आजोबागड

Submitted by शुभम एडेकर on 30 January, 2017 - 07:48

रात्रीचे 9 वाजले होते आणि आमचं कुठे ट्रेकला जायच हे ठरलही नव्हतं पण कुठे तरी जाणार हे नक्की होतं. सुट्टीचा दिवस आम्ही असा थोडी ना निष्फळ जाउ देणार होतो. अखेर दर्शन दादाच्या सल्ल्यावरुन आजोबागड नक्की झाला. डोळखांबला उतरायचं एवढीच माहिती आमच्या हातात होती. तरीपण विदाउट प्लॅनिंग एक वेगळीच मजा असते. सकाळी साडेसहाच्या आसनगाव गाडीने आम्ही निघालो. शहापूर बस स्टाॅप वर पोहचल्या पोहचल्या डोळखांब बसही आम्हाला पटकन मिळाली. कंडक्टर काकांनी आम्हाला सगळी व्यवस्थित माहिती दिली. आजोबागडावर जाण्यासाठी साकुर्ली फाट्यावर उतरावं लागतं. साकुर्ली फाट्यावर एक चहाची टपरी होती. घरातुन पोटातला अग्नी तसाच पेटत ठेउन निघालो होतो. चहाच्या टपरीवर चहाबिस्कट खाउन पोटातला अग्नी विझवला. कंडक्टर काकांनी सांगीतल्याप्रमाणे साकुर्ली फाट्यावरून आम्हाला गडावरील आश्रमापर्यंत जाण्यासाठी 9 किमी चालत जाव लागणार होतं. उंबरं, करवंद आणि सुर्यदेवाच्या कोवळ्या किरणांचा प्रसाद खात आमची ब्लॅक अॅण्ड व्हाईटची जोडी आजोबागडाच्या दिशेने निघाली.
PicsArt_01-27-07.56.24.jpgPicsArt_01-27-07.58.35.jpgPicsArt_01-27-08.01.26.jpg
ब्लॅक अॅण्ड व्हाईटची जोडी यासाठी की प्रत्येक ट्रेकला गोंद्याचा काळा टिशर्ट आणि माझा व्हाईट टिशर्ट असतो. आज आमचं नशिब खुप चांगल होत कारण पाठुन एक ट्रॅक्टर येत होता. ट्रॅक्टरवाल्याला थांबवलं, विचारलं, बसलो पण पुढे....... पुढे होता खडतर रस्ता. मुंगुर मासा तव्यावर टाकल्यावर जसा टणाटण उडतोना तसे आम्ही दोघ पण टणाटण उडत होतो. टॅक्टरवाला ही ट्रँक्टर एखाद्या स्पोर्ट्स बाईकसारखा चालवत होता. 1 किमी नंतर तो थांबला, त्याला दुसरीकडे जायच होतं, आम्ही उतरलो आणि पुढे चालत राहिलो. तितक्यात पाठुन बाइकचा आवाज आला. अस वाटत होतं की आपण ट्रेकला नाय राईड एंजाॅय करायाला आलोय. बाइकवाल्याने आम्हाला आश्रमाच्या कमानीपर्यंत म्हणजे डेहणे गावापर्यंत सोडलं. तिथुनही 4 किमी चा चढ बाकी होता.
PicsArt_01-27-08.00.35.jpgPicsArt_01-27-08.02.36.jpg
रमत गमत चालत आम्ही चढण चढत होतो, दोघांच्या आवडीनिवडी जुळत असल्याने आमच्या गप्पा काही थांबत नव्हत्या. घड्याळाकडे आमच लक्षच नव्हत त्यामुळे आम्ही किती वाजता पोहचलो हे सांगता येणार नाही. आश्रमाचा परिसरही झाडांनी भरून गेला होता. आश्रमात खुप सारी मंदिरं आहेत. त्यात वाल्मिकी ऋषींचा आश्रम आणि समाधी हे प्रमुख आकर्शण.
PicsArt_01-27-08.04.08.jpgPicsArt_01-28-04.06.48.jpgPicsArt_01-28-04.08.22.jpgPicsArt_01-28-04.11.32.jpg
सर्व मंदिरांत नमस्कार करून आम्ही आश्रमाच्या खालच्या भागात असलेल्या जलकुंडाकडे निघालो.
PicsArt_01-28-04.09.45.jpg
तिकडे गेल्यावर आमचा आराम चालु होता, इतक्यात आमच्या समोर एक पिवळ्या रंगाचा पक्षी येउन बसला. बॅडलक इतकच की माझा कॅमेरा आमच्यापासुन लांब होता, आता कॅमेरॅत चित्र टिपायचा की फक्त नेत्रसुख घ्यायचं एवढा विचार करता करता त्या पक्ष्याने आमचा राम राम ही घेतला. थोडफार खाउन आम्ही बाकी राहीलेला अर्धा गड चढण्यास सुरवात केली. ही चढाई अगदी सरळ होती, आमचा चांगलाच दमछाक निघत होता.
PicsArt_01-28-04.14.01.jpg
एका ठिकाणी आम्ही आराम करून फक्त 25 मिनटांत सितेच्या पाळण्याजवळ पोचलो होतो. सितेच्या पाळण्याजवळ जाण्यासाठी छोटीसी शिडी चढुन जावी लागते.
PicsArt_01-28-04.27.51.jpgPicsArt_01-28-04.26.51.jpg
आता मात्र चांगली भुक लागली होती. मेन्युमध्ये घरून बाबांनी करून दिलेली बुर्जी आणि पाव होते.
PicsArt_01-28-04.16.36.jpgPicsArt_01-28-04.19.15.jpg
दोघांनी बघता बघता 12 पाव सहज फस्त केले. इथे येउन फक्त एवढीच खंत होती की गड अर्धवट चढल्यासारखं वाटत होतं. गडाच्या माथ्यावर जाण्यासाठी दुस-या गावातुन रस्ता जातो हे आम्हाला घरी परत आल्यानंतर समजलं. असो जे ताटात येइल त्यात आम्ही कायम समाधानी असतो. मुळात हा संपुर्ण महाराष्ट्र इतका नटलेला आहे की आपल्या ताटात कधीच चटणी-भाकरी येत नाही. केव्हाही संपुर्ण पंचपंकवान्नच ताटात असतं मग तुम्ही कुठेही जा, कुठल्याही गडावर जा. वरती सितेचा पाळणा आणि तिथे असलेले दोन पाण्याचे टाके आहेत.
PicsArt_01-28-04.29.32.jpgPicsArt_01-28-04.31.46.jpg
हा अजुन एक गोष्ट आवर्जुन सांगाविशी वाटते, आम्ही एक छोटसं मिशन तयार केलं होतं. फक्त 1 लीटर पाण्यामध्ये दोघाजणांनी भागवायचं होतं आणि अगदी सहजपणे आम्ही ते पुर्णही केलं. आश्रमात आल्यावर तिथल्या बाबांनी आम्हाला जेवण्यासाठी खुपच आग्रह केला पण आमचा कोटा पुर्ण झाला होता. बुर्झीपावानेच ट्रॅफीक जाम केल होत. कसतरी त्या बाबांना समजावत आम्ही निघालो. थोडस पुढे गेल्यावर एक दुसरा रस्ता खाली उतरताना दिसला. थोडा विचार करून त्याच रस्त्यानी जाण्याच ठरलं.
PicsArt_01-28-04.43.54.jpg
थोड्या वेळाने गोंद्याला कसला तरी चालण्याचा आवाज आला. थोडस थांबलो आणि परत चालायला लागलो. परत त्याला आवाज आला आता मात्र खात्री झाली की पुढे काहीतरी आहे, आणि खरंच पुढे एक निळगाय होती. आम्हाला अगदी छोटीशीच झलक दिली तिने. निळगाय ही हरणाच्या प्रकारात मोडते पण निळसर रंग आणि गायीएवढा आकार त्यामुळे तिला निळगाय नाव पडले. पहिल्यांदा ट्रेकला कुठलातरी नविन प्राणी बघायला मिळाला. गड उतरुन आम्ही सपाट जागेवर पोहचलो होतो. हातात बेसबाॅल असते तशी बॅट दिसणारी काठी आणि खाली गोल गुमुट पडलेली दगड. मग आम्हाला कसला मोह आवरतोय. दोघही एकमेकांचे गावठी शाॅट दाखवायला लागलो. जवळ-जवळ दगड संपेपर्यंत आमची बॅटींग चालु हाती. गावात पोहचणार इतक्यात आम्हाला ढडाम धुम असा आवाज आला. कुणीतरी बाइक वरून पडला होता. आम्ही धावत त्या व्यक्तीपर्यंत पोहचलो. गाडी एकीएकडे आणि तो माणुस एकीकडे. त्याला उठवायला गेलो तर त्याने आमचा हात उडवुन टाकला आणि बोलला की ‘मला लागल नाही, म्या या गावचा सरपंच हाय’. त्याने जीवाच्या वरती ढोसली होती. त्याला उचललं, पाणी दिल तेवढयात तिथले गावकरी आले आणि आम्ही निघालो. आता इथुन अजुन 9 किमी परत चालायच होत.
PicsArt_01-28-04.48.43.jpg
आता अपेक्षा होती देवाची, म्हणजे अशा टाईमाला जो धाउन येतो किंवा आपली मदत करतो तो आपल्यासाठी देवच असतोना. पण 33 कोटी देवांपैकी एकही इथे यायला तयार नव्हता. शेवटी पदयात्रा चालुच ठेवली. आता आम्ही एका नदीजवळ पोहचलो होतो तिथे थोडीशी राहिलेली फोटोग्राफीची इच्छा पुर्ण करत आणि फ्रेश होउन तिथुन निघालो.
PicsArt_01-28-04.49.34.jpgPicsArt_01-28-04.47.48.jpgPicsArt_01-28-04.46.31.jpgPicsArt_01-28-04.41.37.jpgPicsArt_01-28-04.40.27.jpg
साकुर्ली गावात पोहचलो. इथेही पोहचल्या- पोहचल्या लगेच बस आली. तिथे वाटलं की हे तर कसारा आसनगाव ट्रेन पेक्षा भारी आहे. जराही वाट बघावी लागत नाही. पण तो थोडा नशिबाचा भाग होता.
PicsArt_01-28-04.36.12.jpg
बसमध्ये गाढ झोप लागली. गाढ झोपेतच शहापुरला उतरलो. तिथुन रिक्षाने आसनगावला पोहचलो, तिथेही सी.एस.टी. लोकल जणु आमचीच वाट पाहत होती. किती भारीना, कसलीही पुर्वतयारी न करता, पहिल्यांदा नविन ठिकाणी जाउनही इतका भारी ट्रेक होतो हे पहिल्यांदाच आमच्याबरोबर झालं.
- शुभम एडेकर

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छान.

हा अजुन एक गोष्ट आवर्जुन सांगाविशी वाटते, आम्ही एक छोटसं मिशन तयार केलं होतं. फक्त 1 लीटर पाण्यामध्ये दोघाजणांनी भागवायचं होतं आणि अगदी सहजपणे आम्ही ते पुर्णही केलं. >>>>>हे असं मिशन का म्हणुन ???

छान वर्णन..
वर जिप्सी विचारतो ते खरेच आहे. पाण्याबाबत अगदीच नड नसेल तर काटकसर करू नका, ते अत्यंत धोकादायक आहे.

मुंगुर मासा तव्यावर टाकल्यावर जसा टणाटण उडतोना तसे आम्ही दोघ पण टणाटण उडत होतो. >>> Proud

फार छान लिहितोयस. फोटो काढत फिरत रहा इथे येऊन लिहित रहा

आपला प्रश्न अगदी बरोबर आहे सर....इथे पाण्याची कमतरता नव्हतीच आम्हाला पण पुढे कधीही अशी वेळ येऊ शकते आपल्यावर म्हणून थोडासा सराव.....

शुभम,
मी मागे पूर्वतयारी असा लेख लिहिला होता. माणूस एकवेळ अन्नाशिवाय तग धरू शकेल, पण पाण्याशिवाय नाही. शक्यतो अशी वेळ कधी येऊच देऊ नये. त्यासाठी तयारी करणे आपल्या हातात असते. पुरेसे पाणी जवळ ठेवायचेच, शिवाय जिथे जिथे पाणी मिळेल, तिथे तिथे
बाटल्या भरून घ्यायच्या. पुरेसे पाणी जवळ असल्याशिवाय अनोळखी प्रदेशात जाऊ नये. पुढे पाण्याचा स्त्रोत आहे का, त्याची पुर्ण खात्री
करून घ्यावी. त्याशिवाय क्लोरीन ड्रॉप्स, उंबरे, नाचणीची आंबिल असे अनेक उपाय आहेत.
जिप्सीलाच डीहायड्रेशनचा त्रास झाला होता, आणि होणारा त्रास डीहायड्रेशनमूळे होतोय, हे पटकन लक्षातही येत नाही. म्हणून असे वेडे साहस करू नका, अशी परत विनंती.