पाजीराव भन्साळी (Bajirao Mastani Movie - Not a Review !)

Submitted by रसप on 26 April, 2016 - 03:15

बहुचर्चित, बहुपुरस्कृत 'बाजीराव मस्तानी' परवा कुठल्याश्या वाहिनीवर लागला होता.
'बाजीराव मस्तानी' आणि 'दिलवाले' एकाच दिवशी प्रदर्शित झाले होते. त्यामुळे दोनपैकी एकच पाहायला जमणार होतं. प्रदर्शनाच्या एक आठवडाआधीच मी त्यावेळी 'दै. मी मराठी लाईव्ह'साठी लिहित असलेलं काम स्थगित करायचा निर्णय घेतला होता आणि तसं संबंधितांना कळवलंही होतं. पण मग त्यांनी मला एक शेवटचा चित्रपट 'कव्हर' करायला सांगितलं. मी 'दिलवाले' निवडला. कारण त्या काळात जितका रणवीर डोक्यात जात होता तितका शाहरुख जात नव्हता ! Eventually, 'मी मराठी लाईव्ह'ने मला 'राहू द्या' सांगितल्याने, 'दिलवाले'सुद्धा उगाच पाहिला गेला.
तर सांगायचा उद्देश हा की 'बाजीराव मस्तानी' तेव्हा टाळला नव्हता, त्यामुळे आत्ता जर फुकट पाहायला मिळणार होता तर का न पाहावा ? वेळ होता, पाहिला.
'दिलवाले' हा एक गरीब चित्रपट असेल, तर 'बाजीराव मस्तानी' दळभद्री म्हणावा, ह्या मताला मी आलो आणि शेवटचा अर्धा तास उरलेला असताना माझा संयम संपला. मी टीव्ही बंद केला.

bajirao.jpg

'बाजीराव मस्तानी'ची अनेक परीक्षणं येऊन गेली आहेत. आता इतक्या दिवसांनंतर मी परीक्षण लिहिणं तसं निरर्थकच. त्यामुळे काही टिपिकल लिहित नाही. थोडेसे, जसे आठवताहेत तसे मुद्दे मांडतो. हे लहान-मोठे किस्से समजा. जे मला जाणवलं ते सांगतो.

१. भन्साळीचा चित्रपट म्हणजे भव्यतेची साक्षात व्याख्या असते. हम दिल दे चुके सनम, देवदास आणि अगदी गुजारीशमध्येही त्याने दाखवलेली भव्यता लक्षात राहणारी होती. त्यातून 'बा.म.' ऐतिहासिक चित्रपट. मग तर मोठमोठे सेट्स, भव्यता, श्रीमंती वगैरे दाखवायला आयतंच निमित्त होतं. पण सावरिया आणि राम-लीला मधले पूर्णपणे खोटे समजून येणारे सुमार सेट्स आठवले. सेट्समधली कृत्रिमता, खोटेपणा ठळकपणे जाणवत होता. गड, किल्ले, महाल, खोल्या, झाडं, पाणी, नदी, पाऊस काही म्हणता काहीही थोडंसुद्धा खरं वाटत नाही, इतकं गंडलं आहे. अत्यंत वाईट प्रकारे केलेली प्रकाशयोजना ह्यासाठी जबाबदार आहे की अजून काही, मला माहित नाही. पण जो काही End result आहे, तो शुद्ध बकवास आहे.

२. ऐतिहासिक चित्रपट म्हणजे वजनदार संवाद आले पाहिजेत. त्यांची तितकीच जबरदस्त फेकही आली पाहिजे. कसलं काय ! इथे तर सगळंच 'फेक' (Fake) ! 'बाजीराव ने मस्तानी से प्यार किया है, अय्याशी नही' हा सुमार डायलॉग संवादलेखनाची सर्वोच्च पातळी आहे. अत्यंत बाष्कळ, पोकळ, निरर्थक, सपक संवादांची तितकीच अभिनिवेशशून्य फेक 'अथ'पासून 'इति'पर्यंत ('इति' मी पाहिला नाही, पण बहुतांश पाहिला) आहे. 'पेशवीण पद म्हणजे आमराई' असे अनेक अत्यंत हास्यास्पद डायलॉग्स आपल्यावर आदळत राहतात. एका प्रसंगात काशीबाई उखाणा घेतात. त्यात 'कोहिनूर - हैं नूर' अशी यमकायमकी आहे. ह्यातला तांत्रिक दोष आज कुणालाही कळणार नाही आणि कळला तरी तो किरकोळच वाटेल. पण त्या काळात लोकांची काव्याची जाण इतकी भिकारडी नव्हती. असं सगळं ऐकता, पाहताना हसताही येत नाही. कीव येते लिहिणाऱ्याची.

३. त्याहून जास्त कीव येते गाणी लिहिणाऱ्याची. 'कडक तडक भडक झाली, चटक मटक वटक झाली, दुश्मन की देखो जो वाट लावली' (इथे 'झाली' आहे की 'साली'?) हे बाजीरावाचं शौर्यगान आहे. ह्यात वीररस असणं अपेक्षित होतं. ह्या निरर्थक आणि मवाली छाप शब्दांत कोणता रस आहे, माहित नाही. पण वीररसपूर्ण लिखाणाची ही जर सीमा असेल, तर त्या सीमेवरून गीतकाराने परत फिरूच नये. तसंच पुढे जात राहावं आणि आयुष्यात इतर सर्वांना क्षमा करावं.

४. बाजीराव, काशीबाई आणि मस्तानी. ह्या तिन्ही मुख्य व्यक्तिरेखा समस्त चित्रपट युनिटमधील कुणाला तरी समजल्या असाव्यात का, अशी शंका येते.
बाजीराव हा एक हाडाचा योद्धा होता. महावीर होता तो. भारताच्याच काय, जगाच्या इतिहासातील सर्वोत्तम योद्ध्यांपैकी एक बाजीराव होता. त्याचं मस्तानीसोबतचं प्रकरण हा एक वेगळा भाग आहे. पण त्यापायी तो वेडगळ झालेला दाखवायचं ? एक कर्तव्यदक्ष राजा (प्रधान) असलेला तो शेवटी शेवटी अगदी बिथरलेला दाखवला आहे. त्याची ती मनस्थिती सादर करतानाचा रणवीर सिंगचा अभिनय तर हास्यास्पदच वाटला. तो सतत दारूच्या नशेत बरळल्यासारखा बोलताना दिसतो. (की तसंच दाखवलंय, कळलं नाही.)
काशीबाई एक घरंदाज स्त्री होती की पोरगेलेशी, हाही मुद्दा बाजूला ठेवू. पण बाजीरावाच्या निजामाशी वाटाघाटी सफल ठरल्या, ही बातमी जेव्हा चिमाजी घेऊन येतो, तेव्हा ती ऐकून अत्यानंदाने ती टुण्णकन् उडी मारुन सासूबाईंच्या मांडीत जाऊन बसते, हे दृश्य पाहून तर माझ्या डोळ्यांचे पारणे फिटले. तसंच बाजीरावाचा शिरटोप वगैरे घालून 'हर हर महादेव' ओरडून त्याच्याभोवती नाचणं बागडणं म्हणजे थिल्लरपणा होता.
दुसरीकडे मस्तानी. दीपिकाच्या चेहऱ्यावर मस्तानी सादर करताना कायमस्वरूपी बारा वाजलेले आहेत. ती गोरी वगैरे न दिसता चक्क 'पांढरी' दिसते. रोगट वाटते. मस्तानी जर अशी हाडाडलेली, कुपोषित, निस्तेज होती तर आम्ही इतकी वर्षं तिचं भलतंच काही तरी वर्णन वाचत आलो आहोत. 'बाजीराव म्हणून रणवीर' आणि 'काशीबाई म्हणून प्रियांका' ह्यापेक्षा 'मस्तानी म्हणून दीपिका' हे कास्टिंग सपशेल फसलेलं आहे. दीपिका सुंदर आहे. पण तिच्या सौंदर्यात दैवीपणाची झाक नाही. मस्तानीसाठी तीच अत्यावश्यक होती.

५. भन्साळीचा अभ्यास (केला असल्यास) अगदीच अपुरा पडला आहे. ना त्याला पेशवे, मराठाकालीन, महाराष्ट्रीयन, मराठी संस्कृती समजली आहे ना व्यक्तिरेखा. महालांचे सेट्स मुघलांचेच वाटतात. कुठे तरी एक गणेश वंदना असणं अत्यंत गरजेचं होतं, इतकी साधी बाब लक्षात आलेली नाही. 'कट्यार' मध्ये 'सूर निरागस हो'नेच एक माहोल बनवला जातो. तो 'बा.म.' मध्ये बनतच नाही.
'बा.म.' ही कुठली शौर्यगाथा किंवा कुणा व्यक्तीवर आधारित चित्रपट (Not exactly Biopic) नाही. ही प्रेमकहाणी आहे आणि आपल्या कुवतीवर अचूक विश्वास ठेवत भन्साळीने ही कहाणी 'प्रेम कहाणी'च्या पुढे जाऊ दिलेली नाही. त्यामुळे अत्यंत फालतू युद्धदृश्यं माफ करून टाकावीत म्हणतो. मात्र प्रेमकहाणी तरी कुठे व्यवस्थित मांडली आहे ? कुठल्याही क्षणी बाजीराव आणि मस्तानी, राम आणि लीला बनून 'लहू मूंह लग गया..' करत तोंडात तोंडं घालतायत की काय अशी एक विचित्र अनामिक भीती सतत वाटत राहते, इतकं सगळं वरवरचं झालं आहे.

६. सरसकट सगळे लोक, अगदी मराठी नट-नट्याही 'राऊ' न म्हणता 'राव' म्हणतात ! निवेदक इरफान खान 'बाजीराव बल्लाड' असा अगदी सुस्पष्ट उच्चार करतो. तेव्हा मात्र 'च' आणि 'भ' चे पाढे मनातल्या मनात सुरु झाले. इतकं सगळं उथळ करायचं होतं, तर काही शतकं मागे जायची गरज काय होती ? आजच्याच काळातली एखादी कहाणी गुंफायची होती ना ! अभ्यास करायचाच नव्हता, मेहनत घ्यायचीच नव्हती तर एक प्लॉट ज्याचं इतर कुणी तरी कदाचित सोनं केलं असतं, तो वाया का घालवला ? असा एक वैफल्यग्रस्त प्रश्न मला पडला.

७. हिमेश रेशमियाची अभिनयाची हौस आणि भन्साळीची संगीत देण्याची हौस एकसारखीच वाटते आहे. सगळ्या गाण्यांच्या चाली एक तर एकसारख्याच किंवा इतर कुठल्या तरी गाण्यासारख्या किंवा थेट इस्माईल दरबारची नक्कल करणाऱ्या आहेत. 'अलबेला सजन आयो..' ची चाल मस्तच आहे. पण आयो' मधल्या 'आ' वरच्या जबरदस्त समेची अक्षरश: माती झाली आहे. वाद्यांचा इतका गोंगाट आहे की ती समेची जागा खरंच वाया जाते. इथे पुन्हा एकदा 'कट्यार'चा संदर्भ देतो. 'दिल की तपिश आज हैं आफताब..' मधल्या 'ता' (आफ'ता'ब) वर येणारी समेची जागाही अशीच दिलखेच आहे. पण सुरेख व अचूक प्रमाणातला वाद्यमेळ ही सम व्यवस्थित ठळक करतो. भन्साळी भसाभस वाद्यांचे आवाज ओततो आणि फक्त गोंगाट करतो.

एकंदरीत, अत्यंत रटाळ आणि सपशेल फसलेला चित्रपट म्हणूनच 'बाजीराव मस्तानी' ओळखला जाईल. मी 'दिलवाले' पाहिला ह्याचा तुलनात्मक का होईना मला आनंद होईल, असं मला कधीही वाटलं नव्हतं. आता वाटतंय.

- रणजित पराडकर
http://www.ranjeetparadkar.com/2016/04/bajirao-mastani-movie-not-review....

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

perfect समीक्षण !!
सगळे मुद्दे (Y )

जमेची एकच गोष्ट कि अमराठी लोकां पर्यंत बाजीराव पेशवे कोण होते आणि त्याचं कार्य काय होत ह्याची ओळख परेड झाली

मी अजून पाहिला नाही हा पिक्चर. पण हा लेख वाचून उत्सुकता चाळवलीय.
तरीही फारच अतर्क्य दाखवले असावे असे वाटत नाही. एखाद्याचा ईतिहासाचा सूक्ष्म अभ्यास असेल तरच त्याला दोष जाणवावेत. बहुतांश पब्लिक यात मोडणारे नसल्याने त्यांना चालून जावे. हेच नेमके संजयलीलाने पकडले आहे. समजा जर असेच काही शिवाजी महाराजांबद्दल दाखवले असते तर.. तेव्हाच जाळपोळ होत चित्रपट झळकलाच नसता. बाजीरावांबाबत याची शक्यता कमी होती. जो ओरडा झाला तेवढा तर दुनियादारी चित्रपटाच्या वेळीही हा पिक्चर मूळ पुस्तकाशी फारकत घेऊन आहे असा झाला होता. याने चित्रपटाचा फायदाच होतो. दोन्ही हिट गेले.

माझ्या ब्लॉगवर एका वाचक मैत्रिणीने एक प्रतिक्रिया दिली आहे. मी त्यावर उत्तरही दिले. त्या संवादाचा एक भाग इथे देतो. रिलेव्हन्ट आहे म्हणून. (इंग्रजीतली प्रतिक्रिया वाचक मैत्रिणीची आणि मराठीतून माझे उत्तर.)

------------------------

1. No non Marathi person even in Maharashtra knew who and what Bajirao was. How brave he was. Due to this movie now whole India and maybe whole world (audiences including Pakistan, shrilanka, Nepal, Singapore, Mauritius and all those countries wherein Hindi knowing people live) for sure knows about Bajirao peshwa.

>> चित्रपटाच्या समर्थनार्थ हाच एक मुद्दा वारंवार आणि सर्वत्र मांडला जातो आहे. बाजीराव लोकांपर्यंत पोहोचला नाही, ह्यासाठी लोक जबाबदार नसून सिस्टीम जबाबदार आहे. आपली इतिहासाची पुस्तकं जबाबदार आहेत. बाजीराव जितका पोहोचला आहे, तोसुद्धा 'बाजीराव-मस्तानी' असाच पोहोचला आहे, इतकी बदनामी आपल्या सिस्टीमने केलेली आहे. हा चित्रपट पुन्हा एकदा तेच करतो आणि अधिक मोठ्या प्रमाणावर करतो. अर्धवट ज्ञानापेक्षा संपूर्ण अज्ञान बरं, असं मला तरी वाटतं. त्यामुळे अश्या प्रकारे बाजीराव लोकांपर्यंत पोहोचवून काही भलं झालेलं नाही.
आणि बाजीराव लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या महान उद्देशाने काही चित्रपट बनवलेला नाही. तो पैसा कमवण्यासाठी बनवला आहे, त्यामुळे हा मुद्दा असंबद्ध ठरतो. <<

रसप, तुमच्या प्रतिक्रीयेला १००% अनुमोदन. बाजीराव लोकांपर्यंत जसा पोचवायला हवा होता तसा पोचवला गेला नाही.

बाकी सगळं सगळं चालेल पण बाजीराव 'वाट लावली' म्हणणं पाहणं डोळ्याला सहन होत नाही.थोडे आजच्या हिंदीतले पण टपोरी नसलेले शब्द चालले असते.

रसप...
>>..........................अर्धवट ज्ञानापेक्षा संपूर्ण अज्ञान बरं .....<< ह्या अख्ख्या पोस्टीला संपुर्ण अनुमोदन.
त्या बाळंतपणाच्या सीन वर ही लोकांना आक्षेप नाहीये, असे वरिल काही तत्वज्ञ मंडळींच्या प्रतिसादावरुन कळले, हरकत नाही...पण रणवीर ने तो सीन हास्यास्पद केलाय असे मला तमाम जनते कडून कळले, ज्यांनी हा चित्रपट पाहिला आहे. द मेकिंग ऑफ महात्मा मधे [चु.भु.द्या.घ्या.] मला वाटतं असाच एक सीन आहे, रजित कपूर ने अत्यंत संयत पणे हाताळला आहे तो सीन. अर्थात प्रत्येकाची आवड निवड वेगळी असु शकते, पण प्रियांका चे बालीश असणे आणि रणवीर चे छिछोरे असणे फार खटकते, भले ही त्याने बरीच मेहनत केली असेल ह्या रोल साठी पण तो रांगडा कमी आणि छिछोरा च जास्ती वाटतो. जोधा अकबर मधील अकबर मात्र हृतिक ने बर्या पैकी चांगला वठवला होता.

मी काड्या लावत नाहीये, पण तरी एक मुद्दा इथे सर्वांनाच चर्चे साठी विचारावासा वाटतो की >>चित्रपटाच्या समर्थनार्थ हाच एक मुद्दा वारंवार आणि सर्वत्र मांडला जातो आहे. बाजीराव लोकांपर्यंत पोहोचला नाही, ह्यासाठी लोक जबाबदार नसून सिस्टीम जबाबदार आहे. आपली इतिहासाची पुस्तकं जबाबदार आहेत. बाजीराव जितका पोहोचला आहे, तोसुद्धा 'बाजीराव-मस्तानी' असाच पोहोचला आहे, इतकी बदनामी आपल्या सिस्टीमने केलेली आहे<< ह्या मागे बाजीराव चे "पेशवे" म्हणजे च so called उच्च वर्णीय असणे तर कारणीभूत नसेल ?

>> अर्धवट ज्ञानापेक्षा संपूर्ण अज्ञान बरं

अय्या हो? तुम्हाला कुठल्या विषयात संपुर्ण ज्ञान आहे म्हणे?

>>ह्या मागे बाजीराव चे "पेशवे" म्हणजे च so called उच्च वर्णीय असणे तर कारणीभूत नसेल ?

आपली "सिस्टीम", जी गेली ३०-४० वर्ष सोडली तर संपुर्णपणे उच्च वर्णीयांच्या ताब्यात होती किंबहुना अजुनही आहे, तिने उच्चवर्णीय पेशव्यांचीच का बरे बदनामी केली असेल? (गहन विचारात बुडलेली स्मायली)

मी हा सिनेमा बघितला नाहॆ. पण लिहिलेला प्रत्येक शब्द पटला. हा सिनेमा बघण्यासाठी गर्दी करणारे आणि त्याला पुरस्कार देणारे महान आहेत!
"बाजीराव लोकांपर्यंत पोहोचला नाही, ह्यासाठी लोक जबाबदार नसून सिस्टीम जबाबदार आहे. आपली इतिहासाची पुस्तकं जबाबदार आहेत. बाजीराव जितका पोहोचला आहे, तोसुद्धा 'बाजीराव-मस्तानी' असाच पोहोचला आहे, इतकी बदनामी आपल्या सिस्टीमने केलेली आहे. हा चित्रपट पुन्हा एकदा तेच करतो आणि अधिक मोठ्या प्रमाणावर करतो" - १०००++

बाजीराव पेशवा म्हणजे टपोरी कम रजनीकांत असे कॉम्बो होते असे रणवीरला सांगितले गेले असावे असे पिक्चर पाहून वाटले.

मला ही मस्तानी निव्वळ हपापलेली, बाजिरावाच्या घरादाराचे काहीही होवो, मी इथ्थेच्च ठिय्या देऊन बसणार अशी आडमुठी वाटराहतो..
त्या दोघांतलं प्रेम खुलताना दिसलंच नाही, उलट काशी आणि बाजिचं पुर्वी नातं मस्त दाखवलंय, त्यामुळे मस्तानीचा फक्तच राग येत राहतो..

ज्यांना कुणाला आपल्या अ-मराठी भाषिक मित्रमंडळींना खरा बाजीराव कोण आणि काय होता हे कळावे असे वाटत असेल तर त्यांना उपयुक्त ठरू शकेल असा इंग्रजी भाषेत असलेला भाषण आणि प्रश्नोत्तरांचा हा कार्यक्रम रास्ते वाड्यात होत आहे.

THE REAL BAJIRAO: AN INTERACTIVE TALK
Conducted By: Dr. Uday .S. Kulkarni

तिकीट १०० रुपये.

http://intachpune.org/index.php/about-us/our-events-calendar/explore-pun...

मला ही मस्तानी निव्वळ हपापलेली, बाजिरावाच्या घरादाराचे काहीही होवो, मी इथ्थेच्च ठिय्या देऊन बसणार अशी आडमुठी वाटराहतो..
त्या दोघांतलं प्रेम खुलताना दिसलंच नाही, उलट काशी आणि बाजिचं पुर्वी नातं मस्त दाखवलंय, त्यामुळे मस्तानीचा फक्तच राग येत राहतो..

+१

मला ही मस्तानी निव्वळ हपापलेली, बाजिरावाच्या घरादाराचे काहीही होवो, मी इथ्थेच्च ठिय्या देऊन बसणार अशी आडमुठी वाटराहतो..
त्या दोघांतलं प्रेम खुलताना दिसलंच नाही, उलट काशी आणि बाजिचं पुर्वी नातं मस्त दाखवलंय, त्यामुळे मस्तानीचा फक्तच राग येत राहतो..

हो मलापण बाजिराव काशीबाई यांच नातच जास्त आवडल.
आणि त्यांच्याबद्दलच sympothy वाटते.

त्या बाळंतपणाच्या सीन वर ही लोकांना आक्षेप नाहीये, असे वरिल काही तत्वज्ञ मंडळींच्या प्रतिसादावरुन कळले, >>> का हो, तुमच्याशी सहमत नसेल किंवा वेगळे मत दिले तर डायरेक्ट खवचट शेरे का?

"बाजीराव लोकांपर्यंत पोहोचला नाही, ह्यासाठी लोक जबाबदार नसून सिस्टीम जबाबदार आहे. आपली इतिहासाची पुस्तकं जबाबदार आहेत. बाजीराव जितका पोहोचला आहे, तोसुद्धा 'बाजीराव-मस्तानी' असाच पोहोचला आहे, इतकी बदनामी आपल्या सिस्टीमने केलेली आहे. हा चित्रपट पुन्हा एकदा तेच करतो आणि अधिक मोठ्या प्रमाणावर करतो" >> सिस्टीम म्हणजे काय अभिप्रेत आहे नक्की ? सिस्टींम ने बदनामी केली म्हणाजे नक्की काय केले आहे ? ह्या सिनेमापूर्वी अजून काहि झाले होते का ?

इतिहासातील काही थोर लोक पॉप्युलर कल्चर मधे दुर्लक्षित राहिल्याची उदाहरणे आहेत. इथेही तसेच असेल. कदाचित हा सिनेमा व त्यावर होणारी टीका लोकांना उद्युक्त करेल संशोधन करायला. हर्पेन ने उल्लेख केलेले भाषण ही सुद्धा एक प्रतिक्रिया असू शकते. हे दुर्लक्ष कोणी आवर्जून करत असेल असे वाटत नाही. माझ्या आठवणीत बाजीरावाबद्दल गेल्या अनेक वर्षांत झाली नसेल एवढी चर्चा, एवढी माहिती गेल्या काही महिन्यांत विविध वेब साईट्स वर व सोशल नेटवर्क्स वर बघण्यात आली. आजकाल प्रत्येक ऐतिहासिक व्यक्तीचे काही उत्साही सोशल नेटवर्क प्रमोटर्स असतात ते ही आता यापुढे दुर्लक्ष होउ देणार नाहीत. Happy

मला ही मस्तानी निव्वळ हपापलेली, बाजिरावाच्या घरादाराचे काहीही होवो, मी इथ्थेच्च ठिय्या देऊन बसणार अशी आडमुठी वाटराहतो..
त्या दोघांतलं प्रेम खुलताना दिसलंच नाही, उलट काशी आणि बाजिचं पुर्वी नातं मस्त दाखवलंय, त्यामुळे मस्तानीचा फक्तच राग येत >>>+१

गलेपडु मस्तानी.

पण बाजीराव आवडलाच. रण्वीर रॉक्स. लैच झ्याक वाटलाय तो. ए बजनेदे धडक धडक. कसली एनर्जी आहे. मस्तच. मला तरी रण्वीर चा बाजीराव भलताच आवडलाय.
ए मुर्ख, लगाम दिखती नही है पर जबान पे होनी चाहिये
आणि
चला..... सातार्‍याला
हे डायलॉग माया घरी लैच फ्येमस. खासकरुन त्याच टोनमधे 'मुर्ख' म्हणणं Happy

चित्रपट किंवा कादंब-या मनोरंजनासाठी बनवल्या किंवा लिहिल्या जातात. खरा इतिहास त्यात कुठुन दिसणार? त्यावरुन इतिहासाची कल्पना करणेही चुक आहे. रमा-माधव बद्दल मराठी समाजात जे मत आहे त्याला स्वामी ही कादंबरी जबाबदार आहे. त्यावरुन रमा-माधव खरोखरीच तसे होते असे मत बनवणे योग्य ठरणार नाही. मत बनवायचे असेलच तर तेव्हाचा खरा इतिहास जाणुन घ्यायचे कष्ट घ्यायला हवेत.

मराठा इतिहासात ज्यांना रस आहे त्यांनी Bakhar of Panipat - Raghunath Yadav हे पुस्तक वाचा. अमॅझॉनवर आहे. ज्या अमराठी लोकांना मराठा इतिहास समजुन घ्यायचा आहे त्यांना भेट द्या. यातली माहिती सापडलेल्या कागदोपत्री पुराव्यांवरुन लिहिलेली आहे. अशी अजुन बरीच पुस्तके आहेत/असावित. हे माझ्या संग्रही आहे म्हणुन इथे दिले.

अगदी मनातलं. माझी सौंदर्यदृष्टी फ्लेग्झीबल आहे. पण तरीदेखील पर्वतीच्या संग्रहालयातलं मस्तानीचं तैलचित्र बघून करीना कपूर मस्तानी असायला हवी होती असं वाटलं. तिच्यात मस्तानीचं तेज आणि बांधा दोन्ही आहे.
मल्हारी गाण्यात रणवीरचं ध्यान बघून मलादेखील थेटर सोडून जावसं वाटलं होतं.

ए मूर्ख खूप छान म्हणतो तो खरंच.
माझी एखादी बहिण असती तर लग्न करुन दिले असते
(जसंकाय तो दारी मागणं घेऊन ताटकळतोय Happy Happy )

Pages