प्राईम-टाईम स्टार - श्री. सचिन कुंडलकर

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

श्री. चेतन दातार यांच्या मृत्यूनंतर २००९ साली लिहिलेला हा लेख -

***

एकटा राहणारा माणूस जेव्हा अचानक मरतो तेव्हा काही नाट्यपूर्ण गोष्टी घडण्याची शक्यता तयार होते. रोजच घडणाऱ्या साध्या गोष्टी अभूतपूर्व होऊन जातात. त्या एकट्या माणसाने घरामध्ये ओट्यावर काही शिजवून ठेवलं होतं, ते सावकाश नासायला लागतं. कपडे? ते वॉशिंग मशिनमध्ये धुऊन पडलेले असतात, ते वाळत घालायचे राहून जातात. कुजायला लागतात. टेबलावर दोनतीन पत्रं येउन पडलेली असतात. उघडायची राहिलेली, उघडायचा कंटाळा केलेली . त्यांतल्या एखाद्यातरी पत्रात चांगली बातमी असू शकते. नव्या प्रवासाविषयी. आपल्या नाटकाला मिळालेल्या चांगल्या प्रतिसादाविषयी. फोन दिवसभर वाजत राहील. पण एकटा राहणारा माणूस नेहमीच फोन उचलायचा कंटाळा करतो, त्यामुळे फोन करणारे सवयीने दर तासाला प्रयत्न करत राहतील. जवळच एका हॉटेलमध्ये एकट्या राहणाऱ्या माणसाने कुणालातरी भेटायला बोलावलं होतं. एकटा राहणारा माणूस आलाच नाही म्हणून ती व्यक्ती चरफडत वाट पाहून निघून जाईल. दाराला आतून कडी लावलेली असेल. पेपरवाला पेपरही टाकून जाईल. मग साडेदहा-अकरानंतर सगळं संपूर्ण शांत. रात्री उघड्या राहिलेल्या नळाला दुपारी अचानक पाणी आलं की फिस्कारत दोधाण धबधबा वाहू लागेल. मोठ्ठा आवाज. जेव्हा दोनतीन तासांनी सोसायटीच्या टाकीतलं सगळं पाणी संपून जाईल, तेव्हा कुणीतरी दारावर पहिली थाप मारेल. मग धडका. तुमच्या मरणामुळे जगाचं प्रत्यक्ष रोखठोख नुकसान होणार असेल तरच जग एकट्या राहणाऱ्या माणसाच्या जगण्याची किंवा मृत्यूची फिकीर करण्याची शक्यता आहे.

हा एकटा राहणारा माणूस जर एकाकी माणूस असेल तर अजूनही काही गोष्टी घडतात. एकाकी माणूस मरतो तेव्हा त्याच्या स्वतः च्या वेदना शमतात, पण आजूबाजूच्या लोकांच्या जखमा उघड्या पडायला लागतात. चिघळतात. एकाकी माणूस मरताना मागे अनेक तऱ्हेचे गंड आणि एक न संपणारी भीती मागे ठेवून जातो. तो त्याच्या मरणाची जबाबदारी आपल्यावर टाकून जातो. पण आता वेळ गेलेली असल्याने आपण काहीच करू शकत नाही. तुझ्यासाठी मी काय करू शकतो? आपण पुन्हा एकदा बोलूया का?आपलं काही चुकलं असेल तर नाटकाच्या तालमीसारखं परत एकदा करून पाहूया का? तू माझ्याबरोबर दोनचार दिवस राहायला येतोस का? तुला कुठे शांत जागी जावसं वाटतंय का? काहीही शक्य नसतं . एकाकी माणूस मेलेला असतो आणि तो जाताना सर्व शक्यतांचे दोर तोडून जातो. मागे उरलेली माणसं मग आपापली नखं खाऊन संपवतात. पुढचे काही दिवस एकमेकांच्या डोळ्यांत बघायचंही टाळतात. मध्येमध्ये खाली बघून रडल्यासारखं करतात आणि मग पहिल्या स्मृतिदिनाचं कारण काढून साळसूदपणे एकत्र जमतात.

चेतन दातारने असं अवेळी जायला नको होतं, असं आपल्यापैकी प्रत्येकालाच वाटतं. आपल्या प्रत्येकाशी स्वतंत्रपणे वागत, काहींना उजेडात तर काहींना अंधारात ठेवत तो आपल्याशी खेळ खेळला. त्याने सर्व सत्ता शेवटपर्यंत आपल्या हातात ठेवली आणि दार उघडून तो ताडकन निघून गेला. माझ्याप्रमाणेच अनेकांना त्याने त्याच्या गंभीर आजाराबद्दल कोणताही सुगावा लागू दिला नव्हता. कसलीही कल्पना नसताना गेल्या वर्षी एका सकाळी ‘चेतन गेला’ असं सांगणारा फोन मला आला त्या क्षणापासून मी धुमसत राहिलो. त्या रागामुळेच की काय , त्याला शेवटचं एकदा पाहून घेण्याचीही मला इच्छा झाली नाही.

चेतन दातारला आपण कधीही भेटलेलो नसू तरी आपल्याला तो माहितीच असायचा, कारण नाटकाशी कशाही प्रकारे संबंध असलेले महाराष्ट्रातले सगळेचजण त्याच्याविषयी सतत बोलायचे. तो फार बोलायचा नाही किंवा पेपरमध्ये त्याचे फोटोही यायचे नाहीत. तो जर आपल्या शहरात आला तर त्याने आपलं नाटक पाहून बोलावं, असं वाटायचं. आपण जर कधी मुंबईला गेलो तर चेतनची नक्की भेट घेऊ, असं वाटायचं कारण तो फार आश्वासक हसायचा. रंगीबेरंगी कपडे घालायचा. तसले कपडे तो कुठून आणायचा हे त्याचं त्यालाच माहीत. शिवाय सतत वेगवेगळ्या हेयरस्टाइल्स. आज असा बघावा तर चार महिन्यांनी तसा. नाटकाचा प्रयोग बघताना नीट रोखून बघणार आणि प्रयोग संपल्यावर काहीतरी मोघम बोलून सटकणार. मग सगळ्या जगाचं आटपल्यावर ह्याचा तीन दिवसांनी फोन येणार. ‘येडझवा’ हा त्याचा आवडता शब्द असायचा. माणसं येडझवी पाहिजेत, नाटकं येडझवी पाहिजेत. येडझवं नसेल तर त्याला आवडायच नाही. त्याच्या असण्याचं जिथे तिथे एक स्टेटमेंट तयार व्हायचं. जिथे ते होणार नाही तिथे तो जायचा नाही. तो कशावरही बोलत बसला की सुरुवातीला ते साफ खोटं वाटायचं आणि थोड्या वेळाने खरं वाटायला लागायचं. त्याचं बांद्रयाच अंधारं गूढ घर. त्या घरातली भिंतभर पुस्तकं आणि त्याची जगभरातल्या गोष्टींविषयीची कडक मतं. त्याचे गावोगावचे मित्रमैत्रिणी. त्याचं मोठ्यांदा हसणं आणि त्याची भलतीसलती मस्त नाटकं. माहीमच्या शाळेत स्टेजमागच्या छोट्या खोलीत तो हळदीच्या घाऊक व्यापाऱ्याच्या टेचात एक पाय खुर्चीवर ठेवून बसणार, समोरचा फोन ओढून घेणार आणि म्हणणार, ”ए चायवाला, मी नाटकवाला बोलतोय. दो चाय भेज दे.” जगातले निम्मे लोक चेतनचं वागणं चालवून घ्यायचे आणि उरलेले त्याच्यावर रागावलेले. अधेमधे काही लोक त्याच्या वागण्यामुळे दगड लागलेल्या कुत्र्यासारखे विव्हळत फिरत असायचे, ते मुंबईत इथेतिथे सापडायचे. बराच वेळ फोन वाजू देऊन मग शांतपणे तो उचलण्यात त्याला परमानंद वाटायचा. आजच्या काळातला तो शेवटचाच माणूस जो नागपूरला एलकुंचवारांशी, मुंबईत तेंडुलकरांशी आणि पुण्यात आळेकरांशी एकाच वेळी उत्तम संवाद ठेवून असायचा. गिरीश कर्नाडांविषयी मला जे वाटतं तेच त्यालाही वाटतं, हे कळल्यामुळे मला तो जवळचा वाटायचा. चेतन दातार हे रसायन पचवायला लोकांना जर वेळ लागायचा. आपण सगळ्यांनी तर त्याच्यापुढे हात टेकलेलेच होते. पण तो आपल्यालाला सतत आजूबाजूला हवा होता. वर्ष दोन वर्षं भेटलाच नसता, कुठेतरी गायब झाला असता तरी हरकत नव्हती, पण त्याने असं मरून जायला नको होतं.

एकट्या राहणाऱ्या आणि मरून गेलेल्या माणसांच्या घरचे लोक त्यांच्या अफाट पुस्तकसंग्रहाचं नंतर काय करतात, हा मला एक नेहमी पडलेला प्रश्न आहे. कारण प्रतिभावंत माणसाच्या घरच्या लोकांना आपणही तसेच प्रतिभावंत आहोत, अस लहानपणीपासून वाटत जरी असलं तरी ते खर नसतं. अशी माणसं गेली की मी नेहमी त्या पुस्तकांचा विचार करत राहतो.

चेतनच्या नसण्यामुळे नक्की काय बिनसलं आहे, हे आत्ता लगेचच उमजेलच असं नाही. पण आपल्या इमारतीच्या पायाजवळच्या काही विटा काढल्यासारखं झालं आहे. आता आपल्याला फार जपून राहायला हवं आहे. याचं कारण म्हणजे आपल्यापैकी प्रत्येकाला चेतनविषयी जी उमज होती, त्यापेक्षा तो जास्त विस्तृत आणि महत्त्वाचा होता. आजच्या मराठी रंगभूमीला भारतातील इतर प्रांतातील रंगभूमीशी जोडणारा तो एक भक्कम आणि महत्त्वाचा दुवा होता. आणि तसा असणारा तो एकमेव होता. कारण आपलं नाटक घेऊन अनेक मराठी नाट्यकर्मी भारतात फिरतात, पण चेतनने त्याच्या व्यक्तिमत्त्वातून नाटक करणाऱ्या माणसांची एक आपसूक जोडणी केली होती. तो त्या माणसांची एकमेकांशी गाठ घालून देत असे. गेल्या वर्षी संपून जाईपर्यंत तो नाटक बसवत होता, नाटक लिहीत होता. नाटकांची भाषांतरं करत होता. तो कोणत्याही संस्थेचा पदाधिकारी होऊन बसला नव्हता, सरकारी कमिट्यांवर नव्हता, सिनेमात तर अजिबातच लुडबुडत नव्हता. आपली सर्व ताकद आणि आपला सर्व वेळ त्याने नाटक करण्यासाठी नीट वापरला होता. चेतनला कधीही यशस्वी नाटक करायचं नव्हतं. त्याला फक्त नाटकच करत राहायचं होतं. चेतनने त्याच्या व्यक्तिमत्त्वामध्ये आणि विचारांमध्ये जो एक विलक्षण ताजेपणा ठेवला होताम त्याचा मला फार हेवा वाटतो. आजूबाजूचा एकही नाट्यदिग्दर्शक जे करताना मला दिसत नव्हता, ते चेतन सातत्याने करत होता. तो स्वतः ला एकटं पाडून, नव्या विषयाला, नव्या माणसांना सामोरा जाऊन, चौफेर वाचन आणि भरपूर प्रवास करून, स्वतः ची मतं आणि विश्लेषक बुद्धी तल्लख ठेवून तो नाटकांची निर्मिती करत होता. तो अपयशाला घाबरला नाही, लोकांच्या मतांना घाबरला नाही, एकटं पडलं जाण्याला घाबरला नाही. कारण तो जाणीवपूर्वक एकटाच होता. मराठी रंगभूमीवरील आपणच निर्माण करून ठेवलेल्या संस्थांच्या दलदलीत पाय रुतून बसलेल्या नाट्यदिग्दर्शकांच्या नामावालीपासून एकदमच वेगळा असा चेतन दातार हा एक प्राईम-टाईम स्टार होता.

अनेक वर्षं रात्री तो सुरमा लावत असे आणि ’का’ असं विचारलं की, ’डोळ्याला थंड वाटतं’ असं काहीही उत्तर देत असे. त्याला पाचसहा मुखवटे होते. त्यांतले एकदोन त्याने मला दाखवले होते.

नाटक बसवण्याची प्रक्रियाच अशी की नाटक बसवणाऱ्या प्रत्येकाला ते कमकुवत करत जातं कारण त्यात एक सामूहिक देवाणघेवाण अपेक्षित असते. नाटक बसवायला आलेल्या सगळ्यांमधील थोडी थोडी ऊर्जा काढून घेऊन ते नाटक उभं राहतं. कारण तो सगळा जिवंत खेळ असतो. आभास नसतो. केल्यासारखा वाटतो पण नसतो. हे होत असताना एकत्र जमून नाटकाचा शोध घेण्याच्या नादात त्या माणसाना एकमेकांची चटक लागते आणि त्यातून संस्था नावाचं प्रकरण उभं राहतं. ते कामासाठी आवश्यक वाटलं तरी भारतीय प्रवृत्तीनुसार जिथेतिथे कुटुंबे उभी करायच्या आपल्या गलथान सवयीमुळे एकदा संस्था स्थापन झाली की मग नाटक सोडून सगळं काही त्या माणसांच्या हातून होतं. त्यांचे दौरे होतात, त्यांची बस होते, त्यांना ग्रांट मिळतात, पुरस्कार मिळतात. बऱ्याच जणांची या काळात एकमेकांशी लग्नं होतात. पण एक गोष्ट करायची राहून जाते, ती म्हणजे भारंभार नाटकं करत राहूनही चिकित्सकपणे नाटकाचा आणि स्वतःचा शोध. त्यामुळे पूर्वी कम्युनिस्टांचे देश चालत तशा महाराष्ट्रात अजूनही नाटकाच्या संस्था चालतात. ह्या सगळ्या सामूहिक कोलाहलात आणि दलदलीत दिग्दर्शक नावाच्या माणसाची पूर्ण वाट लागते. चेतनने हे ओळखलं होतं आणि स्वतः ला संस्थांच्या आणि माणसांच्या किचाटापासून मोकळं ठेवलं होतं . नाटक बसवायची वेळ आली की सौम्य हसरा चेहरा करून नाटकासाठी आवश्यक ती मंडळी तो हुशारीने जमवायचा, पण त्याचा फोकस अतिशय तीव्रपणे त्याच्या नाटकावर असायचा. आपण समूहाचा भाग नसून एकटे आहोत आणि ह्या एकटेपणातूनच त्याला त्याच्या नाटकाचा शोध घ्यावा लागणार आहे, ह्याची जाणीव त्याला होती. या बाबतीत त्याला त्याच्या गुरूंचं, सत्यदेव दुब्यांचं, बरंवाईट सगळंच नशीब लाभलं होतं. चेतनच्या बाबतीत पिढ्यांचे उल्लेख करण्याची गरज भासू नये, पण त्याने ज्या माणसांबरोबर कामाला सुरुवात केली, ती सर्व माणसं सुजली, कंटाळली, डोकं चालेनाशी झाली, प्राध्यापक झाली, नोकऱ्यांना लागली, समीक्षक झाली, पण चेतन मात्र फार काळ सर्वांना पुरून उरला.

चेतनने दिग्दर्शन करण्यासाठी जी नाटकं निवडली, त्या नाटकांमुळे त्याच्या मनाच्या ताजेपणाची आणि व्याप्तीची आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे चुका करायला न घाबरण्याच्या त्याच्या वृत्तीची कल्पना येऊ शकते. कारण अनेक माणसं चुका करायला घाबरून सामान्य काम दळत राहतात, जे चेतनने कधी केलं नाही. भारतीय कथा, कविता, कादंबरी, पत्रव्यवहार आणि प्रवासवर्णनं यांचा बेमालूम मेळ तो त्याच्या हातातील नाट्यसंहितेशी घालत होता. मराठी नाटककार आणि मराठी साहित्यिक यांच्या कुंपणापलीकडे जाऊन त्याने नाटकासाठी नवं मॅटर शोधण्याचा सातत्याने प्रयत्न केला. नृत्यभाषेबद्दल त्याला अतीव आकर्षण होतं. पारंपरिक भारतीय नृत्यांचा ताल आणि मेळ तो त्याच्या कामात सातत्याने आणू पाहत असे. तो राहत असलेल्या मुंबई शहरात चालणारा अनेकभाषीय जगण्याचा आणि नाटकाचा व्यवहार त्याला उत्तेजित करत असे. त्यातून चेतनने खर्‍या अर्थाची कॉस्मोपोलिटन जाणीव आणि पोत स्वतःच्या कामाला आणला होता. नटाचं शरीर आणि नटाचा आवाज ह्या दोन ताकदींचा अधाशासारखा वापर तो आपल्या नाटकांमध्ये करत असे आणि रंगमंचावरचा नट हे फक्त साधन आहे, ह्याची ओरडून ओरडून आपल्याला खात्री करून देत असे. त्याच्या कामामध्ये सत्यदेव दुब्यांच्या दृष्टीचं ठोस प्रतिबिंब होतं. त्याच्या नाटकाचा सूर चढा आणि त्यातील दृश्यात्मकता फार ढोबळ असे. त्याचे मतभेद आणि आवडीनिवडी ठाम होत्या, पण गेल्या पाचसात वर्षांत नव्याने निर्माण होत असलेल्या नाटकांकडे तो फार खोलवर पाहू शकत होता. त्याच्या स्वत:च्या कामाचं एक निश्चित स्वरूप तयार व्हायला लागल्यापासून ते शेवटपर्यंत तो भारतीय कलाकार असण्याच्या शक्यता पुरेपूरपणे अजमावत रहिला. त्याने कधीही भारावून जाऊन किंवा इतिहासाला बळी पडून पाश्चात्य रंगभूमीची अनावश्यक भलावण केली नाही . मॉडर्न होत बसण्याचं त्याच्या पिढीवर असलेलं खुळं प्रेशर त्याने स्वतःवर घेतलं नाही. कारण त्याच्या अवतीभवती असलेल्या त्याच्या पिढीत दोन टोकाची माणसबं होती. जबाबदार आदर्शवाद आणि डाव्या विचारांनी भारावलेली किंवा मनानं लंडनच्या रंगभूमीवर राहणारी. चेतनने ह्या दोन्ही प्रकांपासून स्वतःला साळसूदपणे वाचवलं. रात्री प्रयोग झाले की दिग्दर्शकाचे कपडे फेकून देऊन तो मुंबईच्या अंधारात लुप्त होऊन जायचा. आपलं काम तपासून बघणं आणि नव्या शक्यता अजमावणं यांसाठी तो आजूबाजूचे चित्रकार, लेखक, संगीतज्ञ, गायक, नर्तक यांच्याशी चांगली मैत्री जोपासून होता. त्याच्या ह्या ओढीमुळे त्याचं काम सतत नव्या आणि आश्वासक अनुभवांनी बहरलेलं राहिलं. चेतन आता पुढे काय करतो आहे, ही उत्सुकता त्याने प्रत्येकाच्या मनात कायम ठेवली. चित्रपटमाध्यमाविषयी त्याने आपली जाणीव एवढी पारंपरिक आणि बंद का ठेवली होती, ह्याचा उलगडा मला होत नसे. एकतर जुन्या नाटकातील लोकांप्रमाणे तो चित्रपटांकडे एक दुय्यम आणि फक्त व्यावसायिक माध्यम म्हणून पाहायचा. चित्रपटांचं योग्य रसग्रहण करण्याची त्याने कधी फिकीरही केली नाही आणि कष्टही घेतले नाहीत. त्यामुळे ह्या एका मोठ्या विषयावर आम्ही बोलणं टाळायचो किंवा बोललो तर खूप वेळ भांडत बसायचो! नळावर पाण्याला जमलेल्या बायका मुकाट माना खाली घालून घरी परत जातील एवढी गॉसिप्स्‌ तो करायचा आणि त्यातून अपार ताकद मिळवायचा. ’निंदेला बसलो होतो दुपारी’ असं तो फोन करून सांगायचा. माणूस जगताना बाहेर जे जगतो त्याच्या खाली, त्वचेच्या आत वेगळेच अद्भूत व्यवहार चाललेले असतात. चेतनला माणसं अशी सोलून बघायला आवडायची. मानवता, अहिंसा, बंधुभाव, समता असे लोचट मुखवटे घालून माणसांचे कळप एकमेकांना भिडून जो उत्पात करतात, ते बघायला तो फार आसुसलेला असायचा. जोतिषविद्या, मंत्रविद्या, गूढविद्या, आध्यात्मिक अनुभूती, स्वप्नं ह्यांखाली एक हात ठेवून जगायची त्याला सवय होती. त्याला मध्येच फुटलेले हे फाटे मला गोंधळवून टाकत. त्याच्या जगण्याची आणि कामाची अफाट ताकद तो अश्या वेड्यावाकड्या गोष्टींमधून मिळवत असे. ’सावल्या’ हे त्याचं नाटक वाचलं तर त्याच्या मनाचे हे असे अनेक पापुद्रे हाती लागू शकतील. चारपाच वर्षांपूर्वी नव्यानं नाटक लिहू लागलेल्या माझ्यासारख्या नाटककाराला त्याने खूप मोठं जग उघडून दाखवलं होतं. आमच्या नाटकांची भाषांतरं व्हावीत आणि त्या नाटकांच्या शक्यता वेगवेगळ्या प्रकारे हाताळल्या जाव्यात, ह्याबद्दल तो आग्रही असायचा. इतकं सगळं चालू असताना चेतनने जाण्याची काहीच गरज नव्हती. बाकी इतर अनेकजण जाऊ शकले असते. महाराष्ट्रातील रटाळ दिग्गजांचा गोंगाट तरी कमी झाला असता. रम्य जुन्या आठवणींची गावठी दारू पिऊन स्मृतींच्या चिखलात लोळणारे, कामाची ताकद संपून परीक्षक वगैरे बनलेले, बुद्धी गंजलेले कलाकार मागे राहतात. घरी कंटाळा आला म्हणून किंवा घरी उकडत आहे आणि नाटकाच्या तालमीच्या हॉलमध्ये पंखा आहे इतक्या सध्या कारणाने नाटक करणाऱ्या आणि नाटक करताकरता लग्न उरकून घेतलेल्या नट्या आनंदात जगतात. पूर – पाऊस – रोगांच्या साथी – अतिरेक्यांचे हल्ले होऊनही एकही समीक्षक मरत नाही. बाळबोध आणि हिडीस मराठी नाटकांचा धंदा करणारे नाट्यनिर्माते मरत नाहीत. सगळे मस्त जगतात आणि आपला चेतन बिचारा मरून जातो, ह्यासारखं मोठं दुर्दैव नाही.

आपली सामाजिक व्यवहारांची संस्कृती अतिशय संकोचलेली आहे. जवळच्या माणसाने आपल्यासाठी काही केलं तर त्याचे आभार मानणं आपल्याला औपचारिक वाटतं. कोणत्याही व्यासपीठावरून एखाद्या माणसाविषयी कृतज्ञतापूर्वक बोललं की ते कृत्रिमच असणार, असं आपल्याला वाटतं. प्रेमाचे, कृतज्ञतेचे, ऋण मानंण्याचे व्यवहार करायला आपण संकोच करतो आणि मग अचानक असा कुणाला मृत्यू आला की त्याला साधं थॅंक यू म्हणायचं राहून जातं. नाटक लिहिणाऱ्या, नाटक करणाऱ्या आम्ही सर्वांनी चेतनला एकदा मनापासून थॅंक यू म्हणायला हवं आहे. त्याला आत्ता हे सांगायला हवं आहे की, तू आमच्यासाठी फार महत्त्वाचा आहेस. जसं पाणी घडवता येत नाही, तशी तुझ्यासारखी माणसं घडवता येत नाही. शिबिरं घेऊन नाही, पुरस्कार देऊन नाही. ज्याला ओळखण्यात आपण सतत कमीच पडलो असं वाटतं, असा तुझ्यासारखा अद्भुत मित्रही परत तयार होणार नाही.

माझ्या कादंबरीचं पहिलं हस्तलिखित तयार झाल्यावर चेतन दातारला मी त्याचं मत विचारण्यासाठी वाचायला दिलं होतं. ती आमची पहिली भेट. त्याला आता दहा वर्षं झाली. त्यानंतर काही वर्षांनी नाटकाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना, माझा मित्र मोहित टाकळकर ह्याच्या आग्रहामुळे मी ’छोट्याश्या सुट्टीत’ हे नाटक लिहिलं. त्याचे प्रयोग सुरू झाले तेव्हा चेतनने माझ्याकडे नीट नजर वळवली होती. मधल्या काळात त्याने माझी विजय तेंडुलकरांशी गाठ घालून दिली आणि मी सतत तेंडुलकरांशी बोलेन, न संकोचता त्यांच्या आजूबाजूला राहीन ह्याची काळजी त्याने घेतली. अतिशय मोकळेपणाने आणि आग्रहाने मुंबईतील अनेक क्षेत्रांतील लोकांना त्याने माझी नाटकं आणि माझ्या फिल्म्स दाखवल्या. नाटकाविषयी कोण कसं बोलतं, कुणाला गंभीरपणे घ्यायचं आणि कुणाला समोर हसून नंतर सोडून द्यायचं, ह्याचे आडाखे त्याने मला शिकवले. मराठी समीक्षकांविषयीचा माझा एकसुरी विरोध त्याने पुसला आणि काही जाणत्या, ताज्या मनाच्या समीक्षकांशी गाठ घालून दिली. मुंबई शहराच्या पोटातल्या काही जादूमय गुहांमध्ये चेतनने मला फिरवलं. चित्रविचित्र जागा, भलीबुरी माणसं आणि भन्नाट गल्ल्यांची आम्ही उन्हापावसात केलेली सफर कशी विसरता येईल? अनेक महिने, वर्षं चालूच होती ती. माझ्या मागे लागून त्याने माझी नाटकं पुस्तकरूपात प्रकाशित करायला लावली आणि ’छोट्याश्या सुट्टीत’चं प्रॉडक्शन बूक प्रकाशित होताना त्याने त्याला प्रस्तावना लिहिली. मी त्याच्यासाठी एकही नाटक लिहिलं नाही, ह्यावरून तो मला फार टोचून बोलायचा. मी त्याला म्हणायचो की, मला तुझ्यासारखे दुब्यांच्या तालमीतले दिग्दर्शक नकोतच. तुम्ही लेखकाचा चोळामोळा करून त्याला कोपर्‍यात फेकून देता. नाटकाच्या तालमी करताना स्वतःच एवढा आरडओरडा करता की नट तुमच्या वर आवाज काढून नाटकात उगीचच बेंबीच्या देठापासून ओरडत सुटतात. वर वाट्टेल ते सीन, तमाशे आणि नाचगाणी तुम्ही नाटकात घुसडणार . बुवांच्या बाया आणि बायांचे बुवे करणार. कोण शहाणा नाटककार तुमच्यासाठी नाटक लिहील?

आपापल्या कामाचं चोख डॉक्यूमेंटेशन आणि रेकॉर्डिंग करण्याबाबत चेतनची पिढी आळशी आणि संकोचलेली होती. शिवाय आपल्या देशात कलाकाराचा दस्तऐवज तयार होण्यासाठी जितकं म्हातारं व्हावं लागतं, तितका चेतन झाला नव्हता. त्यामुळे चेतनचं सगळं काम, त्याच्या चुका, त्याची नाटकं, त्याचं म्हणणं हे सगळं त्याच्याबरोबर वाहून गेलं. तो मागे सोडून गेला काही उदास झालेल्या स्त्रियांना आणि पुरुषांना, एकदोन पुस्तकांना, काही फोटोंना आणि त्रोटक लिखाणाला. तो गेल्यावर काही दिवसांनी मला समजलं की, त्याच्या मृत्यूनंतरही अनेक महिने त्याच्या ऑर्कूटच्या पेजवर त्याच्यासाठी निरोप येत राहिले. लोक त्याच्याशी तो जिवंत असल्यासारखं गप्पा मारत राहिले, त्याला आपल्या मनातलं सगळं सांगत राहिले. त्याच्या ईमेलवर अजूनही पत्रं जातात . मेलिंग लिस्टीतून त्याला कोणीच काढलेलं नाही. त्यामुळे सर्व कार्यक्रमांची आमंत्रणं त्याला मिळत राहतात. आज अनेक कपाटांमधून चेतनचे फोटो असतील, काही कागदांवर चेतनचं हस्ताक्षर सापडेल. काही व्हिडिओटेप्स्‌ असतील, ज्या लावल्या की चेतन बोलताना दिसेल. त्याचा आवाज ऐकू येईल. त्याला नीट समजून घेण्यासाठी जरा जवळ जाऊन बघू, तर सगळं एकदम मुंग्यामुंग्यांचं दिसायला लागेल. चेतनला स्पर्श करू पाहावा तर बोटाला टीव्हीची जाडजूड थंडगार काच लागेल. आता फक्त इंटरनेटच्या अंतराळात चेतनची आठवण अधांतरी तरंगत राहील आणि आत्ता आली तशी अलगद जवळ येईल.

***

हा लेख मायबोली.कॉमवर पुनर्मुद्रित करण्यास परवानगी दिल्याबद्दल श्री. सचिन कुंडलकर यांचे मनःपूर्वक आभार.

***
प्रकार: 

अशीच गंमत त्यांना न ओळखणार्‍यांनी लेखाचं कौतुक करण्याबद्दलही वाटली का?
अशीच गंमत जे मेले तरी चाललं असतं त्यांच्याबद्दलही वाटली का?

सॉरीच हां पण जर लेख आवडायला अथवा नावडायला त्यातल्या मेन पात्रांचं खाजगी जीवन माहित असणे ही एक महत्त्वाची अट होती तर असे खाजगी लेख मुद्दाम लिहून सार्वजनिक माध्यमांतून छापतात कशाला? असा एक प्रश्न पडला.

जीवलग मित्रमैत्रिणींच्यातच फिरवायचा की.

एकदा तो सार्वजनिक केला की प्रत्येकजण आपला दृष्टिकोन सांगणारच. मग ज्यांना त्या व्यक्ती माहित आहेत त्यांनी आपल्याला अगदी 'आतली' बातमी माहित असल्यामुळे अमुक तमुक दृष्टिकोन चुकीचा आहे हे अहमहिकेनं सांगायचं हे जरा गंमतीशीर वाटलं.

अट वगैरे नाही पण लेख वाचूनच लक्षात येतय की त्यांची मैत्री होती. ते इस्टॅब्लिश झाल्यामुळे लेख आपोआप त्या अँगलनी वाचला जातो.
पुढे ते मरण्याविषयी मजकूराचं सुद्धा, मला वाटतं कोणाला मनापासून राग आला की हे असले विचार मनात डोकवतात फक्त ते मोठ्यानी बोलून दाखवावे की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. (मला वाटतं साधनांनी पण ह्याच उल्लेख केलाय त्यांच्या पोस्टीत). अर्थात ते विचार बोलून दाखवल्यावर कोणाला ते बालिश, टोकाचे वाटणे टोटली शक्य आहे.

>> धन्य टिपापावरील सगळेजण एकच अभिप्राय का लिहित नाही? सगळ्यांचे विचार आचार अभिप्राय सेम टु सेमच असतात.

बी, पुन्हा टीपापाचं नाव निष्कारण घेच आता. नाही तुझी विपू तोडक्यामोडक्या इंग्रजीतल्या पोकळ धमक्यांनी भरून टाकली तर बघ.

टिपापा = टिका पार्टी पारले

वरचे ते वाक्य मी जर नसते लिहिले ना तर आत्ता ह्या वेगळ्या प्रतिक्रिया आल्या त्याही नसत्या आला. सो क्रेडीत गोज टु माय वाक्य Happy

विपुची वाट बघत आहे!!!!

दातार व कुंडलकर किती जवळचे मित्र होते हे वा नव्हते हे आधी माहिती असावेच असा आग्रह लेखकाचाही नाहिये. रादर या लेखातून ते उत्कटपणे बाहेर येत आहे. त्यांचे इतरांनी मरण्याबद्दल असलेले उल्लेख हे सर्कास्टिक आहेत - प्रस्थापित संस्था, समिक्षक यांवरचा राग त्यातून दिसतो. तो राग असण्याचे लेखकास संपूर्ण स्वातंत्र्य आहे. लेख चेतन व त्याचे मराठी नाटकक्षेत्रात असलेले योगदान/वावर यावर आहे. मला तरी कुठे कुंडलकरांनी केवळ स्वतःबद्दल काही लिहिल्याचे वा स्वतःची टिमकी वाजवल्याचे या लेखात आढळले नाही. जे उल्लेख आलेत (उदा. तेंडुलकरांची ओळख वगैरे) ते दातारांच्या संदर्भानेच आलेत.

प्रथमच असे झाले की मी प्रतिसाद आधी वाचले आणि नंतर लेख! मला चेतन दातार , कुंडलकर ह्यांच्याबद्दल अक्षरशः काहीही ज्ञान नाही. वरील चर्चेत भाग घेण्याइतकी अक्कलही माझ्याकडे नाही.

पण मला हा लेख अतिशय आवडला. आणि सर्वात आश्चर्य ह्याचे वाटले की माझ्यासारख्या माणसाला हा खालचा परिच्छेद चक्क आवडला, आपलासा वाटला.

>>>बाकी इतर अनेकजण जाऊ शकले असते. महाराष्ट्रातील रटाळ दिग्गजांचा गोंगाट तरी कमी झाला असता. रम्य जुन्या आठवणींची गावठी दारू पिऊन स्मृतींच्या चिखलात लोळणारे, कामाची ताकद संपून परीक्षक वगैरे बनलेले, बुद्धी गंजलेले कलाकार मागे राहतात. घरी कंटाळा आला म्हणून किंवा घरी उकडत आहे आणि नाटकाच्या तालमीच्या हॉलमध्ये पंखा आहे इतक्या सध्या कारणाने नाटक करणाऱ्या आणि नाटक करताकरता लग्न उरकून घेतलेल्या नट्या आनंदात जगतात. पूर – पाऊस – रोगांच्या साथी – अतिरेक्यांचे हल्ले होऊनही एकही समीक्षक मरत नाही. बाळबोध आणि हिडीस मराठी नाटकांचा धंदा करणारे नाट्यनिर्माते मरत नाहीत. सगळे मस्त जगतात आणि आपला चेतन बिचारा मरून जातो, ह्यासारखं मोठं दुर्दैव नाही.<<<

ह्यात ते लोकं मरावेत ही इच्छा खरे तर नाहीच आहे. ही एक तगमग आहे एका क्षेत्राच्या र्‍हासाला पाहून झालेली! त्या क्षेत्रातीलच कोणालातरी देवाला न्यायचेच होते तर त्या क्षेत्राच्या भल्यासाठी इतर कित्येकांना नेलेले बरे पडले असते ही भावना माणसाच्या आयुष्यात एखाद्या वळणावर अतिशय अस्सलपणे अनुभवास येते. त्यात कोणीतरी विशिष्ट दुसरे मरावे असे खरे तर काही नसतेच.

लेख आवडला बुवा! मागे कुंडलकरांचे काही लेखन आलेले होते ते आवडलेले नव्हते. ह्या लेखात चेतन दातारांच्या जाण्याने निर्माण झालेली परिस्थिती, त्या परिस्थितीबाबतची तळमळ आणि चेतन दातारांशी असलेले एक गूढ नाते समोर येत आहे असे वाटले.

माझ्या ह्या प्रतिसादाचा अर्थ मी वरीलपैकी कोणाशी सहमत / असहमत आहे वगैरे असा काहीच नाही. हा एक स्वतंत्र व प्रामाणिक प्रतिसाद मानला जावा इतकीच अपेक्षा!

-'बेफिकीर'!

>>पब्लिक केलेला लेख असेल तर न ओळखणारेच वाचण्याची शक्यता जास्त नाही का ?!<<
हो, पण बॅक्ग्राउंड माहित नसताना निगेटिव लिहिण्याचा अट्टाहास का?

>>अशीच गंमत जे मेले तरी चाललं असतं त्यांच्याबद्दलही वाटली का?<<
भावनेच्या भरात लिहिलेल्या सगळ्या गोष्टी लिटरली घ्यायच्या नसतात...

>>सॉरीच हां पण जर लेख आवडायला अथवा नावडायला त्यातल्या मेन पात्रांचं खाजगी जीवन माहित असणे ही एक महत्त्वाची अट होती तर असे खाजगी लेख मुद्दाम लिहून सार्वजनिक माध्यमांतून छापतात कशाला?<<
लेखात मांडलेल्या घटनांची माहिती नसेल तर ती माहित करुन घेणे हि वाचकाची जबाब्दारी आहे - प्रतिक्रिया देण्यापुर्वि. नेट एटिकेट्स म्हणतात त्याला...

परत एकदा, वरील तिन्ही प्रतिक्रिया माझ्या कमेंटमधल खालंचं वाक्य न समजल्यामुळे आलेल्या आहेत:

या सगळ्या बाबींचा काँटेक्स्ट विचारात न घेता या लेखाला दांभिक ठरवतायत, हे बघुन गम्मत वाटली...

कुठल्याहि गोष्टीचा काँटेक्स्ट समजावुन न घेता, वाक्यांचा अर्थ समजावुन न घेता प्रतिवाद करण्याची उर्मी जिथे-तिथे बळावलेली आहे; हे निरिक्षण पुन्हा इथे नोंदवतो... Happy

आजकाल टण्या आणि माझे विचार जुळू लागले आहेत ह्याचे भय वाटू लागले आहे
>
मला देखील. मी हेच लिहिणार होतो इथे इतक्यात तुम्ही लिहिलेत. आता अजून भय.
भय इथले संपत नाही

>> लेखात मांडलेल्या घटनांची माहिती नसेल तर ती माहित करुन घेणे हि वाचकाची जबाब्दारी आहे - प्रतिक्रिया देण्यापुर्वि. नेट एटिकेट्स म्हणतात त्याला...

चेतन दातार वारले ही घटना माहिती होती. लेखकाचं आणि त्यांचं घनिष्ट नातं असावं हे लेखातून पुरेसं स्पष्ट होत आहे. आमची जिवाभावाची माणसं अकालीसुद्धा गेल्याचे अनुभव खात्यावर जमा (?) आहेत. आणखी काय माहिती करून घ्यायला हवी होती?

नेट एटिकेट्स कळतात आणि एकाची भलावण करण्यासाठी अजिबात संबंध नसलेल्या इतरांना (नाटक करता करता लग्न उरकून घेणार्‍या नट्या?!!) तुच्छ लेखू नये हा साधा शिष्टाचार कळत नाही?

दातारांबद्दल लिहिलं आहे ते आवडलं. व्यक्तिचित्र वाचायला नेहमीच आवडतात. 'चेतनने जाण्याची काहीच गरज नव्हती' इथपर्यंत इंटरेस्ट घेउन वाचला गेला लेख. त्यानंतरचा सगळा पॅरा वाचून तिडिक गेली अगदी डोक्यात. एकही समीक्षक मरत नाही???? समिक्षकांबद्दलचा एकसुरी विरोध दातारांनी पुसला असं नुसतं लिहिण्यापुरतंच.

असो, २-३ टायपो राहून गेल्या आहेत लेखात.

लेख वाचला प्रामाणिक आणि दातारान्च्या प्रेमापोटी लिहिलेला वाटला .
काही प्रतिक्रिया वाचुन राज यांच मत अगदी पटलं -- / कुठल्याहि गोष्टीचा काँटेक्स्ट समजावुन न घेता, वाक्यांचा अर्थ समजावुन न घेता प्रतिवाद करण्याची उर्मी जिथे-तिथे बळावलेली आहे; हे निरिक्षण पुन्हा इथे नोंदवतो...--- /

धन्यवाद चिनुक्स!

मी नाट्यक्शेत्रात जरी काम केले नसले तरी ' जीव ओतून, दुनियेला फाट्यावर मारून ' काम करणारी माणसं, मित्र जवळून पाहिले आहेत. त्यामुळे लेख भावला.

मामी + १. सगळीकडे यांची हिच केविलवाणी धडपड चालू असते.

लेखाबद्दल, आवडला. असे मनातले विचार लिहिता येणे खुप मोठे वरदान आहे कुंडलकरांना. अजुन वाचायला आवडेल.

आजकाल टण्या आणि माझे विचार जुळू लागले आहेत ह्याचे भय वाटू लागले आहे हाहा>>>

त्याचे तुमच्यापेक्षा आम्हाला जास्त भय वाटू लागले आहे ::फिदी:

लेख आवडला. चेतन दातार वा लेखक कोण हे ठाऊक नसुनही आवडला.
कारण त्यात व्यक्त केलेले कित्येक विचार आपल्याही मनात कधीनाकधी उद्भवलेत याची खात्री पटत गेली.
होय, अगदी, या व्यक्तिऐवजी त्या दुसर्‍या व्यक्ति का गेल्या नाहीत हा विचारही.
पण मनात उद्भवलेले सगळेच विचार जसेच्या तसे "सत्य" म्हणून व्यक्त करण्याची मुभा नसते, मुभा असली तरी वैयक्तिक तितकी प्रज्ञा व ताकद नसते, कटू असले तरी त्या त्या सत्याला सामोरे जायची. अन मग तिथुनच सुरु होतो प्रत्येकाच्या जीवनातील विविध मुखवटे चढवुन रंगविल्या जाण्यार्‍या नाटकांचा. खोटेपणाचा.
असो.
>>>>> अशी माणसं गेली की मी नेहमी त्या पुस्तकांचा विचार करत राहतो. <<<<
मला सर्वात जास्त हे वाक्य दचकवुन गेले. माझ्या माहितीतील व्यासंगी लोक गेले तेव्हा त्यांच्या पुस्तकांचा अफाट संग्रह त्यांच्या त्यांच्या चुलबोळक्यात दंग वारसांनी लायब्ररी वगैरे "दान" देऊन ते पुण्य पदरात पाडून घेतले, व लायब्ररीच्या अंधारकोठडीत, पुन्हा कधीही कुणीही उघडुन बघूही नये अशी शिक्षा त्या त्या संग्रहाच्या नशीबी आली.
एका ठिकाणी तर मी स्वतः तो संग्रह मागितला होता अभ्यासाला, पण लौकर विल्हेवाट लावण्याच्या घाईत /नादात तो संग्रह कुठल्याश्या लायब्ररीत गेला... मी इतकेच म्हणले, की नशिब रद्दीवाल्याला नाही विकला.
अर्थात रद्दीवाल्याला विकला असता तर कुठेतरी परत रस्त्यावर त्यातिल काही पुस्तके अर्ध्या किमतीत लोकांना उपलब्ध झाली ही असती, व लायब्ररीच्या कपाटांची अंधारकोठडी टळली असती असेही वाटून जाते.
पण असोच.
दचकायचे मूळ कारण इतकेच होते, की माझ्यामागे माझ्या पुस्तकांची, मी जमविलेल्या विविध लहानमोठ्या गोष्टींची / संग्रहाची काय गत होईल? की माणुस गेल्यावर त्याचे सर्व भंगारातच काढले जाते?

लेख वाचला, बर्‍याच अन्शी म्रु,स्वातीशी सहमत! (लेखाचा सुरवातिचा भाग आवडला तरी शेवटाच्या पॅरात पार माती झालिये)

आपापल्या कामाचं चोख डॉक्यूमेंटेशन आणि रेकॉर्डिंग करण्याबाबत चेतनची पिढी आळशी आणि संकोचलेली होती. शिवाय आपल्या देशात कलाकाराचा दस्तऐवज तयार होण्यासाठी जितकं म्हातारं व्हावं लागतं, तितका चेतन झाला नव्हता. त्यामुळे चेतनचं सगळं काम, त्याच्या चुका, त्याची नाटकं, त्याचं म्हणणं हे सगळं त्याच्याबरोबर वाहून गेलं.>>

हे अस दुसर्‍याच्या बाबतित घ्डल्या गोश्टीविषयी कुणा तिसर्‍यालाच दोष देणे हे दुट्टपीपणाचे लक्षण आहे( हा मागे एका मायबोलिच्या दिवाळि अन्कात कुन्डल्कराच्या लेखात पण जाणवला)

>>>> हे अस दुसर्‍याच्या बाबतित घ्डल्या गोश्टीविषयी कुणा तिसर्‍यालाच दोष देणे हे दुट्टपीपणाचे लक्षण आहे( हा मागे एका मायबोलिच्या दिवाळि अन्कात कुन्डल्कराच्या लेखात पण जाणवला) <<<<
मुद्दा योग्य.
पण चोर सोडून सन्याशाला बळी देण्याचि परंपरा तर गेली बरीच वर्षे इकडे जोमात सुरू आहे.... मागे जे जे काही घडले, सध्या घडतय त्याला फक्त अन फक्त (प्रगत?) साडेतीन टक्क्यांचा कावेबाजपणा कारणीभूत आहे अशा घोडेछाप नि:ष्कर्षाची सवय जिकडे तिकडे आहेच. त्याची थोडी तरी बाधा होणारच ना? तेवढ्या मुद्द्याला दुर्लक्ष करायच झाल...

आपापल्या कामाचं चोख डॉक्यूमेंटेशन आणि रेकॉर्डिंग करण्याबाबत चेतनची पिढी आळशी आणि संकोचलेली होती. शिवाय आपल्या देशात कलाकाराचा दस्तऐवज तयार होण्यासाठी जितकं म्हातारं व्हावं लागतं, तितका चेतन झाला नव्हता. त्यामुळे चेतनचं सगळं काम, त्याच्या चुका, त्याची नाटकं, त्याचं म्हणणं हे सगळं त्याच्याबरोबर वाहून गेलं

हे अस दुसर्‍याच्या बाबतित घ्डल्या गोश्टीविषयी कुणा तिसर्‍यालाच दोष देणे हे दुट्टपीपणाचे लक्षण आहे

मला वाटते यात लेखकाने दोष चेतनलाही दिला आहे. "आपापल्या कामाचे डोक्युमेंटेशन" म्हटले म्हणजे ज्याने काम केले त्यानेच ते डोक्युमेंटेशन करावे असे अभिप्रेत आहे ना?

दस्तावेज म्हटलेय यात कलाकाराचे आत्मचरित्रही यात अंतर्भुत असावे. आपल्याकडे स्वतःछ्या कामाबद्दल प्रामाणिकपणॅ लिहिणे क्वचितच घडते आणि जे काही घडते ते बहुतेकवेळाअ आत्मचरित्राच्या माध्यमातुन. ते म्हातारपणीच लिहायचे असा एक समज आहे आणि त्यात बहुतेक वेळा परखड विश्लेषणाऐवजी आत्मगौरव दिसुन येतो. आपल्या क्षेत्राचा आढावा घेण्याऐवजी व्यक्तीगत आयुष्याचा आढावा, तोही गोडगोड, असा घेतला जातो. त्यामुळॅ कलाकार म्हणुन तो माणुस कसा होता हे हाती लागत नाही. लेखकाला कदाचित याबद्दल बोलायचे असावे. विजयाबाईंच्या "झिम्मा" चे कौतुक त्यात त्यांच्या काळाचा दस्तावेज योग्यरित्या उतरला यासाठीच झाले ना?

Pages