शापित गड भाग २

Submitted by श्रीमत् on 28 September, 2014 - 07:49

शापित गड भाग १.http://www.maayboli.com/node/49017
माझी आणि पंडीतची डेपोत भेट झाल्यानंतर पुढे.
ठिक आहे चल आता आपल्याला लवकर निघाल पाहिजे एव्हाना साडेपाच वाजले होते. मी आणि पंडीत चौकशी कक्षा समोर गेलो आणि खापरवाडीला जाणारया एस. टी ची विचारणा केली असता. गाडी फलाट नंबर अकरा वर लागेल असं सागण्यात आलं आम्ही तडक आमचा मोर्चा तिकडे वळवला. एव्हाना गाडी तिथे येऊन रिव्हर्स गिअर मध्ये फलाटावर लागत होती. गाडीच्या एकंदर अवतारावरुन ही पोचणार की पोचवणार अशा व्दिधा मनस्थीतीत मी अडकलो होतो.

पुढच्या चारच तासात आम्ही हरवल गावाच्या फाट्यावर "जिवंत" उभे होतो. एक दोन आचके तर एवढे जोरात बसले होते की आता आपले विस्कटलेले अवयव बहुतेक गोळा करुनच न्यावे लागणार असं वाटुन गेलं, मनात आलं हा जो कोणी ड्राईव्हर होता त्याला एस.टी महामंडळाने जर फॉर्म्युला वन मध्ये उतरवला तर "वेटल आणि शुमाकर" वर एस.टी चालवयची पाळी यायची. घड्याळात सळाळचे साडे नऊ वाजले होते. आम्ही जेथे उतरलो तिथे तीन रस्ते एकत्र आले होते त्यापैकी एक सरळ खापरवाडीला तर एक त्याच्याच बाजुने नागमोडी वळन घेऊन पुढे गेला होता. तर उजव्या बाजुचा काळवंडलेला बोर्ड आमचं लक्ष वेधुन घेत होता. शापित गडाच्या दिशेने दिशा दर्शक बाण दाखवला होता त्या बाणाच्या मध्येच कोणी तरी ह्रुदय काढुन वर ईंग्रजी बी आणि खाली ए लिहील होतं.च्यायला कोणाची क्रिएटिवीटी कुठे फळफळेल आणि एखाद्याच्या प्रेमाला कुठे पुर येईल सांगणे कठीण. मी पंडीतकडे नजर मारली स्वारीच्या चेहर्यावर प्रश्नचिन्ह आणि पोटात कावळे ओरडत असावेत असा मी अंदाज बांधला आणि मी काही बोलायच्या आतच, " ए भास्क्या दोन घास खाल्याशिवाय मजा नाही लेका तुझा माऊंट शापित चढायला इति पंडीत, "थांब रे हरवल गाव येईलच ईतक्यात मग खाऊ काहीतरी मी म्हणालो".
घड्याळात एव्हाना पाउने दहा वाजत आले होते. गेल्या पंधरा मिनिटांच्या चालीत ना एखादं वाहन ना एखादी व्यक्ती आमच्या नजरेस पडली होती. रस्ता म्हणजे तशी कच्ची सडकच होती लाल मातीची. दुतर्फा झाडं आणि किर्रर्र शांतता आमची पायपीट चालु असतानाच मागुन एक फटफटी कर्कश आवाज करत आमच्या पर्यंत आली, "काय रे ए पोरहो कुणीकड चाल्ला? पांढरा सदरा लेंगा आणि त्यावर तशीच मॅचिंग गांधी टोपी घातलेला माणुस आमच्याकडे रोखुन बोलला. वर्ण काळा असला तरी चेहरा तरतरीत मिश्या पिळलेल्या आणि कपाळावर गुलालाची रेघ एकुन व्यक्तीमत्व एकदम ठसठशीत त्यात बुलेट ही तशीच, हेडलाईटवर रेडियम मे काढलेले डोळे दोन्ही हॅंडलला लावलेले झुबकेदार झालर आणि मागच्या मडगार्डला लावलेल्या काळ्या रब्बरवर राम राम पाव्हनं असं ठळक अक्षरात लिहंल होतं. एकदंर ती बुलेट त्या माणसाला जास्त शोभुन दिसत होती.

"गाववाले जरा हरवलं गावाकडे चाल्लो होतो सोडाल कायं? "मी विचारल, "अहो त्यात इच्यारायचं काय, बसा ना मागं. गडावर चाल्लाय व्हय? इति मि. फटफटी. आम्ही एकसुरात होय म्हटलं, आणि पाठीवरच्या बॅगा सावरत त्यांच्या मागे बसलो. मध्ये पंडीत आणि मागे मी. एव्हाना त्यांनीच बोलायला सुरवात केली, "चांगला योग काढलाय म्हणायचा तुम्ही, कसला योग? इति पंडीत. म्हणजे काय आहे आज? "आव आजच तर पित्री आमावस्या आहे. आचच्याच दिशी त्या राजानं येताळाला प्रसन्न केलं होतं. आंम्ही कोन वर गडावर न्हाय जात पण गावच्या येशीवरच्या मंदीरातच त्याची पुजा करतो. असं म्हणतात रातच्याला एका ठराविक येळी गडावर कसल्यातरी शक्तींचा वावर असतोय, आमच्या गावचा भगत सांगतोय बगा, आता त्या चांगल्या हायती कि वाईट ह्ये तो वेताळच जाणो. बाकी तसल काय बी भ्या वाटायच कारण न्हाय फकस्त सांजच्याला येळवर खाली उतरा म्हणजी झालं. नाहीतर गेल्या येळला अशीच बाहीरच्या देशातन दोन माणस आली व्हती, काय ते सर्वे का काय म्हणत्यात तो कराया पण वर गेली ते पुन्यांदा काय खाली आलीच न्हाईत. कुणी म्हणत त्या रात्री गडावरणं कसले-कसले भयंकर आवाज येत व्हते, म्हणुन ते घाबरुन पळाले असतील. आमच्या ठाकर वाडीतला भिवा डुकराचे फासे लावायला वर डोंगरात गेला असता त्याला त्यांच समद सामान मिळाल. त्यानंतर पण अदनं-मदनं तुमच्यासारखी तरणीबांड पोर येत असत्यातच. ह्ये रानोमाळ नि फुटकं अवषेश धुंडाळुन त्यास्नी काय मिळत ह्ये त्यासनीच ठाऊक. त्याच्या ह्या बडबडीत आम्ही गावाच्या आत एका टपरीवर येऊन पोचलो. तिथे पोचताच आम्ही त्याच्या बुलेटवरुन पायऊतार झालो व तिथपर्यंत सोडल्याबद्दल त्याचे आभार मानले तसे त्याने कसल्यातरी पक्षाचे एक कार्ड आमच्यापुढे केले त्याचावर लिहले होते "दादोसा पाटील" शाखा अध्यक्ष- हरवल गावं. आम्ही ते कार्ड हातात घेताच त्याने टपरीवरच्या पोर्याला आवाज दिला, "पुंडलिक.. ए..पुंडलिक...! "पावण्यासनी फक्कड च्या आणि नाष्टा दे बघु आणि हो तुमच खाऊन झालं की टपरीच्या मागुन वरच्या अंगाला सरळ बाहेर पडलात की गडाची पायवाट लागते त्याच वाटेवर ठाकरवाडी बी हाय. तिथ गेलात तर मगाशी मी जे नाव सांगितल ना भिवा म्हणुन त्याच घर ईचारा पोरगं शे-दोनधे घील पण तुमासनी गडावर यवस्थीत पोचवलं. एवढ बोलुन त्याने बुलेट ला किक मारली त्याची गाडी पण त्याच्या सारखीच फट..फट..फट..फट..फट..फट करीत डोळ्यासमोरुन नाहीशी झाली.

टपरी तशी साधीच होती. टपरीच्या बाहेरच दोन लाकडी बाक आडवे मांडले होते तर समोरच्या आडव्या फळीवरच काचेच्या भरण्या वेगवेगळे जिन्नस भरुन ओळीत मांड्ल्या होत्या. त्यांच्या पत्र्याच्या झाकणांवरुनच त्या किती जुन्या आहेत याची साक्ष मिळत होती. टपरीच्या मागेच वडाचं विस्तीर्ण झाड त्याच्या पारंब्या सांभाळत डौलात उभे होते. त्याच्या भोवतीच गावातली काही जुनी खोड तंबाखु मळत बार भरत होती. आजुबाजुलाच कौलारु घरे दाटीवाटीने एकमेकांना खेटुन उभी होती तर काही कौलांवर डिश टिव्हींच्या छत्र्या मशरुम सारख्या डोक वर काढुन बघत असल्याचा भास होत होता. माझ निरिक्षण चालु असतानाच पुंडलिक गरमागरम मिसळ घेऊन आला. मटकीचा तांबडा रस्सा त्यात खरबुडी चिवडा आणि त्यावर बारीक चिरलेला कांदा आणि सोबतीला लिंबु. अशा एखाद्दा टपरीवर अस्सल गावरान चव चाखायला मिळेल अस आम्हा दोघांना स्वप्नातही वाटलं नव्हतं. पुढची दहा मिनिटे आम्ही हा..हुं.. करत नाकाच पानी पुसत पुंडलिकाच्या मिसळीत पार बुडुन गेलो होतो.

मगाशी दादोसा ने सांगितल्या प्रमाणे आम्ही गाईड घ्यायचा ठरवला. शेदोनशे साठी कशाला उगाच रिस्क घ्या. त्यात गडाविषयी एवढ्या आख्यायिका ऐकल्या नंतर नाही म्हटल तरी आमची जरा पाचावर धारण बसली होतीच. पंडीत तर परत जाण्याच्याच मुड मध्ये दिसत होता. टपरीच्या मागच्या बाजुने सरळ चालत आम्ही गावापासुन थोडे पुढे आलो. मधेच चार- पाच पोर रबरी टायरला लाकडाच्या दांड्याने फटके मारत आमच्याकडे बघत निघुन गेली. तर आमच्या उजव्या बाजुनेच पाच-सहा म्हशी गळ्यातल्या घंटा वाजवत शहाण्या बाळासारख्या एका ओळीने विरुध्द दिशेने चालल्या होत्या. त्यांनी टाकलेल्या शेणांचे डोंगर चुकवत-चुकवत आम्ही ठाकर वाडीत येऊन पोचलो. ठाकर वाडी गावापासुन वर थोड्या ऊंचावर डोंगरातल्याच एका टेकडीवर वसलेली होती. मिळुन दहा-बाराच झोपड्या असतील. शेणाने-मातीने सारवलेल्या भिंती आणि वर गवताची झापं.

भिवाचं घर म्हणजे खोपट वजा झोपडीच होती. बाहेरच कोणी तरी म्हातारा माणुस ओल्या बांबुची चिपाड सोलुन टोपली वळत बसला होता. आम्ही त्याला विचारल भिवा तर खुणेनेच त्याने आम्हाला आत मध्ये जायला सांगितल. आम्ही आत जात असतानाच दोन कोंबड्या आमच्या पायातन जोरात पळत बाहेर गेल्या. आतमध्ये एक तरुण वळकटी मारुन आडवा झोपला होता तर त्याच्याच वयाची एक पोरसवदा मुलगी हातातल्या फुंकणीने फुक मारुन चुलीत जाळ करत होती. भिवा आहे का घरात, आम्ही दारातनच विचारल. कोण...हाय? तसा काळा सावळा पण काटक भिवा किलकिले डोळे करुन बाहेर आला. काय काम हाय जी? त्याने हळु आवाजात विचारल तस मी त्याला आमचा गडावर जाण्याचा बेत सांगितला. थोडेसे आढेवेढे घेतल्यानंतर तो तीनशे रुपयात आमच्याबरोबर वर यायला तयार झाला. त्याने आवाजानेच त्या मुलीला पाणी आणायला सांगितले. तशी ती काहीशा मंद चालीने दोन ग्लास घेऊन बाहेर आली. तिने वर चोळी आणि गुडघ्यापर्यंत पातळ नेसले होते व त्याचा पदर कमरेभवती गुंडाळला होता. एव्हाना भिवा तयार होऊन बाहेर आला. डोक्याला मुंडासे एका हातात कापडी पिशवी आणि कमरेला कोयता बांधुन अनवानीच तो आमच्याबरोबर येणार होता.

आम्ही निघणार इतक्यात मगापासुन गप्प बसलेला माणुस आमच्या दिशेने बघुन आक्रस्ताळेपणाने हातवारे करु लागला. एकंदर त्याच्या खुणांवरुन तो भिवाला आमच्या बरोबर जाऊच नको असं सांगत होता असच प्रथमदर्शी तरी वाटत होतं. त्याबद्दल भिवाला विचारल असता तो माणुस त्याचा बाप होता अस समजलं आणि त्याची हि अवस्था पुर्वी पासुन अशी नसुन काहीच दिवसापासुन झाली आहे अस समजलं. दोनच हप्त्यांपुर्वी तो डुकराच्या पारधीसाठी वरच्या जंगलात गेला असता त्या रात्री शिकार तर काय घावली नाही. पण तो जे परत आला तेच मुळी घामाघुम होऊन. जणु त्याने काहीतरी पाहिल असावं आणि भितीने त्याचा जो आवाज बसलाय ते आज पंधरावीस दिवस झाले तरी त्याला स्पष्ट बोलता येत नाही नुसता ईशार्‍यानेच काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतो. मधीच वरच्या जंगलाकडे हात दाखवतो आणि डोळे मोठे करुन उर बडवायला सुरवात करतो.

आता पंडीतने न राहावुन भिवाला विचारलच "भिवा वर काही वाईट गोष्टी तर नाहीत ना?
यावर भिवा म्हणाला, ''साहेब मी इथच ल्हानाचा मोठा झालो''. हा आता एखांद्याबारी वरच्या जंगलातन कसलं-कसलं आवाज येत्यात पण वर जनावर बी लई माजल्यात आणि आपण "येखादी गोष्ट येळत केली तर वाईट येळ तरी कशापाई येतीया". तसा भर दिसा भरपुर येळला मी गडावर फिरलुया, वर समदीकडे पडकं वाडे हायती. त्यातलाच येक मोठा वाडा आजबी जरा बर्या कंडिक्शन मधी हाये. भिवाच्या तोंडी मिंग्लिश शब्द ऐकुन मी आणि पंडीत जरासे हसलो व पुढे ऐकु लागलो. भिवाच्या मते त्याच वाड्यात एक गुप्त दरवाजा आहे. अस म्हणतात कि त्यातुन आत गेल की एक भुयार लागत जिथुन सरळ खालच्या वेताळाच्या मंदीरापर्यंत जाता येतय. वाड्याच्या समोरच एक उभा दगड आणि तळं असुन तळ्याच्या मागेच एक विचित्र झाड आहे. "मग तु कधी गेलास का त्या दरवाज्यातनं? पंडीतने खोचकपणे भिवाला विचारल. "न्हायबा, "आपल्या बाच्यान बी असलं धाडस व्हायच नाय, एक दोन बारी आसंच वाकुन बघितल त्या वाड्यात तर नुसत्या काळोखानंच भिती वाटली. आत जायचं तर लांबच राहीलं, उगाच ईषाची परीक्षा कशापाई? आणि आमचा भगत म्हणुतय त्या परमानं वर त्या वाड्यात भुताटकी हाय. आता मानला तर देव नायतर दगुडच, आणि जर देव मानताय तर भुताटकी बी असणारच की कारण दोन्हीबी गोष्टी दिसत न्हाईत पण त्यांच्या असण्याची जाणीव होती की न्हाय? भिवाच्या या उत्तराने आम्ही चिडीचुप होऊन पुढे ऐकु लागलो. आता बघा गेल्या येळला ती कोन गोरी माणस आली व्हती. आमच्या दादोसा ने सांगितल होतं कोनाला तरी वर घेऊन जा आणि सांच्याला माघारी फिरा पण ऐकली न्हाईत. ते जे वर गेले ते खाली आलेले कुणाला दिसलेच नाय. हा चार-पाच दिसांनी त्यांच सामान मात्र घावलं मला. ते केलं जमा पोलीस पाटलाकडे. हप्त्याभरानंतर अजुन तसलीच माणसं आली व्हती पोलीस घेऊन. समद शोधल पण काहीच पत्या नाय लागला बिचार्‍यांचा.

पुढे भिवा मधे पंडीत आणि मागे मी, उन आता बरयापैकी वर चढल होतं मधुन नागमोडी वाट आनि दुतर्फा जंगल. काही ठिकाणी तर भर दुपारी पण झांडाच्या शांत सावलीमुळे किर्रर्र काळोख पडला होता. पंडीत चालता चालता फोटो काढण्यात मग्न होता. पण माझ मन मात्र आजुबाजुच्या गुढ वातावरणात गुंतत चालल होतं. मगाशी भिवाच घर सोडल्यापासुन सतत कोणी तरी आमच्यावर नजर ठेऊन आहे अस वाटत होतं. मागे वळुन पाहील तर कोणीच नाही. एक दोनदा तर गवतातुन चालताना सळसळही जाणवली. बहुतेक माझा भास असावा. अर्ध्या पाऊन तासाने आम्ही एका अरुंद टेकडीवर येऊन पोचलो. भर उन्हातल्या तंगड तोडी मुळे मगाशी खाल्लेली मिसळ केव्हाच पचली होती. आम्ही जरा विश्रांती घेण्यासाठी थांबलो. आता वरुन उंचीवरुन हरवल गाव लगेचच नजरेला सापडत होतं. आमच्या डाव्या बाजुलाच आम्ही ज्या वाटेने आलो ती वाट नागासारखी वळणे घेत खालीपर्यंत गेली होती. सुर्य आता पश्चिमेकडे कलल्यामुळे आम्ही उभे असलेल्या भागावर छान सावली पडली होती. थोडी ग्लुकोझ बिस्कीटे आणि पाणि रिचवल्यावर आम्ही पुढच्या चढाईसाठी मार्गस्थ झालो. पुढच वळण घेऊन जी चढणीची वाट लागली त्या वाटेवर आमचीपण चांगलीच वाट लागली. माझ्या आतमध्ये जो बिअर ग्रिल काल रात्री पासुन संचारला होता तोही आता थंडावला होता. तर पंडीत चालतोय की रांगतोय तेच कळत नव्हतं भिवा मात्र आत्ताच आंघोळ करुन आल्यासारखा फ्रेश दिसत होता तर आमचे चेहरे मात्र जत्रेत हरवलेल्या पोरांसारखे केविलवाणे दिसत होते. भिवाचं काटक शरीर आणि स्फुर्ती पाहुन खरच हेवा वाटला.

या सर्व दमखमीत एक गोष्ट पुन्हा प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे सतत कोणी तरी आमचा पाठलाग करतय असा भास मला होत होता. एक दोन प्रसंगी तर मला शु....क्क, शु...क्क्क, असा ही आवाज आला. पण हा नक्की भास आहे की खरच कोणीतरी आपल्यावर पाळत ठेऊन आहे? या विचाराक्षनीच माझ्या अंगावर सर्रर्रकन काटा आला. पण दुसरयाच क्षणाला मी सावध झालो. काय साला आपण पण, आता जंगलातुन फिरतोय तर काड्याकुड्यांचा आवाज हा येणारच त्यात इतक घाबरण्यासारख काही नाही. बहुतेक ह्या दादोसा आणि भिवाच्या गोष्टी ऐकुन आपण जरा जास्तच सतर्क झालो आहोत.

अडीच तीन तासांच्या अथक परिश्रमांनंतर अखेरीस आम्ही गडावर येऊन पोहचलो. वर आल्या आल्या एक विचित्र गोष्ट आम्हाला जाणवली ती म्हणजे. सर्व रस्त्यात जाणवणारा आमचा उत्साहच एकदम गायब झाला होता. वारा पण एकदम पडल्यामुळे अंगभर घामाच्या धारा लागल्या होत्या. अचानक एकदम नकारात्मक विचार डोक्यात डोकाऊ लागले. पंडीत तर उगाचच इकडे आलो या विचारापर्यंत आला होता. अर्थात मलाही तसच वाटत होतं पण जर सेनापतीच खचला तर कस होणार? म्हणुन चेहरयावर खोट हसु आणुन मी वातावरण हलक करण्याचा प्रयत्न करत होतो. माझ्या हातातील कंपास प्रमाने आम्ही गडाच्या उत्तर दिशेला उभे होतो व आमच्या समोरच गडाचा भव्य प्रवेशद्वार आमचं स्वागत करत होतं. शिरस्त्याप्रमाणे इथेही पंडीत ने आपली फोटोग्राफिची हौस फिटवुन घेतली. व आम्ही आतमध्ये मार्गस्थ झालो.

दुपारच रखरखीत ऊन चोहो बाजुंनी किरणांचा मारा करत होत. तश्यातच मी माझ्या बॅगेतला गडाचा मॅप काढला. मॅप प्रमाने जिथे आम्ही उभे होतो. त्या दरवाजापासुनच काही अंतरावर पाण्याची दोन तळी समोरासमोर शांत पहुडली होती. आणि मधुनच एक वाट सरळ थोड्या चढनीने वरच्या दिशेन जात होती. त्या चढावरच एक भग्न कोठी अखेरचे दिवस मोजत उभी असलेली दिसली. तर ठिकठिकाणी ऊंचच ऊंच गवत माजलेले दिसत होते. गडाच्या चहु बाजुने तटबंदी असुन काही ठिकाणी ती शाबुत असुन काही ठिकाणी भरपुर पडझड झालेली होती.तटबंदीवर जाण्यासाठी ठिक ठिकाणी पायरयाची व्यवस्था होती. गडाचे बुरुजही अखेरच्या घटका मोजत असताना दिसले. मधल्या वाटेनेच त्या कोठी पासुन जरा पुढे गेल्यावर पुन्हा दोन पाण्याची छोटी टाकी लागली पैकी एकातील पाणी पिण्याइतपत स्वछ दिसत होतं आम्ही आमच्या वॉटर बॉटल भरुन घेतल्या जरा फ्रेश झालो आणि पुन्हा पुढे चालु लागलो. मॅप मध्ये काढल्याप्रमाणे आमच्या सर्व गोष्टी बघुन होत आल्या होत्या. आता फक्त तो वाडा त्यातला तो गुप्त दरवाजा आणि सभोवतालचा परीसर बघायचा राहीला होता. आम्ही वाढलेल्या गवतातुन मार्ग काढत असतानाच अचानक कसला तरी किंचाळण्याचा विचित्र आवाज आला. आम्ही मागे वळुन बघे पर्यंत भिवा विजेच्या चपळाईने दोन तीन उड्यातच आमच्यासमोरुन नाहीसा झाला. भिवा तिथुन जाताक्षणीच एक गुढ शांतता तिथे पसरली. आता फक्त हलणारया गवताची सळसळ आणि आमचे फुललेले श्वासच आम्हाला ऐकु येत होते.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उत्कंठावर्धक...
आतापर्यंतचं आवडलं.
हा भाग टाकायला खुपच वेळ लावलात.
पुढचा भाग जरा लवकर टाकायचा प्रयत्न करा..

भारी. आता पुढचा भाग टाकायला येळ लावू नका. उत्सुकता ताणली गेलीये . लिहिण्याची हातोटी चांगली हाय .

मामी, साती, वीप, मोहिनी, प्रीती, शिरिन व अतुलनीय तुमच्या अमुल्य प्रतिसादांबद्दल धन्यवाद. Happy

मस्त. तुम्ही पुढील भाग लिहिताय म्हणजे सर्व काही ऑलबेल (ठिकठाक) आहे हे मात्र नक्की Happy
पुढचा भागाच्या प्रतिक्षेत...