वीज, नोकरी, निवास, रोजगार, भाकरी
त्याच त्याच अडचणी व तेच ते निराकरण
- डॉ. कैलास गायकवाड
एक 'मध्यमवर्गीय घुसमट' ह्या दोन ओळींतून डॉ. गायकवाड खुबीने मांडतात. अख्खी हयात ह्या मूलभूत गरजांच्या पूर्ततेसाठी झिजत झिजत निघून जावी, ही एक शोकांतिकाच ! मुंबईसारख्या महानगरात टीचभर घरात राहणारी ७-८ जणांची कुटुंबं वर्षानुवर्षं ह्या प्राथमिक गरजांवर तीच ती वेळ मारून नेणारी उपाययोजना करत आहेत. समस्या बदलत नाहीत आणि उपाययोजनाही ! आणि हे एक प्रकारचे दुष्टचक्र थांबवण्यासाठी, परिस्थितीला भिडण्याची हिंमत, डोक्या-खांद्यावर असलेला जबाबदारीचा डोलारा करू देत नाही. ह्या विवंचनेत, घुसमटीत लोक जगत नसतात, फक्त जिवंत राहत असतात. दोन दोन पिढ्या तेच हाल काढून दिवस ढकलत असताना, विकासाच्या चक्राच्या गतीला जवळून पाहणारी नवी पिढी मात्र ही फरफट नाकारते आणि जबादारीच्या डोलाऱ्यासकट परिस्थितीशी झगडा करायची हिंमत करते. 'हिंमत-ए-मर्दा तो मदद-ए-खुदा' म्हणतात आणि एक दुष्टचक्र थांबतं. घाण्याला जुंपलेले बैल मुक्त होतात आणि एक मोठ्ठा मोकळा श्वास घेतात.
तर कधी ही हिंमत अंगाशीही येते आणि डोलारा कोसळून त्या ढिगाऱ्याखाली दबण्याचीही वेळ येते. रक्ताचं पाणी करून, पोटाला चिमटा काढून, अनन्वित कष्ट उपसून केलेली जमवाजमव हातातून निघून जाते आणि पटावर सोंगट्या पुन्हा एकदा पहिल्या घरांत येतात. परत एकदा -
त्याच त्याच अडचणी व तेच ते निराकरण
- सुरु होतं. दुष्टचक्र थांबत नाही. आता ते भरडायलाही लागतं.
लखलखत्या मुंबापुरीच्या अस्मानी श्रीमंतीच्या पायाशी अश्या अनेक घुसमटी मूकपणे सगळा झगमगाट बघत असतात. त्यांपैकीच एक आहे लालबागमधल्या एका चालीत राहणारं 'नाईक' कुटुंब. थोरल्या मुलाचं - अमितचं (अंकुश चौधरी) - लग्न होऊन घरात 'मंजिरी' (मुक्ता बर्वे) येते आणि आयुष्याची ३१ वर्षं केवळ तडजोडी करत घालवलेल्या अमितला राहण्यासाठी एका मोठ्या घराची गरज प्रकर्षाने जाणवायला लागते. समजूतदार मंजिरी, घरी मसाले बनवून विकणारी आई (वंदना गुप्ते) आणि धाकटा हिप-हॉपर भाऊ अशी चौघांची टीम नव्या घराच्या स्वप्नाला साकार करण्यासाठी झटायला लागते. अल्पसंतुष्ट वडिलांना हा 'उपद्व्याप' वाटत असतो, पण चौघांना ह्या एकाच ध्येयाने जणू झपाटलंच असतं.
एका मध्यमवर्गीय कुटुंबाची धडपड आपण ह्यापूर्वीही पाहिलेली आहे. अडचण, त्यातून बाहेर पडत असताना नवीन संकट अशी सगळी कहाणी आपल्याला तोंडपाठ असते. चित्रपटाचं नाव - 'डबल सीट' - सुद्धा आपल्याला पुढे होऊ घातलेल्या तथाकथित नाट्याची कल्पना देते. जो अंदाज आपण मनाशी बांधतो, त्यापेक्षा वेगळं काही होत नाही. एका पतपेढीत जेव्हा अमित सगळी मिळकत जमा करत असतो, तेव्हाच आपल्याला माहित असतं की ही 'पतपेढी' आहे म्हणजे ही बुडणार आहे, बुडतेच !
अक्षरश: काहीही अनपेक्षित न घडणारं कथानक केवळ आणि केवळ चारही प्रमुख कलाकारांच्या लाजवाब कामामुळे बघावंसं वाटतं. अंकुश चौधरीने डॅशिंग भूमिका अनेक केल्यात. 'दुनियादारी'तला त्याचा दिग्या लोकांनी खूप डोक्यावर घेतला. पण खऱ्या अर्थाने जर तो कुठल्या भूमिकेत शोभला असेल तर ती 'अमित नाईक' ह्या सोशिक, समजूतदार मध्यमवर्गीय सरळमार्गी तरुणाची ठरावी. एकाही फ्रेममध्ये तो मिसफिट वाटत नाही की 'अमित नाईक' व्यतिरिक्त इतर कुणी वाटत नाही, तो स्वत:सुद्धा नाही.
'मंजिरी'च्या भूमिकेत मुक्ता बर्वे अशी दिसली आणि वावरली आहे की कुणाही अविवाहिताने ताबडतोब सांगावं, 'मला अशीच बायको हवी!' तिचं सौंदर्य ईश्वरी नाही. पण साधेपणातल्या सौंदर्याची ती परिसीमा असावी. ती अगदी सेंट पर्सेंट 'गर्ल नेक्स्ट डोअर' वाटते. सहजाभिनय हा काही तिच्यासाठी नवीन नाही. (अवांतर - मिलिंद जोशींसोबतचा तिचा 'रंग नवा' हा कवितांचा आगळावेगळा कार्यक्रम पाहिल्यानंतर तर मला तिच्याविषयी प्रचंड आदर वाटायला लागला आहे. 'मुक्ता बर्वे' हे एक अभ्यासू, तल्लख, चतुरस्र व्यक्तिमत्व आहे ह्याबद्दल अजिबातच शंका नाही.)
विद्याधर जोशी व वंदना गुप्ते ह्यांना प्रत्येकी एक दृश्य असं मिळालं आहे, ज्यात त्यांना आपली 'सिग्नेचर' सोडायची संधी होती. अशी संधी असे कसलेले अभिनेते सोडतील, हे अशक्यच ! तो बाप आणि ती आई मन जिंकतात.
मराठी नाट्यसृष्टीचा मराठी चित्रपटसृष्टीवर जो संस्कार आहे, त्यामुळे सामान्यातले सामान्य मराठी चित्रपटही उत्तमातल्या उत्तम हिंदी चित्रपटांपेक्षा सरस ठरतात. ताकदीचे नवे-जुने अभिनेते ही रंगमंचाचीच देणगी. त्यामुळे इथे कलाकारांकडून उत्तम काम काढून घेताना दिग्दर्शकाची नक्कीच दमछाक होत नसावी. अश्या वेळी दिग्दर्शक इतर गोष्टींवर अधिक चांगल्या प्रकारे लक्ष केंद्रित करू शकत असेल का ? म्हणजे, मला असं म्हाणायचं आहे की जरी संकलन, छायाचित्रण, लेखन, पटकथालेखन, संगीत वगैरे सगळं सांभाळणारे जरी ते ते लोक असतील, तरी त्यांच्याकडूनही हवं ते करवून घेण्याची अंतिम जबाबदारी दिग्दर्शकाचीच ना ? मग ते बाप-मुलाच्या भांडणावेळी धाडकन झूम इन, झूम आउट होणारं कॅमेरावर्क का ? आरडाओरड्याने संपृक्त गाणी का ? अशक्य पांचट डायलॉग्स का ? कहाणीची तीच ती साचेबद्ध वळणं का ? त्यांची हाताळणीही अगदी नेहमीसारखीच का ?
असे सगळे 'का?' घेऊन आपण बाहेर येतो. खूप आनंददायी नसलेला, पण अगदीच कंटाळवाणाही नसलेला एखादा प्रवास संपावा आणि सगळ्या लहानश्या बऱ्या-वाईट स्मृती तिथेच त्या टप्प्यावर आपण अगदी सहजपणे सोडून द्याव्यात, तसाच हा 'डबल सीट' प्रवास संपतो. मनाची पाटी कोरीच राहते. कारण हा चांगल्या बाईकवरचा हा रोजचा प्रवास असतो. तेच खड्डे, तीच वळणं आणि त्याच जागेपासून त्याच जागेपर्यंत.
रेटिंग - * * १/२
http://www.ranjeetparadkar.com/2015/08/movie-review-double-seat.html
छान परिक्षण. बघायचा आहेच.
छान परिक्षण. बघायचा आहेच.
मस्त.
मस्त.
mala tar khooopch aavadala
mala tar khooopch aavadala karan he pratyek mumbaikarache pratyekachya gharatil aahe aani to movie pahatana ase vatat hote ki aaplich kahani aahe agadi to Amit aani Manjiri madhe aapanch disat hoto. Agadi ha swanubhavch hota. mast aamhala tar prachand aavadala. Agadi 100% marks aamchyakadun
पार चिरफाड केलीत की..
पार चिरफाड केलीत की..
मस्त! परिक्षण.
मस्त! परिक्षण.
डबल सीट पाहिलाय. साधी सोपी
डबल सीट पाहिलाय. साधी सोपी मांडणी आणि कसलेले अभिनेते. विषयात नवीन काहीच नाही. आपल्याला जरी नाही, तरी आपल्या आधीच्या पिढीला नक्की आवडेल असा सिनेमा. जे एकत्र कुटूंबात काही दिवस राहिलेत ते तर नक्की रिलेट करतील यातल्या प्रत्येक गोष्टीला. मातीच्या चुली हे जरा पॉश. व्हर्जन म्हणता येईल. व्यक्तिस्वातंत्र्याचाच संघर्ष असला दोन्हीकडे तरी पार्श्वभूमी आणि परिणाम दोन्ही वेगळे आहेत.
रसप, हे परीक्षण आहे की प्रेक्षकांनी तिकीट खिडकीपर्यंत जाऊच नये याचा बंदोबस्त? आधीच चित्रपट साधाभोळा. त्यातही जे काय 'नाट्य' होतं तेही तुम्ही जाहीर करून टाकलंत. अभिनेत्यांची नावं वाचूनच या सिनेमाला जाईल एवढा तरी मराठी प्रेक्षक सुजाण आहे. परीक्षण म्हणजे सिनेम्याचं रिव्हर्स इंजिनियरींग करून लिहीलेलं स्क्रिप्ट नव्हे. मराठी नव्या जुन्या पिढीचे काही बदललेले कंगोरे अनेक प्रसंगात किती ठळक केले आहेत, चाळीत न करायला मिळालेल्या रोमान्सचे तुकड्या तुकड्यातले अवशेष बघूनही जिगसॉ पझलसारखं पूर्ण चित्राची कल्पना येते, नवर्यावर प्रेम करण्यासाठी चान्स मारणारी अवखळ मराठी नवरी मी फार क्वचित पाहिलीये पडद्यावर. अशा कितीतरी गोष्टी होत्या नमूद करण्यासारख्या. शिवाय 'किती सांगायचंय मला तुला' हे स्पृहा जोशीनं लिहीलेलं गाणं.. पण हे सगळं सोडून तुम्हाला वारंवार सिनेम्यात नवीन काही नाही, रोजचीच घुसमट हेच सांगावंसं वाटलं त्याचा खेद आहे.
...
...
मला वाटत नाही मी सगळी स्टोरी
मला वाटत नाही मी सगळी स्टोरी सांगितली आहे. मुळात सांगण्यासारखं किंवा गुपित फोडण्यासारखं त्यात काही नाहीच आहे. चित्रपट मध्यमवर्गीय आशा-आकांक्षांवर आहे, इतकी एकच ओळ सुज्ञ प्रेक्षकाची संपूर्ण मानसिक तयारी करते.
एकाने 'सगळी स्टोरी सांगून टाकलीत!' असं म्हटल्यावर अनेक लोक त्याला '+१' करतील, हे मला आशूडींचा प्रतिसाद वाचल्याबरोबर कळलं होतंच आणि ते आता 'मनरंग'पासून सुरूही होईल.
तसेच वाटत असल्यास मी परीक्षण काढून टाकतो, माझी अजिबात हरकत नाही.
अर्र! परीक्षण वाचायला आले
अर्र! परीक्षण वाचायला आले होते..
रसपनी काय लिहिले होते ते वाचल
रसपनी काय लिहिले होते ते वाचल नाही पण मला नाही आवडला चित्रपट .
मटामधल परीक्षण वाचून गेलो होतो . हातीकाही फारस लागल नाही. एक दोन
ठिकाणच्या अनावश्यक बोल्ड दृश्यांपेक्षा पटकथेवर मेहनत घेतली असती तर बर झाल असत. मुंबईसारख्या शहरात नवीन घर घेण् हा खरेतर संवेदनशील विषय आहे. तो विषय नीट व्यवस्थित फुलवुन मांडता
आला असता. पण पदरात पड़ते ती
सरधोपट मांडणी . इंटरवल नंतरचा
भाग तर अक्षरश उरकला आहे. काय होणार आहे याचा अंदाज आधीच येतो
आणि तसेच होते. निदान मांडणी तरी
नीट हवी होती. कलाकारांनी ठीक ठाक अभिनय केलाय. वंदना गुप्तेच काम आवडल. विशेष रोल नसुनहि छान काम केलेय. आरती वडबाग़ळकर छोट्याश्या
भूमिकेत छाप पाड़ते. मुक्ता बर्वेच काम ठीक वाटल. मला स्वतला ती
गोंधळलेली वाटली.
काय राव रसप? आम्हाला ठरवू
काय राव रसप? आम्हाला ठरवू द्या की वाचून काय ठरवायचे ते..... एखाद्या प्रतिक्रियेला घाबरुन परिक्षणच डिलीट मारणे नाही बुवा आवडले आपल्याला
डबलसीट साठी रसपच्या
डबलसीट साठी रसपच्या परिक्षणाची वाटच बघत होते प्रचंड हिरमोड झाला
इथून काढून का बरे टाकलंत ?
इथून काढून का बरे टाकलंत ?
बाकी ते कॅशेमधून वाचला .
इतर परीक्षणाच्या तुलनेने टुकार !
आजकालची परीक्षणे ड्यूटी म्हणून येत आहेत हे जाणवत आहेत.
गीतकार आणि कवी मधे हाच फरक असतो बहुधा !
.
.
रसप, परि़क्षण काढून टाकायला
रसप, परि़क्षण काढून टाकायला नको होते. आम्हाला तुमची परिक्षणे वाचायला आवडतात व पुढेही आवडतील याची नोंद घ्यावी.
मी पण परि़क्षण च वाचायला आले
मी पण परि़क्षण च वाचायला आले होते . .
<<असं म्हटल्यावर अनेक लोक त्याला '+१' करतील>> हि रसाप यांची भूमिका पण पटली
<<असं म्हटल्यावर अनेक लोक
<<असं म्हटल्यावर अनेक लोक त्याला '+१' करतील>> हि रसाप यांची भूमिका पण पटली
>>
आणि मला जराही नाही पटली
जनमताचा आदर ठेवणे हे समजू शकतो, ते योग्यही असते. पण ते जनमत तयार व्हायच्या आधीच लेख उडवला हे नाही पटले.
एकतर आपले काहीतरी चुकले असे वाटत असेल तर ते प्रामाणिकपणे कबूल करून तो लेख उडवावा,
किंवा जर आपले काहीच चुकले नाही असे वाटत असल्यास अजून ईतर लोक काय म्हणतात ते बघावे, आणि मग आत्मपरीक्षण करावे.
आपण पुन्हा लेख प्रकाशित कराल या आशेत आपल्या परीक्षणांचा एक नियमित वाचक, ऋन्मेष
परीक्षण वाचायला आले
परीक्षण वाचायला आले होते....>+१
परीक्षण वाचायला आले
परीक्षण वाचायला आले होते....>+१ <<+११
पुनर्प्रकाशित केला आहे.
पुनर्प्रकाशित केला आहे.
मला वाटलं नव्हतं, तुम्ही
मला वाटलं नव्हतं, तुम्ही पूर्ण लेखच काढून टाकाल! किंवा पुन्हा टाकाल! पुन्हा टाकताना तरी सगळी गोष्टच सांगणारी वाक्यं बदलाल अशी माफक अपेक्षा होती. आता तुम्ही वर्तमानपत्रातूनही लिहीता म्हटल्यावर ही काळजी घेणं तुमची जबाबदारी असायला हवी.
धन्यवाद ! आपले मत समजले. कळवत
धन्यवाद ! आपले मत समजले. कळवत राहावे ही विनंती.
* * १/२ कमीच आहेत...
* * १/२ कमीच आहेत... माझ्याकडुन ४*
परीक्षणाबद्दल धन्यवाद,
परीक्षणाबद्दल धन्यवाद, वाचले.
अंकुश चौधरीसाठी बघायची इच्छा आहेच. तो या भुमिकेत शोभणार याची खात्री होतीच. कारण तो बेसिकलीच खूप साधा सिंपल आहे. बरेचदा वाईटच वाटते त्याच्याबद्दल की त्याला फारश्या चांगल्या भुमिका वा चित्रपट मिळाले नाही जितके मिळायला हवे होते.
अंकुश चौधरीसाठी बघायची इच्छा
अंकुश चौधरीसाठी बघायची इच्छा आहेच. बरेचदा वाईटच वाटते त्याच्याबद्दल की त्याला फारश्या चांगल्या भुमिका वा चित्रपट मिळाले नाही जितके मिळायला हवे होते.+१
भरपूर मिळाल्या की
भरपूर मिळाल्या की !
दुनियादारीत काय चांगला रोल होता त्याचा.. पण उपयोग शून्य.
रसप, परीक्षण अतिशय पटल .
रसप, परीक्षण अतिशय पटल . स्पष्टपणे लिहिल्याबद्दल अभिनंदन
पाहिला काल नाही आवडला अंकुश
पाहिला काल
नाही आवडला
अंकुश आणि वंदना गुप्ते ह्या दोघांच काम आवडलं आणि त्यांची कॅरेक्टर्स सुद्धा
मुक्ता ठीकठाक
मला मंजिरी हे पात्र विशेष आवडल नाही
दुनियादारीत काय चांगला रोल
दुनियादारीत काय चांगला रोल होता त्याचा.. पण उपयोग शून्य.
>>>
उपयोग शून्य ???
म्हणजे...?
कोणते परीमाण लावून मोजता आपण उपयोग?
अजरामर केली त्याने दिघ्याची भुमिका ..
आणि व्यावसायिक यश म्हणाल तर दुनियादारी बॉक्स ऑफिसावर एक मैलाचा दगड ठरलाय..
आणि भरपूर नाही मिळाल्यात त्याला साजेश्या भुमिका .. यात त्याची चूक नसून मराठी चित्रपटसृष्टीची मर्यादा.. अन्यथा आपला अमिताभ बच्चन कम जॅकी श्रॉफ कम सनी देओल कम अक्षयकुमार कम अजय देवगण होता तो.. आहे तो
अजरामर !!
अजरामर !!
Pages