असा रंग तो जीवनाला चढू द्या... [बदलून]

Submitted by स्वाकु on 30 October, 2013 - 06:05

बदलून

असा रंग तो जीवनाला चढू द्या ,
तुम्ही आज बेरंग सारे सरू द्या ||

कसे होत नाही नवे बीज मोठे ,
जुना गंध मातीस आता सुटू द्या ||

कुठूनी मनी घोर झाली निराशा ,
नव्याने पुन्हा आज हासू फुलू द्या ||

कधी भावना अंतरी रोखल्याही,
पुढे वाट ती आसवांना मिळू द्या ||

जरी होत होते उदासीन गाणे ,
नवी चाल देऊनिया ते खुलू द्या ||

---------------------------------------------------------------------------------------------------------

असा रंग तो जीवनाला चढू द्या ,
तुम्ही आज बेरंग सारे सरू द्या ||

कसे होत नाही नवे बीज मोठे ,
जुना गंध मातीस आता सुटू द्या ||

कुठूनी मनी घोर झाली निराशा ,
नव्याने पुन्हा आज हास्य फुलू द्या ||

कधी भावना अंतरी रोखल्याही,
अश्रूंना पुढे वाट त्यांची मिळू द्या ||

जरी होत होते उदासीन गाणे ,
तुम्ही चाल देऊन गाणे खुलू द्या ||

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वृत्तात चूक नसावी
शेरात प्रत्येक शब्दाचे प्रयोजन नेमके हवे शब्दांच्या नेटक्या मांडणीलाही खूप महत्त्व आहे सर्वात मेन म्हणजे खयाल /विचार ...हा मुद्दा सांगायला मला जमेल न जमेल पण इतके सांगू शकतो की त्यात किमान एक सुसुत्रता असावी लागते ...
असो
शुभेच्छा

नमस्कार वैभवजी,

तुमचा अभिप्राय वाचल्यानंतर जेव्हा हे पद्य पुन्हा वाचले तेव्हा काय कमी पडले ते समजले...

अभ्यास चालू आहे.. हळू हळू जमेल अशी अपेक्षा आहे..

स्वानंदजी,

नावाजलेल्या गझलकारांचेही अनेक शेर अगदी सपक, अळणी वाटतात. सपक, अळणी लिहिणारे बरेच नावाजलेलेही आहेत ! त्यामुळे शेर कमजोर झाल्यास त्यात अजिबात कमीपणा वाटू नये. तुम्ही प्रयत्न करत आहात, तुम्हाला ह्याची जाणीव आहे की कुठे तरी, काही तरी कमी पडतंय, हेच महत्वाचं आहे. तुमची वृत्तावरील पकड चांगली आहे, हा तुमच्या लिखणातला सर्वात महत्वाचा 'प्लस पॉईण्ट' आहे. खयालांची समृद्धी प्रयत्नाने येणार नाही मात्र. ती चिंतनाने येईल. (असे आमचे एक आदरणीय प्रोफेसर म्हणायचे. त्यांचं इतकंच म्हणणं मला पटायचं!)
माझा अनुभव असा आहे की, विचारांना जितकं वास्तवावादी बनवाल, तितका शेर जास्त भिडतो.
प्रयत्न सुरू असू द्या. विचार, चिंतन सुरु असू द्या. लौकरच तुम्ही अशी गझल लिहाल की प्रत्येक जण मनापासून दाद देईल !!

धन्यवाद व शुभेच्छा !

नमस्कार रसप,

तुमचा अभिप्राय खूप प्रेरणादायी आहे. तुम्ही व वैभवजींनी दिलेल्या शुभेच्छांसाठी मनापासून धन्यवाद!!

कसे होत नाही नवे बीज मोठे ,
जुना गंध मातीस आता सुटू द्या || >>>> ही द्वीपदी सर्वात विशेष वाटली.

बाकीचे मुद्दे जाणकारांनी सांगितले आहेतच.

<<कधी भावना अंतरी रोखल्याही,
अश्रूंना पुढे वाट त्यांची मिळू द्या ||

जरी होत होते उदासीन गाणे ,
तुम्ही चाल देऊन गाणे खुलू द्या ||>>

या द्वीपदी खालीलप्रमाणे रचल्या तर कशा वाटतील?

कधी भावना अंतरी रोखल्याही,
पुढे वाट ती आसवांना मिळू द्या ||

जरी होत होते उदासीन गाणे ,
नवी चाल देऊनिया ते खुलू द्या ||

सहसा मी दुसर्‍यांनी लिहिलेल्या ओळी सुधारण्याच्या फंदात पडत नाही. त्याचे कारण असे की ज्याच्या चुका त्यानेच सुधारल्या तर ते जास्त श्रेयस्कर असते; पण या गजलच्या बाबतीत राहवले नाही.

प्रयत्न चांगला आहे .
नव्याने पुन्हा आज हास्य फुलू द्या ||<<या ओळीत 'हास्य' शब्दामुळे वृत्त बिघडते आहे .
नव्याने पुन्हा आज हास्या फुलू द्या ...असे काही करून बघा .

शुभेच्छा !

खूप खूप आभार.

अजून तितकी सफाई, शब्दांची निवड मला जमत नाहीत.

प्रयत्न चालूच आहेत पण तुम्हा सगळ्यांचा प्रतिसाद वाचून मला खूप आनंद आणि प्रोत्साहन मिळत आहे.....