'वेगळेपण' सामावताना... - श्रीमती चित्रा पालेकर

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

भारतात कलम ३७७अंतर्गत 'अनैसर्गिक' लैंगिक संबंध बेकायदेशीर आहेत. भारतीय कायद्यानुसार समलिंगी संबंध ठेवणंही अर्थातच बेकायदेशीर आहे. इंग्रजांनी एकोणिसाव्या शतकात लिहिलेला, दोन सज्ञान व्यक्तींच्या खाजगी आयुष्यात ढवळाढवळ करणारा, त्यांना गुन्हेगार ठरवणारा हा कायदा भारतात पाळला जातो.

काही वर्षांपूर्वी दिल्ली उच्च न्यायालयानं हा कायदा घटनाविरोधी ठरवला. या निकालाविरुद्ध अनेक धार्मिक संघटना सर्वोच्च न्यायालयात गेल्या. दिल्ली उच्च न्यायालयाचा निकाल भारतात सर्वत्र लागू व्हावा, म्हणून काही सामाजिक संघटना आणि समलिंगी मुलामुलींचे एकोणीस पालकही न्यायालयात गेले. गेल्या महिन्यात सर्वोच्च न्यायालयानं दिल्ली उच्च न्यायालयाचा निकाल रद्द केला.

उच्च व सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार्‍या पालकांपैकी एक होत्या श्रीमती चित्रा पालेकर. चित्रा व अमोल पालेकर यांची मुलगी शाल्मली समलिंगी आहे. ऑस्ट्रेलियात एका विद्यापीठात ती प्राध्यापक आहे. गेली अनेक वर्षं चित्राताई भारतात समलैंगिकांना गुन्हेगार ठरवलं जाऊ नये, त्यांना समान हक्क मिळावेत, यासाठी लढा देत आहेत.

२०१२ साली 'माहेर'च्या दिवाळी अंकात चित्राताईंनी समलैंगिकतेबद्दल एक लेख लिहिला होता. हा लेख प्रकाशित झाल्यावर अनेकांचे फोन, ईमेल आले. आपला मुलगा / मुलगी समलिंगी असल्याची शंका असणारे पालक, आपला मुलगा / मुलगी समलिंगी आहे, हे माहीत असणारे पालक हा लेख वाचून पुढे आले. भारतात अजूनही या विषयाबद्दल किती अज्ञान, भीती, संकोच आहे, हे या निमित्तानं लक्षात आलं.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आलेल्या प्रतिक्रियांमधूनही हे जाणवलं. समान हक्क नाकारणार्‍या या कायद्याच्या बाजूनं किती मोठा समुदाय उभा आहे, हे समोर आलं. म्हणूनच चित्राताईंनी लिहिलेला लेख इथे (सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर काही बदलांसह) पुन्हा प्रकाशित करत आहे.

CP and Shal.jpg

`माझा मुलगा जर समलिंगी असेल, तर समलैंगिकतेला वाईट समजणार्‍या पारंपरिक रूढ कल्पनाच साफ चुकीच्या, असं मी ठामपणे मानतो.'

एका ख्रिस्ती बिशपचे हे उद्गार. मुलानं स्वतःची लैंगिकता उघड केल्यावर त्याची निर्भर्त्सना करण्याऐवजी, त्याला नाकारण्याऐवजी, मुलावर विश्‍वास ठेवून त्याला पूर्ण पाठिंबा देताना काढलेले! दोन वर्षांपूर्वी ’स्ट्रेट पेरेंट्स्, गे चिल्ड्रन : कीपिंग फॅमिलीज टुगेदर’ असं लांबलचक शीर्षक असलेलं पुस्तक वाचताना ते शब्द माझ्या नजरेस पडले. एका धर्मप्रचारकानं त्याच्या धार्मिक नीतिनियमांची तमा न बाळगता अशी भूमिका उघडपणे घ्यावी, याचं खूप बरं वाटलं. त्याचबरोबर, वीस वर्षांपूर्वी माझ्या मुलीनं ती लेस्बियन आहे, असं मला सांगितल्यावर मला काय वाटलं होतं, ते पुन्हा एकवार आठवलं.

त्या काळी समलैंगिकतेबद्दल मला फारशी माहिती नव्हती (आता साठीत असलेल्या माझ्या पिढीला स्त्री-पुरुष संबंधांबद्दलसुद्धा उघड बोलायला संकोच वाटे, तिथे समलैंगिकतेचं काय घ्या?). ही गोष्ट कधीच स्वप्नातदेखील न आल्यामुळे, मुलीनं तसं म्हटल्यावर मी चकित होणं साहजिक होतं, पण मी अजिबात हादरून वगैरे गेले नाही. वर उल्लेख केलेल्या बिशपप्रमाणेच मला वाटलं, की जर माझी मुलगी लेस्बियन असेल, तर ती गोष्ट वाईट असणं शक्यच नाही. लेक म्हणाली, ''तू काळजी करू नकोस. लैंगिकता ही गोष्ट सोडून बाकी सर्व बाबतींत मी अगदी तीच आहे... माझ्या जन्मापासून आत्ता, काही क्षणांपर्यंत मी जी होते, जिला तू जाणत होतीस तीच... तुझी शाल्मली". वास्तविक तिनं हे बोलून दाखवायची गरज नव्हती. तिच्या वागण्याबोलण्यात कुठलाच फरक नाही, हे मला स्पष्ट दिसत होतं. मी केवळ हलकंसं स्मित करून होकारार्थी मान हलवली. शाल्मली बरीच रिलॅक्स झाली.

''अम्मा, समलिंगी असणं हा आजार नाही, बरं का! हे व्यंग किंवा विकृतीदेखील नाही", लेक समजावत होती. "समलैंगिकतेला अनैसर्गिक मानणं तर साफ चुकीचं आहे. तू लहान असताना डाव्या हाताचा वापर वाईट मानला जाई, नाही का? बिचार्‍या डावर्‍या मुलींना पूर्वी फटके मारून उजव्या हातानं लिहा-जेवायला भाग पाडत, हे तूच मला सांगितलं होतंस, पण आज डाव्या हाताला मान्यता मिळाली आहे. त्याचा वापर अनैसर्गिक, असं कुणी म्हणत नाही. अशा लोकांचं प्रमाण कमी असतं. समाजातल्या बहुतेक लोकांहून ते वेगळे असतात, पण त्यांच्या कृती नैसर्गिकच मानल्या जातात. समलिंगी असणं हे एका परीनं डावरं असण्यासारखंच आहे.''

''समाजात बहुतांश लोकांची लैंगिकता स्त्री-पुरुष संबंधाशी निगडित असते. त्यांच्या तुलनेत समलिंगी लोकांची संख्या कमी; पण ते बहुतेकांपेक्षा वेगळे आहेत म्हणून समाजानं त्यांच्यावर अनैसर्गिक असा शिक्का मारणं योग्य आहे का? खरंतर लैंगिकता केवळ बायोलॉजिकल फॅक्ट आहे. डोळ्यांच्या रंगांप्रमाणे. सर्व माणसांचे डोळे जसे एकाच प्रकारचे असत नाहीत - काळे, निळे, राखाडी असे वेगवेगळ्या रंगांचे असतात, त्याचप्रमाणे लैंगिकतादेखील केवळ एकाच प्रकारची - स्त्री-पुरुषसंबंधी नसते. समलैंगिकता हे ऐतिहासिक वास्तव तर आहेच. त्याशिवाय आता समाजशास्त्रीय, मानसशास्त्रीय, तसंच जीवशास्त्रीय संशोधनांतून या विषयावर अधिकाधिक प्रकाश पडत चाललाय आणि अशा सगळ्या अभ्यासांतून जो निष्कर्ष निर्विवादपणे निघालाय, तो हाच, की गे किंवा लेस्बियन (होमोसेक्शुअल) असणं हे स्ट्रेट (हेटेरोसेक्शुअल) असण्याइतकंच नैसर्गिक आहे.''

वीस वर्षांची माझी लेक तर्कशुद्ध विचार अतिशय सुसंगतपणे मांडत होती. वास्तविक मी व तिचे वडील अनेकदा तिच्याबरोबर वेगवेगळ्या विषयांवर वाद घालत असू, चर्चा करत असू, पण आज केवळ तात्त्विक चर्चा होत नव्हती. तिच्या-माझ्यातला हा संवाद अतिशय नाजूक होता... आम्हां दोघींचं नातं, जवळीक पारखणारा, आणि म्हणूनच अतिशय महत्त्वाचा होता. शाल्मली पोटतिडिकीनं बोलत होती, पण मधूनच अम्माला हे पटतंय का, अशी शंका तिच्या चेहर्‍यावर उमटून जात होती... कधी निराशेचा सूर डोकावत होता. मी तिला कुशीत घेऊन म्हटलं, ''तू मुळीच काळजी करू नकोस. या सगळ्या गोष्टी सांगण्यापूर्वी तू जी माझ्यासाठी होतीस, तीच अजूनही आहेस... माझी लाडकी लेक. बस्स...'' आणि मग एकमेकींना मिठी मारून आम्ही खूप हसलो आणि थोडंसं रडलोसुद्धा. आपल्या वडलांना, जवळच्या कुटुंबीयांना व मित्रमंडळींना तिनं सांगितल्यावर सगळ्यांनी तिचा सहजपणे स्वीकार केला. माझ्यासारखंच सर्वांना वाटलं, तिचं-आपलं जे प्रेमाचं, आपुलकीचं नातं आहे, त्यात तिच्या लेस्बियन असण्यानं काय फरक पडतो? तो तिचा खासगी प्रश्‍न आहे! तिला आपल्या पुढच्या आयुष्यात सोबती म्हणून स्त्री हवी आहे, पुरुष नाही, इतकंच. सर्व जवळच्या, प्रिय लोकांनी स्वीकार केल्यामुळे माझ्या लेकीचं मानसिक बळ खूप वाढलं, यात शंका नाही. आज ती परदेशात एका महत्त्वाच्या विश्‍वविद्यालयात प्राध्यापक आहे. स्वतःच्या विषयात आंतरराष्ट्रीय स्तरावर तिला मान्यता मिळाली आहे. इतकंच नव्हे, तर तिचं खासगी जीवनदेखील अतिशय सुखी, समृद्ध आहे. याचं श्रेय तिच्या आत्मविश्‍वासाला आणि कर्तृत्वाला जातं, तिच्या सहचरणीच्या प्रेमाला जातं, तसंच तिच्या जवळच्या सर्व माणसांच्या पाठिंब्यालाही जातं, अशी माझी खात्री आहे.

''आपण लेस्बियन आहोत हे जाणवल्यावर तू लगेच मला का नाही सांगितलंस? मध्ये इतका काळ का जाऊ दिलास?'' मी लेकीला विचारलं. बालपणापासून कुठलीही गोष्ट तिनं माझ्यापासून लपवली नव्हती, पण या बाबतीत ती चार-पाच वर्षं गप्प राहिली, हे मला थोडंसं खटकलं होतं. ''मी तेव्हा चौदा-पंधरा वर्षांची असेन. एव्हाना माझ्या मित्रांना मुलींबद्दल आणि मैत्रिणींना मुलांबद्दल 'गुलुगुलु' वाटायला सुरुवात झाली होती. सगळे मला त्यांची गुपितं सांगत. आवडणार्‍या मुलीशी किंवा मुलाशी ओळख करून द्यायची विनंती करत! मी सगळ्यांची दोस्त! त्या वेळी माझ्या लक्षात आलं, की मला स्वतःला मुलांबद्दल निर्भेळ मैत्रीपलीकडे काही वाटत नाही... मी इतर मुलींपेक्षा वेगळी आहे. त्या वयात वेगळेपणाची भीती वाटते, तशी मलाही वाटली. मी लेस्बियन तर नसेन, अशी शंका मनात डोकावल्यावर तर फारच. अर्थात, हे सगळे शब्द तेव्हा माझ्या परिचयाचे नव्हते. माझ्या मनाचा गोंधळ उडाला. कुणाशी तरी बोलणं आवश्यक होतं, पण आजूबाजूच्या माणसांत कुणीही समलिंगी नव्हतं, किंवा कुणी असल्याचं मला माहीत नव्हतं. मी कुणाचा सल्ला घेणार?'' 'म्हणूनतर माझ्याकडे यायचंस ना...' असं मी म्हणणार, इतक्यात शाल्मली पुढे म्हणाली, ''तुझं व बाबांचं या विषयी नेमकं काय मत आहे, मला ठाऊक नव्हतं. आपल्या घरी अनेक कलात्मक, राजकीय, सामाजिक, साहित्यिक विषयांवर चर्चा चालत, पण समलैंगिकतेचा कधी कुणी उच्चारही केला नाही. तुम्ही केवळ या विषयाकडे दुर्लक्ष करत होतात, की त्याच्या विरोधात होता, हे मला कसं कळणार? मी तुम्हांला सांगितलं, तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? तुम्हांला माझा राग येईल का... शरम वाटेल का... तुम्ही माझ्यापासून दूर जाल का... माझ्यावर पूर्वीसारखं प्रेम कराल का? नाहीनाही त्या शंकाकुशंका मला सतावत होत्या. तुमच्यापाशी यायला मी धजावत नव्हते. याशिवाय अनेकदा अनेक ठिकाणी गे किंवा लेस्बियन माणसांबद्दल गलिच्छ कुजबूज, विनोद माझ्या कानी येत होते. अतिशय वाईट शब्दांत, अश्‍लील पद्धतीनं त्यांचा उल्लेख होताना मी ऐकलं होतं. क्लबमध्ये वा शाळेत नाजूक दिसणार्‍या मुलांना इतर मुलं किती वाईट वागवत, हे मी पाहिलं होतं. साहजिकच मी लेस्बियन आहे असं कळलं, तर माझ्याशी सगळे असंच वागतील, अशी भीती माझ्या मनात घर करून होती. हे सगळे धोके पत्करण्यापेक्षा गप्प राहणंच शहाणपणाचं होतं, नाही का?'' मी सुन्न होऊन तिचे अनुभव ऐकत होते.

काही क्षण गप्प राहून शाल्मली हसली आणि म्हणाली, ''पण गंमत म्हणजे जसजशी मी मोठी झाले, तसतसं माझ्या लक्षात आलं, की 'आपल्यात काही कमी आहे, तिरस्कार वाटण्यासारखं आहे, आपलं मन गलिच्छ आहे' असलं काही मला अजिबात वाटत नाहीये. मी मित्रमैत्रिणींपेक्षा 'वेगळी' असेन पण माझ्यात कमतरता मुळीच नाही. उलट अभ्यास, खेळ, गाणं सगळ्यांत मी पुढेच आहे. हळूहळू या विषयावरचे अभ्यासपूर्ण निबंध, लेख वाचायला मी सुरुवात केली. त्यावर विचार करायला लागले. माझा आत्मविश्‍वास बळकट झाला आणि वाटलं, अम्मा-बाबाला सांगायला का घाबरावं? शेवटी तुम्हीच तर मला सत्याची चाड धरायला शिकवलं होतं. निर्भय होण्याचे धडे दिले होते. शिवाय लेस्बियन असण्यानं मी कुणाचंही वाकडं करत नव्हते, कुणालाही इजा करत नव्हते! हो ना?''

उत्तरादाखल मी तिला पुन्हा मिठीत घेतलं. माझ्यापाशी शब्द नव्हते. आईच्या नात्यानं मी तिच्या सर्वांगीण वाढीची सदैव काळजी घेतली होती. प्रत्येक बाबतीत तिला प्रोत्साहन दिलं होतं, पण जेव्हा तिच्या किशोरवयात तिला समलैंगिकतेची, स्वतःच्या 'वेगळेपणा'ची जाणीव झाली आणि ती गोंधळून गेली, तेव्हा तिला माझ्या मायेची, आधाराची खरी गरज होती आणि नेमकी तेव्हाच, मुलीची हेटेरोसेक्शुअ‍ॅलिटी गृहीत धरण्याची चूक केल्यामुळे मी कमी पडले होते!

समलैंगिकता मुलीच्या आयुष्यात एक महत्त्वाचा घटक आहे, हे कळल्यावर त्या बाबतीत सर्व काही व्यवस्थित जाणून घेण्याची मला आवश्यकता वाटली. मी तिला प्रश्‍न विचारायला, शंका बोलून दाखवायला सुरुवात केली आणि तीदेखील मनमोकळेपणानं, कसलाही संकोच न करता समजावून देऊ लागली. लेख, पुस्तकं वाचायला देऊ लागली. पुढे बर्‍याच समलिंगी स्त्री-पुरुषांशी माझी ओळख झाली, अनुभवांची देवाणघेवाण सुरू झाली. या सर्व प्रयत्नांतून, पूर्वी धूसर असलेलं समलैंगिकतेचं विश्‍व हळूहळू माझ्यापुढे साकार होऊ लागलं. समाजात त्यांच्याबद्दल ज्या समजुती प्रचलित आहेत, त्यांत वास्तव किती, दंतकथा किंवा फोल कल्पना किती, हे स्पष्ट व्हायला लागलं.

***

माझी या जगाशी ओळख झाली त्या वेळी म्हणजे १९९०च्या दशकात, समलैंगिकतेबद्दल भारतात सर्वसाधारणपणे प्रतिकूल वातावरण होतं. शतकानुशतकं ज्यांच्यावर अन्याय झाला, ज्यांचा आवाज दडपला गेला, हक्क हिरावले गेले अशा दलित, स्त्रिया, आदिवासी इत्यादी घटकांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी स्वतंत्र भारताच्या चाळीस वर्षांत संघटना उभ्या राहिल्या होत्या, चळवळी सुरू झाल्या होत्या. सामाजिक कार्यकर्त्यांच्या जोडीनं खुल्या विचारांचे बुद्धिजीवी, कलाकार, पत्रकार यांत भाग घेत होते. सरकारवर दबाव आणत होते. अल्पसंख्याकांच्या प्रश्‍नांबद्दलही त्या सर्वांना सहानुभूती वाटत होती. आणीबाणीनंतर घटनेत नमूद केलेल्या व्यक्तिस्वातंत्र्याविषयी व प्रत्येक नागरिकाच्या मूलभूत हक्कांविषयी समाजात अधिक जागरूकता होती; पण समलैंगिक मात्र अल्पसंख्य, अन्यायाचे बळी असून, त्यांचे मूलभूत हक्क हिरावले गेले असूनदेखील उपेक्षित व अंधारात राहिले. एकदा स्त्रीमुक्ती चळवळीशी संबंधित एका प्रसिद्ध कार्यकर्त्रीला ''तुम्ही स्त्रियांच्या प्रश्‍नांबरोबर लेस्बियन्सचे प्रश्‍नही हाती घेता का?'' असं मी विचारलं. यावर त्या बाई म्हणाल्या, ''छे! तो तर वरच्या वर्गातल्या बायकांचा प्रश्‍न आहे. आम्ही ज्या बायकांबरोबर काम करतो, त्यांचा नाही.'' ही त्यांची समजूत साफ चुकीची होती, हे अर्थात मला पुढे कळून चुकलं. (आज मात्र परिस्थिती बदलली आहे. स्त्रीमुक्ती चळवळीत काम करणार्‍या अनेक कार्यकर्त्या एलजीबीटी चळवळींत सक्रीय सहभाग घेतात.) वास्तविक समलैंगिकता दुनियेतल्या सर्व वंशांत, खंडांत, आर्थिक घटकांत, सामाजिक स्तरांत, जाती-जमातींत, तसंच धर्मांत सापडते. पाश्‍चात्त्य-पौर्वात्य, श्रीमंत-गरीब, शहरी-ग्रामीण अशा सगळ्या समाजात अस्तित्वात आहे. अगदी प्राचीन काळापासून आजपर्यंत.

समलैंगिकता मूळ भारतीय नाही, तर ती पाश्‍चात्त्य संस्कृतीतून आपल्याकडे आली, असं आपले संस्कृतिरक्षक सांगतात; पण तेही खरं नाही. प्राचीन भारतीय संस्कृतीत समलैंगिकता प्रचलित असल्याचे पुरावे पुरातन शिल्पांमध्ये व ग्रंथांमध्ये संशोधकांना सापडले आहेत. उलट ज्या नीतिमत्तेच्या कल्पनेतून समलिंगी लोकांवर हल्ला चढवला जातो, ती बुरसटलेली नीतिमत्ता राणी व्हिक्टोरियाच्या काळात आपल्यावर लादली गेली, तेव्हा खरंतर ही नीतिमत्ताच पाश्‍चात्त्य आहे!

समलैंगिकांबद्दलच्या चुकीच्या कल्पनांची यादी लांबलचक. अशी माणसं ठरावीक (बायकी?!) क्षेत्रांत वावरतात, ही अशीच एक गैरसमजूत! वास्तविक, समलिंगी माणसं कुठल्याही क्षेत्रात सापडतील. ती डॉक्टर, इंजिनीअर, वैज्ञानिक, राजकीय पुढारी, अर्थतज्ज्ञ, बँकर, पत्रकार, खेळाडू असे कुणीही असू शकतात. पोलिस, सैन्य वगैरे 'पुरुषी' क्षेत्रांतदेखील ही माणसं आढळतात. कला, फॅशन, जाहिरात यांत वावरणारे अनेकदा ओळखू येतात. प्रस्थापित क्षेत्रांत, करीअरवर घाला येऊ नये म्हणून बहुतेक जण समलैंगिकता लपवतात. देशातला समलैंगिकतेबद्दलचा कायदा, समाजातली सहिष्णुता यांवर या लोकांचं 'प्रकाशात येणं' बरंच अवलंबून असतं.

इतिहासात अनेक प्रसिद्ध समलिंगी व्यक्ती होऊन गेल्या. उदा. 'मोनालिसा' या प्रख्यात चित्राचा जनक लिओनार्दो दा विंची. चित्रकला, शिल्पकला, वास्तुशास्त्र, विज्ञान अशा सर्व तर्‍हेच्या विषयांतलं त्याचं श्रेष्ठत्व आज सहाशे वर्षांनंतरदेखील अबाधित आहे; पण त्याच्या काळात (पंधराव्या शतकात) इटलीतल्या कायद्याप्रमाणे, समलिंगी असल्याच्या आरोपावरून त्याला त्रास देण्यात आला, धार्मिक चित्र रंगवण्यास मनाई करून त्याचा अपमान करण्यात आला. एकोणिसाव्या शतकात ऑस्कर वाइल्ड या थोर आयरिश लेखक-नाटककाराला तो समलिंगी असल्याचं उघडकीला आल्यावर व्हिक्टोरियन कायद्यानुसार तुरुंगवास भोगावा लागला; पण विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात जेव्हा मार्टिना नवरातिलोवा या प्रसिद्ध टेनिसपटूनं आपण लेस्बियन असल्याचं जाहीर केलं, तेव्हा अनेकांच्या भुवया जरी वर गेल्या, तरी तिला क्रीडाजगतात (आणि त्याबाहेरही) मानाची वागणूकच मिळाली. आणि एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीलाच व्हिक्टोरिया राणीचा वंशज प्रिन्स विलियम याच्या लग्नसोहळ्यात एल्टन जॉन हा प्रसिद्ध समलिंगी गायक व्हीआयपी पाहुणा म्हणून आमंत्रित केला गेला!

आपल्या देशात 'इंडियन पीनल कोड कलम ३७७' खाली समलैंगिकता हा गुन्हा आहे. 'लैंगिक क्रियेचा एकमेव हेतू 'गर्भधारणा व त्यातून प्रजोत्पत्ती' हाच असायला हवा आणि म्हणून, केवळ सुख-समाधान देणारी लैंगिकता पाप आहे', असं मानणार्‍या सनातन धार्मिक विचारांतून, तसंच व्हिक्टोरियन काळातल्या संकुचित नीतिमत्तेतून या कलम ३७७चा उगम झाला. कायद्याच्या पाठिंब्यामुळे बुरसटलेल्या विचारांना पुष्टी मिळाली. समाजानं समलैंगिकांना वाळीत टाकलं. धर्म आणि समाज यांच्या दडपणाखाली कुटुंबीय आपल्या समलिंगी मुलांना नाकारायला लागले, लैंगिकता उघड झाल्यास नोकरी मिळणं मुश्किल, समाजात अवहेलना, वर कुटुंबाचा आधारही नाही! एखादा पुरुष 'गे' असल्याची नुसती शंका जरी आली तरी इतर पुरुषांकडून मारहाण, छळ, बलात्कार होण्याची शक्यता असे. असे समलिंगी पुरुष पोलिसांच्या अत्याचाराचेही वारंवार बळी होत, पण कायदाच प्रतिकूल असल्यावर दाद कुणाकडे मागणार?

लेस्बियन बायकांची कमीजास्त फरकानं अशीच स्थिती होती, पण यांना कुटुंबीयांचीच जास्त भीती होती. आपल्या पुरुषप्रधान समाजात मुलींची किंमत कमीच. मुलींच्या नियमबाह्य वागण्यामुळे कुटुंबाच्या प्रतिष्ठेला किंचित जरी धक्का बसला, तरी मुलीला कठोर शिक्षा करायला (प्रसंगी तिची हत्या करायला) घरचे पुरुष मागेपुढे पाहायचे नाहीत. स्ट्रेट मुलींची ही गत, तर लेस्बियन मुलींना वाली कुठून असायचा? अशा अनेक कारणांमुळे समलैंगिकतेभोवती अंधार पसरला; त्यांच्याविषयी सच्ची, वस्तुनिष्ठ माहिती मिळणं मुश्किल झालं आणि परिणामी चुकीच्या कल्पना, गैरसमजुती वाढत गेल्या. हे दुष्टचक्र चालत राहिलं आणि त्यातून समलिंगी मुलं आईबापांच्या प्रेमाला मुकली, स्वाभिमानास पारखी झाली, खरं रूप लपवावं लागल्यामुळे अस्मिता गमावून बसली, दुहेरी जीवन जगू लागली. अनेकदा त्यांच्यावर लग्नाची सक्ती झाल्यामुळे, त्यांचं स्वतःचं, तसंच त्यांच्या वधू/वराचं आयुष्य उद्ध्वस्त झालं.

२००९ साली दिल्ली उच्च न्यायालयानं ३७७ या कलमात बदल करून सम व अन्य लैंगिकांना न्याय मिळण्याच्या दृष्टीनं पहिलं पाऊल टाकलं. न्यायालयाचा निकाल होता- 'दोन प्रौढ समलिंगी व्यक्तींचा परस्पर संमतीनं खासगीत केलेला संग गुन्हा नाही.' कायद्यातल्या या अतिशय महत्त्वाच्या बदलामुळे देशातल्या एलजीबीटी (लेस्बियन, गे, बायसेक्शुअल, ट्रान्ससेक्शुअल) लोकांत चैतन्याची लाट पसरली, त्यांचा आत्मविश्‍वास वाढला. यांच्या विरोधात सनातन विचारांचे लोक सर्वोच्च न्यायालयात गेले, तेव्हा समलैंगिकांना सहानुभूती दर्शवणारे लोक वेगवेगळ्या शहरांतून, निरनिराळ्या क्षेत्रांतून खूप मोठ्या संख्येत पुढे आले. त्यात वकील, प्राध्यापक, डॉक्टर, मानसशास्त्रज्ञ अशांचा समावेश होता. अनेक तज्ज्ञांनी ऐतिहासिक, वैद्यकीय दाखले देऊन समलैंगिकतेच्या बाजूनं शपथपत्रं न्यायालयात सादर केली. एक महत्त्वाचं शपथपत्र सर्वोच्च न्यायालयात सादर केलं ते एकोणीस आईबापांनी- ज्यांत मीही होते- आपल्या मुलांवर आजपर्यंत (म्हणजे दिल्ली उच्च न्यायालयानं कलम ३७७मध्ये बदल करण्यापूर्वीपर्यंत) कसा अन्याय झाला,त्यांना मानसिक, प्रसंगी शारीरिक छळ समाजात कसा सहन करावा लागला, आई-बाप या नात्यानं आमची कशी घुसमट झाली अशा अनेक गोष्टी त्यात मांडल्या होत्या. त्याचबरोबर लैंगिकता ही आमच्या मुलांची खासगी बाब आहे. त्यामुळे आमच्या मुलांत काहीही कमी आहे, असं आम्हाला वाटत नाही. ते सगळ्या बाबतींत आदर्श नागरिक आहेत. त्यामुळे त्यांना गुन्हेगार मानणं अन्याय्य आहे. आमच्या मुलांना त्यांचे घटनांतर्गत हक्क मिळायला हवेत आणि त्यासाठी कलम ३७७मधला बदल अत्यावश्यक आहे, हे आम्ही ठामपणे शपथपत्रात लिहिलं.

आमच्या या कृतीचा खूप मोठा परिणाम झाला. आई-बापांनी विरोधकांना न भिता उघडपणे मुलांची बाजू घ्यावी, त्यांच्या व आपल्या भावना व्यक्त कराव्यात, हक्कासाठी झगडावं, याचं अनेकांना आश्‍चर्य वाटलं, कौतुक वाटलं. तशातून टीव्ही, वर्तमानपत्रं, मासिकं यांनी आजवर दुर्लक्षित असलेल्या (किंवा केवळ अश्‍लीलतेच्या संदर्भात उल्लेख झालेल्या!) समलैंगिकतेची बाजू उचलून धरली. आई-बापांच्या, मुलांच्या मुलाखती, मान्यवर तज्ज्ञांबरोबर चर्चा, लेख, इत्यादींमधून या लोकांची वस्तुस्थिती, त्यांचे अनुभव, या विश्‍वाबद्दलची शास्त्रोक्त माहिती समाजातल्या इतर लोकांपर्यंत पोचू लागली. समाजातल्या सहानुभूतीचा ओघ काही अंशी वाढला.

आता दरवर्षी निरनिराळ्या शहरांत एलजीबीटी लोकांचे, त्यांच्याबद्दल सहानुभूती असणार्‍यांसह मेळावे भरतात, सार्वजनिक जागेत कार्यक्रम होतात, मिरवणुका निघतात. आई या नात्यानं मी अशा बर्‍याच गोष्टींत भाग घेतला आहे. भोवती जमलेल्या बघ्यांच्या चेहर्‍यावर नवल असतं, कुतूहल असतं; पण तिरस्कार मात्र मी आजकाल कधी पाहिलेला नाही. दगडफेक, अश्‍लील शेरे असलंही काही अनुभवलेलं नाही. तेव्हा एकूण वातावरण बर्‍याच अंशी निवळलंय. निदान मोठ्या शहरांत तरी होमोफोबिया कमी झालाय, यात शंका नाही; पण उत्साहाच्या भरात हे विसरून चालणार नाही, की गुन्हेगारीचा ठप्पा पुसला जाणं ही निव्वळ पहिली पायरी आहे. एलजीबीटींना त्यापुढेही खूप मजल मारायची आहे. नागरिक या नात्यानं लागू होणारे भारतीय संविधानातले सगळे हक्क मिळवायचे आहेत. नोकरी, आईवडलांची मालमत्ता, आर्थिक मदत अथवा सरकारी कर्ज इत्यादी बाबतींत समलैंगिकतेवरून भेदभाव (डिस्क्रिमिनेशन) होऊ नये, यासाठी जागरूक राहायचं आहे. समलिंगी जोडीदाराला साहचर्याचे हक्क मिळावेत, समलिंगी जोडप्याला 'कुटुंब' मानलं जावं, या जोडप्यांना मुलं दत्तक घेता यावीत, अशा अनेक गोष्टींत कायदेशीर तरतुदी करून घ्यायच्या आहेत. निव्वळ मोठ्या शहरांतच नाही, तर छोट्याछोट्या गावांतही समलैंगिकांना स्वीकारलं जावं, यासाठी झटायचं आहे. परंतु या सर्वांपेक्षा अधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपापल्या आईवडलांची, भावाबहिणींची, जवळच्या इतर कुटुंबीयांची मानसिकता पालटून, त्यांचा मनापासूनचा पाठिंबा मिळवायचा आहे.

आज समलैंगिकतेविषयीचं संशोधन खूप पुढे जात आहे. समलिंगी असणं म्हणजे पाप आहे, अनैसर्गिक आहे इत्यादी कल्पना चुकीच्या असून, त्या निव्वळ अज्ञानातून उद्भवल्या आहेत, असं मत तज्ज्ञांनी पूर्वीच व्यक्त केलं होतं (आणि माझ्या मुलीनं ते वीस वर्षांपूर्वी मला सांगितलंही होतं). त्याच्यापुढे जाऊन हल्ली वैद्यकीय संशोधनातून हेही सिद्ध झालं आहे, की 'सम अथवा विषम लैंगिकता जन्मतःच निश्‍चित होते.' जन्मतः निश्‍चित झालेली, नैसर्गिक समलैंगिकता ही 'बायोलॉजिकल फॅक्ट' असेल, तर 'आईवडलांना पसंत नाही, समाजाला पटत नाही' असल्या कारणांवरून ते बदलणं कसं शक्य आहे? अशा मुलांवर दडपण आणून, त्यांना साधूंच्या पायांवर घालून, अंगारे लावून, किंवा एखाद्या पैसेखाऊ डॉक्टरकरवी शॉक ट्रीटमेंट देवऊन त्यांची समलैंगिकता नाहीशी होईल, असं मानणंदेखील साफ चुकीचं आहे. खरी लैंगिकता लपवून, खोटं जीवन जगायला भाग पाडल्यास मुलं दुःखी होतात, तणावाखाली जगतात, कधी आत्महत्या करतात. अनेकदा तर आपल्या दबल्या लैंगिकतेला कसा ना कसा वाव देण्याच्या प्रयत्नांत रोगांची अथवा नीच लोकांची शिकार बनतात.

याउलट, आज उपलब्ध असलेल्या आधुनिक शास्त्रीय ज्ञानाचा/माहितीचा आधार घेऊन आईबापांनी जुन्या, चुकीच्या कल्पनांना तिलांजली दिली, तर त्यांना कौटुंबिक/सामाजिक विरोधाची काळजी करण्याचं कारण उरणार नाही. आपल्या समलैंगिक मुलांना तोडून, त्यांचं जीवन नष्ट करण्याऐवजी आईबाप त्यांचा मनापासून स्वीकार करू शकतील. आपल्या इतर मुलांसारखंच प्रेम व आधार त्यांना देऊ लागतील. अशा स्वीकृतीमुळे मुलंही आनंदानं जगतील, कर्तृत्ववान होऊ शकतील. समलैंगिकांना आईबापांचा पाठिंबा लाभल्यास, समाजाच्या मुख्य धारेत सामावलं जाणं त्यांच्यासाठी मुळीच अशक्य नाही, अशी माझी खात्री आहे.

***

समलैंगिक मुला-मुलींच्या पालकांना, किंवा समलिंगी मुलामुलींना काही शंका असतील, किंवा संवाद साधायचा असेल तर श्रीमती चित्रा पालेकर यांच्याशी parents@queer-ink.com या इ-मेल पत्त्यावर संपर्क साधता येईल. तुमचा पत्रव्यवहार, तुमची ओळख यांबाबतीत संपूर्ण गोपनीयता पाळली जाईल.

***
विषय: 
प्रकार: 

या विषयावर बाजूने आणि विरोधात प्रतिक्रिया इथे प्रकटणार हे ओघाने आलेच; पण म्हणून ज्यावेळी कायद्याच्या उल्लेखाचा प्रश्न येतो त्यावेळी किमान संयतपणे त्या घटनेकडे तसेच संबंधित कलमांकडे पाहणे नितांत गरजेचे आहे, असे मी मानतो

नीधप म्हणतात "...सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय चुकिचा वाटतो हे म्हणण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे..." हे आपण जरूर मानू पण म्हणून ते कलम ३७७ आपण निदान आतातरी फेकून देऊन समलैंगीकतेचा झेंडा उघडपणे फडकवू तरी शकत नाही....किमान इतके तरी सर्वोच्च न्यायालयाबाबत मानले जावे. चर्चा होणारच असेल तर समलैंगीकतेच्या अस्तित्वाचे महत्व वा बाजू पटवून देत असता नैसर्गिक मानल्या गेलेल्या हेटरोसेक्शुअल संबंधाइतकेच होमोसेक्शुअल संबंधही नैसर्गिक मानले जावेत इतपत म्हणणे ठीक; पण ते म्हणत असताना ज्या देशाचे कायदेही पाळणे गरजेचे आहेत तिथला कायदा जर होमोला मान्यता देत नसेल तर त्याविरुद्ध कोणत्या पातळीपर्यंत संबंधितांनी लढा द्यावा हा खरा प्रश्न. शिवाय मतपरिवर्तनाची चळवळ राबविताना ".....व्हिक्टोरियन काळातल्या संकुचित नीतिमत्तेतून या कलम ३७७चा उगम झाला. कायद्याच्या पाठिंब्यामुळे बुरसटलेल्या विचारांना पुष्टी मिळाली...." असली विधाने चित्राताई जेव्हा देतात त्यावेळी त्या फार मोठी चूक करतात. ९०% पेक्षा जास्त असणारी प्रजा सेक्ससंदर्भात ज्या पारंपारिक विचारांना मानते त्याच प्रजेला आपण बुरसटेलेल्या विचाराची असे म्हणतो असा स्पष्ट अर्थ या विधानातून ध्वनीत होतो.

बाकी 'मायबोली' ने काय प्रकाशित करावे वा काय करू नये हा संपादकीय मंडळाचा पूर्ण अधिकार आहे हे मी मान्य करतोच.

हे आपण जरूर मानू पण म्हणून ते कलम ३७७ आपण निदान आतातरी फेकून देऊन समलैंगीकतेचा झेंडा उघडपणे फडकवू तरी शकत नाही <<
म्हणजे काय?
एक कायदा चूक आहे हे जाहिरपणे म्हणण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. समलैंगिक व्यक्तिंना गुन्हेगार ठरवणारा कायदा बदललाच जायला हवा हे म्हणण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. आणि सगळे तेच करतायत.

पण ते म्हणत असताना ज्या देशाचे कायदेही पाळणे गरजेचे आहेत तिथला कायदा जर होमोला मान्यता देत नसेल तर त्याविरुद्ध कोणत्या पातळीपर्यंत संबंधितांनी लढा द्यावा हा खरा प्रश्न. <<<
कायद्याविरूद्ध लढा याची कुठलीही पातळी कशी ठरवता येईल. एखाद्या कायद्याविरूद्ध लढा जोवर कायदा बदलत नाही तोवर चालूच रहाणार.
कोणत्या पातळीपर्यंतला काहीही अर्थ नाही. लढा देणारे अभ्यासाने आणि मुद्देसूद लढा देतायत. आमच्या संस्कृतीत बसत नाही किंवा मला पटत नाही असल्या पोकळ मुद्द्यांचा बेस नाहीये त्या लढ्याला.

मग हा लेख तुमच्यासाठी नाही असे म्हणा आणि सोडून द्या. तो बाबा रामदेव इत्यादिकांसाठी आहे असे समजा.<<<

गंमतीशीर वळण लावणे हा युनिव्हर्सली वापरला गेलेला उपाय आहे.

ज्या गोष्टीशी आपला कधीही संबंध येण्याची शक्यता नाही अशा कोणत्याच गोष्टीवर आपण मत बनवत नाही आणि ते व्यक्त करत नाही. बरोबर?<<<

माझ्यातरी मते प्रचंड चुकीचे विधान!

>>>> उत्तरादाखल मी तिला पुन्हा मिठीत घेतलं. माझ्यापाशी शब्द नव्हते. आईच्या नात्यानं मी तिच्या सर्वांगीण वाढीची सदैव काळजी घेतली होती. प्रत्येक बाबतीत तिला प्रोत्साहन दिलं होतं, पण जेव्हा तिच्या किशोरवयात तिला समलैंगिकतेची, स्वतःच्या 'वेगळेपणा'ची जाणीव झाली आणि ती गोंधळून गेली, तेव्हा तिला माझ्या मायेची, आधाराची खरी गरज होती आणि नेमकी तेव्हाच, मुलीची हेटेरोसेक्शुऍलिटी गृहीत धरण्याची चूक केल्यामुळे मी कमी पडले होते! >>>>>

सगळ्या आईबापांनी लक्षात ठेवण्यासारखा आणि यातून धडा घेण्यासारखा विचार आहे.

लेख पुन्हा एकदा अतिशय भावला. धन्यवाद, चिनुक्स.

चर्चा होणारच असेल तर समलैंगीकतेच्या अस्तित्वाचे महत्व वा बाजू पटवून देत असता नैसर्गिक मानल्या गेलेल्या हेटरोसेक्शुअल संबंधाइतकेच होमोसेक्शुअल संबंधही नैसर्गिक मानले जावेत इतपत म्हणणे ठीक; पण ते म्हणत असताना ज्या देशाचे कायदेही पाळणे गरजेचे आहेत तिथला कायदा जर होमोला मान्यता देत नसेल तर त्याविरुद्ध कोणत्या पातळीपर्यंत संबंधितांनी लढा द्यावा हा खरा प्रश्न. <<< म्हणजे नक्की काय करावे? समलैंगिक संबंधांना कायदेशीर मान्यता मिळण्यासाठीच तर हा लढा चालू आहे ना?

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर कितीतरी समलैंगिकांनी माध्यमांसमोर हा निर्णय चुकीचा आहे हे सांगताना ते स्वतः समलैंगिक असल्याचे कबूल केले आहे. त्यावेळेला अथवा त्याहीनंतर त्यांना या देशाच्या कायद्याने कसलाही त्रास दिलेला नाही. त्रास कायद्यापेक्षाही समाजाच्या मानसिकतेचा जास्त आहे. जनजागृती त्या विरोधात होणे गरजेचे आहे आणि कायदा बदलणे ही त्याची निव्वळ एक सुरूवात असेल.

. ९०% पेक्षा जास्त असणारी प्रजा सेक्ससंदर्भात ज्या पारंपारिक विचारांना मानते त्याच प्रजेला आपण बुरसटेलेल्या विचाराची असे म्हणतो असा स्पष्ट अर्थ या विधानातून ध्वनीत होतो.>>> आहेच बुरसटलेल्या विचारांची. स्वतःहून समजून उमजून बदल करण्याची लवचिकता हा समाज केव्हाच गमावून बसलाय. म्हणून या समाजामधे सतीविरोधी कायदा आणावा लागला, अस्पृश्यता विरोधी कायदा आणावा लागला, विधवा पुनर्विवाह कायदा करावा लागला. असाच हादेखील एक बदल असेल अशी आशा ठेवण्यात काय चुकीचे आहे?

बेफिकीर, धन्यवाद, विरोधकांच्या बाजुने लिहिण्याबद्दल.
सविस्तर लिहायला वेळ नाही (आणि खरेतर पुन्हा तेचते लिहिण्याची फारशी इच्छा पण नाही)
तसेही आधी एकदा अशा प्रकारच्या धाग्यावर खुप वाद झालेले आहेतच.

>>निव्वळ काहीही भूमिका न घेता राहणे शक्य नाही का?
या एका वाक्यातच सगळे काही आले आहे खरे तर.

निसर्गात इतर प्राण्यांत चालतं म्हणून माणसांतही चालावं हे काय तर्कशास्त्र आहे?
निसर्गात इन्सेस्टही चालतो मग आपणही चालवून घ्यावा का?
उद्या 'वी लव अवर पॅरेंटस अँड विल मेक लव्ह विथ देम टू' अश्या घोषणा देत बापलेकीच्या नाहीतर मायलेकांच्या जोड्या रस्तोरस्ती मोर्चा काढताना दिसू लागल्या की तिथेपण नैसर्गिकतेचा बाजा वाजवाल का?

>>सतीविरोधी कायदा आणावा लागला, अस्पृश्यता विरोधी कायदा आणावा लागला, विधवा पुनर्विवाह कायदा करावा लागला.
त्या गोष्टी आणि यामधे महाभयानक मोठ्ठा फरक आहे. कृपया कशाचीही तुलना करू नका.
तुम्ही म्हणत आहात ते काही प्रथा बंद करण्यासाठी होते, आणि हे जे काही आहे ते नविन प्रथा चालू करण्यासाठी आहे.

समलैंगीक संबंध नैसर्गीक आहेत असे भिन्नलिंगियांना वाटणे ह्याला जे सांस्कृतीक व सामाजिक औदार्याचे मोजमाप मानले जात आहे ते चकीत करणारे आहे.

एलॅबोरेटिंग : माझ्या संपर्कात एखादा / दी समलिंगी व्यक्ती आली तर ती समलिंगी आहे हे समजल्यावर मी ते मान्य करेन व त्या व्यक्तीशी सामान्य व्यवहारच ठेवेन. कदाचित इतर लाखो लोक तसे करणार नाहीत, ते त्यांना वाळीत टाकतील, बहिष्कृत करतील वगैरे! त्यांच्याविरुद्ध हा लढा आहे हे ठीक!

पण ह्या लढ्याबाबतः

१. सौ पालेकरांची भूमिका निव्वळ त्यांच्या कन्येबाबतची माहिती मिळाल्यानंतरची नाही का?

२. ती भूमिका 'सेकंड' करण्याची येथे इतकी अहमअहमिका का असावी?

एका गटाचे म्हणणे आहे की ते नैसर्गीक व दुसर्‍याचे म्हणणे आहे की अनैसर्गीक! एक तिसरा गट का नसावा की 'ठीक आहे नैसर्गीक, पण आम्हाला आवडत नाही, पण ते तसे असू शकते हे आम्हाला मान्य आहे'! ??

हा काही एखादा रोज भेडसावणारा सामाजिक किंवा भयानक प्रश्न नव्हे ज्यावर पहिल्या दोनपैकीच एक भूमिका असायला हवी.

अनैसर्गिक म्हणणार्‍यांनी झालेल्या संशोधनाचा काही अभ्यास केलाय का?
जगभरात वेगवेगळ्या प्रकारे संशोधन करून समलैंगिकता नैसर्गिक आहे हे सिद्ध केले गेलेले आहे.
तो सगळा मूर्खपणा आहे हे म्हणण्यापूर्वी आपण तो मूर्खपणा सिद्ध करू शकणार आहोत का याचा विचार व्हावा.

१. अनेक देशात ते स्वीकारले गेले आहे

२. जनावरांमध्ये असते

३. अनेक उस्ताद उर्दू शायर, मार्टिना, विंची असे महान लोक समलिंगी होते.

४. समाजात सती, विधवांचा छळ अश्या प्रथा होत्या.

ह्या सगळ्यामुळे मानवातील समलैंगीकत्व नैसर्गीक मानले जावे हा फॉर्म्युला कसा काय अस्तित्वात आला? जितके ते नैसर्गीक मानणे नैसर्गीक तितकेच ते नैसर्गीक न मानणेही नैसर्गीक नाही का?

आता अशी किळस वाटण्याचा मला अधिकार नाही काय?<<< अनुमोदन, अशी किळस वाटणे हेही नैसर्गीकच आहे.

>>>>>> बेफी + १०००००००००००००००. जशी काही जणांना वांग्याची भाजी अत्यंत आवडते तर काही जणांना वांगी बघून किळस येते तितकी नैसर्गिक. कारण कोणत्या गोष्टीची कोणाला किळस येईल हे सांगता येत नाही.

मला वांगी आवडत नाहीत म्हणून वांग्याची किळस येणं हेच नैसर्गिक आहे हे ठरवणं आणि ते इतरांवर लादणं आणि त्याचं जनरलायझेशन करणं आणि त्याही पुढे जाऊन वांगी खाणं अनैसर्गिक आहे हे ठरवून टाकणं हे चुकीचं आणि झापड लावून वागणं.

मला वांगी आवडत नाहीत म्हणून वांग्याची किळस येणं नैसर्गिक आहे हे ठरवणं आणि इतरांवर लादणं आणि त्याचं जनरलायझेशन करणं आणि त्याही पुढे जाऊन वांगी खाणं अनैसर्गिक आहे हे ठरवून टाकणं हे चुकीचं आणि झापड लावून वागणं.

मला वांगी आवडत नाहीत म्हणून वांग्याची किळस येणं नैसर्गिक आहे हे ठरवणं

मला येथपर्यंतच थांबण्याची इच्छा आहे.

आतापर्यंत समलैंगिकांवर काही कारवाई झाली का?
नसेल झाली तर उगाच ही मंडळी "आमचं वागणं नैसर्गिकच आहे" हे इतरांना पटवुन देण्याच्या भानगडीत का पडताहेत. लोकं तर प्रत्येकालाच त्रास देतात. हा काय दारुडा, तो फुकाड्या, ती कुटाळ, ही काय म्हणे जिन्सवाली......... लोकांना कशाचा त्रास होईल, काही सांगता येत नाही.

स्वतः मोकळेपणानं राहावं. पालकांसोबत शक्य नसेल, तर वेगळं राहावं. उगाच तथाकथित संस्कॄतीरक्षकांविरुद्ध लढण्यात वेळ, शक्ती खर्च करु नये. मुर्खांसोबत {ज्यात मीही येतो} वाद घातल्याने त्याला आनंदच होतो, त्यामुळे गप बसावं अन मुकाट्यानं जगाव.

राहिला प्रश्न कायद्याच्या संमतीचा. कायदे मोडुन कित्येक गोष्टी करतोच ना... त्यात ही समजा.

ज्यांना समलैंगिकता नैसर्गिक वाटते, त्यांनी अश्या समलैंगिकांना मदत करावी, आम्हाला ती नैसर्गिक आहे, हे घसा फोडुनही सांगण्यात अर्थ नाही, कारण आम्ही बदलायच नाही हे ठरवलय. त्याला तुम्ही काहीच करु शकत नाही. जोपर्यंत आमच्या घरात या गोष्टीची झळ लागत नाही, तोपर्यंत आम्हाला तुमच्याविरोधात मुद्दाम लढण्यासाठी डिचवू नका.

धन्यवाद.

मामी, सिरियसली, तुम्ही गंभीरपणे काही म्हणताय की माझी टर उडवताय हे मला माहीत नाही, पण समहाऊ मी अजुनतरी मी आधी व्यक्त केलेल्या मताशी प्रामाणिक आहे. हेही आत्ताच लिहून ठेवतो की माझे मत बदलले (बदलण्यास सहाय्यभूत ठरतील इतपत दर्जाचे प्रतिसाद आले) तर तेही प्रामाणिकपणे लिहीनच.

=============

नीधप ह्यांनी लिहिलेला मुद्दा ह्या धाग्यावर येईल हे काल रात्रीच ध्यानात आले होते. खरे तर त्या मुद्याची वाट पाहात होतो. त्यावर माझ्या मनात काही शंका आहेत त्या विचारतो पुढील प्रतिसादात.

सुंदर लेख.

बर्‍याचशा प्रतिक्रियाही मुद्देसूद आणि आवडल्या.

सुप्रीम कोर्टाच्या निकालाविषयी- कलम ३७७ जे आहे, ते फक्त सुप्रीम कोर्टाने उलगडून दाखवलेलं आहे. ते कलम तसंच ड्राफ्ट केलं गेलेलं आहे, आणि जोवर त्यात बदल घडत नाहीत, तोवर त्या कलमाखाली असे संबंध अनैसर्गिक असतील- हे फक्त एक्स्प्लनेशन आहे. कलम बदलण्याचं काम सुप्रीम कोर्टाचं नाही. जे कलम आहे, त्यानुसार इन्टरप्रिटेशन करून निर्णय देण्याचं काम आहे कोर्टाचं. कलम बदलण्याचं काम सरकारकडे आहे. आणि सरकारला ते कलम बदलणं आवश्यक आहे असं सातत्यानं पटवून द्यावं लागणारच आहे.

<आपल्या मुलांच्या समलैंगिकतेचे समर्थन करणार्या पालकांत बहुतेक आपण यांना वाढविण्यात काही चूक झाली नाही ही मुले अशीच आहेत असे ठसविण्याचा प्रयत्न आहे असे वाटते.>

संगोपनात होणार्‍या कोणत्या चुका टाळल्याने मूल समलैंगिक होणार नाही हे सांगाल का? तसेच एखाद्या व्यक्तीची (निव्वळ परिस्थितिजन्य नसलेली) समलैंगिकता क्युअर करण्याचे कोणते उपाय आहेत हे सांगणार का?

बेफिकीर, दृष्टिकोण खरेच न्युट्रल असता तर लेख खटकायचे कारण नव्हते. तुम्ही विरोधकांच्या बाजूने लिहीत आहात असे प्रमाणपत्र तुम्हाला विरोधी बाजूकडून मिळाले आहे. म्हणजे तुमचा दृष्टिकोन न्युट्रल प्रतीत होत नसावा.

या लेखावर आलेल्या काही प्रतिक्रिया वाचल्या आणी या लेखाचे महत्व आणी नितांत आवश्यकता माझ्या लक्षात आली. हा लेख माबोवर दरवर्षी प्रसिद्ध व्हायला हवा. इतरत्रही.

आपला मुलगा समलैंगीक आहे, त्याला अमेरिकेत एक मित्रही आहे हे माहीत असूनही केवळ प्रतिष्टेसाठी त्याचा विवाह एका मुलीशी करून त्या मुलीचे आतोनात नुकसान करणारे उदाहरण प्रत्यक्ष पाहिलेले आहे. त्या पार्श्वभूमीवर चित्रा पालेकरांचा लढा खरोखर सलाम करण्याच्या योग्यतेचा आहे.

अशोकजी, या ९०% या आकड्याला काही आधार ? आणी जर ९०% जनतेने आंतरजातीय विवाह अमान्य आहेत असे सांगितले तर ते पुन्हा बेकायदेशीर करणार ?

>>आणि हे जे काही आहे ते नविन प्रथा चालू करण्यासाठी आहे.

अत्यंत कैच्याकै! हे कलम रद्द झाल्याने कोणत्याही नव्या प्रथा सुरु होणार नाहियेत. दरवर्षी किमान दहा टक्के लोक समलिंगी व्ह्यायला हवेत असा काही कोटा नाही येणार. घाबरू नका !

>>आपल्या मुलांच्या समलैंगिकतेचे समर्थन करणार्या पालकांत बहुतेक आपण यांना वाढविण्यात काही चूक झाली नाही ही मुले अशीच आहेत असे ठसविण्याचा प्रयत्न आहे असे वाटते

अत्यंत विनोदी, करूण आणी भयावह वाक्य! लहान मुलांना नीट वाढवले नाही तर ती समलैंगीक होतात हे लहान मुलांवर संस्कार केले नाहीत तर ती डावखुरी होतात असलेच बावळटपणाचे आहे.

कलम बदलुन फायदा होईल? लोकांना जे पटायचं तेच पटतं. कदाचित १०० वर्षांनी पटेलच... मग वाट बघा की.... याआधी कित्येक उदाहरणं दिलित, ते जगलेच ना, का त्यांना कायदा पाहिजे होता? उगाच सरकारच्या (जे हा कायदा करणार नाहीच, हे माहिती असुनही) मागे लागले आहात....

सुप्रीम कोर्टाच्या निकालाविषयी- कलम ३७७ जे आहे, ते फक्त सुप्रीम कोर्टाने उलगडून दाखवलेलं आहे. >>>>>>>>>>>>>>> ह्याचा दोन्ही बाजुने विपर्यास होतोय, तो टाळणे गरजेचे.

कुठल्याही विषयावरची चर्चा तो विषय किती 'महत्वाचा' आहे यावर अवलंबून असावी आणि
आपल्या मताच्या विरोधात असलेले मत जेथे असते ती चर्चा महत्वाची नसते, कारण
आपल्या मताच्या विरोधात असलेले मत 'काहीही' असते.

<आतापर्यंत समलैंगिकांवर काही कारवाई झाली का?> कारवाई करण्यासाठी कृत्य करताना पकडणे गरजेचे असते. ते शक्य आहे का? पण त्या कलमाचा आणि गुन्हेगारीचा धाक दाखवून छळण्याचे (शारीरिक , मानसिक, आर्थिक) प्रकार पोलिसांकडून आणि समाजकंटकांकडूनही होतच असतात.

समलैंगिकता हा कायद्याने गुन्हा आहे. दिल्ली उच्च न्यायालयाच्या निकालानंतर अनेकांनी आपली समलैंगिकता जाहीर केली होती. (मधला दोन वर्षांचा काळ दुर्दैवाच्या फेर्‍याचा का?) आता ते पुन्हा गुन्हेगारी कृत्य झाल्याने त्यांच्या एम्प्लॉयर्सनी त्यांना कामावरून काढून टाकायला हवे ना.

<जोपर्यंत आमच्या घरात या गोष्टीची झळ लागत नाही, तोपर्यंत आम्हाला तुमच्याविरोधात मुद्दाम लढण्यासाठी डिचवू नका.> समलैंगिकांना तुमच्यासारखेच जीवन जगण्याचा अधिकार अमान्य करू नका. लढा त्यासाठीच आहे. त्याची तुम्हाला झळ लागण्याचा प्रश्न कसा येतो? (झळ लागलीच तर घरातून आपसूकच लागेल. तेव्हा काय कराल? Wink

१. समलैंगीकता संशोधनाअंती नैसर्गीक आहे हे सिद्ध झाले आहे म्हणजे काय झाले आहे? (सामान्यांना सांगण्यासारख्या भाषेत सांगता येईल का कृपया)

२. पुरुषाला स्त्रीबाबत व स्त्रीला पुरुषाबाबत जे आकर्षण वाटते त्यात देहरचना (लैंगीक व इतर अवयव), रंग, स्पर्शातील फरक, गंध, व्यक्तिमत्वात असलेले फरक, सवयी, आवाज, हालचाली ह्या सर्वाचा समावेश होतो. आता समलैंगिकांना ह्याच सर्व गोष्टी समान लिंगाबाबत वाटतात का? (म्हणजे संशोधन काय म्हणते असे समजून घ्यायच्या प्रयत्नांत आहे).

३. मग जर तश्या वाटत असतील तर चुंबकातील आकर्षण जसे विरुद्ध पोल्समध्ये असते तो शास्त्रीय नियम येथे लागू होत नाही का? तसे असल्यास लैंगीकतेशिवाय आणखी कशाकशात तो लागू होत नाही?

४. समलिंगियाबद्दल आकर्षण वाटण्यामागे स्वतःत दुसर्‍यापेक्षा अधिक असलेले शारीरिक सामर्थ्य (बळजबरीचा आसूरी आनंद), दुसर्‍याचे आपल्यापेक्षा अधिक असलेले शारीरिक सामर्थ्य (बळजबरी करून घेण्याचा एक प्रकारचा आनंद), कोणालाच शंका येणार नाही म्हणून असलेली सोय, ह्यापैकी एकही किंवा काहीही नसतेच असे ठामपणे शास्त्र सांगते का?

५. समलैंगीक आकर्षण जबरदस्तीने निर्माण केले जाऊ शकते का?

६. विशिष्ट समुपदेशनाने समलिंगी व्यक्ती भिन्नलिंगीय होतात ह्यामागे कोणता शास्त्रीय आधार असतो?

७. 'एका संस्कृतीत' पूर्वी स्त्री उपलब्धच होत नसल्याने लहान मुलांना शारीरिक सुखासाठी शोषले जायचे व ती मुले पुढे मोठी होऊनही हेच (कदाचित स्वेच्छेनेही) करायची. हे नैसर्गीक की नैसर्गीक आहे असे अनैसर्गीकपणे वाटायला भाग पाडणे?

८. लैंगीक अवयव स्त्री व पुरुषांमध्ये भिन्न असतात व ते भिन्न असल्यामुळे दोघांना शरीरसुखातील खरे सुख मिळते. तसेच सुख समलिंगीय लोकांना मिळते असे शास्त्र म्हणते का? तसे असल्यास अवयवरचना समान असल्यावर तसे सुख कसे मिळते? (येथे मला हे अजिबात म्हणायचे नाही की फक्त या सुखासाठी संबंध येतात वगैरे, जरी ते लार्जली येतात).

अश्या आणखीन काही शंका आहेत, त्या नंतर विचारतो.

धन्यवाद!

बेफिकीर,
किळस वाटण्याचा निश्चितच अधिकार आहे. मात्र केवळ अशी किळस वाटते म्हणून ती (समाजाला कोणताही अपाय न पोहोचवणारी) गोष्ट समाजात नसावी, असं म्हणणं चूक आहे.

कलम ३७७ला विरोध हा समानतेच्या हव्यासापोटी आलेला आहे. कोणीएक आपल्या घरात काय करतो, यावर कायद्याचा अंकुश असू नये. कलम ३७७ हे फक्त समलैंगिकतेपुरतं मर्यादित नाही. भिन्नलिंगीयांमधील मुखमैथुन व गुदमैथुनही या कलमांतर्गत बेकायदेशीर आहे. भिन्नलिंगीयांमधील मुखमैथुनाचे पुरातन वाङ्मयात अनेक दाखले सापडतात. कलम ३७७ यालाही अनैसर्गिक ठरवतं.

पुढचा मुद्दा भूमिका घेण्याबाबतचा. ती कोणी, कुठल्या बाबतीत घ्यावी, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आदिवाशांवर होणार्‍या अत्याचारांविरुद्ध कोणी सुबोध कुलकर्णी भूमिका घेतो. बोटं झडलेल्या कुष्ठरुग्णांना मतदानाचा हक्क मिळावा म्हणून कोणी विकास आमटे उभा राहतो. या कुष्ठरुग्णांना औषधासाठी पैसे मिळावेत म्हणून कोण कुठली एक शीतल आमटे दोन वर्षं झगडते. अपंगांनी विकलेल्या वस्तूंवर करमाफी मिळावी म्हणून एखादी नसीमा हुरजूक वर्षानुवर्षं भांडत राहते. सुबोध, विकास, शीतल, नसीमा भूमिका न घेताही जगू शकतात. पण ते भूमिका घेतात. अशा भूमिका प्रत्येकानं घेतल्याच पाहिजेत का? अजिबात नाही. हे स्वतंत्र राष्ट्र आहे. प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. नका घेऊ तुम्ही भूमिका. फक्त इतरांनी भूमिका घेऊ नये, हे सांगू नका. जे भूमिका घेतात, त्यांना कदाचित आदिवासी, कुष्ठरुग्ण, अपंग, समलिंगी यांना समान अधिकार मिळावेत, असं वाटत असेल. अल्पसंख्य असले तरी ते या देशात जन्मले. देशाचे नागरिक आहेत ते. त्यांना समान अधिकार मिळावेत, अशी इच्छा असलेले काही लढत असतील, तर निदान त्याला विरोध होऊ नये.

आपली मुलगी समलिंगी आहे, हे कळल्यावर 'धक्का' बसला, असं लेखिकेनं कुठे लिहिलं आहे, हे मलातरी कळलं नाही. शिवाय सातत्यानं हाच मुद्दा का, असं तुम्ही विचारलं आहे. कुष्ठरुग्णांना मतदानाचा हक्क, स्त्रीभ्रूणहत्येविरुद्ध जनजागृती, दलितांवरील अत्याचारांना विरोध असे मुद्दे महत्त्वाचे वाटत असतील, तर त्यांना प्राधान्यक्रम मिळतं. एकदोन गझला लिहिल्या, दोनतीन कादंबर्‍याही झाल्या लिहून, आता लिहिणं थांबवा, असं एखाद्या साहित्यिकाला कोणी म्हटलं तर? Happy

अशोक.,
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध मत देण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. सुप्रीम कोर्टात रिव्ह्यू याचिका दाखल करताना निर्णयाविरुद्ध पत्र लिहिणार्‍यांमध्ये मीही एक आहे. त्यामुळे कायद्याची मला पूर्ण कल्पना आहे.

अतुल ठाकूर,
वर लिहिल्याप्रमाणे किळस वाटले यात गैर काहीच नाही. मात्र किळस वाटली म्हणून समान अधिकार नाकारणं, हे चूक आहे.
बाकी, एका कुष्ठरुग्णाची किळस वाटली आणि बाबा आमट्यांनी आनंदवन उभारलं. Happy

कलम बदलुन फायदा होईल? >> हो विजय देशमुख. कलम बदलणे खरंच गरजेचं आहे.
ही गोष्टच सोडा, कोणत्याही गोष्टीला कायदेशीर मान्यता मिळणं हे का गरजेचं असतं? -यावर एकदा विचार करा.

कायदेशीर असो वा नसो, अनेक गोष्टी आपण करतो वा नाही करत. मग कायदा मुळातच आवश्यक का असतो? गरजच काय कोणत्याही कायद्याची- अगदी ट्रॅफिक रूल्सचीही? याचे उत्तर मिळाले, की कलम मॉडिफाय करणे का गरजेचे आहे याचे उत्तरही मिळेल.

वांग्याच्या उदाहरणात मला वांगी आवडतात म्हणून
- मी वांग्याच्या झाडाशी लग्न करेन
- हिंदू अनडिवायडेड फॅमिली म्हणून मी आणि ते झाड एकच इन्कमटॅक्स फॉर्म भरू.
- माझ्यामागे माझी पेंशन तहहयात वांग्याच्या झाडाला मिळावी.
- मी आणि ते वांग्याचं झाड मिळून एक बटाट्याचं झाड / माणसाचं पिल्लू दत्तक घेऊ आणि नवा कायदा बनवून आमचा वारसा हक्क त्या वारसाला द्या

असे जोपर्यंत कोणी म्हणत नाही तोपर्यंत कुणाच्या वांगी आवडण्याशी आम्हाला काही म्हणणं नाही.

हा प्रतिसाद विनोदी नसून यात एकदा समलैंगिकता मान्य केली की पुढे आणखी कायकाय बदल कायद्यात करावे लागतील हे लिहिलेले आहे हे सूज्ञांच्या लक्षात येईलच.

निव्वळ काहीही भूमिका न घेता राहणे शक्य नाही का? >>> आपली समाजव्यवस्था भूमिका घेतेय. समलैंगिकता बेकायदेशीर आहे असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा लग्न, मुलं, प्रॉपर्टीत हक्क ह्या कुटुंबव्यवस्थेच्या मूलभूत गोष्टी आपण ( किंवा आपली न्यायव्यवस्था ) नाकारतो आहोत.

आपण कुठल्याही सांस्कृतिक आणि सामाजिक औदार्याची नव्हे तर माणुसकीची अपेक्षा करतो आहोत. दोन सज्ञान व्यक्तींना परस्परसंमतीने आपल्या मनाप्रमाणे कुटुंबव्यवस्था उभारण्याचे स्वातंत्र्य ! हे स्वातंत्र्य नाकारुन त्यांची गळचेपी करणे हे माणुसकीला धरुन आहे का ?

'ठीक आहे नैसर्गीक, पण आम्हाला आवडत नाही, पण ते तसे असू शकते हे आम्हाला मान्य आहे!?? >> पण सध्याच्या कायद्याला समलैंगिक संबंध अमान्य आहेत. आवडनिवड असणे वेगळे आणि आम्हाला आवडत नाही म्हणून त्यांनी चार भिंतींच्या आत काय ते करावे असे म्हणणे वेगळे.

< समलैंगीकता संशोधनाअंती नैसर्गीक आहे हे सिद्ध झाले आहे म्हणजे काय झाले आहे? > परिस्थितीचा (आईवडिलांनी मुलाला मुलगी म्हणून वाढवणे, विरुद्ध लिंगी व्यक्तीचा सहवास न मिळणे, बालपणात समलिंगी व्यक्तीच्या अत्याचारांना बळी पडणे, इ.) कोणताही प्रभाव नसताना अत्यंत 'नॉर्मल' वातावरणात वाढलेली व्यक्ती समलैंगिक असू शकते. तिला कोणत्याही प्रकारे हेट्रोसेक्स्युअल करता येत नाही. (जसे प्युअर हेट्रोसेक्स्युअल व्यक्तीला मारून मुटकून समलैंगिक करता येणार नाही).

हा अत्यंत बेसिक प्रश्न विचारताय आणि दर दोन-चार महिन्यांनी तोच मुद्दा का येतो असेही विचारताय. सगळी चर्चा झाली आहे असेही म्हणताय. काय अर्थ राहिला?

सातीजी तुम्ही केलेला हा युक्तीवाद अमेरिकेतही slippery slope या नावाने केला जातो. आज एका पुरुषाला दुसर्‍या पुरुषाशी लग्न करायला परवनगी दिली तर उद्या लोक कुत्र्या मांजराशीही लग्न करतील ई ई. तुमचेच वाक्य काही बदल करून लिहितो

मी विधवेशी लग्न करेन
- हिंदू अनडिवायडेड फॅमिली म्हणून मी आणि ती पुर्वीची विधवा एकच इन्कमटॅक्स फॉर्म भरू.
- माझ्यामागे माझी पेंशन तहहयात माझ्याशी लग्न केलेल्या विधवेला मिळावी.
- मी आणि ती विधवा मिळून एक परजातीय मूल दत्तक घेऊ आणि नवा कायदा बनवून आमचा वारसा हक्क त्या वारसाला द्या

असे जोपर्यंत कोणी म्हणत नाही तोपर्यंत कुणाच्या विधवा स्त्रीयांच्या सामाजिक कार्याशी आम्हाला काही म्हणणं नाही

Pages