आहेत ते मी लिहिले आहे. ते बरोबर आहेत का चूक याचा आपण आढावा घेत नाही. तसे हिंदू धर्म म्हणजे अनेक तत्त्वज्ञानांची मोळी आहे. कर्म ,धर्म, जन्म ,मृत्यु , द्वैत,अद्वैत,देव,आत्मा,परमात्मा यांचे ज्ञान मिळते का अथवा म्हणजे काय सांगण्याचा प्रयत्न आहे.

जैन तीर्थंकराच्या मू्र्ती असतात ,महावीर,जिनेंद्र असतात तिथे दरवाजावर कुबेर,विष्णू आणि लक्ष्मी असते. म्हणजे जितेंद्रियापुढे हेसुद्धा गौण ठरतात. मग यावर वाद घालायचा का? कोण महान अन कोण लहान?
तसाच वाद गुरूबद्दल होऊ शकतो. गुरू हवा का नको. पण हा लेख तो वाद घालण्याच्या उद्देशाने नसावा.
तुमच्या मुद्यांना +१.

माझा प्रतिसाद तुमच्या प्रतिसादाला उत्तर नाही. तसा समजू नये. केवळ गुरुची आवश्यकता व गुरुंचे महत्त्व याबद्दल माझे विचार मांडले आहेत, आधार केवळ तुमच्या एका वाक्याचा घेतला आहे, तो तुमचा प्रतिवाद नाही हे नमूद करतो. मी इथे वाद घालत नाही. अध्यात्मावर मी वाद घालत नाही. चर्चाही करत नाही. फक्त माझे म्हणणे मांडतो. अध्यात्म हा वादाचा विषय नाही अनुभवाचा आहे. जे मी लिहिले त्याचा अनुभव आल्यास सत्य समजावे, नाही आल्यास सोडून द्यावे असा रोखठोक विचार आहे. कोण बरोबर कोण चूक ह्या वादाचा तर प्रश्नच येत नाही. तेव्हा गैरसमज नको.

लेखातल्या मूळ विषयाची प्रस्तावना म्हणून माझा पहिला प्रतिसाद समजावा, मूळ विषयाबद्दल सविस्तर लिहिन थोड्या वेळाने.

वरील सर्व प्रतिक्रिया वाचल्या. प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद सर्वांचे. "केव्हांपासून म्हणू लागले ते ही बघावे लागेल" या limbutimbu यांच्या मुद्द्याशी अगदी सहमत.

Srd यांनी केलेले विश्लेषण बरेचसे पटण्यासारखे आहे. पण त्यातूनही काही प्रश्न सुद्धा मनात येतात:

१. "भक्तीपंथातील श्रेष्ठ गुरु" जर जगदगुरु असतील तर भक्तिमार्गाचे महत्व सांगणारे इतरहि थोर संत आहेत. तुकाराम महाराजांप्रमाणे या सर्वांचा संत म्हणूनच उल्लेख होतो. पण त्यांना जगद्गुरू म्हटले जात नाही. उदाहरणार्थ, भागवत धर्माचा पाया श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी घातला. किंबहुना भागवतधर्माचा प्रमाणभूत ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी त्यांनी लिहिला. पण "जगदगुरु ज्ञानेश्वर" असे कधी ऐकले नाही.

२. आद्य शंकराचार्य संत ज्ञानेश्वरांच्याही आधी होऊन गेले. तेंव्हा भागवतधर्म उदयास आलेला नव्हता तरीही त्यांना तसेच तत्कालीन अनेक विभूतीना जगद्गुरू म्हटले जाते. किंबहुना भारताची जगदगुरु अशी ओळख त्या काळात निर्माण झाली होती असे उल्लेख आहेत. म्हणजे हि पदवी मुळात त्या काळातली आहे असे मानायला हरकत नाही.

३. भागवतधर्माच्या अनुयायांनी प्रेम आणि आदरापोटी तुकाराम महाराजांना जगदगुरु असे म्हणायला सुरवात केली असे मानले तर इतरही संतांच्या अनुयायांनी त्यांना जगद्गुरू म्हटले तर भागवतधर्मात ते मान्य आहे का? (जसे विठ्ठल यांनी प्रतिक्रियेत लिहिले आहे नाणिज स्थित कुणी एक आहेत त्यांचे अनुयायी त्यांना जगदगुरु म्हणतात)

@नानाकळा: "गुरु"ची माहिती आणि महती विशद करणारी प्रदीर्घ प्रतिक्रिया आपण दिली आहे. ती खूप आवडली. धन्यवाद.
(माझा उद्देश सुद्धा वादविवाद हा नाही. कृपया गैरसमज नसावा. फक्त जगद्गुरू हे पद कोणत्या संदर्भात व कोणासाठी वापरले जाते ते जाणून घेण्याची उत्सुकता त्या मुलाप्रमाणे मलाही आहे इतकेच)

जे तत्त्वज्ञान गुरुच्या महतीवर अवलंबून आहे तिथे निरनिराळे गुरू असणारच.( बुद्ध धर्मात गुरू नसून धर्मगुरू किंवा संघनायक असतात)
२) शंकराचार्यांचा उल्लेख जगद्गुरू असा केव्हाचा आहे ?
३) किर्तनकार शंकर अभ्यंकरांना किर्तनमहोत्सवात( डोंबिवली,टिळकशाळा प्रांगण एमाइडिसी) ऐकले आहे॥ त्यांनी सरळच विचारले "ज्ञानेश्वरांनी नक्की काय केले? भागवताचा ,गीतेचे निरुपण,प्रसार. तुकाराम रामदास हे स्वानुभवी होते." यानंतर कांची कामकोटीपतींनी हेच वाक्य उधृत केले आणि परखड वक्तव्याचे कौतुक केले.
त्यामुळे ज्ञानेश्वरांना ही पदवी का नाही याचे उत्तर मिळते.

बुद्ध धर्मात गुरू नसून धर्मगुरू किंवा संघनायक असतात

>> तथाकथित बौद्ध धर्मात धर्मगुरु किंवा संघनायक म्हणून जे काही चालू आहे तो कर्मकांडांचा धर्म म्हणजे बुद्धांनी सांगितलेला मार्ग नव्हे.

नानाकळा, तुमची गुरुची डेफिनिशन काय?

सायकल कोणी 'शिकवली' नाही तर ती कोणाला येणारच नाही का? मला वाटतं नक्की येईल, वेळ लागेल. पण ते स्किल माणूस ट्राय अ‍ॅन्ड एरर मधून आत्मसात करेल. आता प्रयत्नांना, निसर्गाला, लॉजिकल विचारांना, पुस्तकांना तुम्ही गुरु म्हणत असाल तर प्रश्नच मिटला.
माणसाला एका पिढी कडून पुढच्या पिढीत ज्ञान संक्रमित करता येते, त्यासाठी त्याने भाषा, लेखन इ. प्रक्रियांना जन्म दिला आहे. इतर पशूंना हे अगदी थोड्या प्रमाणात शक्य होते/ किंवा होतंच नाही.
दिल्ली कुठे आहे? निसर्गातील वेगवेगळ्या गोष्टीचे गुणधर्म कोणते, त्याचा उपयोग मला कसा करून घेता येईल? इत्यादी ज्ञान माणसाने स्वकष्टाने आत्मसात केले आहे. ते पुढच्या पिढीत संक्रमित होईल आणि री-इंवेन्टिंग-द-व्हील होणार नाही याची काळजी ही माणसाने घेतली आहे. आता या सगळ्याला गुरु मानून पुढे जायचं का ज्ञान मानून हा ज्याचा त्याचा प्रश्न.

<< केव्हांपासून म्हणू लागले ते ही बघावे लागेल. Happy
आमच्या लहानपणी, "संत ज्ञानेश्वर", "संत तुकाराम" इतकाच "संत" या पदवीने उल्लेख असायचा. Happy>> +१०० Happy

सायकल, दिल्ली ,इत्यादी केवळ दृष्टांत म्हणून दिलेली उदाहरणे आहेत, ती अचूक फिट बसत नसतील तर माझ्या समजवण्यात दोष आहे, मूळ संकल्पनेवर विचार होणे महत्त्वाचा, बाकी काथ्याकूट कचरा आहे, सोडून देता येईल.

छान चर्चा,नानाकळाम्चे विवेचनही छान. Happy

ही सत्य घटना की कोणत्यातरी बादशहाने प्रयोगाखातर मानवि मुले कुणाही मानवाच्या संपर्काविना वाढवुन पाहिली असता, ती जंगली राहिली, इतकेच नव्हे तर त्यांचेमध्ये बोलणे, चालणे, चावुन खाणे/पिणे इत्यादी नैमित्तिक गुण/गरजा भागविण्याची क्षमताही विकसित झाली नाही असे दिसले. याचाच अर्थ, मानवी जन्मापासुनच, त्याचे शिक्षण सुरु होते, अन शिक्षक/गुरु अर्थातच आजुबाजुच्या व्यक्ति, व खास करुन आई-वडिल असतात. आजही आईला प्रथम गुरु मानण्याची पद्धत आहे, तर काही पुरुषप्रधान "धर्ममार्तंड" केवळ बापाला प्रथम गुरु मानतात.
ते काही का असेना, जन्मतः मानवी देहासहित मिळालेले अवयव/पंचेंद्रिये सुयोग्यपणे "वापरण्याचे शिकण्याकरता' तरी गुरु लागतोच.
अन्यथा, एकलव्यासारखे केवळ निरीक्षणातुन शिकण्याची क्षमता असावी लागते.... (ही पुढची पायरी) पण ते निरीक्षण होण्यासाठी तरी, समोर दुसरे कुणी असावेच लागते.
मुद्दा असा की "गुरुचे" स्थान आयुष्यात इतके महत्वाचे आहे.
माझ्या मते कोणी "एकच एक" गुरु असणे ही कल्पना मला मान्य नाही. व्यक्तिव्यतिरिक्त, जगातील प्रत्येक अस्तित्वातील सजीव-निर्जीव गोष्ट ही "गुरुस्थानी" असु शकते जर व्यक्तिने तसा ध्यास घेतला तर, असे माझे मत.

यापुढील पायरि म्हणजे, स्वतःच कुणाचे तरी गुरु बनणे वा गुरु बनण्यास अप्रत्यक्षरित्या कारणीभुत ठरणे.
या पायरीवर व्यक्ति "घेण्याच्या" भुमिकेतुन बाहेर पडुन, "देण्याच्या-वाटण्याच्या" भुमिकेत शिरलेली असते.
सामान्य व्यक्ति, आपल्यापाशी असलेली अक्कल दुसर्‍यास देण्याच्या बाबतीतही हात आखडता घेतानाच दिसतात.
जेव्हा की, संत तुकारामांसारखी व्यक्ति, आख्खे आयुष्य जगाला उपदेशामार्फत काहि ज्ञानामृत देण्यात व्यतित करतात.
अन असे काही सांगुन जातात जे कालातीत आहे, सर्व कालात सर्व जागी सर्वांना उपयोगी आहे.
अन कदाचित म्हणुनच, त्यास "जगद्गुरु" ही पदवी /संबोधन दिले गेले असावे. किंबहुना, त्यांना वा त्यांच्यासारख्या
काही मोजक्या इतरांना (जसे की मनाचे श्लोक/दासबोधवाले समर्थ रामदास स्वामी) जगद्गुरु या संबोधनाने उल्लेखिण्यास प्रत्यवाय नाही.
असे माझे मत.

नानाकळा, लिम्बु +१००.
अध्यात्म, गुरु उपदेश जरी अवघड असला तरी सोप्या सोप्या ओव्या, अभंग, भजने यां व्दारे ते सामान्या लोकां पर्यंत नेण्याचे असामान्य कार्य संतांनी केले. त्यातील तुकोबा हे तुकाराम गाथे च्या रुपाने अजुनच लोकप्रीय झाले. त्यांच्या व्दारे बहुत जनांत पोहोचले म्हणुन त्यांना जगद्गुरु म्हणत असावेत.