हाय शरमाऊं किस किस को बताऊं...

Submitted by अतुल ठाकुर on 26 May, 2015 - 00:40

meragaon.jpg

"शोले" सर्वांना माहित आहे. सर्वांना तो चित्रपट आवडतोही. मात्र हिन्दी चित्रपटाचे जे जाणते रसिक आहेत ते त्या अगोदर प्रदर्शित झालेल्या "मेरा गांव मेरा देश" ला विसरले नसणारच. हा ट्रेड सेटर चित्रपट आहे. कारण "शोले"त गब्बर सिंग तर "मेरा गांव मेरा देश" मध्ये जब्बर सिंग. हा निव्वळ योगायोग वाटत नाही. "मेरा गांव मेरा देश" हा "शोले" चा पूर्वसूरी वाटतो. धर्मेंद्रला फिल्मफेअर नॉमिनेशन मिळालेला (बहुधा एकमेव) चित्रपट. "शोले" पासुन तंत्राचा बोलबाला हिन्दीचित्रपटात सुरु झाला. सिनेमास्कोप, पडदा व्यापणारे चित्रिकरण, साउंडमधील बारकावे, सर्जिओ लिऑनीच्या काही चित्रपटांची हुबेहुब उचललेली दृश्ये, अशा अनेक गोष्टी "शोले" वेगळा ठरण्यास कारणीभुत झाल्या. "मेरा गांव मेरा देश" मात्र परिपूर्ण हिन्दी चित्रपटच. अस्सल इये देशीच्या मातीत घडलेला. तंत्राचा भुलभुलैय्या नसण्याचे ते सुदैवी दिवस. राज खोसलासारखा अंगावर येणारी दृष्ये चित्रित करणारा काळाच्या पुढचा दिग्दर्शक. धर्मेंद्रला मिळालेला टिपिकल रोल. अगदी चेहर्‍यामोहर्‍यापासुन त्यात धरमसाहेब फिट्ट बसतात. आणि हिरोला खाऊन टाकणारा विनोद खन्नाचा क्रूर जब्बरसिंग. विनोद खन्ना खलनायक सुरेख वठवत असे. त्याची नजर, देहबोली आणि त्याला दिलेला डाकुचा गेटअप अगदी लक्षात राहण्यासारखा. विनोद खन्नाने अनेक खलनायक केले पण यासम हाच. जर हिन्दी चित्रपटात खलनायकांवर लिहिले गेले तर विनोदचा जब्बरसिंग वगळता येणारच नाही. चित्रपटातल्या इतर अभिनेत्यांबद्दल सांगायचं तर अभिनयाचे कसलेले शिलेदार येथे आहेत. "शोले" त अमजद आहे तर "मेरा गांव..." मध्ये अभिनयातही त्याचा "बाप" असलेला जयंत आहे. आशा पारेख आहे. सर्वच भट्टी मस्त जमलेली आहे. चित्रपट फार पुर्वी पाहिलेला आहे, त्यामुळे बारकावे फार आठवत नाहीत. मात्र एक गाणे पुन्हा पुन्हा आठवते त्यावरच येथे लिहायचे आहे.

"हाय शरमाऊ" या गाण्याचा तसं म्हटलं तर चित्रपटात कदाचित शेवटचा नंबर लागेल. रफी लताचं "कुछ कहता है ये सावन" गाणं यात आहे. त्यावेळी अनेकांच्या तोंडी असणारं "मार दिया जाय के छोड दिया जाय" हे गाजलेलं गाणं या चित्रपटात आहे. सोना लई जा रे, आया आया अटरिया पे कोई चोर सारखी मनात रेंगाळणारी गाणी आहेत. गावचं वातावरण, आशा पारेखचे रंगीबेरंगी कपडे, वातावरणाला साजेसं लक्ष्मीकांत प्यारेलालचं ठसकेबाज संगीत आणि आनंद बक्षीची चपखल गीतरचना. तरीही "हाय शरमाऊ" मला आवडतं कारण त्याचं राज खोसलाने केलेलं जबरदस्त चित्रिकरण. सुरुवातीपासुन खिळवुन ठेवणारं, श्वास रोखायला लावणारं. गाण्याचा सुरुवातीलाच तणाव निर्माण करण्यात दिग्दर्शक यशस्वी ठरला आहे. आणि हा तणाव गाणे संपेपर्यंत आणि त्यानंतरही ते संपूर्ण दृश्य संपेपर्यंत कायम राहतो. गावात जब्बरसिंगची दहशत बसलेली असते. त्याला पकडायला पोलिस जंगजंग पछाडतात. धर्मेंद्र त्यांना मदत करत असतो. जब्बरसिंगशी संबंध असलेली परंतु त्याचा तिरस्कार करणारी एक नाचणारी कलावंतिण धर्मेंद्रला मदत करायला तयार होते. जत्रेत येणार्‍या जब्बरसिंगची खुण ती गाण्यातुन सांगणार असते. यातुन एका उत्कंठावर्धक नाट्याला सुरुवात होते. जब्बरसिंगला खबर मिळालेली असते कि जत्रेत काहीतरी घडणार आहे. पण तरीही तो तेथे वेश पालटुन यायला निघतो. हे दृश्य अतिशय सुरेख घेतलं आहे. जब्बरसिंगच्या टोळीतील प्रत्येक जण वेष पालटुन त्याच्यासमोर उभा राहतो. त्याच्या पसंतीची मोहर त्यांना हवी असते. आवश्यक तेथे जब्बरसिंग त्यांना वेषाबाबत सुचना देतो. स्वतः जब्बरसिंगही ओळखु येणार नाही इतपत स्वतःला बदलतो. आणि जत्रेत आल्यावर सुरु होतं "हाय शरमाऊ...". लक्ष्मीछाया ठसकेबाज गावरान नृत्य करत धर्मेंद्रला पहिली खुण सांगते "काला कंबल काली पगडी". स्वतः धर्मेंद्रदेखिल वेष पालटल्यामुळे पोलिसांना ओळखु येत नाही. चोर पोलिस खेळ सुरु झालेला असतो.

जत्रेतली गडबड, खेडवळ चेहरे, निरनिराळी दुकाने, खेडवळ पोषाखातील खेडुत, त्यांचे जत्रेतील वावरणे आणि त्यात शिजत असलेले हे नाट्य मात्र मुळातुनच पाहण्याजोगे. राज खोसलाने टाईट क्लोजअप्सचा फार परिणामकारक वापर येथे केला आहे. विशेषतः विनोदखन्नाला म्हातार्‍याचा गेटअप देऊन त्याच्या चेहर्‍यावरचा संशय, तणाव आणि बारकाईने गर्दी निरखणारा जब्बरसिंग त्या क्लोजअप्स मधुन मस्त उभा राहिला आहे. "काला कंबल काली पगडी" ही खुण गाणे म्हणताना नृत्य करत करत लक्ष्मीछाया फक्त धर्मेंद्रलाच सांगते. मात्र गाण्याच्या पुढच्या ओळी "कुर्ता है नीला, रंग पगडीका पिला" अशा असतात त्यामुळे काही उंट लोक हा वेष केलेल्या भलत्यालाच पकडून त्याची दाढी वगैरे ओढुन पाहतात. वातावरणातील तणाव हळुहळु वाढत असतो. जब्बरसिंगची माणसे देखिल जागोजाग पोलिसांप्रमाणेच पेरलेली असतात. धर्मेंद्रला पोलिस प्रथम ओळखु शकत नाहीत पण तो कोपराने ढोसुन आपली ओळख पटवतो. येथे इन्सपेक्टरचे काम आपल्या सुधीरने केले आहे. तोच तो "हकीकत"मधला "मै ये सोचकर उसके दरसे उठा था" गाणारा सुधीर. गाणे शेवटाला येते, लक्ष्मीछायाच्या आईच्याही चेहर्‍यावर प्रचंड तणाव असतो. शेवटी गाण्याच्याच ओळीत "पिपल के नीचे मेले में सबसे पिछे" हे शब्द येतात आणि धर्मेंद्रची खात्री पटते. तो इन्सपेक्टरला बोटाने खुण करुन जब्बरसिंग कुठे आहे हे दाखवतो आणि बंदुकांचे आवाज सुरु होतात. जत्रेत एकच गोंधळ उडतो. या दृश्यात एखाद्या जंगली श्वापदाला धोक्याची अगोदरच जाणीव व्हावी आणि त्याचे शरीर त्याला तोंड देण्यासाठी तयार असावे अशातर्‍हेने आपली देहबोली विनोद खन्नाने राखली आहे. त्याच्या एकुण हालचाली बारकाईने पाहण्याजोग्या. गाणे संपल्यानंतरची हाणामारी अगदी खरीखुरी वाटावी अशी चित्रित केली आहे. पुढे काय होतं हे येथे सांगण्यापेक्षा पाहणे जास्त चांगले.

लताबाईंचा आवाज हा या गाण्याचा सुरेख आणि अर्थातच सुरेल भाग. बरेचदा एखाद्या दृश्याचे रसायन इतके मस्त जमलेले असते कि कुठल्या गोष्टीचे विवरण आधी करावे कळत नाही. लता नुसती नायिकेला चपखल बसेल असे गात नाही तर वातावरणाराला अनुसरुन गाते हे या गाण्यात अगदी अधोरेखित होते. जत्रा आणि त्यात गाणारी कलावंतिण, अशावेळी आवाजातला नायकिणीचा अवखळपणा लताने बरोबर पकडला आहे. "हाय शरमाऊ" शब्दांवर सुरुवातीला सुरेल करामत केली आहे. प्रत्येक कडव्याच्या शेवटी ही करामत आणखी मजा आणते. आनंद बक्षी हा कलावंत उपेक्षित राहीला असे माझे स्पष्ट मत आहे. मागणीप्रमाणे पुरवठा करणार्‍यांच्या यादीत हा कलावंत ढकलला गेला. खरं तर हे कसबदेखिल महत्त्वाचे आहेच. सिच्युएशनला चपखल बसणारे गाणे आनंदबक्षींनी लिहिले आहे. ते "हाय शरमाऊ" सारखे गाणे ही लिहु शकतात आणि "नमक हराम" मध्ये "मै शायर बदनाम" सारखे जबरदस्त गीत देखिल लिहु शकतात इतकी मोठी रेंज या कलावंताची आहे. तीच कथा लक्ष्मीकांत प्यरेलाल यांची. पारसमणी, दोस्ती सारख्या चित्रपटापासुन सतत सुरेल संगीत देणे सोपे नव्हे. "मेरा गांव मेरा देश" मध्ये वातावरणाला सजेशा चाली त्यांनी दिल्या आहेत. लक्ष्मी छायाचे नृत्यही झकास. "शोले"हा चित्रपट म्हणुन थोर असेल पण माझ्या सारख्याच्या मनात "मेरा गांव मेरा देश" अशा तर्‍हेच्या दृश्यांमुळे घर करुन बसला आहे. कधी कधी वाटतं अशा सार्‍या गोष्टी जमुन आल्यावर त्या वातावरणातला गंध दरवळणे इतकेच बाकी राहते इत़कं ते सारं खरं वाटत राहतं.

अतुल ठाकुर

गाण्याची युट्युब लिंक
https://www.youtube.com/watch?v=Nm7rDfyv_F0

संपूर्ण चित्रपट येथे पहता येईल
https://www.youtube.com/watch?v=x3jFi8Kn9BY

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विनोद खन्ना या चित्रपटामुळे स्टार म्हणून स्थिरावला. विनोद खन्नाने अमिताभलाही आव्हान निर्माण केले होते पण ऐन भरात तो रजनीशबाबाच्या नादी लागला आणि चढती कारकीर्द सोडून संन्यास घेतला. मात्र त्याचा आवाज ही त्याची नेहमी कमजोर बाजू होती. आजही आहे. 'वाचिक'अभिनय हा प्रकार त्याच्याकडे नाही की ज्याच्या जोरावर अमिताह्भ कुठल्या कुठे गेला.

@रॉबीनहूड

हिरवट दिवसात अमिताभ की विनोद खन्ना हे वाद घालुन झालेत मात्र आजही विनोद खन्ना कितीही आवडत असल्या तरी त्याच्या मर्यादा माहित असल्याने आता वाद घालत नाही Happy

कमजोर आवाज हे तुम्ही सांगीतलं आहेच. त्याबरोबर नृत्याचं अंग नसणे, विनोदाचे अंग नसणे ह्या फार मोठ्या कमकुवत जागा त्याच्या अभिनयात आहेत. शिवाय विनोद खन्नाला विशिष्ट भुमिका मिळाल्यास आणि तसे दिग्दर्शक मिळाल्यास तो भुमिकेचे सोने करतो असे मला वाटते. अमिताभने दिवारमध्ये साकार केलेला कुली विनोदच्या रुपात पाहता येत नाही.

मात्र विनोदने साकार केलेला अचानक मधला फौजी अमिताभच्या रुपात पाहता येत नाही हेच विनोद खन्नाचे सामर्थ्य म्हणता येईल.

विनोद खन्नाचे एक मला क्रेडिटेबल वाटले ते अमिताभच्या ऐन भरातील चित्रपटात त्याने त्याची कॉमेडी किंवा अ‍ॅक्शन ची स्टाईल मॅच करायचा प्रयत्न केला नाही - उदा: अमर अकबर अ‍ॅन्थनी मधे अमिताभ व ऋषी दोघे धमाल उडवतात, तर विनोद ने एक बर्‍यापैकी गंभीर असा मोठ्या भावाचा म्हणून शोभणारा रोल केला आहे, पण काही सीन मधे या चित्रपटात ऑड वाटेल असा 'सटल' ह्यूमर मस्त आहे - उदा: शबाना त्याला फसवायला घेउन जाते तेव्हा - 'चलो इसी बहाने ऐसी जगह देखते है जहाँ पुलिस नहीं आती' सारखे संवाद Happy

Pages