फटाकेमुक्त दिवाळी

Submitted by प्रकाश घाटपांडे on 26 October, 2013 - 08:12

दिवाळी हा खरा तर दिपोत्सव. त्यात हे फटाके कुठून घुसले काय समजत नाही.पुर्वी दुष्ट शक्तींना जवळपास फिरकू न देण्यासाठी ढोला सारखी वाद्ये वाजवली जायची.कदाचित दिवाळी सारख्या मंगल सणामधे दुष्ट शक्ती चा वावर नको म्हणुन फटाके वाजवण्याची प्रथा आली असावी.

फटाकेनिर्मितीत वापरले जाणा-या रसायनांमुळे अनेक प्रकारचे आजार संभवतात. फटाक्यांमुळे हवा आणि वातावरण दूषित होते.त्यामुळे श्वसानाचे आजार वाढतात. ध्वनीप्रदूषणाची पातळीही वाढते. मोठ्या आवाजाच्या फटाक्यांमुळे श्रवण क्षमता कमी होते.फटाके फोडल्यामुळे कार्बन मोनॉक्साईड सारखे विषारी वायू वातावरणात पसरतात. ओझोनचा थर पातळ होतो.एकदा मराठी विज्ञान परिषदेचा फटाक्यामागील विज्ञान या कार्यक्रमात फटाक्यात वापरल्या गेलेल्या रसायनांबदद्ल स्लाईड शो कार्यक्रम दाखवला होता.
कॉपर मुळे श्वसननलिकेत त्रास कॅडमियम मुळे किडनीला धोका आणि अ‍ॅनेमिया.शिशाचा मज्जासंस्थेवर परिणाम अशा अनेक गोष्टी सांगितल्या होत्या.तपशीलात थोडाफार फरक असू शकतो. अशा प्रदुषण करणार्‍या फटाक्यांपासून मुक्त राहून दिवाळी साजरी करता येणार नाही का? नक्कीच येईल. फटाक्या शिवाय दिवाळी ही कल्पनाच काहींना करवत नाही. कारण दिवाळी आणी फटाके यांची संलग्नता मेंदुमधे ठामपणे कोरली गेली आहे.पिढ्यान पिढ्या ती संक्रमित होत गेली आहे.कालसुसंगत नसलेल्या अनेक प्रथा परंपरा आज पाळल्या जातात.खर तर कालबाह्य रुढी परंपरा या एक प्रकारच्या अंधश्रद्धाच आहेत.मनाला वाटणार्‍या असुरक्षिततेमुळे ते मोडण्याचे धाडस आज बर्‍याच लोकांना होत नाही.अंधश्रद्धा निर्मुलनाची चळवळ ही एक व्यापक समाज परिवर्तनाची चळवळ आहे.त्यामुळे अंनिस फटाकेमुक्त दिवाळीचे अभियान नेहमी राबवते. विद्यार्थ्यांमधे ही पर्यावरण जागृतीचे प्रमाण वाढू लागल्यामुळे त्यांना फटाके मुक्त दिवाळीचे महत्व पटू लागले आहे.काही सुसंस्कृत पालक ही आपल्या मुलांना फटाक्यांचे दुष्परिणाम पटवून त्यापासून परावृत्त करु लागले आहेत. डॊ नरेंद्र दाभोलकरांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी काही युवकांनी व विद्यार्थ्यांनी स्वत:हून फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याचे ठरवले आहे.पाहू या काय होते ते!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फटाकेमुक्त दिवाळी पाहीजे हे मान्यच आहे. हल्ली शाळेतही हे सांगतात (प्रदूषण, कारखान्यात काम करून होणारा बालमजूरांना त्रास इत्यादी) आणि त्या वयात टीचरचा शब्द प्रमाण असतो त्यामुळे मुलेही ते ऐकतात.

पण कधीतेरी मोह होतो आणि लेक भूईनळे किंवा भूईचक्र मागते. मागताना थोडी अपराधी असते. आम्ही मात्र तिला खूशीने ते फटाके आणून देतो. तीची अपराधी भावना कमी करण्याचा प्रयत्न करतो कारण ही खात्री आहे की ती ह्यापेक्षा जास्त फटाके वाजवणार नाही. Happy

विचार पटत नाही................

दिवाळीसारख्या सणाला नाही वाजवायचे मग काय कोणाच्या श्राध्दाला वाजवायचे काय ?

फटाके वाजविण्याची मजा तुम्हाला काय कळणार -तुम्ही आपल दिवाळी फराळ खात बसा ..

मुलांना फटाक्याचे आकर्षण असतेच उगाच प्रदूषणाच्या नावाखाली त्यांच्या इच्छांचा बळी देऊ नका
प्रदूषणाचे इतके वाईट वाटत असेल तर दररोज लाखो गाड्या रस्त्यावरुन धावताना जो धूर सोडतात आणि आवज करतात त्याकडे बघा .

फटाक्यांचे प्रमाण नियंत्रित असावे याबद्दल वाद नाही पण फटाकेमुक्त दिवाळी म्हणजे
१) बिर्याणीविना भात
२) सायविना दूध
३) आंघोळीविना धनत्रयोदशी
४) धाग्याविना मायबोली ............................
... चू.भू. नेमेची करावी

मला मोठेपणी ऐकलेली 'खुलभर पाण्याची' कहाणी आठवली. देवाचा गाभारा दुधाने भरून वाहील असा संकल्प लोकशाही राजाने केला व अनासक्तिने सर्व नागरिकांना स्वतःला थेंबही न घेता सगळे दूध देवळात आणुन घालायचे आवाहन केले.
कोणी विचार करु लागला कि इतर लोक दुध टाकणार आहेत च आपली एखादा तांब्या पाण्याने काय होणार आहे? चला आपण पाणीच टाकू
कोणी विचार करु लागला कि इतर लोक साले चोर आहेत पाणी टाकतील मग आपण दुध टाकले तरी त्याचा काय उपयोग? चला आपणही पाणीच टाकू.
अशा रितिने सर्व गाभारा पाण्याने ओसंडून वाहू लागला.
तसे इथे माझ्या एकट्याच्या प्रदूषणाने काय होणार आहे इथे कितीतरी प्रदूषण करणारे अन्य घटक आहेत.माझ्या एकट्याच्या फटाके न वाजवण्याने वा कमी वाजवण्याने काय होणार आहे?

आम्ही पण गेल्या काही वर्षापासून फटाके फोडणं बंद केलय. हवा/ध्वनी प्रदूषण हे कारण आहेच.

प्रघा - खुलभर दुधाच्या कहाणीचे उदाहरण एकदम चपखल. पण..... त्याबरहुकुम सगळ्यांनीच पाणी न मिसळण्याची अपेक्षा म्हणजे अतीव आदर्श. अनासक्तीची सक्ती नाही करता येत.
म्हातारीच्या दुधाने गाभारा कधी भरला, तर तिने घरच्या लेकराबाळांना संतुष्ट करून उरलेले दुध आणले तेव्हा....

आमच्याकडे मी दहावीत गेल्यानंतर दिवाळीत फटाके ऊडवणे बंद केले होते.
आता माझी मुले लहान असल्याकारणाने गेली ३-४ वर्षे थोडे फटाके (टिकल्या, फूलबाज्या, लवंगी, ई.) आणले जातातच. मला त्यात वावगे वाटत नाही. मुले थोडी मोठी झाल्यावर समजावून सांगून मगच बंद होईल हे प्रकरण.

दिवाळी हा खरा तर दिपोत्सव. त्यात हे फटाके कुठून घुसले काय समजत नाही. +१
फटाके उडवणे पर्यावरणास हानीकारक आहे हे मान्य, पण ते बंद करा असे सांगण्यासाठी अंनिस यात कुठून घुसली काय समजत नाही.

माणसे अंधश्रध्देने फटाके उडवतात / फटाके उडवणे ही अंधश्रध्दा आहे? जरा ओढून ताणून वाटते.

काही वर्षांनी म्हणाल दिवे लावण्यात इतके इतके तेल वाया जाते. ते पण बंद करा. दिवेमुक्त दिवाळी करा. Proud

दिवाळीला दिवे लावणे, उटणे लावणे हे कुठेतरी धर्म-शास्त्रात सांगितले आहे, पण फटाके लावण्याचा कुठेही उल्लेख नाही.

मी पाचवीत होतो तेव्हा बाबांनी सांगितले की आपण फटाके नको आणूया. मी तयार झालो. पण संध्याकाळी सगळे मित्र फटाके वाजवत होते आणि मी मात्र त्यांच्याकडे बघत हिरमुसून उभा होतो. तेव्हा पासून पुढे कधीच आमच्या कडे फटाके आणले नाहीत. नववी/दहावी नंतर मला फारसा फरक पडेनासा झाला. पण सुरुवातीची ४-५ वर्ष मात्र खूप घालमेल व्हायची. मी आणि माझ्यासारख्या शेकडो जणांनी २५ पेक्षा जास्त वर्ष फटाके न वाजवूनही काहीच फरक पडलेला नाहीये. आता माझी मुलं साधारण त्याच वयाची आहेत. मला त्यांचे ते हिरमुसले पण नकोय. मी त्यांच्यासाठी थोडेफार तरी फटाके त्यांच्या आवडीनुसार घेतो. अजून थोडे मोठे झाल्यावर त्यांचे ते ठरवतील काय करायचं ते.

मला वाटते इथे लहान मुलांनी थोड्या प्रमाणात फटाके उडवण्याला कोणाची फारशी हरकत नाहीये. पण वाचकांच्या पत्रव्यवहारात उल्लेख केल्याप्रमाणे आणि अरुंधती यांनी सांगितल्या प्रमाणे प्रचंड प्रमाणावर पैशांचा धूर ही मोठी माणसेच करत असतात. आणि यात फटाक्यांचा आनंद घेण्यापेक्षा आम्ही इतक्या हजारांचे फटाके उडवतो हा माज जास्त आहे.
जोपर्यंत त्यांच्या मानसिकतेत बदल होत नाही तोपर्यंत तुम्ही आम्ही फटाके बंद करून काहीही फरक पडणार नाही.
टग्याशी सहमत...मी देखील मोठ्या बहिणींचे ऐकून शाळेत असतानाच फटाके वाजवण्याचे सोडले. त्यावेळी वाईट वाटायचे आता काहीच वाटत नाही. पण जोपर्यंत माझ्या मुलाला स्वतहून वाटत नाही तोपर्यंत त्याला थोडक्या प्रमाणात कमी आवाजाचे, कमी धूराचे फटाके आणण्याची माझी तयारी आहे. मला खात्री आहे नंतर तो स्वतहूनच बंद करेल...पण आत्ताच त्याला प्रदुषणाची भिती घालून त्याचा आनंद हिरावून घ्यायचा नाहीये.

दिवाळी म्हणजे जरा चैन करणे असा अर्थ असला, तरी फटाके हा आयटम मला तरी पचनी पडत नाही.

५-१० मिनिटात हजार दोन हजार रुपयांचा नुसताच जाळून धूर करण्याने काय मिळते? त्या ऐवजी मस्त खावे प्यावे, कुठे फिरून यावे. कुणा गरीबाला खाऊ घालावे. जुने का होईना थोडे धड कपडे दान करावे. यामुळे त्याच्या चेहर्‍यावर फुललेल्या आनंदाची रोषणाई पहावी, हे मला जास्त पटते.

आता थोडा वेगळा अँगल.

लहान मुले आजकाल स्वतःहून फटाके नको म्हणतात. ही चांगली गोष्ट आहे.

चांगली यासाठी, की व्यवस्थीत सुपरव्हिजन नसेल, तर लहान मुलांना हमखास ईजा होते. बहुतेकदा नुसत्याच चटक्यांवर निभावते. पण दर दिवाळीत डोळे, कानाचे पडदे फाटलेले, गंभीर भाजलेले किमान ५-७ तरी रुग्ण माझ्यासारख्यांकडे येतात.

हातात धरून भुईनळे उडवणे, मोठे फटाके पेटवून फेकणे असल्या शूरवीर प्रकारांनी हे अपघात होतात.

फटाक्यांच्या त्या मोठ्या लडी लावतात, हजार दोन हजार बारी इ. त्या सगळ्यात जास्त धोकादायक. प्रत्येक फटाका ही एक बंदूकीची गोळी असते. कागदाची पुंगळी, आत दारू, अन शिशाच्या गोळीऐवजी बुडाशी मातीचा गोळा असतो. अगदी लवंगी फटाक्यातही. हा मातीचा गोळा डोळ्यासारख्या नाजुक अवयवांना २५-३० फुटांवरूनही मोठी इजा करू शकतो.

मुलांना आवडते असे आपण म्हणतो, पण माझा अनुभव असा आहे, की आपणच मुलांना आग्रह करून फटाके उडवायची सवय लावतो. लहान मूल फटाक्याला, आवाजाला अन आगीला घाबरत असते.

*

अर्थात लक्ष्य२०१४ उर्फ (विनंतीवरून येथील नांव काढून टाकले आहे)सारखे काही 'श्रीमंत' व 'धार्मिक' लोक जगात आहेतच, जे अशा रीतीने पैशाचा धूर करणे अ‍ॅफोर्ड करू शकत अस्तीलही. कारण तेच एकटे विरोध करताना दिसताहेत या धाग्यावर. Wink शेवटी जिसका उसका चॉईस.

तरीही (विनंतीवरून येथील नांव काढून टाकले आहे)साहेब, मोठा आवाज करणारे फटाके अट्टाहासाने उडविताना, प्लीज जवळपास खूप लहान मुले, वा आजारी वृद्ध, वा इस्पितळे नाहीत, असे पाहून तुमचा सण साजरा करा, अशी विनंती करतो.

धन्यवाद!

इब्लिस यांचा प्रतिसाद आवडला. तो केवळ इब्लिस यांनी दिला आहे म्हणुन त्याला नाक मुरडण्यात अर्थ नाही. Happy

फटाक्यांचा आवाज, प्रदूषण, पैशांचा चुराडा वगैरे गोष्टींखेरीज प्रचंड बेपर्वाईने, बेजबाबदारपणे फटाके उडवणारे सानथोर लोक हे तर गल्लोगल्ली दिसतात. बाल्कनीतून पेटते फटाके खाली सोडणे, जिन्यात फटाके फोडणे, फटाका पेटल्यावर तो हवेत उडविणे, लिफ्टजवळ किंवा वीजेच्या तारांजवळ, केबल्सच्या जाळ्याजवळ फटाके फोडणे - ह्यात कसला शूरवीरपणा वाटतो कोणास ठाऊक! रॉकेट्स, बाण उडवतानाही निष्काळजीपणे उडवतात. दर दिवाळीत आमच्या बाल्कनीत कोणतीही ज्वालाग्राही वस्तू नाही ना हे पाहावेच लागते. कारण आजूबाजूच्या लोकांनी उडवलेल्या फटाक्यांच्या ठिणग्या आमच्या बाल्कनीत येऊन पडतातच पडतात! क्वचित प्रसंगी बाल्कनीतल्या झाडांना त्याची किंमत चुकती करावी लागते. शेजारी पाजारी हॉस्पिटल्स, क्लिनिक्स असली तरी फटाके फोडून परिसर दणाणून सोडण्यात कोणीही मागे नसतात.

लक्ष्य२०१४ उर्फ मंदार जोशींसारखे काही 'श्रीमंत' व 'धार्मिक' लोक जगात आहेतच,

अच्छा हा असा धागा आहे होय....च्यामारी...:) Happy Happy

आशूचँप, खरं तर हा धागा तसा नाहिये.

पण काये ना? पणत्यांतलं पामोलिन तेल चुलीवरच्या नाचणी/वरीत पडलं, तर दोन कुपोषितांचं भलं होईल इतकी अक्कल थोडं फार शिकल्यावर माझ्यासारख्या अर्धशिक्षितांना येते.

त्यापेक्षा जास्त हुशारी 'काही वर्षांनी म्हणाल दिवे लावण्यात इतके इतके तेल वाया जाते. ते पण बंद करा. दिवेमुक्त दिवाळी करा.' असे म्हणणार्‍या हुशार लोकांपाशी असते.

इथे येऊन 'मियाँ' म्हणुन उत्तरे लिहिणे ही त्यांची फित्रत असते.

धागे नॉर्मल असतात हो. हे असे^^ प्रतिसाद आले, की थोडं प्रबोधन करावं लागतं.

रच्याकने:
पमोलिन तेल, हे जगातील ई जीवनसत्वाचा सर्वोत्तम स्रोत आहे. टोकोट्राएनॉल्स नामक जे ४ घटक आहेत, ते रेशनवर मिळणार्‍या या तेलात मॅक्झिमम प्रमाणात आहेत, व हे सगळे घटक हार्ट डिसिजच्या 'प्लाक' फॉर्मेशनलाच विरोध करणारे आहेत, असं नवं ज्ञान आहे. तेव्हा, चुकून पामोलिन तेल (पाम ऑईल) मिळालंच, तर ते ऑलिव्ह ऑइल पेक्षा भारी आहे, हे लक्षात ठेवा, अन पणतीत साजुक तूप जाळा (१००% सॅचुरेटेड फॅट) पण पाम ऑईल प्या. Wink

फटाके न उडवणे म्हणजे दाभोळकरांना श्रध्दांजली आणि समर्थन (आणि पर्यायाने उडवले म्हणजे त्यांना विरोध) असे समजण्यात येत असेल तर काहीच्या काहीच आहे हे (दोन्ही बाजूने)

हर्पेन, फटाके फोडण्याच्या दुष्परिणामांबद्दल म. अं.नि.स. काम करते आहे.

पर्यावरणस्नेही दीपावली : आजच्या लोकसत्ता - मुंबई वृत्तान्तातील लेख

मुलांना आवडते असे आपण म्हणतो, पण माझा अनुभव असा आहे, की आपणच मुलांना आग्रह करून फटाके उडवायची सवय लावतो. लहान मूल फटाक्याला, आवाजाला अन आगीला घाबरत असते. >>>>>>> १०० टक्के ख्ररं आहे!! मुल घाबरत असेल तर जबरदस्तीने लाव लाव घाबरु नकोस अस्ं सांगून त्यांना प्रोत्साहन देत असतात मोठी माणसे!!

५-१० मिनिटात हजार दोन हजार रुपयांचा नुसताच जाळून धूर करण्याने काय मिळते? ??????

जगातला बराचसा आनंद ५-१० मिनीटातच सामावलेला असतो...... Happy

भरत, फटाके फोडणे पर्यावरणास घातक आहे हे मी जाणतो, आणि त्या करता अंनिस काम करत आहे हे ही, पण मी माझ्या मुलांकरता काही वर्षे, थोडेसे फटाके आणले म्हणजे मी दाभोळकरांना मानत नाही असाही अर्थ ध्वनित होत आहे ते मला योग्य वाटत नाही.

वर इब्लिस यांनी म्हटलेले, "मुलांना आवडते असे आपण म्हणतो, पण माझा अनुभव असा आहे, की आपणच मुलांना आग्रह करून फटाके उडवायची सवय लावतो. लहान मूल फटाक्याला, आवाजाला अन आगीला घाबरत असते" हे प्रथमदर्शनी पटण्यासारखे आहे पण मुले जरा मोठी झाली की आजूबाजूच्या मुलांकडे बघून किंवा तू घाबरतोस काय मी दाखवतो तुला कसे उडवायचे अशा शिकवण्यांमुळे तयार होतातच.

मुलांना समजावून, पटवून फटाके न आणलेली कोणी पालक मंडळी असतील तर कृपया त्याच्या रेसिप्या इथे मांडा, त्यांचे अनुभव मार्गदर्शक ठरू शकतील. विशेषतः इतर (फटाके उडवणार्या ) मुलांना कसे सामोरे जावे, ई.

>>पण मी माझ्या मुलांकरता काही वर्षे, थोडेसे फटाके आणले म्हणजे मी दाभोळकरांना मानत नाही असाही अर्थ ध्वनित होत आहे ते मला योग्य वाटत नाही. <<
असा अर्थ कुठे ध्वनित होतो? डॊ नरेंद्र दाभोलकरांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी काही युवकांनी व विद्यार्थ्यांनी स्वत:हून फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याचे ठरवले आहे असे मी म्हणालो. काही विद्यार्थी दरवर्षी जर हजार रुपयांचे फटाके वाजवत असतील तर यावेळी ते पाचशे रुपयांचेच उडवून पाचशे रुपयांची तिथे बचत करणार व ते पाचशे रुपये पुस्तके वैज्ञानिक खेळणी अशा गोष्टींसाठी खर्च करणार असा संकल्प करतात. अजिबात फटाके उडवणार नाही असे ते म्हणत नाहीत. पण हे देखील एक सकारात्मक पाउल आहे.
लोकांना दाभोलकर हे काही १०० टक्के मान्य असतात असे अजिबात नाही. काहींना ७०,६०,५०,४०,३०,२०, अशी टक्केवारी पण असतेच. जेवढे मान्य आहेत तेवढेच ते आचरणात आणतात. विचार पटतात पण प्रत्यक्ष आचरणात आणता येत नाहीत असे ही लोक असतातच ना! ( कारण काही का असेना)

फटाके किती अन कसे वाजवावेत यावरील सूचना नक्कीच अंमलात आणता येण्यासारख्या आहेत. मात्र जर कुणी उठून " (हिंदूंच्या) दिवाळीत फटाक्यांच्यामुळे लाखोकरोडो रुपयांचा चूराडा होऊन पर्यावरणास महाभयंकर हानी पोचते म्हणून फटाकेही नकोत, (पक्षी दिवाळीही नको)" असे सुचवत असेल, तर ते मान्य होण्यासारखे प्रत्यक्षात येण्यासारखे नाही! एक तत्कालिन फ्याड याव्यतिरिक्त यास दुसरे काहीही म्हणता येणार नाही.
>>>>> मुल घाबरत असेल तर जबरदस्तीने लाव लाव घाबरु नकोस अस्ं सांगून त्यांना प्रोत्साहन देत असतात मोठी माणसे!! <<<<
मुल रान्गताना उठून चालायला/धावायला देखिल घाबरते, चाल चाल म्हणूनच शिकवावे लागते. पुढे सायकल सारखे दुचाकी वाहन शिकताना देखिल मुल घाबरतेच. तेव्हाही त्यास चालव चालव म्हणूनच प्रोत्साहन देऊन शिकवावे लागते. त्याचप्रकारे जर युद्धशास्त्रीय दृष्ट्या /युद्धजन्य परिस्थितीस साजेशा दारुगोळ्याच्या कानठळ्याबसणार्‍या आवाजाला अन आगीला जर मुल घाबरत असेल, तर त्याला तसेच घाबरट/शेळपट /मेंगळट राहू द्यावे अशा मताचे जे नसतात, ते जरुर मुलांना या जोखमीच्या बाबी शिकवतातच शिकवतात. (फक्त वर आधीच म्हणल्याप्रमाणे त्याचा किती अतिरेक करायचा की नाही हे देखिल शिकवायला हवे हे नक्की)

मला कुठुनतरी अशी माहिती मिळू शकेल का? की,
परवाच मोदींच्या सभेत फुटलेल्या सात बॉम्बयेवढ्या दारूच्या समकक्ष ताकदीमधे किती बारकेसारके फटाके होऊ शकतात? म्हणजे किती माळा/अ‍ॅटमबॉम्ब/भुईनळे लावले असता वरील एका बॉम्ब येवढी उर्जा/प्रदुषण/हानी होऊ शकेल? Wink
जगभरात एकूण किती ज्वालामुखी कार्यरत आहेत, अन त्यातुन बाहेरपडणार्‍या गंधकादी रासायनिक द्रव्यांची संख्या/मोजदाद किती? व त्या तुलनेत दिवाळीमधे दोन दिवस उडणार्‍या भारतातील एकुण फटाक्यांची उर्जा/मोजदाद किती?
रोजच्यारोज धावणार्‍या असंख्य "प्रवासी" वाहतुकीतील कार्स्/जीप्स्/दुचाक्या यांचेमार्फत किती इंधन जळून किती टन धूर निर्माण होतो व त्यात कार्बनमोनोक्साईड/शिसे वगैरेचे प्रमाण किती असते? तुलनेत दोन दिवस दिवाळीत उडविल्या जाणार्‍या फटाक्यांमुळे किती होते?
आजवर जगात झालेल्या अणूबॉम्बच्या/हायड्रोजनबॉम्बच्या/रॉकेट्स्च्या चाचण्या, निरनिराल्या शस्त्रे अस्त्रे यांच्या चाचण्या मधे वापरलेल्या दारुगोळ्याचे एकुण आकारमान व त्यामुळे झालेल्या उर्जा/प्रदुषणाचे मोजमाप किती?
मला जरा अजुन तुलनात्मक अन तर्कात्मक अभ्यास करायचा आहे म्हणून ही माहिती हवी आहे. Happy

फटाके मुक्त दिवाळी म्हणजे हजार रुपयांच्या ऐवजी पाचशेचे फटाके असे सांगीतले गेल्याने खरेतर माझी बोलतीच बंद झालेली आहे; पण तरीही परत विचारतोय की, मुलांचे भावविश्व उद्ध्वस्त न करता त्यांना फटाके आणण्यापासून परावृत्त कसे करावे?

सगळे उडवतात मग आपण का नाही अशा प्रश्नांना कशी उत्तरे द्यावी. एरवी लहानपणापासून बहुतेक सर्व बाबतीत बाकी सगळे बघ कसे करताहेत तू पण कर असे सांगत आलेलो असतो आपण (एखादेवेळी 'आपण' वर आक्षेप येऊ शकतो, पण तो अमूकदादा बघ कसा आपापला जेवतो, सगळे जेवण संपवतो, तो तमूक दादा बघ कसा अभ्यास पुर्ण करून मग खेळतो असे मी तरी सांगत असतो) अचानक ह्या एका बाबतीत बाकी सगळे लोक वागतात ते चूकीचे आहे आणि मी काय सांगतो हे बरोबर असे त्यांच्या गळी उतरवणे सोपे नाही. आणि अर्थातच मुलांवर सक्ती करायची नाहीये. तर कसे करावे.

अकु, इब्लिस लिहा की आपापले अनुभव. (इब्लिस - धार्मिक आणि श्रीमंत व्यक्तींकडेच आणि फार लक्ष देता बुवा तुम्ही, आम्हा अधर्मी आणि गरीब व्यक्तींकडे पण द्या की जरा लक्ष ;))

हे अनुभवाचे बोल फटाक्यांव्यतिरिक्त इतर काही गोष्टींकरताही कामास येतील.

(इब्लिस - धार्मिक आणि श्रीमंत व्यक्तींकडेच आणि फार लक्ष देता बुवा तुम्ही, आम्हा अधर्मी आणि गरीब व्यक्तींकडे पण द्या की जरा लक्ष डोळा मारा) >> Rofl

मुलांचे भावविश्व उद्ध्वस्त न करता त्यांना फटाके आणण्यापासून परावृत्त कसे करावे? >>>हर्पेन, हे काम आजकाल शाळाच करतात. त्यामुळे मुले हट्ट करत नाहीत. लहान मुलांचे फटाके वाजवण्याचे प्रमाण खरच कमी झाले आहे.
अवांतर - मला मुलगी आहे मुलग्यांची कथा कदाचीत वेगळी असू शकते.

मी नताशा+१
फटाक्यांचे दुष्परिणाम, फटाक्यांच्या कारखान्यांतली बालमजुरी यांच्याबद्दल माहिती सांगता येईल.

फटाके लाऊ नका प्रदूषण होतं

दिवे लाऊ नका > तेल/तूप यांचा नाश होतो

आकाशकंदील लाऊ नका > वीजेचा अपव्यय होतो

फराळ बनवू नका > पुन्हा, तेल/तूप यांचा नाश होतो आणि अतिरिक्त साखर पोटात जाते

नारळ फोडू नका > अंधश्रद्धा आहे. शिवाय नारळ फुकट जातात

उदबत्ती/धूप लाऊ नका > कित्ती कित्ती प्रदूषण होतं

फुले वाहू नका > निसर्गाची हानी होते

रोषणाई करु नका > प्रकाशप्रदूषण होतं, वीजेचा अपव्यय होतो

घंटा वाजवू नका > ध्वनीप्रदूषण होतं

Pages