अपवादात्मक अपवाद

Submitted by चेतन सुभाष गुगळे on 12 September, 2014 - 02:22

भारतीय समाजाने येथील मानवांची अलिखित आणि अनौपचारिक वर्गवारी केलेली आहे. या वर्गवारीनुसार पुरुषांनी कसं वागावं, महिलांनी कसं वागावं, याचे काही एक नियम ठरून गेले आहेत. महिला आणि पुरुषांमध्ये असणाऱ्या शारीरिक भेदांशिवाय त्यांच्या बौद्धिक आणि मानसिक क्षमतेतील फरकदेखील समाजाने ठरवून टाकला आहे. या आखणीनुसार महिला व पुरुषांची कार्यक्षेत्रेही ठरली आहेत. त्यानुसार ढोबळ मानाने घराच्या आतले कार्यक्षेत्र हे महिलांचे आणि घराबाहेरचे कार्यक्षेत्र ही विभागणी तर फारच जुनी आहे. परंतु या नियमांना अपवाद म्हणून काही महिला या घराबाहेर देखील कार्यरत राहतील हे समाजाने मान्य केले आहे. या अपवादांची देखील समाजाने पुन्हा वर्गवारी केली आहे. त्यानुसार आर्थिकदृष्ट्या निम्नवर्गीय महिला या घरकाम अथवा लघु उद्योगातील कामगार म्हणून कार्यरत राहतील असे ठरले आहे. प्लंबर, सुतार, लोहार (वेल्डर / फॅब्रिकेटर), रेल्वे स्थानकावरील हमाल, वाहन / मोबाईल / इलेक्ट्रॉनिक वस्तू दुरुस्ती कारागीर या खास पुरुष राखीव जागांवर चुकूनही महिला दिसणार नाहीत. मुद्रण उद्योगात (छापखान्यात) महिला आहेत पण त्या कुठे? तर यंत्रावर पुरुषांनी मुद्रणाचे मुख्य काम केल्यावर मुद्रित कागदाच्या घड्या घालणे, पुस्तके चिटकविणे अशा कमी जोखमीच्या आणि अर्थातच कमी मोबदल्याच्या कामावर. वर्तमानपत्र विक्रीतही घरोघरी दुचाकीवरून वर्तमानपत्रे पोचविण्याचे काम पुरुषांचे तर महिलांचे काम दुकानात एका जागी बसून विक्री करण्यापुरतेच मर्यादित. रिक्षा, टेम्पो, ट्रक अशा व्यावसायिक वाहनांचे चालक देखील पुरुषच. टॅक्सीचालक म्हणून आता काही प्रमाणात महिला पुढे येताहेत पण त्या देखील प्रियदर्शिनी सारख्या संस्थेच्या माध्यमातून, स्वतंत्र पणे नव्हे. शिवाय त्यांचे प्रमाण देखील अत्यल्पच आहे. खासगी वाहनांचे चालक या पदावरही अजूनही पुरुषांचेच साम्राज्य आहे.

आर्थिकदृष्ट्या मध्यमवर्गीय महिलांचे प्राधान्य अध्यापन, कला, सेवा क्षेत्रात राहील हे गृहीत धरले जाते. उद्योग, अभियांत्रिकी, वैद्यकीय अर्थ, गुंतवणूक या क्षेत्रात जर महिला असल्याच तर त्यांच्यावर प्रामुख्याने कमी जबाबदारीचे अथवा दुय्यम श्रेणीचे काम राहील हे पाहिले गेले आहे. उदाहरणच घ्यायचे तर कार्यालयात पुरुष व्यवस्थापक तर महिला स्वागतिका, विमान सेवेत पुरुष वैमानिक तर महिला हवाई स्वागतिका, इस्पितळात पुरुष शल्य विशारद तर महिला परिचारिका अशा प्रकारे भूमिकांचे वाटप झाले आहे.

उच्च आर्थिक गटातील महिलांची परिस्थिती काय आहे? विविध उद्योगसंस्थांच्या मालक, संचालक या पदांवर महिला दिसतील. राजकारणातही काही मोजक्या उच्च पदांवर महिला आहेत. पण त्या तिथे का आहेत? तर त्या एखाद्या घराण्याशी संबंधित आहेत म्हणून. जसे की, कायनेटिक उद्योगसमूहाचे मालक श्री. अरुण फिरोदिया यांच्या कन्या सुलज्जा फिरोदिया-मोटवाणी. पंडित नेहरूंच्या कन्या इंदिरा गांधी इत्यादी. जर सुलज्जा व इंदिरा यांना सख्खे बंधू असते तर त्या आपल्या पित्याच्या वारसदार ठरल्या असत्या काय? २०१४ लोकसभा निवडणूकीत मुंबईमध्ये एक अपवादात्मक चित्र दिसले. सुनील दत्त व प्रमोद महाजन या दिवंगत राजकारण्यांच्या कन्या प्रिया व पूनम एकमेकींच्या विरोधात खासदारकीची निवडणूक लढवीत होत्या. या घटनेत या दोघींनाही सख्खे भाऊ असतानादेखील आपापल्या पित्याचा वारसा या दोन्ही कन्यांकडे आला. अर्थात या दोघींचे बंधू संजय दत्त व राहुल महाजन वैयक्तिक कारणांमुळे ही निवडणूक लढविण्यास असमर्थ असल्यानेच या दोघींना ही संधी मिळाली.

अर्थात या सर्व व्यवस्थेला आव्हान देत अनेक मध्यम व उच्च मध्यम आर्थिक गटातील महिलांनी अभियांत्रिकी व वैद्यकीय क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने मोठमोठी पदे मिळविली आहेत. तसेच उच्च आर्थिक गटात (कॉर्पोरेट विश्व) इंद्रा नूयी, चंदा कोचर अशा महिलांनी आपले स्थान पुरुषांच्या बरोबरीच्या पातळीवर आणले आहे. इतके असले तरीही अजून लिमिटेड कंपन्यांपैकी ५५ टक्के कंपन्यांमध्ये (किमान एकतरी महिला संचालक नेमणे कायद्याने बंधनकारक असूनही) एकही महिला संचालक नाही ही बाब दुर्लक्षित करून चालणार नाही. शिवाय मोठ्या पदांवर असणाऱ्या व संख्येने अत्यल्प अशा महिला या त्या ठिकाणी अपवादानेच आहेत हे देखील विविध नियतकालिकांतून लेखांद्वारे सातत्याने लोकांसमोर मांडण्यात येते जेणेकरून महिलांचे अशा स्थानी असणे सहजसाध्य नाही तर अतिशय जिकिरीचे आहे हे इतर महिलामनांवर बिंबविले जावे.

कला विश्वातले महिलांचे स्थान काय आहे? चित्रपट, नाट्य ही क्षेत्रे समाजाचा आरसा आहेत. त्यामुळे अर्थातच त्यांच्या कथांमध्ये महिला व पुरुष पात्रांचे प्रमाण सारखेच असणार. त्यामुळे अभिनय व गायन क्षेत्रात महिला व पुरुष यांचे प्रमाण सारखेच असणे नैसर्गिक आहे. (अर्थात पूर्वीच्या काळी महिलांच्या भूमिका देखील पुरुषच करीत, त्यामुळे तिथेही महिलांचे प्रमाण कमीच होते पण आता ती परिस्थिती राहिली नाही. ) गायक व गायिकांचे आणि अभिनेते व अभिनेत्रींचे संख्यात्मक प्रमाण सारखे असले तरीही त्यांच्या दर्जात्मक प्रमाणातला फरक लक्षणीय आहे. अभिनेत्यांची कारकीर्द तुलनेने प्रदीर्घ व आव्हानात्मक आहे तर अभिनेत्रींची कारकीर्द अल्प स्वल्प तसेच अभिनयाला फारसा वाव नसणारी आहे. त्यांच्या मानधनातला फरकही लक्षणीय आहे. गायक व गायिकांमध्ये असा फरक दिसून येत नाही. किंबहुना तिथे प्रकार उलटाच आहे. १९८० साली वयाच्या अवघ्या पंचावन्नाव्या वर्षी मोहम्मद रफी आणि १९८७ साली वयाच्या अवघ्या अठ्ठावन्नाव्या वर्षी किशोर कुमारांचा मृत्यू झाला ही बाब लक्षात घेता आणि आघाडीच्या गायिका लता व आशा या तुलनेने दीर्घायुषी ठरल्या आहेत हे पाहता गायक व गायिकांची कारकीर्दीची तुलना करणे थोडे किचकट असले तरीही हे लक्षात घ्यावे लागेलच की आशा व लता या दोघींनी कुठल्याही पुरुष गायकापेक्षा अफाट संख्येने गाणी गायली आहेत. या दोघींच्या जास्त गाण्यांमुळेही पुन्हा महिला पुरुष असमानताच सिद्ध होते आणि तीदेखील गायनक्षेत्रातली नव्हे तर अभिनय क्षेत्रातली. लता व आशा यांना पुरुष गायकांपेक्षा जास्त गाणी मिळण्याचे कारण -

  • चित्रपटात नायिकेलाच नाचगाण्याला जास्त वाव असतो. नायक तुलनेने महत्त्वाचे असे म्हणजे शौर्य, धाडस, पराक्रम, बौद्धिक कसोटी यात व्यग्र असतो.<
  • नायिका कुणीही असली तरीही तिला कुठलाही कॉमन आवाज चालतो. फार तर सोज्वळ गाण्यांकरिता लता आणि कॅब्रे, इत्यादी बोल्ड गाण्यांकरिता आशा अशी विभागणी पुरेशी आहे हा चित्रपटकर्त्यांचा दृष्टिकोन. याउलट नायक कोण आहे? त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा बाज काय आहे? हे नीट विचारात घेऊन त्यानुसार त्याकरिता गायकाचे नियोजन. जसे की देव आनंद व राजेश खन्ना करिता किशोर कुमार, दिलीपकुमार व शम्मी कपूर करिता मोहम्मद रफी, राज कपूर व मनोज कुमार करिता मुकेश ही विभागणी पुरुष गायकांना कमी काम मिळवून देणारी असली तरीही पुरुष अभिनेत्यांचे महत्त्व वाढविणारीच ठरते नाही काय?

याशिवाय कला प्रांतातील महिलांच्या बाबतीत असणारे विविध प्रवाद. त्या स्वतःच्या क्षमतेवर किती आणि पुरुषांचा शिडी सारखा वापर करून किती वरपर्यंत चढल्यात याबाबत चर्चिले जाणारे किस्से. या व्यवस्थेलाही तोंड देत एखादी महिला अगदी उघडपणे व निःसंशय स्वतःच्या मेहनतीच्याच जोरावर यशशिखरावर विराजमान झाली असेल आणि उणीव दाखवावी असे तिच्यात शोधूनही सापडण्यासारखे दूरान्वयानेही काही नसेल तर तिला लगेच वेगळ्याच कोंदणात बसविले जाते. मग ती सर्वांचीच ताई, माई, अक्का असल्याचा तिच्यावर शिक्का बसतो. ती कोणाची प्रेयसी, कोणाची मैत्रीण देखील होऊ शकत नाही. एका वेगळ्याच गंभीर नजरेने तिच्याकडे पाहिले जाते. याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे लता मंगेशकर. त्यांच्या पिढीतील, पुढच्या आणि त्याही पुढच्या पिढीतील सर्वच जण त्यांचा दीदी म्हणूनच उल्लेख करतात. त्यामुळेच जेव्हा त्यांच्या एका वाढदिवसाच्या जाहीर समारंभात सोनू निगमने "मी थोडा आधी जन्माला आलो असतो किंवा लताजी थोड्या उशीराने जन्माला आल्या असत्या तर मी त्यांना विवाहाकरिता मागणी घातली असती." असे विधान केले तेव्हा ते अनेकांना खटकले. सोनू निगमांवर टीकाही झाली. खरे पाहता सोनूने लताजींकडे पाहण्याच्या समाजाच्या चाकोरीबद्ध नजरेची कोंडी फोडली असेच म्हणावे लागेल. परंतु आपल्या समाजाने अपवादांचीही वर्गवारी केली असल्याने सोनूचे विधान समाजाच्या पचनी पडले नाहीच.

अपवादांची वर्गवारी करण्याची समाजाची सवय तशी फारच जुनी. महिला शक्यतो घरातच राहणार. घराबाहेर पडल्या तरीही त्यांच्यावर तसा प्रसंग आला तरच. म्हणजे झाशीची राणी ही शूर लढवय्यी असे आपण म्हणतो पण ती तशी का? तर तिचे पती गंगाधरपंत (जे तिच्याहून चाळीस एक वर्षांनी मोठे) यांच्या मृत्यूनंतर तिला अकाली वैधव्य आल्यावर राज्याचे रक्षण करण्याकरिता. कारण तिचा पुनर्विवाह होऊन तिच्या नव्या पतीला राज्याचा रक्षणकर्ता बनण्याची संधी देणंही परंपरेला मंजूर नाहीच. त्यापेक्षा अपवाद म्हणून तिलाच रणरागिणी बनविणं समाजाला जास्त सोयीस्कर आणि म्हणूनच राणीला श्रेयस्कर. पण या श्रेयाची धनीण होताना राणीला वयाच्या बाविशीतच मृत्यूला सामोरं जावं लागून फार मोठी किंमत चुकवावी लागली हे कोणी ध्यानात घेत नाही. [काव्यात्म न्याय / योगायोग म्हणजे उपग्रह वाहिनीवरील मालिकेत झाशीच्या राणीची भूमिका करून लोकप्रिय झालेल्या कृत्तिका सेनगर हिनेच पुढे पुनर्विवाह या मालिकेत महिलेच्या पुनर्विवाहाचा मुद्दाही ऐरणीवर आणण्यात मुख्य भूमिका निभावली.] असो. तर झाशीच्या राणीचे शौर्य हे अपवादच होते असे समजणाऱ्या समाजाच्या मानसिकतेचे पुरावे म्हणजे झाशीच्या राणीच्या इतिहासोत्तर काळात जन्माला आलेल्या मुलींनाही घोडसवारीचे प्रशिक्षण दिले जात नसे. अगदी त्यापुढील काळातही किती जणी सायकली अथवा स्वयंचलित दुचाकी चालवीत असत? सुनीताबाई देशपांडे चारचाकी मोटार चालवीत आणि भाई चालकाच्या बाजूला बसत. एकदा सुनीताबाई रस्त्याने अशाच गाडी चालवीत असताना दोन मुले रस्त्यात दिसली. त्यातल्या एकाने दुसऱ्याला सांगितले - अरे बाई गाडी चालवतीये, बाजूला हो नाहीतर अपघातात सापडशील. त्यावर दुसरा पहिल्याला म्हणाला - काळजी करू नकोस शेजारी बाप्या बसलाय ना. तोच काळजी घेईल अपघात होणार नाही याची. आयुष्यात कधीही वाहनाचे सुकाणूचक्र न धरलेल्या भाईच्या केवळ शेजारी असल्यामुळे रस्त्यावरील मुलांना हायसे वाटावे आणि त्यापुढे सुनीताबाईंच्या वाहन चालविण्याच्या अफाट कौशल्याचा काडीचाही प्रभाव पडू नये याचे सुनीताबाईंना मोठे वैषम्य वाटले. पण सामाजिक वर्गवारीने पुरुष व महिलांची कार्यक्षेत्रे ठरविली त्याला सुनीताबाई किंवा रस्त्यावरची ती मुले तरी काय करणार?

पुढे महिला दुचाकी वाहने चालवू लागल्या तरी कोणती? तर स्कूटर किंवा मोपेड यांसारखी. एखादी महिला मोटरबाईकसारखे वाहन चालविते असे सत्तर ऐंशीच्या दशकांतील चित्रपटांतून दाखवायला सुरुवात झाली. अशी वाहने चालविणारी महिला पुरुषांसारखे पँट शर्ट असा पोशाख, पुरुषांप्रमाणेच अगदी लहान कापलेले केस अशी टॉमबॉय स्वरूपात दाखविली जाऊ लागली. म्हणजे तिला काही वेगळे करायचे तर तिला महिलांच्या नेहमीच्या गटातून बाहेर काढून तिचे छंद हे अपवादात्मक आहेत असे दाखवूनच. ही झाली समाजाच्या अपवादांचीही वर्गवारी करावयाच्या मानसिकतेची पद्धत. म्हणजे महिला अमुक एक वाहन प्रकार चालविणार नाहीत आणि समजा एखादीने चालविलेच तर ती लगेच टॉमबॉय कॅटेगरीतली.

पुरुषांप्रमाणे वाहन प्रमाणे वाहन चालविले, किंवा तसे कपडे घातले, किंवा तसे केस ठेवले तर ती महिला पुरुषी वृत्तीची ठरते काय? तिच्यातील स्त्री-सुलभ भावना लोप पावतात काय? अजिबात नाही. आणि हे समाजाला दाखवून दिले पुरुषांसारखे कपडे घालणाऱ्या, बारीक केस ठेवणाऱ्या आणि बरीचशी त्यागराज खाडिलकरांसारखी चेहरेपट्टी असणाऱ्या गायिका फाल्गुनी पाठकने. तिची सर्व गाणी पाहा आणि ऐका. प्रत्येक गाण्याचे बोल आणि सादरीकरण स्त्री-सुलभ भावनांचे यथार्थ प्रदर्शन मांडणारे आहे हे लगेच जाणवेल. आता तर अनेक महिला टिपीकल महिला वेषात आणि केशभूषेत राहून देखील खास पुरुषांची समजली जाणारी बुलेट सारखी वाहने देखील चालवीत आहेत. महिलांकडून आता अपवादांच्या वर्गवारीलाही आव्हान दिले जाण्यास सुरुवात झाली आहे.

मनोरंजन क्षेत्रात गायन, अभिनय अशा विभागांमध्ये महिलांची आवश्यकता असल्याने महिलांना स्थान आहे पण लेखन / दिग्दर्शन /संगीत दिग्दर्शन या विभागांत महिलांचा सहभाग अत्यल्प आहे. अपवाद म्हणून काही महिला या क्षेत्रात आहेत. त्यातही दिग्दर्शन हा प्रांत अतिशय विद्वत्तेचा समजला जातो त्यामुळे या प्रांतातील महिला अपवादाच्या वर्गवारीप्रमाणे अतिशय अभ्यासू, विद्वान आणि महत्त्वाचे म्हणजे धीरगंभीर स्वभावाच्या हे ठरून गेल्यासारखे आहे. सई परांजपें ह्या अपवादाच्या परंपरेतला एक अपवादात्मक अपवाद. त्यांनी गंभीर चित्रपटांबरोबरच निखळ विनोदी चित्रपट देखील बनविले. परंतु मीरा नायर, कल्पना लाजमी, तनुजा चंद्रा या धीरगंभीर दिग्दर्शिकांनी पुन्हा अपवादाची वर्गवारीच सिद्ध केली.

अशा वेळी मनोरंजन विश्वाच्या क्षितिजावर उदय झाला फराह खानचा. ह्या दिग्दर्शिकेने पहिल्याच प्रयत्नात (मै हूं ना - २००४) प्रेक्षकांना अगदी खळखळून हसायला भाग पाडलं. विनोदासोबतच चित्रपटात देशभक्ती, प्रेम, शौर्य हे सर्व रस मिसळून एक चांगला मसालापट बनविला, त्याला उत्तम व्यावसायिक यश देखील मिळालं आणि समीक्षकांची प्रशंसाही. मुख्य म्हणजे शाहरुख सारख्या मनस्वी कलाकाराला लीलया हाताळलं. महिला अष्टपैलू नसतात किंवा अनेक आघाड्यांवर त्या एकाच वेळी कार्यरत राहू शकत नाहीत या पारंपरिक समजालाही तिने छेद दिला. मूळची ती तशी दिग्दर्शिका नव्हेच. पहिल्या दिग्दर्शकीय प्रयत्नापूर्वी तिने जलवा, सात साल बाद (१९८७), कुछ कुछ होता है (१९९८) आणि कल हो ना हो (२००३) या चित्रपटांमधून किरकोळ भूमिका केल्या होत्या. त्याशिवाय १९९२ च्या जो जीता वही सिकंदर पासून २००३ च्या चलते चलते पर्यंत तिने अनेक चित्रपटांत नृत्यदिग्दर्शिका म्हणूनही काम केले. २००४ साली दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केल्यावरही तिने आपले हे जुने काम सोडले नाहीच. अजूनही ती पाहुणी अभिनेत्री आणि नृत्यदिग्दर्शिका म्हणून काम करतेच. शिवाय पटकथा लेखन आणि निर्मिती ह्या जबाबदाऱ्याही तिने पार पाडल्या आहेत. इतकेच नव्हे तर शिरीन फरहाद की तो निकल पडी या चित्रपटाद्वारे तिने पूर्ण लांबीची नायिकेची भूमिकाही निभावली आहे. तेही वयाच्या सत्तेचाळिसाव्या वर्षी आणि पारंपरिक नायिकेला शोभेल अशी शरीरयष्टी नसतानाही.

त्याशिवाय आपल्या दिग्दर्शकीय आणि नृत्यदिग्दर्शकीय कौशल्यातून इतर कोणालाही न जमलेली गोष्ट सर्वात आधी साध्य करून दाखविली. कत्रिना कैफने पदार्पणातच (बूम - २००३) बिकिनी दृश्य दिले. इतर अनेक चित्रपटांतूनही तिने देहप्रदर्शनाचा अजिबात संकोच केला नाही. परंतु इतके करूनही ती कधी 'मादक' किंवा 'चालू' दिसू शकली नाही. याचे कारण तिच्या चेहऱ्यावर असलेले कायमचे निरागस भाव. अगदी अक्षय कुमार सोबतच्या नमस्ते लंडनमध्ये तिच्या संवादांमुळे ती भांडकुदळ किंवा उर्मट वाटली असली तरीही तिला 'चालू' दाखविणे कुठल्याच दिग्दर्शकाला जमले नव्हते. परंतु ही बाब जणू एक आव्हानच आहे असे समजून फराह खानने तिला तीस मार खान चित्रपटात शीला की जवानी या गाण्यातून 'मादक' किंवा 'चालू' रूपात प्रेक्षकांसमोर सादर केले. या गीतात कत्रिनाच्या चेहऱ्यावरचे नेहमीचे निरागस भाव पार पुसले गेलेले आढळतात. आता हे फराहने योग्य केले की अयोग्य हा वादाचा मुद्दा असला तरीही इतर कुणालाही साध्य न होऊ शकलेली गोष्ट तिने सहज करून दाखविली हे मान्य करावेच लागते.

इतक्या आघाड्या सांभाळणारी ही बुद्धिमान महिला अपवादात्मक असली तरी इतर अपवादात्मक महिलांप्रमाणे हिचे व्यक्तिमत्त्व विद्वत्तेच्या ओझ्याखाली धीरगंभीर बनले आहे असे मात्र अजिबात नाही. अतिशय हसतमुख व विनोदी व्यक्तिमत्त्वाची ही महिला डान्स इंडिया डान्स, जो जीता वही सुपरस्टार, एंटरटेन्मेंट के लिए कुछ भी करेगा या व अशा इतर कार्यक्रमांतून प्रेक्षकांसमोर येते, स्पर्धकांशी दिलखुलास संवाद (तेही अगदी थेट बंबईय्या हिंदीतून) साधते तेव्हा कुणी सेलिब्रेटी न वाटता आपल्यातीलच एक सामान्य व्यक्ती वाटते.

व्यक्तिगत आयुष्यात देखील या महिलेने अनेक परंपरांना छेद दिला आहे. सहसा महिला आपला वैवाहिक जोडीदार शोधताना वय व शारीरिक क्षमता यांत आपल्यापेक्षा वरचढ पुरुषास पसंती देतात. तसेच मुस्लिम महिला सहसा गैर मुस्लिम पुरुषांना पसंती देत नाहीत. परंतु इथेही सर्व परंपरांना छेद देत फराहने आपल्यापेक्षा तब्बल साडेआठ वर्षांनी लहान असलेल्या शिरीष कुंदेर सोबत विवाह केला. चाळिशीनंतर महिलांचा मातृत्व टाळण्याकडे महिलांचा कल असतो. इथेही पुन्हा अपवाद करीत फराहने वयाच्या त्रेचाळिसाव्या वर्षी ही संधी घेतली आणि निसर्गानेही तिला अपवादांची मालिका प्रवाहित ठेवण्यास साहाय्य करीत एक पुत्र (झार) व दोन कन्या (दिवा आणि अन्या) या तिळ्यांची आई बनविले.

फराहचे विशेष कौतुक करावेसे वाटते ते तिच्या द्रष्टेपणा बाबत. द्रष्टेपण म्हणजे भविष्याचा वेध घेण्याची कला. हे भल्याभल्यांना जमत नाही. पुरुषांत देखील हा गुण अपवादानेच आढळतो तिथे स्त्रियांची काय कथा? मनोरंजन क्षेत्रात पूर्वी एखाद्या बड्या असामीने एखादा चित्रपट बनविला आणि तो प्रेक्षकांनी स्वीकारला नाही की लगेच आम्ही काळाच्या पुढचा चित्रपट बनविला असे म्हटले जायचे. देव आनंद यांचा तर हा अतिशय प्रसिद्ध युक्तिवाद होता. अर्थात त्यांचे मै सोलह बरस की, सेन्सॉर आणि मिस्टर प्राईम मिनिस्टर हे चित्रपट पाहताना हा युक्तिवाद माफक प्रमाणात पटतो देखील. परंतु यश चोप्रांनी जेव्हा त्यांचा लम्हे हा चित्रपट अपयशी ठरला आणि तो काळाच्या पुढचा असल्याचा दावा केला तेव्हा त्यात काही तथ्य नव्हते कारण याच कथेवर पूर्वी गुलजार यांनी मौसम हा एक यशस्वी चित्रपट बनवून दाखविला होता. असो. तर असे हे द्रष्टेपण समाजात अभावानेच आढळणारे. फराह खान मध्ये ही भविष्याचा वेध घेणारी कला दिसून आली ती २००९ मध्ये जेव्हा तिने तेरे मेरे बीच में नावाचा एक सेलिब्रिटी रिअलिटी शो स्टार प्लस या उपग्रह वाहिनीवर सादर केला. तेरा भागांच्या कार्यक्रमाला फारसा प्रतिसाद लाभला नाही कारण तेव्हा ही संकल्पना नवीन होती. आता मात्र अशी संकल्पना रुळली आहे. अनुपम खेर देखील असा एक कार्यक्रम आता सादर करतात आणि त्याला चांगला प्रतिसाद देखील मिळतोय. तर फराह च्या कार्यक्रमात तिने दुसऱ्याच भागात मुष्टीयोद्धा विजेंद्र सिंग आणि अभिनेत्री प्रियांका चोप्रा यांना निमंत्रित केले होते. त्यात तिने विजेंद्रला अभिनय करण्याविषयी सुचविले होते आणि त्याच्याकडून लहानसा प्रसंग सादरही करून घेतला होता. त्याचप्रमाणे प्रियांकालाही तिने लुटुपुटूचे बॉक्सिंग करायला लावले होते. गंमत म्हणजे विजेंद्र सिंग फग्ली या चित्रपटाद्वारे अभिनेता म्हणून प्रेक्षकांपुढे आलाय आणि प्रियंकानेही मेरी कोम वरील चित्रपटात प्रशंसनीय बॉक्सिंग केली आहे. ह्या भविष्याचा पाच वर्षांपूर्वीच वेध घेणाऱ्या ह्या महिलेला द्रष्टेपण नाही असे म्हणावे तरी कसे? विकिपीडियावरील माहितीनुसार फराह खानचा जन्म ९ जानेवारी १९६५ चा म्हणजे चित्रपटसृष्टीतील तीनही दिग्गज खानांपेक्षा ती वयाने जराशी मोठीच. तिच्यापेक्षा कमी वय असलेल्या पद्मिनी कोल्हापुरे आणि रेणुका शहाणे या आणि अशा इतर अनेकींची कारकीर्द आता जवळपास संपुष्टात आलेली असताना पन्नाशीच्या उंबरठ्यावर उभी असलेली ही महिला मनोरंजन क्षेत्रात अनेक आघाड्यांवर एकाच वेळी यशस्वीपणे कार्यरत राहू पाहत आहे. दिवाळीत तिचा अजून एक भव्य प्रकल्प हॅपी न्यू इयर प्रेक्षकांसमोर सादर होत आहे. या निमित्ताने तिच्या भावी वाटचालीकरिता शुभेच्छा देऊन ह्या लेखाची सांगता करतो.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेखाचा पुर्वार्ध वाचून पुरुष असल्याचा अभिमान वाटू लागलाय Wink

उत्तरार्धातील फराह खान म्हणजे साजिद खानची बहीण का?

लेखाचा उद्देश काय आहे ? पुरुष स्त्रियांच्या कामाची वाटणी हि मुख्यत; त्यांच्या मनोबला पेक्षा शारीरिक सामर्थ्यावर झाली आहे .

[[ शाहिर | 12 September, 2014 - 16:24

>>याचे कारण तिच्या चेहऱ्यावर असलेले कायमचे निरागस भाव

भलतेच विनोदी बॉ तुम्ही डोळा मारा ]]

होय काहींना ते भाव बावळट / गोंधळलेले / अज्ञानमूलक असेदेखील वाटतात. काहीजण ती सतत कोरा चेहरा ठेवूनच वावरते असेही म्हणतात. मी जरा त्यातल्या त्यात सौम्य शब्द वापरला आहे.

सातीजी,

धन्यवाद.

ऋन्मेऽऽष
फराह खान म्हणजे साजिद खानची बहीणच. अर्थात तिची अशी ओळख करून द्यावी इतका साजिद खान चा लौकिक नसावा. उलट साजिदची ओळखच फराहचा भाऊ अशी करू द्यायला हवी.

यूरो आणि मोहिनि३३३

निसर्गाने आधी मानवाची स्री पुरूष अशी शारिरीक भेदानुसार वर्गवारी केली. समाजाने त्यात पुन्हा स्त्रियांच्या भूमिका आणि पुरुषांच्या भूमिका कोणत्या अशी अजून वर्गवारी केली. या वर्गवारीला अपवाद ठरणारे जे कुणी असतील त्या अपवादांचीही काय वैशिष्ट्ये असावीत अशीही एक पुन्हा वर्गवारी केली गेली. म्हणजे दिग्दर्शनासारख्या एखाद्या क्षेत्रात महिलांचा सहभाग सहसा असणारच नाही हे स्वीकारले. त्यातूनही अपवादात्मकरीत्या कुणी महिला या प्रांतात दाखल झालीच तर विद्वतेच्या ओझ्याखाली दबलेली धीरगंभीर प्रवृत्तीची असणार हेही ठरल्यासारखेच झाले. पण या अपवादांच्या परंपरेलाही कुणीतरी अपवाद आहे हे दाखविणे हाच या लेखाचा उद्देश.

म्हणजे लेख फ़्रराह खान यांच्यावर वर आहे असे समजतो आणि वाचतो.

<<परंतु मीरा नायर, कल्पना लाजमी, तनुजा चंद्रा या धीरगंभीर दिग्दर्शिकांनी पुन्हा अपवादाची वर्गवारीच सिद्ध केली.>>

हे कसं ठरवल? की त्यांनि केलेल्या चित्रपटां वरुन असे ठरवले आहे?

अर्चना पुरणसिंग यांच्या विषयी आपल्याला काय वाटते?

<< हे कसं ठरवल? की त्यांनि केलेल्या चित्रपटां वरुन असे ठरवले आहे? >>

चित्रपटांवरून ही ठरवलं आणि औपचारिक / अनौपचारिक मुलाखतींच्या कार्यक्रमातला त्यांचा वावर पाहिला आहे त्यावरूनही.

<< अर्चना पुरणसिंग यांच्या विषयी आपल्याला काय वाटते? >>
हुषार स्त्रिया गंभीर असतात या संकल्पनेत अर्चना पुरणसिंग कुठे बसतात?

हुषार स्त्रिया गंभीर असतात या संकल्पनेत अर्चना पुरणसिंग कुठे बसतात?

विनोद समजायला उच्च बुद्धीमत्ता लागते असे म्हणतात असे मला वाटले म्हणुन मी विचारले.

तुमचे म्हणणे असे आहे का

अर्चना पुरणसिंग या बुद्धीमान नाहीत? किंवा त्या सुद्धा अपवादात्मक अपवाद आहेत?

विषय भरकटायला नको उत्तर नही दिलेत तरी चालेल.

<< विनोद समजायला उच्च बुद्धीमत्ता लागते असे म्हणतात असे मला वाटले म्हणुन मी विचारले. >> त्यांच्या त्या कार्यक्रमातील वावरावरून आणि ज्या विनोदाला त्या हसतात त्याचा दर्जा पाहून त्या विनोद समजला म्हणून हसतात की गडगडाटी हसण्याचं मानधन मिळतं म्हणून हसतात हा वादाचा मुद्दा आहे.

<< विनोद समजायला उच्च बुद्धीमत्ता लागते असे म्हणतात >>

त्या कार्यक्रमातील विनोद समजायला हा निकष निदान मी तरी मान्य करु शकत नाही.

<< अर्चना पुरणसिंग या बुद्धीमान नाहीत? >>

त्या कार्यक्रमावरून मूल्यमापन करायचं तर माझं मत नकारार्थीच आहे. अर्थात तीन दशकांपूर्वी त्या दूरदर्शन वर एका विनोदी (खर्‍या अर्थाने) मालिकेत काम करीत त्याबद्दलचं मत सकारात्मक आहे.

<< त्या सुद्धा अपवादात्मक अपवाद आहेत? >>

नाही.

एखाद्या बड्या असामीने एखादा चित्रपट बनविला आणि तो प्रेक्षकांनी स्वीकारला नाही की लगेच आम्ही काळाच्या पुढचा चित्रपट बनविला असे म्हटले जायचे. देव आनंद यांचा तर हा अतिशय प्रसिद्ध युक्तिवाद होता. अर्थात त्यांचे मै सोलह बरस की, सेन्सॉर आणि मिस्टर प्राईम मिनिस्टर हे चित्रपट पाहताना हा युक्तिवाद माफक प्रमाणात पटतो देखील >>>>>>>>>>

चेगु तुम्ही हे सिनेमे बघुन बोलताय की फक्त नाव वाचुन

टोचा,

हे चित्रपट मी पाहिले आहेत. हे चित्रपट थेट अंतःकरणाला भिडतात. यांची मांडणी थोडी बाळबोध आहे खरी, पण तरीही ते अतिशय प्रभावी आहेत.

मिरा नायर आणि फ़्रराह खान दोघीही दिग्दर्शिका आहेत हे एकच साम्य मला दिसले. सलाम बॉम्बे आणि मै हू ना हे सारख्या दर्जाचे आहेत की नाही या वर वाद असु शकतो. थोडक्यात काही गोष्टी फ़ार फ़ेच्ड वाटल्या, तरिही तुम्हाला तुमची मते असण्याचे स्वातंत्र्य आहेच.

<< सलाम बॉम्बे आणि मै हू ना हे सारख्या दर्जाचे आहेत की नाही या वर वाद असु शकतो. >>

नक्कीच. पण मै हू ना च्या तूलनेकरिता सलाम बॉम्बेच का हवा? मॉन्सून वेडिंग घ्या, मिसिसिपि मसाला घ्या. इतरही बरेच आहेत.

<< तरिही तुम्हाला तुमची मते असण्याचे स्वातंत्र्य आहेच. >>

धन्यवाद.

फराह खान म्हणजे साजिद खानची बहीणच. अर्थात तिची अशी ओळख करून द्यावी इतका साजिद खान चा लौकिक नसावा. उलट साजिदची ओळखच फराहचा भाऊ अशी करू द्यायला हवी.
>>>>

फराह खान हे नावही अस्तित्वात नव्हते तेव्हा नव्यानेच सुरू झालेल्या झी टीव्ही वर साजिदखानचा एक कार्यक्रम लागायचा ज्यात तो मस्त स्टॅण्डअप कॉमेडी करत चित्रपटांची वगैरे खेचायचा.
तेव्हापासूनची आमची ओळख आहे. (एक कलाकार आणि रसिक प्रेक्षक म्हणून)
त्याच्या त्या टॅलेंटसाठी त्याला कोण्या गॉडफादरची गरजही भासली नव्हती.

फराह खानचे म्हणाल तर शाहरुखखान नसता तर मी तिला साजिद खानची बहिण म्हणूनही ओळखत नसतो. Happy

<< फराह खान हे नावही अस्तित्वात नव्हते तेव्हा नव्यानेच सुरू झालेल्या झी टीव्ही वर साजिदखानचा >>

फराह खान हे नाव साजिद खानच्या सहा वर्षे आधीपासूनच अस्तित्त्वात होते. ती त्याच्यापेक्षा सहा वर्षे मोठी आहे. शिवाय दिग्दर्शिका म्हणून जरी ती उशिरा समोर आली असली तरी फार आधीपासून नृत्यदिग्दर्शिका देखील आहेच.

तुम्ही म्हणताय तो साजिद खानचा कॉमेडी शो आणि झूठ बोले कौआ काटे या चित्रपटातील त्याची अनिल कपूर सोबत सहनायकाची भूमिका हा त्याचा इतिहास झाला आणि तोही अभिनेता म्हणून.

हे बेबी आणि हमशकल्स सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन करून त्याने आपला पूर्वलौकिक धूळीस मिळविला आहे. कहर म्हणजे त्याने हिंमतवाला चा रिमेक केलाय...

फराह खान हे नाव साजिद खानच्या सहा वर्षे आधीपासूनच अस्तित्त्वात होते. ती त्याच्यापेक्षा सहा वर्षे मोठी आहे.
>>>>>>>
मग तर यात साजिद खानच सरस आहे, त्याने तिच्यापेक्षा लहान वयात नाव कमावले Happy

तुम्ही म्हणताय तो साजिद खानचा कॉमेडी शो आणि झूठ बोले कौआ काटे या चित्रपटातील त्याची अनिल कपूर सोबत सहनायकाची भूमिका हा त्याचा इतिहास झाला आणि तोही अभिनेता म्हणून.
>>>>>>>>
झूठ बोले कौवा काटेच्याही बरेच आधी त्याने स्टँडअप कॉमेडीयन म्हणून नाव कमावलेले.
बाकी तो त्याचा अभिनेता म्हणून इतिहास का झाला असेना, आताही तो दिग्दर्शक आहेच की, हे बेबी आणि हाऊसफुल्ल भाग १ आणि २ सारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेतच की...

फराह खानने काय केले? शाहरुख खान नसता तर मै हू ना आणि त्यापेक्षा तो बंडल ओम शांती ओम केराच्या टोपलीत गेले असते. जसे की तो नाही का अक्षयकुमारबरोबरचा तीसमारखान..

<< फराह खानने काय केले? शाहरुख खान नसता तर मै हू ना आणि त्यापेक्षा तो बंडल ओम शांती ओम केराच्या टोपलीत गेले असते. जसे की तो नाही का अक्षयकुमारबरोबरचा तीसमारखान..>>

तिचे जास्तीत जास्त काम नृत्यदिग्दर्शिका (फार मोठी यादी आहे, जालावर पाहू शकता) म्हणूनच आहे. दिग्दर्शिका म्हणून तिने ओम शांती ओम आणि तीसमारखान हे वाईट चित्रपट केले आहेत हे मान्यच आहे, पण मै हू ना चांगलाच होता.

साजिदचे तर दिग्दर्शक म्हणूनही सर्वच चित्रपट वाईट होते / आहेत. (अर्थात हे माझे मत झाले)

बॉक्स ऑफिसचा निकष लावायचा तर मग साजिदने हिंमतवाला हा एक फ्लॉप दिला आणि फराहने तीस मार खान. तेव्हा त्या निकषावर दोघेही सारखेच ठरतात.

फराह खान कडे निदान या व्यतिरिक्त नृत्यदिग्दर्शिका म्हणून केलेल्या कामाची मोठी यादी ही जमेची बाजू ठरते.

आता कोण किती प्रसिद्ध आहे हे कसे ठरविणार? फराह च्या नावाचा गुगल शोध 5,63,000 परिणाम दाखवितो तर साजिदच्या नावाचा गुगल शोध 2,68,000 परिणाम दाखवितो (त्यातही पुन्हा सन ऑफ इंडिया या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केलेल्या मेहबूब खानच्या पुत्राचेही काही परिणाम आहेत.) हा फरक बराच मोठा आणि लक्षणीय आहे.

याशिवाय फराह खान च्या विकीपीडिया पानावर साजिद खानच्या विकीपीडिया पानापेक्षा बरीच जास्त माहिती आहे.

अर्थात साजिद आणि फराह ची बुद्धिमत्ता स्वतंत्र रीत्या (बुद्ध्यांक चाचणी इत्यादी द्वारे) मोजता येणे निदान मला तरी शक्य नाही. परंतु दोघांच्याही विविध कलाकृती पाहून शिवाय ते दोघेही विविध कार्यक्रमात जे बोलतात त्याचे निरीक्षण करता फराह साजिदपेक्षा सरस वाटते.

आता कोण किती प्रसिद्ध आहे हे कसे ठरविणार? फराह च्या नावाचा गुगल शोध 5,63,000 परिणाम दाखवितो तर साजिदच्या नावाचा गुगल शोध 2,68,000 परिणाम दाखवितो
>>>>>>>>

मला मिळालेले रिजल्ट बघा -

फराह खान - ५,६७,००० / पाच लाख सदुसष्ट हजार
साजिद खान - २,७८,००० / दोन लाख अठ्ठ्याहत्तर हजार

सनी लिओन - ९०,६०,००० / नव्वद लाख साठ हजार .

आता यावरून काय निष्कर्श काढायचा हे आपल्यावर सोडतो, मग त्यावर भाष्य करतो Happy

<फराह खान हे नावही अस्तित्वात नव्हते तेव्हा नव्यानेच सुरू झालेल्या झी टीव्ही वर साजिदखानचा एक कार्यक्रम लागायचा ज्यात तो मस्त स्टॅण्डअप कॉमेडी करत चित्रपटांची वगैरे खेचायचा.
तेव्हापासूनची आमची ओळख आहे. (एक कलाकार आणि रसिक प्रेक्षक म्हणून)>

ऋन्मेष, पडद्यामागच्या कलाकारापेक्षा पडद्यावरच्या कलाकाराची ओळख आधी होणं, जास्त असणं यात काही नवल नाही. पण याचा अर्थ पडद्यामागचा कलाकार अस्तित्वात नसतो असा घ्यायचा असेल तर बरीच नावं पुसावी लागतील. फराह खानने १९९२ - जो जीता वही सिकंदर - कोरिओग्राफीला सुरुवात केली होती,
पहिल्याच चित्रपटात तिच्या प्रयोगशीलतेने जाणकारांचे लक्ष वेधून घेतले होते. पहला नशा हे हिंदी चित्रपटात स्लो मोशनमध्ये चित्रांकित झालेले पहिलेच गाणे. कोरिओग्राफर म्हणून अनेक गाजलेली गाणी व चित्रपट तिच्या नावावर आहेत. : १९४२ अ लव्ह स्टोरी, दिल से ही मोजकीच नावं पुरेशी व्हावीत. त्याचे श्रेय शाहरुखला देता येणार नाही.

चित्रपट दिग्दर्शक म्हणून कोणाची कामगिरी कशी वाटली हा ज्याच्या त्याच्या अभिरुचीचा प्रश्न आहे.

फराह आणि साजिद यांच्या रक्तातूनच हिंदी फिल्म इंडस्ट्री वाहत असते, हे साजिदच्या टॉक शो आणि फराहच्या ओम शांति ओम मधून दिसते. साजिदने आपल्या टॉक शो मधून चित्रपटांवर लोकांना आवडेल अशा शैलीत टीका केली होती. पण समीक्षकाचा चित्रपटदिग्दर्शक झाल्यावर काय झालं? टॉक शो होस्ट म्हणून तो चिमटे काढायचा तर दिग्दर्शक म्हणून विनोद प्रेक्षकांच्या डोक्यात हॅमर करायला लागला. ती त्या भूमिकेतली त्याची निवड होती.

बाकी कोणाची ओळख आपल्यापर्यंत कोण म्हणून पोचली याने तो लहानमोठा ठरवायचे झाले तर एस डी बर्मन यांची ओळख अचानक आर डी चे वडील अशी होऊ लागली.. म्हणजे ते स्वतः कोणीच नव्हते का? की तोवर एस डीचा मुलगा म्हणून ओळखला जाणारा आर डी कोणीच नव्हता?

फराह खानचा सुरूवातीचा पीरीयड अत्यंत स्ट्रगलिंगचा गेलेला आहे. तिचे वडील कामरान हे स्वतः चित्रपटांशी संबंधित होते. ५०च्या दशकांमध्ये त्यांनी वेस्टर्न स्टाईलचय अनेक चित्रपटाच्ची निर्मीती आणि अभिनय केला. दुर्दैवानं त्यामधेय त्यांना फार वाईट आर्थिक धक्के बसले. आईवडलांच्या घटस्फोटानंतर दोघांची आर्थिक परिस्थिती अगदी वाईट होती. फराह आणि साजिद दोघांनीही शाळकरी वयापासूनच कामांना सुरूवात केली. "जो जीता" साठी ती असि. डिरेक्टर म्हणून काम करत होती तेव्हा सरोज खाननं ती फिल्म अर्ध्यावर सोडली आणि ते गाणं "कोरीओग्राफ" करायचं काम फराहने स्वतःहून स्विकारलं. तेव्हाचा ९०मधला टीपिकल लटकेझटकेपणा सोडून तिनं त्या गाण्याला पूर्णपणे स्लो मोशनमध्ये चित्रित केलं (त्यातही गंमत अशी की ओठांच्या हालचालीदेखील सोमोशनमध्ये आहेत. नीट पाहिलंत तर लक्षात येईल, अशा पद्धतीनं चित्रीत झालेलं हे पहिलंच गाणं)

ज्यावेळी स्वित्झर्लंडमध्ये जाऊन तिथल्या हिरवळीवर आणि बर्फावर गाणी शूट करायची पद्धत होती, त्यावेली तिनं संधी मिळले अशा ठिकाणी गाण्यांसाठी सेट उभारून चित्रीकरण करणे चालू केलं. "फिर भी दिल है हिंदुस्तानी" मधलं "और क्या" हे गाणं आऊटडोअरवर शूट करायच ठरलं होतं, ते बदलून तिनं सेटवर करवून घेतलं. तेव्हापासूनच तिच्यामधला "दिग्दर्शकीय" स्पार्क बर्‍यापैकी दिसला होता.

फराह ही अभिनेत्री डेझी इराणी आणि पटकथाकार हनी इराणीची भाची. फरहान आणि झोया अख्तरची सख्खी मावसबहिण. फराहनं केलेला ओम शांती ओम आणि झोयाचा लक बय चान्स दोन्ही फिल्म इंडस्ट्रीवर आधारित सिनेमा. इंटरेस्टिंगली दोन्ही सिनेमांची तुलना केल्यास या दोघींचा इंडस्त्रीमधल्या जडणघडणीवरचा प्रभाव स्पष्ट पणे दिसून येऊ शकतो.

साजिदच्या तुलनेमध्ये ती अतिशय हुशार आणि व्यवसायाची गणितं ओळखून असणारी आहे. साजिद स्वतःच्याच "कहने मे क्या हर्ज है" इमेजमधून बाहेर पडला तर बरंच काम करू शकेल. दुर्दैवानं त्याच्या वडलांनी केलेल्या चुकीच्यच दिशेने त्याची वाटचाल चालू झालेली आहे.
मला फराहचं कौतुक यासाठी वाटतं की तिनं दिग्दर्शिका असूनदेखील तथाकथित पुरूषी दिग्दर्शकांसारखे मसालापट दिले आहेत. स्वतः स्त्री असल्याचं भांडवल कधीच केलं नाही. तिचे सिनेमा ६० ७० च्या दशकातील मसाला मूव्हीज असतात आणी ते खुल्लमपणानं ती कबूल करू शकते. (इथं तुलनेसाठी आठवणारं नाव तनुजा चंद्रा. अर्थात तो वेगळा विषय होइल).

ऋन्मेऽऽष
<< सनी लिओन - ९०,६०,००० / नव्वद लाख साठ हजार .>>
ती जास्त प्रसिद्ध आहेच, ही वस्तुस्थिती आहे. कुप्रसिद्धी / वादग्रस्त प्रसिद्धी हा देखील प्रसिद्धीचाच भाग असतो. फराह खान - साजिद खान तुलनेत हा मुद्दा येत नाहीये.

भरत मयेकर आणि नंदिनी - धन्यवाद.

<< साजिदच्या तुलनेमध्ये ती अतिशय हुशार आणि व्यवसायाची गणितं ओळखून असणारी आहे. >>

नक्कीच.

<< मला फराहचं कौतुक यासाठी वाटतं की तिनं दिग्दर्शिका असूनदेखील तथाकथित पुरूषी दिग्दर्शकांसारखे मसालापट दिले आहेत. स्वतः स्त्री असल्याचं भांडवल कधीच केलं नाही. तिचे सिनेमा ६० ७० च्या दशकातील मसाला मूव्हीज असतात आणी ते खुल्लमपणानं ती कबूल करू शकते. (इथं तुलनेसाठी आठवणारं नाव तनुजा चंद्रा. अर्थात तो वेगळा विषय होइल).>>

मला लेखात जे अपवादात्मक अपवाद म्हणून दाखवायचं होतं ते नेमकेपणानं दाखविल्याबद्दल आभार.

हा साजीद खान म्हणजे तोच ना 'हिम्मतवाला आणि हमशकल्स' सारख्या भिक्कार चित्रपटांचा दिग्दर्शक.

पण या साजिद खानच्या आत्मविश्वासाला मात्र दाद द्यावी लागेल. 'हमशकल्स' सारखा सिनेमा एवढा रद्दड आणि रटाळ असतानाही त्याला फक्त साजिद खानच सिनेमा म्हणू शकतो.

भरत मयेकर,
खरे तर पडद्यामागचे कलाकार वा कोण जास्त प्रसिद्ध हा मुद्दाच नव्हता. मी स्वता आधी साजिद खानला ओळखू लागलो आणि त्यानंतर फराह खान नामक कोरीओग्राफर साजिद खानची बहीण आहे म्हणून ओळखू लागलो. त्यावर चेसुगु यांनी साजिद खान आणि फराह खान यांच्यात फराह खान कशी वरचढ हे दाखवण्यात दोघांकडून त्या अनुषंगाने तश्या पोस्ट आल्या.

तिच्या कोरीओग्राफर असण्यात शाहरुखचा हात नाहीच आहे, ते मी तिने दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांबद्दल केलेले विधान होते. ती ज्या पठडीतले सिनेमे काढते ते जरी नंदिनी म्हणतात तसे ७०च्या दशकातले मसालापट असले तरी मग त्यात शाहरुखला घेणे हा नाईलाज होतोच. मग तो मै हू ना सारखा ठिकठाक सिनेमा असो वा ओमशांतीओम सारखा टुक्कार. मध्यंतरी तिच्या नवर्‍याचे आणि शाहरुखचे अगदी हातापाई पर्यंत बिनसले असूनही (वैयक्तिक होत असेल तर क्षमस्व फराह खान) आता पुन्हा हॅपी न्यू ईयरसाठी तिला शाहरूखच हवा. याला म्हणतात लिमिटेशन. फराह खान हि काही दिग्दर्शनाच्या बाबतीत करण जोहर नाही. (इथे करण जोहर परत शाहरुख या मुद्द्यावरून आठवला आहे, आता यात त्या दोघांची तुलना करतोय असा अर्थ काढू नका, तशीही ती एकतर्फीच होईल)

गाण्यांच्या कोरीओग्राफीबाबत ती कल्पक आहे यात मला शंका नाही. भले ती माझी आवड नसली तरी मी तिची अदाकारी नाकारणार नाही.

मध्यंतरी तिच्या नवर्‍याचे आणि शाहरुखचे अगदी हातापाई पर्यंत बिनसले असूनही (वैयक्तिक होत असेल तर क्षमस्व फराह खान) आता पुन्हा हॅपी न्यू ईयरसाठी तिला शाहरूखच हवा. याला म्हणतात लिमिटेशन. फराह खान हि काही दिग्दर्शनाच्या बाबतीत करण जोहर नाही.>>> दोघांचेही सिनेमा करण्याची पद्धतच भिन्न आहे. त्यामुळे तशी तुलना होऊ शकत नाही. करण जोहरचे सिनेमा कधीच हार्ड हिटींग नसतात त्या उलट फराहचे सिनेमा फार वेगळे असतात. फराहच्या मै हू ना मध्ये जितके अ‍ॅक्शन सीन्स होते तितके करन जोहरच्या एकाही सिनेमामध्ये नसतील. (दिग्दर्शित, निर्माता म्हणून त्यानं अग्नीपथसारखा मारधाडापट दिलाय). त्याखेरीज फराह वेगवेगळे विषय हाताळते. तीसमारखान असाच पूर्ण वेगळ्या विषयावरचा सिनेमा. (फ्लॉप झाला म्हणून त्याचं महत्त्व कमी होत नाही) केजो आणि तिला दोघांनाही त्यांच्या सिनेमामध्ये शाहरूखच हवा असतो. त्याचं कारण यांच्या दिग्दर्शकीय लिमिटेशन्स नसून बॉक्स ऑफिसवर शाहरूख दाखवू शकत असलेला करिष्मा आहे. एवढे सुपरहिट सिनेमा देणार्‍या रोहित शेट्टीलाही दोनशे करोड चेन्नई एक्स्प्रेस त्यानंच दाखवलेत.

ओम शांती ओम मला तिचा आवडलेला सिनेमा. त्यामधलं पुनर्जनम आणि इतर बाबी बाजूला काढल्या तरी तिनं उभारलेलं पहिल्या हाफमधलं स्ट्रगलर लोकांचं विश्व, त्यांचे आपापसांतले संबंध, दुसर्‍या हाफमध्ये सुपरस्टारच्या सुपरस्टार मुलाचं विश्व तिनं बर्‍याच ताकदीनं दाखवून दिलं होतं. ज्या वातावरणात ती लहानाची मोठी झाली त्याचा प्रभाव तिच्या सिनेमांवर दिसतो आणि तो ती ठळकपणे येऊ देते, काहीही प्रीटेण्ड करत नाही.

नंदिनी,
आपल्या पोस्टवरून आपण फराह खान आणि ती देते त्या त्या पठडीतल्या सिनेमांच्या फॅन असल्याचा प्रभाव जाणवतो.

मै हू ना मधील अ‍ॅकशन द्रुष्यांचे कौतुक करणे, तीसमारखानला वेगळा विषय म्हणने, ओम शांती ओम मध्ये तिने स्ट्रगलर/सुपर्रस्टारचा मुलगा भाव विश्व दाखवले आहे असा दावा करणे वगैरे...
काहीच नाही पटले,

.......... पण आपल्या वैयक्तिक मताचा आदर केलाच पाहिजे. Happy

आता माझे मत - शाहरुख हा बॉक्स ऑफिसवर करिष्मा दाखवू शकतो म्हणून त्याला घेणे आणि मग त्याला साजेसाच चित्रपट बनवणे हा मुद्दाच दिग्दर्शकाला दुय्यम करतो.
आधी तुमच्या डोक्यात चित्रपट तयार हवा आणि मग त्यात कोण सूट होईल त्यानुसार कास्टींग व्हायला हवी.
फराह खान सारख्या दिग्दर्शकांमुळेच चित्रपट जे खरे तर दिग्दर्शकाचे माध्यम हवे त्यावर अभिनेता आपला हक्क सांगतो, आणि म्हणूनच शाहरुख हा रोहित शेट्टीच्या चेन्नई एक्स्प्रेसमध्येही तेच करतो जे त्याने "कुछ कुछ होता है" पासून "मै हू ना / ओम शांती ओम" पर्यंत आजवर कित्येक सिनेमांत केले आहे.

मॉरल ऑफ द स्टोरी - इटस नॉट फराह खान फिल्म, इटस शाहरुख खान फिल्म. मग मी तिचे कौतुक का करू ?

शाहरुख हा बॉक्स ऑफिसवर करिष्मा दाखवू शकतो म्हणून त्याला घेणे आणि मग त्याला साजेसाच चित्रपट बनवणे हा मुद्दाच दिग्दर्शकाला दुय्यम करतो. <<
म्हणून तर बॉलिवूडमधले बहुतांश सगळे दिग्दर्शक दुय्यमच असतात. एडिटला एडिटर, दिग्दर्शक यांच्यापेक्षा निर्मात्याचे पारडे जड, रफकट त्या त्या सेलेबल स्टारकडून अप्रूव्ह करून घेणे वगैरे हे ही होते.
शाहरूखच नाही तर प्रत्येक सेलेबल स्टारचे हे असेच.

Pages