विवेकाला फाशी दिली होती तेव्हाची गोष्ट - श्री. नितीन चव्हाण

Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago

समाजातील अंधश्रद्धा नष्ट व्हाव्यात यासाठी लढा देणार्‍या, जनजागृतीचे प्रयत्न करणार्‍या डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांची पुराणमतवाद्यांनी केलेली निर्घृण हत्या आणि त्यानंतरचा धार्मिक उन्माद यांनी पुरोगाम्यांनाच नव्हे, तर सर्वच शांतताप्रेमी नागरिकांना अस्वस्थ केलं.

श्री. नितीन चव्हाण हे मुंबईच्या वडाळ्यातील झोपडवस्तीतले कार्यकर्ते. त्यांच्या आईच्या अंगात यायचं, तसंच वयाच्या वीस-एकविसाव्या वर्षापासून त्यांच्याही अंगात वारं संचारू लागलं. पुढे मानसोपचारतज्ज्ञांनी ‘अंगात येणं’ हा मानसिक आजार कसा आहे, हे त्यांना समजावलं. य. दि. फडके, कुमार केतकर, डॉ. दाभोलकर यांच्या व्याख्यानांतून, पुस्तकांच्या वाचनातून ‘वारं’ बंद करण्यापर्यंत त्यांचा प्रवास कसा झाला, हे त्यांच्याच शब्दांत.

***

साल १९९१. डिसेंबरची मरणाची थंडी. सोबत जवळपास आमचा पन्नासजणांचा जथ्था. थंडीच्या कडाक्यात पहाटे पाच वाजता कर्‍हा नदीच्या पात्रात उतरलो. पहाटे नदीचं पाणी उबदार असतं. त्यामुळे पाण्यात असेपर्यंत थंडी जाणवली नाही. नदीतून बाहेर आल्यावर मात्र शरीराचं अक्षरशः मुटकुळं झालं. या मुटकुळ्या अंगानंच जेजुरी गडाच्या दिशेनं निघालो. पहाटे साडेसहाच्या सुमारास बोचणारा गार वारा सोबत घेऊन गडावर पोहोचलो. भाविकांकडून केला जाणारा ‘येळकोट येळकोट जय मल्हार... सदानंदाचा येळकोट...’ गजर कानात घुमत होता. गडाच्या उघड्या पठारावर वारा आणखी बेभान झाला होता. पठाराचं सारं प्रांगण हळदीनं माखलं होतं. भवतालाला सोन्याची झिलई आली होती.

गाभार्‍यात जाऊन खंडोबाचं दर्शन घेऊन प्रांगणातल्या पितळी कासवापाशी आलो. आईनं मंदिराच्या कळसाकडे एकवार नजर फिरवली आणि मोठ्या आवाजात ‘येळकोट येळकोट जय मल्हार...’ ललकारी दिली. त्या आवाजानं गडाचा आसमंत थरारून गेला. वार्‍याच्या लयीसोबत आईचं शरीर हिंदकळत होतं. माझ्यासाठी हे नवीन नव्हतं. मागची अनेक वर्षं तुळजापूर, कोल्हापूर, जेजुरी इथे आईच्या अंगात येणं हे चित्र मनावर कोरलं गेलं होतं. यंदा त्यात नावीन्य इतकंच होतं, की तुळजापूरला, कोल्हापूरला देवीसमोर केस मोकळे सोडून घुमणारी, घरी बायांचं - सात आसरांचं वारं आलं की प्रासादिक, सात्त्विक गळ्यानं गाणी म्हणणारी माझी आई जेजुरीत चक्क खड्या पुरुषी आवाजात बोलत होती. तिच्या शारीरिक हालचालीत कुठेच स्त्रीमार्दव दिसत नव्हतं. उभं राहण्याची पद्धतसुद्धा स्त्रीसुलभ नव्हती.

गडावरील बेफाम गारठ्याचा यत्किंचितही परिणाम तिच्यावर जाणवत नव्हता. अंगात घुमणार्‍या वार्‍यानं तिच्या शरीराला जोरदार हिसडे द्यायला सुरूवात केली. वडील पुढे सरसावले आणि त्यांनी तिच्या कपाळाला हळदीचा भंडारा लावला. ‘बोला देवा कसं येणं झालं,’ म्हणत ते आईच्या पाया पडले. वडिलांनी गाव आणि भावकी यांसंबंधातील काही प्रश्न विचारल्यानंतर ‘यंदा हे पुरुषी आवाजाचं नवीन रूप काय?’ असा सवाल केला. त्यावर वार्‍यानं कोणतंही भाष्य न करता ‘हे वारं आता तुझ्या पुढच्या पिढीकडे सोपवतोय’ असं सांगत माझ्या डोक्यावर हात ठेवला. वार्‍याच्या त्या स्पर्शानं काही क्षण माझं अंग शहारलं. मात्र, झाला प्रकार काय होता हे मला आणि वडिलांना कितीसा आकळला, ते मलाही आता सांगता येणार नाही. माझं वय त्यावेळेस २०-२१च्या घरात असेल.

पुढचं वर्ष १९९२. नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा. त्या वर्षी आई-वडिलांसोबत उत्तरेच्या तीर्थयात्रेला गेलो होतो. आई तिच्या गुरूमहाराजांच्या उत्सवानिमित्त दरवर्षी वडाळ्यातून पन्नास भाविकांची एक लक्झरी बस घेऊन तीर्थक्षेत्रांची यात्रा करत असे. यात्रेत भाविकांच्या सेवेला, त्यांच्या बॅगा उचलण्यासाठी, वयोवृद्ध भाविकांना सांभाळण्यासाठी, जेवणासाठी लागणारं पाणी, लाकडं आणून देण्यासाठी मला आणि माझा मित्र संतोषला सोबत नेत असे. पोरसवदा वयं होतं. शाळेला दांड्या मारून बाहेर भटकायला जाम आवडायचं. तब्बल तेवीस दिवसांच्या या उत्तरेतल्या तीर्थयात्रेदरम्यान विंध्याचल पर्वत भागातून जात असताना दुपार झाली होती. वाटेत एक नदी दिसली. प्रवासानं आंबलेल्या शरीरधर्माच्या अंघोळीसाठी आम्ही नदीत उतरलो. अंघोळी सुरू असतानाच एक मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नदीकाठी आणण्यात आला होता. आमच्यातल्या जाणत्या लोकांनी सांगितलं, आपण नदीच्या स्मशानाजवळच्या पात्रात आलो आहोत. सगळ्यांनीच कशाबशा आंघोळ्या आटोपत्या घेतल्या आणि तिथून काढता पाय घेतला. वाराणसीच्या जवळपास येत असतानाच ६ डिसेंबर उजाडला.

तिकडे अयोध्येत बाबरी मशीद पाडण्यात आली होती. संपूर्ण उत्तर प्रदेशात दंगलीचा वणवा भडकला होता. तीर्थयात्रा अर्ध्यातच आटोपून आम्ही मुंबईच्या दिशेनं निघालो. वाटेत अनुभवलेला दंगलीचा दाहक अनुभव स्वतंत्र लेखाचा विषय आहे.

चार-पाच दिवसांच्या अथक प्रवासानंतर मुंबईला पोहोचलो. त्यानंतर अनेक दिवस माझं डोकं वारंवार गरगरायला लागलं होतं. अठरा ते वीस दिवसांच्या बसच्या अथक प्रवासानंतर आलेला हा शिणवटा असावा असं वाटायचं. तसंच स्मशानात केलेल्या अंघोळीदरम्यान भुताच्या झपाट्यात आला असेल असा अंदाज आसपासच्या शेजार्‍यांनी केला. कशातच मन लागत नव्हतं. आतून खूप अस्वस्थं वाटायचं. एके दिवशी संध्याकाळी घरी आईसोबत देवाच्या आरतीला उभा राहिलो असताना एखाद्याच्या अंगात वारं येत तस माझं शरीर डोलायला लागलं. हा काय प्रकार आहे ते आईला बरोबर समजलं. आईनं माझ्या अंगात आलेल्या वार्‍याला “अखेर आलास तर...’’ अशा सूचक शब्दांत विचारलं. अर्धग्लानीत असलेल्या मला माझ्या शरीरात काही तरी बदल घडतोय याची जाणीव व्हायला लागली होती. सुरुवातीचे काही दिवस फक्त मूकपणे शरीर डोलायचं. कुणाशी काहीच बोलायचो नाही. देव्हार्‍यातल्या भवानीच्या मूर्तीकडे खूप वेळ टक लावून पाहण्याचा प्रकार सुरू झाला. एके दिवशी रविवारी घरी बकर्‍याचं मटण खाल्लं आणि सार्‍या शरीराचा भडका उडाला. ‘येळकोट येळकोट जय मल्हार’ असा गजर करत खूप वेगाने शरीरानं गिरक्या घ्यायला सुरुवात केली. खंडोबाचा जयघोष करत सारं घर डोक्यावर घेतलं. घराच्या भिंती पत्र्याच्या होत्या. कधी या पत्र्याला तर कधी त्या, अशा धडका देत बेभानपणे वारं घुमत होतं. अंगात प्रचंड ताकद आली होती. वडिलांनाही मला रोखता येणं कठीण होऊन बसलं होतं. आईनं देव्हार्‍यातल्या हळदी-कुंकवाच्या करंड्यातली हळद काढली आणि माझ्या कपाळाला लावली. वार्‍यानं जागेवर उंच उंच उड्या घेत ‘येळकोट येळकोट’चा घोष आणखी तीव्र आवाजात सुरू केला.

आईच्या अंगात आमच्या कुलदेवतेचं - तुळजाभवानीचं वारं यायचं. त्या वार्‍याला एके दिवशी वडिलांना विचारलं, “मुलाच्या अंगात येण्याचा हा नवीन प्रकार काय आहे?’’
देवानं सांगितलं, “खंडोबाच्या वार्‍यानं तुला जेजुरीत काय सांगितलं होतं... हे वारं पुढच्या पिढीकडे सोपवतोय म्हणून, ते विसरलास?’’
वडिलांना तो जेजुरीतला प्रकार आठवला.
पुढच्याच क्षणी त्यांनी, “मुलगा अजून लहान आहे. या वयात हे असलं वारंबिरं काही नको,’’ म्हणत आईच्या वार्‍याला “हे थांबव’’ अशी विनंती केली.
वार्‍यानं, “आता हे मला थांबवता येणार नाही,’’ म्हणत विषय झटकून टाकला.

त्यानंतर प्रत्येक मंगळवार, रविवारी संध्याकाळच्या वेळेत हे वारं माझ्या अंगात येणं नित्याचं होऊ लागलं होतं. खंडोबाला मांसाहार चालत नाही म्हणत आईनं माझं चिकन, मटण, मासे खाणं बंद करून टाकलं. प्रत्येक रविवारी उपवास सक्तीचा झाला. दुपारी बारा वाजता हळद-खोबर्‍याची तळी भरायची देव्हार्‍यातल्या खंडोबाच्या मूर्तीवर आणि घरात सर्वत्र भंडारा उधळायचा. आरती करायची. अधूनमधून वारं यायचं, घुमायचं आणि शांत व्हायचं. पुढच्या वर्षी आई-वडिलांसोबत पुन्हा तीर्थयात्रेला गेलो. वारं अंगात यायला लागल्यानंतर जेजुरीला जाण्याची ही पहिलीच वेळ होती. जेजुरी जवळ येऊ लागली होती. बसमधून गडाच्या कमानी आणि जय मल्हार ही इलेक्ट्रॉनिक अक्षरं दिसू लागली तशी माझ्या मनात अस्वस्थता वाढू लागली. गडाच्या पायथ्याला पहिल्या पायरीजवळ जाऊन पोहोचलो आणि शरीराचा बेफाम भडका उडाला. हातातल्या पिशवीतला हळद-खोबर्‍याचा भंडारा पायरीवर उधळला आणि ‘येळकोट येळकोट जय मल्हार’ करत विजेच्या गतीनं वार्‍यानं मला अक्षरश: गडावर खेचत नेलं. वाटेत कुठंही न थांबता अवघ्या पाच ते दहा मिनिटांत मी गडाच्या मोकळ्या प्रांगणात पोहोचलोदेखील. सर्वसाधारणपणे चालत गडावर पोहोचण्यासाठी हेच अंतर कापायला पूर्वी किमान अर्धा तास सहज लागायचा. पहिल्याच पायरीवर सुरू झालेला प्रकार पाहून आईनं मला सांभाळण्यासाठी बसमधल्या तीन-चार माणसांना पाठवलं. माझ्या पापाठोपाठ तेही धावत सुटले होते. मात्र, त्यांच्या आणि माझ्या धावण्यात खूप अंतर पडलं होत. त्यांनी मला गाठायच्या आधीच मी गडावर पोहोचलो होतो. गडाच्या माथ्यावर पोहोचल्यावर कितीतरी वेळ एकटाच घुमत होतो. काही वेळानं आई-वडील पोहोचले. मला घेऊन ते गाभार्‍यात खंडोबाच्या मूर्तीसमोर घेऊन गेले. हातातला भंडारा खंडोबावर उधळला. आई मंदिरातल्या पुजार्‍याला या वार्‍याबाबत काहीतरी सांगू पाहत होती. त्यानं आईचं काहीही न ऐकता माझ्या हाताला धरून सरळ मला ढकलून दिलं. मी बाजूच्या भिंतीवर जाऊन आदळलो. आईचा पारा चढला. “स्वत:ला समजता काय?’’ म्हणत ती पुजार्‍यावर डाफरली. “अरे, याला ओळखतोस काय? खंडोबाचं वारं येत याच्यावर!’’ असं पुजार्‍याला सुनावलं. पुजार्‍यानं, 'अशी अनेक वारी पाहिली' म्हणत मला दोन-चार सणसणीत शिव्या हासडल्या. तसाच घुमत-घुमत मंदिराच्या प्रांगणात पितळी कासवापाशी आलो. वार्‍यानं पुन्हा शरीराला वेगवान फेर धरला. या वेगातच मंदिराला प्रदक्षिणा घातली. पुन्हा कासवापाशी येऊन थबकलो. यावेळची महत्त्वाची गोष्ट म्हणजे, प्रत्येक वेळेस जेजुरीत आईच्या अंगात येणार्‍या वार्‍याचा मात्र कोणताच मागमूस नव्हता. आई अत्यंत शांत होती. माझ्या अंगात आलेल्या वार्‍याला ‘कुडीचे हाल करू नकोस’ म्हणून ती बजावत होती. वार्‍याचा वेग हळूहळू मंदावत गेला. ते सहजपणे आईशी संवाद साधू लागलं. आमचा सध्याच्या, म्हणजे कणकवली आणि कुडाळजवळच्या मूळ गावासंबंधी, गावात असलेल्या कुलदैवताच्या आद्यस्थानाविषयी तिनं काही गोष्टी विचारून घेतल्या. “माझा या वार्‍यावर विश्वास असला, तरी माझी भावकी हे काही मानणार नाही,’’ असं आईनं वार्‍याला सांगितलं. वार्‍यानं, “तू तुझ्या कुटुंबापुरता विचार कर’’ म्हणत या वार्‍यासंबंधी काय काळजी घ्यायची वगैरे माहिती आईला दिली. गडावरून उतरतानाही विजेच्या चपळाईनं वार्‍यानं मला खाली खेचत नेलं. अवघ्या दहा मिनिटांत मी पहिल्या पायरीजवळ पोहोचलो होतो.

मुंबईला परतल्यानंतर माझे मोठे चुलते, ज्यांना आम्ही बाबा म्हणत असू, त्यांना, तसंच इतर चुलत भावांना आईनं या वार्‍यासंबंधी माहिती दिली. चुलत्यांना आणि भावांना माझ्या आणि आईच्या अंगात येणारं वारं बिलकूल पटत नव्हतं. त्यांच्या मते हा भुतानं झपाटल्याचा प्रकार होता. आमच्या घराण्यात फक्त आमच्या कुडाळजवळच्या मूळगावात असलेल्या भावकीच्या घरात परंपरेने पिढीजात एका कुटुंबात भवानीचं वारं येतं. ते वगळता सिंधुदुर्ग जिल्ह्यात सात गावांमध्ये विभागलेल्या आमच्या भावकीत दुसरं कुणावरही भवानीचं वारं येऊच शकत नाही, असा आमच्या भावकीचा दावा होता.

खंडोबाच्या वार्‍याविषयीची आख्यायिका थोडी वेगळी आहे. मूळगावात आमच्या भावकीचा भवानीचा गोंधळ होतो. या गोंधळाच्या ठिकाणी एक मजबूत लोखंडी साखळदंड बांधला जातो. ही साखळं मालवणला राहणार्‍या एका ठाकर कुटुंबाच्या घरातील ज्या व्यक्तीच्या अंगात खंडोबाचं वारं येते ती तोडते. अनेक पिढ्यांपासून ही परंपरा सुरू आहे. भवानी आणि खंडोबा ही आपली जोड कुलदैवतं असली तरी खंडोबांच वारं आपल्या भावकीत नाही. त्यामुळे माझ्या आणि आईच्या अंगी येणारं वारं हे सगळं थोतांड असल्याचं आमच्या भावकीचं कायमच मत राहिलं आहे. तरीही माझ्या वडिलाचं मन राखण्यासाठी, माझ्या अंगात येणार्‍या वार्‍याची शहानिशा करण्यासाठी माझे चुलते एके दिवशी आमच्या घरी आले. संध्याकाळी साडेसातची वेळ होती. देवीच्या मूर्तीसमोर उभा राहिलो. पाच मिनिटांतच वार्‍यानं शरीराचा ताबा घेतला. घरभर हळदीचा भंडारा उधळला. चुलत्यांच्या आणि वडिलांच्या कपाळाला लावला. माझ्या शरीराची सुरू असलेली ओढाताण वाहून चुलते वैतागले. त्यांनी वार्‍याला, “आधी कुडीक (म्हणजे मला) सोड’’ अशी विनंती केली. “माझो झिल अजून ल्हान हा. त्याचा लगीन होवचा हा. आमच्या घराण्यात असो देवबिवं कुणावर येवक् नाय,’’ असं सांगून पाहिलं. वारं काही ऐकेना. त्याला विचारलं, “तू कोण आसंस?’’ त्यानं उत्तर दिलं, “तुझ्या घरचा आकार.’’ आता मात्र चुलत्यांचं टाळकं चांगलचं सणकलं. “अंगात येताना येळकोट... येळकोट... करता आणि आता आकार म्हणून सांगता? हो काय प्रकार हा?’’ अशा शब्दांत त्यांनी आईला व वार्‍याला सुनावलं. (कोकणात आकार म्हणजे घराचा राखणार असे समजलं जातं.) आकाराच्या पलीकडे वारं काहीच उत्तरं देईना. चुलते वैतागले आणि ‘आंग सोड’ म्हणतं वार्‍यावर खेकसले. वार्‍यानं अंग सोडलं. चुलते जायला निघाले तेव्हा मला म्हणाले, “जरा माका बाहेर सोडूक चल रे.’’ त्यांच्यासोबत थोडं अंतर चालल्यानंतर त्यांनी वार्‍याबाबत काही नोंदविलेली निरीक्षण मला सांगू लागले. मला म्हणाले, “झिला तुझ्या अंगात येता तेव्हा तुका हलका हलका वाटता की जड जड?’’ मी म्हणालो, “जड.’’ “वारा निघून गेल्यावर तुझ्या पाठीत, मणक्यात दुखता काय रे?’’ मी म्हणालो, “होय. अंग दुखतं माझं.’’ त्यांनी जागच्या जागी तात्काळ निकाल लावून टाकला - “ह्या काय देवाचा वारा नाय. ह्या काय तरी भायलाभुतुला (बाहेरचं) असात.’’

मी एका ऑटोमोबाइल इंजिनीअरकडे नोकरी करत होतो तेव्हाची गोष्ट. संध्याकाळी सहा वाजता माझी शिफ्ट संपायची. त्या दिवशी थोडसं काम वाढल्यानं अर्धा तास जास्त वेळ ऑफिसात थांबलो होतो. या वेळेस न जाणो माझ्या मनाची चलबिचल सुरू झाली होती. घरी कुणी तरी माझी वाटं पाहतयं असं वाटायला लागलं.ऑफिसमधून घाईघाईनं निघालो. घरी पोहोचलो तेव्हा पाहिलं, तर माझा एक चुलत भाऊ घरी आला होता. मोरीत गेलो, हात-पाय धुतले आणि देव्हार्‍यासमोर उभा राहिलो. हळदीचा भंडारा हाती घेऊन भावाला माखून टाकलं. भवानीच्या मूर्तीकडे वळलो. मूर्तीकडे टक लावून पाहू लागलो. हळूहळू मूर्तीशी काही तरी हातवारे व्हायला लागले. एखादा माणूस दुसर्‍याशी भांडतो तसा मानेला झटके देत भवानीच्या मूर्तीशी भांडू लागलो. मधेच दात-ओठ चावणं वगैरे विचित्र प्रकार सुरू व्हायला लागले. हा भाऊ खूप साधाभोळा होता. मी मूर्तीशी भांडतोय हे पाहून खरंच हा देवाशी संवाद चाललाय, असा काहीसा त्याचा समज झाला होता.

एके दिवशी चुलत बहीण घरी आली होती. पुन्हा तोच एपिसोड. मूर्तीशी भांडण वगैरे... थोडा वेळ गेला आणि वार्‍यानं नूर बदलला. बहिणीकडे पाहून बोलू लागलं, “काय गो, तू माका वळखूक नाय?’’ वारं असं काही तरी बोलेलं याचा अंदाज नसल्याने ती गोंधळली. काय बोलावं तिला कळेना. ते कोडं वार्‍यानंच सोडवलं. “अगो, मी तुझो चुलतो. माझ्या दाजीचा चेडू ना तू?’’ खंडोबा म्हणवणार्‍या वार्‍याकडून आलेल्या या उत्तरानं आईदेखील चक्रावली. तिनं विचारलं, “हे काय मधेच? हा कुठला देव आला?’’ वार्‍यानं त्यावेळेस चक्क ‘मी नागोजी’ (म्हणजे माझे आजोबा. माझे वडील पाच-सात वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचा नागोजींचा मृत्यू झाला होता.) असल्याचं सांगितलं. जवळच असलेल्या सोफ्यात जाऊन हे वारं उकीडवं बसलं आणि “माका आता इडी फुकू ची हा’’ म्हणत त्यानं विडी मागितली. कुणी तरी झटकन टपरीवरून विड्या आणून दिल्या. वार्‍यानं मस्त झुरके मारत विडी ओढली. आयुष्यात विडी-सिगरेटच्या वासानेही दूर पळणारा मी; माझ्या या विडी ओढण्याच्या दृश्यानं वडील आणिक माझ्या बहिणीही अचंबित झाल्या.

वार्‍याची शहानिशा लावण्यासाठी आई एके वर्षी मला आमच्या मूळगावी घेऊन गेली. तिथं कुलदेवतेसमोर मोठ्या जोशानं वारं घुमू लागलं.आमच्या भावकीत ज्यांच्या अंगात भवानीचं वारं यायचं त्यानं माझ्या अंगात येणारं वारं म्हणजे भुताटकीचा तसंच आईच्या अंगात येणारं वारं म्हणजे भवानीच्या इतर बहिणींचा (देवीच्या इतर अवतारांपैकी) संचार असल्याचं सांगत आपलं कुलदैवत फक्त मूळगावातच वाढत असल्याचा निष्कर्ष काढला. आमच्या घरी अनेक वर्षांपासून नवरात्रीत घटस्थापना होते. अजूनही ही परंपरा सुरू आहे. यावेळी भवानीचा अष्टमीचा होम होतो. या होमाला आईसोबत माझ्या अंगी वारं यायचं. आईच्या वार्‍यासोबत हातात दिवटी घेऊन होमाभोवती नाचायचो.

जवळपास १९९३ ते २००५ अशी आयुष्यातील एकूण दहा ते बारा वर्षं या वार्‍याच्या फेर्‍यात अडकलो होतो. २००२पर्यंत आम्ही वडाळ्यात झोपडपट्टीतील घरात राहत होतो. झोपडपट्टीतील घरं म्हणजे सगळाच आव-जाव कारभार. घराची दारं सताडं उघडी. अंगात वारं आलं की आजूबाजूच्या बघ्यांची गर्दी व्हायची हा तमाशा बघायला. काही लोकांना हे देवाचं वारं असल्याचा विश्वास वाटायचा, तर काही लोक टिंगलटवाळी करायचे. या वार्‍याचा माझ्या खासगी जीवनात कोणताच त्रास होत नव्हता. नोकरी व्यवस्थित करत होतो. वारं अंगात येऊ लागल्यानंतर चार वर्षांनी १९९७मध्ये माझं लग्न झालं. वार्‍याचा वैवाहिक आयुष्यावरही कोणताच परिणाम झाला नाही. माझ्या पत्नीचीही काहीच तक्रार नव्हती. तिनं तिच्या माहेरच्या नातेवाइकांत असा अंगात येण्याचा प्रकार पाहिला नव्हता. त्यामुळे लग्नानंतर सुरुवातीचा काही काळ तिच्यासाठी आश्चर्याचा होता. नंतर तिला हे वारं प्रकरण अंगवळणी पडलं होतं. दरम्यानच्या काळात काही काळ बंद केलेला मांसाहार पुन्हा सुरू झाला होता. अधूनमधून बिअर वगैरे प्यायला सुरुवात झाली होती. त्याचा वार्‍याला काहीच त्रास होत नसल्याने मला थोडा धक्काच बसला होता. देवाला मांसाहार आणि दारू कशी काय चालते हे कोडं काही सुटत नव्हतं. बरं, देवाविषयी म्हणायचं तर मी काही खंडोबाचा भक्त वगैरे कधीच नव्हतो. कुलदैवत भवानीवर मात्र अढळ श्रद्धा होती. वारं येण्याच्या सुरूवातीच्या दिवसांत मांसाहार केला की कधी उलट्या व्हायच्या, कधी अस्वस्थ असल्यासारखं तर कधी आजारी पडल्यासारखं वाटण्याचे प्रकार सुरू होते. हे सर्व अचानक थांबल्यानं माझ्यासाठी हा बदल आश्चर्यकारक होता.

वारं येण्याच्या एक-दोन वर्षं आधी, १९९०पासून, मी नियमित वृत्तपत्रवाचनास सुरुवात केली होती. वाचल्यानंतर एखाद्या बातमीबाबत, लेखाबद्दल माझ्या मनात विचार घोळायचे. त्यासंबंधीची माझी प्रतिक्रिया संबंधित वृत्तपत्र, साप्तहिकाकडे पाठवायचो. वाचकांच्या पत्रव्यवहारात पत्र स्वरूपात ते प्रसिद्ध व्हायला लागलं. आपण काही तरी बरं लिहितोय, त्यामुळे हे छापलं जातंय, असा एक आत्मविश्वास त्यातून येत गेला.

हे तोडकंमोडकं लेखन सुरू असतानाही अंगात येण्याचा प्रकार सुरूच होता. या लेखनादरम्यान दादरच्या शिंदेवाडीत मराठी वृत्तपत्रलेखक संघात रवींद्र मालुसरे याच्याशी माझं मैत्र जुळलं. रवीमुळे पुस्तकांचा आणि व्याख्यानांचा छंद लागला. मुंबईत जिथं कुठं व्याख्यानमाला सुरू असेल, तिथं तो मला घेऊन जायचा. त्यामुळे साहित्य आणि आध्यात्मिक विषयावरच्या व्याख्यानाची गोडी लागली. श्याम मानव, नरेंद्र दाभोलकर यांची अंधश्रद्धेवरची तर धुंडामहाराज देगलुरकर, यशवंत पाठक, राम शेवाळकर, भा. पं. बहिरट, शंकर अभ्यंकर, जगन्नाथ महाराज पवार, विवेक घळसासी, सु. ग. शेवडे यांची आध्यात्मावरची अनेक व्याख्यानं यादरम्यान ऐकली. अंधश्रद्धा आणि शुद्ध अध्यात्म यांतला फरक कळू लागला. एके वर्षी प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचं स्वामी विवेकानंदांवर रुपारेल कॉलेजमध्ये व्याख्यान ऐकलं. विवेकानंद नावाची ताकद समजून घ्यायला हे व्याख्यान खूप महत्त्वाचं ठरलं. या व्याख्यानानंतर माहीमच्या कर्नाटक संघ हॉलच्या गल्लीतील एका सोसायटीत स्वामी रामकृष्ण परमहंस, शारदादेवी, विवेकानंद, भगिनी निवेदिता या विषयावर शिवाजीराव भोसले यांची तब्बल तीन दिवस व्याख्यानं ऐकली.

पुण्याला किसनमहाराज साखरे यांच्या घरी रवीसोबत गेलो होतो. महाराजांनी ‘मन’ या विषयावर तब्बल दीड तास निरूपण करून आमची मनं तृप्त केली. एमआयटीला विश्वनाथ कर्‍हाड यांनी ज्ञानेश्वरांवर रसाळ निरूपण केलं. त्यानंतर एक-दोन वर्षांतच डोंबिवलीत संत साहित्य संमेलन भरलं होतं. त्यालाही हजेरी लावली होती. या प्रत्येक व्याख्यानादरम्यान संत साहित्यावरची पुस्तकं खरेदी करत होतो. बहिरट, पाठक, देगुलरकर, ल. रा. पांगारकर यांची पुस्तकं वाचत होतो. त्यातला शुद्ध अध्यात्मचा संस्कार मनात रुजला जात होता. दादरला वनमाळी हॉलमध्ये, अमरहिंद मंडळाच्या व्याख्यानमालेत मानव व दाभोलकरांची ऐकलेली व्याख्यानं, त्यांतले विचार मनात खळबळ माजवू लागले. अंगात येणं कसं थोतांड आहे, यासंबंधी छबिलदास हायस्कूलमध्ये श्याम मानवांचे अनेक प्रयोग पाहिले. याच दरम्यान मुंबईतील जवळपास सगळ्या साहित्य कार्यक्रमांना आणि चर्चांना जाऊ लागलो होतो. या कार्यक्रमांत य. दि. फडके, कुमार केतकर आणि विजय तेंडुलकर यांच्या वेगवेगळ्या विषयांवरच्या भाषणांतला आधुनिक विचार मनावर खोलवर प्रभाव पाडू लागला. त्यांच्या विचारांची शास्त्रशुद्ध मांडणी मेंदूला विचार करण्यास भाग पाडत होती. विशेषत: तेंडुलकर व फडके मेंदू कुरतडत असतं. या निमित्तानं नव्या विचारांच्या पेरणीस सुरुवात झाली होती. मी आणि आई घरात देवाच्या नावानं जे काही करतो आहोत हा श्रद्धेच्या नावाखाली सुरू असलेला निव्वळ बाजार आहे, हे मनात ठसायला लागलं. व्याख्यानं ऐकली, पुस्तकं वाचली की काही काळ हा प्रभाव टिकून राहायचा. आईनं देव आणि वार्‍यासंबंधी काही माहिती सांगितली की हा प्रभाव ओसरायचा. श्रद्धा-अंधश्रद्धेच्या या पाठशिवणीच्या खेळातून अखेर बाहेर पडायचं, ही मानसिक प्रक्रिया मनात सुरू झाली होती.

वृत्तपत्रांतून, व्याख्यानांतून ‘अंगात येणं’ हा मानसिक आजार असून त्यासाठी मानसोपचारतज्ज्ञांचे उपचार घ्यावे लागत असल्याचं वाचलं होतं. एके दिवशी दादरला प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे यांना त्यांच्या क्लिनिकमध्ये जाऊन भेटलो. माझी केस त्यांना सांगितली. त्यांनी मेंदूत घडणारे रासायनिक बदल, सब-कॉन्शन्समध्ये मूळ धरून असलेल्या काही जुन्या आठवणी यांतून हे अंगात येणं किंवा हिस्टेरियासारखे प्रकार घडत असल्याचं सांगून, यावर ट्रिटमेंटची आवश्यकता असल्याचं नमूद केलं. हे उपचार आथिर्कदृष्ट्या मला परवडणारे नव्हते. त्यामुळे घरी आलो आणि कोणत्याही डॉक्टरची मदत न घेता स्वत:च यातून बाहेर पडायचं ठरवलं. अंगात वारं येतयं असू वाटू लागलं, की त्याला कोणताही प्रतिसाद द्यायचा नाही, असा निश्चय केला. त्यानंतर मंगळवारी, रविवारी वारं येण्याचा प्रकार हळूहळू कमी होत गेला. एके वर्षी सर्व कुटुंबासह जेजुरी आणि तुळजापूरला गेलो होतो.

जेजुरीचा गड चढण्याआधीच मनाशी पक्कं केलं होतं. पत्नीला म्हणालोदेखील, “माझ्या अंगात आता येणार नाही. आलं तरी ते धुडकावून देईन.’’ ही मात्रा चांगलीच लागू पडली. गडावरून खाली उतरेपर्यंत माझं अंग जरासंही थरारलं नाही. जेजुरीत येऊनही वारं आलं नाही, म्हटल्यावर माझा आत्मविश्वास चांगलाच दुणावला. त्यानंतर अनेकदा जेजुरीला गेलो, पण पुन्हा कधीच अंगात आलं नाही. माझ्यापुरतं तरी हे खंडोबा प्रकरण कायमच संपलं. अनेक वर्षांनंतर या वार्‍यासंबंधी आठवणींना उजाळा देतो तेव्हा जाणवतं, कसल्या भयंकर आजारातून आपण बाहेर आलोय. नशीब बलवत्तर म्हणून यातून अनेकदा जीवानिशी वाचलो आहे. जेजुरी, तुळजापुरात संबळ, हलगीचा आवाज कानावर पडला, की अंग आपसूकच डोलायला लागायंच. वारं अंग सोडायचं तेव्हा धाडदिशी शरीर फेकून द्यायचं. प्रचंड वेगानं मी दूरवर फेकला जायचो. घरी किती वेळा जमिनीवर कोसळलो असेन याचा हिशेब नाही. सगळ्यात भयंकर म्हणजे, जेजुरीत वार्‍याच्या अंगी तुफान ऊर्जा यायची. अंग सोडताना त्याच बेभानपणे शरीरापासून ते वेगळं होत गडावरच्या काळ्याकभिन्न दगडवर, पितळी कासवावर आदळायचं. कोसळल्यावर कधी अख्खं शरीर सुन्न पडायचं, तर कधी मेंदूकडून संवेदना नष्ट होतायंत अस वाटायचं. या अघोरी प्रकारांतून मी बाहेर पडलो. आता आईला बाहेर काढू असं ठरवलं. श्रद्धा आणि अंधश्रद्धेतला प्रकार आईला अनेकदा समजावून सांगितला. देवाच्या पाया पडणं, पूजा, आरती यात काहीच गैर नाही. मात्र, हे अंगात येणं वगैरे यातून तू बाहेर पडायला हवं, असं तिला सांगू लागलो. तिच्या मनात साचलेले वर्षानुवर्षाचे अंगात येण्याचे संस्कार तिला यातून बाहेर पडू देईनात. खूप चिवटपणे ते तिच्या आत खोलवर रुतून बसले होते. तिच्याशी माझे खूप कडाक्याचे वाद होऊ लागले - “तू हे देव मानणं सोडलसं म्हणून घरात आजारपणं वाढलं. कशातच यश नाही.’’ वगैरे युक्तिवाद ती करायची. माझं टाळकं सटकायचं. “देव ही आनंददायी संकल्पना आहे. देव कधीच कुणाचं वाईट करत नाही.’’ हे त्यावर माझं उत्तर होतं. “अंगात येणंबिणं सोडून तू ध्यान कर. त्यातून तुला मानसिक शांती मिळेल. हळूहळू अंगात येण्याचे प्रकार कमी होतील.’’ असं पोटतिडकीनं सांगायचो. टीव्हीवर दाभोलकरांची मुलाखत किंवा काही प्रबोधनाचा विचार असणारा कार्यकम वा चर्चा लागली, की टीव्हीचा आवाज मुद्दाम मोठा करायचो. श्रद्धा-अंधश्रद्धेसंबंधीचा माझा रोजचा ओरडा, आमची वाढणारी भांडणं याचा सकारामत्क परिणाम व्हायला लागला. आई समजुतदारपणे माझं ऐकू लागली. त्यानंतर एके दिवशी माझा मामा तिला पंढरपूरला घेऊन गेला. तिथं तिनं वारकरी पंथ स्वीकारला. माझी आई पूर्ण अशिक्षित आहे. मात्र, एकेक शब्द जोडून ती तोडकंमोडकं वाचण्याचा प्रयत्न करत होती. या वाचनाचा खूप मोठा फायदा झाला. पंढरीतून तिनं ज्ञानेश्वरी आणली होती. ती रोज सकाळी वाचू लागली. ज्ञानेश्वरीचं माधुर्य तिला कळू लागलं होतं. माझ्याकडे असलेली भगवद्गीता तिला वाचायला दिली. ज्ञानेश्वरीचे आणि गीतेचे पाठ रोज घरात होऊ लागले. तिचं आध्यामिक वाचन फळाला यायला लागलं. पूर्वी प्रत्येक पौर्णिमेस येणारं तिच्या अंगात येणारं वारं हळूहळू कमी झालं. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, २००२च्या सुमारास आम्ही वडाळ्याहून कांदिवलीला राहायला गेलो. तिचा गुरूमहाराजांचा भक्तिसंप्रदाय वडाळ्यातच राहिला. त्यामुळे तिची जेजुरी, तुळजापूरची वार्षिक तीर्थयात्रा बंद झाली होती. दुसरी गोष्ट म्हणजे, झोपडपट्टीतून चांगल्या वसाहतीत राहायला गेलो होतो. आसपास सुशिक्षित माणसांची वस्ती होती. इकडच्या लोकांना अंगात येण्याचा प्रकार आवडणार नाही. हे लोक आपल्या घराला देव-देवस्कीवाले, अंधश्रद्धाळू म्हणतील हे मी आईला पटवून देऊ शकलो. तिनंही ते मान्य केलं. रोजचं अंगात वारं यायचं कमी झालं. नवरात्रीत घटस्थापनेला आणि अष्टमीच्या होमाला वारं यायचं मात्र बंद झालं नाही.

आठवड्यातून एकदा येणारं वारं बंद झाल्यानं नवरात्रीत येणार्‍या वार्‍यास मीही आता विरोध करत नाही. गेल्या अनेक वर्षांत वारं यायचं आता बर्‍यापैकी बंद झालं असलं, तरी ते बंद झाल्याचा मानसिक आघात मात्र तिच्यावर प्रचंड झाला आहे. आजही ती अधूनमधून, माझं देवस्थानं तुझ्यामुळे बंद झाल्याचं दु:ख मला बोलून दाखवते. नको त्या खुळचट कल्पना बाळगण्यापेक्षा तिची चीडचीड, त्रागा सहन करणं इतकचं माझ्या हातात आहे. हे वारं म्हणजे तिचं जगणं होतं. वार्‍यामुळे तिच्याकडे अनेक लोक आपले अडलेनडले प्रश्न घेऊन यायचे. हळदी-कुंकवाचा शिक्का देऊन ती हे प्रश्न सोडवायची. तिच्या वार्‍यामुळे लोकांच्या समस्या सुटतात असा तिचा व येणार्‍या लोकांचा ठाम विश्वास होता.

असो. देवावर श्रद्धा असणं काही वाईट नाही. मात्र, श्रद्धेच्या नावाखाली चालणारं मानसिक, शारीरिक, आर्थिक शोषण हे कधीही घातकच. माझ्याबाबत तो प्रकार झाला नसला, तरी हे अंगात येण्याचं आणखी किती काळ चाललं असतं? त्यातून माझ्याकडून बुवाबाजी, फसवेगिरी झाली नसती, हे मला छातीठोकपणे सांगता येणार नाही. मात्र एक गोष्ट खरी, की विवेकाला फासावर लटकवून मी निघालो होतो. ज्या क्षणी माझा विवेक जागा झाला त्या क्षणी या अघोरी प्रकारातून बाहेर पडलो. त्याचं श्रेय आध्यात्मिक वाचन आणि दाभोलकरांच्या, मानवांच्या विवेकवादी विचाराला द्यायला हवं. त्यामुळे विचारांच्या कक्षा रुंदावल्या. अन्यथा काय झालं असतं या जगण्याचं? विचार मनात आला तरी भितीनं अंग थरारतं!

आपल्या कुळांचा उद्धार करून घेण्यासाठी गोंधळ, जागरण करून देवीचा आणि खंडोबाचा कुळाचार केला जातो. या कुळाचारादरम्यान दिवटी पेटवली जाते. ही दिवटी म्हणजे फक्त परंपरेचा अभिमान नव्हे, तर अज्ञानाचा अंधकार दूर सारून ज्ञानाचा प्रकाश तुमच्या आयुष्यात येवो, असा तिचा व्यापक अर्थ आहे. अंधश्रद्धेत डुचमळणार्‍या मला हा ज्ञानाचा विवेकाचा प्रकाश दिसला. सगळ्यांनाच तो दिसला तर विवेकाला फासावर लटकवण्याची वेळ येणार नाही!

***

पूर्वप्रसिद्धी - 'इत्यादी' दिवाळी २०१३

***

हा लेख मायबोली.कॉमवर पुनर्मुद्रित करण्यास अनुमती दिल्याबद्दल श्री. नितीन चव्हाण व श्री. आशीष पाटकर (मनोविकास प्रकाशन, पुणे) यांचे मन:पूर्वक आभार.

***
विषय: 
प्रकार: 

लिंबुटींबूजी, तत्परतेने दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद..
आपण ज्याला << मानसिक ताकद असणार्‍या व्यक्तिवर प्रभाव टाकणारी "बाह्य शक्ति" (दैवी/आसुरी) >> म्हणतां, त्यालाच जर मानसशास्त्रज्ञ << मेंदूत घडणारे रासायनिक बदल, सब-कॉन्शन्समध्ये मूळ धरून असलेल्या काही जुन्या आठवणी >> म्हणत असतील, तर हा तिढा कसा सोडवायचा:?
हा प्रकार समजून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न म्हणूनच कृपया या प्रश्नाकडे पहावे.

शिवाय, << इतर देशांतही असे प्रकार होतात का, >> ,.<< यावर ट्रिटमेंटची आवश्यकता असल्याचं नमूद केलं. हे उपचार आथिर्कदृष्ट्या मला परवडणारे नव्हते. >> याबद्दलचं तुतूहल शिल्लक आहेच !

मानसिक दुर्बलतेमुळे हे आजार होतात हे तर अगदीच मान्य आहे.
त्या संदर्भात काही वाद उद्भवण्याची शक्यता वाटत नाही.
मात्र मानसशास्त्रज्ञ म्हणतात म्हणून डोळे झाकून विश्वास ठेवणेही सुद्धा एकप्रकारची अंधश्रद्धा आहे असे वाटते.
प्रश्नांची पटतील अशी उत्तरे लोकांच्या समोर आली नाहीत तर अशिक्षित आणि शिकलेली लोकं पण गुढ विषय म्हणून तळ्यात-मळ्यात अशा वैचारीक अवस्थेत राहतील.
भाऊ, अतिमानवी शक्ती कुठून येते ह्यावर विज्ञान काय म्हणते हा प्रश्न पण आहे मनात.
(मी सुद्धा तटस्थतेने बघायचा प्रयत्न करतेय याकडे)

>>>>>>>> त्यालाच जर मानसशास्त्रज्ञ << मेंदूत घडणारे रासायनिक बदल, सब-कॉन्शन्समध्ये मूळ धरून असलेल्या काही जुन्या आठवणी >> म्हणत असतील, तर हा तिढा कसा सोडवायचा:? <<<<
भाऊ, तुम्ही नेमक्या रेषेत्/पद्धतीत विचारत आहात. Happy

व्यक्ति शरिराद्वारे एखादी कृती करते/वा शरिरावरील तिचा ताबा सुटतो, तेव्हा मेंदुत "रासायनिक बदल " होतात हे विज्ञानाचे म्हणणे अमान्य करण्याचे कारणच नाही. कारण मेंदू काहीतरी करतो म्हणुन हालचाली घडतात, तर मेंदू काय करतो/वा तिथे मेंदुमधे काय घडते याचे हे अल्पसे दर्शन विज्ञान सांगते. पण...

१) ते बदल फक्त रासयनिकच होतात का? इलेक्ट्रॉनिक संवेदनां/तत्सम काहीच होत नाही का?
२) बदल होण्यामागची नेमकी कारणे काय? विशिष्ट व्यक्तिमधेच का होतात/होत नाहीत ?
३) सब-कॉन्शस मध्ये, म्हणजे नेमके काय? मेंदूच्या विशिष्ट भागात्/पेशीत? काय स्वरुपात असतात या आठवणी? अनुभवास येते की अगदी गेल्या जन्मीच्या आठवणीदेखिल "जागृत" होतात, ते कसे काय? आईबाप व काळ पूर्णतः भिन्न असताना, "काय प्रत्यक्ष योजनेद्वारे" गतजन्मातील मृत व्यक्तिच्या (जिचे शरिर नाश पावलेले आहे) आठवणी नव्या आइबापांचे मुळे जन्माला आलेल्या व्यक्तिमध्ये दृगोच्चर होऊ लागतात? तिथे तर शरिर/अनुवंश/स्थळ्/काळ वगैरेंचा "डायरेक्ट " संबध असतच नाहीत, तर नव्या जन्मातील नव्या देहातील नव्याकोर्‍या मेंदुत "आठवणींचे" हे ट्रान्स्फर काय मार्गे होते? फक्त रासायनिक लोच्याने होते? इलेक्ट्रॉनिकली होते?
जोवर, केवळ पंचेंद्रियांना जाणवते/कळते तितकेच सत्य हा हेका सोडला जात नाहि, तोवर हा तिढा कायमच रहाणार.
असो.

>>>>> भाऊ, अतिमानवी शक्ती कुठून येते ह्यावर विज्ञान काय म्हणते हा प्रश्न पण आहे मनात. <<<<
एम्राल्ड, "अतिमानवि शक्ति" वगैरे काहि अस्तित्वातच नसते असे बर्‍याचश्या "विज्ञानवाद्यांचे" म्हणणे असते , तेव्हा ती येते कुठुन हा शोध घेण्याचे त्यांना कारणच नाही. थोतांड असा शिक्का मारला, वा मेंदुतील केमिकल लोचा असे ठरवले की (त्यांचे) काम भागते... Wink

भौतिक शास्त्राप्रमाणे प्रयोगशाळेत सिद्ध करण्यासारखे मानसशास्त्राचे निष्कर्ष बव्हंशी नसतात व त्यामुळे त्यांत संदिग्धता असणारच ; व त्याचमुळे, त्या निष्कर्षाना सुचवलेले पर्याय सर्वस्वी बाद समजणे अयोग्य , हे मान्य. पण सुचवलेले पर्यायही त्याच कारणामुळे सर्वस्वी ग्राह्यही समजतां येत नाहीत , हा खरा तिढा असावा,

आपण ३] इथें मांडलेल्या प्रश्नाचं उत्तर कदाचित 'डीएनए' या संकल्पनेत दडलेलं असावं. माझ्या मित्राच्या कुटूंबातील ३ सख्खे भाऊ 'किडनी डिसऑर्डर'मुळे अकालीं निधन पावले. 'डीएनए'चा दाखला देत त्या कुटूंबातील सर्वाना याबाबत सावध रहाण्याचा सल्ला डॉक्टरानी दिला. जर इतर शारिरीक गुणधर्म पिढ्यान पिढ्या अशा तर्‍हेने वंशपरंपरागत चालत असतील, तर मेंदूच त्याला अपवाद असेल का, हाही प्रश्न आहेच. [ माझं याबाबतींतल ज्ञान = शून्य !]

भाऊ, डीएनए ची संकल्पना मान्य. पण पूर्वजन्मीच्या स्मृतीच्या काही उदाहरणामध्ये देश/काल यांच्या सीमा पार केलेल्या आढळतात, जिथे गेल्या पन्नास पिढ्या डीएनए एकच येण्याचे काही कारण दिसत नाही.

त्याचबरोबर, भविष्यकालिन घटना /बाबी जशाच्या तशा दिसण्यामध्ये "पूर्वस्मृतीचा" भाग काय असणार?
माझ्या अनुभवात मला पडलेली पाच/सहा स्वप्ने जी सहा महिने ते दहा वर्षांच्या काळात प्रत्यक्षात दिसली, तिथे मी कोणत्या "पूर्वस्मृतींचा" संदर्भ देणार? ठिकाणांबाबत एकवेळ कदाचितच देऊ शकु . पण घटनांचे काय? हात स्फोटात भाजला, तो स्फोट मी सव्वा वर्ष आधी स्वप्नात पाहिला होता, खांद्याला बसलेला दणका वेदना, स्फोटाच्या उजेडाने डोळे दिपणे इत्यादी अनुभवुन जागा झालो होतो, व तशीच घटना घडली. केवळ सांख्यिकी आधारावर मोजदाद करीत वा सांगणारा (इथे मी) खोटे बोलतो आहे असे गृहित धरीत अशा घटनांची "योगायोग" म्हणुन वासलात लावणेही योग्य आहे का?
असो.

हे विषय गहन व गुढ आहेत, जितके खोलात जाऊ, तितका वैचारिक गोंधळ अधिक वाढतो. (गोंधळ वाढतो म्हणजे मेंदुत केमिकल लोचा होतो हो.. Proud )

गेले दोन दिवस लेख वाचतेय. पण वाचन अजून पूर्ण होत नाहीये Sad
खरंतर सलग एका बैठकीत वाचायला हवा असा आहे लेख.

लेखकाचा प्रवास प्रेरणादायी!
चर्चा ही उद्बोधक!
सगळ्या 'वार्‍यांना' सरसकट मानसिक आजार म्हणणे आणि आजार असताना दुर्लक्ष करणे...दोन्ही चुकीचे असे काहिसे चर्चे वरुन कळतेय..:)

लिंबूटिंबू Happy
मला अतीमानवी शक्ती म्हणजे सुपरनॅचरल पावर अस नव्ह्त म्हणायच.
इतर वेळी सर्वसाधारण असणारी व्यक्तीने अचानक अवघ्या५-१० मिनिटांत जेजुरी चढणे-उतरणे यासंदर्भात मी हा शब्द वापरला
विज्ञानाच्या चौकटीत राहून याचं स्पष्टिकरण काय आहे?

निरा, तुम्हाला जे काही कळतेय ते चुकीचे कळतेय.
चुकीची चर्चा वाचून , चुकीचा निष्कर्ष लक्षात घेऊ नका.
कारण वर चर्चा करणारे मानसशास्त्रज्ञ किंवा डॉक्टर तर नाहीतच पण वारेतज्ज्ञ पण नाहीत आणि अध्यात्मिक गुरुही नाहीत.

Wink

काही हरकत नाही अमितव!
प्रत्येकाला काहिही वाटायचा अधिकार आहे.
Happy

इतर वेळी सर्वसाधारण असणारी व्यक्तीने अचानक अवघ्या५-१० मिनिटांत जेजुरी चढणे-उतरणे यासंदर्भात मी हा शब्द वापरला
विज्ञानाच्या चौकटीत राहून याचं स्पष्टिकरण काय आहे >>
एस्क्ट्रीम स्पोर्ट्स / अ‍ॅडव्हेंचर स्पोर्ट्स ( माउंटन बाइकिंग, स्किइंग, सर्फिंग) यात भाग घेणार्‍या लोकांनी असे सिमिलर अनुभव नोंदवले आहेत - उदा योसेमिटी पार्क मधे रेकॉर्ड ब्रेकिंग वेळात शिखरावर पोचणे.

प्रोफेसर Mihaly Csikszentmihalyi यांनी फ्लो स्टेट असे नाव देऊन या प्रकारच्या अनुभवांवर बराच रीसर्च आणि लिखाण केलेलं आहे .

विषयाला सोडून बोलल्यास चर्चा कोणत्या रोखाने पुढे सरकणार याचा अंदाज येणे अवघड नाही.
देव, धर्म, बाहेरची बाधा इत्यादी गोष्टींवर विश्वास असणार्यांनी आपली मते मांडली .ती चुक असतील तर का चुक आहेत यावर चर्चा झाली तर फायदाच होइल.अंधश्रद्धा दूर करणे हा प्रामाणिक उद्देश लक्षात घेउन या प्रश्नांना विज्ञानधिष्टीत उत्तरे मिळावित ही अपेक्षा.
मानसोपचारतज्ञ, डॉक्टर किंवा जाणकार मंडळीनी यावर प्रकाश टाकावा ही विनंती.

मेधा,धन्यवाद अधिक माहिती साठी.

मी असे पाहिले आहे कह, काही ना काही कारणाने त्रस्त असलेली लोकं अशी अंगात येणे वगैरे प्रकार चालु करतात. परिस्थिती सुधारली की आपोआप हे सर्व बंद होते. मानसिक अस्वास्थ्य हेच कारण आहे अंगात येण्याचे. सरळपणे व्यक्त होता येत नसेल की असे आडमार्ग जवळ्चे वाटतात.

खूप छान लेख आहे. लेखकाचे कौतुक वाटले. कुठल्याही मदतीशिवाय केवळ मानसिक तयारीवर तो यातून बाहेर पडला आणि आपला अनुभव जाहिरपणे मांडावासा वाटला.

अंगात येणे ही एक मानसिक विकृती आहे असे म्हणायचे नसल्यास ती एक मनोशारिरिक अवस्था आहे असे म्हणा. विकृती शब्दाला एक काळी किनार आहे. खरतर विकृती ही प्रकृतीच असते फक्त ती समाजाला / वि़ज्ञानाला मान्य नसते. असाधारण प्रकृती म्हणू यात त्याला.
काय लेमनटेमनजी आपल काय म्हण्ण आहे?

>>> काय लेमनटेमनजी आपल काय म्हण्ण आहे? <<<
मनोवस्थेवर परिणाम करणार्‍या/करु शकणार्‍या बाह्य/अतिंद्रिय ताकदींचे अस्तित्वच जर विज्ञानाला मान्य नसेल, वा त्या दृष्टीने संशोधन राहुदेच, विचारही होत नसेल, तर अंगात येणे ही मानसिक विकृती की प्रकृती या म्हणण्याला अर्थच नाही. काहिही म्हणा... किंवा सरसकट अंगात येणार्‍या "हजारों/लाखोंना" आधीच मानसिक विकृत ठरवुन झालेच्च आहे, त्या आधारा वरुन कायदे पण निघालेत म्हणे.... !
मग मी पामर यावर काय बोलणार बोवा?

त्यातुन मी काय चर्चा करणारा मानसशास्त्रज्ञ किंवा डॉक्टर तर नाहीच पण वारेतज्ज्ञ पण नाही आणि अध्यात्मिक गुरुही नाही, कारण अभ्यासक्रमामार्फत तशा अर्थाची "सर्टिफिकीटे" मिळण्याची ये देशी सोयच्च नाही ना ! Wink

>>मनोवस्थेवर परिणाम करणार्‍या/करु शकणार्‍या बाह्य/अतिंद्रिय ताकदींचे अस्तित्वच जर विज्ञानाला मान्य नसेल, वा त्या दृष्टीने संशोधन राहुदेच, विचारही होत नसेल, तर अंगात येणे ही मानसिक विकृती की प्रकृती या म्हणण्याला अर्थच नाह<<
खर तर शास्त्रज्ञ या भूमिकेत अशा अस्तित्वाच्या शक्यता पूर्ण बाद करता येत नाहीत.
खरा शास्त्रज्ञ नकाराज्ञ नसतो याचा मला उमगलेला अर्थ असा कि तो सर्व शक्यतांचा विचार करतो. एखादी गोष्ट आपल्याला आज पटत नसेल तरी ती उद्या पटणारच नाही असा दुराग्रह तो बाळगत नाही. एखाद्या गोष्टीची शक्यता खूप कमी असली तरी ती गोष्ट अशक्यच आहे असे तो मानत नाही. तो कोणत्याही गोष्टी ला कायमस्वरुपी ठामपणे नकार देत नाही. जी गोष्ट माझ्या दृष्टीकोनात बसत नाही तो वैज्ञानिक दृष्टीकोनच नव्हे असे तो मानत नाही. एखादी गोष्ट मला आज पटत नाही म्हणून ती त्याज्य आहे असे तो मानीत नाही. तो विनम्र असतो.
हे मी अन्यत्र मांडले आहेच. हल्ली कॉपी पेस्ट करतो .

>>> खर तर शास्त्रज्ञ या भूमिकेत अशा अस्तित्वाच्या शक्यता पूर्ण बाद करता येत नाहीत. <<<<
अगदी बरोबर विवेचन प्रकाशराव.
दुर्दैवाने "भारतात", त्याहुन खास करुन महाराष्ट्रात अशा विचारांच्या शास्त्रज्ञ/शास्त्रज्ञसमान संशोधक/चिकित्सक व्यक्तिंची अतिशय कमतरता आहे. जे आहेत ते "धर्माला अफुची गोळी मानणार्‍यातले आहेत", तेच बहुसंख्येने मिडियातही आहेत, म्हणून तोच आवाज जरा जास्त मोठा चालतो.
याव्यतिरिक्तही कोणी असतीलच तर ते अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले असे व इतर व्यक्ति कशा मानसशास्त्रज्ञ किंवा डॉक्टर किंवा वारेतज्ज्ञ किंवा अध्यात्मिक गुरुही नाहीत याचे घरबसल्या/हापिसबसल्या/दुकानबसल्या जागेवरुन मनोराज्यात्मक परिक्षण करुन नि:ष्कर्ष काढणारे आहेत Proud
असो.

पण प्रकाशराव, एक मान्य करावेच लागते, की अंगात येणारे सगळेच "खरोखरचे (?)" अंगात आलेले असतातच असे नाही, माझ्या अनुभवात लोकांच्या "श्रद्धेचा" स्वार्थी गैरफायदा घेत लोकांच्या श्रद्धेला अंतिमतः "अंधश्रद्धा" ठरण्यास भाग पाडू शकणारे, हुकमीरित्या "अंगात वारे आणणारेहि" बहुसंख्येने आहेत, इतकेच नव्हे तर कौटुंबीक अस्वास्थ्य/अशांतता/स्वमहत्व वाढवणे/सूड घेणे इत्यादी अनेक कारणांनी "वारे येण्याचा" कृत्रिम प्रयोग करणारेही आहेत.
मराठी भाषेमधे "उन्मादीत" अवस्था वा उन्मन असा काही शब्द प्रयोग आहे. ही अवस्था कोणाचीही, कोणत्याही प्रत्यक्ष /अप्रत्यक्ष कारणाने होऊ शकते. अगदी गाण्याची ओळ, एखादी सुंदरी दिसणे/स्पर्ष/तशी कल्पना मनोराज्ये करणे/ एखादे रौद्र भयचकित करणारे दृष्य पाहणे वा काहीही.... असे काही जे मनाच्या विविध "मुड्सपैकी" कोणत्याही एका मुडला अतिरेकी पद्धतीने ट्रीगर आऊट करुन अत्युच्च्य पातळीवर नेते. अशी उन्मादित अवस्था ही इतरांना "अंगात वारे येण्यासमच" वा "समाधीसम" भासू शकते असे मला वाटते.

बाह्य अतिंद्रिय ताकदींमुळे आलेली अवस्था व वर वर्णन केलेल्या अवस्था यात नक्कीच फरक आहे, पण प्रत्यक्षात सरमिसळ झाल्याने सुक्याबरोबर ओलेही धोपटले जाते/जाळले जाते.
असो.

हे फ़ारच अवांतर झाले पण मला लिहावेसे वाटले. असंयुक्तिक असेल तर काढुन टाकेन.
----------
साती... तुमचे ही पटले.
प्रकाश घा. व लिं टीं यांचे ही..
असे का? तर बालपणातील काही आठवणी कारणीभुत आहेत.
१) घागरी फ़ुंकणे या कार्यक्रमात माझ्या आईला थेट विचारले...त्या 'काकुंच्या' अंगात येते तसे तुला पण येते का? आणि नसेल तर का नाही?
उत्तर असे होते- 'ते जे' असते ते भारवलेपण असते. आजुबाजुच्या वातवरणाने आणि आपल्य मनाच्या गुंतले पणावर तसे वाटते. नकळत आपण घुमतो. मला होत नाही कारण मी मनाने इतकी 'हल्लक' नाहिये. हल्लक म्हणजे- अतीहळवे पणा, देवभोळेपणा
२) गाणगापुरला तर खांब चढतात मग इतकी शक्ती कुठुन येते- तो उन्माद असतो. एखादा किरकोळ मुलगा रागाच्या भरात शक्तिमान मुलाला बदडु शकतो 'थोड्यावेळ तरी'...तोच हा उन्माद.
प्रत्येकाचे 'व्यक्त' होणे हे त्याच्या मन:शक्तिवर अवलंबुन आहे.
३) मग 'त्या' काकुनां स्वामींचा वरदहस्त आहे... हे कसे तुला पटते- जसे जन्मताना. आपण आपापल्या जेनेटिक्स प्रमाणे काही गुण अवगुण घेउन येतो तसेच काही शक्ती ही आणतो. कोणाला शार्प रंगज्ञान असते, कोणाल गंधज्ञान असते. तसेच हे. अभ्यासाने ते वाढते. जे नजरेल दिसते, जाणवते त्या पलीकडे जे असते ते काहीन्ना जाणवते/कळते. त्याला अतिंद्रीय म्हणतात काही देव म्हणतात काही भुत म्हणतात. आपण देवच मानायचे.
या सगळ्याच उपयोग जर कोणाच्या चांगल्या साठी असेल तर आहे वरदहस्त.
पण त्याचा बाजार झाला तर ते थोतांडच आहे.
हा प्रश्न का तर 'त्या' काकु उच्चशिक्षित व बुद्धिवादी की काय आणि श्रद्दाळु आहेत.
------
अशी सरमिसळ असुनही.. माझे हे मत नक्की आहे की... हा मनोविकारच आहे. फ़क्त व्यक्त होणे हे ज्याच्या त्याच्यावर अवलंबुन आहे.
MSc. च्या थेसीस साठी सायकट्रिक ओपीडी मधे जावुन जावुन यावर शिक्कामोर्तब झाले.
(आणि मी सश्रद्ध ही आहे. अतिंद्रीय जे काही आहे ते देव अर्थात निसर्ग आहे असे मला वाटते.)

निरा व या धाग्यावरील सर्वांसाठीच मनोविकारांचा मागोवा हे डॉ श्रीकांत जोशी यांचे पुस्तक जरुर वाचावे. मनोविकारांवर सुंदर भाष्य करणारे उत्तम पुस्तक आहे.
औषधं उतारे आणि आशीर्वाद
हे पुस्तक देखील वाचावे.मनोविकारांचा मागोवा हे उत्तम पुस्तक लिहिणारे मानसोपचार तज्ञ डॉ श्रीकांत जोशी यांनी ते अनुवादित केल होत. मूळ पुस्तक Mystics, Shamans and Doctors डॊ सुधीर कक्कर यांच

अतिशय ओघवत्या भाषेतला हा लेख आहे. वाचायला सुरवात केल्यापासून संपल्यावरच थांबलो ! लिखाणातला प्रामाणिकपणा खूप खूप आवडला. कदाचित त्यामुळेच लिखाण वाचनीय झाले. "अंगात येणे म्हणजे मानसिक दुबळेपणाचा परिणाम यापलीकडे काही नाही" असा निष्कर्ष कैक वर्षपूर्वी काढून बसलेला मी. मला भूतखेत, भानामती, अंगात येणे इत्यादी वरचे गंभीर लिखाण वाचायची खरेच इच्छा होत नाही. पण तरीही हे मी वाचत गेलो ते केवळ लिखाण शैली मुळे.

आपण ज्या वातावरणात लहानपणी वाढतो त्याचा आपल्या मेंदूवर अत्यंत खोल परिणाम झालेला असतो. अगदी टोकाचे उदाहरण द्यायचे तर जंगली मुलांचे (Feral Kids) देता येईल. इच्छुकांनी हा लेख जरूर वाचावा. (सूचना: तुम्ही अतिशय संवेदनशील असाल, विशेषकरून लहान मुलांविषयी, तर तो लेख वाचू नका). पण तो पूर्ण स्वतंत्र व अतिशय गहन विषय असल्याने त्यावर इथे जास्त लिहिण्याचा मोह मी टाळत आहे. फारतर त्यावर वेगळा धागा काढून चर्चा करता येईल. इथे संदर्भ फक्त अशासाठी दिला कि आपण सारेच या परिणामाचे लहानपणीच शिकार झालेले असतो. आपल्या प्रत्येकावर लहानपणी त्या त्या वातावरणाचे खोल संस्कार रुजलेले आहेत. तसेच लेखकावर पण त्या वातारणात वाढल्याने आयुष्यातील महत्वाच्या अशा ऐन तारुण्यापासून पुढे अनेक वर्षे तो अंगात येणे वगैरे ह्या प्रभावाखाली राहिला.

पण या लेखातील एका उल्लेखाकडे सर्वांचे दुर्लक्ष झाले आहे असे मला वाटते.

आई मंदिरातल्या पुजार्‍याला या वार्‍याबाबत काहीतरी सांगू पाहत होती. त्यानं आईचं काहीही न ऐकता माझ्या हाताला धरून सरळ मला ढकलून दिलं. मी बाजूच्या भिंतीवर जाऊन आदळलो. आईचा पारा चढला. “स्वत:ला समजता काय?’’ म्हणत ती पुजार्‍यावर डाफरली. “अरे, याला ओळखतोस काय? खंडोबाचं वारं येत याच्यावर!’’ असं पुजार्‍याला सुनावलं. पुजार्‍यानं, 'अशी अनेक वारी पाहिली' म्हणत मला दोन-चार सणसणीत शिव्या हासडल्या.

ही माझ्या दृष्टीने खूप महत्वाची नोंद आहे. स्वत: पुजाऱ्यानेच अंगात येणे याची त्याच्या लेखी (देवीचा पुजारी असूनही) काय किंमत आहे याची स्पष्ट कल्पना दिली होती. इथेच खरे तर लेखकाला अंगात येणे याचा देवाशी कोणताही संबंध नसतो याची जाणीव होणे अपेक्षित होते. पण तसे झालेले दिसत नाही याचे आश्चर्य वाटले. आणि त्याला यातून बाहेर येण्यासाठी पुढे अनेक वर्षांची वाट पहावी लागली.

असो. पण असे लेख वाचल्यानंतर दाभोळकरादी विचारवंतानी अशी कित्येक आयुष्ये राखरांगोळी होण्यापासून वाचवली असतील याची तीव्रतेने जाणीव होते आणि म्हणूनच या लोकोत्तर महापुरुषांचे महानत्व अजून जास्तच अधोरेखित होते. चांगला लेख शेअर केल्याबद्दल धागाकर्त्याचे मनापासून आभार Happy

<< चुकीची चर्चा वाचून , चुकीचा निष्कर्ष लक्षात घेऊ नका.कारण वर चर्चा करणारे मानसशास्त्रज्ञ किंवा डॉक्टर तर नाहीतच पण वारेतज्ज्ञ पण नाहीत आणि अध्यात्मिक गुरुही नाहीत.>> सातीजी, हें वाचून या चर्चेत सहभागी झालेल्याना तीव्रतेने आपल्याच ' ह्या छोट्या मोठ्या अपमानांचं काय करावे ? ' या कवितेची तीव्रतेने आठवण झाली असावी ! Wink

<< चुकीची चर्चा वाचून , चुकीचा निष्कर्ष लक्षात घेऊ नका.कारण वर चर्चा करणारे मानसशास्त्रज्ञ किंवा डॉक्टर तर नाहीतच पण वारेतज्ज्ञ पण नाहीत आणि अध्यात्मिक गुरुही नाहीत.>> >>> सातीजी, हें वाचून या चर्चेत सहभागी झालेल्याना तीव्रतेने आपल्याच ' ह्या छोट्या मोठ्या अपमानांचं काय करावे ? ' या कवितेची तीव्रतेने आठवण झाली असावी ! डोळा मारा <<<< Lol

भाऊ, स्त्रीआयडींना असे खिंडीत नै पकडू बोवा, थोडं तरी स्त्रीदाक्षिण्य दाखवावे म्हणतो मी ! Proud

Pages