अशी मालिका हवी - "झिम्मा" च्या निमित्ताने

Submitted by दिनेश. on 3 July, 2013 - 09:08

विजया मेहता लिखित, "झिम्मा" या पुस्तकाबाबत इथे चर्चा झालीच आहे. गेल्या सहा महिन्यात किमान चार वेळा मी ते वाचले. शिवाय हाताशीच असल्याने कधीही कुठलेही पान वाचायला सुरवात करावी आणि त्यात रमून जावे असे अनेकदा झाले.

काल सहज मनात एक विचार आला.

बाईंनी सुरवातीलाच लिहिलेय कि लेखन हा त्यांचा प्रांत नाही. त्यांना बोलणे जमते. झिम्माच्या मुखपृष्ठावर त्यांचे जे फोटो आहेत ते अत्यंत बोलके आहेतच. मग या पुस्तकाच्या आधाराने एखादी भव्य दूरचित्रवाणी मालिका का बनू नये ? या पुस्तकाचा आवाका, माहितीपटाच्या कक्षेतला नाही.

बाईंचे पुस्तक म्हणजे मराठी नाट्यसृष्टीचा समग्र इतिहास नाही, पण बाईंची कारकिर्द नक्कीच महत्वाची आहे.
शिवाय त्यांनी जो कालखंड / स्थित्यंतरे पाहिली त्याचे दस्तावैजीकरण केवळ लिखित स्वरुपात असू नये.

सुदैवाने बाईंच्या कामापैकी अनेक कलाकृती, अगोदरच फिल्मवर उपलब्ध आहेत. त्यांचे संकलन या निमित्ताने होईल.
पण त्या व्यतीरिक्त ज्या कलाकृतींचा बाईंनी उल्लेख केलाय, त्यांचेही चित्रीकरण होणे गरजेचे आहे.
रवींद्र मंकणीचा हयवदन मधला प्रवेश, सुकन्या कुलकर्णीचा नागमंडल मधला प्रवेश यांचे जे वर्णन बाईंनी केलेय, ते वाचून ते प्रवेश बघण्याची जबरदस्त ईच्छा होते.

हयवदन, अजब न्याय वर्तुळाचा यांचे संगीत लाईव्ह असे. त्याचे रेकॉर्डींग झालेय का ते माहीत नाही. पण
त्याचाही अनुभव रसिकांना मिळायला हवा.

बाईंच्या आधी रुढ असलेली अभिनय पद्धत ( उदा. दुर्गाबाई खोटे ) मग बाईंनी सुरु केलेली उलट अभिनयाची पद्धत. मग त्यांनी नापसंत केलेली, भक्ती बर्वेची लाऊड पद्धत.. हे सगळे पडद्यावर आलेच पाहि़जे.

बाईंची लेक आणि मुलगा दोघेही याच क्षेत्रात आहेत. त्यांनी हे मनावर घेतले पाहीजे. आणि जर बाईंनी
स्वतः सहभाग घेतला तर त्यासारखे दुसरे काहीच नसणार.

बाईंच्या शिष्यांपैकी ( नीना कुलकर्णी, सुहास जोशी, विक्रम गोखले, नाना पाटेकर. ) अनेक जण या उपक्रमात
आनंदाने सहभागी होतील. स्मृतिचित्रे मधे जो प्रयोग झाला होता, तसा प्रयोग करत वेगवेगळ्या वयातील
बाईंच्या भुमिका वेगवेगळ्या कलाकार करु शकतील.

पुस्तकाच्या लेखनामागची भुमिका म्हणून बाईंनी इतर नाटकांबद्दल लिहिलेले नाही. पण तरी काही
नाट्यप्रयोगांशी बाईंचा आडवळणाने संबंध होता. त्याबद्दल बाईंनी भाष्य करणे गरजेचे आहे.
किमान त्यांनी या प्रयोगाबाबत काही वेगळा विचार केला असता का, ते कळायला हवे.
( पुरुषचे डॉ उत्कर्षा नाईक / हर्षदा खानविलकरने केलेले प्रयोग, डॉ. लागूंचे गिधाडे, चंद्रकांत कुलकर्णीची त्रिनाट्यधारा, लाईफलाईनचे पुढचे भाग, रंगायनच्या अपरोक्ष झालेले, शांतता चे प्रयोग... )

बाईंनी ज्या वास्तूंचे वर्णन केलेय ( भुलाभाई, एन.सी,पी.ए. , वैद्यांचा वाडा.. ) त्यांचे पण दर्शन या
निमित्ताने होईल.

बाईंनी अगदी चपखल वर्णन केले असले तरी, संवाद / अभिनय या गोष्टी पुस्तकातून नीटश्या उलगडत
नाहीत. त्यांच्या नाट्यशिक्षण शिबीराचेही चित्रीकरण करता येईल.

००

टीव्हीवरच्या मालिका बघणे तर मी कधीच सोडून दिलेय. आजकाल तर मालिकांची नावे पण त्यात कुठले
दळण दळले जाणार आहे, त्याचाच आरसा असतात. किंवा कुठलाही विषय घेतला तर तो त्याच मार्गावर
कसा जाईल हेच बघितले जाते.

त्याला पब्लिक डिमांड असे गोंडस नावही दिले जाते. आपणही त्यावर यथेच्छ तोंडसुख घेतच असतो. पण
या मालिका नकोत तर कशा हव्यात, हे पण आपणच सांगायला पाहिजे.
मालिका निर्मात्यांचेही मग लक्ष या चर्चेकडे वेधता येईल.

हा विषय तर कुणाही निर्माता / दिग्दर्शक यांना आव्हानात्मक वाटेल. तो काळ, माणसे आणि नाट्यानुभव
परत सादर करणे, अर्थातच सोपे नाही.

तुम्हालाही असे विषय सुचत असतीलच. लिहा नक्की.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

टीव्हीवरच्या मालिका बघणे तर मी कधीच सोडून दिलेय. >> हे विधान देखील वादग्रस्त होऊ शकतं Wink असो.
चांगला विषय, चांगला बाफ आहे.

मॅथेमॅजिक क्विझ सारखी एखादी मालिका असावी असं वाटतं. नॅशनल जिओग्राफिक, डिस्कव्हरी, टर्बो, हिस्टरी या वाहिन्यांवर अनेक दर्जेदार कार्यक्रम असतात.

बाईंबद्दल खुप वाचलय, झिम्मा अजुन नाही मिळालं... सालं यासाठी भारतात हवं... असो.

बरेचदा खंत वाटते आणि आश्चर्यही, की मराठीत कित्येक उत्कृष्ट लेखक आणि लिखाण आहे, पण बिनडोकांना कळत का नाही देव जाणे. देवच त्यांना सदबुद्धी देवो.

जयंत नारळीकरांच्या कथांवर आधारीत विज्ञान्-मालिका तसेच विज्ञान आणि गुन्हेगारी यांवर आधारित (बहुदा) बाळ फोंडके यांच्या कथा पडद्यावर बघायला आवडतील...

<<<<<सालं यासाठी भारतात हवं... असो.>>>>>>> एकदम पट्या च .... Sad

ई बूक पण नाहिये ....

विजय..खरच नारळीकरान्च्या अनुभवान्वर पण मस्त मालिका होउ शकतात .....अस काही तरी मुलभुत परीवर्तन घडायला हवे... को ब म क ...सारख्य मस्त मालिका पण आहेतच .....फक्त घरगुती , कुचाळक्या , नटुन थटुन सगळे जण काही तरी खलबते करणे , ई ई विशय लगेच बन्द केले पाहिजेत ....

दिनेशदा, अप्रतिम सूचना. चांगले जिवंत डॉक्युमेंटेशन होईल एका ऊर्जाभारित प्रतिभेचे.
विजय देशमुख यांच्याशीही सहमत.
>>टीव्हीवरच्या मालिका बघणे तर मी कधीच सोडून दिलेय. आजकाल तर मालिकांची नावे पण त्यात कुठले
दळण दळले जाणार आहे, त्याचाच आरसा असतात>>'' अगदी पटेश ! एकूण या देशातले अन निदान महाराष्ट्रातले महान साहित्य, माणसे, चळवळी चित्रबद्ध करणे असा अजेंडा असलेले निर्माते हवेत किंवा एरवी यशस्वी निर्मात्यांनी सामाजिक दायीत्व म्हणून असे एक-एक प्रकल्प घ्यावेत...'योजकस्तत्र दुर्लभः' !

अक्षरशः खरंय. ठराविक वाहिन्यांचा अपवाद वगळता चांगल्या कार्यक्रमांचा दुष्काळ असतो. निवांत वेळ, टीव्ही पहायचा मूड आणि त्यातून मराठी काहीतरी हवं असेल तर एक कार्यक्रम बघण्यासारखा असेल तर शप्पथ! हल्ली आम्ही हिस्टरी, डिस्कव्हरी अशा वाहिन्या चक्क मराठी डबिंग असलेल्या ऐकतो. अनेक फायदे होतात, कार्यक्रम चांगले असतातच, त्यात वापरलेलं मराठी बरंच सुसह्य असतं आणि माझा पाच वर्षाचा मुलगाही मराठीमुळे आणखी आनंदाने बघतो. इंग्रजीच्या तुलनेत त्याला ते जास्त समजतात, पडणार्‍या अनेक प्रश्नांची उत्तरे पण मिळतात.

असो. विषयांतर झालं. पण हा मलाही कित्येक वर्षे पडलेला प्रश्न आहे, आपल्याकडे मराठीच नाही, एकंदरच प्रादेशिक साहित्य इतकं मुबलक आणि वैविध्यपूर्ण आहे, मग हे असले भिक्कार विषय का निवडतात?
'तुंबाडचे खोत'वर काही वर्षांपूर्वी सुरू झालेली एक मालिका, पुढे बंद पडली, काय झालं कोण जाणे. जयवंत दळवींच्या एक-दोन कलाकृती येऊन गेल्या पण पुन्हा तसे प्रयत्न झाले नाहीत. त्यांच्या आणखी कितीतरी कादंबर्‍या आहेत. गोनिदा, श्री. ना., मधू मंगेश कर्णिक, मुन्शी प्रेमचंद, महाश्वेतादेवी, अन्नपूर्णादेवी, कर्नाटकात भैरप्पा आणि पूर्णचंद्र तेजस्वींच्या (कानडीतल्या फक्त या दोघांचेच लेखन मी वाचलंय म्हणून, आणखी खुप आहेत) आणि अशा कित्येकांच्या लिखाणामध्ये लोकांना जे हवे ते ओतप्रोत भरलेलं आहे. उत्कंठावर्धक कथानक, अगणित पात्रं, चकित करणारी भरपूर अनपेक्षित वळणे आणि धक्के, गुंतागुंतीचे नातेसंबंध, वेगवेगळ्या प्रदेशांमधे घडणार्‍या गोष्टींमुळे स्थळे आणि वेशभुषेची चंगळ, शिवाय अनेक पिढ्या असणारे मोठाले कालखंडही जेणे करून एपिसोड वाढवायला पाण्याची गरजच नाही! लोकांना मसालेदार मनोरंजन लागतं ना, वाट्टेल तितका मसाला आहे इथे तोही दर्जेदार. सगळे खजिने बाहेर काढायला हवेत. गौरी देशपांडे, सानिया, आशा बगे, मोनिका गजेंद्रगडकर, विजया राजाध्यक्षांमुळे तर किती किती छान गोष्टी पहायला मिळतील. तरूण पिढीही आवडीने बघेल. कथासंग्रह, आत्मचरित्रे, प्रवास वर्णने, ललित लेखन... काय नाही?

हे सगळं करण्यासाठी निर्मात्यांना काही तांत्रिक अडचणी असतात का ते माहिती नाही, पण लोकांना खिळवून ठेवण्याची पूर्ण क्षमता आपल्या साहित्यात आहे. तुम्ही म्हणताय तसं या आता ज्येष्ठ असलेल्या नामवंतांनी यासाठी पुढाकार घ्यायला हवा, नव्या लोकांनी कितपत हे सगळं वाचलं असण्याची शक्यता आहे (अपवाद असतीलच पण हल्ली बहुतेकजण इंग्रजीच वाचतात) आणि इच्छा असेल तरी त्यांना तितका वेळ असेलच असे नाही. जुन्या जाणकारांनी वाचन, अनुभव, ज्येष्ठत्व या जोरावर हे मनावर घेऊन आणि लावून धरून केलं तर नव्या लोकांना जॉब सॅटिस्फॅक्शन मिळेल, मोठ्या कलाकारांना समाधान, प्रेक्षकांना गुणवत्ता असलेलं मनोरंजन मिळेल, निर्मात्यांना पैसा. (वा! काय चित्र रंगवलंय मी :-))

दिनेश, माफ करा, पाल्हाळ लावलं. पण विषयच दिलाय तुम्ही तसा.

याबाबत माबो पुढाकार घेउ शकते का? मला फारशी कल्पना नाही पण प्रायोजक म्हणुन माबो चे नाव बघितले म्हणुन... आणि तसच असेल तर कलाकारही इथे असतीलच की Lol

तूम्ही खरेच आपल्या मागण्या इथे नोंदवायला हव्यात. ज्या कुणाला प्रेक्षकांच्या ( आपण स्वतःला सुशिक्षित गट म्हणवून घेऊ ) मनाचा कानोसा घ्यायचा आहे, त्यांना तरी हे समजेल.

मला स्वतःला भारतीय नद्यांवरची मालिका नक्की आवडेल. गंगेवरची बीबीसी ची अप्रतिम मालिका बघून, तर जास्तच प्रकर्षाने असे वाटायला लागलेय. दूरदर्शनच्या काळात पंजाबमधल्या बियास - व्यास नदीवर अशी चार भागांची मालिका बघितल्याचे आठवतेय. आपल्याकडच्या नद्या केवळ जमिनीवरच नाहीत तर लोकसाहित्यात / संगीतात / पुराणात एवढेच नव्हे तर राजकारणातदेखील अवतरतात. एकेका नदीवर चार चार भाग होतील.

यू ट्यूबवर झांबेझी / अमेझॉन / मेकाँग नद्यांवर अप्रतिम माहितीपट आहेत.

आपल्या कृष्णा / कावेरी / गोदावरी / नर्मदा / तापी अशा अनेक नद्यांची आपण केवळ नावे वाचलेली असतात.
ब्रम्हपुत्र या नदाशी संबंधित लोहित किनारे हि मालिका आली होती. पण त्यात कथा होत्या. ( अर्थात त्या नदाच्या प्रदेशातल्याच. )

विजय / सुहास्य.. मायबोली प्रशासनाला विनंती केल्यास हे पुस्तक मिळू शकेल. ( मी भारतात जातोय, मीदेखील पाठवू शकेन. अवश्य कळवा ) दोनेक महिन्यातच ३ आवृत्त्या निघाल्या होत्या.

झिम्मा खुप मस्त आहे पुस्तक.. श्री पाटेकरांनी माझ्या नवर्याला हे पुस्तक भेट म्हणुन दिलं... ( पाटेकर सरांची सवय आहे की ज्या माणसांबरोबर त्यांना कम्फर्टेबल वाटतं त्यांना ते हे पुस्तक भेट देतात कारण विजया बाई त्यांच्या गुरु) त्या पुस्तकावर विजया बाईंची सही पण आहे... :)..माझ्या छोट्याशा संग्रहात हे पुस्तक माझं आवडतं पुस्तक आहे....त्यांचे लहान पणाचे प्रसंग खुप मस्त आहे...लहान पणाचा काळ त्यांनी मस्त रेखाटला आहे...नंतरचे पण तरुण पणीचा काळ , मग लग्न....सर्व काही खुप छान.. Happy

सुंदर लेख.

आणि जर बाईंनी स्वतः सहभाग घेतला तर त्यासारखे दुसरे काहीच नसणार. >>> प्रचंड अनुमोदन ....

दिनेशदा, खुप खुप धन्यवाद. माझा मित्र नुकताच भारतात गेलाय त्याला सांगतोय मी आणायला. पुढच्या आठवड्यात मिळेल पुस्तक.

पुनश्च आभार.