वेदाध्ययनातील- संथा देणे... अर्थात वेदाभ्यास शिक्षण/पाठांतर पद्धती.

Submitted by अत्रुप्त आत्मा on 25 March, 2015 - 08:42

खुलासा:- वेदपाठशाळांमधे प्राचीन काळापासून अध्ययन/अध्यापनाची एकच एक अशी, परंपरागत पद्धती रहात आलेली आहे. ही पद्धती फक्त पाठ करून ठेवण्याच्या विषयाकरिताच निर्माण झालेली आहे. हिला सामन्यतः मौखिकी अध्यापन पद्धती असे म्हटले जाते. ह्या पद्धती विषयी खूप जणांच्या मनात कुतुहल,आस्था,चिकित्साभाव इत्यादी असते. आंम्हा पुरोहित मंडळीना काम करत असताना,पाठांतर पाहुन ह्या अनुषंगानी काहि प्रश्नंही विचारले जात असतात. अश्या सर्व प्रश्नकर्त्यांना हा विषय नीट माहिती व्हावा,एव्हढ्याच हेतूने हा सदर लेख येथे देत आहे.

@संथा देणे म्हणजे काय? >> संथा देणे म्हणजे ,वेदपाठ शिकविणारे गुरुजी , समोर बसलेल्या विद्यार्थ्यांना मंत्राचे छोटे तुकडे(चरण)पाडून ,वदवून आपल्या मागे घोकायला/म्हणायला सांगतात..याला प्राथमिक अर्थानी संथा-देणे असे म्हटले जाते. यापुढे...(विद्यार्थ्यांनी)संपूर्ण पाठांतर करण्याच्या विशिष्ट पद्धतीला, संथा घालणे अगर संथा म्हणणे ..असे म्हटले जाते. एखादा विषय/याज्ञिकातला प्रयोग/संहितेचा अध्याय (तोंड)पाठ करताना, संथा म्हणण्याचे ४ ट्प्पे असतात.
१) चरणाची संथा(४वेळा) २) अर्धनीची संथा(४वेळा) ३) ऋचेची संथा(४वेळा) ४) गुंडिकेची संथा(४वेळा) = एकंदर १६ संथा.

१)चरणाची संथा:- चरणाच्या संथेत, गुरुजिं..प्रथम समोर बसलेल्या विद्यार्थ्यांना मंत्राचा एकेक चरण दोनदा सांगतात.. मग विद्यार्थ्यांनी पोथित बघून तो त्यांच्या मागून ७वेळा घोकायचा. यात म्हणताना चूक झाली,की पुन्हा सुरवात. यात शुद्धअक्षर,जोडाक्षर,त्याचे गुरुत्व,अनुस्वारांचे उच्चार,स्वराघात,र्‍हस्व आणि दीर्घ/प्रदीर्घ-अश्या काना ,मात्रा,वेलांट्या,उकार, विसर्ग आणि त्यांचे तसेच उच्चार ,हे शंभर टक्के शुद्ध होत आहेत की नाहीत? हे गुरुजी कसून तपासत असतात. (कारण एकदा अशुद्ध पाठ झालं..की ती (मेंदूत उमटलेली) प्रींटाऊट,नंतर पुसणं कर्मकठीण असतं.) तर..हे स्तोत्रातले पाडलेले एकेक चरण ७ वेळा घोकत संपूर्ण अध्याय वा स्तोत्र - पूर्ण केलं जातं... ही झाली "चरणाची" पहिली संथा. अश्या चार संथा झाल्या की 'चरण' पूर्ण होतो. ही सगळी संथा गुरुजिंसमक्ष होते. (कारण तेच-मंत्रात अजिबात अशुद्धी राहू नये.)

२)अर्धनीची संथा:- अर्धनीच्या संथेत ,सामान्यतः दोन चरण एकत्र घेऊन..किंवा मंत्राची अर्धी ओळ सात वेळा म्हटली जाते. (काहि वेळा जगतिच्छंदा सारखा,मंत्राचा लांबलचक छंद असेल,तर एका ओळीत ४/४ किंवा अगदी ६/६ चरणंही पाडावे लागतात) आधी चरण डोक्यात-बसलेला असतोच..त्यामुळे इथपासून गुरुजी समोर नसले,तरी चालते. तर.. ही...एकामागून एक ओळ पूर्ण ७ वेळा घोकत ...संपूर्ण अध्याय पूर्ण केला... की अर्धनीची १ संथा झाली...आता अश्याच पुढे अजुन ३ संथा म्हणायच्या..म्हणजे या अर्धनीच्या चार संथा होतात.

३)ऋचेची संथा:- ऋचेच्या संथेत..मागील अर्ध्या ओळीच्या संथेचा पुढचा भाग सुरु होतो..म्हणजे आता २ ओळिंची संपूर्ण ऋचा ,आणि पुढच्या ऋचेचा पहिला चरण(धरुन) ..,तसे ७ वेळा म्हणायचे. यातील पुढच्या ऋचेचा पहिला चरण त्यात घेण्याचे वैशिष्ठ्य असे..की यामुळे संपूर्ण अध्यायातल्या प्रत्येक पहिल्या ऋचेची-दुसर्‍या ऋचेशी गुंफण तयार होते. (कनेक्टींग होते.) ऋचे'तल्या या (पहिल्या)संथेवर,शिकविणार्‍या गुरुजिंचे बारीक लक्ष असते. (कारण तेचः- अशुद्धी आली कींवा मधे कुठे तयार झालेली आहे काय? हे पहाणे.) ह्या ऋचेच्या परत पुढे तीन संथा म्हणायच्या. म्हणजे या ऋचेच्याही एकंदर चार संथा पूर्ण होतात.

४) गुंडीकेची संथा:-..हा शेवटचा, परंतू अत्यंत महत्वाचा टप्पा असतो. आता मागील ऋचेच्या संथेनी हीचेच निम्मे काम केलेले असते. पण तरिही.., आता कितीही पाठ येत असले..तरी(यातल्या पहिल्या संथेला) पोथीत पाहूनच..सदर पाठांतराच्या अध्यायाचा एकेक अनुवाक अथवा वर्ग (पॅरेग्राफ) ७/७ वेळा म्हणायचा असतो. आणि तो सगळा अध्याय पूर्ण करायचा असतो. ही झाली गुंडिकेची पहिली संथा.. अश्या अजुन तीन म्हणून ,ह्या गुंडिकेच्या चार संथा पूर्ण करायच्या. या गुंडिकेच्या संथेमधे, साधारणपणे दुसर्‍या किंवा तिसर्‍या संथेपासून ,(आता) विद्यार्थ्याची..इच्छा अगर तयारी-नसली तरी विद्यार्थ्यांनी पोथित न पहाताच ,मान वर करुन संथा म्हणायची असते. कारण त्याशिवाय-पाठ येणे..ही क्रीयाच आकाराला येऊ शकत नाही. अर्थात कोणत्याही सर्व सामान्य बुद्धीच्या विद्यार्थ्याला यातल्या शेवटच्या २ संथांमधे सर्वकाहि बिनचूक तोंडपाठ-येतेच. पण त्याहून(बुद्धिनी) आगे/मागे जे असतील..त्यांना कमी अगर जास्त कष्ट घ्यावे लागतात. तर,अश्या ह्या एकंदर १६ संथा घातल्या की आपल्याला अपेक्षित असलेला पाठांतराचा विषय-तयार होतो.

आता आपण याचे-संकलित..,एका स्तोत्रपाठांतराच्या उदाहरणाद्वारे पाहुया. (हे आणखि डिटेलिंग,विशिष्ट हेतूनी आणि जाणिवपूर्वक करत आहे.)

चरणाची म्हणायची संथा:- प्रणम्य शिरसा देवं,(७वेळा) गौरीपुत्रं विनायकम् ।(७वेळा)
भक्तावासं स्मरेन्नित्यं, (७वेळा)आयुःकामार्थसिद्धये॥(७वेळा)

प्रथमं वक्रतुण्डं च,(७वेळा) एकदन्तं द्वितीयकम् ।(७वेळा)

तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं,(७वेळा)गजवक्त्रं चतुर्थकम् ॥ (७वेळा).....
असेच प्रत्येक चरण म्हणत स्तोत्राच्या शेवटापर्यंत जायचे असते..मग येथे चरणाची एक संथा पूर्ण होते.अश्याच अजुन तिन संथा म्हटल्या,की चरणाची मुख्य संथा पूर्ण होते.

अर्धनिची म्हणायची संथा:- प्रणम्य शिरसा देवं, गौरीपुत्रं विनायकम् ।(७वेळा)
भक्तावासं स्मरेन्नित्यमायुःकामार्थसिद्धये ॥(७वेळा) ॥

प्रथमं वक्रतुण्डं च, एकदन्तं द्वितीयकम् ।(७वेळा)

तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् ॥ (७वेळा).....
अशीच प्रत्येक अर्धनि/अर्धी ओळ म्हणत स्तोत्राच्या शेवटापर्यंत जायचे असते..मग येथे अर्धनिची एक संथा पूर्ण होते.अश्याच अजुन तिन संथा म्हटल्या,की अर्धनिची मुख्य संथा पूर्ण होते.

ऋचेची म्हणायची संथा:- प्रणम्य शिरसा देवं, गौरीपुत्रं विनायकम् ।
भक्तावासं स्मरेन्नित्यमायुःकामार्थसिद्धये ॥..प्रथमं वक्रतुण्डं च(७वेळा)

प्रथमं वक्रतुण्डं च, एकदन्तं द्वितीयकम् ।
तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् ॥ लम्बोदरं पञ्चमं च(७वेळा).....
अशीच प्रत्येक ऋचा ,पुढल्या ऋचेचा पहिला चरण तिच्यात लावुन म्हणत स्तोत्र एकेक ऋचेनी म्हणत पूर्ण घोकायचे असते..मग येथे ऋचेची एक संथा पूर्ण होते.अश्याच अजुन तिन संथा म्हटल्या,की ऋचेची मुख्य संथा पूर्ण होते.

गुंडिकेची म्हणायची संथा:-
प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् ।
भक्तावासं स्मरेन्नित्यमायुःकामार्थसिद्धये ॥ १॥

प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकम् ।
तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् ॥ २॥

लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च ।
सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमम् ॥ ३॥

नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् ।
एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम् ॥ ४॥

द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यं यः पठेन्नरः ।
न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरः प्रभुः ॥ ५॥

विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम् ।
पुत्रार्थी लभते पुत्रान्मोक्षार्थी लभते गतिम् ॥ ६॥

जपेद्गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासैः फलं लभेत् ।
संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः ॥ ७॥

अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत् ।
तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादतः ॥ ८॥ (सुरवात ते शेवट -७वेळा..)
.....असेच सुरवात ते शेवट -७वेळा.. म्हटले,की मग येथे गुंडिकेची एक संथा पूर्ण होते.अश्याच प्रकारे अजुन तिन संथा म्हटल्या,की गुंडिकेची मुख्य संथा पूर्ण होते.

आता आपल्याला आवश्यमेव असा एक प्रश्न पडेल,की "(बुद्धिचा..)इतका बारीक किस पाडून, ही पाठांतर पद्धती तयार होण्या/करण्यामागचे प्रयोजन काय बरे असावे???" Happy

उत्तरः- ज्या काळात ही पद्धती आली/विकसीत झाली.तो काळ लेखनकलेची सुरवातहि न झालेला असा काळ होता. अश्या वेळी आपल्या जिवापाड जपाव्याश्या वाटणार्‍या गोष्टींपैकी, ही मंत्र /काव्य/स्तोत्र जतनाची एक गोष्ट होती. आणि याशिवायंही ,पुढे लेखनकला विकसीत झाल्यावर..जो विषय वारंवार म्हणावा,वापरावा लागणार आहे..त्यासाठी भल्यामोठ्ठ्या पोथ्यांची बाडे बरोबर घेऊन हिंडणे.हे ऋषीमुनिंपासून ते सामन्यजनांपर्यंत सर्वांनाच त्याकाळी सोपे नव्हते. त्याशिवाय पोथ्या पाण्यानि/आगिमुळे,वाळवी/कसर लागण्यापुळे खराब होणे अशिही कारणे होतिच. आणखि म्हणजे, परस्पर विरोधीमतांच्या गटांनी एकमेकाचे लिखित स्वरुपातिल वांङगमय नष्ट करणे,हे ही एक प्रबळ कारण त्याकाळी होतेच...या अश्या सर्व कारणांसाठी हे ज्ञान मुखोद्गत-पाठ ठेवावे लागले असेल.(आमच्याकडला अचुक शब्द म्हणजे-जिवंत ठेवावे लागले असेल.) आणि विशेषतः जर ते जसे च्या तसे पाठ ठेवावे लागले असेल,तर त्याला अशीच तंतोतंत शब्दपाठांतराची पद्धती असायला हवी होती. आणि म्हणुन तसे जर का एकदा पाठ झाले,आणि त्याच्या वारंवार आवृत्या* म्हणुन पाठ ठेवलेही गेले, तर वरिल कारणांनी येणारे नष्टतेचे भय बाळगावे लागत नाही, हे तर निश्चित आहे. (आज आपण हे आपल्याला हव्या त्या सर्व विषयांसाठि, हजारो प्रकारच्या रेकॉर्डिंगच्या साधनांनि करतच असतो. Happy )

आता जसेच्या तसे...म्हणजे काय हो नक्की? तर खाली दिलेले हे गणपतिस्तोत्र पहात पहात ह्या लिंकवर http://mfi.re/listen/zxd8acxaxqxwc2i/ganapatistotra_myself.mp3 जाऊन हे क्लिपिंग ऐका. जेणेकरुन ह्या पद्धतिनी पाठ केले असता,जसेच्या तसे मेंदुत उमटते..म्हणजे काय होते? ते कळणे सहज होइल Happy
(गायकबियक कुणी नाही.. मीच आमच्या(उच्चार)पद्धतिनी म्हटलेलं आहे हां! Wink )
http://mfi.re/listen/zxd8acxaxqxwc2i/ganapatistotra_myself.mp3
प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् ।
भक्तावासं स्मरेन्नित्यमायुःकामार्थसिद्धये ॥ १॥

प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकम् ।
तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् ॥ २॥

लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च ।
सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमम् ॥ ३॥

नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् ।
एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम् ॥ ४॥

द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यं यः पठेन्नरः ।
न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरः प्रभुः ॥ ५॥

विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम् ।
पुत्रार्थी लभते पुत्रान्मोक्षार्थी लभते गतिम् ॥ ६॥

जपेद्गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासैः फलं लभेत् ।
संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः ॥ ७॥

अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत् ।
तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादतः ॥ ८॥

.........................................................................................................................

आवृत्ति*:- हा वेदाध्ययनातला अत्यंत महत्वाचा भाग आहे. एकदा पाठ झालेला विषय/अध्याय..किमान २ वर्ष तरी दररोज १ आवृत्ती म्हणून जिवंत-ठेवावा लागतो. नाहितर आमच्याकडल्या प्रसिद्ध म्हणी प्रमाणे..तो नवव्या दिवशी नवा-होतो. म्हणजे अक्षरशः पुन्हा संथा-घेऊन शिकण्याच्या पातळीवर येतो. आणि असंही हे सोपं काम नसतच. नुसती ऋग्वेदाची संहिता घेतली..तरी त्यात आठ अष्टके..म्हणजे ६४ अध्याय आहेत. अध्ययन सुरु झाल्यापासून जसजसे पाठांतर वाढत जाइल..तसतसा हा आवृतीचा काळ वाढत जातो. आणि दर दोन वर्षानी समांतर होत रहातो. मग पुढे ब्राम्हण/आरण्यक्/उपनिषदे/शिक्षाचतुष्टय/ज्योतिष(फलज्योतिषवालं नव्हे!)/शास्त्र/निरुक्त असे अनेक ग्रंथोपग्रंथ पचवत, जिवंत ठेवत, अध्ययन करावे लागते..एका वेदाच्या दशग्रंथांच्या अध्ययनाला पहिल्या वर्षाला ६ तास.. इथून सुरवात होऊन..शेवटच्या वर्षाला हा शिक्षण कालावधी १६ ते १८ तासांपर्यंत जाऊन बसतो. म्हणूनच ऋग्वेदाचे दशग्रंथ पूर्ण कंठस्थ (पाठ) होण्याचा कालावधी किमान १२ वर्षे आहे.

पाठांतरातील अग्निदिव्य :- संचार जाणे .. संचार.., हा पाठांतराच्या वाटेतला अटळ सहप्रवासी आहे. आता संचार म्हणजे काय? तर एकसमान किंवा तोच तोच.. शब्द वा मंत्र ,संपूर्ण अध्ययनाच्या विषयांमधे कुठेही वारंवार येणे.. यामुळे काय होते? तर ..एका महारस्त्यावर जवळ जवळ सारखी नावं असलेले दोन फाटे असतील..तर नामसाधर्म्याच्या गोंधळामुळे, माणूस जसा या ऐवजी त्या गावात पोहोचावा. तसे काहिसे, हे सारखे-मंत्र अथवा शब्द करीत असतात. ऋग्वेदाच्या नुसत्या संहितेमधे असे हजारो संचार आहेत. नुसतं त्याच संहितेमधून वेगवेगळे पाच अध्याय व दोन सूक्त एकत्र करून निर्मिलेलं जे पंचसूक्त पवमान आहे..त्यात सुमारे आडिचशे संचार आहेत. बरं.., हे संचार म्हणजे फक्त (समान)शब्द आणि संपूर्ण अथवा अर्ध्या (समान)मंत्राचेच आहेत काय? आणि नुसते तेव्हढेच आहेत काय? तर..तसे नाही. काहि ठिकाणी तर, फक्त या अध्यायात या ओळीत विशिष्ट शब्दावर मात्रा आहे ..आणि एकदम पुढच्या कुठल्या तरी अध्यायात तोच मंत्र पण त्याच ओळिवर विशिष्ट शब्दावर (आता) मात्रा नाही, एव्हढाच फरक आहे. म्हणजे ही पवमानातली गंमत बघा. एके ठिकाणी "शुंभमा ऋतायुभि:" असे आहे,तर दुसरीकडे , "शुंभमानो ऋतायुभि:" असे आहे. परत दोन्ही कडच्या पुढच्या ओळी निसंशय वेगळ्याच असतात. आणि मग जर का हे लक्षात राहिले नाही..तर या अध्यायातून त्या अध्यायात उडी पडते. याच घडणार्‍या प्रकाराला म्हणतात, संचार-जाणे! उदाहरणा दाखल आपण आजुन एक दोन संचार पाहू .. सुदुघाहि-पयस्वती: आणि सुदुघाहि-घृतःश्चुतः.. हा शब्दाचा संचार झाला.हा ही सहज लक्षात रहातो. पण अनुस्वारांचे संचार म्हणजे,मेंदूची शस्त्रक्रीया करतांना जितकं बारीक..आणि नजर न हलता लक्ष ठेवावं लागेल..तसला भयंकर प्रकार. तो असा - पतामांतरिक्षा आणि पवंतामांतरिक्षा - या शब्दातल्या दुसर्‍या अक्षरावर ,म्हणजे व - वर ..प्रथम अनुस्वार नाही आणि नंतर पुढे, तोच अनु-स्वार-झालेला आहे!!! इतका सूक्ष्म फरक लक्षात राहाणे मुश्किल..आणि मग इकडून तिकडच्या आध्यायात उडि पडणे निश्चित! (यातलं पंचसूक्त पवमान..हे पाठ-ठेवायला अत्यंत कर्मकठिण आहे. मला स्वतःला हे पाठ झाल्यापासून सलग तिन महिने याची आवृती ठेवल्यानंतरही..पुढे पुन्हा सलग २ महिने पाठ म्हणताना, रोज २ अथवा ३ संचार-जायचेच! आणि ते ही रोज वेगवेगळे! आज ह्या गल्लीत चुकलो,की उद्या त्या गल्लीत! रामा..शिवा..आणि गोविंदा..बाकि काही नाही! )

आता आपल्या सुप्रसिद्ध रुद्रातला हा शब्दसंचार..,प्रत्यक्षच कसा-जातो..?ते पहा...
(रुद्रामधे, आकरा नमका'चे आणि आकरा चमका'चे असे एकंदर २२अनुवाक आहेत.)

यातल्या नमकाच्या पहिल्या अनुवाकातल्या तिसर्‍या ऋचेतली पहिली ओळः- यातेरुद्र शिवातनुरघोरा पापकाशिनी। आणि पुढची (वेगळी)ओळः- तयानस्तनुवा शंतमया गिरिशंता भिचाकशीहि॥

आता इथून सरळ नमकाच्या दहाव्या अनुवाकातली दुसर्‍या ऋचेतली पहिली ओळः- यातेरुद्र शिवातनु:शिवाविश्वा हभेषजी। आणि पुढची (वेगळी)ओळ:- शिवारुद्रस्य भेषजी तयानोमृड जीवसे॥

आता यात जर का रुद्र म्हणणारा माणूस पहिल्या अनुवाकात , यातेरुद्र शिवातनु च्या पुढे शिवाविश्वा हभेषजी असे चुकून म्हणून गेला..तर त्याची पाठांतर पद्धतीमुळे मेंदूत कोरली गेलेली पुढची ओळ ही दहाव्या अनुवाकातली ,म्हणजे शिवारुद्रस्य भेषजी तयानोमृड जीवसे॥
.., हीच तोंडातून उमटणार. हा गेला संचार! आणि याच्याही अगदी उलट घडून दहाव्या अनुवाकातून पहिल्या अनुवाकात असा उलटंही तो येणार.म्हणजे - संचार जाणार!

आणि कित्तीही कुशाग्र बुद्धिमत्तेचा माणूस असला , तरी संपूर्ण एका वेदातले असे हजारो संचार लक्षात ठेवणं हे सामान्य बुद्धीमत्तेच्या बाहेरचचं काम.. मग हे काम सोप्प व्हावं म्हणून पुढे .. वेदांमधे पद/क्रम/जटा/माला/घन अशी सोय निर्माण करण्यात आली. याचा उचित वापर केला..कि हे संचारचं गाडं आडवं आलं, तरी त्याला नीट उभं करता येतं. (याविषयी पुन्हा केंव्हा तरी असच लिहिन! ) अर्थात, ज्या अध्ययनाचा आधार फक्त आणि फक्त पाठांतर हाच (राहिला)होता, त्या अतीप्राचीन (लेखनकलेची सुरवातही न झालेल्या) कालखंडात अश्या तर्‍हेच्या युक्त्या अथवा सोयी सुचणं, हे ही त्याच मानवी बुद्धीशी सुसंगतच म्हटलं पाहिजे. मग त्याचं समर्थन आजच्या आणि यापुढच्या काळात कोणत्याही पद्धतीनी अगर हेतूनी होवो.

आज हा पाठांतर पद्धतीचा छोटासा आढावा घेणारा लेख लिहुन झाला याचं समाधान एका कारणानी तर आहेच आहे.

१) वेदज्ञान.., हे त्या किंवा आजच्या अथवा पुढच्या काळात उपयोगी/अनुपयोगी .. उपकारक/अनुपकारक..असं कसंही असलं .तरी .. हे ज्ञान पूर्वी आणि आजही पाठ ठेवणारे जे वेदाध्यायी आहेत. त्यांच्या बुद्धिमत्तेची जाणिव..या लेखनामुळे करवून देता आली.(एरवी..हे नुसतं सांगून शक्य नाही,आणि नसलंही पाहिजे. Happy ) याशिवाय.., जे लोक:- "ह्हॅ!...हे शिकायला काय अक्कल अथवा बुद्धी लागते?" असे (कोणत्याही हेतूने) म्हणतात..त्यांना.. किमान हा लेख वाचल्यानंतर,पुन्हा असं म्हणताना,काहि क्षण थांबून विचार करावा लागेल...
धन्यवाद. Happy
===============================================
पराग दिवेकर..(हिंदू पुरोहित.)

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण या माझ्या वर्गाचं मनाचं ऐश्वर्य असं कधी आलच नाही.
बरोब्बर!!

खरे तर जनावरे नि मनुष्यप्राणी यांच्यात महत्वाचा फरक म्हणजे मनुष्याला मन, बुद्धि यांचा विकास करण्याची शक्ति अफाट आहे. पण चांगले विचार असतील असे मनाचे ऐश्वर्य मिळवणे या ऐवजी इतर गोष्टीतच बहुतेक सर्व वेळ घालवतात.
याच ठिकाणी तुम्ही जे लिहीले आहे त्यावरून धर्माच्या नावाखाली आजकाल बर्‍याचश्या गोष्टी केवळ वर्षानुवर्षे असेच केले म्हणून आत्ताहि या न्यायाने होतात असे दिसते. म्हणजे बुद्धि विकसित झाली आहे, जास्त ज्ञान प्राप्त झाले आहे आता काही बदलावे, वगैरे विचारहि कुणाला शिवत नाहीत. हे खरे आहे असे वाटते. याला हिंदू धर्म म्हणायचे हे त्या धर्माचे दुर्दैव.

बाकी मुळात तुम्ही वेदाभ्यास शिक्षण/पाठांतर पद्धती याबद्दल नुसती माहिती दिली आहे, माहिती म्हणून ती फार छान आहे. त्यातून इतर फाटे फुटून लै विनोदी लिहीले बर्‍याच लोकांनी.

तसे काय, या मायबोलीवर कुणि, सिनेमात वेशभूषा करण्यामागील प्रक्रिया, या विषयावर छान माहितीपर लेख लिहीला तर त्यातहि धर्म, समाजकारण, भाजप/ काँग्रेस, अमेरिका/ भारत, सावरकर/ गांधी असे वाद उकरून काढता येतात. काय लिहावे याचा विषयाशी संबंध नाही.

त्या गामांना नक्की कोण धर्मशास्त्र शिकवतं माहित नाही. पण आमच्या लग्नाच्यावेळी पुरोहित म्हनाले की लग्नानंतर पतीने केलेल्या पुण्यावर पत्नीचा अर्धा हक्क. पत्नीचं पुण्य पत्नीला. थोडक्यात पत्नीला दीड पुण्य. पण पापं ज्याच्या त्याच्या हिशोबावर. ती कॅरी फॉरवर्ड होत नाहीत. Proud पाप पुण्य संचितावर फारसा विश्वास नसला तरी हे मजेदार वाटलं होतं. Happy

गामांना नक्की कोण धर्मशास्त्र शिकवतं माहित नाही. >>> त्यांच्या पितृसंस्थेची लिंक इकाकानी दिली आहे त्यावर क्लिक करताच टणाटण प्रभात चा दुवा उघड़तो Wink

अतृप्त,

खूपच सुंदर पोस्ट आहे. जुनं ते सगळं टाकूनच दयायचं किंवा ते सगळंच मान्य करुन बसायचं हे दोन्ही करण्यापेक्षा आपल्या सद्सद्विवेकबुध्दीनुसार काही सुवर्णमध्य काढला तर फार उत्तम...तेच करण्याचा आमचा तरी प्रयत्न असतो.

गुरूजी , तुम्ही जे गुंडीकेचि संस्था म्हणून जे दिलेल आहे ते श्रीधरमुनिनी रचलेल स्तोत्र आहे . बरोबर ना ? आम्हाला शाळेत शिकवल होते ते . सहज गुणगुणन पाहिल . अजुनही लक्षात आहे

महिला यजमानाच्याही हातून मृताचे दिवस-करणे <<
हे फारसे नवीन राह्यलेय असे वाटत नाही. मी माझ्या आईचे केलेत. ओंकारेश्वराच्या इथल्या गुरूजींनाही ते सवयीचे झाले असावे. त्यांनी नियमानुसार संततीने दिवसकार्य करावे (मुलगा वा मुलगी कोणीही). संतती नसल्यास जोडीदाराने करावे असे स्पष्ट सांगितले होते.
आजोबा, आई आणि आजी अश्या तिघांच्याही दिवस कार्याच्या वेळेला ओंकारेश्वराच्या इथे अनेक मुलींना/ बायकांना आपापल्या जन्मदात्यांचे दिवस करताना बघितले होते.

धर्म फेकून देण्याबाबत... कुठल्याही संदर्भात जेव्हा बाई असणे हे कमी प्रतीचे, बाई आहेस म्हणून तुला धर्मातील अमुक तमुक करायचा अधिकार नाही, बाई आहेस म्हणून तू स्वतःच्या जन्मकुळापेक्षा नवर्‍याच्या कुळाचेच हित पुजेअर्चेत चिंतले पाहिजेस, बाई आहेस म्हणून तुला देवीच्या (जी स्त्रीच आहे) गाभार्‍यात जायची परवानगी नाही, बाई आहेस म्हणून.... अमुक, तमुक, ढमुक, दगड, धोंडे, माती..... अश्याच गोष्टी सतत आडव्या येतात आणि त्या धर्मानुसार आहेत हे सांगितले जाते तेव्हा धर्म फेकावासा वाटणे हे काही चुकीचे नाही.

मला संपूर्णपणे फेकावासा वाटत नाही पण ती माझी खाजगी बाबच असायला हवी हे मात्र जरूर वाटते. देवाशी असलेले कनेक्शन हा माझा आणि देवाचा प्रायव्हेट मामलाच रहायला हवा असे मला वाटते. इमोशनली किंवा मानसिक बळ मिळण्यापुरती मला कधीकधी देवाची जरूर पडते पण मग त्यावेळी मी काय करावे हे मला कुठल्या पंथाने, बुवाबापूमहाराजाने सांगायचा संबंध नाही.
धर्मकृत्यांची जी बेसिक रिच्युअल्स आहेत त्याचे काही प्रमाणात महत्व मला वाटते. जसे की विवाहविधी. समहाऊ कचेरीत जाऊन सह्या करणे याने मी आयुष्याच्या नवीन टप्प्याला सुरूवात करावी असे मला पचत नव्हते. आणि आंधळ्यासारखे गुरूजी जे म्हणतील ते करत गेल्यानेही मला विवाह झाल्यासारखे वाटणार नव्हते. त्यामुळे वरती सांगितला तो सगळा उहापोह केला होता.
दिवसकार्यांच्या संदर्भात म्हणायचे तर गुरूजी आत्मा, गती वगैरे सर्व काही सांगत होते. ते असूदेत पण मला घडलेल्या घटनेचे वास्तव खरेखुरे कळायला, क्लोजर मिळायला त्या सगळ्या गोष्टींचा उपयोग झाला.
हे अर्थात अत्यंत वैयक्तिक आहे आणि प्रत्येकाला तसेच वाटेल/ वाटायला हवे असे नाही.

असो तुमच्या धाग्यावर फारच जास्त अवांतर झालेय. त्याबद्दल क्षमस्व.
यापुढे काही कार्य करायचे असेल तर तुम्हाला किंवा तुमच्यासारखा विचार असलेल्या गुरूजींना बोलावेन.

कृपया
गामा पैलवान, यांना जे काही बोलायचे असेल, अगर बोल लावायचे असतील, ते त्यांच्या वि.पू. मधे जाऊन बोला. ही प्रार्थना. __/\__

पराग दिवेकर आणि गुर्जी या दोन भूमिका पार पाडणारे व्यक्तीमत्त्व एकच आहे. गुर्जी हा त्यांचा व्यवसाय आहे. इतर व्यवसाय जसे असतात तसंचे हे पण. तसंच त्यांनी ते स्वेच्छेने स्विकारलेलं आहे. हे महत्वाचं. पराग दिवेकर या व्यक्तीला आपले विचारस्वातंत्र्य आहे ज्यावर त्यांचा व्यवसाय आक्रमण करीत नाही. याहीपुढे जाऊन त्यातल्या चुकीच्या गोष्टींची ते कबुली देतात आणि शिवाय हे चुकीचं आहे पण करावं लागतं हा प्रांजळपणा खूपच दुर्मिळ आहे. हे सर्व प्रेमात पाडणारं आहे. जालावर लोक काय लिहीलेलं चांगलं दिसेल याचा विचार करून शक्यतो लिहीतात. जालावरच का, सर्वच ठिकाणी मनुष्य स्वतःला असच प्रेझेण्ट करत असतो. गुर्जींची प्रांजळ भूमिका स्विकारली तर अनेक गोष्टी खूप सोप्या होऊन जातात.... बाकी मतमतांतरे तर असणारच !

परागशास्त्री दिवेकरांस बालके गामा पैलवानाचा आदरपूर्वक प्रणाम.

आपला इथला प्रतिसाद वाचला. तुम्ही नाराज झालात हे पाहून अंमळ खेद वाटला. तुमची नाराजी दूर करायचा अल्पसा प्रयत्न करतो.

१.
>> तुमचा काही संमंध नसताना तुम्ही प्रतिउत्तरांचि खैरात झोडताय. कृपया हे बंद करा.

एका अर्थी हे बरोबर आहे. मात्र मला मतप्रदर्शनाचं स्वातंत्र्य असल्याने मी माझं म्हणणं उचित शब्दांत मांडू इच्छितो. तसेच मूळ संदर्भ ">>" अशा चिन्हाने अंकित करून त्यावर प्रतिसाद देतो, जेणेकरून माझ्या प्रतिसादाची पार्श्वभूमी स्पष्ट व्हावी.

२.
>> तसेच या पुढे वेद,धर्म सारख्या (तुमच्याच मति प्रमाणे) सोवळ्या आणि सात्विक विषयां वरची उत्तरं सत्व गुणि
>> ताडपत्रांवर लिहून पाठवा . तमोगुणी संगणक यंत्राचा , अंतरजाल सेवेचा वापर करू नका.

प्रस्तुत चर्चेत देवतांना आवाहन नसल्याने तुमची सूचना अंमलात आणणे आवश्यक नसावे.

३.
>> आणि वेदाध्याय़िंचि आज्ञा ऐकायचाच धर्म पाळता ना? मग या धग्यावर गप्प बसा. बघू आता धर्म किती पाळता ते!

वेदाध्याय़िंचि आज्ञा ऐकणे हा माझा धर्म असल्याचा एखादा शास्त्राधार तुम्ही शोधून काढालही. परंतु त्यामुळे धर्मपालन कसे होईल ते कृपया विशद करावे.

असो.

आपली अप्रसन्नता दूर झाली असेल अशी आशा आहे.

आपला नम्र,
-गामा पैलवान

लोकहो,

नीधप यांनी या ठिकाणी काही रोचक विधाने केली आहेत. त्यावर माझं मत प्रदर्शित करतोय. कृपया नीधप यांनी हा संदेश वाचू नये.

१.
>> पतीचं पाप आणि पत्नीचं पुण्य याची काय भागिदारी सांगितलीये गामाशास्त्रामधे? की बाप्याच्या जन्माला
>> येऊन पतीची सगळी पापे धुतली गेलीत आणि बाईच्या जन्माला येऊन पत्नीची पुण्ये गायब झालीत? कैत्तरी उत्तरे...

हे मत माझं नसून पारंपारिक आहे. माझ्याकडे नेमका संदर्भ नाही. यावर परागशास्त्री अधिक सांगू शकतील. गामाशास्त्र हा उल्लेख निरर्थक आहे.

२.
>> पुरोहित लोक पुजेला येऊन निर्लज्जासारखे 'कुणाची पाळी नाही ना?' असे विचारताना मी ऐकले आहे

निर्लज्जपणाचा निषेध. Angry मात्र अशी खात्री करून घेणं हा त्यांच्या कामाचा भाग असू शकतो. कारण की त्या वेळेस स्त्रीच्या शरीरात विनाशकारी तत्त्व फार मोठ्या प्रमाणावर कार्यरत असतं.

३.
>> हे एवढेच विधी व हार घालणे करायचे अशी आमची दोघांची इच्छा होती.

हे बरोबर आहे. आपल्याला जेव्हढे मान्य असतील तेव्हढेच विधी करून घेणं हा त्या त्या व्यक्तीचा अधिकार आहे. मात्र त्यासाठी यथोचित पुरोहित मिळवणं कठीण आहे. याबाबत द्रुपद राजाचं उदाहरण प्रसिद्ध आहे.

द्रोणाचा वध करेल असा पुत्र उत्पन्न करण्यासाठी यज्ञ करायला कोणी पुरोहित मिळेना. कारण तत्कालीन शास्त्रानुसार असा संकल्प सोडणं हा अनाचार होता. तरीपण द्रुपदाने याज नामक ऋत्विज शोधला. त्यांने पाहिजे तसा यज्ञ करून द्रुपदास पुत्र मिळवून दिला. त्याचं नाव धृष्टद्युम्न.

४.
>> त्यामुळे मी माझे दान करायला होकार दिला.

ही जबरदस्ती झाली. यावर एक मार्ग म्हणजे नोंदणी पद्धतीने विवाह करणे. आणि घरी खाजगी समारंभ ठेवून त्यात हवे असतील तेव्हढेच विधी करून घेणे.

मला स्वत:ला असं काटछाट केलेलं लग्नं पसंत नाही. मात्र उभयपक्षांचा अधिकार मान्य.

५.
>> तर खटकलेले मुद्दे म्हणजे ही कार्यालयाबरोबर तयार केलेली मोनोपॉली आणि हा कन्यादान नावाच्या अत्यंत
>> वाईट प्रकाराचा आग्रह.

कार्यालायची दंडेली वैदिक परंपरेचा भाग नाही!

कन्यादानाचं म्हंटलं तर राक्षस, गांधर्व आणि पैशाचिक (यादी अपूर्ण) विवाहांत कन्यादानासह अनेक विधी नसतात. ब्राह्मपद्धतीने (वा तत्सम) विवाह असेल तर कन्यादान करावं लागतं. यथोचित प्रकाराने विवाहकार्य साधून घ्यायला कुणाचीही हरकत नसावी.

आ.न.,
-गा.पै.

परागशास्त्री दिवेकरांस बालके गामा पैलवानाचा आदरपूर्वक प्रणाम.

'टणाटण प्रभात' ही संज्ञा वाचून आपण हसून हसून वारलात असे लिहिले आहे. खरंतर ही हसण्यावारी न्यायची गोष्ट नाही.

कुणाच्या व्यंगावर वा कमतरतेवर असे हसणे बरोबर नव्हे. पहाटेपहाटे काय टणाटण होतं ते सगळ्यांना ठाऊक आहे. पण मायबोलीवरील काही जणांचं ते होत नाही. म्हणून ते 'टणाटण प्रभात' असं बोंबलत ठायी ठायी हिंडत असतात.

अशांकडे तुम्ही हास्यमूलक भावनेने बघितले तर त्यांना यातना होतील. अशांकरिता 'सर्वेऽपि सुखिन: सन्तु' हा श्लोक म्हटलेला शोभून दिसावा. अर्थात तुम्ही मुद्दाम हसला नसणार याची खात्री आहे. तसेच जाई. यांनी केलेला टणाटण प्रभात हा उल्लेखही चुकून झालेला आहे, हे वेगळे सांगणे नलगे.

आपला नम्र,
-गामा पैलवान

कुणाच्या व्यंगावर वा कमतरतेवर असे हसणे बरोबर नव्हे. >>> गामांच्या या वाक्याला मात्र जोरदार अणूमोदण. असेच प्रांजळ बना ...

अतृप्त, तुमचे सगळे लिखाण आणि प्रतिसाद अतिशय आवडले. तुमची चपखल, संयमी आणि मुद्देसूद भाषा खरोखर वाखाणण्यायोग्य आहे >> +१

लिंबूटिंबू, तुमचे तर्कशास्त्र मला आजिबात कळलेले नाही! अर्थ न समजता गाण्यांवर नाच करणाऱ्या मुलांचे उदाहरण देऊन तुम्ही वेद पाठ असणाऱ्या परंतु त्यांचा अर्थ न जाणणाऱ्या भटजींची बाजू घेत आहात. याचा अर्थ तुम्हाला त्या मुलांचा नाच योग्य वाटतो असा घ्यायचा का? बहुतेक तसं अपेक्षित नाहीये पण तसं ध्वनित होतंय तुमच्या प्रतिसादातून! न कळत्या वयात अनेक बऱ्या-वाईट गोष्टी कानांवर पडून पाठ होऊ शकतात पण जो आपला व्यवसाय आहे त्यातील ज्ञान केवळ पाठ असल्याने व्यवसाय चालतो असा हा एकमेव व्यवसाय असावा! नाहीतर कायद्याची पुस्तके पाठ करून लोकं वकील झाले असते आणि पाढे पाठ करून गणितज्ञ! हा लेख वाचेपर्यंत माझी समजूत होती की वेदाभ्यास म्हणजे त्यात काय लिहिले आहे त्याच्या अभ्यास आणि ज्यांना ते कळते आणि पाठ येते असे ब्राह्मण म्हणजे दशग्रंथी वगैरे उपाधी लावणारे ब्राह्मण. पण ते तसे नसते हे अतृप्त ह्यांनी सांगितल्याने कळले आणि मला पटले.
अतृप्त, तुमचे सर्वच प्रतिसाद खूप सुरेख आहेत! होय, ह्या धर्मातील अनेक चांगल्या विचारांची पाठराखण करणे हेही घडले पाहिजे. "यः धारयति सः धर्मः|" अशी इतकी व्यापक ज्या धर्माची व्याख्या असेल तो धर्म टाकावू ठरणार नाही. पण त्याचवेळी वाईट प्रथांना तिलांजली देण्याची हिम्मत न दाखवल्यास हा धर्म टिकणारही नाही!

गा पै .. तुम्हाला माझा साष् टांग नमस्कार!
आपली बुद्धिमत्ता आ कलन शक्ति अतिशय हुच्च कोटीची आहे,हे निदर्शनास आले. शब्दार्थांचे भावार्थ तर आपण जे काही शोधता , तो गुण तर अखिल (लै दिसानी हा शब्द हताला लागला! Wink ) मानावजातीला शतकानुशतके प्रेरणादायी ठरेल , याबद्दल मज पामराला अज्जिब्बात शंका नाही. ब्रम्हादेवानि आपली चारही तोंड आपल्या समोर झुकवून आपल्या कडू नच आता नवनिर्मितिचा ध्यास-धरला पाहिजे!

जय हिंदुधर्म , जय जय जय जय जय जय जय भारत!

आपल्या ठणठणीत लख्ख प्रतिभेनी डोळे दिपलेला :- अतृप्त , उर्फ़ पराग दिवेकर.

नाठाळ,

तुम्हाला विनाशकारी तत्त्व म्हणजे काय हे पहायचं असेल तर डॉ. साती यांच्या लेखातली ही वाक्यं पहावीत :

>> निसर्गाने स्त्री शरीराची रचना बरिच गुंतागुंतीची केली आहे.

>> इस्ट्रोजेन प्रोजेस्ट्रॉन कमी झाल्याने बाहेर पडलेले ओवम व गर्भाशयाने केलेली गर्भरपणाची तयारीही हळुहळू नष्ट
>> होत नविन मासिक स्त्रावाच्या रुपाने गर्भाशयाबाहेर पडते.

>> हुश्श! एवढं लिहितानाच थकून गेले मी तर निसर्ग हा चमत्कार कसा घडवुन आणत असेल कुणास ठाऊक.

लेख इथे आहे : http://www.maayboli.com/node/34504

आ.न.,
-गा.पै.

जिज्ञासा,

>> त्यातील ज्ञान केवळ पाठ असल्याने व्यवसाय चालतो असा हा एकमेव व्यवसाय असावा!

तुमचं निरीक्षण समर्पक आहे. मात्र पौरोहित्य हा केवळ व्यवसाय नाही. त्यापेक्षा जास्त काहीतरी आहे. ते 'जास्त काहीतरी' मूळ उद्दिष्ट आहे. धंदा हे उपफळ आहे. निदान अशी माझी श्रद्धा आहे.

आ.न.,
-गा.पै.

Pages