समस्या आणि उपाय भाग १: अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची अध्यक्षीय निवडणूक

Submitted by चेतन सुभाष गुगळे on 7 January, 2014 - 05:27

समस्या आणि उपाय

आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला अनेक गुंतागुंतीच्या समस्या जाणवतात. या समस्यांचा वेध घेऊन अतिशय साध्या कल्पनांचा अवलंब करीत त्यावर शोधण्यात आलेल्या सरल उपायांची ओळख.

भाग १: अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची अध्यक्षीय निवडणूक

प्रत्येक वर्षी अ.भा.म.सा.प. द्वारा आयोजित अ.भा.म.सा.सं. अध्यक्षपदाच्या निवडणूका घेतल्या जातात. त्याचप्रमाणे प्रत्येक (च) वर्षी काही ठराविक वादविवाद झडतात.

  1. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन असे बिरूद मिरविणार्‍या आणि अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद असे नाव लावणार्‍या संस्थेमार्फत आयोजित केल्या जाणार्‍या या संमेलनाच्या अध्यक्षीय निवडणूकीत मतदान करण्याचा अधिकार अगदी मोजक्याच (संख्येने फक्त काही शेकड्यात असणार्‍या) मतदारांना का? जेव्हा की मराठी साहित्याच्या वाचकांची संख्या किमान दोन कोटी तरी असणार. मग अशा अत्यल्प मतदारांनी निवडलेल्या साहित्यिकास अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष मानणे योग्य ठरेल का?
  2. कोणाला मतदानाचा अधिकार द्यावा आणि कोणाला नाही हा जर संस्थेचा अधिकार असेल आणि संस्था शासकीय नसल्या कारणाने संस्थेचा हा अधिकार अबाधित असेल तर शासकीय अनुदानावर ह्या संमेलनाचा खर्च करावा का?
  3. संमेलनात राजकीय व्यक्तींना बोलवून व्यासपीठावर भाषण करू द्यावे का? आणि जर राजकीय व्यक्तींना बोलविले नाही तर पुन्हा तोच प्रश्न की, शासकीय अनुदानावर ह्या संमेलनाचा खर्च करावा का?
  4. शासकीय अनुदान टाळावे तर खासगी प्रायोजकांकडून खर्चाचा भार उचलायला हवा. तसे केले तर त्यांच्या उत्पादनाच्या जाहिरातींनी संमेलनाचे मंडप सजवायला हवे. या प्रकारच्या आयोजनालाही अनेक जण नापसंती दर्शवितात. गुटखा, मद्य आदींच्या जाहिराती नक्कीच आक्षेपार्ह ठरतात.

या सर्व समस्या टाळायच्या असतील खाली दिल्याप्रमाणे एक साधा उपाय अंमलात आणावा

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणूकी करिता कुणालाही (हो.. अगदी कुणालाही) उभे राहू द्यावे. दिलेल्या मुदतीत जितके इच्छूक आपले अर्ज सादर करतील त्या सर्वांची यादी बनवावी. या इच्छूक उमेदवारांपैकी प्रत्येकाच्या नावाने अ.भा.म.सा.प. ने राष्ट्रीयीकृत बॅंकेत एक एक स्वतंत्र खाती उघडावीत. त्यानंतर वर्तमानपत्र, दूरचित्रवाणी व आकाशवाणी वाहिन्या आणि महाजालावरील संकेतस्थळे या सर्व प्रसारमाध्यमांद्वारे सर्वसामान्य जनतेला आवाहन करावे की, त्यांना इच्छूक उमेदवारांपैकी ज्या उमेदवाराला संमेलनाध्यक्ष म्हणून निवडून द्यायचे आहे त्या उमेदवाराच्या नावाने अ.भा.म.सा.प. ने उघडून दिलेल्या बॅंक खात्यात यथाशक्ती रक्कम (केवळ धनादेश अथवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीनेच) तीस दिवसांच्या आत जमा करावी.

अशा प्रकारे ज्या उमेदवारास वाचकपसंती जास्त असेल त्याच्या खात्यात तीस दिवसांनंतर कमाल रक्कम जमा होईल आणि तोच संमेलनाध्यक्ष म्हणून घोषित केला जाईल. तसेच त्याच्या निवडीबाबत कोणासही आक्षेप राहणार नाहीत. त्याचप्रमाणे रक्कम केवळ धनादेश अथवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीनेच जमा होत असल्याने यात काळे धन जमा होणार नाही. सर्व इच्छूक उमेदवारांच्या खात्यात जमा होणारी रक्कम अ.भा.म.सा.प. द्वारे एकत्रित केली जाऊन संमेलनास होणारा खर्च त्यातून परस्पर भागविता येईल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कल्पना म्हणून ठीक आहे, पण पुढाकार घेवून सर्व करणार कोण ? हे जर अशासकिय यंत्रणा करणार असेल तर ते सर्वांनी मानायला पाहिजे! हे होईल ? अन जर शासकिय यंत्रणा करणार असेल तर विचारायलाच नको. बोजवारा वाजलाच म्हणून समजा. हे अर्थकारण अशासकिय अथवा शासकिय केले अन भ्रष्टाचार झाला तर ते सर्व कसे निस्तरायचे ?

१. अत्यल्प मतदारांनी निवडलेल्या साहित्यिकास अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष मानणे योग्य ठरेल का? >> सर्वसाधारणपणे योग्य म्हणता येईल. सध्या, अगदी सर्वांना मान्य नसला तरी तो या क्षेत्रात एक विशिष्ट पातळी गाठलेला असतो.
२. संमेलन अशासकिय असेल तरीही अश्या सांस्कृतिक उपक्रमाला मदत करणे उचित नक्कीच ठरते.
३. राजकिय व्यक्ति या व्यासपीठावर येवून साहित्याविषयी बोलणार असतील तर काय हरकत आहे?
४. खासगी प्रायोजकाकडून खर्च शक्यतो घेवू नये.

एकंदरीत या विषयाला हो अथवा नाही असे डिजीटल उत्तर देता येणार नाही. याला बरेच सांस्कृतिक, राजकिय, सामाजिक & प्रादेशिक पदर आहेत. आपण या क्षेत्रात (संमेलन आयोजन) कार्यरत नसलो तर आपण यावर काही भाष्य करणे योग्य होणार नाही. या क्षेत्रात स्वत:चे हात काळे केलेली व्यक्तिचाच यावर भाष्य करण्याचा अधिकार राहिल.

जाताजाता, कोण अध्यक्ष आहे, पैसे कुणी खर्च केले, कुणी चमकोगिरी केली या पेक्षा संमेलनाला स्वतः
हजर राहून साहित्यिकाशीं बोलून, तिथल्या कार्यक्रमाचा आनंद लुटणे याने तळागाळातील ग्रामिण, नागरी वाचकांनी प्रचंड समाधान अनुभवलेले आहे हे वृत्तपत्रातील बातम्यांवरून दिसून येते. ही एक जत्रा आहे, यात हौशे-नवशे-गवशे सामील होणारच.
एक सामान्य वाचक म्हणून साहित्य संमेलन होत असते यात आंनंद आहेच, थोडे फार इकडेतिकडे झाले तर चालायचेच म्हणून दुर्लक्ष करायचे.