जम्मू- कश्मीर मदतकार्याच्या आठवणी- १४

Submitted by मार्गी on 12 August, 2015 - 06:08

२०१४ च्या सप्टेंबरमध्ये जम्मू- कश्मीरमध्ये आलेल्या महापूरानंतर तिथे मदतकार्यात घेतलेल्या सहभागाच्या आठवणी माबोकरांसोबत शेअर करत आहे. सर्वांना अभिवादन! (अवांतर- हे काम उदात्त/ ग्रेट इत्यादी नसून उत्स्फूर्त केलेलं सामान्य कामच आहे. आपण प्रत्येक जण असं काम कुठे ना कुठे करतंच असतो. ज्यांच्याकडे तशी पॅशन असते, तसे लोक ते काम जास्त काळ करतात. तेव्हा उदात्त/ ग्रेट असं काही मानू नये. धन्यवाद!)

जम्मू- कश्मीर मदतकार्याच्या आठवणी- १
जम्मू- कश्मीर मदतकार्याच्या आठवणी- २
जम्मू- कश्मीर मदतकार्याच्या आठवणी- ३
जम्मू- कश्मीर मदतकार्याच्या आठवणी- ४
जम्मू- कश्मीर मदतकार्याच्या आठवणी- ५
जम्मू- कश्मीर मदतकार्याच्या आठवणी- ६
जम्मू- कश्मीर मदतकार्याच्या आठवणी- ७
जम्मू- कश्मीर मदतकार्याच्या आठवणी- ८
जम्मू- कश्मीर मदतकार्याच्या आठवणी- ९
जम्मू- कश्मीर मदतकार्याच्या आठवणी- १०
जम्मू- कश्मीर मदतकार्याच्या आठवणी- ११
जम्मू- कश्मीर मदतकार्याच्या आठवणी- १२
जम्मू- कश्मीर मदतकार्याच्या आठवणी- १३

नैकपोरामधील शिबिर

१७ ऑक्टोबरच्या पहाटे लवकर जाग न आल्यामुळे शंकराचार्य मंदीर बघायला जाता आलं नाही. पण सकाळच्या थंड वातावरणात चहाचा आनंद घेतला. सूर्याने कृपा केल्यावर उन्हाचाही आनंद घेतला. थंडीमध्ये उन्हात बसण्याची मजा वेगळीच. इथले एक कार्यकर्ते- हिलाल भाईंचे वडील अजूनही हॉस्पिटलमध्ये आहेत. त्यांची थोडी काळजी वाटत आहे. जर जाण्याची व्यवस्था झाली, तर त्यांना भेटायला जायचं‌ आहे. कालपासून कार्यालयात वारंवार संस्थेच्या मदतकार्याचा व्हिडिओ बघितला जातो आहे-

ख़ुदा से मन्नत है मेरी. .
लौटा दे जन्नत ये मेरी. . .
ये चमन. . . ये अमन का नजारा. . .
ओ खुदाया. . . लौटा दे. . . कश्मीर दोबारा. . .
मेरी‌ रुह की तस्वीर. . . . मेरा कश्मीर. . . मेरा कश्मीर. . .

आता इथे थोडेच लोक आहेत. बरेचसे लोक परत गेले आहेत. स्थानिक कार्यकर्ते येऊन जाऊन असतात. कार्यालयाच्या बाजूलाच राहणारे अंकलसुद्धा येतात. ते जम्मूचे आहेत आणि इथे मार्केटिंगच्या कामाने येतात. सकाळच्या शिबिराची तयारी काल रात्रीच झाली आहे. अजूनही काही मेडिसिनचे सेटस तयार आहेत. आज गावातलं शिबिर व्हायला हवं.

सकाळी शिबिराच्या जागी नेण्याकरता बिलालभाई आले; त्यांच्याशी पहिल्यांदा भेट झाली. ते गोपालपोराला राहतात. सकाळचं शिबिर नेहमीप्रमाणेच पार पडलं. ह्या शिबिराची एक खास गोष्ट म्हणजे अत्यंत विशाल चिनार (देवदार) वृक्षाच्या पायाशी ते होतं. नंतर आश्रमातल्या शांत वातावरणात तिथल्या जेवणाचा आनंद घेता येतो. तसच शिबिरामुळे ऊनसुद्धा मिळतं! एक गोष्ट काळजी करण्यासारखी आहे की २१ ऑक्टोबरनंतर इथे काम करण्यासाठी अद्याप कोणीही डॉक्टर येताना दिसत नाही आहेत. तसे अजून चार दिवस आहेत; तरीही कोणी येण्याची सूचना मिळालेली नाही. एक विचार असाही केला जातो आहे की, जम्मूचे डॉक्टर्स आणि फार्मासिस्टस ह्यांची मदत घ्यावी. पण बहुतेक त्यांनी आधीच सहभाग घेतला असावा आणि आता ते येऊ शकत नसतील. बघूया.

दुपारी कार्यालयात पायीच गेलो. श्रीनगर बघणं एक विशेष अनुभव आहे. जेव्हा तीन वर्षांपूर्वी श्रीनगरला आलो होतो, तेव्हा किती तरी वेळ श्रीनगरमध्ये आहोत, ह्यावर विश्वासच बसत नव्हता! ह्या वेळी तर श्रीनगरमध्ये असण्याची सवयच झाली आहे! तरीही त्यातील विशेषता प्रत्येक वेळेस जाणवते आहे. . . कार्यालयात थोडा वेळ आराम झाला. कार्यकर्त्यांनी संध्याकाळचं शिबिर आज प्लॅन केलं आहे. थोड्या वेळाने निघायचं आहे. श्रीनगरपासून वीस किलोमीटर दूर नैकपोरा गावामध्ये आरोग्य शिबिर घ्यायचं आहे.

तिथे जाण्यासाठी गावातून बाहेर पडताना पहिले डोंगरावर दीपस्तंभाप्रमाणे अढळ उभं असलेलं‌ शंकराचार्य मंदीर दिसलं. रस्त्यात पुढे डोंगरावर आणखी काही दिसत होतं. बिलाल भाईंनी सांगितलं की हे परिमहल गार्डन आहे! तीन वर्षांपूर्वी हे गार्डनही बघितलं होतं. आज त्याच बाजूला त्याच्या खाली असलेल्या एका गावामध्ये जायचं आहे. बिलाल भाईंचं बोलणं खूप रुबाबदार आहे. इथे अनेक जण छान हिंदी आणि इंग्रजीसुद्धा बोलतात. कश्मिरी संस्कृतीमध्ये बोलण्याची शैली बहुतेक अशीच विनम्र आणि आकर्षक असावी. बिलाल भाईंनी पुढे सांगितलं की, ह्या गावाच्या जवळच ते धरण आहे जे फुटल्यामुळे ७ सप्टेंबरला श्रीनगरमध्ये पुराचं पाणी घुसलं. नैकपोरामध्ये १८ फूट इतकं पाणी होतं. दुमजली घराच्या दुस-या मजल्यापर्यंत पाणी होतं.

हे गाव तसं श्रीनगरच्या आउटस्कर्टसमध्येच येईल. दूरवर परिमहल दिसतं आहे. गावातले रस्ते ठीक आहेत. पण गावाच्या आत असलेल्या रस्त्यांवर अजूनही चिखल आहे. इथे बिलाल भाई एकटेच कार्यकर्ता म्हणून सोबत आहेत. बाकी गावातलेच कार्यकर्ते सोबत असतील. एका दुकानातल्या मोकळ्या जागी शिबिर सुरू झालं. इथून थोडसंच पुढे गेलं की, धरण आहे. पण शिबिरामुळे ते बघता आलं नाही. हे शिबिर माझं गावातलं शेवटचं शिबिर असू शकेल. कारण बहुतेक उद्या डॉक्टर सर गांदरबलला जाऊ शकतात. आजपर्यंत गावांमध्ये झालेल्या शिबिरांपैकी हे सगळ्यात चांगलं वाटलं. लोकांची गर्दी नियंत्रणात होती. रुग्ण सतत येत होते; पण काही अडचण आली नाही.

ह्या शिबिराचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आलेल्या रुग्णांमध्ये जवळजवळ ९०% महिला होत्या. आत्तापर्यंत पाच- सहा शिबिर झालेले आहेत; त्यामुळे औषधांची नावं माहिती झाली आहेत. औषधं आता न शोधता लगेच सापडतात. तसंच कोणत्या रोगासाठी काय औषध द्यायचं हेसुद्धा पाठ झालं आहे! कोणी अशक्तपणा- थकवा सांगितलं तर त्याला आयरन बॉटल. कोणाला मल्हम हवं असेल तर फेनाक प्लस. शरीर दुखत असेल तर कॅल्शिअमसाठी सिपकॅल. आणि इतरही! एका महिलेने अशक्तपणा आणि शरीरातल्या वेदना सांगितल्या. लगेच सिपकॅल आणि आयरन बॉटल काढली. डॉक्टर सरसुद्धा हसले. गमतीची गोष्ट म्हणजे पुढच्या दोन महिलांनाही हेच आजार होते; म्हणून तीच औषधं दिली. एका प्रकारची हॅटट्रिक झाली!

कश्मिरी भाषेतले काही शब्द आता कळत आहेत. वस्तुत: ते अन्य भारतीय भाषांमधले शब्दच आहेत. तापाला इथे ताप म्हणतात; आवेला आमांश म्हणतात. तीनला त्रैण म्हणतात. मळणेला मलना म्हणतात. आणि अब्र (बादल) शब्द अभ्र शब्दापासून आहे. आबो हवा अर्थात् जल वायू म्हणतात. त्यातला आबो शब्द आप (पाणी) पासून आलेला आहे. इतकंच काय पंजाब शब्दसुद्धा तसाच आहे. पंच + आब- आप (पाणी). अर्थात् पाच नद्यांचं पाणी! तसाच उत्तर प्रदेशात दुआब आहे ज्यामध्ये गंगा व यमुनेचं पाणी आहे! असो.

शिबिर चांगलं चाललं. शेवटी अंधारामुळे बंद करावं लागलं. शेवटी अर्थातच रुग्ण थांबत नव्हते. नोंदणी बंद करूनही रुग्ण सुरू राहिले. सुमारे ९३ रुग्ण आले होते. ऐकण्यात आलं की ह्या गावामध्ये सरकारी मदत फारच थोडी मिळाली आहे. इथे जमाते इस्लामीने थोडी मदत केलेली आहे. हे गाव पुरामुळे सगळ्यात पहिले जलमय झालं. इथे अजूनही स्प्रे करण्याची गरज आहे. गावातून निघताना तिथल्या एका डॉक्टरांना लिफ्ट दिली. तेव्हा त्यांनी सांगितलं की, पुरामुळे इथल्या लोकांमध्ये अशी भावना आहे की, कश्मीरमध्ये झालेल्या पापांचं फळ म्हणून हा पूर आला आहे. कारण इतका विनाश गेल्या शंभर वर्षांमध्येही झाला नव्हता. नंतर त्यांनी हेही सांगितलं की, केंद्र सरकारने एका प्रकारे कश्मीरच्या लोकांना परावलंबी करून ठेवलं आहे. केंद्र सरकारकडून प्रचंड आर्थिक मदत केली जाते ज्यामुळे लोक आळशी होतात. त्यांनी हेसुद्धा म्हंटलं की ही आर्थिक मदत मुख्यत: दोनशे कुटुंबांनाच दिली जाते आणि त्या लोकांनी शांत राहावं; विरोधी आवाज उठवू नये, इतकाच त्याचा हेतु असतो. असंही‌ ऐकण्यात आलं की, जे-के सरकार एका अर्थाने फुटिरतावाद्यांची बी टीम आहे. असो.

संध्याकाळी मयूरभाई आणि शेजारच्या अंकलजींनी जेवण बनवलं आहे. आज कार्यालयात आम्ही चारच जण मुक्कामी आहोत. जेवणानंतर गप्पांची मैफिल रंगली. हे अंकल जम्मूच्या डोगरा समाजातले आहेत. खूप मोठा अनुभव त्यांना आहे. त्यांनी आमच्या शिबिरातले अनुभव ऐकले आणि अनेक विषयांवर त्यांनी मतं मांडली. हे त्यांचे स्वत:चे विचार आहेत आणि ते पोलिटिकली करेक्ट नाहीत. पण तरीही त्यांचे विचार बरेच महत्त्वाचे वाटले. परिस्थितीच्या आकलनासाठी उपयोगी वाटले. अंकलजींनी कश्मीरची पार्श्वभूमी सांगितली आणि म्हणाले की, कश्मीरचे लोक- कश्मिरी पंडीत असतील किंवा आत्ताचे कश्मीरचे मुस्लीम असतील; त्यांच्यात हा भाव खूप तीव्र असतो की, आम्ही इतरांपेक्षा वेगळे आहोत; इतरांहून श्रेष्ठ आहोत. इतिहासामध्ये कश्मिरी पंडितांनी अन्य समुदाय व मुस्लीम समाजाचं शोषण केलं; तसंच त्यांच शोषण आता मुस्लीम समाज करत आहे. कश्मिरी पंडीत आणि मुस्लीम समाज ह्यांच्यात आजही अनेक गोष्टी समान आहेत- जसे खाण्याचे रिवाज; राहण्याच्या पद्धती. त्यांनी आपली जुनी नावे किंवा गोत्र तसंच ठेवलं आहे. उदा., जे भट किंवा भट्ट होते; ते मुस्लीम झाल्यावर भट किंवा बट्ट झाले. जे धर होते; ते दर बनले (लगेच आठवणारी दोन नावं- भारताची महिला क्रिकेटपटू रुमेली धर आणि पाकिस्तानचे अंपायर अलीम दर) आणि कचरू किचलू झाले. असे आणखीही आहेत. धर्म बदलला तरीही एका अर्थाने त्यांची ओळख अजूनही सारखी आहे.

अंकलजींनी नंतर सांगितलं की, आजसुद्धा कश्मिरी पंडीत स्वत:ला वेगळे समजतात आणि म्हणूनच इतका अन्याय सहन करूनही कश्मिरी मुस्लीमांसोबतच जातात. ते बीजेपीच्या ऐवजी नॅशनल कॉन्फरन्सलाच सपोर्ट करतात. जेव्हा कश्मिरी पंडितांना व्हॅली सोडण्यासाठी भाग पाडलं गेलं तेव्हा ते मोठ्या संख्येने जम्मूमध्ये आले. त्या वेळेस त्यांना तिथल्या गुज्जर, डोगरा अशा समुदायांनी मदत केली. तिथल्या संसाधनांवरही ह्या लोकांमुळे ताण पडला. जम्मूच्या स्थानिक समाजांपेक्षा ते जास्त अफ्लुअंट होते; त्यामुळे स्थानिक समाजाच्या प्रगतीमध्ये थोडा अडथळाही निर्माण झाला. परंतु तरी त्या समाजांनी ह्यांना खूप मदत केली. त्यांना निवारा दिला. नवीन घर वसवण्यासाठी मदत केली. परंतु. . . इतकं करूनही कश्मिरी पंडीत आजसुद्धा डोग्रा- गुज्जर अशा जम्मूच्या समाजांना आपल्याहून खालचे मानतात आणि त्यांच्याकडे खाण्यापेक्षा कश्मिरी मुसलमानाकडे जातात. अंकलजी ह्या सगळ्या विषयावर डोग्रा परस्पेक्टिव्ह सांगत आहेत.

नंतर त्यांनी सांगितलं की एका अर्थाने हे लोक आल्यामुळे आमची‌ अडचण झाली; संसाधन शेअर करावे लागले; परंतु अंतिमत: आमचा त्यात फायदाच झाला. स्पर्धेमुळे आम्ही आणखी प्रगती करू शकलो. ते मग पुढे म्हणाले की कश्मीरचे लोक असं दाखवतात की, ते सगळ्यांत शक्तीशाली आहेत आणि तुम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करतात. जर तुम्ही घाबरला नाहीत तर तेच तुम्हांला घाबरतात. आणि कित्येक लोक पैशाचे लालची आहेत. पैसाच फक्त त्यांचा मित्र आहे. आज कश्मिरी पंडितांना अनेक सवलती आहेत; अनेक लाभ मिळतात; पण तरी ते आपली वेदनाच सांगत बसतात. खरोखर हा डोग्रा परस्पेक्टिव्ह जाणून घेतल्याशिवाय ह्या गोष्टींचं आकलन अर्धवट राहिलं असतं.

पुढे ते म्हणाले की, हो, काही लोकांना वाटतं की, पाप वाढल्यामुळे पूर आला. पण हे लोक स्वत:चं पाप बघत नाहीत; ते लोक म्हणतात की, आर्मीने इतके अपराध केले; इतकं पाप केलं; त्यामुळे हा सैलाब आला. त्यांच्या सांगण्यात आलं की, कश्मीरचे लोक स्वत:ला इतकं श्रेष्ठ मानतात ह्याचं एक उदाहरण म्हणजे श्रीनगरच्या राजभवनात स्वच्छतेसाठी कोणी कर्मचारीच मिळत नव्हते. म्हणून १९६० च्या दशकामध्ये चंडीगढ़वरून ख्रिश्चन सफाई कामगारांना इथे आणलं गेलं. त्यांच्या पुढच्या पिढ्या अजूनही इथेच आहेत; पण अजूनही त्यांना स्टेट सब्जेक्ट (राज्याचे नागरिक) दर्जा मिळालेला नाही; ते भाड्यानेच राहतात.

त्यानंतर थोडी चर्चा राजकारणाविषयी झाली. लवकरच कश्मीरमध्ये निवडणूका आहेत.कश्मीरला येण्याच्या आधी वाटायचं की, तिथेही मोदींची लहर असणार. पण लोकांच्या विचारांचा कानोसा घेतल्यावर वाटतं आहे की, इथे मोदींची लहर अजिबात नाहीय. अंकलजींनी हेच म्हंटलं की, जम्मू आणि लदाखमध्ये बीजेपीला चांगली संधी आहे; पण कश्मीरमध्ये अजिबात नाही. इथले कश्मिरी पंडीतसुद्धा बीजेपीला मत देणार नाहीत. कश्मीरच्या विधानसभा जागा बघितल्या तर एकूण १११ जागा आहेत. त्यापैकी २४ सीट पाकव्याप्त कश्मीरमध्ये असतात व त्या नेहमी रिक्त असतात. उरल्या जागा ८७. त्यातल्या ४६ कश्मीर व्हॅलीच्या, ४ लदाख क्षेत्राच्या आणि ३७ जम्मू क्षेत्राच्या आहेत. तसं बघितलं तर क्षेत्रफळ आणि लोकसंख्येच्या प्रमाणानुसार जम्मू आणि लदाखला आणखी जागा मिळतात. पण जम्मू- कश्मीरमध्ये आधीपासूनच कश्मीरचं वर्चस्व आहे आणि म्हणून जम्मू व लदाख क्षेत्रांना दाबून टाकण्यात येतं. अंकलजींनी नंतर म्हंटलं की, बीजेपीला जर जम्मू आणि लदाखमध्ये चांगलं यश मिळालं आणि कश्मीर व्हॅलीमध्ये एक सीट जरी मिळाली; तरी ती पीडीपीसोबत सत्तेमध्ये येऊ शकते. कारण ओमर अब्दुलांविषयी लोक प्रचंड नाराज आहेत. त्यामुळे त्यांची सत्ता जाणं जवळजवळ अपरिहार्य आहे. ही‌ चर्चा व्यक्तिगत आणि चाकोरीबाहेरची असली तरी महत्त्वाची वाटली. असे सर्व दृष्टीकोन समजून घेणं आवश्यक आहे. आपण त्या विचारांशी सहमत होत नसलो तरीही.

नंतर थोडा वेळ श्री अमरनाथ श्राईन आंदोलनाविषयीसुद्धा बोलणं झालं. त्या आंदोलनात जम्मू क्षेत्राने पहिल्यांदा कश्मीरच्या शोषणाविरुद्ध आवाज उठवला आणि आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारला झुकवलं. तेव्हापासून कश्मीरमधलं वातावरण बदलण्यास सुरुवात झाली. असो.


डावीकडे डोंगरावर टॉवरजवळ शंकराचार्य मंदीर आणि उजवीकडील डोंगरावर दूरवरून दिसणारं परिमहल गार्डन


नैकपोरातील रस्त्याची अवस्था


शिबिर घेताना डॉ. देसाई

पुढील भाग: जम्मू कश्मीर मदतकार्याच्या आठवणी- १५

मूळ हिंदी ब्लॉग:
जन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव १
जन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव २
जन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव ३
जन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव ४
जन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव ५
जन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव ६
जन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव ७
जन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव ८
जन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव ९
जन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव १०
जन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव ११
जन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव १२
जन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव १३
जन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव १४

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मार्गी,

>> इतकं करूनही कश्मिरी पंडीत आजसुद्धा डोग्रा- गुज्जर अशा जम्मूच्या समाजांना आपल्याहून खालचे मानतात
>> आणि त्यांच्याकडे खाण्यापेक्षा कश्मिरी मुसलमानाकडे जातात.

खरोखरंच विदारक सत्य आहे. अतिरेक्यांमुळे काश्मिरी पंडितांना परागंदा व्हावं लागलं. त्या अतिरेक्यांच्या विरुद्ध या स्थानिक मुस्लिमांनी जराही आवाज काढला नाही. खुशाल हिंदूंची कत्तल होऊ दिली. आणि काश्मिरी पंडित त्यांचा घात करणाऱ्या त्याच मुस्लिमांसोबत परतपरत जातात. शिवाय सहाय्य करणाऱ्या डोगरा, गुज्जरांना हलके लेखतात. उद्या काश्मिरी हिंदूंना मदत केली, तर परत ते मुस्लिमांच्या कच्छपी लागणार नाहीत हे कशावरून? मुस्लिमांच्या नादी लागणे म्हणजे पाकिस्तानचे हात मजबूत करणे होय. काश्मिरी पंडितांच्या अहंकारामुळे केवळ त्यांचंच नव्हे तर उर्वरित भारताचंही प्रचंड नुकसान होत आहे.

आ.न.,
-गा.पै.

या भागामुळे काश्मीर मधील पोलिटिकल सिचुएशन ची सत्यस्थिती कळली..

निसर्गाचे रौद्र स्वरूप, टेरेरिझम , फुटीची राजनीती इ. भयंकर संकटांचा सतत सामना करण्याकरता लागणारे

मनोधैर्य या लोकांकडे कुठून बरं येत असावे..

तुमच्या सारख्या लोकांमुळे, काश्मीर काही काळापुरता तरी पुनश्च स्वर्ग बनत असेल..

खरेच. काश्मिरी पंडीतांबद्दल आजवर त्यांच्या वाट्याला खुप काही वाईट आलेय हे ऐकण्यात आलेय. पण इथले वाचुन नाण्याची दुसरी बाजुही कळतेय.

कितीही संकटे आली आणि त्यात मानवी स्वभावाची नव्याने ओळख झाली तरी ते संकट टळल्यावर लोक परत मुळ स्वभावधर्माकडे वळतात. पंडित स्वत्:चे घर सोडुन जम्मुमध्ये गेले, लोकांच्या मदतीवर तगुन राहिले तरी तिथेही उच्चनिच भेद मनातुन गेला नाही. आणि यात पंडितांना दोष देण्यात अर्थ नाही, इतर लोक जे करतात त्यापेक्षा वेगळे असे काहीच त्यांनी केले नाही. आत्यंतिक परिस्थितीतही असा भेद न मिटवणे म्हणजेच धर्मपालन करणे ही शिकवण पिढ्यानपिढ्या मनावर बिंबलेली आहे.

धर्म कुठलाही असो, आपण तेवढेच श्रेष्ठ आणि बाकी सगळे कनिष्ठ हा विचार सगळीकडे आहेच. आज धर्माच्या नावावर जगभर इतक्या कत्तली होताहेत तरीही कोणाला आपले विचार परत एकदा तपासुन पाहण्याची गरज वाटत नाही.

साधना,

>> आत्यंतिक परिस्थितीतही असा भेद न मिटवणे म्हणजेच धर्मपालन करणे ही शिकवण पिढ्यानपिढ्या मनावर
>> बिंबलेली आहे.

काश्मिरी मुस्लिमांसोबत वावरतांना काश्मिरी पंडितांकडून भेदभाव पाळला जात नाही. त्यामुळे धर्मपालन म्हणजे भेदभाव पाळणे नव्हे.

माझ्या आकलनानुसार काश्मिरियत ही अधिक बलवान शक्ती आहे. ती अद्यापि भारताच्या चौकटीत बसवली गेली नाहीये (असं दिसतंय). काश्मिरियत ही उर्वरित भारतीयत्वापासून वेगळी नाही. हा विचार त्यांना पटायला आणि ठसायला हवा. नवीन पिढीचं वर्तन याबाबत अधिक आशादायी आहे/असावं.

पारंपारिक समज पाहू जाता काश्मीर हे हिंदूंचे शैक्षणिक आणि यौगिक केंद्र आहे. काश्मिरी ब्राह्मण हा साधारणत: विद्वान मानला जातो. हिंदूंच्या पूर्वापार चालत आलेल्या व्यवस्थेत आश्रम वा अध्ययन केंद्रे ही राजसत्तांवर अवलंबून नसंत. त्यांचे स्वत:चे उत्पन्नाचे स्रोत असंत आणि त्यांना कर द्यावा लागत नसे. अध्ययन आणि अध्यापनाच्या कार्याचं स्वरूप प्रतिष्ठायुक्त असल्यामुळे या क्षेत्रातले लोकं समाजापासून दूर जातात. हे साहजिकंच होतं. कोणी मुद्दामून करत नाही. पण जेव्हा परिस्थिती पालटते तेव्हा, अशा लोकांना सामाजिक अभिसरणासाठी विशेष प्रयत्न करायला लागतात.

असे काही प्रयत्न जुन्या विस्थापित पिढीकडून झालेत का हे पाहणे रोचक ठरावे.

आ.न.,
-गा.पै.

सर्वांना प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद!

@ साधना जी आणि गामा पैलवान जी; आपल्या विचारांशी काही अंशी सहमत आहे. पण सत्य हे बहु-अंगी असतं आणि प्रत्यक्ष दिसत असणारं सत्य आईसबर्गचा तुकडा असतं, इतकंच त्याला जोडेन. Happy धन्यवाद.

श्रेष्ठ - कनिष्ठतेची भावना किती मोठी हानी करु शकते हे लक्षात आले ...

प्रत्यक्ष दिसत असणारं सत्य आईसबर्गचा तुकडा असतं >>>>> हे फारच महत्वाचं आहे ...

सर्व परिस्थिती समजावून घेणे हे देखील जिथे फार मोठी समस्या आहे तिथे निरपेक्ष मदत करायला जाणे ही सगळ्यात मोलाची गोष्ट ठरते ...

अंकलजींनी नंतर सांगितलं की, आजसुद्धा कश्मिरी पंडीत स्वत:ला वेगळे समजतात आणि म्हणूनच इतका अन्याय सहन करूनही कश्मिरी मुस्लीमांसोबतच जातात. ते बीजेपीच्या ऐवजी नॅशनल कॉन्फरन्सलाच सपोर्ट करतात. जेव्हा कश्मिरी पंडितांना व्हॅली सोडण्यासाठी भाग पाडलं गेलं तेव्हा ते मोठ्या संख्येने जम्मूमध्ये आले. त्या वेळेस त्यांना तिथल्या गुज्जर, डोगरा अशा समुदायांनी मदत केली. तिथल्या संसाधनांवरही ह्या लोकांमुळे ताण पडला. जम्मूच्या स्थानिक समाजांपेक्षा ते जास्त अफ्लुअंट होते; त्यामुळे स्थानिक समाजाच्या प्रगतीमध्ये थोडा अडथळाही निर्माण झाला. परंतु तरी त्या समाजांनी ह्यांना खूप मदत केली. त्यांना निवारा दिला. नवीन घर वसवण्यासाठी मदत केली. परंतु. . . इतकं करूनही कश्मिरी पंडीत आजसुद्धा डोग्रा- गुज्जर अशा जम्मूच्या समाजांना आपल्याहून खालचे मानतात आणि त्यांच्याकडे खाण्यापेक्षा कश्मिरी मुसलमानाकडे जातात. अंकलजी ह्या सगळ्या विषयावर डोग्रा परस्पेक्टिव्ह सांगत आहेत.>>>>> खूप वाईट वाटले हे वाचुन. म्हणजे पन्डितानी स्वतःच कुर्‍हाडीवर पाय मारलाय तर. ज्यानी मदत केली त्यानाच हलके लेखण्यात कसला आलाय धर्म?
मार्गी धन्यवाद. खरे काय ते कळले.

पण लेखमाला आवडली. दुसर्‍याकरता आपला इतका वेळ देणे हेच मोठे काम.