आठवे पुस्तक, (भाग १ )!

Submitted by कवठीचाफा on 23 June, 2008 - 14:33

'तुम्हाला नाथबाबु माहीताय का हो ?'
नाही? मग तुमचे साहीत्यातले नॉलेज अपुर्णच म्हणायला हवे, आहो, मोजक्या सात कादंबर्‍या लिहून त्यांच्या इतके प्रसिध्द कुणीच झाले नसतील. कमीत कमी मी तरी नाही पाहीलेले.
बरं एक एक कादंबरी म्हणजे एखादा नवा विषय एकाच विषयावर त्यांनी कधी पुन्हा म्हणुन लिहीले नाही.
कधी विनोदी कधी गंभीर अश्या वेगवेगळ्या 'रसभरीत' कादंबर्‍या त्यांनी लिहील्या त्यातल्या चार कादंबर्‍यांवर चित्रपटही निघाले अर्थात चित्रपटनिर्मात्यांच्या भाषेत त्यातली फ़क्त मध्यवर्ती कल्पना घेउन त्यांच्या पटकथाकारांनी पटकथा लिहीली पण नक्कलला काही प्रत्येकवेळीच अस्सलची सर येत नाही, चित्रपट आपटले.
आता प्रश्न पडला असेल ना? ' की कोण बुवा हे नाथबाबु? आणि आपल्यापर्यंत त्यांचे लिखाण कसे आले नाही?
तुमचा प्रश्नही बरोबर आहे त्यांच्या कादंबर्‍यांना एका ठराविक वलयाबाहेर प्रसिध्दी मिळाली नाही. त्यात कदाचीत काही थोर लेखकांना थोडं असुरक्षीत वाटल असेल, पण जीथे नाथबाबुंच्या कादंबर्‍या पोहोचल्या तिथे मात्र ते प्रचंड लोकप्रिय होते.
मी स्वतः नाथबाबुंचा फ़ार मोठा चाहता आहे त्यांच्या प्रत्येक कादंबरीतला शब्द न शब्द मी अनुभवला आहे! हो अनुभवलाच आहे कारण नुसतं वाचणं आणि आपण वाचत असलेल्या साहीत्यात हरवण यात फ़ार मोठा फ़रक आहे. प्रत्येक पानागणीक मी बेहोष होत त्यांची पुस्तके वाचली आहेत. त्यांच्या विनोदी लेखनाला मनापासुन खदखदुन हसलो आहे, त्यांच्या कौटुंबीक लेखनात मी त्या कादंबरीतले एक पात्र झालो आहे.
मनात आणलं असतं तर अमाप प्रसिध्दी मिळवु शकले असते नाथबाबु, पण त्यांना प्रसिध्दीची हाव मुळीच नव्हती. मी हे छातीठोकपणे सांगु शकतो कारण त्यांनी अनेक ठीकाणी वेगवेगळ्या टोपणनावाने लिखाणे केली आहेत.
आता तुमचा पुढचा प्रश्न नक्कीच असा असणार की मला नाथबाबुंबद्दल ईतकी माहीती कशी?
तर मी गर्वाने सांगु शकतो की नाथबाबुंना वैयक्तीक ओळखणारे जे कुणी होते त्यात मी ही होतोच. आणि हा मान काही फ़ारश्या लोकांना नाही मिळालेला आगदी हाताच्या बोटावर मोजता येतिल असे आणी इतकेच लोक असतिल.
आता लेखक म्हंटल की आपल्या डोळ्यासमोर जे व्यक्तीमत्व उभे रहाते तसे नाथबाबु मुळीच नव्हते. म्हणजे चेहर्‍यावर एकतर गांभिर्य, नाहीतर असल्या नसल्या प्रतिभेचे तेज, घेउन वावरणारे बिलकुल नाही.

नाथबाबु म्हणजे एक भारदस्त वगैरे वाटणारं असं व्यक्तीमत्व नव्हतच मुळी, उंचीने ठेंगणेच म्हणायला हवेत इतपत कमी, चेहरा सर्वसाधारण उच्चमध्यमवर्गीय माणसाचा असावा तसा, डोक्यावरचे केस आता वयोमानापरत्वे आपली जागा सोडुन गेलेले आणि जे उरले होते त्यांच्यात चंदेरी झाक आलेली होती. एकुणच सर्वसामान्य माणसात ते वेगळे असे उठुन दिसणारे असे नव्हतेच. कदाचीत याचाच फ़ायदा धेउन ते सर्वसामान्य माणसात मिसळत असावेत, असावेत हं कारण मी तरी त्यांना त्यांच्या बंगल्यातच पाहीले आहे अर्थात जेंव्हा पाहीले तेंव्हा.

नाथबाबुची आर्थीक परीस्थीती तशी दांडगीच म्हणायला हवी. कारण केवळ लिखाणा व्यतीरिक्त मी त्यांना काही करताना पाहीले नाही ज्याला उपजिवीकेचे साधन म्हणता येईल असे तरी. त्यांचा बंगला बाकी आगदी ऐसपैस होता, पण त्यात रहाणारे असे ते एकटेच कारण त्यांना कुणी नातेवाईक असल्याचे कधी कुणाला माहीत नव्हते. लग्नही न केल्याने त्यांच्या आयुष्याचा असा कुणीही वाटेकरी नव्हता. तसा एक नोकर कायम असे तिथे पण तो बहुधा फ़क्त दिवसाच असावा.
माझ्या आयुष्यात जे काही आगदी आनंदाचे क्षण आले त्यातला एक म्हणजे मी नाथबाबुंच्या मर्जीतला माणुस झालो, मी कधीही त्यांच्या बंगल्यावर जाउन त्यांच्याशी गप्पा मारु शकत होतो. कदाचीत आणखीही काहीजण असावेत पण मी जेंव्हा जेंव्हा तेथे गेलो तेंव्हा मात्र ते एकटेच असत. ते ज्या खोलीत आपले लिखाणाचे काम करत असत ती खोली, त्यांचे टेबल, आगदी त्यांच्या अफ़ाट पुस्तक संग्रहालयातल्या पुस्तकांपर्यंत जाण्याची मला मुभा होती. अर्थात मी याचा कधी गैरफ़ायदा घेण्याचा प्रयत्न केला नाही, याची कदाचीत त्यांना खात्री होती नाहीतर माझ्यासारख्या माणसाला इतक्या जवळकीने वागवण्याची त्यांना काय अवश्यकता होती?

आता तुमचा पुढचा प्रश्न असेल की मी नाथबाबुंचा उल्लेख असा भुतकाळात का करतोय?

तर त्याचे उत्तर माझ्यासाठी फ़ारच वेदनादायक आहे. ते म्हणजे आत्ता नाथबाबु आपल्यात नाहीत. अर्थात मृत्यु या संकल्पनेबद्दल माझ्या मनात काही अचाट कल्पना नाहीत. म्हणजे जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला मृत्यु हा येणारच. पण मला जास्त धक्का बसला तो नाथबाबुंच्या मृत्युच्या प्रकाराने. नाथबाबुंसारखा माणुस आत्महत्या करु शकतो? यावर माझा विश्वास बसायला आजही तयार नाही. जो माणुस इतकी वर्षे एकटा जगला, प्रत्येक चांगल्या वाईट प्रसंगाना एकटाच सामोरा झाला त्या माणसाच्या आत्महत्या करण्याच्या बातमीवर तुम्ही तरी विशवास ठेवाल का? पण हेच सत्य आहे कारण आत्महत्येपुर्वी त्यांनी लिहिलेली चिठ्ठी पोलीसांना त्यांच्या खोलीत सापडली होती, त्यात काय लिहीले होते ते आजुन तरी मला कळु शकलेले नाही पण काहीतरी खास कारण असावे हे नक्की. म्हणजेच नाथबाबु माझे अत्यंतिक आवडते लेखक आता या जगात नाहीत हे धक्कादायक असले तरी मी आता मान्य करुन टाकले आहे त्याखेरीज दुसरा पर्याय नाहीच, नाही का?

पण मला सगळ्यात जास्त छळणारा प्रश्न हा की माझ्या माहीती प्रमाणे नाथबाबु सध्या त्यांच्या आठव्या कादंबरीच्या लेखनात गर्क होते. आणि त्याचमुळे गेल्या सहा किंवा त्याहीपेक्षा जास्त महीन्यात माझी आणी त्यांची भेट झालेली नव्हती. पोलीस तपासानंतर मी त्यांची लिखाणाची खोली, टेबल पाहीले पण त्यात कोठेही त्यांचे हस्तलिखीत सापडले नाही. याचा अर्थ ते कदाचीत त्यांनी पुर्ण करुन संपादकांकडे सोपवलेले असावे. म्हणुन मी तिकडे धाव घेतली पण तिथेही निराशाच पदरी आली. बरं संपादक खोटे बोलत आहेत असे म्हणता येणे शक्यच नाही कारण त्यांनी कुणाच्याही नावावर त्यांची कादंबरी छापण्याचा प्रयत्न केला तरी नाथबाबुंचे वाचक क्षणात ओळखतील याची त्यांनाही जाण आहे.

मग मी शोध सुरु केला इंटरनेटवर कारण आपले साहीत्य तुकड्या तुकड्याने एखाद्या संकेतस्थळावर प्रसिध्द करुन त्याच्या प्रतिक्रीयांच्या आधारे आपल्या लिखाणात ते वास्तवता आणत हे मला माहीत होते, त्यातच मला ह्या संकेत स्थळाचा शोध लागला मी आगदी पिसाटासारखा इथे ओळ न ओळ वाचत शोध घेत राहीलो. पण दुर्देव इथेही त्यांच्या लिखाणाचा मागमुस नाही. पण जे काही ईथे मला मिळाले त्यामुळेच मी माझ्या भावना आणि नाथबाबुंबद्दल इथे लिहीण्याचा प्रयास करत आहे.

हो केवळ या ठीकाणी मला जे काही वाचायला अनुभवायला मीळाले त्यामुळेच मी हे सर्व लिहीत राहीलो कारण नाथबाबुंच्या ज्या आठव्या कादंबरीच्या हस्तलिखिताच्या शोधात मी होतो ते तर मला आता मिळालेले आहे, त्यांनी ते माझ्याच नावे पोष्टाने पाठवलेले होते आणि पोष्टखात्याच्या विलंबामुळे ते आजच माझ्या हातात पडले आहे. आता ते हस्तलिखीत वाचल्याशीवाय मला एक अक्षरही लिहीणे शक्य होईल असे वाटत नाही त्यामुळे आता ते वाचुन झाल्यावरच मी माझे हे लिखाण पुर्ण करेन त्यामुळे तुमची क्षमा मागुन मी आता हे लिखाण थांबवत आहे. नाथबाबुंची आठवी कादंबरी वाचल्यावरच मी आता पुढे लिहू शकेन.

क्रमशः

गुलमोहर: 

लिहा लिहा राव, आम्हि वाचक आहोतच मनमुराद वाचायला.

झाली का आठवी कांदबरी वाचुन? आता पुढ काय?

फारच विदारक ---आम्ही आपल्या आठ्व्या कादम्बरीच्या प्रती़क्शेत.

--जीवन एक प्रवास, मी एक वाटसरु ,ट्प्याट्प्याने प्रवास करणारा.

ह्म्म! आता पुढील भाग टाका राव लवकर!

हे चाफ्फ्या, आयला आम्हीच सापडलो होय रे Happy

आणि तो क्रमशः शब्द फसवा आहे की नाही Happy

बाकी लिहीलंय जबरी रे Happy