राग दरबारी

Submitted by आतिवास on 9 January, 2014 - 01:05

आजकाल पुस्तकं वाचताना मला माझ्यात झालेला एक बदल जाणवतो.
पूर्वी 'कोणतं पुस्तक छान आहे, आवडलं आहे?' या प्रश्नाचं उत्तर खूप सोपं होतं.
जे पुस्तक वाचताना भूक, झोप, इतर व्यवधानं यांचा पूर्ण विसर पडतो; जे पुस्तक एकदा हातात घेतलं की शेवट होईपर्यंत हातातून सोडवत नाही; दुर्दैवाने ते बाजूला ठेवायची वेळ आलीच तर संधी मिळताक्षणी ते जिथं सोडलं होतं तिथून पुढे चालू केलं जातं - ते चांगलं पुस्तक!

पण आजकाल माझं मत बदललं आहे.
अनेक चांगली पुस्तकं वाचताना हा बदल जाणवतो.
'राग दरबारी' ही श्रीलाल शुक्ल यांची कादंबरी वाचताना हे पुन्हा एकदा प्रकर्षाने लक्षात आलं माझ्या.

जे पुस्तक (खरं तर कोणतीही कलाकृती) मला विचार करायला भाग पाडतं; जे मला अस्वस्थ करतं; जे माझ्या मनात प्रश्न निर्माण करतं; जे मी घेतलेले अनेक अनुभव माझ्यात पुन्हा एकदा जागवतं; जे मला एकहाती वाचायची चैन करू देत नाही आणि अक्राळविक्राळ रुप धारण करुन नाचतं समोर, जे वाचताना हे आजही किती लागू आहे असं वाटत राहतं - ते चांगलं पुस्तक असं आता माझं मत बनलं आहे. आणि 'राग दरबारी' माझ्या या सगळ्या निकषांना पुरुन उरलं. ३३५ पानांच पुस्तक वाचायला मला जवळजवळ एक महिना लागला यातच माझ्यासाठी या पुस्तकाची गुणवत्ता आहे.

पुस्तकाच्या नावावरून संगीताबद्दल पुस्तक असेल किंवा राजकीय सत्तेबद्दल पुस्तक असेल असा अंदाज होता - यातला दुसरा अंदाज बरोबर आहे हे पहिल्या पानातच लक्षात आलं माझ्या.

'शिवपालगंज' हे तुम्ही आम्ही पाहिलेलं कोणतही गाव असू शकतं -आजही आहे ते. 'जे इतरत्र नाही ते इथं आहे आणि जे इथं नाही ते कुठेच आढळणार नाही' या महाभारताच्या गौरवाची आठवण यावी असं गाव आहे हे! शहरापासून हे जवळ आहे आणि मुख्य म्हणजे रस्त्याच्या बाजूला आहे. त्यामुळे बाहेरच्या जगापासून अलिप्त नाही हे गाव पण ते आपलं आपल्यात रममाण पण आहे. या गावाच्या छोटयाशा परिघात घडणारी एक गोष्ट.

हे गाव कसं आहे? रात्रीच्या अंधारात गावात प्रवेश करताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला स्त्रिया शौचास बसल्या आहेत. कुत्री भुंकत आहेत. गावात काही दुकानं आहेत; सरकारी कार्यालयं आहेत; दारुच दुकान आहे. इथं रस्त्यावर येणारे घरांचे चौथरे आहेत. गावात एक कॉलेज आहे ज्याला वर्ग भरवण्यास पुरेशी इमारत नसल्याने ते जणू 'शांतीनिकेतन' आहे. या गावात एक 'गांधी चबुतरा' आहे - ज्याच्या आड गावाचे पुरुष मूत्रविसर्जन करतात आणि इथं निवांत कुत्री बसलेली असतात. गावापासून पाच मैल अंतरावर एक मंदिर आहे - जिथं जत्रा भरते. इथं कर गोळा करताना आपला वाटा घेणारे कर्मचारी आहेत आणि फुकट हादडणारे गावगुंड आहेत. दरवर्षी नेमाने वृक्षारोपण होणारे उजाड मैदान आहे. गावाची घाण पोटात घेणारा एक तलाव आहे. आपल्या गावची जी परिस्थिती आहे तीच दिल्लीची आहे याची इथल्या लोकांना अगदी स्पष्ट जाणीव आहे आणि त्यामुळे आपलं कोणी काही घडवू आणि बिघडवू शकणार नाही याची खात्रीही.

कादंबरीत पात्रं तशी पाहायला गेली तर मर्यादित आहेत; पण त्यांच विश्व मात्र असीम आहे. पुस्तकाची सुरुवात रंगनाथच्या नजरेतून होते. रोजच्याप्रमाणे रेल्वे दोन तास उशीरा येणार अशा अंदाजाने रंगनाथ रेल्वे स्थानकावर पोचतो तर गाडी आज फक्त दीड तास उशीर होऊन निघून गेलेली आहे. "शिकायती किताब के कथा-साहित्य मे अपना योगदान देकर" रंगनाथ बाहेर पडल्याचा उल्लेख पहिल्याच पानावर आहे. पुस्तकात उपहास ठासून भरलेला आहे याची खूण इथे मिळते, या उपहासात्मक टिपण्यांनी पुढे हसू येत राहतं, ते पटत राहतं, लेखकाची निरीक्षणशक्ती एकदम 'भारी' आहे अशी दाद आपण देत राहतो. पुस्तक इथंच थांबलं असतं तर बरं झालं असतं - असं नंतर वाटायला लागतं; कारण हा उपहास नंतर नंतर अंगावर यायला लागतो; विषण्ण करायला लागतो.

शिवपालगंजइतकाच प्रातिनिधिक आहे तो रंगनाथ. शहरातून खेडयात आपल्या मामाकडे काही महिने प्रकृती सुधारण्यासाठी तो चालला आहे. त्याने एम.ए. केलं आहे इतिहासात. तिथं आहेत वैद्यजी - रंगनाथचे मामा. वैद्यजी बरंच काही आहेत. ते वैद्य तर आहेतच शिवाय कॉलेजचे व्यवस्थापक आहेत; सहकारी संस्थेचे व्यवस्थापक आहेत. त्यांना अशा दोन दोन पदांवर राहायला आवडत नाही. पण काय करणार? दुसरं कोणी जबाबदारी पेलण्याइतकं लायक नाहीच या गावात! 'ब्रह्मचर्या'वर उपदेश करतात ते आणि वीर्यनाश टाळण्यासाठीच्या त्यांच्या गोळ्या कॉलेज विद्यार्थ्यांमध्येही चांगल्या खपतात. ते संस्कृतही वाचू शकतात.

रुप्पन हा वैद्यजींचा कॉलेजमध्ये शिकणारा मुलगा. बरीच वर्ष तो एकाच वर्गात आहे. तो एक 'युवा नेता' आहे. बाप नेता असल्याने त्याची नेतागिरी जन्मजात आहे. काहीही मनाविरुद्ध व्हायला लागलं की रुप्पन 'कॉलेजचे विद्यार्था रस्त्यावर उतरतील' अशी धमकी देतो. इथले दरोगाजी दोन पुढा-यांना खेळवत स्वतःचा फायदा करून घ्यायचा प्रयत्न करतात आणि फसतात. छंगामल कॉलेजातले शिक्षक वेगवेगळ्या व्यक्तिमत्त्वांचे आहेत - त्यांच्यापैकी कुणालाच विद्यार्थ्यांना शिकवण्यात रस नाही आणि त्यांच्याकडे ते कौशल्यही नाही. विद्यार्थीही उगाचच कॉलेजात येतात. प्राचार्यांच्या मते वैद्यजींच्या 'दरबारात' हजेरी लावणे हे सर्वात महत्त्वाचे काम, तेवढे ते इमानेइतबारे करत राहतात. इथे शिकवणा-यांत तट पडतात, कोर्टबाजी होते वगैरे ब-याच घडामोडी होत राहतात. अर्धाअधिक उघडाच असणारा आणि वैद्यजींच्या दरबारात भांग घोटण्याचे काम करणारा सनीचर एके दिवशी गावचा प्रधान बनवला जातो.

बद्री पैलवान आहे. हा वैद्यजींचा मोठा मुलगा. त्याचा शिष्य छोटू पैलवान आहे जो स्वतःच्या वडिलांना नियमित मारहाण करतो. मुलाने बापाला मारहाण करण्याची त्या घराण्यात परंपराच आहे. 'फ्लश' खेळण्याचे कौशल्य असणारा जोगनाथ आहे - त्याला कसे गुन्ह्यात अडकवले जाते आणि कसे सोडवले जाते याची रोचक कहाणी आहे. एक लंगड आहे इथं. लाच न देता तहसील कार्यालयातून एक कागद मिळवण्याची त्याची लढाई आहे. इथल्या सहकारी संस्थेत घोटाळा होतो. रामाधीन कलकत्त्यात अफूचा व्यापार करण्याचा अनुभव घेऊन गावी परतला आहे. तो आता वैद्यजींचा विरोधक आहे. त्यावरुन गावात राजकारण होत. कॉलेजच्या व्यवस्थापन समितीची बैठक व्हावी अशी रामाधीन मागणी करतो. गयादीन व्याजाने पैसे देतो आणि त्याचे एक कपडयांचे दुकान आहे. त्याच्याकडे कॉलेजातली शिक्षक मंडळी सतत सल्लामसलतीसाठी येतात - पण तो प्रत्यक्ष कुणा एकाची बाजू घ्यायचे नेहमीच नाकारतो. कॉलेजच्या व्यवस्थापन समितीचा हा उपाध्यक्ष. एका अर्थी वैद्यजींच्याच पक्षातला.

शिवपालगंजमध्ये घडणा-या अनेक घटनांचे सविस्तर चित्रण या कादंबरीत येतं. सहकारी संस्थेतला घोटाळा; कॉलेजच्या व्यवस्थापकीय समितीची बैठक आणि नव्या कार्यकारी मंडळाची निवडणूक; सनीचरचा निवडणूक प्रचार आणि निवडणूक 'जिंकण्याच्या' तीन यशस्वी पद्धती; शिक्षकांची कोर्टबाजी आणि त्यावरचे कोर्टाचे ताशेरे; दरोगाजींची बदली; बापाने मुलाविरुद्ध केलेली मारहाणीची तक्रार ऐकणारी न्याय-पंचायत; सरकारी योजनाच्या जाहिराती आणि विकासाची भाषणबाजी; हिंदी सिनेमाचा जनमानसावर असलेला प्रभाव ; कॉलेजचे विद्यार्थी आणि त्यांचे दिशाहीन जगणे; कोर्टात साक्ष देण्यात वाकबगार असलेले खेडूत; ताकदवान बापाला विरोध करणारी मुलं आणि त्यामुळे हतबल झालेला बाप; आंतरजातीय विवाहाचे राजकारण आणि त्यातून सुटका; शहरातल्या लोकांशी ग्रामीण सत्तावानांचे नाते; कुटुंब नियोजनाचा गावात प्रसार करणारा एक अविवाहित कर्मचारी; कोर्टातला खटला बाहेर मिटवू पाहणारे दरोगाजी; सहकारी संस्थेत घोटाळा झाला या आरोपाची जबाबदारी घेत पदाचा राजिनामा देणारे वैद्यजी आणि त्याच सभेत बद्रीला बिनविरोध त्याच पदावर बसवणारे गावकरी ....एकामागून एक घटना होत राहतात .. अगदी ख-या जगण्यात घडाव्यात तशा .. त्याच गतीने, त्याच पद्धतीने, त्याच फळांना जन्म देत ...

या सबंध कादंबरीत स्त्रियांचे उल्लेख ठराविक प्रसंगी आणि ठराविक संदर्भात येतात. एक आहे: गावचा राधेलाल शहरात जाऊन दुस-याची बायको पळवून घेऊन आला आहे - लग्नाची म्हणून. तिची छेड काढणे हा विद्यार्थ्यांचा आवडता उद्योग आहे. बकरी चारणारी एक तरूण मुलगी आहे. गयादीनची मुलगी बेला आहे, जिला रुप्पन प्रेमपत्र लिहितो, छोटा पैलवान भर कोर्टात तिचे नाव दुस-याशी जोडतो, बद्री तिच्याशी लग्न करु इच्छितो, आणि गयादीन तिचे लग्न जातीतल्या मुलाशी लावायची धडपड करतो. ही मुलगी बेला कधीच समोर येत नाही - तिला काय वाटते, तिच्या भावना काय आहेत याची काही किंमत नाही. ती फक्त एक साधन आहे इतरांच्या भावनांचे! तिला जणू काही अस्तित्वच नाही. देवीच्या जत्रेत नटूनथटून वावरणा-या स्त्रिया आहेत. जत्रेच्या परिसरात एका 'गाणा-या स्त्रीची दलाली करणारा' पुरुष आहे. हिंदी सिनेमातली गाणी माहिती असणारी ग्रामसेविका आहे - जी दुस-यांना प्रेमपत्र लिहायला मदत करते असा एक उल्लेख आहे. स्त्रिया इथं अदृश्य आहेत, त्यांची भूमिका आणि स्थान दुय्यम आहे - समाजात आणि पुरुषांच्या भावविश्वातही .... १९६८ मधल्या एका प्रातिनिधिक खेडयात काही वेगळ चित्र कसं दिसेल?

१९६८ मध्ये प्रकाशित झालेल्या या पुस्तकातला ग्रामीण भारत आजही बराचसा तसाच आहे, काहीही बदल झालेला नाही या जाणीवेने पुस्तक वाचता वाचता जीव गुदमरायला लागतो. या सगळ्यातून सुटका नाहीच या अपरिहार्यतेने घुसमट वाढते. साहित्याचा आणि जीवनाचा काय संबंध असतो हे धारदारपणे सांगणारी लेखकाची शैली चकित करून जाते आधी; आणि वेदना देते शेवटी शेवटी.

'शायनिंग इंडिया'च्या भूलाव्यातून ज्यांना बाहेर पडायचं आहे त्यांनी हे पुस्तकं अवश्य वाचावं .. कारण आजही आपल्या देशात असंख्य शिवपालगंज आहेत. आजही हे पुस्तकं तितकंच खरं आहे जितकं पाच दशकांपूर्वी होतं! बदल झाले आहेत - पण ते किती वरवरचे आहेत हे 'राग दरबारी' जाणवून देतं! हे पुस्तक आपण अजून किती प्रवास करायचा बाकी आहे याची जाणीव करून देत राहत.

हे पुस्तक मनोरंजन करत नाही, हे पुस्तक तुम्हाला आभासी स्वर्गात नेत नाही; हे पुस्तक तुमचा निवांतपणा घालवतं - तुमची झोप उडवतं....अशी अस्वस्थ करणारी पुस्तकं वाचावीत का? आहेत ते प्रश्न काय कमी आहेत म्हणून अशी गंभीर पुस्तक वाचावीत? .. असे प्रश्न पडू शकतात ...अशा प्रश्नांची उत्तरं आपण आपल्यालाच द्यायची असतात - खरीखुरी! हे पुस्तक अशा गंभीर आत्मचिंतनासाठीही अतिशय मोलाचं आहे.

राग दरबारी
श्रीलाल शुक्ल
राजकमल पेपरबैक्स, नयी दिल्ली
२०१२
किमत: रुपये २५०/-
(या पुस्तकाला १९६९ चा 'साहित्य अकादमी' पुरस्कार मिळाला आहे आणि बाजारात सध्या या पुस्तकाची चौदावी आवृत्ती आहे. कादंबरी हिंदी भाषेत आहे. )
**
अन्यत्र पूर्वप्रकाशित

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलयस. 'राग दरबारी' वाचून थोडा वेळ झालाय आत्ता. पण कादंबरीची शैली एकदम आवडली. त्यात उपहासात्मकतेने केलेले वर्णन आजपन कित्येक गावांना/शहरांना लागू होते. यातील प्रत्येक व्यक्तीरेखा आपल्या आसपास पाहायला मिळू शकते.

गावातील राजकारण, सामान्यांची जीवनाची फरफट, कॉलेजातील दंगा सारखे अनेक पैलू आहेत यात.
तू अगदी सुंदर लिहिलयस आणि या पुस्तक वाचनाच्या आठवणीला उजाळा दिलायस. Happy

मस्त लिहिले आहे!
प्रत्येक वाचकाला त्याच्या वकूबाप्रमाणे वेगळा अर्थ जाणवणे हे कोणत्याही महान कलेचे लक्षण मानायला हरकत नाही, राग दरबारी देखील प्रत्येकाला काही वेगळेच देऊन जाते.

हे पुस्तक मस्ट हॅव लिस्ट मधे हवंच..
कित्येक वर्षांपासून अनगिनत पारायणं करत आहे.. पण अजून अवीट चव आहे.. तशी च्या तशी!!कोरी च्या कोरी...

Happy