आकाश पाताळ एकत्र व्हावे अशी वेळ यावी पुन्हा एकदा
काळोख व्हावा सभोवार तेव्हा दिसाया नको येथली संपदा..
ज्वालामुखी तप्त यावा असा कि धुरानेच व्यापून जावी धरा
निर्वंश होऊनिया जीवसृष्टी तुझे राज्य यावे पुन्हा ईश्वरा...
माणुसकी राहिली ना कुणाला दया प्रेम शांती कुठे लोपली
वाढायला लागली हिंस्त्रबुद्धी विनाशाकडे माणसे धावली..
झाले रिपू मित्र होते कधी जे स्वभावात खोटेपणा वाढला
धर्मांधतेने मनातील यांच्या जगातील गोतावळा तोडला...
वेताळ सैतान यांचीच पूजा इथे रोज देवाप्रमाणे सुरु
कोणापुढे हात जोडावयाचे कुणाची खरी प्रार्थना मी करु..
रस्त्यावरी खून होतात देवा बलात्कार झाले प्रथा येथली
जाणार कोठे स्त्रिया आश्रयाला जिथे माणसे श्वापदे जाहली...
चोर्या दरोडे सरेआम होती कधी दंगली कैक जातीतल्या
संस्कार सारे खुणा पुर्वजांच्या मिटू लागल्या याच मातीतल्या..
विश्वास नावात विश्वास नाही मिळे दुश्मनी मात्र जन्मासवे
घायाळ झाली धरीत्री तरीही कुणाचीच ना वाहिली आसवे...
पापी खुनी माणसांच्याच झुंडी खुलेआम चोहीकडे हिंडती
सत्कर्म सद्भाव बंधूत्व यांना समाजात क्षुद्रापरी निंदती..
दारिद्र्य वाढायला लागलेले व्यभिचार बोकाळले पाशवी
जाळायला पाप हे वाढलेले तुझ्या लोचनातील ज्वाला हवी...
-- संतोष वाटपाडे ( नाशिक)
सन्त सोहिरोबानाथाच्या कविता
सन्त सोहिरोबानाथाच्या कविता क्रुपया कुनितरि द्या